सांगली, दि. १ (जि. मा. का.) : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणसे निर्माण केली जातात. समाज घडवला जातो. सर्व सामान्यांची मुले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार असून, राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केले.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मिरज तसेच १२५ वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सांगली या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन व लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिरज येथे रमा उद्यान, मेडिकल कॉलेज ग्राऊंडच्या शेजारी, वसतिगृह इमारत ठिकाणी आयोजित या कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सामाजिक न्याय विभागाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण मेघराज भाते उपस्थित होते.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात १२५ वसतिगृहात उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृहे असावीत, या दृष्टीने वाटचाल सुरू केली. भविष्यात भाडे तत्त्वावरील वसतिगृहे शासकीय इमारतीत व्हावीत, यासाठी प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, विद्यार्थी दशेत असताना अनेक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जडणघडण वसतिगृहात झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही देण आहे. मागासवर्गियांची मुले या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया इथे घातला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना थ्री स्टार प्रमाणे सोयी सुविधा द्याव्यात. वसतिगृहात अंतर्गत व बाह्य स्वच्छता नियमित ठेवावी, असे त्यांनी सूचित केले.
आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आपण सामाजिक न्याय मंत्री पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे शासकीय इमारतीत असावीत, विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले. वसतिगृहातील सुविधा दर्जेदार असाव्यात, विद्यार्थ्यांना सुरक्षित, संरक्षित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. तालुक्यात १७ बौद्ध विहार बांधली. जिल्ह्यातील दोन वसतिगृहे खाजगी जागेत असून, ती शासकीय जागेत असावीत यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, त्यास मान्यता द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात सहायक आयुक्त समाजकल्याण मेघराज भाते म्हणाले, जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या सहा निवासी शाळा आहेत. तसेच २१ शासकीय वसतिगृहे असून, त्यापैकी दोन वसतिगृहे वगळता अन्य सर्व वसतिगृहे शासकीय जागेत आहेत. या वसतिगृहात शिक्षण घेऊन अनेक चांगले विद्यार्थी घडले आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते दोन्ही वसतिगृहांचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.
00000