शुक्रवार, मे 2, 2025
Home Blog Page 231

वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त राज्यपालांची मृतात्म्यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 27 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ज्यू लोकांचे मुंबईतील प्रार्थनास्थळ असलेल्या केनेसेथ इलियाहू सिनेगॉग येथे दुसऱ्या महायुद्धात हत्या करण्यात आलेल्या लाखो ज्यू लोकांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहिली. जागतिक वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त या स्मृतीसभेचे आयोजन जेकब ससून ट्रस्टच्या वतीने सोमवारी (दि. २७) करण्यात आले होते.

दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांचा नरसंहार झाला, त्या इतकी दुर्दैवी आणि क्रूर घटना मानव जातीच्या इतिहासात कधीही झाली नाही. मात्र सुसंस्कृत समाजाने बदल्याच्या भावनेने पेटून न उठता गतकाळ मागे सारुन समोरच्या व्यक्तीचे हृदय परिवर्तन केले पाहिजे, असे यावेळी राज्यपालांनी सांगितले.

या स्मृतीसभेला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी, जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत एकिम फेबिग, अमेरिकन दूतावासातील वरिष्ठ अधिकारी मायकल श्रुडर, जेकब ससून ट्रस्टचे अध्यक्ष सॉलोमन सोफर, विविध देशांचे वाणिज्यदूत तसेच ज्यू धर्मीय उपस्थित होते.

००००

देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात; गरज भासल्यास केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागणार – पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई, दि. 27 – राज्यात नोंदणी झालेल्या 7 लाख 64 हजार 731 शेतकऱ्यांपैकी 3 लाख 69 हजार 114 शेतकऱ्यांकडून 7 लाख 81 हजार 447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली असून ही खरेदी इतर राज्याच्या तुलनेने सर्वाधिक आहे. देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यांना मागे टाकत देशांमध्ये सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्राने केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

याबाबत माध्यमांशी बोलताना पणन मंत्री श्री.रावल म्हणाले, अनेक जिल्ह्यांनी आपले खरेदी उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला अडचण येऊ नये यासाठी वेगाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया करण्याची तसेच दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पोहोचेल यासंदर्भात वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. 31 जानेवारी 2025 पर्यंत खरेदी चालू राहणार असल्याने सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. तथापि, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची गरज भासल्यास केंद्र सरकारकडे मुदत वाढवून मागितली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पणनमंत्री श्री.रावल म्हणाले, राज्यात नाफेड व एनसीसीएफ अंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दि. 1 ऑक्टोबर 2024 पासून नोंदणी सुरू केली होती. त्यानुसार  दि.15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील 562 खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सूरू करण्यात आली आहे. नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीची मुदत एक वेळा वाढवली. त्यानंतर सुरुवातीला सोयाबीन खरेदीची मुदत 12 जानेवारी 2025 पर्यंत होती, मात्र या मुदतीत अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी न झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांना विनंती करून खरेदीची मुदत दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात खरेदीच्या तुलनेत महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक खरेदी केली आहे. महाराष्ट्रासह या सहाही राज्याची एकूण खरेदी 18 लाख 68 हजार 914 मेट्रिक टन इतकी झाली असून यापैकी महाराष्ट्राने 7 लाख 81 हजार 447 मेट्रिक टन खरेदी केली आहे. राज्यात नांदेड जिल्ह्यात 57 हजार 528 शेतकऱ्यांकडून 1 लाख 290 मेट्रिक टन इतकी सर्वाधिक सोयाबीन खरेदी झाली आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात 29 हजार 764 शेतकऱ्यांकडून 60 हजार 989 मेट्रिक टन खरेदी झाली आहे. सुरुवातीच्या काळात आलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून आजही वेगाने खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री श्री.रावल यांनी सांगितले.

केंद्र सरकारने सन 2024-25 करीता सोयाबिनसाठी प्रति क्विंटल 4 चार 892 रुपये इतका हमीभाव घोषित केला असून त्यानुसार खरेदी सुरू आहे. हे दर मागील वर्षाच्या हमीभावापेक्षा 292 रुपये प्रति क्विंटल इतके जास्त आहे. सन 2024-25 मध्ये लागवडीखालील क्षेत्र 50.51 लाख हेक्टर असून उत्पादन 73.27 लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे. पीएसएस खरेदीसाठी केंद्र सरकारने 14 लाख 13 हजार 270 मे.टन (19.28 टक्के) मंजूरी दिली असल्याची माहितीही मंत्री श्री.रावल यांनी दिली आहे.

राज्यातील सोयाबीन खरेदीच्या संदर्भात ठळक मुद्दे :

❖    मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख पाच सोयाबीन उत्पादक राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने सर्वाधिक सोयाबीन खरेदी केली आहे.

❖        अजून गरज भासल्यास केंद्र सरकारला सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची विनंती करणार.

❖    राज्यात नोंदणी झालेल्या एकूण 7 लाख 64 हजार 731 शेतकऱ्यांपैकी 25 जानेवारी 2025 पर्यंत 3 लाख 69 हजार 114 शेतकऱ्यांकडून 7 लाख 81 हजार 447 मेट्रीक टन सोयाबीन खरेदी करण्यात आली.

❖        नाफेड व एनसीसीएफ यांच्या अंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सी च्या माध्यमातून दिनांक 1 ऑक्टोबर2024 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली होती, त्यानुसार 7 लाख 64 हजार 631 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

❖    मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात खरेदीच्या तुलनेत महाराष्ट्राने सर्वाधिक खरेदी केली आहे. महाराष्ट्रासह या राज्यांची एकूण खरेदी 18 लाख 68 हजार 914 मॅट्रिक टन इतकी झाली असून त्यापैकी 7 लाख 81 हजार 447 मेट्रिक टन खरेदी महाराष्ट्राने केली आहे.

 ❖       दि. 15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली आहे. या खरेदीसाठी नाफेड आणि एनसीसीएफ च्या अंतर्गत नोडल एजन्सी कडून राज्यात 562 केंद्रांवर खरेदी वेगाने सुरू आहे.

❖        सोयाबीन खरेदीची मुदत दि. 12 जानेवारी 2025 रोजी संपलेली होती, मात्र लोकप्रतिनिधी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना विनंती करून ही मुदत दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे.

❖    केंद्र शासनाने सन 2024-25 करीता सोयाबिनसाठी प्रति क्विंटल 4 हजार 892 इतका हमीभाव घोषित केला आहे. या वर्षाचे दर हे मागील वर्षाच्या हमी भावापेक्षा रू 292 रुपये प्रति क्विंटल इतके जास्त आहेत.

❖        राज्यात सर्वाधिक सोयाबीन खरेदी नांदेड जिल्ह्यात झाली असून 57 हजार 528 शेतकऱ्यांकडून 1 लाख 290 मेट्रिक टन इतकी खरेदी झाली आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील 29 हजार 764 शेतकऱ्यांकडून 60 हजार 989 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली आहे.

❖    31 जानेवारी 2025 पर्यंत खरेदी सुरू राहणार आहे, त्यामुळे खरेदीचा आकडा अजून वाढेल. दरम्यान सोयाबीन खरेदीची आणखी गरज भासल्यास केंद्राकडून मुदत वाढवून देण्याची विनंती करणार आहे.

❖        सन 2024-25 मध्ये लागवडीखालील क्षेत्र 50.51 लाख हेक्टर व उत्पादन 73.27 लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे.

❖    सुरुवातीला सोयाबीन खरेदीत येणाऱ्या बारदान उपलब्धता व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. त्यात खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खरेदी प्रक्रिया वेगाने करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या, त्यामुळे खरेदीचे उद्दिष्ट साध्य.

❖        खरेदीनंतर बँकिंग प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ते तीन दिवसात रक्कम जमा करण्यासाठी जलद गतीने कारवाईच्या सूचना नाफेड आणि यंत्रणेला दिल्या. त्यानुसार लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट जमा झाले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ई पंचनामा प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करावी

मुंबई, दि. 27 :- नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून पीक नुकसान मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा  सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडतात. यातून सावरण्यासाठी शासन मदत जाहीर करते. शासनाने जाहीर केलेली मदत त्यांना तातडीने मिळावी, यासाठी संबधित शेतकऱ्यांचे इ केवायसी प्रक्रिया तातडीने करून त्यांना थेट मदत दिली जावी.  ई पंचनामा प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात यावी.

अमरावती आणि नाशिकमध्ये पूनर्वसन प्राधिकरण कार्यान्वित करण्याबरोबरच अतिरिक्त ८ प्राधिकरणांसाठी मंत्री मंडळासमोर प्रस्ताव आणावा. १९७६ पूर्वी पुनर्वसन झालेल्या गावांसाठी दिलेल्या वस्तीमध्ये  नागरी सुविधांची कामे  पूर्ण करून ती ग्रामविकास विभागाकडे वर्ग करण्याबाबतही प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्र व जिल्हा आपत्कालीन प्रतिसाद केंद्रांचे अद्ययावतीकरण करावे. कोकण आपत्ती सौम्यीकरण व इतर महाराष्ट्रातील सौम्यीकरण प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस जलसंपदा ( विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे मंडळ) व आपत्ती. व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरण केले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

‘एमएमआर’ क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी

उद्योगांना प्रक्रिया केलेलेच पाणी द्यावे

वन आणि इतर परवानग्यांना गती द्यावी

मुंबई, दि. 27 : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी या क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत. महसूल व वन विभागाने यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रिया निश्चित कालमर्यादा निर्धारित करुन तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे प्रकल्प) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री गणेश नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्प केवळ पिण्याच्या पाण्याचा स्रोत नसून, शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा घटक आहेत. आगामी काळात जल व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करून हे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करावेत. या प्रकल्पासंदर्भात वन विभागाची मान्यता, एमएमआरडीए, सिडको आदी कार्यान्वयिन यंत्रणांनी परवाने व इतर अनुषंगिक बाबीसंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करून कामास गती द्यावी, असे निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले.

शाई व सुसरी प्रकल्पाची कामे सुरू करा

मुंबई महानगर क्षेत्र हे सर्वांत वेगाने वाढणाऱ्या शहरी भागांपैकी एक असून, पाणीपुरवठा हा येथील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आगामी काळातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता शाई व सुसरी प्रकल्पाची कामे सुरू करण्याबाबत जलसंपदा विभाग आणि संबंधित यंत्रणेने कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

एसटीपी प्रकल्पातील पाणी औद्योगिक वापरासाठी

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ज्याठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, तेथील पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) औद्योगिक वापरासाठी घ्यावे. या पाण्यावर आणखी काही प्रक्रिया करता येते, का याबाबतही अभ्यास करावा. एसटीपी प्रकल्पातील पाणी औद्योगिक वापरासाठी घेण्यासंदर्भात मुख्य सचिव यांनी एमआयडीसी आणि नगरविकास विभाग यांची एकत्रित बैठक घ्यावी.

अनेक ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईन जुन्या झाल्या असल्याने पाण्याची गळती होते. पाण्याची ही गळती रोखण्यासाठी जुन्या पाईपलाईन बदलण्याबाबत कार्यवाही करावी. वाहून जाणारे पुराचे पाणी साठवण्याबाबतही नियोजन करावे, अशा सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

काळू नदी प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण करावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात पिण्यासाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी काळू नदी प्रकल्प महत्त्वाचा असून हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावा. ठाणे व परिसरातील नवीन वसलेल्या भागाला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून द्यावे, असेही ते म्हणाले.

बैठकीत देहरजी मध्यम प्रकल्प, काळू नदी प्रकल्प, भातसा (मुमरी) प्रकल्प, सूर्या (कवडास) उन्नैयी बंधारा, सूर्या नदीवरील पाच बंधारे, बाळगंगा नदी प्रकल्प, खोलसापाडा-2 लघु पाटबंधारे योजना, श्री हरिहरेश्वर पाणीपुरवठा योजना, जांभिवली (चिखलोली), शाई नदी प्रकल्प आणि सुसरी नदी प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला.

0000

एकनाथ पोवार/विसंअ/

शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्याला ६ अग्निशमन गाड्या; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव दि. 27 ( जिमाका ) –  जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील जिल्हा नियोजन समितीच्या  बैठकी दरम्यान सर्व 6 नगरपालिकेच्या अग्नीशमन विभागातील अधिकारी यांना  वाहनाच्या प्रतिकात्मक  चाबी देत लोकार्पण सोहळा पार पडला.

महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून जिल्ह्यातील  भुसावळ, चोपड़ा चाळीसगाव, पाचोरा, जामनेर,अमळनेर  या नगरपालिका/नगरपरिषदेसाठी  अग्निशामन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

या प्रसंगी  पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार  स्मिता वाघ, आमदार  अनिल पाटील,आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील,

आमदार मंगेश  चव्हाण,  आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार  चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पोलीस अधीक्षकडॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. अंकित, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ उपस्थित होते.

 मिनी फायर अँड रेस्क्यू व्हेईकल एमएफआरव्ही ची वैशिष्ट्ये

प्रगत आपत्कालीन प्रतिसाद युनिटचे वाहन हाय प्रेशर वॉटर मीटर सिस्टीम,हाय प्रेशर वॉटर मिटर सिस्टीम,फोम प्रेशर सिस्टीम.आपत्कालीन रेस्क्यू टूल्स (बचाव कार्य साहीत्य).

आग, भूस्खलन, पूर, रेल्वे अपघात यासह विविध आपत्ती दरम्यान तात्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा यात आहे.

जिल्ह्यातील दुर्गम भागातील आपत्ती झोन पर्यंत पोहोचण्याची क्षमता. जिल्ह्यातील जीवित व वित्तहानीशी सक्षमपणे सामना करण्यासाठी जिल्ह्याची अग्निशमन यंत्रणा अद्यावत असणे आवश्यक होती, त्याची पूर्तता झाली आहे.

राज्यपालांच्या उपस्थितीत कोपरखैरणे येथील सेंट मेरीज शाळेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम

मुंबई, दि. २७ : कोपरखैरणे नवी मुंबई येथील सेंट मेरीज आयसीएसई स्कूल या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात संपन्न झाला.

यावेळी मलंकरा ऑर्थोडॉक्स चर्चच्या मुंबई धर्मप्रांताचे मुख्य बिशप गीवर्गीस मार कुरीलोस, मुंबई मलंकरा ऑर्थोडॉक्स चर्च परिषदेचे सचिव थॉमस चाको, परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फादर एब्राहम जोसेफ, शाळेच्या प्राचार्या ब्लेसी मॅथ्यूज, उपप्राचार्य फादर जॉन मॅथ्यूज, विश्वस्त तसेच आजी माजी प्रशासक, प्राचार्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते.

रौप्य महोत्सवी वाटचालीबद्दल सेंट मेरीज स्कुलचे अभिनंदन करताना राज्यपालांनी मलंकारा ऑर्थोडॉक्स चर्चच्या कर्क रुग्ण सेवा, एचआयव्ही – एड्स रुग्ण सेवा, अनाथ मुलींचे शिक्षण आदी क्षेत्रातील सेवाकार्याचे कौतुक केले.

सेंट मेरीजच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उत्तम प्रदर्शनाचे कौतुक करताना खेळ व शिस्त यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ राहण्यास मदत होते असे राज्यपालांनी सांगितले.

शिक्षण मिळवून धनसंपदा अर्जित करणे योग्यच आहे. मात्र केलेल्या धनसंचयाचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजासाठी करावा असे राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.

शाळेत वेळापत्रक महत्वाचे असते तसेच वेळापत्रक जीवनात देखील पाळले गेले पाहिजे कारण त्यातून वेळेचे चांगले नियोजन करता येते, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांचे हस्ते शाळेचे आजी – माजी समिती सदस्य, माजी प्राचार्य तसेच कला, क्रीडा व इतर उपक्रमांमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रेसी मॅथ्यूज, आशा नारायण, जलतरणपटू तोषला भिरूड, बाल वैज्ञानिक अर्श चौधरी, माजी विश्वस्त जेकब वर्गीस, जॉन मथाई, के ए थॉमस, फुटबॉल पटू निल थॉमस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

०००

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त चौगुले पब्लिक स्कूलमध्ये काव्यवाचन उपक्रम

काव्यवाचन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद

नवी दिल्ली, २७ : चौगुले पब्लिक स्कूलच्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी वर्तमान विषयक तसेच बालकविता सादर केल्या. कोमडे दादा….,सॅण्डविच…., आई कशी होती रे…. भारत माता… माणूस…… आयुष्य…. स्त्रीशक्ती, कुतूहल…..चिमणीचे लग्न अशा विविध विषयांवरील कवितांचे वाचन केले.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने निवासी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत येथील चौगुले पब्लिक स्कूलमध्ये कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाचवी ते आठवीपर्यंतच्या एकूण २१  विद्यार्थी सहभागी झाले. शाळेच्या प्राचार्य पुजा साल्पेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका दिपाली सावंत आणि दिपाली कदम   यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सराव करून घेतला.

मराठी आणि अमराठी  भाषिक सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी मराठी कविता सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  तृतीय पारितोषिक दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले.  सहभागी  झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

इयत्ता सातवीची अदिती माने या विद्यार्थींनीने स्त्रीशक्तीवर आधारित कविता सादर करून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तनुजा सांळुके हिने आयुष्य…..या विषयावरील कविता स्पष्ट उच्चारात सादर केली. तिने  दुसऱ्या क्रमांक पटकावला. इयत्ता सातवीतील कमलेश याने आईवर……. सुंदर कविता सादर केली. तर तनुष्का या आठवीतील विद्यार्थ्यांनीने वर्तमान परिस्थितीवर आधारित कविता सादर केली.  या दोन्ही विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.

या कविता स्पर्धेस परीक्षक आणि प्रमुख पाहुणे  म्हणून महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा आणि माहिती अधिकारी अंजु निमसरकर उपस्थित होत्या.

0000

अंजु  निमसरकर, मा.अ. वि.वृ.क्र.27 /दि. 27.01.25

गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २७ – शालेय शिक्षणात महाराष्ट्र देशात आघाडीवर राहावा यासाठी शासनामार्फत सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धारावी काळा किल्ला शाळा संकुलातील मुंबई पब्लिक स्कूल तसेच धारावी ट्रान्झिट कॅम्प मधील इंग्रजी आणि सेमी इंग्रजी शाळांना भेट देऊन पाहणी केली.

यावेळी श्री. भुसे यांनी शाळेतील बालवाडीसह अन्य वर्ग, ग्रंथालय, विद्यार्थ्याला वाचन आणि लिहिता येते का, पाढे येतात का, कविता वाचन, विद्यार्थ्याची शारीरिक स्वच्छता याची पाहणी केली. त्यांनी पोषण आहारामध्ये दिले जाणारे अन्न, पिण्याचे पाणी स्वतः तपासले. स्मार्ट क्लासरूम, कंप्युटर लॅब, क्राफ्ट रूम मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे योग्य ज्ञान मिळत आहे की नाही ते जाणून घेतले. परिसर स्वच्छता, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी असलेली स्वच्छतागृहे तसेच शाळेतील सीसीटीव्ही यांची देखील पाहणी करून मंत्री श्री. भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शाळांची पाहणी केल्यानंतर श्री.भुसे यांनी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शाळांमध्ये विद्यादानाचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करून हा दर्जा असाच कायम राखावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी असल्याचे सांगून समाजातील कोणत्याही घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, जी उत्तर वार्ड च्या प्रशासकीय अधिकारी स्नेहलता डुंबरे, शाळेतील वर्ग शिक्षक यांनी शालेय शिक्षणमंत्री श्री.भुसे यांना शाळेविषयी सविस्तर माहिती दिली.

0000

बी.सी.झंवर/वससं/

येत्या ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई, दि.२७ :  एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर उपस्थित होते.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, सध्या एसटी महामंडळाकडे १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या  १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला असून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली.  त्याबद्दल परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन २०२९ मध्ये या २५  हजार बसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे ३०  हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल” गाव तिथे एसटी आणि मागेल त्याला बस फेरी” आपण देऊ शकणार आहोत.

आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी  २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटीवर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबद्दल परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी श्री. पवार यांचे आभारही मानले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

क्रीडा व युवक कल्याण विभागाकडील शंभर दिवसात करावयाच्या उपक्रमांचा आढावा

मुंबई, दि. 27 : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूस आवश्यक सेवा सुविधा मिळाव्यात याबाबत क्रीडा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडू सोबत जाणाऱ्या मार्गदर्शक व फिजिओथेरपिस्ट यांचा खर्च क्रीडा विभागाने करण्याबाबत नियोजन करावे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील  स्पर्धेसाठी खेळाडूंना आवश्यक असलेला व्हीसा लवकर मिळावा यासाठीही क्रीडा विभागाने समन्वय करावा.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर राज्यातील खेळाडूंना अधिक संधी मिळाली पाहिजे यासाठी शालेयस्तरावर विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण अधिक विकसित होण्यासाठी जिल्हास्तरावर अधिक स्पर्धा घ्याव्यात. या स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा संकुलांचा वापर व्हावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

क्रीडा विभागामार्फत १०० दिवसाच्या कालावधीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२२-२०२३ व २०२३-२०२४ वितरण करणे, गट  अ आणि ब  करिता पात्र  खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती आदेश देणे, मिशन लक्ष्यवेध, विभागीय क्रीडा संकुल नागपूर, विभागीय संकुल, शिंपोली मुंबई, आणि  पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मधील पदक प्राप्त खेळाडू व मार्गदर्शकांना बक्षीस वितरण आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी उपस्थित होते.

क्रीडा विभागाचे सादरीकरण अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी केले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

ताज्या बातम्या

ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व व्यापक करण्याची गरज ‘इंडियाज रिच टू ऑस्कर्स’ या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांचे...

0
मुंबई दि. 2 :- भारतात सध्याच्या घडीला ३५ हून अधिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती होत असून ऑस्करमध्ये एकाच प्रवेशिकेने संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणे कठीण आहे....

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार – अभिनेते अमीर खान

0
मुंबई, दि. 2 : राज्य शासनाने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या क्षेत्रासाठी सकारात्मक विचार होत असून भारत या क्षेत्रामध्ये उत्तुंग...

वेव्हज् २०२५ : कृत्रिम बुद्ध‍िमत्ता आणि सर्जनशीलतेचा मेळ

0
मुंबई, दि. २ : ५०० दशलक्षाहून अधिक भारतीय ऑनलाइन आशय वापरत आहेत आणि प्रादेशिक भाषांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. सर्जनशीलता आणि उत्पादन सशक्त करणे,...

‘वेव्हज् २०२५’ मध्ये माध्यम आणि मनोरंजनासह साहस, समानतेचा उत्सव

0
मुंबई, दि. २ : कथानकांमध्ये बदल घडवण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ वेव्हज २०२५ ने उपलब्ध करून दिले आहे. चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण...

‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि.  २ : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे....