मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 66

‘आशा रेडिओ पुरस्कार’ सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध रेडिओ वाहीन्यांच्या सहा रेडिओ जॉकींनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीद्वारे मुख्यमंत्र्यांनी आपल्या रेडिओवरील संगीत ऐकणे, गाने लिहीणे आदी छंदाविषयी मनमोकळा संवाद साधला. आपल्या आयुष्यातील रेडिओविषयक प्रसंगांचे वर्णन त्यांनी संवादाद्वारे केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले. रेडिओचे महत्व पूर्वापासुन असून आजही ते अबाधीत असल्याचे सांगत रेडिओ अंतिम व्यक्तिपर्यंत पोहचण्याचे सशक्त माध्यम आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेडिओचे महत्व अधोरेखीत केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आमच्या लहानपणी दिवसाची सुरूवात सकाळी रेडिओ ऐकण्यापासून व्हायची. विविध भारती रेडिओ वाहिनीवर सकाळी येणारी गाणी अगदी न चूकता ऐकली जायची. त्यामुळे रेडिओशी लहानपणापासूनच जुळता आले. शासन दरबारी रेडिओ क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठी काही तरी केले पाहिजे, हा विचार सातत्याने होता. या पुरस्कार सोहळा आयोजनातून त्याचे समाधान लाभत आहे. रेडिओवर कार्यक्रम सुरू असताना माणूस दिसत नाही, पण सचित्र दर्शन शब्दांमधून घडत असते, असे विचार मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले.

जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात रेडिओ जॉकी सिद्धू, अक्की, अर्चना, ब्रजेश, भूषण, सपना भट यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाचे समन्वयन हेनल मेहता यांनी केले. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ज्येष्ठ गायिका महाराष्ट्र भूषण आशा भोसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे उपस्थित होते.

संगीत हे मानवामध्ये संवेदनशीलता आणत असून तणावमुक्तीचे कार्य करते. प्रवासात किंवा तातडीच्या समस्या येवून मनस्थिती बिघडत असल्यास हमखास संगीत ऐकावे. त्यामुळे मन शांत होऊन विचार क्षमता विकसित होते. रेडिओवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी रेडिओवरील कार्यक्रमांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भागही बनविले आहे. त्यामुळे रेडिओचे महत्व कधीही कमी होणार नाही, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. रेडिओचे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू केला. रेडिओ केवळ संगीत ऐकण्याचे साधन नाही, तर संवादाचेही माध्यम होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले, अशा शब्दात पुन्हा एकदा रेडिओचे महत्व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विषद केले.

रेडिओवरील संवादाद्वारे जीवनाला उभारी देण्याचे काम – ॲड. आशिष शेलार

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड शेलार म्हणाले, सांस्कृतिक प्रवासाची मोठी वाटचाल रेडिओच्या माध्यमातून झाली आहे. शासनाने या प्रवासाची दखल घेत पुरस्कार सुरू केले आहे. 1923 मध्ये रेडिओ बॉम्बे नावाने रेडिओ वाहिनी सुरू झाली. रेडिओ क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य आहे. कोरोना काळात जीवनाला उभारी देण्याचे काम रेडिओवरील संवादाद्वारे करण्यात आले. यावेळी या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे महत्व लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील रेडिओ जॉकींशी संवादही साधला होता. मराठी संस्कृती रेडिओ वाहिन्यांवरील कार्यक्रमांमधून समाजापर्यंत जावू देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी रेडिओ नसते, तर मी नसते, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार 2025 हा विश्वनाथ ओक यांना देण्यात आला. तसेच आशा सर्वोत्कृष्ट पुरूष निवेदक पुरस्कार हा रेडिओ मिर्ची वाहिनीचे रेडिओ जॉकी जितूराज यांना, आशा सर्वोत्कृष्ट महिला निवेदक पुरस्कार हा रेड एफ एम वाहिनीच्या रेडिओ जॉकी मलिश्का यांना प्रदान करण्यात आला. तसेच आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार रेडिओ सिटी यांना, तर आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्राचा पुरस्कार विकास भारती रेडिओ केंद्र नंदूरबार यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमात 12 रेडिओ प्रकारात पुरस्कार देण्यात आले. राज्यात 16 रेडिओ वाहिन्या, 58 कम्युनिटी रेडिओ वाहिन्या व 60 केंद्र अस्तित्वात आहेत.

विसंअ/निलेश तायडे

000

छत्रपती शिवाजी महाराज परिक्रमा; भारत गौरव पर्यटन रेल्वेची पहिली फेरी पूर्ण

 केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार

मुंबई, दि. २१ :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा महापराक्रम आणि जाज्ज्वल्य इतिहासाला समर्पित ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ अर्थात परिक्रमेसाठी भारत गौरव पर्यटन रेल्वेची पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली. या सहा दिवसांच्या प्रवासात या विशेष रेल्वेच्या पर्यटक प्रवाशांना शिवप्रताप स्थळांच्या दर्शनाची पर्वणी लुटता आली. ही परिक्रमा शिवछत्रपतींना अभिवादनाची संधी देणारी संस्मरणीय अनुभूती असल्याचे सांगत, पर्यटक प्रवाशांनी  रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि आयआरसीटिसीच्या या संयुक्त उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

भारत गौरव पर्यटन रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ९ ते १४ जून या दरम्यानची पहिली फेरी नुकतीच पूर्ण केली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. ‘शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास, महाराष्ट्राचा जाज्ज्वल्य अभिमान जागवणाऱ्या या उपक्रमाला पर्यटक प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या संकल्पनेला केंद्रीय रेल्वे आणि आयआरसीटीसीने उत्स्फूर्त आणि सकारात्मक रित्या साकार केले आहे. यात सहभागी सर्व यंत्रणा आणि त्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही चोख जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, या सर्वांचे प्रयत्न देखील प्रशंसनीय आहेत. भारत गौरव रेल्वेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला जाज्ज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न महत्वाचा आहे. या आणि अशा अनेक उपक्रम-प्रयत्नात महाराष्ट्र यापुढेही सदैव सज्ज आणि अग्रभागी राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली आहे. अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांना पाठविले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट – भारत गौरव पर्यटन रेल्वेला शिवाराज्याभिषेक दिनी (९ जून) रोजी मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. त्यानंतर या विशेष रेल्वेने रायगड, पुणे – कसबा गणपती, लाल महाल आणि शिवसृष्टी, भिमाशंकर ज्योतिर्लिंग, शिवनेरी, प्रतापगड, कोल्हापूर- महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा आणि परत मुंबई असा प्रवास पूर्ण केला.

मुंबईतून रवाना झाल्यानंतर रेल्वेने पहिला थांबा माणगांव (जि. रायगड) येथे घेतला. येथून पर्यटकांना विशेष बसद्वारा स्वराज्याची राजधानी रायगडकडे येथे घेऊन जाण्यात आले. काही प्रवाशांना रोप-वेतून, तर काही प्रवाशी पायी चालत रायगडावर पोहचले. याठिकाणी या पर्यटकांना शिवराज्याभिषेक सोहळ्याचे क्षण आणि उत्साह अनुभवता आला. माणगांव-रायगड येथून रात्रीचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी पर्यटक रेल्वे पुणे रेल्वे स्टेशन येथे पोहचली. येथून पर्यटकांना शिवसृष्टी, शिव पराक्रमाचा साक्षीदार लाल महाल, आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब महाराजांनी स्थापना केलेल्या मानाचा गणपती कसबा गणपती यांचे दर्शन घेता आले. तिसऱ्या दिवशी पुण्यातून पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी आणि परिसराचे दर्शन घडवून आणण्यात आले. त्यानंतर पर्यटकांची बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर मंदिरात दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. चौथ्या दिवशी सकाळी रेल्वे पुणे येथून सातारा कडे रवाना झाली. पाचव्या दिवशी सातारा येथे आगमन आणि पुढे प्रतागगड येथे शिवप्रतापाचा साक्षीदार आणि शिवछत्रपतींनी बांधलेल्या गडाचे दर्शन घडवण्यात आले. यात गडावरील तुळजाभवानी मंदिर आणि परिसराची माहिती पर्यटकांना दिली गेली. या प्रवासात सह्याद्री पर्वत रांगामधील निसर्ग संपदेचा आणि विविध स्थळांच्या विलोभनीय दर्शनाचा आनंदही पर्यटकांना मनमुरादपणे घेता आला. सातारा येथून रात्री रेल्वे सहाव्या दिवसाच्या प्रवासासाठी कोल्हापूरला रवाना झाली. सहाव्या दिवशी कोल्हापूर येथे आगमनानंतर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरास भेट आणि श्री दर्शन. त्यानंतर पन्हाळगडास भेट, याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभ्या केलेल्या विविध वास्तूंसह, पन्हाळगड वेढ्यातून सूटका, महापराक्रमी बाजी प्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशिद स्मारक आदी स्थळांची माहिती देण्यात आली. सहाव्या दिवशी सायंकाळी हे सर्व पर्यटक कोल्हापूर येथून मुंबईकडे परतले.

सहा दिवस आणि पाच रात्रींच्या या प्रवासात या पर्यटक प्रवाशांच्या निवास-चहा-नाष्टा आणि भोजन, स्थानिक प्रवास यांचीही चोख व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासातील या सर्व ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि पर्यटन क्षेत्रातील घटकांनी पर्यटक प्रवाशांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श, पराक्रमाने पावन झालेल्या परिसरांची, स्थळांची प्रेरक माहिती मिळावी यासाठी तज्ज्ञ गाईडस् यांची व्यवस्था करण्यात आली. यामुळे या पर्यटक प्रवाशांनी भारत पर्यटन गौरव रेल्वेचे आणि या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. आयसीआरटीसीकडे तशा प्रतिक्रियाही त्यांनी उत्स्फुर्तपणे नोंदवल्या.

000

पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा तर कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

मुंबईदि. २१ :  पुणे विभागात झालेल्या पावसामुळे नद्यांमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेतअसे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाण्याची आवक ६३ हजार ६४५ क्युसेक इतकी होत असुन सद्यस्थितीत धरणात ७२.७९ टक्के इतका पाणी साठा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर असून अतिवृष्टीमुळे दापोलीखेडचिपळूण आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये झाड कोसळून आणि भिंत पडून खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. तसेच पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेल्याची नोंद झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग १७३ किमी ३०/६०० चिपळूण तालुक्यातील अंजवेल- रानवेल- पलटणे-श्रृंगरतली- कोटलूक- आबोली- भडगाव चारवेली रास्ता खचला असून  या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२१ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ३४ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७.९ मिमीकोल्हापूर २३.७ मिमीरायगड जिल्ह्यात १२.४ मिमी  आणि पालघर जिल्ह्यात ११.४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २१ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ७.९रायगड १२.४रत्नागिरी ३४,  सिंधुदुर्ग २७.९पालघर ११.४नाशिक ७.९धुळे ०.१नंदुरबार १.३जळगाव ०.२अहिल्यानगर ०.२पुणे ४.२सोलापूर ०.४,  सातारा १०.६,  सांगली ६.१,  कोल्हापूर २३.७छत्रपती संभाजीनगर ०.९जालना ०.४,  लातूर ०.५धाराशिव ३.२नांदेड ०.१,  परभणी ०.३हिंगोली २.५बुलढाणा ०.३अकोला ०.४वाशिम ०.१ अमरावती ०.१यवतमाळ ०.३वर्धा ०.३नागपूर ०.१भंडारा ०.७गोंदिया ०.५चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली जिल्ह्यात १.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पालघर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यूजालना जिल्ह्यात वीज पडून दोन प्राण्यांच्या मृत्यूठाणे जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यूनाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

000

विसंअ/एकनाथ पोवार

योगाभ्यास करून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरा

नियमित योगाने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखता येते – निवासी आयुक्त आर. विमला

नवी दिल्ली, दि. 21 : महाराष्ट्र सदनातील बँकेट सभागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’योगाभ्यास करून  उत्साहात साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी  महाराष्ट्र परिचय केंद्राला दिलेल्या संदेशामध्ये योग साधनेचे महत्व सांगितले, “योग ही भारताला मिळालेली प्राचीन देणगी असून, ती शरीर, मन आणि आत्म्याला निरोगी ठेवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने योगाभ्यास जागतिक चळवळ बनली आहे. ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्यासाठी योग’ या संकल्पने अंतर्गत योगाचा प्रसार करून ‘फिट इंडिया’ आणि ‘निरोगी भारत’संकल्प साकार करूया.”

महाराष्ट्र सदनात झालेल्या योगाभ्यास सत्रात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी सांगितले, “दररोज केवळ पाच मिनिटे योगासने केल्याने मन आणि शरीर निरोगी राहते, तसेच ताजेतवाने आणि प्रफुल्लित राहता येते. योग हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा. नियमित योगाभ्यासाने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखता येते, ज्यामुळे दैनंदिन जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने पार पाडता येतात.”

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या प्रशिक्षक निशा चंद यांनी योगासनांचे महत्त्व समजावून सांगितले आणि प्रात्यक्षिके सादर केली.

या कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहायक सुरक्षा अधिकारी अनिल चोरगे यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे कर्मचारी तसेच सुरक्षा जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात ‘ॐ’ च्या सामूहिक उच्चारणासह प्रार्थनेने झाली. सूक्ष्म व्यायामांमध्ये ग्रीवा चालन, कटी चालन आणि घुटना संचलन यांचा समावेश होता. योगासन सत्रात ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, शशांकासन, मक्रासन, भुजंगासन, पवनमुक्तासन आणि शवासन यांचा समावेश होता. प्राणायाम सत्रात कपालभाती, नाडीशोधन, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम आणि ध्यान मुद्रा यांचा सराव झाला.

00000

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

सांगली, दि. २१ (जि. मा. का.) : शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेने विश्वविक्रमी भक्तियोग साधला. यात त्यांना चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांची साथ लाभली. सर्व सांगली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील योगप्रेमींनी एकाच वेळी वारकरी तालावर योगसाधना करत विश्वविक्रमाला गवसणी घातली. वारकरी संगीतावर एकाच वेळी विविध ठिकाणांहून प्रत्यक्ष व दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होऊन सर्वाधिक व्यक्तिंनी केलेला योग या नावाने हा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदला गेला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये आयोजित भक्तीयोग – तालवारकरी … योगकरी… आरोग्य पंढरी… या  जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे होते. ते म्हणाले, शारीरिक व मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक असून यामध्ये सातत्य ठेवावे. जिल्ह्यातल्या 1600 हून अधिक केंद्रावर झालेल्या योगसाधना कार्यक्रमात जवळपास साडेपाच लाख योग प्रेमी उत्साहाने सहभागी झाले. यामध्ये ग्रामीण भागातील योगप्रेमी व महिलांचा भरभरून प्रतिसाद लाभला. सर्वांच्या अथक प्रयत्नातून भव्य दिव्य योग कार्यक्रम साजरा झाला. याचे वर्ल्ड बुक, आशिया बुक व इंडिया बुकमध्ये रेकॉर्ड झाले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अभिनव संकल्पनेतून हा अत्यंत सुंदर व देखणा कार्यक्रम झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर चितळे उद्योग समूह व गिरीष चितळे, विश्व योग केंद्र, वारकरी सांप्रदाय यांच्यासह या योग साधनेमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक घटकाचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले व सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, चितळे डेअरीचे गिरीष चितळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. विश्व योग दर्शन केंद्राचे योगविशारद बालकृष्ण चिटणीस, अंजली चिटणीस, हर्षद गाडगीळ, शैलेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी योगसाधनेचे प्रात्यक्षिक सादर केले.

सांगली जिल्ह्यातील सर्व 10 तालुक्यातील पोर्टलवर नोंदणीकृत 1 हजार 367 केंद्रे व अनोंदणीकृत अन्य केंद्रे अशा 1600 हून अधिक केंद्रांवरील जवळपास साडेपाच लाखाहून अधिक योगसाधक, योगप्रेमी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, सेवाभावी संस्थाचे प्रतिनिधी, नागरिक, युवक, महिला, शाळा महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी “भेदाभेद अमंगळ” याची साक्ष देत झूम वेबिनारद्वारे मुख्य केंद्राशी जोडले जात विश्वविक्रमास गवसणी घातली. वारकरी तालासाठी संगीत संयोजन प्रशांत भाटे, ध्वनिमुद्रण परेश पेठे यांनी केले. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना वर्ल्ड रेकॉर्डस बुक, आशिया बुक व इंडिया बुकमध्ये झालेल्या रेकॉर्डबद्दल प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले.

योग दिनाचे औचित्य साधून एक विश्वविक्रम करावा, ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची मूळ संकल्पना होती. “एक अकेला चल पड़ा, जानिबे-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया…” याप्रमाणे ती केवळ कल्पना न राहता त्यांच्या विचारांशी समरस होणारे लोक आपोआप जोडले गेले आणि गेल्या आठवडाभर चळवळ होऊन प्रत्येकाने यात योगदान दिले. दूरदृश्यप्रणालीद्वारे हा कार्यक्रम प्रसारित झाला. त्यात पोर्टलवर नोंदणी केलेले 5 लाख 34 हजार 632 व दूरदृष्यप्रणालीव्दारे जोडले गेलेले सहभागी असे मिळून जवळपास साडेपाच लाख योगप्रेमी, नागरिक प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी सहभागी झाले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ व्यक्तिगत वा एका संस्थेपुरता न राहता सामूहिक योग साधनेतून एकात्मता आणि सांस्कृतिक ओळख यांचे दर्शन घडविणारा ठरला. ही प्रेरणादायी सामूहिक कृती सांगलीकरांच्या मनात योगसंस्कार रुजवून सामाजिक बदल घडविण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल.

अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, जयश्री पाटील, भारती दिगडे, वर्ल्ड रेकॉर्डच्या सल्लागार रेणू अग्रवाल, नचिकेत जामदार, दत्ता आंबी महाराज, विश्व योगदर्शन केंद्र मिरज-सांगली चे योग साधक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, वारकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी योगप्रेमींनी एकाच वेळी एकाच तालावर समान योग रचनांसहित विश्व योग केंद्रांवरील विहित योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली.

हा भक्तियोग आणखी भक्तिमय करण्यासाठी परेश पेठे प्रस्तुत स्वरवैभव क्रिएशन सांगली यांच्या मार्फत मूळ कार्यक्रमाच्या पूर्वी भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले. अभिषेक तेलंग, कीर्ती पेठे यांनी गीतांचे सादरीकरण केले. त्यांना भास्कर पेठे यांनी हार्मोनियमची, प्रशांत भाटे यांनी कीबोर्ड व बासरीची, अक्षय कुलकर्णी यांनी तालवाद्याची तर स्वतः परेश पेठे यांनी तबल्याची साथ दिली. कार्यक्रमानंतर मनोहर सारडा यांच्या वतीने उपस्थित वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने भक्तीरसाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यावर उपस्थितांनी फुगड्या, झिम्माचा ताल धरला.

योगिनी स्मार्त एकादशी, जागतिक संगीत दिन यांचे औचित्य साधत भक्तीसंगीत व वारकरी तालावर योग करत भक्ती आणि योगाचा सुरेल भव्य दिव्य संगम साधला गेला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय व ग्रामीण सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

यावेळी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत्युमुखींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

०००००

जनतेच्या सहकार्याने अमली पदार्थ मुक्त कामठी करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि.२१ :  गेल्या वर्षभरात कामठी तालुक्यात अमलीपदार्थ विरोधी ३० मोठ्या कारवाया करून ६० लोकांना अटक करण्यात आली आहे. जनतेने आपल्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यवहाराबद्दल निडरपणे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करत जनतेच्या  सहकार्याने कामठी शहर अमलीपदार्थ मुक्त  करू,असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ऑपरेशन थंडर-२०२५ अंतर्गत कामठी येथील जयस्तंभ चौकात अमलीपदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, माजी राज्यमंत्री ॲड.सुलेखा कुंभारे, नागपूर पोलीस परिमंडळ -५चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले,तरुण पिढीला अमली पदार्थाचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे एक छुपे युद्ध सुरू आहे. अमली पदार्थाच्या आहारी गेलेले तरुण हे व्यसन करण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतात. कामठी शहरातही तरुणाईला अमली पदार्थाच्या विळख्यात ओढणारे षडयंत्र सुरू आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालयाने थंडर मोहीम सुरू केली आहे. जनतेने निडरपणे पोलीसांना अमलीपदार्थ विक्रेत्यांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

येत्या काळात नागपूर शहर पोलीस परिमंडळ-४ अंतर्गत खापरा, जरीपटका हद्दीतील भागांचा समावेश असलेले नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्यात  येईल, येथील भाजीमंडी परिसरात पोलीस स्थानक उभारण्यात येईल तसेच कामठी  शहर १०० टक्के सीसीटीव्ही सर्व्हेलन्सने सज्ज करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी ‘ऑपरेश थंडर’ अंतर्गत गेल्या दीड वर्षात करण्यात आलेल्या विविध कारवायांद्वारे ८ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती यावेळी  दिली. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी प्रास्ताविक केले तर पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी आभार मानले.

श्री. बावनकुळे यांच्या नेतृत्वात यावेळी जयस्तंभ चौक ते गोयल टॉकीज पर्यंत ‘अंमली पदार्थ विरोधी रॅली’ काढण्यात आली. सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले. तत्पूर्वी, श्री. बावनकुळे यांनी जयस्तंभ चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

००००

पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण

चंद्रपूर, दि. २१ : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सहा वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले.

नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, अजय चरडे, रविंद्र माने, तहसीलदार विजय पवार, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना, त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली स्वरुपात नवीन वाहने खरेदी करण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार एकूण सहा महिंद्रा बोलेरो न्युओ या वाहनांची खरेदी करून सदर वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. ही वाहने चंद्रपूर, गोंडपिपरी, मुल, वरोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा राजुरा आणि कोरपना येथील तहसीलदारांना देण्यात येणार आहे.

00000

 

योगाच्या माध्यमातून मानवाचा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक संगम – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

चंद्रपूर, दि. २१ : धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आज अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे. यावर मात करून निरोगी आणि उत्तम जीवन जगायचे असेल तर दैनंदिन जीवनात योगा करणे आवश्यक आहे. हा एक केवळ व्यायामच नाही तर योगामुळे मानवाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संगम साधण्यास मदत होते, असे विचार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित मुख्य शासकीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, अश्विनी सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संयुक्त राष्ट्र संघटनेने योगाचे महत्व ओळखले आणि 21 जूनला आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा ठराव पारीत केला. गत 11 वर्षांपासून जगातील 177 देशांमध्ये योग दिन साजरा केला जात आहे. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ ही 2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे. जिल्हा प्रशासनाने पतंजली योग समिती आणि विविध संघटनांच्या माध्यमातून चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुढील वर्षापासून सर्वांनी एकत्रित येऊन शासकीय योग दिन साजरा करावा. चंद्रपूरात योग संगम दिसणे आवश्यक आहे. पुढील आंतरराष्ट्रीय योग दिन यापेक्षा मोठ्या स्वरूपात व खुल्या मैदानात आयोजित करावा, अशा सुचनाही पालकमंत्री डॉ. वुईके यांनी दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुजन करण्यात आले. यावेळी योगशिक्षिका वैजंती गौरकार आणि कविता मंघानी यांनी उपस्थितांना योगाचे प्रात्याक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे संचालन मंगला घोगी आसुटकर यांनी केले. कार्यक्रमाला क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, मोरेश्वर गायकवाड, नंदू आवारे, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, संदीप वुईके, विजय ढोबाळे यांच्यासह पतंजली योग समितीचे इतर सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांगले व निरोगी आयुष्य योगामुळे शक्य : आमदार किशोर जोरगेवार

आज 11 वा आंतराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करीत आहोत. देशाच्या पंतप्रधानांनी योगाचे महत्व जगाला पटवून दिले, त्यामुळेच याला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. अनादी कालापासून भारतात योग सुरू असून याला अनन्यसाधारण महत्व आहे. चांगले आयुष्य केवळ योगामुळेच मिळू शकते. कोणत्याही आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल किंवा मनाच्या शांतीसाठी योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

उपस्थितांनी केली ही आसने : कपालभारती प्राणायाम, अनुलोमविलोम, ब्राभरी प्राणायाम, वज्रासन, स्कंदसंचालन, स्कंदस्थलांतरण, स्कंदचक्र, घुटनासंचालन, ताडासन, वृक्षासन, पादअष्टासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्धवज्रासन, उत्तंगासन, वक्रासन, भुजंगासन, अर्धहलासन, पवनउत्तासन, शवासन आदी आसने करण्यात आली.

००००००

स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ६.0 राबविणार – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. २१ – पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे. राज्यस्तरावर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्यानंतर आता १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ‘माझी वसुंधरा अभियान .0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

निसर्गाच्या भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांवर लक्ष केंद्रीत करून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यास सुरूवात करण्यात आली. निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध शासकीय योजना, कार्यक्रम, उपाययोजना एकत्रित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्या प्रभावीपणे व मिशनमोड पद्धतीने राबविण्यासाठी अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत पाच टप्प्यात माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी झाली आहे.

राज्यातील २८,३१७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार अंमलबजावणी

माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक संस्थांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अमंलबजावणीनंतर ‘माझी वसुंधरा अभियान .0’ची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत नोंदणी केलेल्या ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व २७,८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८,३१७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान .0’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकसंख्या निहाय गट करून स्पर्धा घेण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) तयार करण्यात आला असून त्यावर १५ जुलै २०२५ पर्यंत सूचना/अभिप्राय मागविण्यात आले आहे. त्या सूचनांचा विचार करून अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) अंतिम करण्यात येणार आहे.

त्रयस्थ यंत्रणेद्वारे होणार कामांचे मूल्यांकन

या अभियानाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर केलेल्या कामांचे मूल्यमापन करून गुणांकन दिले जाणार आहे. यामध्ये अमृत गटासाठी १५,१२५ व अमृत गट वगळून इतर नागरी संस्थांच्या गटांसाठी १४,६२५ आणि ग्रामपंचायतीसाठी १३,६२५ गुण ठेवण्यात आले आहे. त्रयस्थ यंत्रणेद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामांचे मूल्यांकन करून पुढील वर्षी ५ जून २०२६ रोजी निकाल जाहीर करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

 

कार्बन पृथक्करण, हरित वायूचे उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे या बाबींवर लक्ष केंद्रीत करून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंदणी करावी. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आयुक्त, मुख्याधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक आदींनी माझी वसुंधरा अभियान .0 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

विसंअ/नंदकुमार वाघमारे

 ००००

 

 

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. २१ : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही. https://wa.link/o93s9m यावर आपले मत नोंदवा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत -भारत@२०४७ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२९ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा यासाठी विकसित महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन जाहिर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दि. ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

या कार्यक्रमामध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन अशी टप्पानिहाय उद्दिष्टे ठेवण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. व्हिजन डॉक्युमेंटचा आराखडा तयार करण्यासाठी १६ संकल्पनांवर आधारीत क्षेत्रनिहाय गट बनविण्यात आले आहेत. यामध्ये कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, नगर विकास, भूसंपदा, जलसंपदा, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, सामाजिक विकास, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान व मानव विकास, मनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय/अशासकीय संस्थांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.

विकसित महाराष्ट्राच्या व्हिजन मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियानाचे उद्धाटन मुख्यमंत्री यांनी दिनांक १७ जून, २०२५ रोजी केले आहे. सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पासून गावपातळीवरील कार्यालय प्रमुखांनी सर्वेक्षणामध्ये सर्व नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावेत यासाठी दर्शनी भागावर फलक लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले आहेत. यामध्ये नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही.

0000

 

ताज्या बातम्या

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद...

0
मुंबई, २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार

0
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...

महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते २२ जुलै रोजी प्रकाशन

0
मुंबई, दि. २१ :-  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ :-  राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत आहे. शासनाच्या या...