शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 1709

भ्रष्टाचार प्रकरणी जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 11 : जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रासाठी दीड कोटी रूपयांची मागणी करणे ही अत्यंत अक्षम्य बाब असून,सदस्य डॉ. संजय रायमुलकर यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना चाप बसावा यासाठी संबंधित जात पडताळणी अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

ग्रामपंचायत,जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक संमतीदरम्यान,निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत१२ महिने करण्यात आली आहे. जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी १००वर्षाचे अकरा पुरावे असतानाही दीड कोटी रूपये मागितले असल्याची माहिती सदस्य डॉ. रायमुलकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना तीन महिन्यात प्रमाणपत्र मिळाले. मात्र,संबंधित अधिकाऱ्यावर दहा वर्षे होऊनही अद्याप कारवाई झाली नसल्याची माहिती डॉ. रायमुलकर यांनी दिली. 

काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीला चाप बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

०००

विधानसभा लक्षवेधी

पुण्यालगतच्या वाघोली, मांजरी भागासाठी नवीन महानगरपालिका स्थापण्याबाबत शासन सकारात्मक

  उपमुख्यमंत्री अजित पवार

     

मुंबई, दि. 11 : पुणे शहरालगत असलेल्या वाघोली, मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द यांसह आणखी काही गावांचा समावेश करून नवीन महानगरपालिका स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत दिली.                                                                                          

सदस्य अशोक पवार यांनी पुणे शहरालगतच्या वाघोली भागातील रस्ते वाहतूक, पाणीपुरवठा आदि समस्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.

पुणे शहरामध्ये काही गावे समाविष्ट करण्याची त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड सोडून बाकीचा इतर भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत आला आहे .परंतु या कामाला गती देण्याची गरज आहे असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पुणे महानगर क्षेत्रातील वाघोली गाव शहरालगत असल्याने वेगाने नागरीकरण होत आहे .वाढत्या नागरीकरणामुळे सध्याचा 2.5 एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वाढीव  5 एमएलडी पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे .पुणे- शिरूर -अहमदनगर या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चार पदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापनाकरिता प्राधिकरणाने वाघोली ग्रामपंचायतीला पंधरा कचरावाहू वाहने उपलब्ध करून दिली आहेत तसेच हवेली व मुळशी तालुक्यातील 8 गावांकरिता घनकचरा व्यवस्थापनासाठी पूर्वसुधारणेचा अहवाल तयार करून घेण्याची कार्यवाही प्राधिकरणाच्या स्तरावर सुरू आहे अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

यावेळी सदस्य सर्वश्री अशोक पवार, बबनराव पाचपुते, भीमराव तापकीर व राहुल कुल यांनी चर्चेत भाग घेतला.

००००

बनावट प्रस्तावावर शालार्थ क्रमांक दिल्याप्रकरणी

नाशिक विभागातील सर्व संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी – प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 11 : बनावट प्रस्तावावर शालार्थ क्रमांक दिल्याप्रकरणी नाशिक विभागातील सर्व संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.

  

नाशिक विभागात अनेक ठिकाणी बनावट प्रस्तावांवर शालार्थ क्रमांक देताना झालेल्या गैरव्यवहाराबाबत आमदार किशोर पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री श्रीमती गायकवाड यांनी ही माहिती दिली.

        

जळगाव जिल्ह्यातील सहा शाळांनी चुकीच्या पद्धतीने संच मान्यताप्राप्त केल्याची तक्रार आल्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात येऊन चौकशी करण्यात आलेली आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बनावट स्वाक्षरी प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत बनावट प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्थांचे वेतन अनुदान थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बनावट प्रस्तावांवर शालार्थ क्रमांक दिलेल्या प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या नव्हती तसेच तेच तेच विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमध्ये दर्शविले गेले. शिक्षणाधिकारी कार्यालयातून प्रस्ताव गेल्याची नोंद दिसून आली नाही तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रस्ताव आल्याचीही नोंद दिसून आलेली नाही. याप्रकरणी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक यांना निलंबित करीत असल्याचे शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

शालार्थ क्रमांक देताना होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.शालार्थ क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यात येईल आणि बायोमेट्रिकद्वारे प्रमाणित करण्यात येईल.राज्यात जिथे जिथे असे गैरव्यवहार झालेले आहेत त्या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करण्यात येईल असेही मंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी विधानसभा सदस्य किशोर पाटील,सुनील प्रभू आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

००००

देवेंद्र पाटील/विसंअ/11.3.2020

शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर श्रेयांक पद्धतीसह टक्केवारीसुद्धा असणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 11 : विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर श्रेयांक पद्धतीसह (Cumulative Grade Point Average) टक्केवारी नमूद असणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

श्री. सामंत म्हणाले, राज्यातील विविध विद्यापीठांमार्फत गुण देताना विभिन्न पद्धतींचा अवलंब केला जातो. यामुळे इतर ठिकाणी प्रवेश घेताना आणि नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावेळी महाविद्यालयाला आणि नियुक्ती प्राधिकरणाला विद्यार्थ्यांच्या टक्केवारीची आवश्यकता असते. अकृषी विद्यापीठांद्वारे देण्यात येणाऱ्या पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे गुण देण्याच्या पद्धतीमध्ये एकसारखेपणा असावा यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून श्रेयांक पद्धतीसह गुणपत्रिकेवर टक्केवारी नमूद करण्यात यावी.

तसेच शेवटच्या वर्षातील दोन सत्राचे गुण किंवा द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व सत्रांचे गुण मिळून पदवी न देता पदवीचा संपूर्ण कालावधी धरून सर्व सत्रांचे गुण विचारात घेऊन पदवी देण्यात यावी, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले.

००००

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘विकासपर्वाचे शंभर दिवस’ मुलाखतीचा दुसरा भाग

     

मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात विकासपर्वाचे शंभर दिवसया विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. या कार्यक्रमात द फ्री प्रेस जर्नलचे राजकीय संपादक श्री.संजय जोग, दै.लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान व दै.सकाळचे मुख्य प्रतिनिधी संजय मिस्कीन यांचा सहभाग असलेली मुलाखत  दिलखुलासकार्यक्रमात गुरुवार दि. 12 आणि शुक्रवार दि. 13  मार्च रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत तसेच प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही प्रसारित होणार आहे. निवेदक  नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महिला व बालकल्याण विकास विभागाच्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय, राज्यातील मत्यसंवर्धनासाठीचे प्रयत्न, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात होत असलेला दिशा कायदा, राज्याच्या हीरक महोत्सवाच्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय, पाच दिवसांचा आठवडा, पर्यटन विभागाची आतापर्यंतची वाटचाल, मुंबई २४तास हा उपक्रम आदी विषयांवर सविस्तर चर्चा श्री. जोग, श्री. प्रधान व श्री.मिस्कीन  यांनी दिलखुलासकार्यक्रमात केली आहे.

तीन वर्षात महाराष्ट्रातील ११ हजार तरूण भारतीय सेनेत दाखल

नवी दिल्ली,दि.11 :   गेल्या तीन वर्षात देशभरातील1लाख54हजार902तरूण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत,महाराष्ट्रातील11हजार866तरुणांचा यात समावेश आहे.

देशातील तरूण मोठ्या प्रमाणात भारतीय सेनेत दाखल झाल्याचे चित्र आहे. भारतीय सेनेत गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध रिक्त पदांच्या सैन्य भरतीमध्ये30राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील तसेच नेपाळमधील  सरासरी95टक्के  तरूण दाखल झाले आहेत. यात एकट्या महाराष्ट्रातील11हजार866तरुणांचा समावेश आहे.

वर्ष2016-17मध्ये महाराष्ट्रातील3हजार980तरूण,वर्ष2017-18मध्ये  3हजार836आणि वर्ष2018-19मध्ये4हजार50तरुण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत.

भारतीय सैन्यात वर्ष2016-17मध्ये52हजार86तरूण दाखल झाले,वर्ष2017-18मध्ये49हजार438तर वर्ष2018-19मध्ये53हजार378दाखल झाले आहेत. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. 

             

000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.53/दिनांक ११.०३.२०२०

तुकाई उपसा सिंचन योजनेसंदर्भात आढावा बैठक संपन्न

मुंबई, दि. 11 : अहमदनगर जिल्ह्यातील तुकाई उपसा सिंचन योजेनेचे सुरु असलेले काम अधिक गतीने करण्यात यावे याकरिता मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.

यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह मृद व जलसंधारण, वने आणि विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री.गडाख म्हणाले, अवर्षणप्रवण कर्जत तालुक्यातील 19 गावांचा पिण्याचा पाण्यासाठी लघु पाटबंधारे प्रकल्प व 24 पाझर तलावांना, कुकडी कालव्यामधून पाणी उपसा करताना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे भरुन देण्याचे प्रयोजन तुकाई उपसा सिंचन योजनेतून करण्यात येणार आहे. या योजनेत सुरु असलेले काम अधिक गतीने व गुणवत्तापूर्ण करण्याकरिता अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या मंजुरी घेऊन काम करावे असे निर्देश त्यांनी दिले.

तुकाई उपसा सिंचन योजनेमुळे कर्जत तालुक्यातील 19 गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या योजनेत एकूण 599 हेक्टर लाभक्षेत्र असणार आहे. 115 द.ल.घ.फूट पाणी वापर धरणस्थळी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.गडाख म्हणाले, तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर वीज बिलाचा प्रश्न भविष्यात उद्भवून ही योजना कायान्वित करणे अडचणीचे ठरु शकते. याकरिता पथदर्शी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सौरउर्जेद्वारे वीजनिर्मिती करत व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या योजनेसाठी आवश्यक असलेली वीजेची गरज भागविण्यासाठी सोलर जनरेशनची तरतूद करावी. या सोलर प्रकल्पासाठी बिटकेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गायरान जमीन उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/वि.सं.अ./11/03/2020

कुक्कुटपालन व्यवसायाच्या समस्यांसंदर्भात शिष्टमंडळाने घेतली मंत्री सुनिल केदार यांची भेट

मुंबई, दि. 11 : राज्यातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाच्या विविध  विभागांकडून सहकार्य करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

मंत्रालयात कुक्कुटपालनासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी पोल्ट्री फार्मर्स व ब्रिडर असोसिएशन यांच्या शिष्टमंडळाने पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार सुनिल तटकरे, आमदार रोहित पवार, पोल्ट्री फार्मर्स व ब्रिडर असोसिएशनचे पदाधिकारी सी.वसंतकुमार, श्रीकृष्ण गांगुर्डे, उद्धव अहिरे, डॉ.प्रसन्न पेडगांवकर यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. केदार म्हणाले, कुक्कुटपालन व्यवसाय सध्या अडचणीच्या स्थितीतून जात आहे. मागील एक महिन्यापासून समाजमाध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाविषयीच्या अपप्रचारामुळे ग्राहक वर्गाने चिकनकडे पाठ फिरवल्यामुळे कुक्कुटपालकांचे नुकसान झाले आहे. याकरिता ऊर्जा विभागाला वीज बिल भरण्याकरिता तीन महिन्याची सवलत देणे, माणसांना खाण्याकरिता अयोग्य असलेले धान्य कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देणे, कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांना महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या करांविषयी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

या व्यवसायावर अवलंबून असलेला शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला असल्याने त्यांना राज्य शासनाकडून मदत करण्याविषयी सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच केंद्र शासनाकडून मदत मिळविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने पशुसंवर्धन विभाग हा विषय गांभीर्याने घेत असून सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.

000

राजू धोत्रे/वि.सं.अ./11/03/2020

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे मुंबईतील २ निकट सहवासित पॉझिटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 11 : पुणे येथे उपचार सुरु असलेल्या 2 कोरोनाबाधित प्रवाशांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु असून या रुग्णांसोबतचे मुंबईतील २ सहप्रवासीदेखील आज कोरोना बाधित असल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ७ झाली आहे. सध्या  पुणे येथे १८ जण तर मुंबईत १५ जण भरती आहेत. या शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वाय सी एम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

दरम्यान आज सकाळी आरोग्यमंत्र्यांनी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमण्यात येणार असून त्यामध्ये आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, नगरविकास, महसूल, ग्रामविकास, गृह विभाग यांचे सचिव असतील, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पुणे येथे कार्यान्व‍ित असलेला नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जाणीवजागृती अधिक व्यापक करावी, अशा सूचना देतानाच यासाठी सर्व माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त अनुपकुमार यादव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, आरोग्य संचालक डॉ.साधना तायडे, डॉ.अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

दि.११ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११९५ विमानांमधील  १ लाख ३८ हजार ९६८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि द. कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ६३५ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३७० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३४९ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व ३१२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर ७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३४९ प्रवाशांपैकी ३१२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२  बेड्स उपलब्ध आहेत.

००००

अजय जाधव/विसंअ/11.3.2020

देशाच्या जडणघडणीमध्ये भूमिका बजावलेल्या व्यक्तींचा इतिहास समजून घेतला पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जन्मशताब्दीनिमित्त डॉ. शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजाराम बापू पाटील, डॉ. रफीक झकेरिया यांच्या कार्यकर्तृत्वाचे विधानमंडळात संस्मरण

मुंबई, दि. 11 : देशाचे स्वातंत्र्य पुढे नेण्यामध्ये, महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या उभारणीमध्ये, जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मोठ्या व्यक्तींचा इतिहास सर्वांनीच समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी राज्याच्या विधानमंडळाने हा इतिहास माहिती असलेल्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, पत्रकार आदी जाणकारांना आमंत्रित करुन विधानमंडळाच्या सदस्यांसाठी व्याख्यानाचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

          

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. शंकरराव चव्हाण, राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी यशवंतराव मोहिते, लोकनेते राजाराम बापू पाटील आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रफीक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे संस्मरण करणारे व्याख्यान विधानमंडळाच्या वि. स. पागे प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शरद पवार होते.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी लोकसभा अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सामान्य माणसाच्या कल्याणाची तळमळ असणाऱ्या व्यक्ती – शरद पवार

विषयांचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती, सामान्य माणसाच्या कल्याणाची तळमळ, प्रशासनाचा चांगला अभ्यास ही डॉ. शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजारामबापू पाटील आणि डॉ. रफीक झकेरिया यांची वैशिष्ट्ये होती, असे गौरवोद्गार काढून खासदार श्री. पवार यांनी या चारही जणांच्या आठवणींना उजळा दिला. ते म्हणाले, या सर्वांचा राज्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा सहभाग राहिला.

श्री. पवार म्हणाले, डॉ. शंकरराव चव्हाण हे कडक शिस्तीचे आणि उत्तम प्रशासक होते. पाण्याच्या बाबतीत त्यांचा प्रचंड अभ्यास होता. पाण्यासंदर्भात काम केल्याशिवाय लोकांची परिस्थिती सुधारणार नाही ही त्यांची भूमिका होती. राज्यातील सर्व भागांचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून वैधानिक विकास महामंडळाच्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वाचे काम केले. उजनी, जायकवाडी, विष्णुपुरी आदी अनेक धरणांच्या कामांची सुरुवात त्यांनी केली. प्राणहिता नदीच्या पाणीवाटपाबाबत आंध्र प्रदेशाबाबतच्या तंट्यामध्ये त्यांनी अत्यंत मुद्देसूद भूमिका मांडली.

यशवंतराव मोहिते यांच्याबद्दल श्री.पवार म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राचा ठराव पहिल्यांदा त्यांनी मांडला. 1952 मध्ये विधानसभेमध्ये त्यांनी कोयना धरण झाले पाहिजे हा ठराव मांडला. राज्याची वीजेची गरज आणि वीजनिर्मितीनंतर त्याचे पाणी शेतीसाठी मिळेल असे त्यांनी या ठरावाचे समर्थन केले. त्यांच्या दूरदृष्टीचे परिणाम आज पहायला मिळत आहेत.1960 ते 1978  या कालावधीत गृहनिर्माण, शेती, सहकार आदी विभाग सांभाळताना त्यामध्ये विशेष ठसा उमटवला. मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाची निर्मिती केल्यामुळे मुंबईत सर्वसामान्यांना घरे मिळावीत यासाठी अनेक चाळींची निर्मिती झाली. विदर्भ आणि खानदेशाच्या शेतकऱ्यांना मान मिळवून देणारी कापूस एकाधिकार योजना सुरू केली. तसेच उत्कृष्ट कारखाना उभारून चालविला.

राजाराम बापू पाटील यांच्याविषयी खासदार श्री. पवार म्हणाले, लोकांमध्ये प्रत्यक्ष पदयात्रेद्वारे किंवा पायी जाऊन मिसळण्याची त्यांची भूमिका होती. याच तळमळीतून शेतकऱ्यांना जमिनीचे खातेपुस्तक देण्याचे काम त्यांच्या काळात झाले. कोल्हापूर, इस्लामपुरात औद्योगिक वसाहत, सहकारी संस्था उभ्या राहण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या काळात शिक्षणाची चळवळ उभी राहिली.

नागरीकरणाबद्दल पुढील काळात जी नीती सरकारने अवलंबली त्याचे जनक डॉ. रफीक झकेरिया होते, असे सांगून श्री. पवार म्हणाले, औरंगाबादचे नागरीकरण, सुधारणा, औद्योगिकीकरण यात डॉ. झकेरिया यांचे संपूर्ण योगदान राहिले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले असून औरंगाबाद येथे शिक्षण संस्था सुरू केली.

शिवराज पाटील यांनीही या महनीय व्यक्तींच्या आठवणी जागविल्या. त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांचे पाण्याच्या बाबतीतील काम, यशवंतराव मोहिते यांनी सुरू केलेली कापूस एकाधिकार योजना, डॉ. झकेरिया यांनी औरंगाबादच्या सुधारणेत तसेच औरंगाबाद विमानळाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाची माहिती देऊन लोकसंख्या वाढीबाबत त्यांची चिंता तसेच त्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचीही आठवण सांगितली.

प्रास्ताविकात मंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले डॉ. चव्हाण यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांचा फार मोठा पगडा होता. गरीबांच्या प्रश्नाला त्यांनी प्राधान्य दिले. स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी संघर्ष केला. सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी काम केले. रोखठोक भूमिका घेणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते असे सांगून श्री. चव्हाण यांनी राजारामबापू पाटील, यशवंतराव मोहिते तसेच डॉ. झकेरिया यांच्याबाबतही गौरवोद्गार काढले.

यावेळी मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, श्री. फडणवीस यांनीही मनोगत व्यक्त केले. खासदार श्री. केतकर तसेच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी या महान व्यक्तींच्या कार्याचा आढावा आपल्या व्याख्यानातून घेतला. कार्यक्रमात या चारही व्यक्तींच्या कार्याचा आढावा असलेल्या ‘संस्मरण पुष्पांजली’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.

कार्यक्रमास मंत्रिमंडळातील सदस्य, विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य तसेच निमंत्रित लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

००००

सचिन गाढवे/ वि.सं.अ./दि. 11.3.2020

पुढील वर्ष कौटुंबिक न्यायालयीन वाद निवारण वर्ष म्हणून राबविणार – कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी

मुंबई,दि.11 :महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व मुख्य मध्यस्थी केंद्र,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय मध्यस्थी व विधी सेवा परिषद ही महाराष्ट्र न्यायिक अकादमी,मुंबई येथे8मार्च रोजी झाली. या परिषदेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी केले. या परिषदेला न्यायमूर्ती ए. ए. सय्यद,न्यायमूर्ती एस. एस. शिंदे,न्यायमूर्ती के.के.तातेड,न्यायमूर्ती आर.डी.धानुका,न्यायमूर्ती एस.बी.शुक्रे,न्यायमूर्ती एम. एस. सोनक उपस्थित होते.

परिषदेच्या उद्घाटनाद्वारे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी म्हणाले,अनुभवांची देवाणघेवाण करुन विचारमंथन करण्यासाठी व वैचारिक समृद्धीकरिता अशा परिषदा भरविणे ही काळाजी गरज आहे. अलीकडच्या काळामध्ये कौटुंबिक कलहाच्या वाद प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशा वादांमध्ये संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो आहे. त्यामुळे असे कौटुंबिक वाद सामोपचाराने लवकरात लवकर मिटविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. त्याकरिता एप्रिल2020ते मार्च2021 हे वर्ष कौटुंबिक न्यायालयीन वादकलह निवारण वर्ष म्हणून राबवावे.

मध्यस्थी संकल्पनेविषयी ते म्हणाले,मध्यस्थी प्रक्रिया हा एक महत्त्वाचा घटक असून वकील,न्यायाधीश व मध्यस्थ हे लोकशाहीचे महत्त्वाचे घटक आहेत. आपल्या देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मध्यस्थी चळवळ जोमाने पुढे नेली पाहिजे.

महिलादिनाचे औचित्य साधताना न्यायमूर्ती म्हणाले की,महाराष्ट्र राज्यातील महिला न्यायिक अधिकाऱ्यांची वाढलेली संख्या हे महिला सबळीकरणाचे उत्तम उदाहरण आहे.

ताज्या बातम्या

आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान – मंत्री डॉ. अशोक...

0
पुणे, दि. २८: आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी

0
भंडारा,दि. २८: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भौंडेकर,अतिरीक्त...

मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क जेईई, नीट प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. २८: अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर्टी) वतीने राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम समाजातील पात्र उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि...

पाणी संवर्धन कार्यात स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई,दि. २८:  विदर्भात जलसंधारण व जलस्रोत विकासाचे काम होणे आवश्यक आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे या भागातील शेतकरी संकटाच्या छायेखाली आहेत. अशा पार्श्वभूमीवर, या भागात पाणी...

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...