रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 453

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते तानंग येथे विकास कामांचे भूमिपूजन  

सांगली, दि. ६ (जि.मा.का.) : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते तानंग येथे विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून तानंगच्या जमदाडे वस्ती येथील बौद्ध विहार समोरील सभा मंडपाचे बांधकाम करण्याच्या कामाचा समावेश आहे. या कामाची अंदाजित किंमत रक्कम रुपये १५ लाख आहे.

यावेळी सरपंच सुनील पोतदार, अंकुश राजमाने, रावसाहेब चौगुले, बाबासाहेब चौगुले, अवधुत माळी, संजय ईरळे, बबन पाटील, संजय राजमाने व ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच यावेळी पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून तानंग ग्रामपंचायतीसमोर (गणेश मंदिर) सभामंडप बांधकामाचेही भूमिपूजन करण्यात आले. या कामाची अंदाजे किंमत रक्कम रुपये १२ लाख १४ हजार आहे. याबरोबरच ग्रामपंचायतीसमोर (विठ्ठल मंदिर) सभामंडप बांधकामाचेही भूमिपूजन करण्यात आले. या कामाची अंदाजे किंमत रक्कम रुपये १५ लाख आहे.

०००००

जिल्ह्यातील खेळाडूंच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ६ : महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’असे केले जाते. त्यातच ही वाघांची भूमी आहे. वाघ हे पराक्रमाचे प्रतिक आहे. त्यामुळे येथील खेळाडू हा वाघासारखाच पराक्रम गाजविणारा असावा. यासाठी आपण जिल्ह्यात खेळाडूंसाठी अनेक दालने उभी करण्याचा निर्धार केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्तरावर आणि पुढे ऑलम्पिकमध्ये उंच भरारी घ्यावी, यासाठी आपण कायम प्रयत्नशील आहोत. खेळाडूंच्या प्रगतीसाठी आपण सदैव तत्पर राहू, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हा बॅडमिंटन विकास असोसिएशनच्या वतीने स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरीयल महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन निवड स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन करतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा बॅडमिंटन विकास असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मंगेश काशीकर, उपाध्यक्ष राज पुरोहित, जगदीश जोशी, प्रदीप गवारा, मोहन शहा, रणजीत माथु, नागोजी चिंतलवार, अनिरुद्ध जोशी आदी उपस्थित होते.

अतिशय उत्तम वातावरणात या बॅडमिंटन स्पर्धा होईल, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पंचाचा निकाल प्रतिकूल वाटला तरी प्रत्येक खेळाडूंनी डोकं शांत ठेवून निर्णय स्वीकारावा. चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन विकास असोसिएशनने अतिशय कमी वेळात राज्यस्तरीय स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या संघटनांमागे शासन आणि प्रशासन नेहमीच पाठीशी राहील. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे क्रीडा विभागाचा प्रस्ताव गेल्यास ते लगेच मान्य करतात. आपला शब्द खाली पडू देत नाही. त्यामुळे क्रीडा विभागाच्या सर्व सोयीसुविधा जिल्ह्यात उपलब्ध होतात, याचा फायदा येथील विविध क्रीडा संघटनांनी घ्यावा असे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूर जिल्हा हा गोंड राजा, राणी दुर्गावती, राणी हिराई यांच्या वीरतेचे आणि शुरतेचे प्रतीक आहे. त्यामुळे मैदानातही खेळाडूंनी पराक्रम दाखवावा, आंतरराष्ट्रीय स्तराच्या या वातानुकूलीत बॅडमिंटन सभागृहाला आणि स्टेडियमला सोलरवर करण्यात येईल. आपल्या जिल्ह्यात क्षमतेची आणि पराक्रमाची कुठेही कमतरता नाही. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र असल्यामुळे एक नवी उर्जा आपल्याला प्राप्त होते. आपण नेहमी मतांपेक्षा सर्वांगीण विकासालाच चालना दिली आहे. जिल्ह्यातील बॅडमिंटन कोर्ट, स्टेडियम अत्याधुनिक करण्यात आले आहेत. चंद्रपूरच्या सैनिक शाळेत नुकतीच देशभरातील सैनिक शाळांची ‘स्पोर्ट मीट’ पार पडली. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू माधवी काशीकर हेडाऊ यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यात उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा : जिल्हाधिकारी विनय गौडा

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, चंद्रपूर शहरातील वातानुकूलित नवीन बॅडमिंटन हॉलमध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भक्कम पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. चंद्रपुरातून सुद्धा उत्कृष्ट खेळाडू तयार झाले पाहिजे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपुरचे खेळाडू नक्कीच पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक म्हणाले, गत १० वर्षात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यात अनेक विकासाची कामे झाली असून ताडोबा हे जगाच्या नकाशावर आले आहे. स्पर्धेकरीता येथे आलेल्या सर्व खेळाडूंना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोफत सफारी करण्याचा निर्णय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषित केला. चंद्रपुरात अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. म्हाडाच्या जागेवर चंद्रपुरात उभारण्यात येणाऱ्या नवीन इनडोअर स्टेडियममध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे दहा वातानुकूलित बॅडमिंटन कोर्ट तयार होत आहे. स्वर्गीय डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन निवड स्पर्धेकरिता राज्यभरातील 520 खेळाडू आले असल्याचे गिरीश चांडक यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन निशा मेहता यांनी तर आभार जोवेल चांदेकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धेकरीता आलेले खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, पालक तसेच क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

000000000

मुल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह सर्वसामान्यांच्या सेवेचा संकल्प –  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि.६ : जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. लोकांच्या आरोग्यासाठी सहकार्याचा हात पुढे करत दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकलीचे वाटप, बालकांच्या हृदयाची शस्त्रक्रिया, 50 हजारपेक्षा जास्त लोकांचे नेत्र चिकित्सा शिबिर, 35 हजारपेक्षा जास्त लोकांना चष्मेवाटप तर पाच हजारपेक्षा जास्त लोकांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मुल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह सर्वसामान्यांची सेवा करण्याचा संकल्प केला असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मारोडा येथे माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर यांच्या माध्यमातून व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून भव्य नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच (मारोडा) भिकाजी शेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, चंदु मारगोनवार, प्रेमदास गेडाम, जयश्री वेलकेवार, नंदु रणदिवे, प्रियंका नरमलवार तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

मतदारसंघाचा विकास साधतांना येथील नागरीकांना अपेक्षित असलेली विकासकामे मार्गी लावली आहेत, असे सांगून पालकमंत्री  श्री. मुनगंटीवार म्हणाले,  मुल ते मारोडा रस्ता, कृषी महाविद्यालय, सिमेंट काँक्रिट रोड, मारोडा रेल्वे थांबा आदि विविध कामे पुर्णत्वास आली असून या ठिकाणचे प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.  मारोडा गाव विकसीत व्हावे यासाठी येथे कृषी महाविद्यालयाची उभारणी करण्यात येत आहे. प्रत्येक गावाच्या विकास कामांसाठी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. मारोडा येथील तलावाचे सौंदर्यीकरण, वाचनालय, महादेव मंदिराचा जीर्णोद्धार आदी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून मारोडा प्रवेशद्वार उभारण्याची येथील गावकऱ्यांची मागणी होती, हि मागणी लक्षात घेवून प्रवेशद्वार (गेट) उभारणीसाठी वनविभागाच्या ताडोबा फाऊंडेशनच्या माध्यमातून 25 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, नेत्रचिकित्सा शिबिराच्या माध्यमातून जेष्ठांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र (पी.एच.सी) उत्तम करण्यात आल्या असून राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करुन मतदार संघातील पाच उपकेंद्रांना विशेष बाब म्हणून मान्यता मिळवून दिली. तसेच मुल येथील ग्रामीण रुग्णालय अत्याधुनिक करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. भोई समाजासाठी मच्छीमार कल्याणकारी  महामंडळाच्या स्थापनेस मंत्रीमंडळाने नुकतीच मान्यता दिली. शबरी आवास, रमाई आवास, प्रधानमंत्री आवास व इतर आवास योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान 1.30 लाखावरुन रु. 2.50 लाख केले. निराधार योजनेच्या अनुदानात 600 रुपयावरुन 1500 रुपये वाढ दिली. रस्ते हि ग्रामीण विकासाची रक्तवाहिनी आहे. ग्रामीण भागातील पाणंद रस्ते तसेच शहरातील मुख्य रस्ते उत्तम केले. राज्यपाल महोदयांनी पोंभुर्णा क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचे कौतूक केले असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी आवर्जुन सांगितले.

सर्व जाती, धर्माच्या विकासासाठी कार्य केले असून 50 वर्षात न झालेली विकासकामे येत्या 10 वर्षात पुर्णत्वास नेली असून मारोडा वासियांनी विकासाची गंगा थांबू देवू नये असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

0000000

सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रामाणिक सेवा देणे महत्त्वाचे – पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर,दि.६(जिमाका):- प्रशासकीय सेवेमध्ये मिळालेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी करावा. प्रशासनात सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रामानिक सेवा देणे महत्त्वाचे असते,असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक, औकाफ व पणन  मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहांमध्ये निवृत्त सचिव तथा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या कार्यावर आधारीत व गौतम कोतवाल लिखित ‘जनमानसातील जिल्हाधिकारी’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि.५) पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे ,जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपायुक्त जगदीश मिनीयार, डॉ.अनंत गव्हाणे, सुरेश बेदमुथा, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, एकनाथ बंगाळे,  उद्योजक मुकुंद कुलकर्णी, हेमंत लांडगे, प्रसाद कोकीळ, घाटी रुग्णालयाच्या तत्कालीन अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे, माजी जिल्हाधिकारी तथा निवृत्त सचिव सुनील चव्हाण यांच्या पत्नी कांचन चव्हाण व  परिवार तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

पालकमंत्री सत्तार म्हणाले की, सुनील चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी  केलेले विविध क्षेत्रातील काम व योगदान हे उल्लेखनीय आहे. याची दखल शासन स्तरावर होणे आवश्यक आहे. लेबर कॉलनी येथील अतिक्रमण काढणे हे काम विशेष. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी केलेली मदत. केशर आंबा निर्यात व बाजारपेठ उपलब्धतेसाठी केलेले प्रयत्न, क्रीडा विकासासाठी संथेटीक ट्रॅक,कृषी अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये जिल्ह्याला देशांमध्ये प्रथम क्रमांक, ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन, अग्नीवीर सैन्य भरती यासह विविध क्षेत्रातील काम हे  जिल्हा प्रशासनाचे एक जबाबदार अधिकारी म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली, असे गौरवोद्गार श्री. सत्तार यांनी काढले. कोविड कालावधीमध्ये सुयोग्य नियोजनामुळे जिल्हा प्रशासनाचे काम उल्लेखनीय ठरले.

आपले मनोगत व्यक्त करतांना सुनील चव्हाण म्हणाले की, जिल्हाधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करताना सर्व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी एक टीम म्हणून काम केले.  समन्वय आणि सहकार्याच्या जोरावर विधायक आणि सकारात्मक गोष्टी करू शकतो, त्याचा अनुभव मी इथे घेतला. मराठवाड्याविषयी विशेष आपुलकी असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारीपदाचा कार्यकाळ माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तक स्वरूपातून केलेल्या कामाच्या नोंद या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, वाचनातून माणूस समृद्ध होत जातो, तर वाचनासाठी पुस्तक खूप महत्त्वाची असल्याचे यावेळी त्यांनी विशेष नमूद केले.

सुनील चव्हाण यांचे सहकारी तथा प्रशासनातील विविध अधिकारी यात.विजय घोगरे डॉ. अनंत गव्हाणे  उद्योजक,मुकुंद कुलकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सय्यदा फिरासत. विविध क्षेत्रातील त्यांचे सहकारी यांनी यांच्या विषयी आठवणींना उजाळा दिला.

०००००

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.०६, (विमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला.

छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट,  खा. डॉ. भागवत कराड,  आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे,  आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, उर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा,  पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेचे प्रधानमंत्री यांच्याकडून कौतुक

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. गरिबीची जाणीव असल्याने या सरकारने गोरगरीब महिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून काही महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले असून त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे कार्य हे देशासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्य शासनाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पुरेशी तरतूद केली असून ही योजना बंद होणार नाही, उलट भविष्यात लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कृषिपंपांसाठी शून्य वीज बिलामुळे शेतकऱ्यांना लाभ

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जवळपास ४५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून त्यांचे वीज बिल शून्य झाले आहे. युवकांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. यामधून प्रशिक्षण काळात त्यांना सहा हजार ते दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जात आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून यामधून उभा राहणाऱ्या उद्योगांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल. रोजगार निर्मिती होईल. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वयोवृद्ध नागरिकांना विविध उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयेपर्यंत सहाय्य करण्यात येणार आहे.

शासनाच्या योजनांमुळे सर्वसामान्यांना आधार

प्रधानमंत्री मोदीजींनी ठाणे आणि मुंबईतल्या ३३ हजार कोटींपेक्षा जास्तीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली आहे.  शेंद्राच्या ऑरिक सिटीचं नाव तर जगभर गाजायला सुरुवात झाली आहे. टोयाटो किर्लोस्करचा २० हजार कोटींचा प्रकल्प तिथे होत आहे. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलीसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशा अनेक योजना सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या ठरल्या असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपयुक्त- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाला विकासाकडे नेण्यासाठी महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणणे आवश्यक आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात. त्यानुसार महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपयुक्त ठरत आहे. केंद्र शासनाने महिलांसाठी बेटी बचाओ, बेटी पढाओपासून ते लखपती दीदी सारख्या विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनामार्फत लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेतून मुलीच्या जन्मानंतर तिच्या बँक खात्यावर टप्प्या-टप्प्याने एक लाख रुपये जमा केले जात आहेत. महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. ही योजना बंद होणार असलाचा अपप्रचार काही लोकांकडून केला जात आहे, मात्र यापुढेही ही योजना अशीच सुरु राहील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी दिला.

दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्यास मंजूरी

मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्याच्या कामाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुढील काही वर्षात हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर होईल. साडेसात एचपी पर्यंतच्या कृषीपंपाला मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना शून्य रक्कमेची वीज बिले वाटप सुरु झाले आहे. या योजनेची रक्कम शासनाने महावितरणला जमा केली आहे. आता पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र हे शेतकऱ्यांची वीज कंपनी स्थापन करणारे पहिले राज्य बनले आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अंतर्गत कालच ५ सौर कृषी वाहिन्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मागेल त्या शेतकऱ्याला सौर कृषीपंप देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये सौर कृषीपंपाची ९० टक्के रक्कम राज्य शासन भरणार असून १० टक्क्के रक्कम शेतकऱ्याला भरावी लागेल. राज्यात आतापर्यंत ६० हजार सौर कृषिपंप लावण्यात आले असून यापैकी सर्वाधिक लाभार्थी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत, असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशा निधीची तरतूद- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशा निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे. आपल्याला अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव असल्याने सर्व बाबींचा विचार करूनच ही योजना जाहीर केली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही. या योजनेच्या सुरुवातीला रक्षाबंधनापूर्वीच बहिणींच्या खात्यावर ओवाळणीची रक्कम जमा करण्यात आली होती. आता दिवाळीपूर्वीच म्हणजेच याच आठवड्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या रक्कमेची ओवाळणी बहिणींच्या खात्यावर जमा होईल, असे श्री.पवार म्हणाले.

राज्य सरकाने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य केले असल्याचेही सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना चालू वीज देयकाच्या पावत्यांचं वितरण आणि ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’ अंतर्गत आस्थापित कृषी पंपांचे लोकार्पण करण्यात येत आहे. या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेनं राज्य शासनाने ठोस पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत विज योजनेतून, राज्यातल्या ४४ लाख शेतकऱ्यांच्या साडेसात एचपी पर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज मिळणार आहे. या योजनेसाठी आपण  १४ हजार ७६१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही महत्त्वाची योजना आपल्या सरकारने सुरू केली आहे. त्यातून शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना देखील राबवण्यात येत असल्याचेही श्री पवार यांनी सांगितले.

राज्यात एकही घटक लाभापासून वंचित राहणार नाही – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पाच महिन्यांचा लाभ वितरीत करण्यात यश आले आहे. २ कोटी २२ लाख महिलांपर्यंत हा लाभ पोचला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा लाभही लवकरच जमा होईल. महिलांसाठी पिंक रिक्षा योजना आणली असून राज्यात १० हजार रिक्षा देण्यात येत आहेत. महानगर क्षेत्रात ५०० ते १ हजार रिक्षा देण्यात येत आहेत. पुढे हेच उदिष्ट २  हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे. राज्यात एकही घटक लाभापासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी  केले. विविध योजनांचे लोकार्पण मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. यामध्ये मोफत वीज बील योजना, मागेल त्याला सौर कृषि पंप योजना, पिंक ई रिक्षाचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर विभागातील चांगल्या कार्याबद्दल विभागीय आयुक्त् दिलीप गावडे यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस विभाग यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

000

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.6, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात दिले.

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभ  समृद्धी लॉन्स, हर्सूल सावंगी रोड येथे आयोजित करण्यात आला होता. पोलीस पाटीलांचे मानधन शासनाने 15 हजार रुपये केले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार पोलीस पाटील संघटनेने व्यक्त केले. या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार,शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष  महादेव नागरगोजे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने मेळाव्यास सुरुवात झाली. प्रास्ताविक महादेव नागरगोजे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा पोलीस पाटील यांनी सत्कार केला.

सत्काराला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीस पाटील हे प्रशासनाचे नाक कान आणि डोळे आहेत. आपल्याला 24 बाय 7 काम करावे लागते. सरकारही असेच 24 बाय 7 काम करणारे आहे.  आपले हे प्रामाणिक काम असल्यानेच शासनाने आपले मानधन साडेसहा हजार रुपयांवरुन 15 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. सढळ हस्ते न्याय दिला आहे.

मराठवाड्याच्या विकासासाठी तसेच समाजातील विविध घटकांसाठी शासनाने राबविलेल्या योजनांचा उल्लेख करुन मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कुटुंबातील प्रत्येक घटकाला शासन लाभ देत आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिक सबलीकरण, शेतकरी अशा सर्व घटकांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस पाटील यांनी आपल्या गावात या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या,असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक अध्यक्ष महादेव नागरगोजे यांनी केले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कारभारी पाटील यांनी आभार मानले.

०००००

येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागासाठी वरदान ठरेल ममदापूर बंधारा – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.  ऑक्टोंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : ममदापूर येथे प्रस्तावित बंधारा येवला तालुक्यातील उत्तर – पूर्व भागासाठी उपयुक्त ठरेल. शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेला हा प्रकल्प वन्यजीवांची तहान भागविणाराही ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मृद व जलसंधारण विभागातर्फे ममदापूर, ता. येवला (मेळाचा बंधारा) येथे १५ कोटी ७४ लाख रुपये खर्चातून साठवण तलाव बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज दुपारी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ममदापूरच्या सरपंच विठाबाई सदगीर, मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक अधिकारी हरिभाऊ गीते, तहसीलदार आबा महाजन आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. हा प्रकल्प ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात येत असून वनविभागाच्या २८.०६ हेक्टर जागेवर साकारला जाणार असल्याने राज्य आणि केंद्रीय वने व पर्यावरण विभागाच्या विविध परवानग्या घेण्यात आल्या आहेत. राज्य वन्यजीव मंडळ, राष्ट्रीय वन्यजीव मंडळ स्थायी समिती, केंद्र शासनाचा वने आणि पर्यावरण विभाग आदी विभागासह विविध मान्यतांसाठी जलसंधारण विभागाने पाठपुरावा केला.

केंद्रीय वने व पर्यावरण विभागाने या प्रकल्पाला मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. त्यानंतर जलसंधारण विभागाने विविध अटींची पूर्तता करून नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकार प्रदान समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. या समितीने ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील या साठवण तलावाच्या स्टेज- १ जमीन वळतीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचे काम वर्षभरात पूर्ण करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

येवला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहे. येवला येथे चार एकर क्षेत्रात शिव सृष्टी साकारण्यात आली आहे. तेथे नागरिकांची वर्दळ वाढली आहे. या स्मारकापासून नागरिकांना प्रेरणा मिळेल, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. श्री. गीते यांनी सांगितले की, वन विभागाची २८ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. वन आणि वन्य जीव विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. या तलावाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल.

ममदापूर साठवण तलावाची माहिती

जलसंधारण विभागाने विविध अटींची पूर्तता करून नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकार प्रधान समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. समितीने २० सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाकडून स्टेज -2 ला अंतिम मंजुरी दिली आहे. या तलावाचे पाणलोट क्षेत्र १८ चौरस किलोमीटर आणि एकूण क्षमता ही ३५.६७ दशलक्ष  घनफूट इतकी असणार आहे. या धरणाची लांबी २२० मीटर, तर सांडव्याची लांबी ७९ मीटर इतकी प्रस्तावित आहे.

रस्त्याचे भूमिपूजन

तत्पूर्वी मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते ममदापूर ते लंबे वस्ती या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री ग्राम सडक (टप्पा दोन) योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम होणार आहे.

००००

 

येवला तालुका सुजलाम् सुफलाम् करणार – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 6 ऑक्टोंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : येवला तालुका सुजलाम् सुफलाम् करावयाचा आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यात सिंचनाची विविध कामे सुरू आहेत. ती लवकरच पूर्णत्वास येतील. त्याबरोबरच पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. त्यामुळे लवकरच घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला तालुक्यातील देवना साठवण तलावाच्या कामाचे भूमिपूजन मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज दुपारी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक अधिकारी हरिभाऊ गीते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, येवला तालुक्यात सिंचनाची विविध कामे प्रस्तावित केलेली आहेत. त्यापैकीच ममदापूर आणि देवना तलावाचे काम आहे. देवना तलावाच्या कामावर १५ कोटी ६५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी राजापूर, धूळगाव, लासलगाव पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

देवना साठवण तलावाची माहिती

येवला तालुक्यासाठी उपयुक्त ठरणारा हा तलाव आहे. देवना साठवण तलाव हा येवला तालुक्यातील खरवंडी व देवदरी गावाजवळील दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर माणिकपुंज मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आहे. येवला तालुक्यातील देवदरी, खरवंडी, राहडी,कोळम खु. परिसरातील शेतील उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे.

याशिवाय वन्य प्राण्यांच्या पिण्यासाठी व रोपवाटीकेसही लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून  २.०८ दलघमी (७३.४४दलघफू) पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी संयुक्त मोजणीनुसार वैजापूर तालुक्यातील १३ हेक्टर व येवला तालुक्यातील ४४ हेक्टर असे एकूण ५७ हेक्टर क्षेत्र संपादित होत आहे.    त्यापैकी ५५.७५ हेक्टर वनक्षेत्र असून १.२५ हेक्टर क्षेत्र हे खासगी आहे. योजनेच्या बुडीत क्षेत्रापैकी ५७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

००००००

‘आंबिया बहार फळ पीक विमा योजना’…शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

पुनर्रचित हवामान आधारित ‘फळ पीक विमा योजना’ आंबिया बहार सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी या योजनेची माहिती देणारा हा लेख…

बिया बहार  फळ पीक विमा योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी  सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होणेबाबत अथवा न होणेबाबत घोषणापत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/ किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांस  नोंदणीकृत  भाडेकरार अनिवार्य आहे. या योजनेत राज्यात ‍प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र  10 गुंठे (0.10 हे) आणि उर्वरित विभागाकरीता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे (0.20 हे.) अशी मर्यादा राहील. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळूण जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यासाठी फळपिकांचे उत्पादनक्षम वय पुढीलप्रमाणे राहील. आंबा, चिकू, काजू फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 5 वर्षे, लिंबू फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 4 वर्षे, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 3 वर्षे, डाळिंब, द्राक्ष फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 2 वर्षे, केळी, पपई, स्ट्रॉबेरी पिकासाठी  उत्पादनक्षम वय नाही. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

ही योजना पुढीलप्रमाणे कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात राबविण्यात येते. जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लि.,  जालना जिल्ह्यासाठी फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.,  छत्रपती संभाजीनगर, धाराशिव ,अमरावती,अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार जिल्ह्यासाठी युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. आणि ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, आणि वाशिम जिल्ह्यासाठी बजाज अलियांन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

आंबिया बहार सन 2024-25 मध्ये फळपिक द्राक्ष पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 3 लाख 80 हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम 1 लाख 27 हजार असून शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 असा आहे

मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम 33 हजार आहे. केळी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख 70 हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम 57 हजार आहे. पपई पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 40 हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम 13 हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2024 असा आहे

संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम 33 हजार आहे. काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख 20 हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम 40 हजार आहे. आंबा (कोकण) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख 70 हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम 57 हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 असा आहे.

आंबा (इतर जिल्हे) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख 70 हजार आहे.गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम 57 हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2024 असा आहे.

स्ट्रॉबेरी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम दोन लाख 40 हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम 80 हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 14 ऑक्टोबर 2024 असा आहे.डाळिंब पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख 60 हजार आहे.गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम 53 हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 14 जानेवारी 2025 असा आहे.योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता सर्वसाधारण पणे विमा संरक्षित रकमेच्या 5% असतो. मात्र काही जिल्ह्यात तो जास्त असू शकतो .

आंबिया बहार सन 2024-25 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अवेळी पाऊस, कमी /जास्त तापमान, वेगाचे वारे, गारपीट इत्यादी  निर्धारीत केलेले हवामान धोके (Weather Triggers)लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होणार आहे.

योजनेत सहभाग करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (https://pmfby.gov.in) या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गारपीट (Add on Cover) या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात आलेले असुन गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील व याकरीता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमीत व  अतिरिक्त विमा हप्ता हा बँकांमार्फतच भरणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. आंबिया बहारातील अधिसुचित योजनेच्या अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000

 

सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!

मुंबई, 6 ऑक्टोबर: आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सोयाबीनचा हमीभाव हा ४८९२ रुपये इतका असून, तो गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरु करण्यात आले असून, त्याची संख्या आणखी वाढवणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राज्यात सन २०२४-२५ मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. केंद्र शासनाने सन २०२४-२५ साठी सोयाबीन करिता प्रति क्विंटल रू. ४८९२/- इतका हमीभाव घोषित केला आहे. सदर दर मागील सन २०२३-२४ या वर्षाच्या हमीभावापेक्षा रू. २९२/- प्रति क्विंटल इतका जास्त आहे.

महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात खरेदी सुरू करण्यासाठी  केंद्रशासनातील नाफेड व एन.सी.सी.एफ. तसेच राज्यातील सर्व प्रमुख नोडल एजन्सीची  राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीमधील चर्चेनुसार  हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व NCCF मार्फत प्रथमतः महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व विदर्भ पणन महासंघ नागपुर यांच्या वतीने राज्यात सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी दिनांक 1/10/2024 पासुन सुरु करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या नाफेड व एनसीसीएफ या दोन्ही  नोडल एजेन्सी सोबत संयुक्तपणे चर्चा करून सोयाबीन खरेदीकरीता राज्यात जिल्ह्यांची विभागणी करुन  नाफेड व एन.सी.सी.एफ . कार्यालयाने २६ जिल्ह्यांतील  एकुण २५६ खरेदी केंद्रांना सोयाबीन खरेदीची मंजुरी देण्यात आली असुन त्यापैकी २४२ खरेदी केंद्र कार्यान्वित झालेली आहेत. कार्यन्वित झालेल्या खरेदी केंद्रामार्फत निश्चित केलेल्या कालावधीत किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

तरी सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. सदरील योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरीता राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱी बांधवांनी सोयाबीन विक्रीकरीता आपल्या नाफेड/NCCF च्या नजिकच्या खरेदी केंद्रावर जावुन ७/१२उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवुन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुन घ्यावी व विक्री व्यवस्थापनाचे चांगल्या प्रकारे नियोजन व्हावे या दृष्टीने आपणास SMS प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवुन यावा असे सूचित केलेले आहे. तसेच आजपर्यंत सुमारे ५००० शेतकरी बांधवांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेली असून याबाबत महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

ताज्या बातम्या

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती नागपूर , दि. ८ -  नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी

0
सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :- सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर, दि. 8 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

0
मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र...

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ८ :  जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने  ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर...