सोमवार, जून 2, 2025
Home Blog

बंदरे विभागाने लोकाभिमुख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा – मंत्री नितेश राणे

Oplus_131072

मुंबई, दि. २ : बंदरे विभागाने मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पहिल्या तीन विभागांमध्ये क्रमांक मिळवण्याच्या दृष्टीने काम करावे. तसेच अधिक लोकाभिमुख होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मंत्रालयात १५० दिवसांच्या अनुषंगाने बंदरे विभागाचा आढावा मंत्री श्री. राणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, १५० दिवसांच्या कार्यक्रमासाठी बंदरे विभागाने परिपूर्ण तयारी करावी. वेगवेगळ्या राज्यात बंदरे हाताळणीसाठी वापरण्यात येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा विभागाने अभ्यास करावा. बोटींना ट्रॅक करण्यासाठी ॲप विकसित करावे. बंदरे विकास आणि बोटींच्या नियंत्रणासाठी विभागाची स्वतःची आधुनिक व्यवस्था विकसित करावी. या सर्व गोष्टींसाठी अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करावे. सविस्तर अभ्यास करून त्याचा आराखडा तयार करावा. प्रलंबित असलेली पदभरती तसेच रिक्त पदांवरील नियुक्त्या मार्गी लावाव्यात. ‘आय गॉट’ नोंदणी करावी, हरीत बंदर उभारणीवर भर द्यावा, अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

‘वॉटर टॅक्सी’ सुरू करण्यासाठी बंदरे विभागाने नियोजन करावे – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २ : गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Oplus_131072

मंत्री श्री. राणे म्हणाले, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्याटप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेट्टी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी जोडला जाईल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल,  असेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक दि.२ : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटर नाशिकच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ.पल्लवी धर्माधिकारी, अण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, रुग्णालयाला श्री साईबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही. हा मंत्र आपण विसरल्याने जीवनशैलीशी निगडित विविध आजार आपल्याला होतात. गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले आहे. साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल. सेवा करणे हा हॉस्पिटल काढण्यामागचा उद्देश असल्याने गरिबातील गरीब माणसाची सेवा इथे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

०००००

‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ उपक्रमांतर्गत धोरणासाठी नागरिकांच्या सूचना

नागरिकांना आवाहन

महाराष्ट्र शासनाने ‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ या विशेष उपक्रमांतर्गत लघु, मध्यम आणि दीर्घ काळासाठी राबवायच्या कार्यपद्धतीसाठी धोरण तयार करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासाठी आखण्यात येणाऱ्या प्रस्तावित धोरणाच्या निर्मितीत लोकसहभाग असावा या हेतूने नागरिकांकडून विविध सूचना मागविण्यात येत आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाशी संबंधित आपल्या अपेक्षा, विचार, संकल्पना आणि सूचना महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra@maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर दि. १५ जून २०२५ पर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

000

पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा  दि. १: सातारा जिल्हा बहुतांश डोंगरी व दुर्गम आहे. या भागात कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला वाहनांसह आत्याधुनिक साहित्य देण्यात येत आहे. पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाने वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबणीस यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


पोलीस विभागाकडून चांगल्या कामाची अपेक्षा सर्व जण करतात यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यात येत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून 15 स्कॉर्पीओ, 1 थार, 4 मोठ्या बसेस,दामिनी पथकासाठी 16 प्लेझर स्कूटी मिळाल्या आहेत. दामिनी पथकातील महिला पोलीस शाळा, महाविद्यालय, क्लासेस व गर्दीच्या ठिकाणी गस्त घालतील.

पोलीस विभागाला आवश्यक त्या सर्व गोष्टी दिल्या जातील. सातारा पोलीस दलाचे काम उठावदार आहे ते आणखीन उठावदार होण्यासाठी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजनेतून 15 स्कॉर्पीओ, 1 थार, 4 मोठ्या बसेस   दामिनी पथकासाठी 16 प्लेझर स्कूटी मिळाल्या आहेत. पोलीस विभाग सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करीत आहे. सातारा पोलीस विभाग या पुढेही उत्तम पद्धतीने काम करील असे पोलीस अधीक्षक श्री. दोशी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्री. देसाई यांनी हिरवा झेंडा दाखून वाहने मार्गस्त केली.
0000

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आरगच्या बौद्ध विहार इमारतीची पाहणी

सांगली, दि. १ (जि. मा. का.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन केलेल्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या आरग (ता. मिरज) येथील बौद्ध विहार इमारतीची पाहणी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केली. यावेळी माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी इमारतीच्या दर्जेदार कामाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना करून येत्या 15 तारखेपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी केल्या.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेवून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मेघराज भाते आदि उपस्थित होते.

 लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय इमारतीचेही लोकार्पण

 दरम्यान तत्पूर्वी मिरज येथील वार्ड क्रमांक 20 मध्ये बांधण्यात आलेल्या लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय इमारतीचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महापालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण व समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासह महापालिकेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते.

 सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, हे सुंदर असे बौद्ध विहार उभारण्यात आले असून, यातील ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. या ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवावे. या भागातील विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, या भागातील विविध विकासकामांसाठी प्रस्ताव द्यावेत. ती कामे मार्गी लावू, अशे त्यांनी यावेळी आश्वासित केले.

00000

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे ⁠थ्री स्टार करणार, राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सांगली, दि. १ (जि. मा. का.) : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणसे निर्माण केली जातात. समाज घडवला जातो. सर्व सामान्यांची मुले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार असून, राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मिरज तसेच १२५ वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सांगली या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन व लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिरज येथे रमा उद्यान, मेडिकल कॉलेज ग्राऊंडच्या शेजारी, वसतिगृह इमारत ठिकाणी आयोजित या कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सामाजिक न्याय विभागाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण मेघराज भाते उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात १२५ वसतिगृहात उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृहे असावीत, या दृष्टीने वाटचाल सुरू केली. भविष्यात भाडे तत्त्वावरील वसतिगृहे शासकीय इमारतीत व्हावीत, यासाठी प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.  

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, विद्यार्थी दशेत असताना अनेक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जडणघडण वसतिगृहात झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही देण आहे. मागासवर्गियांची मुले या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया इथे घातला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना थ्री स्टार प्रमाणे सोयी सुविधा द्याव्यात. वसतिगृहात अंतर्गत व बाह्य स्वच्छता नियमित ठेवावी, असे त्यांनी सूचित केले.

आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आपण सामाजिक न्याय मंत्री पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे शासकीय इमारतीत असावीत, विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले. वसतिगृहातील सुविधा दर्जेदार असाव्यात, विद्यार्थ्यांना सुरक्षित, संरक्षित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. तालुक्यात १७ बौद्ध विहार बांधली. जिल्ह्यातील दोन वसतिगृहे खाजगी जागेत असून, ती शासकीय जागेत असावीत यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, त्यास मान्यता द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात सहायक आयुक्त समाजकल्याण मेघराज भाते म्हणाले, जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या सहा निवासी शाळा आहेत. तसेच २१ शासकीय वसतिगृहे असून, त्यापैकी दोन वसतिगृहे वगळता अन्य सर्व वसतिगृहे शासकीय जागेत आहेत. या वसतिगृहात शिक्षण घेऊन अनेक चांगले विद्यार्थी घडले आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते दोन्ही वसतिगृहांचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.

 

00000

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ जून सायंकाळपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई, दि. १ – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असून नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमधील नोंदणीमध्ये दि. १ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अखेर १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.

प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून विद्यार्थी नोंदणी करत असून संकेतस्थळावर ताण येत असल्याने थोड्या प्रमाणात संकेतस्थळ संथ गतीने चालणे तसेच प्रवेश शुल्क भरण्यामध्ये अडचणी कॉलेज पसंतीक्रम भरण्यामध्ये अडथळे येणे अशा अडचणी निदर्शनास आल्या. याबाबींवर संबंधित कंपनीमार्फत तत्काळ उपायोजना/ पर्यायी व्यवस्था करुन प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा नोंदणी अर्ज भरण्याकरिता दिनांक २६ मे २०२५ ते ३ जून २०२५ पर्यंतचा एकूण नऊ दिवसांचा पुरेसा कालावधी देण्यात आला असून या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर केली जाईल असेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात असून कोणत्याही विद्यार्थ्याने काळजी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील काही बदल नवीन पर्याय समाविष्ट करणे आवश्यक असल्याने त्याबाबतचे काम सुरू होते. यादरम्यान क्षेत्रिय स्तरावरुन आणि तज्ज्ञांकडून प्राप्त होणारे बदल यामुळे संकेतस्थळ तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागला. त्यामुळे प्रक्रियेच्या जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दि. २१ मे २०२५ पासून प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी सुरू करणे शक्य झाले नाही. यानंतर संकेत स्थळाबाबत तांत्रिक अडचणी दूर करुन दि. २६ मे २०२५ पासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आली. या बदलाबाबत संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे) यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे स्पष्टीकरण देखील दिलेले आहे.

विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी विभागस्तरावर तांत्रिक सल्लागार मार्गदर्शन केंद्र हेल्पलाईन नंबर सपोर्ट डेस्क संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेमधील माहिती पुस्तिका प्रश्न-उत्तरे विद्यार्थी युजर मॅन्युअल ‘करीअर पाथ’ चा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांस काही बदल करावयाचा असल्यास ग्रीवन्सचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. विद्यार्थी/ पालक यांच्यासाठी विभाग स्तरावर/ जिल्हा स्तरावर अधिकारी/ कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक संकेत स्थळावर देण्यात आलेले असल्याचेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यात प्रवेश प्रकिया राबविण्यात येणार असल्याने यामध्ये ९३४२ कनिष्ठ महाविद्यालयांमधून २० लाख ८८ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमता उपलब्ध झाली असल्याचेही शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००

बेंगळुरू येथील इनोव्हेशन केंद्र आणि कृषी विज्ञान विद्यापीठाला कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांची भेट

मुंबई, दि.1 : स्मार्ट शेतीसाठी बेंगळूरच्या धर्तीवर  महाराष्ट्रात प्रगत कृषी केंद्रांची (इनोव्हेशन केंद्र) उभारणी  करण्याचा धोरणात्मक आराखडा तयार करण्यात येईल. यामुळे शेतीत शिक्षण घेणाऱ्या नव्या पिढीला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळेल व शेतकऱ्यांना नव्या साधनांचा लाभ होईल, ज्यामुळे शेती अधिक उत्पादनक्षम, कार्यक्षम व शाश्वत होईल.असे मत कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.

बेंगळुरू येथील स्मार्ट शेतीसाठी नवप्रवर्तन केंद्र, कृषी विज्ञान विद्यापीठ (UAS) ला  कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. कृषी विज्ञान विद्यापीठचे  कुलगुरू, स्मार्ट शेतीसाठी इनोव्हेशन केंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी  व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने स्मार्ट शेतीसाठी (CDSA)इनोवेशन केंद्रात वापरल्या जाणाऱ्या प्रगत कृषी तंत्रज्ञान व नवकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव या भेटीदरम्यान घेतला. महाराष्ट्रात अशा प्रकारची अत्याधुनिक केंद्रे स्थापन करण्यासाठी शक्यता आणि कार्यपद्धती यांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना लाभ देणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. यावेळी शिष्टमंडळाने संपूर्ण नाविन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी केली.

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी केले बेंगळूर येथील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी  केंद्राच्या पाहणीनंतर  कृषी विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत नवप्रवर्तन केंद्राच्या कार्यपद्धती व पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानामुळे मिळणारे व्यावहारिक ज्ञान व कौशल्य, शेतकऱ्यांच्या अनुभवांद्वारे मिळालेला फायदा — उत्पादनवाढ, खर्चात बचत, आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल याविषयी सविस्तर चर्चा झाली.

केंद्रात सादर करण्यात आलेल्या तंत्रज्ञान व नवकल्पनांनी कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे प्रभावित झाले. त्यांनी अशा केंद्रांचा शेतीतील क्रांतीसाठी असलेला उपयोग आणि विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी उपक्रमांची माहिती घेऊन राज्यात त्याबाबत नक्कीच कार्यवाही करू  असेही सांगितले.

  • स्वयंचलित ट्रॅक्टर्स आणि कृषी अवजारे: स्वयंचलित ट्रॅक्टर व त्यांच्यासोबत चालणाऱ्या अवजारांची कार्यक्षमता व श्रमबचतीसाठी असलेले महत्त्व.
  • कृषी ड्रोन: ड्रोनचा वापर पिकांचे निरीक्षण, कीड ओळख, आणि अचूक फवारणीसाठी कसा करता येतो याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने या उपक्रमाची माहिती घेतली.
  • प्रेसिजन शेती तंत्रज्ञान: जी. पी. एस. आधारित प्रणाली व बदलत्या दराने खते व औषधे देण्याच्या प्रणालीसह अचूक शेती तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
  • शेती उपकरण डिझाईन लॅब्स: स्थानिक गरजांसाठी उपयुक्त व नवोन्मेषक्षम शेती उपकरणे तयार करणाऱ्या लॅब्सची यावेळी माहिती देण्यात आली.

 

0000

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटींची तरतूद -सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. 1 : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने 25 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, सद्यःस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या मालकीतील 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अधिकाऱ्यासमवेत आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली आहे. स्मारक उभारणीमुळे अण्णा भाऊ साठे यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे मंत्री शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, आमदार डॉ. अशोकराव माने, जिल्हाधिकारी अशोक काकडे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबातील सदस्य सचिन साठे उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमीला भेट देऊन शिल्पसृष्टीची ही पाहणी केली तसेच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

000

ताज्या बातम्या

बंदरे विभागाने लोकाभिमुख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. २ : बंदरे विभागाने मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पहिल्या तीन विभागांमध्ये क्रमांक मिळवण्याच्या दृष्टीने काम करावे. तसेच अधिक लोकाभिमुख होण्यासाठी नवनवीन...

‘वॉटर टॅक्सी’ सुरू करण्यासाठी बंदरे विभागाने नियोजन करावे – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. २ : गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे...

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नाशिक दि.२ : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असे प्रतिपादन...

‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ उपक्रमांतर्गत धोरणासाठी नागरिकांच्या सूचना

0
नागरिकांना आवाहन महाराष्ट्र शासनाने 'विकसित महाराष्ट्र - २०४७' या विशेष उपक्रमांतर्गत लघु, मध्यम आणि दीर्घ काळासाठी राबवायच्या कार्यपद्धतीसाठी धोरण तयार करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत माहिती...

पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा  दि. १: सातारा जिल्हा बहुतांश डोंगरी व दुर्गम आहे. या भागात कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला वाहनांसह आत्याधुनिक...