शनिवार, एप्रिल 12, 2025
Home Blog Page 3

पाच वर्षाचा कृती आराखडा बनवून जुन्नर, आंबेगावचा विकास करणार – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

पुणे, दि. ११ : जुन्नर आणि आंबेगाव तालुके दत्तक घेऊन ५ वर्षाचा कृती आराखडा बनवून विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केले. आदिवासी बांधवांच्या आशा अपेक्षा पूर्ण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कायम प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.

जुन्नर तालुक्यातील सुकाळवेढे येथील आई वरसुआई देवीला अभिषेक केल्यानंतर आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, मंदिर देवस्थानचे विश्वस्त दत्तात्रय गवारी आदींसह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

‘पेसा’ कायदा २०१४ मध्ये लागू करण्याचे आणि ‘पेसा’ अंतर्गत असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला ५ टक्के निधी देण्याचे काम शासनाने केले. यामुळे या अंतर्गत येणारे जिल्हे, तालुके, ग्रामपंचायतींचा विकास होत आहे. अर्थसंकल्पात आदिवासी विभागाला मंजूर झालेल्या सर्व निधीचा वापर शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी करण्यात येईल. विविध योजनांचे लाभ थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने अधिक प्रभावीपणे, गतीने कसे पोहोचतील यासाठी काम करण्यात येईल.

जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत जलसंपदा, महसूल, वनविभाग आदी विभागांसोबत चर्चा करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. समाजाला बळ, आत्मविश्वास देऊ, त्यासाठी नियमितपणे येथे येऊन येथील अडीअडचणी, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी असलेला जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला असून आदिवासी विकास विभागाकडून त्याअंतर्गत आवश्यक तो निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

येथील गावांचा पिण्याच्या पाण्याचा, रस्त्याचा प्रश्न सुटावा, बुडीत बंधारे व्हावेत, दाऱ्या घाट व्हावा, अशी मागणी आमदार सोनवणे यांनी यावेळी केली. यावेळी दत्तात्रय गवारी यांनी प्रास्ताविक केले.

‘शासन आपल्या मोबाईलवर’ उपक्रमामुळे सुसंवाद वाढेल – पालकमंत्री संजय राठोड

‘शासन आपल्या मोबाईलवर’उपक्रमाचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

यवतमाळ, दि.11 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक, गतिमान सेवा देण्याचे शासनाने धोरण आहे. त्यासाठी शासनस्तरावरून वेगवेगळे कार्यक्रम देखील राबविले जातात. यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या ‘शासन आपल्या मोबाईलवर’ या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक व प्रशासनामध्ये सुसंवाद वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतूक देखील केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते ‘शासन आपल्या मोबाईलवर’ या उपक्रमाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, तहसिलदार आदित्य शेंडे व सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार ऑनलाईन उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या मोबाईलवर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत प्रशासनाच्यावतीने यु-ट्यूब चॅनल तयार करण्यात आले आहे. या चॅनेलवर महसूल विभागाचे विविध विषय जसे, जमिनीची नोंदणी, फेरफार नोंदी, अकृषक परवानगी, विविध दाखले, वनहक्क कायदा, रस्ते संबंधी वाद, शिधापत्रिका, जमीन प्रकार, सातबारा, वारस नोंदी, भूसंपादन प्रक्रिया, मतदार नोंदणी प्रक्रिया, कलम 155 दुरुस्ती पद्धत, अतिक्रमन नियमित करणे, नैसर्गिक आपत्ती, जन्म मृत्यूची उशिरा नोंदणी, शेती घेतांना घ्यावयाची दक्षता, सहधारकांमध्ये हिस्से वाटप, अर्धन्यायिक प्रक्रिया, सामाजिक अर्थसहाय्य योजना, पोटखराब जमीन वापरात आणणे, गौणखनिज संदर्भात माहिती, अदिवासी जमिनींचे व्यवहार अशा विविध विषयांची माहिती चॅनेलच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

पुढील टप्प्यात विविध शासकीय विभागाच्या योजना देखील उपलब्ध होणार आहे. संबंधित विषयाची सविस्तर माहिती उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी स्वत: व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. विषय समजून सांगतांना त्याचे बारकावे, नियम, अटी, दक्षता, काळजी यावर देखील माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घरबसल्या महसूलसह विविध विभागांच्या किचकट प्रक्रिया देखील नागरिकांना सोप्या भाषेत स्वत: अधिकाऱ्यांकडून माहिती होतील.

जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी काही दिवसात हा उपक्रम सुरु केला. जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक सेवा, पारदर्शक आणि गतिमानपणे मिळण्यासोबतच त्यांचा पैसा, वेळ आणि परिश्रम वाचविण्यासाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. वेळोवेळी उद्भवणारे विषय देखील या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. हा उपक्रम अतिशय चांगला असून सोप्या भाषेत नागरिकांना विविध योजना, उपक्रम आत्मसात होईल, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदारांशी देखील पालकमंत्र्यांनी संवाद साधला. उपक्रमांतर्गत उत्तम काम करून नागरिकांना अधिकाधिक सेवा कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी उपक्रमाची भूमिका, गरज आणि महत्व विषद केले. सुरुवातीस कळ दाबून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महसूल अधिकाऱ्यांसह सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.

पेंच प्रकल्पांतर्गत प्रास्तावित सात प्रकल्पांना गती आवश्यक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,दि. 11: मध्यप्रदेशात चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पांतर्गत निर्माण झालेली पाण्याची तुट भरुन काढण्यासाठी आपण सात उपसा सिंचन योजनांना मान्यता दिली आहे. या पाणी तुटीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांना शासनाने दुष्काळ निवारण कार्यक्रमात मान्यताही दिली आहे. असे असतांना या कामाला गती मिळणे अपेक्षित होते. याचबरोबर जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत त्या प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभ क्षेत्रातील शेवटच्या लाभधारकापर्यंत पाणी का पोहचत नाही, असा उद्विग्न सवाल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

नियोजन भवन येथे विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, मुख्य अभियंता रवी पराते, अधीक्षक अभियंता सोनाली चोपडे, कार्यकारी अभियंता केतन आकुलवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पेंच प्रकल्पाच्या 40 टक्के लाभ क्षेत्रात पाणी पोहाेचत नाही. या प्रकल्पाच्या टेलवर अडचण आहे. अनेक शेतकरी व ग्रामस्थ याबाबत सातत्याने शासनाला विनंत्या करीत आहेत.  हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पेंच प्रकल्पांतर्गत सात उपसा सिंचन योजनांना गती दिली जाईल. मात्र ज्या क्षेत्रात, गावात पाणी पोहचत नाही अशा गावांचा सर्वे करुन नेमक्या किती व कोणत्या गावात पाणी पोहचत नाही याची वस्तुस्थितीदर्शक पाहणी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन अधिकाऱ्यांना दिले.

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेची जोड दिली आहे. जिल्ह्यातील काटोल, नरखेड या दोन तालुक्यात पाण्याची पातळी खुप खोल गेली आहे. भविष्यातील पाणीप्रश्नचा आवाका लक्षात घेता पाणीटंचाई अंतर्गत विहिर पुर्नभरण कामांवर भर, जेवढ्या गावांसाठी नळयोजना आहेत त्या नळयोजनांच्या पाणी स्त्रोतांचे बळकटीकरण यावर भर देण्यास त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या ऑनलाईन सुविधेसाठी संवाद सेतू ॲपचा क्रमांक कार्यान्वित; 86694 94944 क्रमांकावर साधा थेट चॅट

प्रशासकीय पातळीवरील नागरिकांच्या असलेल्या विविध सेवा व सुविधा सुलभ पध्दतीने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने व्हॉटस्ॲप चॅटबोट क्रमांक जाहिर केला. आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते याचे अनौपचारिक उद्घाटन करण्यात आले. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने हा एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याला आपल्या शेजारील अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने राबविलेल्या विशेष उपक्रमाची जोड देऊन ही सुविधा अत्यंत प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ऑप्टीक फायबर केबलपेक्षा वायरलेस सिसिटिव्ही कॅमेरांवर भर द्या

नागपूर महानगराच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या सिसिटिव्ही कॅमेरांपैकी अनेक ठिकाणची कॅमेरे केबलची जोडणी निघाल्याने उपयोगात येत नाहीत. विविध ठिकाणी रस्ते व इतर कामांमुळे या कॅमेरांना जोडणारी केबल प्रणाली वेळोवेळी जर तुटल्या जात असतील तर त्यापेक्षा नागरिकांचा सहभाग घेऊन मोक्याच्या ठिकाणी वायरलेस सिसिटिव्ही कॅमेरे लावलेले उचित ठरेल. याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व पोलीस विभागाला दिले.

नागरिकांच्या जीवीताचे व त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे त्यादृष्टीने अधिकाधिक दक्ष राहण्यासह सिसिटिव्हीचा प्रभावी उपयोग व्हावा, असे ते म्हणाले.

या बैठकीत हनुमान जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथील कार्यक्रम, सुरक्षा आढावा, शासकीय मुद्रणालय व ग्रंथालय स्थानांतरण, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, सामाजिक न्याय विभागांतर्गत प्रलंबित राहिलेल्या कन्यादान योजनेचे अनुदान, छत्रपती शिवाजी महाराज चषक, पुरुष व महि ला कबड्डी स्पर्धा यांचे नागपूर येथे आयोजन, मौदा येथे तालुका क्रीडा संकुलाची नव्याने उभारणी आणि कामठी नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद

महिला लाभार्थ्यांचा थेट शिवारातून उपक्रमात सहभाग; विभागीय आयुक्तांकडून अडचणी सोडविण्याबाबत महिलांना आश्वासन
छत्रपती संभाजीनगर दि.11: “साहेब आमच्या प्रभाग संघासाठी कार्यालयाला जागा पाहिजे, साहेब बचत गटातून कर्ज मिळालं आणि आम्ही आमच्या व्यवसायात यशस्वी झालो, साहेब बचत गटाचे पहिले कर्ज मिळाले दुसऱ्या कर्जाच सांगा, बचत गटाला बाजारपेठ मिळवून द्या, बचत गटासोबत वैयक्तिक लाभांच्या योजना राबवा,” अशा अनेक विषयांवर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थी महिलांनी ‘संवाद मराठवाडयाशी’ या उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याशी संवाद साधला.  विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी महिलांच्या अडचणी समजून घेत तत्परतेने यावर मार्ग काढून अडचणी सोडवू असे सांगतांना संबंधित यंत्रणांनी महिलांनी मांडलेल्या अडचणी तातडीने सोडवाव्यात असे निर्देश यावेळी दिले.
मराठवाडा विभागातील आठही  जिल्हयातील नागरिक आपल्या विविध कामानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. आपल्या प्रशासकीय समस्यांचे निवारण करून घेण्यासाठी नागरिक येत असतात, मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा ‘संवाद मराठवाडयाशी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ आज दुपारी 4 वाजता झाला.
यावेळी सहआयुक्त सुरेश बेदमुथा, डॉ.अनंत गव्हाणे, एनआयसीचे अनिल थोरात, यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील वाडवाळ ता.चाकूर येथील आदर्श प्रभाग संघाच्या सुनिता भाऊसाहेब श्रीनाथे यांनी आपल्या प्रभाग संघाला कार्यालयासाठी जागा द्यावी, तसेच बिनव्याजी कर्ज द्यावे, सोबतच लखपती दिदी मुद्रा लोन याबाबत मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी संबंधित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांना तत्परतेने कार्यवाही करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले.
बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथील महिला बचत गटाच्या महिला संवादात सहभागी झाल्या. आमच्या बचत गटाला बाजारपेठेबाबत मदत करा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या सरस्वती गवळी यांनी आपल्या उत्पादनाच्या बाजारपेठेची अडचण बोलून दाखवली. यावर विभागीय आयुक्त यांनी बचत गटाने निर्मित केलेले उत्पादनाबाबत संबंधित यंत्रणेने इतर जिल्ह्यांनाही याबाबत माहिती पाठवून मागणी घेता येईल तसेच राज्यातील ज्या उत्पादनाची मागणी आहे ते उत्पादन पाठविता येईल, तसेच बाजारपेठेची मागणी लक्षात घेत बचत गटानेही उत्पादन करावे असे आवाहन केले.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील शाम बाला भोसले यांनी गावात 75 गट आहेत, सीआरपी पदभरती करावी अशी मागणी केली. यावर 15 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले.
बीड जिल्ह्यातील ईट या गावातून शेतकरी गटाच्या मंगल रामप्रसाद डोईफोडे या आपल्या शेतीत काम करताना चर्चेत सहभागी झाल्या.
नांदेड जिल्ह्यातील माहूर येथून सपना पेडवाल यांनी चर्चेत सहभाग घेतला. आपल्या बचत गटाच्या अडचणींही त्यांनी मांडल्या. माहूर तालुक्यातील वाई प्रभाग येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून गावात यंदा 45 लाख रुपये आले आहेत, गटातून गावात आर्थिक प्रगती झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी महिलांचे कौतुक केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील आदर्श प्रभाग संघाच्या अंजली पवार यांनीही महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळाल्याची भावना बोलून दाखवली. गंगापूर तालुक्यातील सरला काकडे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
जालना जिल्ह्यातील अकोला देव ता.जाफ्राबाद येथील श्रीमती सवडे यांनी बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तुंच्या विक्रीसाठी मॉल आवश्यक असून या मॉलसाठी जागा पाहिजे अशी मागणी केली. हिंगोली जिल्ह्यातून दयानंद ढोबळे, तरडगव्हण, ता.शिरूर कासार जि.बीड येथून भाग्यश्री भोसले, जालना जिल्ह्यातील रेवगाव येथून गितांजली महिला प्रभाग संघाच्या योगिता गोरडे, परभणी जिल्ह्यातील शिवनेरी प्रभाग संघ ताड बोरगाव, धाराशिव प्रभाग संघ, यासह अनेक महिलांनी चर्चेत सहभाग घेतला. महिलांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर प्रशासनाच्या वतीने समजून घेत विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी महिलांच्या अडचणींबाबत संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. जिल्हा पातळीवरून या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहणारे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी या अडचणींबाबत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

‘क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमी’चे नेतृत्व भारत करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास

मुंबई, दि. ११ :- मुंबईत १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ‘वेव्हज २०२५’ च्या निमित्ताने क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा इव्हेंट होणार आहे. जागतिक दर्जाच्या या परिषद आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला असून यामुळे जगातील ‘क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट’ क्षेत्र मुंबईकडे आकर्षित होणार आहे. यामुळे भविष्यात ‘क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमी’चे नेतृत्व भारत करेल, असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘वेव्हज २०२५’च्या निमित्ताने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्व्हेंशन सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच केंद्रीय सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने मुंबईमध्ये ऑडीओ व्हिज्युअल एंटरटेंटमेंट समिट (वेव्हज) २०२५ या मनोरंजन क्षेत्रातील जागतिक परिषदेचे आयोजन १ ते ४ मे २०२५ दरम्यान ‘जिओ कन्व्हेक्शन सेंटर’ येथे होणार आहे. जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कला गुण, सृजनशीलता दाखविण्याची संधी आहे. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल. जगाला भारताची नवी ओळख करून देण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी संकल्पना आहे. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या परिषदेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे.

करमणूक क्षेत्राची अर्थव्यवस्था अतिशय जलदगतीने विकसित होत आहे. यात भारताने देखील अग्रेसर असले पाहिजे ही भूमिका आहे. ‘वेव्हज २०२५’च्या निमित्ताने शंभर पेक्षा अधिक देश भारतात सहभागी होणार आहेत. पाच हजार पेक्षा अधिक सहभागींची नोंद होणार असून ही परिषद दरवर्षी मुंबईत होणार आहे. त्यामुळे मुंबईचे महत्व जागतिक पातळीवर वाढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाची मालाडला २४० एकर जागा आहे. या जागेवर जागतिक दर्जाच्या एंटरटेनमेंट हबची व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे जगातील करमणूक क्षेत्रातील नामवंत मुंबईकडे आकर्षित होतील. त्याचबरोबर आयआयसीटी म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटीव्ह टेक्नॉलॉजी नावाची संस्था मुंबईला दिली आहे. ही महत्त्वाची संस्था मुंबईत असल्याने या क्षेत्रात मुंबई जगाच्या एक पाऊल पुढे असणार आहे. करमणूक क्षेत्राची मुंबई ही जगाची राजधानी असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी आयआयसीटीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गोंदिया बल्लारशाह या रेल्वे मार्गिकाचे दुहेरीकरण करण्यासाठी ४,८१९ कोटी रूपये केंद्र शासनाने दिले आहे. या दुहेरीकरण प्रकल्पामुळे विदर्भाचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश राज्यांबरोबर व्यापार-व्यवहार वाढणार आहे. तसेच राज्यात सर्व प्रकारच्या प्रवासासाठी एक कार्ड प्रणाली लागू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/

टंचाई सदृश्य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आराखडा करा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

सातारा दि. 11: यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यात संभाव्य टंचाई भासू शकते. याचा विचार करुन तालुकास्तरीय प्रशासनाने टंचाई आराखडा तयार करावा. टंचाई सदृश्य गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पिण्याचा पुरवठा करुन पाणी कमी पडून देऊ नका, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले.

वाईच्या प्रशासकीय इमारतीमध्ये वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यातील पाणीटंचाई परिस्थिती व प्रशासकीय कामकाज आढावा बैठक मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सोनाली मेटकरी, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील, खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांच्यासह वाई, खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील गट विकास अधिकारी, पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी तसेच आदी कार्यान्वयन यंत्रणाच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार घालून  मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी अभिवादन केले. वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यात तीव्र टंचाई भासणार नाही, असे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले, गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला परंतु महाबळेश्वरला नेहमीपेक्षा कमी झाला. एकूणच उन्हाळ्याच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे येथील तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे. उन्हाळच्या तीव्रतेमुळे पाण्याच्या समस्या निर्माण होतात.  विहिरीतील पाण्याची पातळी घटते व पाण्याचा उपसाही अधिक होतो. शेतीला अधिकचे पाणी द्यायला लागते. बाष्पीभवनामुळे व इतर वापरामुळे धरणांमधल्या पाण्याची पातळीही खाली जात असते. काही गावे टंचाईमध्ये येण्याची शक्यता असणाऱ्या गावांवर लक्ष ठेवून आणि त्या गावांना लागणाऱ्या उपाययोजना कराव्यात. या गावांची जर टँकरची मागणी असेल तर स्थळ पाहणी करून या गावांना टँकरने पाणी पुरवठा करून इतर उपाययोजना कराव्यात. तसेच पाणी पुरवठा व जल जीवन मिशनची प्रगती पथावर असणारी कामे टंचाईपूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचनाही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी अपुऱ्या पाणी पुरवठा योजनांबरोबर धोम डावा व उजवा कालव्याच्या पाण्याची आवर्तने, जललक्ष्मी, कवठेकेंजळ योजनेचा आढावा घेतला.  अपूर्ण कामे असलेल्या ठिकाणी कंत्राटदारांची बैठक घेऊन कामे वेळेत पूर्ण करा.गावांमध्ये करण्यात येणाऱ्या विकास कामांवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवावे. वाई, पाचगणी, महाबळेश्वर हा पर्यटनाचा भाग असल्याने  या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक  येत असतात त्यामुळे येथील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी.  विद्युत जनित्रांच्या चोरीबरोबर इतर चोऱ्यांवर आळा बसवण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वारंवार करावे. त्याच बरोबर टंचाईच्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये . तसेच या काळात कोणत्याही परिस्थिती मोबाईल चालू असले पाहिजेत, अशा सूचना  यांनी बैठकीत केल्या.

यावेळी 100 दिवस कृती आरोखड्यानुसार महसूल विभागाने केलेल्या कामांचा आढावा घेऊन लक्ष्मीयोजना, गोपीनाथ मुंढे अपघात योजना, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या कातकरी समाजातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे व दाखल्यांचे वाटप मदत व पुनर्वसन मंत्री  श्री.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागाने तयार केलेल्या क्युआर कोड ॲपचे अनावरणही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले.

या बैठकील विविध गावाचे सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.

गोंदिया-बल्हारशाह रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, ₹४,८१९ कोटींचा प्रकल्प मंजूर

मुंबई, दि. ११ : विदर्भातील गोंदिया ते बल्हारशाह या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४,८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील रेल्वे जाळे अधिक मजबूत होणार असून मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व आंध्र प्रदेशाशी व्यापार-व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

जिओ कन्व्हेशन सेंटर, बीकेसी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली.

महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी विक्रमी निधी देण्यात आला असून याद्वारे १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही समावेश आहे. रेल्वेच्या पायाभूत विकासासाठी एकूण १.७३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र शासनाकडून करण्यात येत आहे. यावर्षी रेल्वे बजेटमधून महाराष्ट्राला २३,७०० कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले..

रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार आहे. यामध्ये महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला १० दिवसांचा टूर आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यास मदत होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/

 

ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ११ : मुंबईतील वाढत्या वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजना म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान नागरी रस्ता बोगदा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि पूरक उपाययोजना करण्यात येत आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पास अधिक गती देण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पी. डी’मेलो रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पूर्व मुक्तमार्ग व अटल सेतूसोबत अखंड जोडणी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर असून टनेल बोरिंग मशीनचे कार्य, जमीन हस्तांतरण व पाइल फाउंडेशनची कामे वेगाने सुरू आहेत. वाहतूक विभागासोबत सातत्याने समन्वय ठेवून सुधारित तांत्रिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एस. व्ही. पटेल रस्ता व मरीन ड्राईव्ह येथे आवश्यक त्या सुधारणा आणि विस्तारिकरणाची कामे नियोजनानुसार करण्यात यावीत.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. याशिवाय प्रदूषणाच्या पातळीत घट होऊन वाहतूक व्यवस्थेला शिस्तबद्ध दिशा मिळेल. दक्षिण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत नवा आयाम देणारा आणि आर्थिक तसेच भौगोलिक दृष्टीने शहराच्या विकासाला वेग देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.  हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होण्याबरोबर प्रवाशांच्या वेळ आणि खर्चात बचत होईल. हा प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण  करण्याचे नियोजन करावे असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

‘ग्रंथ महोत्सव’चे रुपांतर आनंदसोहळ्यात व्हावे – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि. 11 (जिमाका): पुस्तक वाचनाचा फायदा माणसाला जीवनभरात नक्की होत असतो. समाजमन घडविण्या-या ग्रंथाच्या या महोत्सवाचे रुपांतर आनंद सोहळ्यात व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 7 ते 14 एप्रिल दरम्यान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठात पहिल्यांदाच 11 ते 14 एप्रिल दरम्यान इतिहास वस्तू संग्रहालयाच्या हिरवळीवर उभारलेल्या भव्य मंडपात ग्रंथ महोत्सव घेण्यात येत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्याच्या हस्ते शुक्रवारी (दि.11) करण्यात आले. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.भारत खंदारे, डॉ.योगिता पाटिल, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ.वैशाली खापर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, अशोक पटवर्धन यांची ही मंचावर उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगीश्री.शिरसाट म्हणाले, विद्यापीठात पहिल्यांदाच मोठया प्रमाणावर ग्रंथ महोत्सव होत आहे. आजकाल वाचन संस्कृती लोप पावत असून  या प्रदर्शनात आलेल्या  प्रत्येकाने किमान एक पुस्तक विकत घेऊन वाचन करावे.

महोत्सवात देशभरातून 20 नामांकित प्रकाशक सहभागी झाल्याचे प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रा.प्रराग हासे यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, रोजदांरी कर्मचारी, विद्यार्थी व वाचक मोठया संख्येने उपस्थित होते.इतिहास वस्तू संग्रहालयच्या हिरवळीवर 14 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या दरम्यान ग्रंथ प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे.

वसतिगृहासाठी २५ कोटी देऊ : पालकमंत्री

विद्यापीठात आल्याचा मला मनस्वी आनंद असून वसतीगृहासाठी २५ कोटींचा निधी सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येईल, असे आश्वासन श्री.शिरसाट यांनी दिले. विद्यापीठास आवश्यक ते सहकार्य राज्य शासनाकडून करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

‘नॅशनल बुक ट्रस्ट’ च्या वतीने पुढील वर्षी राष्ट्रीय दर्जाचे पुस्तक प्रदर्शन घेऊ, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी अध्यक्षीय समारोपात घोषित केले.

 वीस प्रकाशंकाचा सहभाग

या ग्रंथ महोत्सवात देशभरातून २० प्रकाशक सहभागी झाले. यामध्ये ऑक्सफर्ड हाऊस, वायकिंग बुक, बुक एन्क्लेव्ह, अ‍ॅपेक्स पब्लिकेशन (सर्व जयपूर), करंट पब्लिकेशन (आग्रा), युनिव्हर्सल पब्लिक सिंग, एन.एम मेडिकल बुक्स, वक्रतुंड बुक्स, कवडवाल बुक्स, न्य एस इंटरनॅशनल (मबई), प्रशांत बुक्स, विज्ञान बुक्स राजकमल, आहुजा, टेक्निस् बुक्स (नवी दिल्ली) सुमन बुक्स, कैलास पब्लिकेशन (छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

अभ्युदयनगर पुनर्विकासात किमान ६२० चौ.फूटाची सदनिका; निविदा प्रक्रियेला गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ११ : मुंबईतील अभुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान ६२० चौ.फूट प्रमाणे करुन नव्याने निविदा काढण्यात याव्यात व ही निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार प्रविण दरेकर, अजय चौधरी, माजी आमदार बाळा नांदगावकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह अभुदयनगर रहिवासी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

अभुदयनगर येथील म्हाडाच्या वसाहतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी यापूर्वी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदेमध्ये पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 635 चौरस फूट असण्याबद्दल प्रमुख अट होती. मात्र, विकासकाकडून ही अट व्यवहार्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निविदेमध्ये पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र 635 चौ.फूट ऐवजी किमान 620 चौ.फूट चटई क्षेत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच निविदेमध्ये 620 चौ.फूटपेक्षा जास्त क्षेत्रफळ देणाऱ्या विकासकाचा विचार पुनर्विकासासाठी करण्याचे निर्देश दिले. या निर्णयास अभ्युदयनगर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनुकुलता दाखविली.

या प्रकल्पासाठी पुनर्विकास विनियम 33(5) नुसार लागू असलेल्या 3 चटई क्षेत्र निर्देशांक हा अधिमूल्याच्या मोबदल्यात गृहसाठ्याच्या स्वरुपात वितरित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. पुनर्विकासादरम्यान रहिवाश्यांना देण्यात येणाऱ्या 20 हजार रुपये घरभाड्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. जयस्वाल यांनी या प्रकल्पातील आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या निर्देशानुसार, पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ 620 चौ. फू. नुसार तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे सांगितले.

श्री. दरेकर, श्री. चौधरी व श्री. नांदगावकर यांनी अभ्युदयनगर पुनर्विकास हा एक दिशादर्शक प्रकल्प होईल, असे सांगून रहिवाशांना पुनर्विकासादरम्यान देण्यात येणारे घरभाडे वाढवून देण्याच्या मागणीसह विविध मागण्या केल्या.

अभ्युदयनगर फेडरेशनचे तुकाराम रासम, दिलीप शिंदे, निखिल दिक्षीत यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

 

ताज्या बातम्या

धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डॉ. बाबासाहेब

0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वेळेस धुळे शहरास भेट दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार ललित चव्हाण यांनी...

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते पूजन, मंत्री शंभुराज देसाई यांची...

0
गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात लाखो भाविकांची जोतिबा डोंगरावर उपस्थिती कोल्हापूर, दि.१२ : राज्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत...

डॉ. आंबेडकर कृषिक्रांतीचे जनक

0
परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांचे, अस्पृश्यांचे प्रश्नच सोडविले असे नाही, तर त्यांनी या देशाच्या विविध प्रश्नांचा मूलगामी विचार केला. त्यांची मूलभूत...

जागा निश्चिती होताच आयटी पार्कचा शासन निर्णय काढणार – उद्योग मंत्री उदय सामंत यांची...

0
गुंतवणूक परिषदेत १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सहकारी बँकांमधूनही होणार कर्जपुरवठा; येत्या पंधरा दिवसांत शासन निर्णय काढण्याची उद्योग...

राजधानी दिल्लीशी डॉ. बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे नातं…..

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील बराच काळ दिल्लीत गेला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिल्लीचे एक वेगळे नातेही निर्माण झाले.  ब्रिटिश सरकारच्या  म्हणजे प्रांतीय मंत्रिमंडळात...