शुक्रवार, जून 6, 2025
Home Blog Page 4

पीक विम्यासंदर्भातील जिल्हास्तरावरील प्रकरणे तात्काळ निकाली काढा –  कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. 4 : शासनाने केलेल्या पिक नुकसान अहवालावर आधारित पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्‍यांना नुकसान भरपाई द्यावी. कोणताही शेतकरी पिक विम्यातून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी असे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

मंत्रालयात नाशिक, नांदेड व परभणी जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाई मिळण्याबाबत आयोजित बैठकीत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार डॉ.राहुल आहेर, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक इ.शा.नायकवडी, विजयकुमार औटी उपस्थित होते. यावेळी दूरदृश्यप्रणालीव्दारे परभणी, नांदेड व नाशिकचे जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

ॲड. कोकाटे म्हणाले की, पिक विमा कंपन्यांनी जे दावे फेटाळले आहेत ते तपासून घ्यावेत. तसेच जिल्हा प्रशासनाने पिक विमा कंपन्यांनी शासनाकडे केलेले अपील लवकरात लवकर निकाली काढून शेतकऱ्‍यांनी पिक विम्याचे वेळेत वाटप करावे. यामध्ये कृषी विभाग व विमा कंपन्यांनी समन्वयाने काम करावे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा. सर्व पात्र पिक विमा धारकांना नियमानुसार लाभ मिळेल याची यंत्रणांनी कटाक्षाने खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. 4 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून कृषीच्या सर्व वस्तू शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि कृषी माल देखील याच ठिकाणी विक्री देखील होईल, असे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

मंत्रालयात  दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, उपाययोजना व सांगली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयासंदर्भात आयोजित बैठकीत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, कृषी आयुक्त सूरज मांढरे यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, सोलापूर येथे कृषी भवन व बाजारपेठ मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉलमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल व शहरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना उत्पादित केलेला भाजीपाला, फळे, तृणधान्य, कडधान्य व इतर कृषी आधारित उत्पादने थेट व माफक दरात खरेदी करता येतील. याच धर्तीवर राज्यात देखील कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारल्यास शेतकऱ्‍यांना याचा फायदा होईल त्यांचा वेळ वाचून त्यांना सर्व कृषी माल विक्री व कृषीसाठी लागणाऱ्‍या सर्व सहसाहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. ‘एक पीक एक गाव’ ही संकल्पना देखील विकसित करण्यासाठी विचाराधीन आहे.

ॲड.कोकाटे म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, पेठच्या कामांना तात्काळ निधी वितरीत करून या महाविद्यालयाचे काम सुरू करा.यामध्ये दिरंगाई करू नका हे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

बापगाव आणि काळडोंगरी येथे पणन सुविधा प्रकल्प उभारणार – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 4 : ठाणे जिल्ह्यातील बापगाव आणि नागपूर जिल्ह्यातील काळडोंगरी येथे पणन सुविधा प्रकल्प उभारण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून राज्यातील शेतमालाची निर्यात वाढवण्यासाठी दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक पणन सुविधा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी इतर देशातील तसेच इतर राज्यातील अत्याधुनिक सुविधा केंद्राचा अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात याबाबत बैठक झाली. आमदार चरणसिंग ठाकूर, पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव विजय लहाने, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सल्लागार मझार्स ॲडव्हायजरी एलएलपी फर्मचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्र हे फळे आणि भाजीपाला निर्यात क्षेत्रातील आघाडीचे राज्य असून राज्यातील शेतीमालाची निर्यात वाढवण्यासाठी भिवंडी तालुक्यातील बापगाव आणि काळडोंगरी येथे येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त पणन सुविधा प्रकल्प उभारला जाईल, यासाठी इतर देशातील तसेच इतर राज्यातील अत्याधुनिक सुविधा केंद्रांचा अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात यावा. या प्रकल्पात विविध फळांसाठी उपयुक्त आणि ऑटोमॅटिक काम करणारी अत्याधुनिक यंत्रणा असावी तसेच या सुविधा निर्माण झाल्यानंतर त्या कायम सुरळीत सुरू राहतील याची दक्षता घ्यावी.

बापगाव येथील जागेवर फळे भाजीपाला निर्यातीकरिता व्हेपर हिट ट्रिटमेंट प्लँट, विकिरण सुविधा, पॅक हाऊस उभारणे, शीतगृह आणि पॅक हाऊस सुविधा असलेले आयात हब उभारणे, साठवणूक सुविधा, सार्वजनिक खासगी भागीदारीकरिता सुविधा, व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारणे आदी या प्रकल्पातील मुख्य घटक आहेत. तर काळडोंगरी येथील जागेवर संत्रा फळाकरिता तसेच मिरचीकरिता पॅकहाऊस, प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअरेज, ग्रेडींग लाईन, धान्य व तेलबियाकरिता ग्रेडींग लाईन, ग्रेन शेड सुविधा, वाळलेल्या मिरचीकरिता मेकॅनिकल स्टेम कटींग मशीन, व्हॅक्युम पॅकींग सुविधा, सोलर टनेल डायर, कोल्ड स्टोअरेज, गोदाम उभारणीकरिता जागा, सार्वजनिक खासगी भागीदारीकरिता जागा, व्यावसायिक कॉम्प्लेक्स आदी निर्माण करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

आदिशक्ती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरावर १५ दिवसांत समित्या स्थापन करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ४ : महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबविण्यात येणारे आदिशक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी  १५ दिवसांत ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कारासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत  गाव, तालुका, आणि राज्यस्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. विविध विभागांमधील समन्वयाद्वारे महिलांच्या समस्या सोडविणे, योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि स्थानिक पातळीवर महिलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करणे, विधवा प्रथा, हुंडा प्रथा, स्त्री भ्रुण हत्या रोखणे, एकल महिलांच्या योजनांसंदर्भात जनजागृती करणे यासाठी ग्रामस्तरीय समिती काम करणार आहे. आदिशक्ती अभियान हा महिलांच्या सक्षमीकरणाचा एक व्यापक उपक्रम आहे.

सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर त्वरित उपाययोजना आखणे, शासकीय योजनांची माहिती व लाभ महिलांपर्यंत पोहोचविणे, महिला उद्योजकता, स्वयंपूर्णता, शिक्षण, आरोग्य व पोषणासंदर्भात विशेष उपक्रम, ग्रामस्तरावर महिलांच्या प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्यासाठी समिती सक्रिय करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी आयुक्त नयना गुंडे, सह आयुक्त राहुल मोरे, सहसचिव वि.रा.ठाकूर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ४: वातावरण बदलामुळे होणारी हानी पर्यावरण संवर्धनातून निश्चितच टाळता येणार आहे. पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू प्लास्टिक असून ‘सिंगल यूज प्लास्टिक’ वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. यावर्षी शासनाच्यावतीने १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धनात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

भामला फाऊंडेशन आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वातावरण बदलावर जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अँम्फी थिएटर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमास गोवा राज्याचे परिवहन मंत्री मौविन गोडिन्हो, मुंबई महापालिका सहआयुक्त दिनेश पल्लेवाड, भामला फाउंडेशनचे आसिफ भामला, अभिनेत्री रवीना टंडन, गोदरेज कंपनीचे नादिर गोदरेज, गीतकार स्वानंद किरकिरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कमीत कमी प्लास्टिक वापरून पर्यावरणाची होणारी हानी टाळावी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्याने विघटनकारी प्लास्टिक निर्माण करणे शक्य आहे. प्लास्टिकला पर्याय अशा विघटनकारी प्लास्टिक निर्मिती करावी. राज्यात राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेत केवळ वृक्ष लागवड करण्यात येणार नसून वृक्ष जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या मोहिमेत वृक्षांचे संवर्धनही करण्यात येईल.

देशातील सर्वात मोठे सांडपाणी प्रक्रियेचे जाळे मुंबईत तयार करण्यात येत असून भविष्यात मुंबईतील समुद्रात जाणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया केलेले असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०३० पर्यंत नेट झिरो चे उद्दिष्ट आहे. देशाच्या एकूण ऊर्जे गरजेपैकी ५० टक्के ऊर्जा पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडून मिळविण्याचा मानसही आहे. यामध्ये महाराष्ट्र पुढे असून राज्याने २०२६ पर्यंत कृषी क्षेत्राची १६ हजार मेगावॉट ऊर्जा गरज सौर ऊर्जेपासून भागविण्यासाठी काम सुरू केले आहे. राज्यातील महानगरांमधील संपूर्ण सार्वजनिक परिवहन सेवा ग्रीन ऊर्जेवर आणण्यात येत आहे. मुंबईत याची सुरुवातही करण्यात आली आहे. तसेच मुंबई शहरातील संपूर्ण  परिवहन सेवेचे तिकीट ‘सिंगल’ तत्वावर आणण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धन आणि सिंगल यूज प्लास्टिक वापर बंदी जनजागृतीबाबत अभिनेता अजय देवगण यांच्यावर चित्रित ‘प्यासा’ या प्रचार मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.

000

निलेश तायडे/विसंअ

महाराष्ट्राच्या प्रगतीचा बहुआयामी आराखडा तयार; २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, ४ : महाराष्ट्र २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठणार आहे आणि या दिशेने राज्याने ठोस पावले उचलली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हॉटेल ताज लँड्स एन्ड येथे मॉर्गन स्टॅन्ले आयोजित “इंडिया इन्वेस्टमेंट फोरम 2025” मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगतीच्या विविध पैलूंवर सविस्तर माहिती दिली.

सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अर्ध्या ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेली आहे. टाटा सन्स यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सल्लागार परिषद स्थापन झाली असून, २० वरिष्ठ सीईओंच्या सहकार्याने एक विस्तृत रोडमॅप तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात पायाभूत सुविधा, उद्योग, सेवा, शेती व फिनटेक या क्षेत्रांचा समावेश आहे. याचबरोबर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ आराखड्याचे सादरीकरण २ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यात अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन टप्प्यांचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

औद्योगिक विस्तार

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील औद्योगिक ताकद आता केवळ मुंबई-पुण्यापुरती मर्यादित न राहता छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नाशिक, रायगड यांसारख्या भागांत झपाट्याने वाढते आहे. इव्ही हब, स्टील सिटी, व औद्योगिक टाऊनशिपद्वारे संपूर्ण राज्य औद्योगिक महासत्ता बनत आहे.

१०० मिलियन डॉलर्सची पायाभूत गुंतवणूक

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी १०० मिलियन डॉलर्सची पायाभूत गुंतवणुक करण्यात येणार असल्याचे सांगून त्यात वाढवण बंदर, नागपूर-गोवा महामार्ग, नवीन विमानतळ, मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड प्रकल्पांचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प राज्याच्या व्यापार व वाहतूक व्यवस्थेला नवे परिमाण देणार आहेत, असेही सांगितले.

मुंबईत झपाट्याने शहरी परिवर्तन

धारावी पुनर्विकास प्रकल्पासह मुंबईत शहरी पुनर्रचना वेगात सुरू असून, ८ लाख नागरिकांचे पुनर्वसन यामार्फत केले जाणार आहे. त्याचबरोबर “सिंगल ट्रान्सपोर्ट कार्ड” व एकत्रित मोबाईल ॲपद्वारे वाहतूक व्यवस्था सुलभ केली जात आहे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांमुळे किनारपट्टी स्वच्छ होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य

परकीय गुंतवणूक वाढत असून महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. एकात्मिक डिजिटल “सिंगल विंडो” प्रणाली, एमआयडीसी औद्योगिक पार्क आणि ‘कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट’ यांच्या माध्यमातून गुंतवणूक सुलभ झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

परकीय गुंतवणुकीत अव्वल असल्याने मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमामध्ये सत्कार

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशाच्या 40 टक्के आघाडीवर आहे. यानिमित्ताने या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

कृषी क्षेत्रासाठी जलसुरक्षा व सौरऊर्जा योजनेचा ध्यास

राज्यात शेतकऱ्यांसाठी जलसुरक्षा, तंत्रज्ञान, वीज यांच्यावर भर दिला जात आहे. २०२६ पर्यंत सौरऊर्जेवर आधारित मोफत दिवसभर वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. यामुळे उत्पादन व उत्पन्न वाढेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पर्यटन विकासासाठी पाच वर्षांची ठोस योजना

महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात मोठी क्षमता असून पुढील पाच वर्षांसाठी ठोस आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थानिक सहभाग, संरक्षण क्षेत्र आणि पायाभूत सुविधा यांच्यामार्फत पर्यटन क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग; महाराष्ट्राची भाग्यरेषा 

विशेष लेख

राज्याची प्रगती अधिक गतिमान करण्यात दळणवळण सुविधांची व्यापक उभारणी महत्त्वाची बाब आहे. त्याला प्राधान्य देत शासन नागरिकांच्या प्रवास सुविधेच्या दृष्टीने  अनेक प्रकल्प  गतीने पूर्ण करत आहे. यामध्ये  सर्वात महत्त्वाचा ठरलेला 701 कि.मी लांबीचा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी  महामार्ग आता अंतिम टप्प्यासह पूर्णपण सुरु होत आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांना कलाटणी देणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 11 डिसेंबर 2022 रोजी पार पडले. दुसऱ्या टप्याचे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकमठाण) ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंज दरम्यान एकुण 80 कि.मी लांबीचे लोकार्पण दि. 26 मे 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी पर्यंतच्या 25 किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण दि. 4 मार्च 2024 रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले होते.  एकूण 701 कि.मी पैकी 625 कि.मी लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरु असून आतापर्यंत जवळजवळ 2 कोटी  वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे. आता, समृद्धी महामार्गाची उर्वरित 76 कि. मी लांबीचे (इगतपुरी ते आमणे) लोकार्पण दि. 05 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.

प्रकल्पाची व्याप्ती

राज्याच्या पाच महसुल विभागाच्या 10 जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधील 392 गावांमधुन जाणारा हा सहा पदरी महामार्ग ग्रीन फिल्ड संरेखन आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक व ठाणे हे 10 जिल्हे प्रत्यक्षरीत्या जोडले जातात. तसेच समृद्धी महामार्गामुळे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड हे  14 जिल्हे अप्रत्यक्षरीत्या जोडले जातात. जुन्या नागपूर मुंबई मार्गावरुन नागपूरहून मुंबईकडे येण्यास 17-18 तास लागतात. नवीन “ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे” ने प्रवास 8 तासात करणे शक्य होणार आहे. आता मुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ते नागपूरस्थित मिहान यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे बंदरावरुन जलद वाहतूक करुन आवश्यक माल भारतभर वेळेवर पोहोचवणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागास महत्वाचा ठरलेला आहे.

हा महामार्ग दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि शिर्डी, अजिंठा – वेरुळ लेणी, लोणार सरोवर आणि इतर पर्यटन स्थळांना जोडणारा आहे. देशाचे ग्रोथ इंजिन असणाऱ्या महाराष्ट्रासाठी  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ही खऱ्या अर्थाने समृद्धीची भाग्यरेषा ठरणार आहे.

वैशिष्ट्यांनी समृद्ध महामार्ग

राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असेलला समृद्धी महामार्ग हा अभियांत्रिकी कौशल्यासह अनेक वैशिष्ट्यानींही  समृद्ध असा महामार्ग आहे. दळणवळणाची गतिमान घौडदौड साध्य करत पर्यंटन, उद्योग, शेतमालाला कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचवण्यास सहाय्यक ठरत असलेल्या समृद्धी महामार्गावरुन  आतापर्यंत अंदाजे दोन कोटी वाहनांनी प्रवास करत सुखद, रहदारीमुक्त सुलभ, गतिमान  प्रवासाचा  अनुभव घेतला आहे.

सर्वाधिक लांबी रुंदीचा बोगदा

समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील 76 कि.मी. ची लांबी  ही  नाशिक व ठाणे या दोन  जिल्ह्यात येते. सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान पेलले. या टप्प्यामध्ये एकूण 5 दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी 10.73 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.46 कि.मी) आहे. त्यातील पॅकेज 14 (इगतपुरी) येथील बोगदा 8.00 कि.मी लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा (17.61 मीटर) बोगदा आहे. या बोगद्याची उंची 9.12 मीटर आहे.

प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारी  अग्निशमन यंत्रणा

अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वात लांबीच्या बोगद्यामध्ये बसविण्यात आलेली आहे. या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे.   त्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वाहतूक अधिक जलद होणार आहे, कसारा घाटातील वाहतूक अधिक गतीमान होण्यासही  त्यामुळे सहाय्य होणार आहे.

सर्वाधिक लांबीचा पूल

भौगालिक परिस्थितीतून   मार्ग काढत महामार्गाचे काम पुढे नेत असताना नाशिक व ठाणे या जिल्ह्यातील  76 किमीच्या डोंगर दऱ्यामुळे व्हायाडक्ट (मोठे पूल) व बोगदे बांधणे हे मोठे जिकरीचे होते. काही ठिकाणी कठीण खडकात 30 ते 40 मीटरपर्यंत खोदकाम करावे लागले. या टप्प्यात एकूण 17 व्हायाडक्ट (मोठे व्हॅली पूल) असून त्याची  एकूण लांबी 10.56 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.12 कि.मी) आहे.  या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल (व्हायाडक्ट) 2.28 कि.मी लांबीचा आहे. या टप्प्यात एका ठिकाणी (व्हायाडक्ट-2) पुलाच्या काही खाबांची उंची 84 मीटरपर्यत आहे.

इंटरचेंजेस

या टप्प्यात इगतपुरी, खुटघर व आमणे येथे इंटरचेंज येतात. या शेवटच्या टप्यात मोठ्या प्रमाणात विद्युत उच्च तसेच कमी  दाबाच्या विद्युत वाहिन्या स्थंलातरित कराव्या लागल्या, त्यामध्ये  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या कमी दाबाच्या 62 वाहिन्या स्थंलातरित करण्यात आलेल्या आहेत, तसेच, टोरेंट पॉवरच्या 5 विद्युत वाहिन्या व पॉवर ग्रीडची 1 विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्यात आलेली आहे. तसेच, या टप्प्यात 1 रेल्वे ओलांडणी पुल बांधण्यात आलेला आहे.

पर्यावरण पूरक

प्रकल्पामध्ये वन्यजिव संरक्षणासाठी एकूण १०० बांधकामे पूर्ण झाली असून, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. वन्यजीवांच्या वावरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणी ‘ध्वनी रोधक’ ची तरतूद करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा ११ लक्ष ३१ हजार झाडे लावण्याची प्रक्रिया सुरु आहे.  तसेच   या प्रकल्पामध्ये एकूण २०३  मेगा व्हॅट सौर उर्जा निर्मिती प्रस्तावित आहे.

प्रवासातील सुलभता

इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडी) हा 76 किमीचा टप्पा वाहतुकीस सुरु झाल्यानंतर ठाणे (आमणे) व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासात करणे सहजतेने शक्य  होणार आहे. तसेच ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांनाही या महामार्गामुळे आपला  प्रवास सुलभरित्या व जलदपणे करणे शक्य होणार आहे.  त्यासोबतच शिर्डी, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील            शेतकऱ्यांना आपला  शेतमाल सुलभतेने  कमी कालावधीत  मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवता येणार आहे.  शेतकरी, उद्योजक, प्रवाश्यांना मुंबई महानगर प्रदेशात कामानिमित्त वरचवेर येणे जाणे हे अधिक सोयीस्कर होणार असून शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक संधीचे क्षेत्र विस्तारण्याच्या दृष्टीनेही हा महामार्ग निश्चितच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहाय्यक ठरणारा आहे.

राज्याच्या उपराजधानीला  राज्याच्या राजधानीपर्यंत जोडणार  नागपूर ते मुंबई दरम्यानचे अतंर अवघ्या आठ तासांवर आणणारा समृद्धी महामार्ग निश्तिच महाराष्ट्राच्या औद्यागिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासालाही गतिमान करणारा ठरेल, यात शंका नाही.

००००

शब्दांकन – वंदना  थोरात, वारेगावक

विभागीय संपर्क अधिकारी

कामावर अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीस तात्काळ मदत देण्यात यावी – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. 4 :- कामावर असताना अपघाती मृत्यू झालेल्या कामगाराच्या पत्नीस नियमानुसार भरपाई व मदत जलदगतीने देण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून संबंधित कंपनी व्यवस्थापनाने कंत्राटदारास सूचित करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानसभा उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अपर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, कामगार विभागाचे उपसचिव स्वप्निल कापडणीस, चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक गोसावी, श्रमिक कामगार संघटनेचे यशवंत भोसले, टाटा मोटर्सचे उप महाव्यवस्थापक प्रशांत जोशी, अनितेश देशपांडे यासह कामगार विभाग, कंत्राटदार कंपनी व टाटा मोटर्सचे अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणाले, पिंपरी चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीत कंत्राटदारा मार्फत कामास नेमलेल्या परप्रांतीय कामगाराचा कामादरम्यान मृत्यू झाला. कंत्राटदाराच्या कामकाजाची तपासणी करण्यात यावी. कामगाराच्या वारसास योग्य ती मदत देण्यात यावी, असे श्री.बनसोडे यांनी सांगितले.

संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी यापूर्वीच पालकांना साडेपाच लाख रुपयांची व पत्नीस एक लाख रुपये दिल्याचे कंत्राटदार व कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले होते.

कामगार विभागाशी संबंधित विविध प्रकरणांबाबत बैठका

विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार विभागाशी संबंधित विविध प्रकरणांबाबत बैठका झाल्या. यामध्ये धानोरी येथील कंपन्यातील कामगारांशी संबंधित चर्चा करण्यात आली. कामगारांच्या प्रश्नी निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापन सक्षम नसल्याने त्यांचे कंपनी मालक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांनी दिले.

0000

किरण वाघ/विसंअ/

गोदावरी खोरे विकास महामंडळाकडील विविध योजनांच्या कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आढावा

मुंबई दि. ४ :- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गोदावरी खोरे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या विविध उपसा सिंचन योजना, कालवा अस्तरीकरण बाबत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विविध विषयासंदर्भात बैठका घेऊन या योजनांची कामे गतीने करण्याबाबत सूचना दिल्या.

मंत्रालयातील परिषद सभागृहात जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीवेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार सर्वश्री संभाजी पाटील निलंगेकर, काशिनाथ दाते, प्रकाश सोळंके, विलास भुमरे, चंद्रकांत नवघरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्यासह जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत धनोडा उच्च पातळी बंधारा, मौजे किनी कदू (ता. अहमदपूर) (जि. लातूर) येथील मोघा ल.पा. तलाव, निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्ती, गोदावरी खोरे मधून अधिकाऱ्यांनी पाहणी केलेले प्रकल्प व नवीन सुचवावयाची कामे, मांडओहोळ कालवा अस्तरीकरण करणे, सिंदफणा नदीवर १५ वर्षापूर्वी बांधलेल्या देपेगाव-सांडस चिंचोली (ता. माजलगाव, जि. बीड) कोल्हापुरी बंधाऱ्याचे उच्च पातळी बंधाऱ्यात रुपांतर करणे, माजलगाव, कुंडलिका, सरस्वती, गुणवती या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून सिंचना अभावी वंचित असलेल्या गावांना उपसा जलसिंचनेद्वारे शेतीसाठी पाणी मिळणे, उर्ध्व कुंडलिक प्रकल्प प्रकल्पातून अतिरिक्त पाण्याचा लाभ देणे, माजलगाव मतदारसंघातील कामांबाबत जलसंपदा विभागाकडे प्रलंबित प्रस्ताव, मौजे मोरवड, ता. वडवणी, जि.बीड ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाद्वारे पाणी पुरवठा, मौजे मोरवड मध्ये वंचित राहिलेल्या क्षेत्रास लाभ क्षेत्रात आणणे, पैठण व पाचोड या दोन तालुक्यासाठी सिंचन व पिण्याच्या पाण्याची शाश्वत सुविधा पुरविण्यासाठी ब्रह्मगव्हाण उपसासिंचन योजनेच्या कामासंदर्भात, पैठण तालुक्यातील उर्वरीत गावांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करुन देणे, केळी पाझर तलावाचे पुनर्जीवन करणे, वसमत मतदारसंघातल सिद्धेश्वर उपसा जल सिंचन योजना कार्यान्वित करणे आणि नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

जळगाव, दिनांक  4 :  केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी नुकतेच रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील रावेर स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्याची मागणी केली. या बैठकीत रावेर आणि वरणगाव स्थानकांवर स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार गाड्यांचे थांबे देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

श्रीमती खडसे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे थांबे तात्काळ मंजूर करण्याची विनंती केली. त्यामध्ये पुढील गाड्यांचा समावेश आहे :

नवजीवन एक्स्प्रेस (गाडी क्र. 12656) – बोदवड थांबा

दानापुर पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. 12150) – रावेर थांबा (पुणे मार्ग)

महानगरी एक्सप्रेस (गाडी क्र. 22177) – रावेर थांबा

रावेर येथे या गाड्यांचे थांबे देण्यात आल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग तसेच सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल, असा विश्वास श्रीमती खडसे यांनी व्यक्त केला.

रेल्वे बोर्डाचे चेअरमन  सतीश कुमार यांनी या मागण्यांकडे सकारात्मकपणे लक्ष देण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीस रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

000

ताज्या बातम्या

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा

0
मुंबई, दि.5 :- चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीपासून इंदू मिल येथे निर्माण होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या...

श्री जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्त्वाची - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पर्यावरण दिनी वृक्षारोपण मोहिमेतून मंदिर व परिसर विकास आराखडा अंमलबजावणीस...

ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल – मुख्यमंत्री...

0
ठाणे,दि.05 (जिमाका):- ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि...

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि.5 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून अण्णासाहेब मगर स्टेडियम व सिटी सेंटर भवन हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश...

आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर

0
मुंबई, दि. ५ : आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व खरी माहिती पोहोचणे अधिक गरजेचे असते. यासाठी आपत्ती काळात घडणाऱ्या सर्व घटना, आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याची...