शनिवार, एप्रिल 12, 2025
Home Blog Page 2

शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत – शिक्षणमंत्री दादाजी भुसे

नंदुरबारदिनांक 11 एप्रिल, 2025 (जिमाका) : शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावा. आपल्या शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी करण्याच्या भावनेने  कर्तव्य करावे, असे आवाहन शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. या बैठकीस साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्यासह शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना वळवी, शिक्षणाधिकारी (योजना) उर्मिला पारधे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डॉ. राजेंद्र महाजन, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) नीलेश लोहकरे, अधिव्याख्याता, डाएट बाबासाहेब बढे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. युनूस पठाण, सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच उपक्रमशील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत सिंगापूरला अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या आणि जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील गुणवत्ता वाढवण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली.

मंत्री श्री.भुसे यांनी  अधोरेखित केलेले मुद्दे

  • हुशार विद्यार्थ्यांनीच इतर विद्यार्थ्यांना शिकवण्याचे उपक्रम घ्यावेत.
  • गावातील सुशिक्षित युवकांनीही लहान मुलांना शिकवण्यासाठी पुढे यावे.
  • घरातील आई-वडील, आजी-आजोबा यांनी रोज अर्धा तास मुलांशी संवाद साधावा व अभ्यासक्रम समजून घ्यावा.
  • संपूर्ण वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे वार्षिक शालेय कॅलेंडर तयार करण्यात येत आहे.
  • एक आदर्श शाळा निवडून केंद्रस्तरावर विशेष योजना राबवली जाणार.
  • उर्दू शिक्षकांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाणार.
  • स्पेशालिस्ट शिक्षकांचा अनुभव व ज्ञान संपूर्ण जिल्ह्यासाठी वापरला जाईल.

प्राथमिक सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चरबाबत मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश :

  • प्रत्येक शाळेत स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी आणि उत्तम स्वच्छतागृह असावे.
  • केंद्रप्रमुखांनी शाळांना नियमित भेटी द्याव्यात व अडचणींचे त्वरित निराकरण करावे.
  • शिक्षकांनी मे महिन्यात पालकांशी संवाद साधावा आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करावा.
  • गणवेशासाठीची रक्कम शासनाकडून आगोदरच दिली जाईल, त्यामुळे गणवेश व भोजन हे दर्जेदार असले पाहिजे.

विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना :

  • पुस्तकांबरोबरच इतर जीवनोपयोगी ज्ञान देण्याचा विचार.
  • विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रूम’ उपलब्ध करून देण्यात येणार.
  • शालेय सायकल योजना सुरु करण्याचा विचार.
  • शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी घरी उत्पादित भाजीपाला शाळेत विक्रीसाठी आणावा, असे उपक्रम राबवावेत.
  • विद्यार्थ्यांची सहल विविध क्षेत्रात नेऊन त्यांना त्या क्षेत्राची माहिती दिली जावी.

शिक्षकांच्या सोयीसाठी उपाय :

  • अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करून शिक्षणाशी संबंधित कामांना प्राधान्य.
  • गुणवंत शिक्षकांचे कार्य इतर शाळांनी देखील आत्मसात करावे.
  • खेळात प्राविण्य असल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पाठिंबा.
  • शिक्षण हे पुण्याचे काम आहे आणि आपल्याला ही संधी मिळाली आहे, त्याचे सोनं करावे.

शेवटी मंत्री श्री. भुसे यांनी सर्व गुणवंत शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

मालाड येथे भव्य क्रिएटिव्ह स्पेसचा विकास होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ११ : मालाड येथील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या (I&B) अखत्यारितील जवळपास २४० एकर जागेत भव्य क्रिएटिव्ह स्पेसचा विकास केला जाईल. या योजनेत केंद्र आणि राज्य शासन एकत्र येऊन को-क्रिएशन मॉडेलद्वारे काम करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथील जिओ कन्व्हेंन्शन सेंटर येथील वेव्हज् २०२५ निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईला वर्ल्ड एंटरटेनमेंट कॅपिटल बनवण्याचं स्वप्न सत्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या या पुढाकारामुळे भारतातील नव्हे तर जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसाठी मुंबई एक हब ठरणार आहे. पोस्ट प्रॉडक्शन, स्टुडिओज, फिल्म टेक्नोलॉजी, अ‍ॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससारख्या आधुनिक सेवा आणि अभ्यासाचे वर्ल्ड क्लास सेंटर इथे उभारले जाणार आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईचं स्थान केवळ देशातच नव्हे, तर जगात एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील प्रमुख केंद्र म्हणून बळकट होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

0000

 

केंद्र शासनाच्या पुढाकाराने मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुंबई, दि. ११ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुंबई मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे. मात्र, या नव्या संस्थेमुळे भारताच्या सृजनशील उद्योगास जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथील जिओ कन्व्हेंन्शन सेंटर येथील वेव्हज् २०२५ निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक राजधानीत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ची (आयआयसीटी) स्थापना करण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब करण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश आहे. हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, त्याचा लौकिक जगभरात होणार आहे. आयआयसीटीमुळे क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उद्योगाला नवी दिशा मिळणार आहे.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ ही संस्था केवळ चित्रपट निर्मितीपुरती मर्यादित न राहता, डिजिटल कंटेंट, व्हीएफएक्स, ॲनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरी टेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब ३.० तंत्रज्ञान अशा क्षेत्रांतील संशोधन व प्रशिक्षणात कार्यरत असेल. यासाठी महाराष्ट्र शासनाने गोरेगाव येथील फिल्मसिटी येथे जागा निश्चित केली आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

0000

 

 

 

 

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ : ६० फेलोंची निवड करण्यात येणार

मुंबई, दि. ११ :- राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे. या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी १५ एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात येऊन यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर २०२३-२४ या कालावधीतील  कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यानंतर आता २०२५-२६ साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

फेलोंच्या निवडीचे निकष : अर्जदार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६०% गुण आवश्यक) असावा.

अनुभव : किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.

भाषा व संगणक ज्ञान : मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असावे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईनअॅप्लिकेशन प्रणालिद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.

अर्जाकरिता शुल्कः- रुपये ५००/-

या कार्यक्रमात फेलोंची संख्या ६० इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या १/३ राहील. १/३ महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.

निवड प्रक्रिया :- फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा (Online Objective Test) द्यावी लागेल.

ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील. यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील.

वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या सुमारे २१० उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरील निबंध विहित तारखेस व वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल.

निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक २० जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद यांच्या अधिनस्त काम पाहतील.

फेलोंची नियुक्ती १२ महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजु झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.

या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये ५६,१००/- व प्रवासखर्च रुपये ५,४००/- असे एकत्रित रुपये ६१,५००/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.

शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिपचा अविभाज्य भाग असेल. निवड झालेल्या फेलोंसाठी आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करताना फेलोंना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर ऑफलाईन व ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जाईल. ऑफलाईन व्याख्याने फेलोशिपच्या सुरुवातीस दोन आठवडे तसेच सहा महिन्यानंतर व शेवटी प्रत्येकी एक आठवडा, आयआयटी, मुंबई येथे आयोजित करण्यात येतील. याव्यतिरीक्त ऑनलाईन व्याख्याने वर्षभरात कार्यक्रमाच्या गरजेनुसार शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी आयोजित करण्यात येतील. ऑफलाईन व ऑनलाईन सर्व व्याख्यानांना उपस्थित रहाणे फेलोंना अनिवार्य आहे. या कार्यक्रमाचा उद्देश फेलॉना सार्वजनिक हितासाठी काम करताना व धोरण निर्मिती करताना योग्यसाधने व शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यासाठी मदत करणे तसेच विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये व क्षमता वाढविणे हा असेल.

सदर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोंना संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल. शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यालय वा प्राधिकरणासोबत फेलोंनी करावयाचे काम (फील्ड वर्क) व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील.

शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त परिचय सत्र, विविध सामाजिक संस्थांना भेटी, मान्यवर व्यक्तींशी संवाद, प्रमाणपत्र प्रदान या उद्देशाने वर्षभरात इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

0000

 

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा कायापालट – रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांची माहिती

मुंबई, दि. 11 :- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री.वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, भुसावळ, इत्यादी. तसेच, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे, जसे की – अकलकोट रोड, दौंड, इगतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड इत्यादींचा समोवश आहे.

या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

या पुनर्विकासात स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे. अजनी स्टेशन (297.8 कोटी), नागपूर जं. (589 कोटी), नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जं. (17.4 कोटी), जालना (189 कोटी), छत्रपती संभाजीनगर (241 कोटी), रोटेगाव (12 कोटी), अहिल्यानगर (31 कोटी), भायखळा (35.5 कोटी), चिंचपोकळी (52 कोटी), चर्नी रोड (23 कोटी), छत्रपती शिवाजी महाराज टमिनल (1813 कोटी), ग्रॅट रोड (27 कोटी), लोअर परेल (30 कोटी), मरिन लाईन्स (27.7 कोटी), सॅण्डहर्स्ट रोड (16.4 कोटी), मुर्तिजापूर स्टेशन (13 कोटी), बडनेरा (36.3 कोटी), बारामती (11.4 कोटी), दौंड (44 कोटी), केडगाव (12.5 कोटी), परळी वैजनाथ (25.7 कोटी), भंडारा रोड (7.7 कोटी), गोंदिया 40 कोटी), तुमसर रोड (11 कोटी), टिटवाळा (25 कोटी), शेगाव (29 कोटी), बल्लारशाह (31.4 कोटी), चंद्रपूर (25.5 कोटी), चांदा फोर्ट (19.3 कोटी), धुळे (9.5 कोटी), लासलगाव (10.5 कोटी), मनमाड (45 कोटी), नगरसोल (20.3 कोटी), नांदगाव (20 कोटी), आमगाव (7.8 कोटी), वडसा (20.5 कोटी), हातकंणगले (6 कोटी), हिमायतनगर (43 कोटी), हिंगोली डेक्कन (21.5 कोटी), किनवट (23 कोटी), चाळीसगाव (35 कोटी), अंमळनेर (29 कोटी), धरणगाव (26 कोटी), पाचोरा जं. (28 कोटी), दिवा (45 कोटी), मुंब्रा (15 कोटी), शहाड (8.4 कोटी), कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (43 कोटी), लातूर (19 कोटी), जेऊर (20 कोटी), कुर्डूवाडी जं (20 कोटी), फलटण (1 कोटी), वाठर (8 कोटी), आकुर्डी (34 कोटी), चिंचवड (20.4 कोटी), देहू रोड स्टेशन (8.05 कोटी), तळेगाव स्टेशन (40.34 कोटी), मालाड स्टेशन (12.32 कोटी), कुर्ला जं. स्टेशन (28.81 कोटी), कांजुरमार्ग स्टेशन (27 कोटी), विद्याविहार स्टेशन (32.8 कोटी), विक्रोळी स्टेशन (19 कोटी), जोगेश्वरी स्टेशन (119 कोटी), माटुंगा स्टेशन (17.3 कोटी), परळ स्टेशन (19.4 कोटी), प्रभादेवी (21 कोटी), वडाळा स्टेशन (23 कोटी), भोकर स्टेशन (11.3 कोटी), धर्माबाद स्टेशन (30 कोटी), मुखेड जं.स्टेशन (23 कोटी), उमरी स्टेशन (8 कोटी), देवळाली स्टेशन (10.5 कोटी), इगतपुरी स्टेशन (12.5 कोटी), धाराशिव स्टेशन (22 कोटी), गंगाखेड स्टेशन (16 कोटी), मनवथ रोड स्टेशन (12 कोटी), परभणी जं. स्टेशन (26 कोटी), परतूर स्टेशन (23 कोटी), पूर्णा जं. स्टेशन (24 कोटी), सेलू स्‍टेशन (23.2 कोटी), हडपसर स्टेशन (25 कोटी), गोधनी स्टेशन (29 कोटी), काटोल स्टेशन (23.3 कोटी), कामठी स्टेशन (7.7 कोटी), नरखेड जं. स्टेशन (37.6 कोटी), कराड स्टेशन (12.5 कोटी), सांगली स्टेशन (24.2 कोटी), लोणंद जं.स्टेशन (10.5 कोटी), सातारा स्टेशन (34.3 कोटी), बेलापूर स्टेशन (32 कोटी), कोपरगाव स्टेशन (30 कोटी), सेवाग्राम स्टेशन (18 कोटी), धामणगाव स्टेशन (18 कोटी), हिंगणघाट स्टेशन (22 कोटी), पुलगाव स्टेशन (16.5 कोटी), उरूली स्टेशन (13 कोटी), वाशिम स्टेशन (20.3 कोटी), मलकापूर स्टेशन (19 कोटी), नांदुरा स्टेशन (10.6 कोटी), रावेर स्टेशन (9.2 कोटी), सावदा स्टेशन (8.5 कोटी), दुधनी स्टेशन (22 कोटी), पंढरपूर स्टेशन (40 कोटी), सोलापूर स्टेशन (56 कोटी), नंदूरबार स्टेशन (15 कोटी) आणि पालघर स्टेशन (17.5 कोटी).

000

संजय ओरके/विसंअ/

वेव्हज् २०२५ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

मुंबई, दि . ११ : दिनांक १ ते ४ मे २०२५ या कालावधीत मुंबई येथील जिओ कन्व्हेशन सेंटर, बी.के.सी. येथे वेव्हज् २०२५ परिषद अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट  समिट  होणार आहे. या परिषदेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच केंद्रीय व राज्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत घेण्यात आला. या वेव्हज परिषदेस राज्य शासन पूर्णतः तयार असून वेव्हज् च्या माध्यमातून मोठी पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार भारताने क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून नेहमीप्रमाणे मुंबई क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करायला तयार आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वेव्हज् ही परिषद केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वेव्हजला कायमस्वरूपी एक सचिवालय स्वरूपात पुढे नेण्यात येईल. या परिषदेस एक कायम स्वरूप देऊन दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जाईल. ज्याप्रमाणे ऑस्कर, कान्स किंवा दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन केले जाते, अगदी त्याचप्रमाणे वेव्हज् याचेही दरवर्षी आयोजन केले जाईल. यासाठी एक समर्पित टीम वर्षभर काम करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

माहिती व  प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वेव्हज् या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असून ते बदलणारे आहे. या नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे, यावर जोर देण्यात येत आहे. दृकश्राव्य तसेच मनोरंजन क्षेत्रात क्रिएटिव्ह इकॉनॉमीला एक प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या या वेव्हज् परिषदेस १०० पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम यापूर्वी झालेल्या जी – २० पेक्षा खूप मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/

 

पालकमंत्री टास्क फोर्स आणि जनता दरबारातील तक्रारींचा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला आढावा

परभणी, दि. 11 (जिमाका) : पालकमंत्री टास्क फोर्स आणि जनता दरबारातील नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अर्जाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, महानगरपालिका आयुक्त धैर्यशिल जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता चव्हाण उपस्थित होते.

पालकमंत्री टास्क फोर्स माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्यांना “एक गाव दत्तक” या उपक्रमाच्या माध्यमातून 93 अधिकाऱ्यांना गावे दत्तक देण्यात आली आहेत. एका वर्षात ही 93 गावे आदर्श गाव करण्याचे आपले लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाअंतर्गत गावांना भेटी दिलेल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. तसेच याअंतर्गत गावात येत असलेल्या अडचणीबाबत तालुकास्तरावर एक बैठक घेण्याचीही सूचना त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये आलेल्या अर्जांच्या कार्यवाहीबाबत पालकमंत्री यांनी यावेळी आढावा घेतला. जनता दरबारामध्ये एकूण 887 अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी 421 अर्ज निकाली काढण्यात आले असून, उर्वरित अर्जांवर कार्यवाही चालू असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी सांगितले.

जनता दरबारातील उर्वरित अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांना दिल्या. पुढील जनता दरबारापर्यंत एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, अशा सूचना त्यांनी यावेळी दिली. जनता दरबारातील अर्जांबाबत स्वत: अधिकारी यांनी लक्ष घालून अर्ज निकाली काढावा. जनता दरबारात जास्त अर्ज शेत रस्त्यांचे येत असून हे अर्ज या महिन्याअखेर निकाली काढण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

महावितरण मंडळ कार्यालयावरील ‘रुफ टॉप सोलार सौरऊर्जा’ प्रकल्पाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन

परभणी शहरातील महावितरण मंडळ कार्यालयावर उभारण्यात आलेल्या 35 किलो व्हॅट रुफ टॉप सोलार सौरऊर्जा प्रकल्पाचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते आज उद‌्घाटन करण्यात आले.

यावेळी महावितरणचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, कार्यकारी संचालक (प्रकल्प) धनंजय औंढेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, नांदेड महावितरण मुख्य अभियंता आर.बी.माने, अधीक्षक अभियंता आर.के.टेंभुर्णी, कार्यकारी अभियंता मंदार वग्यानी, जी.के.गाडेकर,यु.व्ही घोंगडे आदींसह महावितरणचे अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.

यावेळी सौरऊर्जा प्रकल्प वेळेच्या आधी उभारणारे कंत्राटदार कैलास कापसे, भागवत देशमुख, योगेश मुळी यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अत्याधुनिक नवीन अग्निशमन वाहनांचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटने दरम्यान जलद प्रतिसाद देणे करिता आर्य पंप्स कंपनीने तयार करुन दिलेल्या मिनी रेक्यू टेंडर अग्निशमन वाहनाचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय मदत व पुनर्वसन विभाग यांचे मार्फत जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटने दरम्यान जलद प्रतिसाद देणे करिता जिल्ह्यातील एकूण तीन नगरपालिका व एक महानगरपालिका, अग्निशमन विभागास, अत्याधुनिक सर्व साहित्य नियुक्त असलेले गुरखा वाहन फायर रेस्क्यू मिनी टेंडर शासन स्तरावरून प्राप्त झाले आहे. अग्निशमन वाहने अनुक्रमे नगरपरिषद गंगाखेड, सेलू, जिंतूर व अग्निशमन विभाग, परभणी शहर महानगरपालिका यांना उपलब्ध करून दिली आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, शहर महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, संबंधित नगरपरिषद विभागाचे अग्निशमन अधिकारी कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती बँक उर्जितावस्थेसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, दि. 11 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा मध्यवर्ती बँकचे जवळपास 50 हजार शेतकरी सभासद आहेत. या शेतकऱ्यांनी त्यांची बँकेतील खाती सुरू करून खात्यावर व्यवहार सुरू करावेत. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून बँकेचे व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्यास बँकेस उर्जितावस्थेस प्राप्त होईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात जिल्हा मध्यवती बँक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी जलज शर्मा, खासदार शोभा बच्छाव, खासदार पराग वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉ.राहूल आहेर, आमदार नितिन पवार, आमदार सरोज आहेर, माजी आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक बाळासाहेब आनासकर, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील,  बँकेचे अधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. कोकाटे यावेळी म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँक सुरळीत होण्याच्या दृष्टीने बँकेविषयी शेतकऱ्यांच्या मनातील असलेले संभ्रम दूर करणे आवश्यक आहे. बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. यासाठी येणाऱ्या तीन महिन्यांपर्यंत शेतकऱ्यांकडून कोणऱ्याही प्रकारची सक्तीची वसूली न करण्याचे निर्देश कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी सहकार विभाग व बँक प्रशासकांना दिले. येणाऱ्या आठवडाभरात शेतकऱ्यांसाठी नवीन ओटीएस स्कीम सुरू करणार असून मयत शेतकरी सभासदांच्या वारसांसाठी, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी व्याजदर आकारणीबाबत वेगवेगळे निर्णय घेण्यात येतील. जिल्हा मध्यवर्ती बँक खाते सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचे लाभही येणाऱ्या काळात डिबीटी माध्यमातून प्रदान करण्यात येतील. शेतकऱ्यांमध्ये बँकेबाबत विश्वासाहर्ता निर्माण होण्यासाठी सर्व संचालक बँकेत पाच लाख रूपयांच्या ठेवी जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सिंहस्थ कुंभमेळा आढावा

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आज सिंहस्थ कुंभमेळा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, खासदार शोभा बच्छाव, खासदार पराग वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉ.राहूल आहेर, आमदार नितिन पवार, आमदार सरोज आहेर, माजी आमदार नरेंद्र दराडे,  जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. कोकाटे यावेळी म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने मागील अनुभव पाहता मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने समृद्धी महामार्गावरील  सिन्नर तालुक्यातील मौजे बोरखिंड येथे आगमन व निर्गमन निर्माण करून बोरखिंड ते नाशिकला जोडणारा पर्यायी रस्ता मंजूर करण्यात यावा. यामुळे  नाशिक- पुणे व मुंबई-आग्रा हायवे वरील वाहतुकीची वर्दळ कमी होण्यास मदत होईल.  सिन्नर- नायगाव जोगलटेंभी हा चौपदरी क्राँक्रीट रस्ता तयार करून गोदावरी नदीवर  दारणासांगवीला जोडणाराा मोठा पूल बांधण्यात यावा व दारणासांगवी ते नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोडरस्ता करून पंचवटीला जोडणार अत्यंत जवळचा पर्यायी मार्ग निर्माण केल्यास गोदावरी-दारणा संगमावर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होईल, अशा सूचना कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

भौगोलिक मानांकन प्राप्त शेतमालाच्या ब्रॅंडिंगबाबत विशेष प्रयत्न करणार – पणन मंत्री जयकुमार रावल

आंबा व काजू उत्पादकांची बैठक

सिंधुदुर्गनगरी दिनांक 11 (जिमाका) :- प्रामुख्याने राज्यात उत्पादित भौगोलिक मानांकन प्राप्त काजु व आंब्याकरिता ब्रॅंडिंग व मार्केटिंग करणेकरिता कृषि पणन मंडळामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल. तसेच भेसळ रोखण्याकरिता अन्न व औषध विभागाची मदत देखील घेण्यात येणार आहे. तसेच भौगोलिक मानांकन प्राप्त शेतकऱ्यांची संख्या वाढविण्याकरिता कृषि पणन मंडळ व भौगोलिक मानांकन मालकी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न करणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांच्या अडीअडचणीच्या अनुषंगाने पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष  मनीष दळवी, कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक विनायक कोकरे, महाराष्ट्र राज्य काजु मंडळाचे संचालक डॉ. परशराम पाटील व रुपेश बेलोसे तसेच माजी आमदार ॲड. अजित गोगटे, डॉ. विवेक भिडे, विलास सावंत,  वासुदेव झांट्ये यांचेसह काजु व आंबा उत्पादक, प्रक्रियादार व कृषि विद्यापीठ, दापोली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते.

श्री रावल म्हणाले, दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेअंतर्गत पुण्यात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा महोत्सव कोकणात घेतला जाईल. या महोत्सवामध्ये जीआय व युआयडी  टॅग लावलेला आंबा ग्राहकांना विक्री केला जात आहे.  कृषि पणन मंडळामार्फत आयोजित आंबा महोत्सवाची व्याप्ती वाढवुन इतर राज्यामधे तसेच परदेशामध्येदेखील प्रयत्न करण्यात येणार. राज्यातील काजू उत्पादक शेतक-यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी काजू बी अनुदान योजनेअंतर्गत 4196 लाभार्थींच्या बँक खात्यात रु. 4.97 कोटी थेट जमा करणेची प्रक्रिया सुरु झालेली असुन रकमा जमा होत आहेत असेही पणन मंत्री यांनी सांगीतले.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, ज्या भागात अथवा देशात आंब्याचे उत्पादन होत नाही अशा ठिकाणी आंबा महोत्सव आयोजित करणेबाबत प्रयत्न करण्यात यावे असे सुचविले. आमदार दिपक केसरकर यांनी ब्राझील देशाला भेट दिले असता तेथील काजु बोंडु प्रक्रिया तंत्रद्नायाबाबत त्यांचे अनुभव विषद करुन त्या धर्तीवर प्रकल्प उभारणीबाबत अपेक्षा व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य काजु मंडळाकडुन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या. मुंबई मार्फत स्थानिक काजु बी खरेदी करणे, त्याची प्रतवारी व पॅकेजिंग करुन गोदामात साठवणुक करणे याबाबतचा सविस्तर विशिष्ठ कार्य पध्दती (SoP) बाबत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या. यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करुन अंतिम करणेत येणार आहे अशी माहिती पणन मंत्र्यांनी यावेळी दिली. काजू फळपिक विकास योजने अंतर्गत 1000 मे. टन क्षमतेच्या गोदाम उभारणीची योजना  राज्य शासनास सादर केलेली असुन त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतकरी उत्पादकांना घेता येईल.

सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य काजु मंडाळाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. कृषि पणन मंडळामार्फत विकसीत देशांना आंबा निर्यातीकरिता आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रियांची माहिती सदर बैठकीस उत्पादकांना देण्यात आली. बैठकीमध्ये कोकणातील काजू व आंबा उत्पादक, प्रक्रियादार इ. यांनी अडीअडचणी मांडल्या.

बाजार समितीमुळे होणार शेतकऱ्यांची उन्नती – पणन मंत्री जयकुमार रावल

  • आंब्याला युआयडी सील देण्यासाठी प्रयत्न
  • ‘आंबा महोत्सव’कोकणात भरवणार
  • पात्र लाभार्थ्यांना काजु अनुदान देणार

सिंधुदुर्गनगरी दि. 11 (जिमाका) :- राज्य शासन हे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे. शेतकरी मेहनत करतो, कष्ट करुन पिक घेतो. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक बाजार समिती किंवा उपबाजार समिती उभी करावी असा शासनाचा संकल्प आहे. बाजार समितीच्या माध्यमातून मालाला योग्य भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये बाजार समितीची भूमिका महत्वपूर्ण राहिल असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन पणन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदीं मान्यवरांच्या उपस्थितीत कोनशिला अनावरण करून पार पडले, यावेळी ते बोलत होते.

श्री. रावल म्हणाले, प्रत्येक तालुक्यात बाजार समिती किंवा उप बाजार समिती स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे. बळीराजाला केंद्रबिंदू मानून शासन  काम करत आहे. 100 दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत या पहिल्या बाजार समितीचे भूमिपूजन होत आहे. राज्यात एकूण 305 बाजार समित्या तर 662 उप बाजार समित्या असून सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांची उलाढाल या वेगवेळ्या बाजार समितींच्या माध्यमातून होते. आज वाघेरी येथे पहिल्या बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन  होत आहे. टप्प्याटप्प्याने अनेक ठिकाणी उप बाजार समितींची देखील उभारणी करुन जिल्ह्याचा विकास केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 5 कोटी 66 लाख रुपयांच्या कामाचे आज भूमिपुजन करण्यात आले आहे. येणाऱ्या 18 महिन्यांमध्ये ही इमारत पूर्ण होणार आहे. या इमारतीमध्ये फळ व धान्यासाठी साठवणूक केंद्र, काजू बी साठविण्यासाठी गोडाऊन, मत्स्य उत्पादनासाठी कोल्ड स्टोरेज, व्यापारी भवन, दुकानगाळे, वे-ब्रिज, पाण्याची सुविधा, शेतकरी भवन, हमाल भवन आणि इतर साऱ्या व्यवस्था उभा राहणार आहेत.  या इमारतीसाठी सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून 75 टक्के निधी मिळाला आहे. उर्वरित 25 टक्के निधी उभारावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या ॲग्रीकल्चर मार्केटींग इन्‍फ्राट्रक्चर योजनेच्या माध्यमातून जवळपास 1 कोटी मी या प्रकल्पाला देणार आहे. या मार्केट कमिटीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास साधला जाणार आहे असेही ते म्हणाले.

श्री. रावल म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा महत्वाचे फळ आहे. या मातीमध्ये लोह असल्याने या आंबाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. म्हणूनच आंब्याच्या जीआय टॅगिंगच्या संदर्भात आपण भूमिका घेतली आहे. पुढील काळात आंब्याला युआयडी सील व पॅम्पर प्रुफ सिल हे येथील मार्केट मध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  ई-नाम योजनेअंतर्गत डिजिटल डिस्प्ले बोर्डवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारभावांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. काजू बोर्डामार्फत जवळपास 370 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. पणन महामंडळामार्फत घेतला जाणारा ‘आंबा महोत्सव’ यावर्षी कोकणात घेतला जाईल असेही ते म्हणाले.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, या बाजार समितीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोणातून एक महत्वाचं स्थान बनवू असा विश्वास मी देतो. या ठिकाणी सर्व कारभार पारदर्शक पध्दतीने होईल. बाजार समितीची ही जागा रेल्वे लाईन तसेच महामार्गालगत असल्याने निर्यातीसाठी योग्य आहे. निसर्गातील बदलांमुळे आंबा आणि काजू उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्र स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. स्थानिक काजूला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळावी यासाठी एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे. बांदा येथे मच्छी बाजारासाठी नक्कीच जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्व प्रयत्न करणार असल्याचेही श्री राणे म्हणाले.

खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी विविध्‍ उपाययोजना सांगितल्या. ते म्हणाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिके घ्यावीत जेणेकरुन त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढेल. एकरी उत्पन्नात कशी वाढ होईल यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील महिलांनी देखील व्यवसायात सहभाग घेऊन उत्पन्न वाढवावे असेही ते म्हणाले.

आमदार दिपक केसरकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यात या बाजार समितीचे योगदान मोठे असणार आहे. या इमारतीत सर्व प्रक्रीया उद्योग एकाच छताखाली आले तर शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे असेही ते म्हणाले.

आमदार निलेश राणे म्हणाले की, ही बाजारा समिती कोकणाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारी बाजारपेठ ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी या बाजार समितीने काम करावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील वेगवेगळे उत्पादन घेऊन विकास साधावा असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डॉ. बाबासाहेब

0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वेळेस धुळे शहरास भेट दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार ललित चव्हाण यांनी...

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते पूजन, मंत्री शंभुराज देसाई यांची...

0
गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात लाखो भाविकांची जोतिबा डोंगरावर उपस्थिती कोल्हापूर, दि.१२ : राज्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत...

डॉ. आंबेडकर कृषिक्रांतीचे जनक

0
परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांचे, अस्पृश्यांचे प्रश्नच सोडविले असे नाही, तर त्यांनी या देशाच्या विविध प्रश्नांचा मूलगामी विचार केला. त्यांची मूलभूत...

जागा निश्चिती होताच आयटी पार्कचा शासन निर्णय काढणार – उद्योग मंत्री उदय सामंत यांची...

0
गुंतवणूक परिषदेत १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सहकारी बँकांमधूनही होणार कर्जपुरवठा; येत्या पंधरा दिवसांत शासन निर्णय काढण्याची उद्योग...

राजधानी दिल्लीशी डॉ. बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे नातं…..

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील बराच काळ दिल्लीत गेला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिल्लीचे एक वेगळे नातेही निर्माण झाले.  ब्रिटिश सरकारच्या  म्हणजे प्रांतीय मंत्रिमंडळात...