बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 220

राज्यातील तिसरे दिव्याशा केंद्र बुलढाण्यात; दिव्याशा केंद्र दिव्यांगासाठी पर्वणी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

बुलढाणा,दि.27 (जिमाका) : दिव्यांगांना आवश्यक असलेल्या उपकरण, साहित्यासाठी मुंबई, नागपूर अशा ठिकाणी जावे लागत असे. आता दिव्यांगाना आवश्यक साहित्य दिव्याशा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार असून दिव्याशा केंद्र हे दिव्यांगांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचा लोकार्पण सोहळा धाड रोड स्थित असलेल्या अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमचे उपव्यवस्थापक के.डी. गोते, दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्थाचे अध्यक्ष जयसिंग जयवार, संस्थेचे विश्वस्त गजानन कुलकर्णी, ओमसिंग राजपूत, देशोन्नतीचे सहसंपादक राजेंद्र काळे आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत दिव्यांगाना आवश्यक असलेले उपकरणे, साहित्य सहज आणि कमी वेळेत मोफत उपलब्ध व्हावेत यासाठी प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र बुलढाणा येथे सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील दिव्यांगांना लाभ होणार आहे. या केंद्रामुळे दिव्यांगांना साहित्य मिळविण्यासाठी होणारा त्रास कमी होणार असून त्यांची क्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणेच त्यांनाही सन्मानाने जगणे सोपे होणार आहे. दिव्यांगाना जास्तीत जास्त सोईसुविधा, साहित्य वाटप व आरोग्याच्या मुलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मुंबई, नागपूर नंतर राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे व देशातील 67 वे केंद्र बुलढाणा जिल्ह्यात सुरू झाले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. दिव्यांगाप्रमाणे दारिद्र रेषेखालील वयोवृद्ध नागरिकांनाही त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य या केंद्रातून देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व वयोवृद्धावर आधुनिक पद्धतीने उपचार करुन आवश्यक साहित्य कमी वेळेमध्ये उपलब्ध होतील. जिल्ह्यातील गरजू दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांनी दिव्याशा केंद्रात भेट देवून लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 47 दिव्यांगांना 3 लक्ष 51 हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये व्हील चेअर, श्रवण यंत्र, ट्र्राय साईकल, कुबड्या, अंधकाठी अशा विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एलिम्कोचे उपव्यवस्थापक के.डी. गोते यांनी तर संचालन रमेश आराख यांनी केले.

0000000

पुढील वर्षासाठीच्या ८२० कोटींच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता – पालकमंत्री शंभूराजे देसाई

सातारा दि.27 (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन 2025-26 साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत 712.35 कोटींचा, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत 106 .28 कोटींचा व आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रम अंतर्गत 2.08 कोटींचा अशा एकूण 820.71 कोटींचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असून या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये सन 2025-26 साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत शासनाने ठरवून दिलेली वित्तीय मर्यादा 486 कोटी 25 लाखाची असून यामध्ये जिल्हास्तरावरील विविध विकास योजनांसाठी 226.10 कोटी वाढीव निधीची मागणी असा एकूण 712.35 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, खासदार नितीन पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, दूरदृष्य प्रणालीद्वारे खासदार र्धर्यशील मोहिते पाटील, सर्वश्री आमदार शशिकांत शिंदे, जयंत आसगावकर, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सन 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रम) अंतर्गत एकूण 671 कोटी 63 लाख 58 हजार तरतूद अर्थसंकल्पित झाली असून बीडीएसवर प्राप्त तरतुद 262 कोटी 43 हजार आहे. तसेच सन 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रम) अंतर्गत 648 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता झालेल्या असून प्राप्त निधी पैकी 204 कोटी 92 लाखांचा निधी खर्च झाला आहे. प्राप्त तरतुदीच्या तुलनेत 31 डिसेंबर 2024 अखेर 78.21 टक्के निधी खर्च झाला आहे.
सातारा जिल्हा हा प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये तसेच खर्चामध्ये राज्यात अग्रेसर आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले. सन 2025-26 साठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी शासनाने वित्तीय मर्यादा 486 कोटी 25 लाखाची असून राज्य समितीकडे केलेली मागणी 226.10 कोटीची आहे. पुढील वर्षासाठी अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 95 कोटी वित्तीय मर्यादा असून 11.28 कोटींची वाढीव मागणी आहे. तर आदिवासी बाह्य क्षेत्र कार्यक्रमासाठी 1 कोटी 63 लाखाची वित्तीय मर्यादा असून 44.40 लाखांची वाढीव मागणी आहे. एकूण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 237 कोटी 83 लाखांची वाढीव मागणी राज्यस्तरीय समितीकडे करण्यात येणार आहे. हा वाढीव निधी मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय व लोकप्रतिनिधीसह दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय बैठकीमध्ये प्रयत्न करणार आहे. सन 2024-25 साठी सर्व मंजूर निधी 100 टक्के खर्च होईल व त्यातून होणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असतील याची सर्वतोपरी खबरदारी घ्यावी. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 176 कोटी 86 लाख, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत 27 कोटी 82 लाख तर आदिवासी क्षेत्र बाह्य कार्यक्रमांतर्गत 23 लाख 76 हजार रुपये निधी आत्तापर्यंत खर्च झाले आहे. उर्वरित सर्व निधी विहित मुदतीत खर्च होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.देसाई यांनी दिले आहेत. या बैठकीत महावितरण कंपनीने निधी उपलब्ध नाही या कारणास्तव मंजूर कामे चालू करण्याचे थांबवू नयेत, मंजूर निधी टप्याटप्याने येत राहील. शेती पंपासाठी विद्युत पुरवठ्याची कामे गतीने पूर्ण करावीत. जल जीवन मिशन अंतर्गत आराखडा मधील कामांच्या 15 टक्के वाढीव रकमेच्या कामांना शासनाची मान्यता घेणे तसेच 15 टक्के पेक्षा जास्त रक्कम लागणाऱ्या कामांच्या मान्यतेसाठी मा. पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे बैठक घेणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत व विविध योजनांच्या निधी उपलब्ध करुन कामे मार्गी लावावीत, असे सूचित करण्यात आले. तसेच या या बैठकीत कराड उपजिल्हा रुग्णालयाची सुधारणा करणे, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, रहिमतपूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करणे अशा मा. आमदार महोदयानी उपस्थित केलेल्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ च्या ७२९ कोटी ८७ लक्ष प्रारूप आराखड्यास मंजुरी

▪️ जिल्हा नियोजन समिती बैठकित पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी उत्कृष्ट काम केल्या बद्दल अभिनंदन ठराव पास

▪️ जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांना गटारी बांधण्यासाठीचा निधी प्रस्ताव शासनाकडे सादर करणार

▪️ शहीद जवानांच्या स्मारकांसाठी निधी मिळावा; शासनाकडे मागणीचा ठराव

जळगाव, दि. 27 (जिमाका) – जिल्हा वार्षिक योजना 2025-26 साठी 729 कोटी 87 लक्ष एवढ्या प्रारूप आराखड्यास आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यावर फुटपाथसह गटारी बांधणे गरजेचे आहे. जेणेकरून रस्ते खराब होणार नाहीत, त्यासाठी शासनाकडे पाठविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. बैठकीत विशेषतः शहीद जवानांसाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे मागणी करण्याचा ठरावही यावेळी संमत करण्यात आला.

आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी निधी नियोजन, त्याची अंमलबजावणी यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल खासदार, आमदार यांच्याकडून अभिनंदन ठराव पास करण्यात आला.

या बैठकीस खासदार स्मिता वाघ, आमदार एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश (मामा) भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण,आमदार अमोल जावळे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रारूप आराखड्यात असलेल्या बाबी

साल 2025-26 साठी जिल्ह्यासाठी एकूण 729 कोटी 87 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये:सर्वसाधारण योजना 574.59 कोटी रुपये, विशेष घटक योजना (अनु. जाती)93 कोटी रुपये, आदिवासी उपयोजना 62.28 कोटी रुपये असा जिल्ह्याचा प्रारूप आराखडा करण्यात आला आहे. जिल्हा नियोजनच्या निधीतून निधीतून जिल्हा विकास आराखड्यासाठी 25 टक्के निधी द्यायचा असून ती रक्कम 145 कोटी एवढी आहे.त्याबाबत चर्चा करण्यात आली असून आराखड्यानुसार निधीस मंजुरी देण्यात आली.

शहीद जवानांच्या स्मारकांसाठी निधी मागणी मागील बैठकीत जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागात शहीद जवानांसाठी प्रत्येकी 25-30 लाख निधी मंजूर करण्याबाबत विषय मांडण्यात आला होता. मात्र, जिल्हा नियोजन अंतर्गत स्मारकांसाठी योजना बंद असल्याने त्यावर खर्च करणे शक्य नव्हते. यामुळे विशेष बाब म्हणून शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला आहे.

या प्रारूप आराखड्यातील प्रमुख कामे व उद्दिष्टे

शासकीय कार्यालयांचे आधुनिकीकरण:
महसूल विभागाची कार्यालये आणि जिल्हा परिषद कार्यालये आधुनिक व लोकाभिमुख बनविणे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवून गुड गव्हर्नन्स अंतर्गत जलद व सक्षम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रकल्पांना गती. शेतकऱ्यांना विनाअडथळा वीज उपलब्ध व्हावी म्हणून ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी 30 कोटी रुपये निधीची तरदूत यात केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची तरदूत यात करण्यात आली आहे. 100% अंगणवाडी बांधकामे पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतीला कार्यालय नाही तिथे ग्रामपंचायत कार्यालये आणि स्मशानभूमी बांधकामासाठी आग्रक्रमाने निधी दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील तीर्थस्थळ व पर्यटनस्थळ विकासात ‘क’ वर्ग तीर्थस्थळे आणि अन्य पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी निधी दिला जाणार आहे. तसेच शहर क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात रस्ते, गटारी व वीजसाठी वाढीव तरतूद करण्यात आली आहे. युवक आणि विद्यार्थी विकासासाठी व्यायामशाळांचे बांधकाम व साहित्य उपलब्ध करून देणे तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, अभ्यासिका बांधकाम व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक शिबिरे घेण्यासाठीच्या निधीची तरदूत यात असेल.

वीजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याच्या कामाचा यात समावेश असणार आहे. खासदार आणि आमदार यांच्याकडून आलेल्या मागणीनुसार राज्यस्तरीय बैठकीत ग्रामीण भागातील गावांतील जनसुविधांसाठी 100 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली जाईल असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खा. स्मिता वाघ,आमदार एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश (मामा) भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण,आमदार अमोल जावळे, आमदार अमोल पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या समोर विविध विकास कामाच्या संदर्भातील विषय मांडले. बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्या त्या विभाग प्रमुखांना खासदार, आमदार यांच्याकडून उपस्थिती केलेल्या मुद्दाबाबत गांभिर्याने दखल घेण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या समोर प्रारूप आराखड्याचे सादरीकरण केले. या बैठकीत 25 जुलै 2023 रोजी नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. 2025- 2026 च्या प्रारूप आराखड्यास मंजूरी देण्यात आली.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘कॅप्टीव्ह मार्केट’ योजनेअंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी योजनेचा शुभारंभ

राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणार कॅप्टीव्ह मार्केट योजनेचा लाभ

जळगाव दि. 27,( जिमाका ) कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ येथील तापी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आज 27 जानेवारी रोजी संपन्न झाला.

याप्रसंगी तालुक्यातील 10 अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलाना प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते साडी वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिकाधारक यांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार असल्याचे मंत्री सावकारे यांनी सांगितले.

सहकारी यंत्रमाग संस्था व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग अंतर्गत नोंदणीकृत घटकाकडून साड्यांचे उत्पादन करण्यात आले असून त्यामुळे विणकरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. वस्त्रोद्योग मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागाचा पहिला कार्यक्रम भुसावळ येथे संपन्न होत असून लाडक्या बहिणींना साडी वितरण करताना आपल्याला आनंद होत असल्याची भावना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की, जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. त्यामुळे कापूस संबंधी प्रक्रिया उद्योग या संबंधित विभागाचे मंत्रीपद हे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे असल्याने जळगाव व भुसावळ येथे संबंधित उद्योगाच्या वाढीस नक्कीच चालना मिळणार आहे. वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, त्यात त्यांनी उपस्थिताना कॅप्टीव्ह मार्केट योजनेबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री खाजगी सचिव प्रल्हाद रोडे, भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील , भुसावळ तहसीलदार नीता लबडे ई मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती बडगुजर यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील दिव्यांग, विधवा महिला, परितक्ता महिला यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देऊन मान्यवरांचे हस्ते ई- शिधापत्रिकांची वितरण करण्यात आले.

वसतिगृह, आश्रमशाळांची वारंवार भेटी देऊन तपासणी करावी – मंत्री अतुल सावे

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मंत्री अतुल सावे यांनी घेतला आढावा

पुणे, दि. २७ : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या घटकांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विविध ५४ कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून वसतिगृह व आश्रमशाळा योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची वारंवार भेटी देऊन तपासणी करावी, अशा सूचना मंत्री अतुल सावे यांनी दिल्या.

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरित कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित विभागाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महाज्योतीचे महासंचालक राजेश खवले, उपसचिव कैलास साळुंखे, सहसंचालक संतोष हराळे, प्रशांत शिर्के आदी उपस्थित होते.

मंत्री श्री सावे म्हणाले, राज्यात सन २०१७ मध्ये सामाजिक न्याय विभागातून नव्याने इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्थापना झाली. मागील अडीच वर्षात इतर मागास बहूजन समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. १०० विद्यार्थी क्षमतेचे मुला-मुलींसाठी ५६ वसतीगृह २६ जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहेत. वसतिगृहात प्रवेश देताना जातप्रमाणपत्र पडताळणी करुनच प्रवेश देण्यात यावा. बोगस प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा दाखल करावा असे सांगून ते म्हणाले या विभागांतर्गत योजना राबविण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. परंतु शासनाच्या निधीचा योग्य विनियोग होईल याची सर्व अधिकाऱ्यांनी गंभीरपणे दखल घ्यावी. व विद्यार्थ्यांच्या तक्रारी येणार नाहीत यासाठी सर्व सोई उपलब्ध असल्याची वसतीगृह व आश्रमशाळांना भेटी देऊन खात्री करावी.

ते म्हणाले, ज्या जिल्ह्यात अद्याप वसतिगृहासाठी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी जागा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत त्या जिल्ह्यांनी तातडीने जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करावेत, विद्यार्थ्यांना भोजन भत्ता तसेच साहित्य पुरवठा प्राधान्याने करावा, वसतीगृह अनुदानाबाबत पाठपुरावा करावा असे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री सावे यांनी मॅट्रिकोत्तर योजना, मॅट्रिकपूर्व योजना, परदेश शिष्यवृत्ती योजना, स्वयंम व आधार योजना, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेश, वसतिगृह योजना, आश्रमशाळा योजना, कै. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, कै. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, घरकुल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, निपुण भारत योजनेंतर्गत विभाग व जिल्हा निहाय नोंदणी तसेच विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला.

प्रास्ताविकात श्री. खिलारी यांनी विविध योजना व त्याअंतर्गत खर्चाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या वतीने संचालनालय स्तरावर आश्रमशाळा संहितेमध्ये सुधारणा करण्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

बैठकीला पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नाशिक व लातूर प्रादेशिक उपसंचालक तसेच सहायक संचालक उपस्थित होते.
0000

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरित कार्यालयाचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. २७ : इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार उमा खापरे, आमदार बापूसाहेब पठारे, विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महाज्योतीचे महासंचालक राजेश खवले, उपसचिव कैलास साळुंखे, सहसंचालक संतोष हराळे, प्रशांत शिर्के आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले, कामाचे ठिकाण प्रशस्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाचा उत्साह वाढेल. कार्यालयास पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून विभागाने अधिक कार्यक्षमपणे व पारदर्शकपणे काम करावे. पेपरलेस कामकाजाला प्राधान्य द्यावे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना तालुकास्तरापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री. सावे यांनी कार्यालयातील दालनांची यावेळी पाहणी केली.

यावेळी पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नाशिक व लातूर प्रादेशिक उपसंचालक, सहसंचालक, सहायक संचालक तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

कृषी विभांगांतर्गत पदभरतीसाठी शनिवार व रविवार रोजी व्यावसायिक चाचणी परीक्षा

पुणे, दि. २७ : कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी व उच्च श्रेणी) संवर्गातील सरळसेवा भरतीच्या ऑनलाईन परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवारांची व्यावसायिक चाचणी दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाचे सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

कृषी विभागाच्या ८ विभागांमध्ये ही चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांनी आवेदन पत्रामध्ये सादर केलेल्या त्यांच्या वैयक्तिक ई-मेल वर पाठविण्यात आले आहेत. परीक्षार्थीना प्रवेशपत्राबाबत (हॉल तिकीट) ई-मेल प्राप्त झाला नसल्यास संबंधित विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात २८ ते २९ जानेवारी २०२५ रोजी संपर्क साधावा. प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द‌्यावी.

भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘संविधान गौरव महोत्सव’ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 27 :- भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर “संविधान गौरव महोत्सव” निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने  भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. भारताच्या इतिहासातील या ऐतिहासिक परिवर्तनात्मक क्षणाचा सन्मान करण्यासाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर संविधान गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

या महोत्सवाचा उ‌द्देश राज्यघटनेतील मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करणे आणि नागरिकांना त्यांच्या घटनात्मक अधिकार व कर्तव्यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी व जगभरातील लोकशाही-प्रेमी नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण असून लोकशाहीचा सण मोठ्या अभिमानाने साजरा करण्याचा हा प्रसंग आहे, असेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना आपण स्वत:प्रत अर्पण केली. या घटनेला  दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. दि.२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात येऊन  २६ जानेवारी २०२५ रोजी या ऐतिहासिक घटनेस ७५ वर्ष पूर्ण  झाली आहेत. या ७५ वर्षांचा प्रवास उल्लेखनीय आहे आणि या प्रवासाच्या केंद्रस्थानी आपल्या संविधान निर्मात्यांची व्यापक दृष्टी आहे, ज्यांचे योगदान देशाच्या भावी वाटचालीसाठी आपल्याला मार्गदर्शन करीत राहील. राज्यघटनेच्या पूर्णत्वाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची ओळख, नागरी कर्तव्ये व अधिकार याबाबत माहिती व्हावी, तसेच राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती समाजातील सर्व सामान्यांपर्यंत  पोहोचावी  या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या  सहा हजार महावि‌द्यालयांमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर ‘संविधान गौरव महोत्सव’ अंतर्गत  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

संविधान गौरव महोत्सव विविध उपक्रम

  • संविधानाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील सर्व अकृषि वि‌द्यापीठांमधून तज्ज्ञांच्या व्याखानांचे आयोजन करणे,
  • “भारतीय राज्यघटनेची ओळख” या विषयावर निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन, प्रश्नमंजुषा, पोस्टर / भित्तीपत्रके स्पर्धांचे आयोजन, चर्चासत्र, कार्यशाळा, परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • महावि‌द्यालयांमध्ये राज्यघटनेविषयीचे अभ्यासक, विषयतज्ज्ञ यांना निमंत्रित करून त्यांची व्याख्याने आयोजन.
  • राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महावि‌द्यालयांनी सर्व सामान्यांपर्यंत राज्यघटना पोहोचवावी या करिता जनजागृती अभियान राबविण्यात येणार.
  • राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये राज्यघटने विषयी व्याख्याने आयोजित करण्यात येणार.

 

0000

 

काशीबाई थोरात/विसंअ/

गोड्या पाण्यातील मासेमारी वाढविण्यासाठी धोरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २७ : राज्यात गोड्यापाण्यातील खंडांतर्गत मासेमारीला मोठा वाव आहे. सध्याच्या खंडांतर्गत मासेमारीमध्ये वाढ करण्यासाठी धोरण निश्चित करावे. तसेच मत्स्यबीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठीही धोरण तयार करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला त्यावेळी त्यांनी सूचना केल्या.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, खंडांतर्गत मत्स्य व्यवसाय वाढवणे गरजेचे आहे. गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी मत्स्यबीज उपलब्धता अत्यंत महत्वाचे आहे. मत्स्यबीज उपलब्धता वाढविण्यासाठी ध्येयात्मक काम करावे. ज्या ठिकाणी राज्यात मत्स्य बीज प्रक्रियेविषयी चांगले काम होत आहे. त्यांना प्रोत्साहन आणि निधी देण्यात यावा. त्यासोबतच सागरी मासेमारी विषयी सर्वसमावेशक धोरण तयार करावे. केंद्र शासनाने मत्स्य व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे. केंद्राच्या नियमानुसार राज्यातील मत्स्य व्यावसायिकांना लाभ देण्याची कार्यवाही करावी. धरण क्षेत्रातील मासेमारी व्यवसायासाठीही सर्वसमावेशक धोरण तयार करावे. मासेमारी संस्थांचा कारभार पारदर्शक राहील असे पहावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन, यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विभागाची माहिती सादर केली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना यासह सागरी क्षेत्रात होणारे ड्रोन सर्वेक्षण, मासेमारी बोटी व मत्स्य व्यवसायिकांना देण्यात येणारे अनुदान व सोयी सुविधा, मत्स्य व्यवसाय वाढीसाठी उभारण्यात येत असलेल्या मत्स्य बंदर, मत्स्य बाजार, मरोळ येथील आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार यासारख्या सुविधांचीही माहिती देण्यात आली.

बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २७ : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ची उपलब्धता महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.

सह्याद्री अतिथीगृह गृह येथे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे फित कापून आणि हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माध्यम प्रतीनिंधीशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी २१ पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे सग्रहीत करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे.  गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.

या व्हॅनमध्ये रक्त, डीएनए संग्रहण आणि बलात्कार गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करता येणार आहे. वैज्ञानिक तज्ज्ञ व सहायक कर्मचारी व्हॅनमध्ये असतील.  तसेच स्फोटक पदार्थ तपासणी, सायबर गुन्ह्यांमध्ये तपासणीसाठी विशेष फॉरेन्सिक किट्स उपलब्ध असणार आहेत. तसेच व्हॅन सीसीटिव्हीने सज्ज असणार आहे. या व्हॅन कनेक्टेड असणार आहेत. त्यामुळे सबंधित पोलीस स्टेशनला सबंधित गुन्ह्याकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणे शक्य होणार आहे ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फॉरेन्सिक किट्स, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन ॲप्लिकेशन यांचा समावेश आहे. यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे. तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे. पुरावे नष्ट करणे, पुरव्यांशी छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होवून गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चितच वाढणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला राज्यमंत्री गृह (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मा. मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव राधिका रस्तोगी, प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, महासचालक (न्याय व तांत्रिक) संजय वर्मा, न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय संचालक डॉ. संगीता घुमटकर, उपसचिव राजेंद्र भालवणे आदीसह गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अशी काम करणार फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन

जेव्हा गुन्हा नोंदविला जातो, तेव्हा नियंत्रण कक्ष फॉरेन्सिक पथकाला सूचित करेल. फॉरेन्सिक पथक गुन्हे स्थळाला भेट देऊन ते गुन्ह्याची माहिती नोंदवून क्राईम सीन ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत करतील. फॉरेन्सिक तज्ज्ञ गुन्ह्याचे ठिकाणी छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करतील. तसेच वरिष्ठ तज्ज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरनसद्वारे संपर्क साधून पुराव्यांचे संकलन आणि तपासणी करून पुरावे पुन्हा तपासून सील केले करतील.  त्यानंतर क्राईम सीन रिपोर्ट तयार करून पोलीस तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जाईल.

000

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे वाणिज्यदूतांसाठी चहापान

0
मुंबई, दि. २९  : दिनांक १ मे रोजी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत...

नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
पुणे महापालिकेत महाप्रितच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा मुंबई, २८: पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने...

खाडीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामासंदर्भात अभ्यास समिती स्थापन करावी – सभापती...

0
मुंबई दि. २९ :- राज्यातील मुंबई, ठाणे, बेलापूर, उलवे, तळोजा येथील खाड्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामधून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि डंम्पिंग ग्राऊंडचा कचरा यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा फटका मासेमारी...

जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आठ दिवसात नव्याने प्रस्ताव सादर करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. २९ : बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांनी 40 टक्के वाढीव मोबदला मागितला आहे. त्यामुळे 8 हजार 782 दावे प्रलंबित असून ते निकालात...

सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी – कामगार मंत्री ॲड.आकाश...

0
मुंबई, दि. 29 : राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो...