शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 147

मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाचे अनेक नवे उपक्रम यशस्वी

मुंबई, दि. १९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) आज घेतलेल्या पाच विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण नवकल्पनांची यशस्वी अंमलबजावणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार महिन्यांत हे उपक्रम राबवले गेले.

गुजरातमधील २४-कडी (SC) आणि ८७-विश्वदर, केरळमधील ३५-निलांबूर, पंजाबमधील ६४-लुधियाना वेस्ट आणि पश्चिम बंगालमधील ८०-कालिगंज या मतदारसंघांत १३५४ मतदान केंद्रांवर पोटनिवडणुका पार पडल्या.

या निवडणुकीत खालील नवकल्पनांची यशस्वी अंमलबजावणी झाली:

🔹 मोबाईल डिपॉझिट सुविधा:

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना त्यांच्या मोबाईल फोन ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात प्रवेशापूर्वी फोन कुठे ठेवावा, हा मोठा प्रश्न असतो. यावर उपाय म्हणून साधे डब्याचे खाचे किंवा गोण्यांमधून ही व्यवस्था करण्यात आली आणि स्वयंसेवकांमार्फत सुविधा दिली गेली.

🔹 सुधारित VTR (मतदान टक्केवारी) प्रणाली:

पूर्वी मतदान टक्केवारीचे आकडे सेक्टर अधिकारी फोन, SMS वा मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे संकलित करत असत. मात्र आता ECINET अ‍ॅपवरून प्रत्येक दोन तासांनी मतदान टक्केवारी थेट अद्ययावत केली जाऊ लागली. मतदान पूर्ण झाल्यानंतरही, प्रिसाइडिंग ऑफिसर मतदान केंद्र सोडण्यापूर्वी अंतिम VTR डेटा अ‍ॅपवर अपलोड करतात. त्यामुळे आकडेवारीत होणारा उशीर टळतो. जिथे नेटवर्क उपलब्ध नाही, तिथे ऑफलाईन नोंदी करून नंतर त्यांचे समक्रमण होते.

🔹 १००% वेबकास्टिंग:

सर्व मतदान केंद्रांवर (फक्त एका अपवादाने) मतदान प्रक्रियेचे थेट वेबकास्टिंग करण्यात आले. यामुळे सर्व प्रक्रिया पारदर्शकतेने पार पडली. RO, DEO आणि CEO स्तरावरील विशेष टीम्सने या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले.

🔹 इलेक्टोरल रोल्सचा विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (SSR):

सुमारे वीस वर्षांनंतर प्रथमच पोटनिवडणुकीपूर्वी मतदार यादींचे विशेष पुनरावलोकन करण्यात आले.

या सर्व उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

०००

 

नोंदणी विधेयक मसुद्यात सुधारणेसाठी नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यशाळा

मुंबई, दि. १९ : नोंदणी विधेयक मसुदा २०२५ वर सुधारणा सुचविण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. राज्यातील उपविभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सूचनांमुळे मसुदा अधिक प्रभावी व सर्वसमावेशक होईल. डिजिटल इंडियाच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल असून नागरिकांना जलद, पारदर्शक व विश्वासार्ह सेवा मिळण्यास मदत होईल, असे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी यावेळी नमूद केले.

नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक यांच्या सादरीकरणातून विधेयकाच्या मसुद्यातील सर्व कलमांवर सखोल चर्चा करण्यात आली. नोंदणी विधेयक मसुदा २०२५ हा नोंदणी कायदा १९०८ ला आधुनिक स्वरुपात रुपांतर करण्याचा प्रयत्न असून यामध्ये डिजिटल नोंदणी, आधार आधारित पडताळणी, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज व विस्तारित बंधनकारक दस्तऐवज यांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्यातील सर्व नोंदणी व मुद्रांक उपविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या चर्चेत सहभाग घेऊन नागरिक केंद्रित, पारदर्शक व डिजिटलायझेशनला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.

कार्यशाळेत डेटा गोपनीयतेसंदर्भात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्‍शन ॲक्ट २०२३ च्या तरतुदींचे पालन करुन डेटा संकलन, वापर, सुरक्षा आणि तृतीय पक्ष सामायिकरणासाठी कठोर नियम लागू करणे आवश्यक असल्यावर भर देण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात ऑफलाईन नोंदणी केंद्रे स्थापन करणे व डिजिटल साक्षरता कार्यक्रम राबवणे, डेटा एनक्रिप्शन, ऑडिटसाठी कठोर तरतुदी,  नोंदणी रद्दीकरण प्रक्रियेत स्पष्टता आणि अनिवार्य नोटीस,  स्वतंत्र नोंदणी विवाद निवारण प्राधिकरणाची स्थापना करणे आदी सूचना करण्यात आल्या.

या कार्यशाळेस अप्पर मुद्रांक नियंत्रक संजय चव्हाण, विशेष कार्य अधिकारी  राजेंद्र मुठे, सहसचिव सत्यनारायण बजाज, मुद्रांक अधीक्षक अशोक पाटील आणि नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) उदयराज चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नोंदणी विधेयक २०२५ लागू झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

निधी चौधरी यांच्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचे वास्तव उभे – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १९ : पर्यावरण संरक्षण या वैश्विक प्रश्नावर विविध प्रकारे जनजागृती होते. नॅशनल गॅलरी ऑफ आर्टच्या संचालक निधी चौधरी यांच्या बोलक्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचा केवळ संदेशच नाही, तर वास्तव चित्र उभे राहत असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. जहांगीर आर्ट गॅलरीत भरलेल्या निधी चौधरी यांच्या चित्र प्रदर्शनाला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट देऊन त्यांच्या कलाकृतीचे  कौतुक केले.

एकीकडे प्रशासकीय जबाबदारी आणि दुसरीकडे आपली कला जोपासत सनदी अधिकारी चौधरी सामाजिक संदेश देण्याचे काम करत आहेत. जहांगीर आर्ट गॅलरीत येत्या २२ जूनपर्यंत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार आहे. प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांनी चित्रांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीबाबत जगात प्रचलित असलेल्या विविध कथांवर आधारित त्यांनी चित्र रेखाटली आहेत. त्यांच्या एकूण ४० चित्रांचा या प्रदर्शनात समावेश असून यातील काही चित्रांमध्ये महापुरुषांच्या तत्त्वांचाही समर्पक वापर करण्यात आला आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

मारुती चितमपल्ली वनसंपदेचे सजग प्रहरी – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १९ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रसिद्ध निसर्गप्रेमी आणि लेखक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पद्मश्री चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. आपल्या तरल आणि प्रवाही लेखनातून त्यांनी निसर्गाचे निरागस व निर्मळ विश्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले.

ज्येष्ठ वनसंरक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतरही, चितमपल्ली आयुष्यभर वन्यजीव तसेच जैवविविधतेचे संरक्षक राहिले. त्यांच्या निधनामुळे देशाने मानवतेचा आणि विशेषतः वनसंपदेचा सजग प्रहरी गमावला आहे. त्यांचे कार्य व वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबिय, चाहते आणि निसर्गप्रेमी जनतेला आपल्या शोकसंवेदना कळवतो, अशा शब्दात राज्यपालांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

०००

 

नवी मुंबईकरांना सुविधा देण्यासाठी तातडीने मार्ग काढा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९ : नवी मुंबईतील नागरिकांच्या विविध सुविधांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला. नवी मुंबईतील विकास आराखड्यास मंजुरी, करारपद्धतीने कार्यरत प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी सामावून घेणे, गरजेपोटी बांधलेली घरे अधिकृत करणे, नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा मंजूर करणे, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विकास शुल्काच्या रक्कमेबाबत तसेच खारघर ते नेरूळ धक्का सागरी मार्ग बेलापूरमधून न घेता सेक्टर ११ बेलापूर मधून विमानतळाला जोडणे आदी मागण्यांबाबत तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महापालिका आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत आढावा बैठक वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीस वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार कपिल पाटील आदी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा महासभेच्या मान्यतेने अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला असून त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी. महापालिकेने होर्डिंग व फेरीवाला धोरणाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी. तसेच अशा प्रकारचे धोरण महापालिकास्तरावर मंजूर करण्याबाबत विचार करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

बारवी धरणग्रस्तांना ज्या प्रमाणे विविध महापालिकांमध्ये कायमस्वरुपी नोकरी देण्यात आली आहे, त्या प्रमाणेच मोरबे धरण व सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी सामावून घेण्यासंदर्भात कालबद्ध आराखडा तयार करावा. ऐरोली जेट्टी चोवीस तास सुरू ठेवणे, शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प बाधित मच्छिमारांना भरपाई देणे, नवी मुंबईतील गावठाण विस्तारामध्ये गरजेपोटी बांधलेल्या घरांना अधिकृत करणे, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील घरांच्या किमती कमी करणे, नवी मुंबई विमानतळामध्ये स्थानिकांना नोकरी देणे, दगडखाण व क्रशर प्लॉटधारकांना पुनर्वसन म्हणून भूखंड देणे आदी विषयांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

खारघर सेक्टर १६ ते नेरूळ जेट्टी या प्रस्तावित सागरी किनारा मार्गातील बेलापूर सेक्टर १५ येथे डबल डेकर रस्ता तयार करता येईल का याचा विचार करावा. तसेच तुर्भे व कोपरखैरणे यांच्यामधील खैरणे गावाजवळ आणखी एक नवीन रेल्वे स्थानक उभारण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

शहापूर तालुक्यातील डोळखांब येथील धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने प्रस्ताव देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा लवकर मंजूर करावा – वन मंत्री गणेश नाईक

नवी मुंबईतील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत. घणसोली येथे खुला रंगमंच कला अकादमी मिनी थिएटर बांधणे, मराठी भाषा भवन उभारणीला गती देणे, घणसोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणे, तसेच विकास शुल्कामध्ये महानगरापालिकेलाही हिस्सा मिळावा. परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाचे नाव बदलून श्री शिव गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ करणे, नागरी सुविधांसाठी औद्योगिक वसाहतीमधील भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करावेत, आदी विविध मागण्या वन मंत्री नाईक यांनी यावेळी केल्या.

खारघर ते नेरूळ जेट्टी सागरी मार्ग बेलापूरमध्ये न आणता तो सेक्टर ११ मधून विमानतळाच्या दिशेला न्यावा, तसेच नवी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेला विकास आराखडा लवकर मजूर करावा, अशी मागणी मंत्री नाईक यांनी यावेळी केली.

बैठकीस नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, यांच्यासह नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, वन विभाग, उद्योग विभाग, एमआयडीसी, मेरी टाईम बोर्ड आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

केमसेफ केमिकल कंपनीतील कंत्राटी कामगारांना टप्प्याटप्प्याने नेमणुका द्याव्यात

मुंबई, दि. १९: केमसेफ केमिकल कंपनीमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने पुन्हा कामावर घ्यावे, कंपनीच्या नियोजनानुसार त्यांना टप्प्याटप्प्याने नेमणुका द्याव्यात, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ कक्षात बैठक झाली. यावेळी कामगार उपआयुक्त अभय कुमार गीते, कामगार विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय जनरल कामगार उत्कर्ष संघटनेचे इंदर शेंडगे, गजानन गिरी, कंपनीचे संचालक आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

तळोजा एमआयडीसी मधील केमसेफ कंपनीचे कामावरून काढून टाकलेले अनेक कामगार २० वर्ष अथवा दीर्घ काळापासून कंत्राटी स्वरूपात काम करीत होते. यांना काम न देता नवीन कामगार कंत्राटी पद्धतीने नेमले आहेत. यापूर्वी काम करणाऱ्या ६५ कामगारांना कंत्राटी पद्धतीने टप्प्याटप्प्याने कामावर नेमावे, असे निर्देश उपाध्यक्ष बनसोडे यांनी यावेळी दिले.

०००

किरण वाघ/विसंअ/

जेएनपीए येथे योग दिनानिमित्त ‘योग संगम’ कार्यक्रम

मुंबई, दि. १९ : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्रासाठी नोडल समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आरआरएपी – केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, वरळी, मुंबई यांच्या तर्फे ‘योग संगम’ या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन २१ जून २०२५ रोजी सकाळी ५:३० वाजता, जेएनपीए टाऊनशिप, सीआयएसएफ कॅम्पस, उरण, नवी मुंबई येथे होणार आहे, अशी माहिती पोदार केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर .गोविंद रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) तसेच भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात येत आहे. या भव्य कार्यक्रमात सुमारे दहा हजार योगप्रेमी सहभागी होण्याची शक्यता असून, आयुष मंत्रालयाचे महासंचालक प्रो. रवीनारायण आचार्य यांची उपस्थिती राहणार आहेत.

योग दिनानिमित्त आयोजित होणारा हा उपक्रम आरोग्यप्रद जीवनशैलीचा संदेश देणारा ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना टी-शर्ट, रेनकोट, योगा मॅट मोफत वितरित करण्यात येणार आहे. असून अल्पपोहाराची ही सोय केली आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी दिली.

योग संगम कार्यक्रमातून महाराष्ट्रात योग आणि हरित उपक्रमांना चालना

यावर्षी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने १० प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यात ‘योग संगम’ हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी दिली.

या कार्यक्रमाअंतर्गत ‘हरित योग’ आणि ‘योगा पार्क’ या संकल्पनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वृक्षारोपणालाही विशेष प्राधान्य देण्यात आले असून, केवळ जे.एन.पी.ए.मध्ये १ लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करण्यात आले आहे. राज्यभरात योगप्रसारासाठी व्याख्याने, शिबिरे आणि जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.

आर.आर.ए.पी. संस्थेने या संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन करत योगाची व्यापक घडी घातली असून, ‘योग संगम’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, निरोगी भारताच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे, असे मत संस्थेचे सहायक संचालक डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केले.

०००

मोहिनी राणे/ससं/

अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचा अंक प्रकाशित

मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या मे २०२५ या अंकाचे प्रकाशन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव सुचिता महाडिक, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव (मावज) समृद्धी अनगोळकर, अवर सचिव (मावज) अजय भोसले, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या अंकामध्ये मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लिहिलेल्या कथा, कविता, ललित लेख, सुलेखन मालिका, स्वानुभव, पाककला, भ्रमंती, तंत्रज्ञानाची टेकवारी, मिशन आयगॉट कर्मयोगी, वेव्हज, या विषयीचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.

०००

अश्विनी पुजारी/ससं/

भुसावळ येथे महावितरण मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठक

Milind Kadam M4B

मुंबई, दि. १९ : भुसावळ (जि. जळगाव) येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत फोर्ट येथील उर्जा विभागाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी महावितरण कंपनीचे संचालक प्रदीप भागवत उपस्थित होते.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, महावितरण मंडळातील कर्मचाऱ्यांच्या सुविधांकडेही लक्ष देण्यात यावे तसेच कार्यालयीन कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी व स्थानिक पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे त्यांनी यावेळी  सांगितले.

या बैठकीत भुसावळ आणि परिसरातील वीज समस्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांनी स्थानिक वीज पुरवठा व्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करून, समस्या क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष पाहाव्यात, लोकांच्या अडचणी समजून घेत ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, भुसावळ शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वीज पुरवठा योग्य प्रकारे आणि वेळेवर होणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार आणि क्षेत्राच्या गरजेनुसार वीज पुरवठा सुनिश्चित करण्यात यावा. महावितरणच्या नवीन मंडळ कार्यालयामुळे भुसावळसह परिसरातील वीज सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम आणि ग्राहकाभिमुख होईल, असा विश्वास राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

या बैठकीस महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, भुसावळ विभागातील  स्थानिक उर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

‘लाईन स्टाफ’ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Milind Kadam M4B

मुंबई, दि. १९ : महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी हे अत्यंत महत्त्वाचे काम करणारे घटक असून, त्यांच्याशी संबंधित प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

फोर्ट येथील ऊर्जा विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. या बैठकीस महावितरणचे संचालक प्रदीप भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी,  संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, सुरक्षा साधने व अपघात प्रतिबंधक उपाययोजना कामाच्या स्वरूपामुळे लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांना अत्याधुनिक सुरक्षा साधने, सेफ्टी शूज, रेनकोट आदी साधने व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिक सुरक्षित साधने उपलब्ध करून देण्यात येतील. तांत्रिक पदांचा स्वतंत्र दर्जा व वर्ग वेतनश्रेणीत व वेतन वाढ यासह विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...