सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 81

मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट २०४७ मध्ये सर्वसमावेशकता असावी – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. 26 : मत्स्यव्यवसाय विभागाचे व्हीजन डॉक्युमेंट 2047 तयार करत असताना वातावरण बदलामुळे मत्स्यव्यवसायावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश असावा. तसेच या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये मत्स्यव्यवसायाशी संबधित भविष्याचा वेध घेणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान व ‘एआय’चा वापर यांचाही समावेश करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मंत्रालयात व्हीजन डॉक्युमेंट 2047 विषयी बैठक झाली. यावेळी मत्स्यव्यवसाय सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यंदा पावसाळा 20 दिवस लवकर सुरू झाल्याचे सांगून मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले की, यामुळे आता आणखी 20 दिवस मच्छिमार व्यवसाय बंद राहील. वातावरण बदलाचा सर्वांधिक परिणाम मत्स्यव्यवसायावर होतो. 2047 पर्यंत या वातावरण बदलामुळे होणारे परिणाम आणि या परिणामांना सामोरे जाताना करावयाच्या उपाययोजना यांचा या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये समावेश करताना या उपाययोजना लोकाभिमूख असतील असे पहावे. व्हीजन डॉक्युमेंट हे वास्तवदर्शी आणि प्रयोगशील असावे. त्यासाठी जपान, इंडोनेशिया, नॉर्वे, स्विडन, इस्त्राईल या देशांसह केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना भेट द्यावी. त्यांच्याकडे राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा अभ्यास करून त्यांचा राज्यात कशा प्रकारे समावेश करता येईल हे पहावे. किनारपट्टीची सुरक्षा यांचाही समावेश या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये करावा. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मच्छिमारी बंदर आणि मच्छि बाजारांत आधुनिक तंत्रज्ञानाचा, सोलरचा वापर यांचाही समावेश या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये करण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी

मुंबई, दि. 26 : मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदरे विभागामार्फत राज्यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी उपलब्ध होण्याबाबत मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांनी आशियाई बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी आशियाई बँकेचे राष्ट्रीय संचालक मिओ ओका, राष्ट्रीय उपसंचालक आरती मेहरा, नगर विकास तज्ञ संजय जोशी, प्रकल्प अधिकारी भावेश कुमार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर ‘उदय’ चे सल्लागार प्रितेश बाफना उपस्थित होते.

यावेळी मुंबईतील तारापोला मत्स्यालय, मुंबईतील वॉटर मेट्रो, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड चे नवीन बंदर उभारणी, विद्यमान बंदराची देखभाल दुरुस्ती, आणि देखरेखीसाठीच्या निधीविषयी चर्चा करण्यात आली. सकारात्मक झालेल्या या चर्चेमध्ये आशियाई विकास बँक अधिकारी यांनी लोकहिताच्या व विकासाच्या या प्रकल्पांमध्ये निधी देण्याविषयी सकारात्मकता दर्शवली. तसेच सॉव्हरींग आणि नॉन सॉव्हरींग निधी विषयीची सविस्तर माहिती दिली.

प्राथमिक स्वरूपात झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पांचा व निधीचा अभ्यास करून तो पुन्हा आशियाई विकास बँकेस सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या चर्चेमुळे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्या अनेक प्रकल्पांना निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांना आर्थिक बळ मिळणार आहे.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

‘स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल; नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नागपूर, दि. 26 : कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा  प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जामठा परिसरातील स्वस्ती निवास या इमारतीचे भूमिपूजन तसेच कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, पर्नो रिका इंडियाचे जॉन तुबुल आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, अनेक संस्थांची कार्यपद्धती मी जवळून पाहिली आहे. अनेक संस्थांमध्ये प्रत्यक्ष काम केले आहे. तथापी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे ज्या संवेदनशीलतेने कॅन्सर रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना धीर देत उपचार केले जातात ती भावनिक आपुलकी इतरत्र कमी आढळते. येत्या काळात देशातील सर्वात चांगल्या संस्थेमध्ये नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटची गणना होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी व्यक्त केला.

ज्या संस्थेमध्ये सेवाभाव असतो तसेच समाजात कुणीही दुःखी राहू नये ही भावना उराशी जपणारे सहकारी असतात त्या संस्था लोकांना अधिक भावतात. लाखो नागरिकांच्या दुःखात सहाय्यभूत होण्याचा विचार आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. हा विचार खूप कमी लोकांमध्ये दिसून येतो या शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कॅन्सर इन्स्टिट्युटचा गौरव केला.

आज ही संस्था अल्पावधीतच वटवृक्ष झाली आहे. स्वस्ती निवासच्या माध्यमातून या इन्स्टिट्युटला पूर्णत्व देण्याचे काम आता होत असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा असल्याचे  गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी यावेळी काढले.

मोठ्या प्रमाणावर मुखकर्करोग आपल्या देशात आढळतो. सर्वाइकल कॅन्सर ही आढळतो. काही वर्षांपूर्वी कॅन्सर हा दुर्धर आजार समजला जायचा. मात्र, आता देशभरात अनेक चांगल्या कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापना झाल्या आहेत. त्यापैकी नागपुरातील कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र राज्यातील रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. या इन्स्टिट्यूटला केंद्राकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील आरोग्य क्षेत्रातील सेवा सुविधा अधिक भक्कम करण्यात येत आहेत. यात नवीन एम्सची निर्मिती, एमबीबीएस विद्यार्थी क्षमतेत वाढ, नवीन रुग्णालयांची निर्मिती व अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी सांगितले.

‘एनसीआय’ला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून साकारू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही संस्था देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. येत्या काळात हे ध्येय आम्ही नक्की साकारू.  नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा रुग्ण आणि कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कर्करोगावरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना निवासाची चांगली सुविधा निर्माण व्हावी यासाठी स्वस्ती निवासची निर्मिती करण्यात येत आहे. लवकरात लवकर ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. इन्स्टिट्युटमार्फत अनेक उपक्रम राबविले आहेत. जागतिक स्तरावर जे सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.  या संस्थेचा आतापर्यंत यशाचा चढता आलेख राहिला असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वस्ती निवासची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची  पाहणी

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी भूमिपूजन समारंभापूर्वी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी त्यांनी इन्स्टिट्युटमधील सेवा व सुविधांबद्दल कौतुक केले. इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी केंद्रीय मंत्री श्री. शाह यांना विविध सेवा व सुविधा विषयांची माहिती दिली.

 ‘स्वस्ती निवास’ विषयी…

डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था व्यवस्थापनाने कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियासाठी निवासी सुविधा तयार करण्याची योजना आखली आहे. ही सुविधा ‘ स्वस्ती निवास ‘ या नावाने ओळखली जाणार असून यातून कॅन्सर रुग्णांना उपचारादरम्यान राहण्याची सोय उपलब्ध होईल. स्वस्ती निवासाच्या माध्यमातून ४०० रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध होईल. यातून रुग्णाच्या उपचारासाठी दीर्घकाळ राहण्याचा आर्थिक भार कमी होऊन कॅन्सर उपचार अधिक परवडणारे होण्यास मदत होणार आहे.

00000

 

‘प्रयास’ मुळे हजारो बंदींच्या जीवनामध्ये होतोय सकारात्मक बदल

मुंबई, दि. 26 : कारागृहातील बंदीजनांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे आवश्यक आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कारागृह विभाग आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. हा कार्यक्रम बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प म्हणून ओळखण्यात येतो. ‘प्रयास’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येतो. या प्रकल्पामुळे राज्यातील हजारो बंदींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. या उपक्रमाला पुढील तीन वर्षांची मुदतवाढ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कारागृह विभाग व टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्यामध्ये नव्याने सामंजस्य करार नुकताच करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासन व टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्यामध्ये सन 2016 मध्ये ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, येरवडा ही पाच मध्यवर्ती कारागृह व ब्रोस्टल स्कूल, नाशिक येथे बंदी कल्याण व पुनर्वसनाच्या उद्देशाने सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण 13 सामाजिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात 2 पुरुष समाजसेवक, नागपूर कारागृहात दोन पुरुष व एक महिला समाजसेवक, येरवडा, ठाणे कारागृह, नाशिक येथील ब्रोस्टल स्कूल येथे प्रत्येकी एक समाज सेवक, नाशिक मध्यवर्ती कारागृहात तीन पुरुष आणि एक महिला समाज सेवक कार्यरत आहेत. या प्रकल्पामध्ये कारागृहातील बंदी व सुटका झालेल्या बंद्यासाठी विविध कार्यक्रम व पुनर्वसनात्मक सेवा पुरविण्यात येत आहे.

   प्रकल्पाची उद्दीष्टे

तुरुंगातील बंदी व सुटका झालेल्या कैद्यांचे पुनर्वसन, तुरुंग व्यवस्थेत सामाजिक कार्यकर्त्यांना संस्थात्मक बनवण्याची प्रक्रिया तयार करणे, तुरुंगातील बंदींना मानसिक स्थैर्य मिळण्याकरिता मदत करणे आणि तुरुंगाचे प्रशासकीय कामकाजाच्या सुरळीतपणासाठी मदत करणे हे या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट आहेत.

सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका

सामाजिक कार्यकर्त्याने कायदेशीर मार्गदर्शन आणि मदत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मोफत कायदेशीर साहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी वकीलांशी संपर्क साधणे, आरोग्य आणि स्वच्छता, मानसिक आरोग्य सेवा आणि समुपदेशनाची तरतूद करणे, प्रथमोपचार आणि सामुदायिक आरोग्य विषयक अल्पकालीन प्रमाणित प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, आरोग्यविषय जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे, तुरुंगामध्ये आणि तुरुंगामधून सुटल्यानंतर कल्याणकारी आणि पुनर्वसन सेवांची तरतूद करणे इत्यादी कामे सामाजिक कार्यकर्ते करत असतात.

बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्पांतर्गत कारागृहातील बंदीच्या विनंतीनुसार व संबंधित तुरुंग अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या कालावधीमध्ये पाच मध्यवर्ती कारागृह व ब्रोस्टल स्कूल, नाशिक मधील एकूण 16 हजार 994 बंदींपर्यंत सामाजिक कार्यकर्ते पोहोचू शकले आहे. त्यापैकी 12 हजार 275 हे न्यायाधीन बंदी असून 4 हजार 719 बंदी व ब्रोस्टल स्कूलमधील 26 किशोरबंदीसोबत कार्य करण्यात आले आहे.

या कार्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी कैद्यांची प्राथमिक माहिती गोळा केली. त्यानुसार त्यांना समुपदेशन, कायदेशीर मार्गदर्शन, तसेच उच्च न्यायालयाद्वारे कायदेशीर मदत, न्यायालयीन भेटी, वकिलांच्या भेटी, पीआर बाँडवर सुटका करण्यासाठी साहाय्य, जामिनासाठी कुटुंबासोबत पाठपुरावा, पोलिस स्टेशनला भेटी, गृहभेटी, कुटुंबामधील व्यक्तींसोबत फोनद्वारे संपर्क, निवारा गृहांचा शोध आणि बंदी मुक्त झाल्यानंतर मुक्त बंदी योजना, त्यांच्या मुलांसाठी बाल संगोपन योजना आणि बंदी पुनर्वसन होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.

कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साहाय्य, बंद्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, कायदेविषयक सत्र, मार्गदर्शन शिबिर, वैद्यकीय शिबिर, तसेच बंद्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बंदी सुटल्यानंतर छोट्या व्यवसायासाठी साहाय्य, बंदी सुटल्यानंतर गरजू बंदीना प्रवास खर्च, बंद्यांच्या कुटुंबासाठी रेशन पुरविणे, तसेच बंद्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी विभाग व स्वयंसेवी संस्थांकडून संसाधने उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.

समुपदेशन कार्य

पाच मध्यवर्ती कारागृहातील 12 हजार 588 बंदीचे समुपदेशन करण्यात आले. या समुपदेशनात कौटुंबिक परिस्थिती विचाराने त्रस्त, जामीन कार्यास विलंब लागल्याने चिंतेत असलेले, कुटुंबीय सदस्यांची आर्थिक बिकट परीस्थितीबाबत चिंताग्रस्त ,वैद्यकीयदृष्ट्या अडचणीत असलेले, तथा मानसिक अवस्थ असलेले बंदी. अशा विविध प्रकारचे अडचणीत असलेल्या बंदी सोबत समुपदेशन कार्य करण्यात आले. समुपदेशन केलेल्या बंदींसोबत गरजेनुसार भेट देऊन त्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यात आले.

फोनवरून संपर्क

कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, वकील मुलाखत, कागदपत्रांची व्यवस्था करणे, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, संबंधित स्वयंसेवी संस्था, प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी बंदीच्या विनंतीनुसार संबंधिताना फोनद्वारे संपर्क करण्यात आला आहे. एकंदरीत प्रकल्प चालू झाल्यापासून पाच मध्यवर्ती कारागृहातील बंद्यासाठी एकत्रितपणे 37 हजार 802 वेळा फोनद्वारे संपर्क करण्यात आला आहे.

कोरोना काळात कारागृहात मुलाखत सुविधा बंद होती, त्यावेळी बंदी बांधवांकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करण्याची सुविधा उपलब्ध होती. ज्या बंदी जणांचे बाहेरील पोलीस स्टेशनमधून पडताळणी झालेले संपर्क क्रमांक आलेले आहेत, अश्याच बंदी जणांना फोन सुविधा सुरु आहे. मात्र संपर्क क्रमांक पडताळणी न झालेल्या प्रकरणात बंद्यांच्या विनंतीनुसार तथा उप अधीक्षक यांच्या सूचनेनुसार बंदी निहाय नातेवाईक व संबंधित पोलीस स्टेशन सोबत फोनद्वारे समन्वय साधून 4 हजार 552 केसेसमध्ये कार्य पूर्ण करण्यात आले.

बंद्यांच्या कुटुंबीयांना गृहभेटीतून आधार

गृहभेट हे कैद्याची दुसरी बाजू शोधण्यासाठी आणि कुटुंबाकडुन बंद्यांना साहाय्य व कुटुबांना तात्काळ मदतीचा महत्त्वाचा मार्ग आहे. काही बंदी कारागृहात येतात, त्याविषयी नातेवाईकांना काहीच माहिती नसते. घरच्या कोणत्याच नातेवाईकाचा संपर्क नसल्यामुळे मुलाखतसुद्धा होत नाही. काही प्रकरणांमध्ये बंदीला भेटण्यास नातेवाईक दुर्लक्ष करतात. त्यामुळे बंदी मानसिक तणावामध्ये असतात. अशा परिस्थितीत समाजसेवकामार्फत कारागृह प्रशासनाच्या परवानगीने व बंदीच्या विनंतीने गृह भेटी करण्यात आल्या. बंदीच्या घरची आर्थिक परीस्थिती बघता त्यांना तात्काळ मदत करण्यासाठी तथा जामिनासाठी मार्गदर्शन, जामीन घेण्यास सक्षम जामीनदार उपलब्ध करण्यासाठी विविध स्तरावर बंदीच्या कुटुंबीय सदस्यांना मानसिक सक्षम करण्यात येते. विविध मुद्देनिहाय पाच मध्यवर्ती कारागृहातील 1 हजार 42 बंदीच्या गृहभेट करून मदत करण्यात आली आहे.

कुटुंबासोबत भेट व मुलाखत कार्य

टाळेबंदी कालावधीपासून माहे ऑक्टोबर 2021 पर्यंत सर्वच कारागृहात मुलाखत बंद होती, परंतु नोव्हेंबर 2021 पासून मुलाखत सुरु झाल्याने बंदीच्या कुटुंबियांना संपर्क साधून मुलाखतीला येणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. गरजेनुरूप गृहभेटही घेण्यात आल्या. मुलाखती दरम्यान कारागृह अधिकारी यांचे सोबत गरजेनुरूप समन्वय साधून ८ हजार ८०२ बंदींच्या नातेवाईकांसोबत मुलाखत घडवून देण्यात यश आले.

प्रकल्पांतर्गत कारागृह कामकाजामध्ये एकूण हस्तक्षेप केसेस 16 हजार 994 बंदी त्यामध्ये 26 किशोरबंदी, न्यायाधीन बंदी केसेस 12 हजार 275, शिक्षाधिन बंदी केसेस 4 हजार 719 आणि किशोर बंदी 26 याप्रमाणे आहेत.

कायदेशीर मार्गदर्शन आणि मदत

कायदेविषयक मार्गदर्शन 16 हजार 691 प्रकरणात, 42 कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 10 हजार 645 बंद्यांनी सहभाग घेतला. तसेच 2 हजार 45 न्यायालय भेट, 2 हजार 317 वकील भेट आणि बैठका घेण्यात आल्या. वैयक्तिक जामीनासाठी 1 हजार 122 प्रकरणे, तर 226 पोलीस स्टेशन भेटी करण्यात आल्या.

तसेच या उपक्रमांतर्गत मानसिक आरोग्याविषयीही तपासणी करण्यात येते. त्यामध्ये उदासी, चिंता आणि व्यसनाच्या वापरासाठी तपासणी, उदासी (डिप्रेशन), चिंता विकार (Anxiety), आणि व्यसनाच्या वापरासाठी (Substance abuse) तपासणी केली जाते. मध्यम आणि गंभीर प्रकरणे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (DMHP) कडे पाठवली जातील. जिल्हा मानसिक आरोग्य शिबिराद्वारे रेफरल केलेल्या प्रकरणी उपचार करण्यात येतील. अशा प्रकराची शिबिरे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत दर महिन्याला आयोजित करण्यात येतात. तर तीव्र मानसिक विकारासाठी रुग्णांना तसेच अत्यंत गंभीर मानसिक विकार (अक्यूट सायकॉटिक एपिसोड) असलेल्या रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात येते.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ परिसराचे भूमिपूजन ट्रांजिस्ट कॅम्पसचे सुध्दा ई-अनावरण 

नागपूर, दि. २६ : कामठी तालुक्यात चिचोली येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या (एनएफएसयू) कायमस्वरूपी कॅम्पसचे आणि एनएफएसयूच्या तात्पुरत्या कॅम्पसचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बालसिंह चहल, एनएफएसयूचे कुलगुरू डॉ. जे.एम. व्यास, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आदी उपस्थित होते.

सुरवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते विटा रचून पायाभरणी करण्यात आली. तसेच परिसरात ट्रांजिस्ट कॅम्पस चे ई- अनावरण सुद्धा करण्यात आले.

नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी (एनएफएसयू) ही जगातील पहिली आणि एकमेव फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी आहे. महाराष्ट्रात एनएफएसयूच्या नवीन कॅम्पसच्या स्थापनेमुळे ‘कुशल फॉरेन्सिक तज्ञांचा’ समूह तयार होईल. नागपूर कॅम्पस हे एनएफएसयूचे ११ वे कॅम्पस असेल. गुजरात, नवी दिल्ली, गोवा, त्रिपुरा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, मणिपूर, पुणे आणि परदेशात युगांडामध्ये येथे सदर विद्यापीठ कार्यरत आहे.

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना फॉरेन्सिक सायन्सच्या वैज्ञानिक वापराद्वारे गुन्हे रोखण्यास, कमी करण्यास आणि शोधण्यास मदत मिळेल आणि सर्व भागधारकांच्या फॉरेन्सिक क्षमता वाढवेल. तसेच या कॅम्पसमुळे कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित विविध समस्या सोडवण्यास मदत होईल, ज्यामुळे न्यायदान प्रणाली वेगवान होईल. राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नागपूर कॅम्पसमध्ये न्यायवैद्यक विज्ञान आणि सायबर सुरक्षेशी संबंधित पाच अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

००००००

अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामुळे कुठल्याही आपत्तीला व्यवस्थित तोंड देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 26 : आपत्तीमध्ये काम करण्याला आमचे प्राधान्य आहे. अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राद्वारे कोणत्याही प्रकारच्या आपत्ती परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील सध्याच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील अद्ययावत अशा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन त्यांनी आढावा घेतला व माध्यमांशी संवाद साधला.

आपत्कालीन कार्य केंद्र तंत्रज्ञानाने सुसज्ज असे झाल्याने कोणत्याही आपत्तीत शासनाला योग्य व्यवस्थापन करणे सहज शक्य होईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून ते कशा पद्धतीने काम करतात आणि तंत्रज्ञान वापरता याची माहितीही घेतली आणि समाधान व्यक्त केले. यावेळी मदत व पुनर्वसन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रभाग संचालक सतीशकुमार खडके यांनी त्यांना कालपासून राज्यभरात सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

९.५ कोटी नागरिकांना अलर्ट

तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून पावसाचे तसेच संभाव्य विजा पडण्याचे अलर्ट ९.५ कोटी नागरिकांना पाठविण्यात आल्याची माहिती सोनिया सेठी यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांना दिली. तर ठाणे, रायगड, मुंबई , पुण्यातील घाट विभागात रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

एनडीआरएफ पथके तसेच इतर बचाव यंत्रणा त्याचप्रमाणे सर्व जिल्हा प्रशासन व पालिकांशी आपत्ती व्यवस्थापन केंद्रांमार्फत सातत्याने संपर्क ठेवला जातो आणि वेळोवेळीचे अलर्ट त्यांना दिले जातात त्यामुळे कुठेही बचाव कार्य किंवा मदत पोहचवायची असेल तर लगेच ते करता येते असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

तज्ञ कर्मचाऱ्यांशी चर्चा

यावेळी उपमुख्यमंत्री यांनी केंद्रातील तज्ञ, तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष व्यवस्था कशी काम करते ते जाणून घेतले आणि समाधान व्यक्त केले. हे कर्मचारी २४ तास काम करतात, त्यांची राहण्याच्या व्यवस्था आणि इतर अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.

ठाण्याच्या धर्तीवर पथके

ठाण्याच्या धर्तीवर आपत्ती प्रतिसाद दले सर्व महानगरपालिकांमध्ये तत्काळ नियुक्त करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रधान सचिव नगरविकास डॉ गोविंदराज यांना दिले. कोकण आपत्ती सौम्यीकरणाची किती कामे पूर्ण झाली आहेत त्याचा आढावाही त्यांनी घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना त्याचप्रमाणे आपत्ती कार्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

0000

नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने सतर्क-सज्ज रहावे, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६ : – पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत.

दरम्यान, राज्यातील या परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना विविध यंत्रणांकडून अवगत करण्यात आले.  राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.  बारामतीत 25 घरांशी अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत. इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.  फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफची एक चमू फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे. रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.

मुंबईत 24 तासात 135.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याच्या तर 5 ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलिस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत.

दरम्यान, मुंबईत पुढील 24 तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिव तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ – एसडीआरएफ, अग्निशमन, महसूल प्रशासन तसेच गृह विभाग आदींना नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना आणि मदत व बचावासाठीची सज्जता ठेवण्याच्या अनुषंगानेही त्यांनी विविध सूचना केल्या. जलसंपदा विभागाशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

000

कर्करुग्णांच्या उपचार खर्चात होणार बचत

नागपूर, दि. 26 : कॅन्सर हा आजही पूर्णपणे बरा करता न येणारा आजार मानला जातो. भारतात विशेषतः ओरल आणि सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक आहे. नागपूर शहरातील मौखिक कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. यामुळे एक अत्याधुनिक उपचार केंद्राची आवश्यकता असल्याने डॉ. आबाजी थत्ते संस्थेने 2012 मध्ये 20 खाटांच्या रुग्णालयास प्रारंभ केला. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूरने गेल्या काही वर्षांत मध्य भारतातील कॅन्सर उपचाराचे एक विश्वासार्ह केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

कॅन्सर रुग्णाचा उपचारासाठी होणारा लांबचा प्रवास आणि अपुरी निवास व्यवस्था यामुळे त्यांच्या डॉक्टर अपॉइंटमेंट्स चुकू शकतात किंवा उपचारास विलंब होतो, ज्याचा परिणाम रुग्णाच्या उपचाराच्या सातत्यावर होतो. ही समस्या सोडविण्यासाठी डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था व्यवस्थापनाने कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियासाठी निवासी सुविधा तयार करण्याची योजना आखली. ही सुविधा ‘ स्वस्ती निवास’ या नावाने ओळखली जाणार असून यातून कॅन्सर रुग्णांना उपचारादरम्यान राहण्याची सोय उपलब्ध होईल. या सुविधेमध्ये ४०० रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची सुसज्ज आणि आरामदायक निवासाची सोय असेल.  यामुळे कर्करुग्णांच्या उपचारात सातत्य राहून त्यांच्या उपचार खर्चातही बचत होणार आहे.

पर्नो रिका इंडिया या बहुराष्ट्रीय कंपनीने आपल्या समाजिक दायित्व निधी (CSR) उपक्रमाद्वारे स्वस्ती निवास प्रकल्पाला आर्थिक सहाय्य केले आहे. जे जे कन्सल्टंट्स स्वस्ती निवास इमारतीची निर्मिती करणार आहेत. या सुविधेच्या प्रस्तावित डिझाईनमध्ये सुविधा केंद्र संकुल, फूड कोर्ट, आणि एकूण १.७ लाख चौ. फूट बांधकाम क्षेत्राचा समावेश आहे.

साडे सात लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या ४७० खाटांच्या क्षमतेच्या, आधुनिक आणि भव्य अशा या दहा मजली रुग्णालयाचे उद्घाटन २७ एप्रिल २०२३ रोजी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते झाले होते. रुग्णालयात वैयक्तिक देखभाल, सवलतीच्या दरातील उपचार आणि अधुनिक संशोधन यावर भर देण्यात येतो.

गेल्या 8 वर्षांत संस्थेने दिलेल्या सेवेचा आढावा:

  • नवीन नोंदणीकृत रुग्ण: 46,699
  • ओपीडी भेटी: 10,60,313
  • इनपेशंट (आयपीडी): 1,36,507
  • रेडिएशन थेरपी घेतलेले नवीन रुग्ण: 8,494
  • रेडिओलॉजी तपासण्या: 1,19,531

‘कॅन्सरपासून मुक्तीचा पहिला टप्पा’ हे ब्रीदवाक्य असलेले हे रुग्णालय केवळ उपचार केंद्र न राहता, कॅन्सरविरोधातील लढ्याचे एक मजबूत शस्त्र बनले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यकरत असून, अध्यक्ष अॅड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य यशस्वीपणे पार पडत आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यास यंत्रणा सज्ज – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. 26 :-  राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज आढावा घेतला. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात मंत्री महाजन यांनी तातडीने भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यासाठी यंत्रणा 24×7 सज्ज असल्याचे श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

आपत्ती व्यवस्थान संचालक सतीशकुमार खडके यांनी मंत्री महोदयांना माहिती दिली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, राज्यात प्रथमच मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत आवश्यक उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिक आयुक्तांना देण्यात आले आहेत. हवामान विभागाने राज्यात आणखी तीन दिवस पावसाचा अलर्ट दिला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे अचानक नदी, ओढ्याच्या पाण्याची पातळी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत रस्ते मार्गही बंद होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच पावसाळी पर्यटनासाठी धबधबे व अन्य ठिकाणी जातानाही नागरिकांनी दक्षता व काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) पथके तैनात केली आहेत. बारामती फलटण येथे काल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पाठविण्यात आली होती, असेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

राज्य व जिल्हा यंत्रणांनी संपर्कात राहून समन्वयानं नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला प्राधान्य द्यावं -मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची प्रशासनाला सूचना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणे जिल्ह्यासह
मुसळधार पाऊस असलेल्या अन्य जिल्ह्यांतील परिस्थितीचाही आढावा

मुंबई, दि. 26 :- “मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांची सुरक्षितता, बचाव व मदतकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठीच्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात. मुसळधार पावसाची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी सावध रहावे. सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून त्यांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुसळधार पाऊस होत असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

राज्याच्या अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीच बारामती येथे दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेपासूनच बारामती, इंदापूर तालुक्यांसह पुणे जिल्ह्यातील गावांना भेट देऊन दिवसभर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास तथा क्रीडा व युवककल्याण मंत्री दत्तामामा भरणे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक पृथ्वीराज जाचक, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित गावांचे सरपंच, स्थानिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शासनाचे संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे ग्रामीण भागातील गावांचा दौरा करत असतानाच, मंत्रालयातील राज्यस्तरीय आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन केंद्राकडूनही अन्य जिल्ह्यातील पाऊस, धरणांची स्थिती, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पाऊस होत असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन परिस्थितीची, मदतकार्याची माहिती घेतली. शेतीचे, पिकांचे, पशुधनाचे, घरांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे, परस्परांच्या संपर्कात राहून समन्वयाने, सहकार्याने बचाव, मदतकार्य तात्काळ राबवावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबई उपनगर रेल्वेसेवेला पावसाचा फटका बसला असून हार्बर रेल्वेसेवा बंद होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सेवा विलंबाने सुरु होत्या. महाडकडून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता पावसामुळे बंद आहे. पंढरपूरला नदीकाठच्या एका मंदिरात अडकून पडलेल्या तीन पूजाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात थांबून नागरिकांना आवश्यक मदत करावी, अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस सुरु असलेल्या भागातील नागरिकांनी शक्यतो घरीच थांबावे. घरात पाणी भरण्याची शक्यता असल्यास सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. आत्यंतिक गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. राज्य शासन व स्थानिक स्वराज संस्थांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आपले कर्तव्य पार पाडत असताना स्वत:चीही काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
——००००००——

ताज्या बातम्या

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

0
मुंबई दि. 29 - स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
नागपूर,दि.29 :  येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची...

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती...

0
तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६००...

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २९: राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना...

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

0
मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे...