जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा नागरिकांसाठी उपलब्ध; प्रधानमंत्र्यांशी देखील चर्चा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
8

देशव्यापी लॉकडाऊनमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही;

दुकानांमध्ये गर्दी करू नका

कोरोनाविषयक अधिकृत  माहितीसाठी राज्य शासनाचा व्हॉट्सअप ग्रुप

मुंबई दि24: प्रधानमंत्र्यांनी  घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अजिबात घाबरून जाण्याचे व गोंधळण्याचे कारण नाही. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपल्या काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे . राज्यात जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य,औषधे यांचा पुरेसा साठा असून नागरिकांनी काळजी करून अनावश्यकरित्या दुकानामध्ये गर्दी करू नये अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आश्वस्त केले आहे.

प्रधानमंत्र्यांच्या घोषणेने लोकांनी घाबरून जाऊन दुकानांमध्ये गर्दी केली,माझ्यापर्यंत या बातम्या पोहोचल्यावर मी स्वत: प्रधानमंत्र्यांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली की आम्ही महाराष्ट्र लॉकडाऊनची कालच घोषणा केली आहे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी जीवनावश्यक वस्तू मिळतील तसेच अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील अशी व्यवस्था केली आहे. प्रधानमंत्र्यांनी युरोपमध्ये परिस्थिती कशी भीषण बनत गेली यासंदर्भात आपल्याला माहिती दिली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,आपल्या देशात असे होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले.

राज्यात मी आधीही सांगितल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू,अन्न धान्य,औषधी,दुध,भाजीपाला व्यवस्थित पुरवठा होत राहील. या मालाची ने आण करणारी वाहतूक सुरळीत सुरु राहील याची खात्री बाळगा. 

व्हॉटसएप ग्रुप

कोरोनाविषयक माहिती नागरिकांना अधिकृतरित्या मिळावी यासाठी राज्य शासनाने +९१२०२६१२७३९४ या क्रमांकाचा व्हॉटसएप  चॅटबॉट  ग्रुप सुरु केला आहे याचाही लाभ नागरिक घेऊन माहिती घेऊ शकतात. त्यांच्या प्रश्नांची माहिती सध्या इंग्रजीत व कालांतराने इतर भाषांतही  मिळेल.

परदेशातून आलेल्या प्रवाशांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्यायची आहे,लपवायची नाही. कारण या साथीची लागण होण्यासाठी हेच मोठे कारण आहे. त्यामुळे त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here