सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 450

मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 8 : ‘स्वप्न पूर्ण करणारे शहर’ म्हणून ओळख असलेल्या मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार होत असल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काढण्यात आली.

यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले.

मंत्री श्री.सावे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. सर्वासाठी घरे हे स्वप्न साकार होण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’, ‘मोदी घरकुल आवास योजना’ सुरू केल्या आहेत. या माध्यमातून अल्प, मध्यम उत्पन्न गटातील सर्वसामान्यांना घरे वाटप करण्यात येत आहेत. राज्यात साडे सात लाख घरे बांधण्यात आली असून  यातली अडीच लाख घर ही मुंबईमध्ये बांधली गेली आहेत. आजच्या या लॉटरीसाठी दोन हजार ३० घरांसाठी १ लाख १३ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. आजची ही सोडत मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णत: ऑनलाईन अशा संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नाशिक, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरात पारदर्शकपणे लॉटरी प्रक्रियेमार्फत लोकांना घरे मिळाली आहेत. मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणी ही वाढत आहे. मुंबईत ही दुसरी सोडत असून लवकरच आणखी घरांची सोडत होईल. अभ्युदय नगर, कामाठीपुरा, शहरातील जुन्या वस्त्या येथील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच आणले जाणार असून गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या व टिकाऊ घरांवर भर दिला जाणार असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

म्हाडामुळे मुंबईतील सर्वसामान्यांना घराचा दिलासा – पालकमंत्री दीपक केसरकर

म्हाडाच्या या लॉटरीमुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना घर मिळणार आहे. म्हाडाने मुंबईतील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे. धारावी, बीडीडीचाळ यांच्या पुनर्विकासामुळे या भागातील नागरिकांच्या हक्काच्या  घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या माध्यमातून ही विकास करण्यात येत आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून  मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील असेही यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या की, आजची लॉटरी प्रणाली ही पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहित आहे. ही लॉटरी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे झालेली आहे. म्हाडा म्हणजे विश्वास. म्हाडाचे घर मिळण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला यावरूनच लोकांचा म्हाडावर किती विश्वास आहे हे लक्षात येते. एक स्थिर आणि सुरक्षित घर सर्वांचं स्वप्न आहे. या लॉटरी प्रक्रियेने ते स्वप्न पूर्ण होत आहे.

प्रास्ताविकात श्री. जयस्वाल म्हणाले, २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत करण्यात आली आहे. यासाठी अनामत रकमेसह १ लाख १३ हजार ८११ अर्ज पात्र होते. गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये दुसऱ्यांदा लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. लोकांच्या मागणीनुसार सदनिकांचे दरही कमी करण्यात आले आहेत.

सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले होते. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. या प्रकल्पात मुंबईतील गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवारनगर, पवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण दोन हजार ३० घरांसाठी ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान अर्ज विक्रीची  प्रक्रिया राबविण्यात आली  होती.

जयश्री कोटकर आणि कृपाल पटेल या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन पत्र यावेळी देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार मिलिंद बोरीकर यांनी यावेळी मानले.

****

शैलजा पाटील/विसंअ/

बारामती शहराच्या प्रगतीत उद्योग जगताचे महत्त्वाचे योगदान- उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ८:  बारामतीच्या शहराला उद्योग-व्यवसायाचा समृद्ध वारसा असून शहराच्या औद्योगिक विकासात, पर्यायाने परिसराच्या प्रगतीत उद्योजकांनी मोठा हातभार लावलेला आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढले. उद्योगाशी निगडित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासोबतच त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

बारामती औद्योगिक विकास संघटनेच्यावतीने आयोजित उद्योजक मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बारामती औद्योगिक विकास संघटनेचे (बीडा) अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खनिजदार अबीरशाह शेख, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, संघटनेचे पदाधिकारी उद्योजक आदी उपस्थित होते

श्री. पवार म्हणाले, बारामती औद्योगिक विकास महामंडळ परिसरात विविध उद्योजकांनी यशस्वीपणे वाटचाल केली आहे. येथे सुमारे ६५० कंपन्या असून त्यामध्ये सुमारे ५० हजार कामगार काम करीत आहेत. या कामगारांच्या कुटुंबियांची उपजीविका एमआयडीसीच्या माध्यमातून होते.

राज्याच्या विकासात औद्योगिक क्षेत्राची महत्वाची भूमिका

देशासह राज्याच्या विकासात औद्योगिक क्षेत्र महत्वाची भूमिका बजावत असते. औद्योगिक क्षेत्रालगतची शहरे तसेच परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याकरीता उद्योगांचे महत्त्वाचे योगदान असते. मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या लघुउद्योग व रोजगार निर्मितीसह बाजारपेठेला चालना मिळते. विकासाच्या प्रक्रियेत उद्योजकांचे योगदान महत्वपूर्ण असून याचा परिणाम अर्थकारणावर होत असतो, असेही ते म्हणाले.

रोजगार वाढीसाठी प्रयत्नशील

आगामी काळात एमआयडीसीत ५० एकर जागेत २ हजार कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प येणार आहे. त्यातून परिसरातील दीड हजार मुलांना रोजगार उपलब्ध होईल. मंत्रालय स्तरावरील यंत्रणेला त्याबाबत सूचना दिल्या असून तात्काळ सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली आहेत.

उद्योग जगताला सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

बारामती परिसरात उद्योगाला पोषक वातावरण असून वीज, पाणी, गॅस विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच उद्योजक आणि कामगार यांच्यात जिव्हाळा, सलोख्याचा संबंध राहण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योगाशी निगडित प्रश्न सोडवण्यासाठी बारामती येथे प्रादेशिक कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या विश्रामगृहाचे नूतनीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. बारामती विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरविण्यादृष्टीने कामे हाती घेण्यात आली आहेत. औद्योगिक आणि कृषी उत्पादनाची निर्यात करण्यासाठी ‘ड्राय पोर्ट’ बाबत प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यापुढेही राज्य शासनाच्यावतीने येथील उद्योग वाढीस सहकार्य करण्यात येईल.

सुरक्षितेच्या दृष्टीने उद्योजकांनी पोलीसांना सहकार्य करावे

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक कंपनीच्या दर्शनी भागात शक्ती अभियानानंतर्गत  ‘शक्ती पेटी’ लावावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक कंपनीत विशाखा समिती स्थापन करावी. परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची पेट्रोलिंग व गस्त वाढविण्यात येणार असून याकरीता वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनमालकावर कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

सुरक्षेसाठी कंपनीच्या आवारात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. भंगार खरेदीदाराची सूची तयार करावी. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कामगारांची माहिती तसेच खंडणीची मागणी झाल्यास अशा प्रकरणांची माहिती कंपनीने पोलीस ठाण्याला द्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन काम करीत असून एमआयडीसीच्या सुरक्षितेच्यादृष्टीने घेतलेल्या निर्णया संदर्भात उद्योजकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

यावेळी श्री. जामदार यांनी आपले विचार व्यक्त केले.

0000

 

 

सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय शिक्षण, आरोग्यसेवा देण्यासाठी  १२ रूग्णालये मंजूर करुन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आनंद – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.07 (जिमाका) : समाजातील सर्व घटकांतील वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचण्यासाठी १२ वेगवेगळ्या रूग्णालयांची मंजूरी घेवून त्यांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण केल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्याहस्ते उत्तुर, आजरा येथील शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन उत्तूर/बहिरेवाडी, ता. आजरा जि. कोल्हापूर येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. 187 कोटी रुपयांच्या निधीमधून पदवी महाविद्यालय आणि रुग्णालय उभे राहणार आहे. तसेच बहिरेवाडी येथे महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाल्याचे त्यांनी कार्यक्रमात सांगितले. या कार्यक्रमाला आयुष संचालनालयाचे संचालक डॉ.रामन घुंगराळेकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान, विद्यापीठ नाशिकचे प्र.कुलगुरू मिलिंद निकुंभ, शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तुरचे प्रशासकीय अधिकारी न.रा. पाटील, अधिष्ठाता डॉ.भाग्यश्री महावीर खोत, डॉ.वीणा पाटील, डॉ.आदर्श देसाई यांच्यासह उत्तुर व बहिरेवाडीचे सरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, उत्तुर येथे १५ एकर जागेत निसर्गरम्य ठिकाणी एक चांगले महाविद्यालय सुरू होत आहे. याचा फायदा स्थानिकांना वैद्यकीय क्षेत्रात होणार आहे. तसेच याच महाविद्यालयाच्या शेजारी १०० प्रशिक्षणार्थी क्षमतेचे राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण रुपये २५२.०३५ कोटी इतक्या खर्चास मान्यता मिळाली आहे. शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तुर अंतर्गत येणारे कॉलेज बहिरेवाडी येथील जे.पी.नाईक स्मारकाच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले असून या ठिकाणी पहिली तुकडी याचवर्षीपासून सुरू होत आहे. या इमारतीला १.५४ लक्ष रूपये दर महिना भाडेही शासनाकडून दिले जाणार आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हयात शेंडा पार्क, सांगाव, आणि ऊत्तुर येथील वेगवेगळ्या महाविद्यालय आणि रूग्णालयांच्या मंजूरी व सुविधांबाबतची माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी उपस्थित संचालक आणि प्र. कुलगुरूंचे आभारही मानून मान्यता व प्रक्रिया जलदरीतीने राबविल्याबद्दल सत्कारही केला. संचालक डॉ.रामन यांनी आपल्या मनोगतामध्ये देशात योग व निसर्गोपचार केंद्र मागील ७० वर्षात ६ सुरू झाल्याचे सांगून मंत्री हसन मुश्रीफ यांनी केवळ दीड वर्षात ५ नव्याने सुरू करण्यास मान्यता दिली असल्याचे सांगितले. अगदी अल्प काळात मेडीकल हब तयार करण्याचे श्रेय केवळ त्यांनाच जाते असे गौरवोद्गार त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याबद्दल काढले. प्र.कुलगुरू निकुंभ यांनी योग आणि निसर्गोपचार काय आहे याबद्दल उपस्थितांना सांगितले. पदवी अभ्यासक्रम ४ वर्षांचा असून इंटर्नशिप एक वर्षाची असेल. पहिल्या वर्षी ६० विद्यार्थी असतील अशारीतीने पुढिल चार वर्षात २४० विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर पुर्ण क्षमतेने कॉलेज सुरू राहील. या महाविद्यालयामुळे स्थानिकांना चांगल्या आरोग्यसेवाही मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता भाग्यश्री महावीर खोत यांनी केले. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जाहीर सन्मान व सत्कार केला.

0000

नवीन सिटीस्कॅन मशीनमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. ७ (जि. मा. का.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटीस्कॅन मशीनमुळे सर्व दारिद्र्य रेषेखालील रुग्ण तसेच विविध योजनांमधील रुग्णांची मोफत व इतर रुग्णांची फक्त 350 रुपये मध्ये सिटीस्कॅन चाचणी होणार आहे. त्यामुळे रुग्णांना कमी दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळेल, असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केला.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटीस्कॅन मशीन व विभागाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. खाडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ,  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे सिटीस्कॅन मशीन अत्यंत अत्याधुनिक 128 स्लाईस क्षमतेचे असून दिवसाला 80 ते 100 सिटीस्कॅन करू शकते. सिटीस्कॅन दोन ते पाच मिनिटांमध्ये होऊ शकतो. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सगळ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

खासदार विशाल पाटील यांनी मनोगतात सिटी स्कॅन मशीनमुळे रुग्णांचा फायदा होणार असल्याचे सांगून चांगल्या आरोग्य सेवेबद्दल प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

पाचशे खाटांचे रुग्णालय लवकरात लवकर बांधून व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहे व नवीन बाह्यरुग्ण विभाग इमारत बांधण्यासाठी प्रयत्न केल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सिटीस्कॅन मशीन लवकरात लवकर रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. या कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उपाधिष्ठाता डॉ. अहंकारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे, डॉ. विकास देवकारे, डॉ. मनोहर कचरे, प्रशासकीय अधिकारी श्री. भोरे व इतर सर्व विभागाचे विभाग प्रमुख परिचारिका वर्ग तसेच रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान मोलाचे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 7 ऑक्टोबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज परिवर्तनासाठी साहित्य हे माध्यम निवडले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज येवला शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक भूमिपूजन समारंभ प्रसंगी मंत्री श्री. भुजबळ बोलत होते.
यावेळी तहसिलदार आबा महाजन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.


मंत्री श्री.भुजबळ यावेळी म्हणाले, स्थानिक विकास निधीमधून हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक विकसित करण्यात येत असून उत्तम दर्जाचे काम होणार आहे. यासाठीच्या अनुषंगिक कामांसाठी अधिकच्या निधीची उपलब्धता केली जाणार असल्याचे मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले. अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्याविरोधात लढण्यासाठी उद्युक्त करणे हेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे उद्दिष्ट होते. त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात परिवर्तन घडून आले. अण्णाभाऊंनी विविध साहित्यप्रकार हाताळले. यात ३५ कादंबऱ्या, आठ पटकथा, १५ स्फुट कथा, एक प्रवासवर्णन, तीन नाटके, १२ उपहासात्मक लेख, १४ लोकनाट्ये, १० पोवाडे एवढी मोठी साहित्यसंपदा त्यांनी आपल्या लेखणीतून निर्माण केली. त्यांच्या प्रत्येक कादंबरीचा, कथेचा, नाटकाचा, लोकनाट्याचा नायक  हा समाजातील  बंडखोर व्यक्ती होता. अण्णाभाऊंनी जीवनासाठी कला या अनुषंगाने आपली साहित्यसंपदा निर्माण केली. तसेच समाजातील वंचित, दीन दलित, कष्टकरी, स्त्रिया, भटके यांच्या व्यथा-वेदना साहित्यातून मांडल्या.

अण्णाभाऊंचा जन्म ज्या सातारा-सांगली-वाटेगाव परिसरात झाला. त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. वाटेगाव ते रशियातील मॉस्कोपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या संघर्षाचा पुरावाच आहे. एखाद्या विचारप्रणालीचा स्वीकार हा बहुधा त्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतो. अण्णाभाऊंना भाकरीचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने येणाऱ्या कामाचे महत्त्व सांगणाऱ्या मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा परिचय त्यांना झाला आणि त्यातूनच ते मार्क्सवादाकडे वळले. ‘अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांचे साहित्य’, असे सार्थ वर्णन  प्र. के. अत्रे यांनी  केले आहे. लोकनाट्याद्वारे त्यांनी कामगारांच्या श्रमाचा पुरस्कार करणारे आणि जमीनदारांच्या शोषणाचा धिक्कार करणारे तत्त्वज्ञान मांडले  आहे.

अण्णाभाऊंच्या साहित्यात कधीही जातीय संघर्ष दिसून येत नाही. प्रखर बुद्धिवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, समाजवादी विचार यांच्या वौचारिक साधनेवर अण्णा भाऊंचा वाङ्मयीन दृष्टिकोन उभा आहे. त्यांच्या साहित्याचे एकूण प्रयोजन सामान्यातल्या सामान्य माणसाला क्रांतीप्रवण करणे व या देशातील जात-वर्गाला मूठमाती देणे होय. सामाजिक वास्तवाची प्रखर जाणीव असलेल्या या क्रांतिकारी साहित्यिकाला विनम्र अभिवादन करीत मंत्री श्री.भुजबळ यांनी  उपस्थितांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा विचार पुढे नेण्याचे आवाहन केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन हा येवला शहरातील महत्वाचा सोहळा असून सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची भूमिका व‍ लिखित साहित्याचा विचार हा सामाजातील तळागाळापर्यंत पोहचला आहे. वाटेगाव सारख्या छोट्या गावात अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला कमी शिक्षणातून त्यांनी प्रचंड साहित्यसृष्टी निर्माण केली. आज अनेक विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएच.डी करीत आहेत. त्यांच्या विचाराचे आपण सर्व वारस असल्याचे सचिन साठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातील मंत्री छगन भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण व शिल्पपूजन करण्यात आले. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज जिल्हा वार्षिक योजना पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत रोकडोबा हनुमान मंदिर येथे १.५० कोटी निधीतून विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.

००००

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि. 7 : इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम शेतीतून जादा उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

नियोजन भवन येथे छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील उत्कृष्ट रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा रेशीमरत्न पुरस्कार 2023 चे वितरण करण्यात आले. यावेळी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील, खासदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कापसापासून ते तयार कपड्यापर्यंत साखळी निर्माण करण्यात येत आहे. बाजारपेठेतील विविध फॅशन्सप्रमाणे रेशीम वस्त्रांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. कापसा पेक्षा जास्त उत्पन्न रेशीममधून मिळत आहे. रेशीमला असलेली मागणी आपण अद्यापही पूर्ण करू शकलो नसल्यामुळे शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळविणे आवश्यक आहे. रेशीम शेती वाढल्यास प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रेशीम खरेदीची व्यवस्था करण्यात येईल. याच धर्तीवर सोलापूर येथे केंद्र निर्माण करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, पाणी, खते, मार्गदर्शन आणि उत्पादीत मालाला भाव मिळाल्यास शेतकरी स्वयंपूर्ण होईल. त्याला शासनाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही. शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अल्पभूधारक शेतकरीही रेशीम शेती करू शकतो. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

000000

 

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते तंत्रनिकेतनमधील उत्कृष्टता, संगणक केंद्राचे उद्घाटन

अमरावती, दि. 7 : शासकीय तंत्र निकेतनमधील उत्कृष्टता केंद्र आणि अद्ययावत संगणक केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी प्रविण पोटे पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय मानकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी, देशात नवीन शैक्षणिक पद्धत लागू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने कौशल्यपूर्ण युवक तयार करण्यात येणार आहे. यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी भर देण्यात येत आहे. जुन्या शैक्षणिक धोरणात उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य देण्यात येत नसल्यामुळे वेगळे प्रशिक्षण द्यावे लागत होते. आता सुरवातीपासूनच रोजगारक्षम युवक तयार करण्यासाठी शिक्षण देण्यात येणार आहे.

तसेच युवकांना संगणकातील अत्याधुनिक शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स आणि थ्री डी प्रिंटींग उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. तंत्रनिकेतनमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी संस्थांमध्ये संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच संशोधन केंद्रासाठी केंद्राने 272 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

अमरावती येथील तंत्रनिकेतनला अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला आहे. तातडीने अतिक्रमण काढून संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

000000

महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना तयार करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि. 7 : घराच्या जबाबदारीने असंख्य महिला पूर्णवेळ काम करण्यास पुढे येत नाहीत. या महिलांच्या श्रमशक्तीने उद्योगांना मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे घर सांभाळून आणि शिक्षण घेत असलेल्या मुली-महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना आखण्यात येत आहे. लवकरच यास मुर्त रूप येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आज सायन्स स्कोर मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधी इतर योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, प्रविण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, निवेदिता चौधरी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्याला राजमाता मॉ जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या‍ विचारांचा वारसा लाभला आहे. या महिलांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. महिलांचा विकास हा शासनाचा अग्रकम आहे. त्यासाठी शासन महिलांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांची माहिती महिलांना माहिती व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. याठिकाणी भेट देऊन योजनांची माहिती घ्यावी.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना बळ देणारी आहे. महिलांचे अर्ज पात्र झाल्यापासून त्यांना लाभ देण्यात येत आहे. ही योजना निरंतर सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात सहा लाखाहून अधिक लाभार्थी असलेली ही योजना आहे. थेट बॅंक खात्यात ही रक्कम देण्यात येत असल्यामुळे कमी वेळात ही योजना यशस्वी झाली आहे. यासोबत मुलींना मोफत शिक्षण, अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलिंडर, पिंक रिक्षा, बचतगटांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी वाहन, तीर्थक्षेत्र आदी असंख्य योजना महिला सशक्तीकरण करण्यासाठी राबविण्यात येत आहेत.

अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहिण योजना यशस्वी केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्यांचे मानधन वाढविण्यात आले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ताही लवकरच दिला जाईल. ग्रामपातळीवर लहान मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांनी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात लाडक्या बहिणी, उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या अंगणवाडी सेविका, नवतेजस्विनी उद्योजिका, महिला बाल विकास विभागातील अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला बचतगटांना कर्ज वितरण धनादेश वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. डॉ. कैलास घोडके यांनी आभार मानले.

00000

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील २४ गावांना पाणी देण्याचे आश्वासन पूर्ण केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर, दि. 7:-  जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील 24 गावांचा पाण्याचा प्रश्न खूप बिकट बनलेला होता. या 24 गावात दुष्काळी परिस्थिती होती. आपण यापूर्वी या 24 गावांना पाणी देण्याचा शब्द दिलेला होता, तो आज पूर्ण होत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले.

आंधळगाव तालुका मंगळवेढा येथे आयोजित महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत मंगळवेढा उपसा सिंचन योजना अंतर्गत पंपगृह टप्पा क्रमांक एक, उर्ध्वगामी नलिका क्रमांक एक, शेलेवाडी मुख्य गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता डॉक्टर एच टी धुमाळ, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील 24 गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या गावातील दुष्काळी परिस्थिती संपण्याबरोबरच 17 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन केलेले आहे. शासनाने जलसंपदा विभागाच्या विविध योजना राबवून सोलापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती संपवली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तसेच शेतकऱ्यांना दिवसा 12 तास सातत्यपूर्ण वीजपुरवठा केला जात आहे विज बिल माफ करणारी व दिवसा सिटी पंपांना वीज पुरवठा करणारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही देशातील पहिली कंपनी आहे. सौर कृषी पंप अंतर्गत मागेल त्या शेतकऱ्यांना कृषी पंप दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शासन उभे असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्य शासन लेक लाडकी योजना, एसटी बस मध्ये महिलांना सवलत, मुलींना उच्च शिक्षण मोफत, लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिला लाभार्थ्याला दरमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय असे अनेक लोक कल्याणकारी निर्णय शासन घेत असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी देऊन आज जवळपास 32 कामांचे भूमिपूजन होत असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या प्रस्ताविकात एमआयडीसी रस्ते उपसा सिंचन योजना अधिक कामाचे भूमिपूजन होत असल्याने हा एक आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले. यातून 24 गावाचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विज बिल माफ योजनेअंतर्गत 48 हजार शेतकऱ्यांना 36 कोटी रुपयांची सवलत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास मतदारसंघातील हजारो नागरिक उपस्थित होते.

अमरावती आयटीआयचे नामकरण पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण

अमरावती, दि. 7 : अमरावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे, नामकरण करण्यात आले आहे. यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन आणि दीक्षान्त समारंभ घेण्यात आला.

दीक्षान्त समारंभाच्या कार्यक्रमात आदित्य राठोड, संकल्प इंगळे, सूरज तायडे, प्रथमेश केवले, सुमिरन कराळे या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी, उद्योगात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी अद्ययावत ज्ञानाने परिपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन उद्योगांना गरज असलेले मनुष्यबळ तयार करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करीत आहे. त्यानुसार प्रशिक्षित मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. आयटीआयमध्ये येणारा तरुण हा प्रामुख्याने गरजू असतो. त्याच्या ज्ञानासोबत त्याची आर्थिक सुबत्ता मिळावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढत आहे.

भारत आज तरुणांचा देश आहे. आज इतर देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असताना आपल्या देशाने मनुष्यबळ पुरवठा करणारा देश म्हणून पाहिले जात आहे. आज जर्मनी देशात मनुष्यबळाची आवश्यकता असून तेथे मनुष्यबळ पुरविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. युवकांना जर्मन भाषा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे. भारत हा कौशल्य विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे युवकांनी रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. पल्लवी वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. संजय बोरकर यांनी आभार मानले.

यावेळी प्रविण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सहसंचालक प्रदीप घुले, सहायक संचालक रवींद्र लोखंडे, उपसंचालक संजय बोरकर, चेतन पवार आदी उपस्थित होते.

000000

ताज्या बातम्या

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती नागपूर , दि. ८ -  नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी

0
सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :- सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर, दि. 8 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

0
मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र...

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ८ :  जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने  ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर...