मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 215

राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 28 : विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, बी वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, उपसचिव अशोक मांडे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर  राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचे आणि जागतिक स्पर्धेत सक्षम ठेवणारे ज्ञान उपलब्ध होईल असे विद्यापीठ असावे.

माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले, आर्टीफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळविल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या एआय विद्यापीठाची स्थापना होईल.

यासंदर्भात एक विशेष कृतीदल (टास्क फोर्स)  स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये  उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, बी वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,  राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक, परेश पागे यांचा समवेश आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

 

काळी पिवळी मीटर टॅक्सी व ऑटो रिक्षा भाडे दरात वाढ करण्यास मान्यता

मुंबईत, दि. २८: मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत काळी पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडेदर सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदी मध्ये वाढ झाल्यामुळे प्राधिकरणाने काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडेदरवाढ करण्यास राज्य परिवहन प्रकरणाच्या 23 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत मान्यता  दिली आहे.

भाडेदर सुधारणा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील सर्व काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांना लागू राहील.  भाडेदर  सुधारणा १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होईल.

जे टॅक्सी व ऑटोरिक्षा परवानाधारक सुधारीत भाडेदरानुसार भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन करून घेतील. त्या ऑटोरिक्षा, टॅक्सीना  ही भाडेवाढ लागू होईल. भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन दिनांक १ फेब्रुवारी २०२५ पासून दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत करून घेणे आवश्यक राहील. (भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन होईपर्यंत सुधारीत अधिकृत टॅरिफ कार्ड दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंतच अनुज्ञेय राहील.)  मोटार वाहन अधिनियमनुसार बृहन्मुंबई विदयुत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) १८५० बसेसचे ६ टप्पा प्रवासी वाहतूक परवान्याचे नुतनीकरण करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

मुंबई महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी व “लास्ट माईल कनेक्ट‍िविटी” अनुषंगाने नवीन ०२ काळी-पिवळी मीटर टॅक्सी स्टॅण्ड, ६८ ऑटोरिक्षा स्टॅण्ड व ०९ शेअर-ए ऑटोरिक्षा स्टँड उभारण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडेदर सूत्र विहित करण्याबाबत शासनाने खटुआ समितीची स्थापना केली होती. समितीने सादर केलेल्या  अहवालास शासनाने ०९ मार्च २०२० रोजीच्या निर्णयाव्दारे मान्य केले आहे. त्यानुसार काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडे निश्चितीच्या सुत्रानुसार व वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदी बाबी विचारात घेऊन भाड्याची परिगणना केली जाते. मोटार वाहन कायदा, १९८८ कलम ६८ अन्वये, राज्य शासनाकडून मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समिती गठित करण्यात आलेली आहे.

असे आहेत सुधारित दर :-

काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी. १८.६६  रुपये वरून २०.६६ रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली आहे.  आता काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी किमान देय प्रति १.५ कि.मी. भाडे रूपये २८ रुपये वरून  ३१ रुपये  भाडेदर असणार आहे.

कुलकॅबसाठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये २६.७१ वरून  ३७.२ रुपये (२० टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता कुल कॅबसाठी किमान देय प्रति १.५ कि.मी. भाडे रुपये ४०  वरून  ४८ रुपये  (२० टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर असणार आहे.

ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये १५.३३  रुपये वरून १७.१४ रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली आहे. आता ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी किमान देय प्रति १.५ कि.मी भाडे रूपये २३ वरून  २६ रुपये भाडेदर असणार आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

 

 

वाघांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

  • राज्यात सरासरी ३५० ने वाघांची संख्या वाढली
  • एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वनक्षेत्र वाढविणार

मुंबई, दि. २८ : राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.

३० डिसेंबर २०२४ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये राज्यात विविध घटनांमध्ये बारा वाघांचा मृत्यू झाला. पाच वाघांचा मृत्यू आपापसातील संघर्षातून जखमी झाल्याने, आजारपणामुळे  इत्यादी  नैसर्गिक कारणांनी झालेला आहे. चार वाघांचा मृत्यू अन्य जनावरांसाठी  लावण्यात आलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागल्याने झाला आहे. किंवा वाहनांच्या धडकेने झाला आहे. तीन प्रकरणांमध्ये  वाघांचा मृत्यू हा शिकारीने झाल्याचे समोर आले आहे. या तीनही प्रकरणांमध्ये एकूण नऊ आरोपींना वन विभागाने अटक केली आहे.

राज्यात वाघांच्या संख्येत वाढ

राज्यात २००६ मध्ये १०३ वाघांची संख्या होती. २०१० मध्ये ही संख्या वाढून १६९ झाली. २०१४ मध्ये  यामध्ये आणखी वाढ होऊन वाघांची संख्या १९० वर पोहोचली. २०१८ मध्ये वाघांची संख्या ३१२ होती. तर २०२२ मध्ये  झालेल्या वाघांच्या  गणनेमध्ये  वाघांची संख्या ४४४  नोंदली गेली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दर चार वर्षांनी वाघांची गणना करण्यात येते. या पुढील गणना २०२६ मध्ये होणार आहे, असेही वनमंत्री श्री नाईक यांनी सांगितले.

वन क्षेत्रात वाढीसाठी प्रयत्न करणार

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार  राज्याचे वनक्षेत्र किमान ३० टक्के असायला हवे. या अनुषंगाने  महाराष्ट्राचे वनक्षेत्र २१ टक्यावरून ३०% पर्यंत नेण्यासाठी  प्रयत्न करण्यात येणार आहेत. जंगलांच्या गाभा क्षेत्रामध्ये रानफळांची रायवळ आंबे, बोर, जांभूळ इत्यादी झाडे लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणीच  अन्नाची सोय होईल आणि मांसाहारी प्राण्यांच्या अन्नाची सोय देखील होईल. त्यामुळे भक्षाच्या शोधार्थ वाघ मानवी वस्तीपर्यंत येणार नाहीत, असे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले.

पालघर मधील बहाडोई येथे जांभळाची प्रगत जात उत्पादित केली जाते. वनखात्याच्या नर्सरीमधून जागतिक दर्जाची जांभूळ रोपे तयार करून वन खात्याच्या विविध विभागांमध्ये लावण्याची सूचना देण्यात आल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले.

खासगी वनीकरणाला प्रोत्साहन

खासगी वनीकरणाला  प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन श्री. नाईक यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचित केल्याप्रमाणे  प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी  अद्ययावत  नर्सरी उभारण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून  या जिल्ह्यामध्ये लवकरच  विविध तालुक्यांमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येणार असल्याचे वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी सांगितले.

वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना

  • जिल्हास्तरीय व्याघ्र समितीच्या बैठकीत वाघ, बिबट इतर वन्य प्राण्यांच्या संरक्षणाच्या उपाययोजनांची आखणी करण्यात येत आहे.
  • विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वाघांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी वनविभाग व महावितरण कंपनी मिळून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहे.
  • अवैध शिकाऱ्यांची माहिती मिळण्याकरिता परिक्षेत्र स्तरावर खबऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
  • व्याघ्र संरक्षण दलातील पथकामार्फत अतिसंवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त करण्यात येते. तसेच डॉग स्कॉड अंतर्गत सुध्दा गस्ती करून शिकारी हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात येते.
  • M – Stripes प्रणाली असलेल्या मोबाईलचा पुरवठा क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना करण्यात आला आहे.  त्याद्वारे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते.
  • अतिसंवेदनशील क्षेत्रात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
  • राज्यातील वन्यप्राण्यांबाबत गुन्हे प्रकरणांची अद्यावत माहिती ठेवण्याकरिता वन्यजीव गुन्हे कक्ष Wildlife Crime Cell प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय, नागपूर येथे तयार करण्यात आला आहे.
  • मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या सायबर सेलच्या माध्यमातून शिकारीच्या घटनांमधील आरोपींचा शोध घेण्यात येतो.
  • अतिसंवेदशील क्षेत्रात आवश्यक त्या ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत.
  • परिक्षेत्र स्तरावर वाघ व बिबट या वन्यप्राण्यांचे मागोव्याचा निश्चित कार्यक्रम राबवून त्यांच्या अस्तित्वाबाबतची माहिती घेण्यात येते.
  • वाघाचे भ्रमणमार्ग, पाणवठे व महत्वाचे ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवण्यात येते. तसेच पाण्यामध्ये विष प्रयोग होऊ नये याकरिता पाणवठ्याची नियमीत तपासणी केली जाते.
  • मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने पाणवठ्याकडे जाणाऱ्या मार्गावर शिकारी लोकांद्वारे लोखंडी ट्रॅप लावले नसल्याची खातरजमा करण्यात येणार.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

 

गिया बारे सिंड्रोम आजाराबाबत आरोग्य यंत्रणांनी समन्वय साधून कार्य करावे – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 28 : गिया बारे सिंड्रोम (GBS) या आजाराचे काही रुग्ण पुण्यातील खडकवासला, नांदेड सिटी नांदेड गाव, किरकटवाडी या परिसरामध्ये आढळले आहेत. दूषित पाण्यामुळे या रोगाची लागण झाली असल्याचे प्राथमिक अहवालात दिसून येत आहे. शासकीय दवाखान्यामध्ये या आजाराच्या उपचारासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून याबाबत शासन प्राधान्याने उपाययोजना करत आहे. आरोग्य विभाग व महापालिकेतील आरोग्य यंत्रणा यांनी समन्वय साधून कार्य करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत.

गिया बारे सिंड्रोमच्या उपचारासाठी पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू रुग्णालय सज्ज असुन वैद्यकीय सहाय्यता निधीची मर्यादा एक लाखावरुन दोन लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेने याबाबत नोडल अधिकारी यांची नेमणूक केली असल्याचेही राज्यमंत्री यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने 65 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून IVIG इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि पाणी उकळून प्यावे, असे आवाहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले आहे.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्याबाबत सकारात्मक – कामगार मंत्री आकाश फुंडकर 

मुंबई, दि. 28 : चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

चित्रपट क्षेत्रात लहान भूमिका करणाऱ्या कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल सिने टी. व्ही. असोशिएशनचे पदाधिकारी मनोज जोशी, जॉनी लिव्हर, बिंदू दारासिंग, संजय पांडे, उपासना सिंग यांनी मंत्रालयात कामगार मंत्री श्री.फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी कामगार विभागाचे उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव दिपक पोकळे उपस्थित होते.

कामगार मंत्री श्री.फुंडकर म्हणाले की, लहान भूमिका करणाऱ्या कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. कलाकारांवर कंत्राटदार किंवा निर्मात्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर या कलाकारांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी नियमावली तयार करण्यात येणार असून तो लवकरच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल, असेही कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

दिनेश वाघमारे यांनी स्वीकारला राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार

मुंबई, दि. 28 (रा.नि.आ.) : राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्यपाल महोदयांनी श्री. वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना 20 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार त्यांनी आज राज्याचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

श्री. वाघमारे यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये बीटेक (1987) केले आहे. आयआयटी खरगपूरमधून त्यांनी संगणकशास्रात एमटेक (1989); तर यूकेमधून ‘विकास व प्रकल्प नियोजन’ या विषयात एम.एस्सी. (2007) केले आहे. 1994 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले श्री. वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे.

रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून श्री. वाघमारे यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. वाशिम आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविले होते. ते नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्षही होते. विविध शासकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सदस्य सचिव; तसेच नवी मुंबई व पिंपरी- चिंचवड महानरपालिकेचे आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. अमरावतीचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. वैद्यकीय शिक्षण विभागासह सामाजिक न्याय, ऊर्जा, गृह इत्यादी विभागांतही त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.

श्री. वाघमारे यांना स्कॉच अवॉर्ड, नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड, सीएसआर इंडिया 2021 अवॉर्ड, पीएसयू अवॉर्ड फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ग्रीनटेक लीडिंग डायरेक्टर अवॉर्ड 2021, सत्यन मित्रा नॅशनल अवॉर्ड इत्यादी पुरस्कारांनी वेळोवेळी गौरविण्यात आले आहे.

०००

गतिशील व दायित्वपूर्ण प्रशासनाचे १०० दिवसांचे नियोजन पूर्ण करा : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

नांदेड दि. 28 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी निर्धारित केलेल्या सातसूत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची नांदेडमध्येही गतिशील व दायित्वपूर्ण अंमलबजावणी करा, असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज येथे केले.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचा नांदेड येथील आजचा प्रथम दौरा होता. त्यांनी नियोजन भवन येथे आज विविध विभागांचा आढावा घेतला. या बैठकीला खासदार अजित गोपछडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अधीक्षक अभियंता महावितरण, महापारेषण, कार्यकारी अभियंता जलजीवन मिशन, पाणीपुरवठा विभाग, नांदेड कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यकारी अभियंता महावितरण व महापारेषण, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि यंत्रणा जिल्हा समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळ आदी विभागांचा त्यांनी आढावा घेतला. खासदार अजित गोपछडे यांनीही यावेळी अनेक योजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात उत्तम प्रशासनाचे 100 दिवस हा संकल्प पुढे ठेवण्यात आला आहे. 7 कलमी कार्यक्रम त्यासाठी दिला गेला आहे. या शंभर दिवसांमध्ये प्रशासनामध्ये झालेला बदल दर्शनी दिसला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांचे व्यवस्थित स्वागत झाले पाहिजे, सर्व वेबसाईट अपडेट असाव्यात, कार्यालयाची स्वच्छता व प्राथमिक सुविधा परिपूर्ण असल्या पाहिजे. पारदर्शी व उद्दिष्टपूर्ण कार्यप्रणाली आत्मसात केली पाहिजे,अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी केल्या.

विविध विभागाच्या सादरीकरण संदर्भात त्यांनी समाधान व्यक्त केले. तथापि, कागदावरचा विकास प्रत्यक्षात उतरण्यासाठी 100 दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार नियोजन करण्याचे त्यांनी आदेश दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले.

महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकासकामे गतीने पूर्ण करा – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 28 :  महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील मुख्य बाजारपेठ विकसित करणे तसेच डॉ. साबणे रोड लगतचा सर्व परिसर विकसित करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.

मंत्रालयात पर्यटन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील), विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे,महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, पर्यटन संचालनालयाचे संचालक भगवंतराव पाटील, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले की, महाबळेश्वर येथे एप्रिलमध्ये पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी महाबळेश्वर परिसरातील विकासकामे गतीने पूर्ण करावी. किल्ले प्रतापगड येथील कामे सर्व कार्यान्वय यंत्रणांनी समन्वयाने पूर्ण करावीत. प्रतापगड किल्ल्याचे सुशोभीकरण करताना किल्ल्याच्या सौंदर्याला बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी. गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्यावा. पर्यटन महोत्सवाच्या अगोदर ही कामे पूर्ण करावीत. कोयनानगर पर्यटन प्रकल्पासाठी लवकरात लवकर सल्लागार नियुक्त करावा तसेच या प्रकल्पासाठी येणारा खर्च आणि करावयाच्या सर्व कामांचा आराखडा सादर करावा. कोयनानगर परिसरामध्ये असलेले ‘एमटीडीसी’चे पर्यटक निवास संकुल अद्ययावत करावे, अशा सूचनाही पर्यटन मंत्री श्री देसाई यांनी दिल्या.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादने, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचे स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसूफ यांनी मंगळवारी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. वाणिज्य दूतावासातील मो.स्यारकावी यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

मंत्री श्री.रावल यांनी समृद्धतेने नटलेल्या महाराष्ट्रातील विविध बाबींची श्री.युसूफ यांना माहिती दिली. नाशिकचा कांदा आणि द्राक्षे, कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सह्याद्रीच्या रांगांमधील सुगंधी इंद्रायणी तांदूळ, ताजी फळे, भाजीपाला अशा विविध उत्पादनांची निर्यात महाराष्ट्रातून होत असते. मलेशियाला निर्यात करण्याबाबत महाराष्ट्र सकारात्मक असून मलेशियाने यांची आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावा, महाराष्ट्राच्यावतीने त्यांचे स्वागत आणि संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे. पर्यटनाच्या माध्यमातून संस्कृतीचा विस्तार होतो. मलेशियाच्या पर्यटकांनी राज्यात पर्यटनासाठी यावे, असे आवाहन मंत्री श्री.रावल यांनी केले. महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान सांस्कृतिक, आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यासाठी मलेशियाच्या कृषी आणि पर्यटन विषयक सदस्यांनी महाराष्ट्राला भेट देण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले.

मलेशियाच्या महावाणिज्यदूतांनी यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी मलेशिया करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

  • साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित
  • तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर

मुंबई दि. २७ : मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले.

मागील ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना १० लाखापासून ४ कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मांडली, त्याला आता मुर्त स्वरूप आले आहे. यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेल, या निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा व नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.

राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने

सन 2022 या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, ४ ब्लाईंड मेन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे.

तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर (उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी (फोर ब्लाइंड मेन) ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रण सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोले, विवेक लागू, बाबासाहेब सौदागर, विजय भोपे, श्रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पिल्लेई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक यांनी केले होते.

नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे ;

  • सर्वोत्कृष्ट कथा :

१. अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव)

२. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मेन)

३. सुमित तांबे (समायरा )

  • उत्कृष्ट पटकथा :

१. इरावती कर्णिक (सनी)

२. पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मेन)

३. तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी)

  • उत्कृष्ट संवाद :

१. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. मकरंद माने (सोयरिक)

३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)

  • उत्कृष्ट गीते :

१. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे – यल्गार होऊ दे)

२. अभिषेक रवणकर (अनन्या/गाणे-ढगा आड या)

३. प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा/गाणे-अलगद मन हे)

  • उत्कृष्ट संगीत :

१. हितेश मोडक (हर हर महादेव)

२. निहार शेंबेकर (समायरा)

३. विजय गवंडे (सोंग्या)

  • उत्कृष्ट पार्श्वसंगीत :

१. अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. हनी सातमकर (आतुर)

३. सौमिल सिध्दार्थ (सनी)

  • उत्कृष्ट पार्श्वगायक :

१. मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत – भेटला विठ्ठल माझा)

२. पद्मनाभ गायकवाड (गुल्ह/ गीत – का रे जीव जळला)

३. अजय गोगावले (चंद्रमुखी/गीत – घे तुझ्यात सावलीत)

  • उत्कृष्ट पार्श्वगायिका :

१. जुईली जोगळेकर (समायारा/गीत – सुंदर ते ध्यान)

२. आर्या आंबेकर (चंद्रमुखी/गीत – बाई ग कस करमत नाही)

३. अमिता घुगरी (सोयरिक/गीत – तुला काय सांगु कैना)

  • उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :

१. राहूल ठोंबरे-संजीव होवाळदार (टाईमपास 3 / गीत – कोल्ड्रीक वाटते गार, वाघाची डरकाळी )

२. उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत- आई जगदंबे)

३. श्री. सुजीत कुमार (सनी/ गीत – मी नाचणार भाई)

  • उत्कृष्ट अभिनेता :

१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)

३. ललीत प्रभाकर (सनी)

  • उत्कष्ट अभिनेत्री :

१. सई ताम्हाणकर (पॉन्डीचेरी)

२. अमृता खानविलकर(चंद्रमुखी)

३. सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह)

  • उत्कृष्ट विनोदी अभिनेता :

१. मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)

२. संजय नार्वेकर (टाईमपास)

३. भरत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर)

  • सहाय्यक अभिनेता :

१. योगेश सोमण (अनन्या)

२. किशोर कदम (टेरीटरी)

३. सुबोध भावे (हर हर महादेव)

  • सहाय्यक अभिनेत्री :

१. स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. क्षिती जोग (सनी)

३. मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

  • उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :

१. अकुंर राठी (समायरा)

२. रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव)

३. जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही)

  • उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :

१. ऋता दुर्गुळे (अनन्या)

२. सायली बांदकर (गाभ)

३. मानसी भवालकर (सोयरिक)

  • प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती :

१. आतुर

२. गुल्हर

३. ह्या गोष्टीला नावच नाही

  • प्रथम पदार्पण दिग्दर्शन :

१. 4 ब्लाइंड मेन

२. गाभ

३. अनन्या

0000

संजय ओरके/विसंअ/

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ निर्णय

0
टेमघर प्रकल्पाची उर्वरित कामे, गळती रोखण्याच्या कामांसाठी ४८८ कोटी ५३ लाखांच्या खर्चास मान्यता पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्प (ता. मुळशी) प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी व गळती प्रतिबंधक उपाययोजनांसाठी...

मुंबईत होणारी ‘वेव्हज्’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई, दि.२९: मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज्) कार्यक्रम आयोजित करण्यात आला...

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...

0
मुंबई, दि. 29:- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरु असून ही कामे पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन दर्जेदार पद्धतीने...

“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”

0
मुंबई, दि. 29 : सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने "TECH वारी - टेक लर्निंग वीक" या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वस्तरांवरील कर्मचाऱ्यांना डिजिटल युगासाठी...

नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन

0
मुंबई, दि. 29 : भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. मात्र त्यासोबतच देशात अंध आणि दृष्टीबाधित लोकांची संख्या देखील फार मोठी आहे....