शुक्रवार, मे 23, 2025
Home Blog Page 490

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

उदगीर येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीचे भूमिपूजन
लातूर, दि. 24 : मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर्टी संस्था स्थापन करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातही समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
उदगीर शहरातील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. आमदार अमित गोरखे, सचिन साठे, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, नगरपरिषद मुख्याधिकारी सुंदर बोंदर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, बन्सीलाल कांबळे, अंबादास सगट यांच्यासह पदाधिकारी, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी ना. संजय बनसोडे यांच्यासह मान्यवरांचे फुलांच्या पाकळ्या उधळून स्वागत करण्यात आले. ना. बनसोडे यांच्या हस्ते कुदळ मारून इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून या इमारतीसाठी 14 कोटी 96 लाख रुपये निधी उदगीर नगरपरिषदेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. तळ मजल्यावर पार्किंगची व्यवस्था असलेल्या या इमारतीमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका असणार आहे.
मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे चिराग नगरमध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरात वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक होणार असून लवकरच त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे म्हणाले.
उदगीर शहरात अतिशय मोक्याच्या जागेवर  साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीची उभारणी होत आहे. याठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी आणखी 50 लाख रुपये निधी दिला जाईल, असे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच जळकोट शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि भव्य सभागृह उभारण्यात आले आहे. उदगीर शहरात विविध ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज भवन उभारण्यात आल्याचे ना. बनसोडे म्हणाले.
राज्य शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करीत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. पुढील काळात ही रक्कम दुप्पट करण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासन मातंग समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. बार्टीच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या आर्टी संस्थेमुळे मातंग समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षा, संशोधनासाठी मदत होवून समाजाचा विकास होईल, असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सर्वसामान्य, कष्टकरी माणसाचे जीवन रेखाटले. या समाजाच्या विकासाबाबत चिंतन करून साहित्य निर्मिती केली. त्यांचे विचार प्रत्येकाने समजून घेवून कोणताही जातीभेद न मानता समाजासाठी काम करावे, असे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यावेळी म्हणाले.
प्रा. अंबादास सगट, रामचंद्र तिरुके, बन्सीलाल कांबळे, पप्पू गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पंडीत सूर्यवंशी यांनी केले, शिवाजी देवताळे यांनी सूत्रसंचालन केले.

राज्यस्तरीय कृषी महोत्सवास एक दिवस मुदतवाढ – कृषिमंत्री धनंजय मुंडे

आता २६ ऑगस्ट रोजी समारोप

मुंबई, दि.24 : परळी वैजनाथ, जिल्हा- बीड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे दि. २१ ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. कृषी महोत्सवास राज्यातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रदर्शनाचा कालावधी एक दिवस वाढवण्यात येत आहे. त्यामुळे या कृषी महोत्सवाचा समारोप दि. २५ ऑगस्ट ऐवजी २६ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात येईल.  सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

या महोत्सवामध्ये कृषी निविष्ठा, कृषी अवजारे, सिंचन साधने, संरक्षित शेती साधने, महिला गट, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादींच्या उत्पादित वस्तू, खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री साठी ४०० हून अधिक स्टॉल प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कृषी विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम, झालेले संशोधन यांची देखील माहिती या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. दररोज शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे. तसेच रानभाजी महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.

 

000000

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार

३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि.२४.   ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने   सुरू आहे. ज्या महिलांनी ३१  जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या  पात्र महिलांना  लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री  आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे.   त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना  लाभ मिळणार आहे.

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  मंत्री कु.तटकरे यांनी केले आहे.

००००

‘विकसित भारता’साठी एमएमआर प्रदेश पॉवर हाऊस : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागरी विकास, पायाभूत सुविधांमुळे गुंतवणूक येणार

मुंबई, दि. 24: – भारताच्या ‘फाईव्ह ट्रिलीयन डॉलर्स’ अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकारण्यात मुंबई महानगर प्रदेशाचा सिंहाचा वाटा राहणार आहे. या प्रदेशातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.

एमएमआर प्रदेश २०४७ मधील विकसित भारतातील अर्थव्यवस्थेसाठी ‘पॉवर हाऊस’ ठरणार असून, यातील दळणवळण, शाश्र्वत नागरी विकास आणि पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना गती देणारी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

एमएमआर प्रदेशाचा नागरी विकासाच्या दृष्टीने कायापालट होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांमध्ये ‘प्लॅटिनम’ आणि ‘सुवर्ण’ प्रकल्प अशा श्रेणीमध्ये आखणी केली जात आहे.

प्लॅटिनम प्रकल्प

अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लींक), अलिबाग, गोराई आणि मढ या तीन पर्यटन विकास क्षेत्रांचा, आणि खारबांव इंटिग्रेंटेड लॉजिस्टिक्स पार्क, अणगांव-सापे, वाढवण आणि दिघी येथील औद्योगिक नगरींचा समावेश आहे.

अटल सेतू हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. अलिबाग, गोराई आणि मढ या क्षेत्रात जागतिकस्तरावरील आधुनिक अशा पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येईल. वसई मधील खारबांव इथे २४८ हेक्टरवर ग्रीनफिल्ड इंडस्ट्रियल पार्क साकारण्यात येणार आहे. ज्यामुळे ५६० कोटी डॉलर्सची गुंतवणूक येणे शक्य होणार आहे.

अणगांव – सापे, वाढवण आणि दिघी इथे औद्योगीक नगरी विकसित केल्या जातील. हाय-ग्रोथ इंडस्ट्रीयल हब म्हणून यांचा विकास केला जाईल. ज्यातून उत्पादन क्षेत्र म्हणून आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा परिसर म्हणून तीन ठिकाणी मिळून सुमारे हजार कोटी डॉलर्सची गूंतवणूक होईल,अशी अपेक्षा आहे.

सुवर्ण प्रकल्पांतर्गत नैना प्राधिकरणांतर्गत बारा ठिकाणी टाऊनशिप प्रकल्प, मुंबई-पुणे हायवे सर्व्हिस लेन, गोरेगांव-ठाणे टनेल आणि सिंहगड रस्ता या प्रक्लांपासह, सार्वजनिक वाहतूक सुविधांचे प्रकल्प, सागरी-हवाई आणि रेल्वेचे पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते वाहतुकीचे महत्वांकाक्षी प्रकल्प, मुंबई-अहमदाबाद (हायस्पीड रेल्वे) बुलेट ट्रेन, एकात्मिक नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्रातील नैना प्राधिकरणांतर्गत एमएमआरडीए बारा ठिकाणी परवडणारी घरे श्रेणीतील गृहनिर्माण प्रकल्प उभे करेल, असे नियोजन आहे. यातून मोठ्या लोकसंख्येला मागणीनुसार घरे उपलब्ध करून देता येणार आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या दोन्ही बाजूला सहापदरी सेवा रस्त्यांची बांधणी करण्यात येईल. ज्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा वाढता ताण कमी करता येणार आहे. गोरेगांव-ठाणे टनेल आणि सिंहगड रस्ता विकास यांच्यामुळे महत्वाची विकास क्षेत्रांना जोडणारी दळणवळण सुविधा उपलब्ध होणार आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षम जाळे

कोस्टल रोड मेट्रो आणि मेट्रो लाईन – ५ या महत्वांकाक्षी प्रकल्पांमुळे प्रवाशी वाहतूक सुविधेत मोठी सुधारणा होईल, यासाठी सुमारे १ हजार २७० कोटी डॉलर्सची तरतूद केली जाणार आहे.

बस रॅपिड ट्रांझिट सिस्टीम (बीआरटीएस)

मुंबईतील बस सेवेचे आधुनिकीकरण करताना या संकल्पनेचाही अवलंब केला जाईल. यातून २०३१ पर्यंत अतिरिक्त दोन लाख प्रवाशी वाहतुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सागरी, हवाई आणि रेल्वे पायाभूत सुविधा उभारणीस गती या क्षेत्रात गुंतवणूक होणार आहे.

बंदर विकास

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, वाढवण बंदर, दिघी आणि रेवस या ठिकाणच्या बंदर सुविधांच्या विकासावर भर देण्याचे नियोजन आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार-उदीमाला प्रोत्साहन मिळेल.

हवाई वाहतूक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वाहतूक (२०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक) सुरु झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे. याशिवाय प्रदूषण आणि अन्य समस्या दूर होणार आहे. याशिवाय २०३२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरणही करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणामुळे दरवर्षी आणखी सहा कोटीं प्रवाशांना वाहतूक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

रस्ते विकासांचे महत्वाकांक्षी प्रकल्प

एमटीएचएल, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा – कोस्टल रोड, वडोदरा महामार्ग यांसह भारतमाला परियोजना टप्पा-३ च्या कामांमुळे मोठी गूंतवणूक होणार आहे.

बुलेट ट्रेन

मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर या प्रकल्पामुळे देशातील आर्थिकदृष्ट्या दोन महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत.

इंटिग्रेटेड रिव्हरफ्रंट विकास योजना 

मिठी, ओशिवरा या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एमएमआरडीएने नियोजन केले आहे. नमामी गंगा या प्रकल्पाच्या धर्तीवर यातून पर्यटन, विरंगुळा क्षेत्र म्हणून विकास केला जाईल. तसेच पर्यावरण जतन-संरक्षणाचे उपायही योजले जातील.

एकंदरीत भारताची नागरी लोकसंख्येची वाढ गृहीत धरून एमएमआर प्रदेशातील नागरी तसेच पायाभूत सुविधांचे सुनियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठीच या क्षेत्रात सुमारे १६ हजार ४०० कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकींच्या विविध क्षेत्रातील प्रकल्प, सुविधांच्या नियोजनावर भर देण्यात येत आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार संधीही उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.

याबाबत नुकताच निती आयोगानेही अहवाल दिला आहे. त्यामुळे एमएमआर प्रदेश विकसित भारतासाठी ‘पॉवर हाऊस’ ठरणार आहे.

००००

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून आर्थिक बळ मिळाल्याची भावना

बहिणींच्या चेहऱ्यावर दिसून आला आनंद व उत्साह

यवतमाळ, दि.२४ : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रक्कमेतून मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्य विषयक बाबींसह आपल्या स्वप्नपूर्तीसाठी योजनेतून मिळालेल्या रक्कमेचा विनियोग करता येईल, अशी भावना आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत वचनपूर्ती सोहळ्यात आलेल्या बहिणींनी व्यक्त केली.
वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्णी रोड स्थित किन्ही परिसरातील मैदानावर हजारोंच्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावागावातून महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. बंजारा व आदिवासी समाजाच्या भगिनी पारंपारिक वेषभुषेत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तसेच यावेळी आदिवासी व बंजारा समाजबांधवांनी पारंपारिक नृत्य सादर करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञ भाव व्यक्त केला.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहीणींच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्यातील आत्मविश्वास दर्शवत होता. आता आम्हीही कुणावर अवलंबून नाही, आमच्या लाडक्या भावाने आम्हाला आमचे हक्काचे पैसे दिले, ही भावना त्यात होती. यावेळी महिला भगिनी हात उंचावून मोबाईल टार्च लावून त्यांची आत्मनिर्भरता दर्शवित होत्या. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

रक्षाबंधनचा सण गोड झाला – निशा राठोड

दिग्रस तालुक्यातील वडगाव येथील निशा रोहिदास राठोड यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. ‘ रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधीची घटना. सण जवळ आला होता, पण हातात पैसे नव्हते, खूप चणचण होती, मुलीला कपडे, शैक्षणिक साहित्य घ्यायचे होते, राख्या खरेदी केलेल्या नव्हत्या आणि इतक्यात…माझ्या फोनवर बँक खात्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला….!” आणि माझी चिंता मिटली….’ अशा शब्दात भावना व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते. निशा राठोड यांच्यासारख्याच यवतमाळ जिल्ह्यातील लाखो महिला लाडक्या बहिणी ठरल्या आहेत. त्यातील काही मोजक्या भगिनींच्या या बोलक्या प्रतिक्रिया….

भेट भावाची, ठेव मुलांच्या भविष्याची – सुनीता रामटेके

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानते. या योजनेचा अर्ज करताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. माझ्या खात्यात बरोबर तीन हजार रुपये जमा झाले. या योजनेतून मिळालेले पैसे भावाची भेट म्हणून माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरणार आहे, अशी भावना व्यक्त केली आर्णी तालुक्यातील लोणी येथील सुनीता रामटेके यांनी. अशीच प्रतिक्रीया लोणी येथील रहिवासी मिना शिंदे यांनी देऊन मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार मानले.

मुख्यमंत्री नावाच्या भावाने दिली कल्याणकारी योजनांची शिदोरी – श्वेता चव्हाण
शासनाने केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ दिला नसून महिलांना अनेक कल्याणकारी योजनांची शिदोरी दिली. या योजनांच्या मदतीने आम्ही आमचे आरोग्य, शैक्षणिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करणार आहोत. लाडकी बहीण योजनेतून मिळालेली रक्कम ही मुलांचे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी उपयोगी पडली. त्याबद्दल मी शासनाचे मनापासून आभार मानते, अशी भावना दिग्रस तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी श्वेता विठ्ठल चव्हाण यांनी व्यक्त केली.

संसाराला हातभार लाभला – संगीता चव्हाण

मी शेत मजुरीचे काम करते. घरात नेहमी पैश्याची चणचण भासत होती. आता माझ्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. या पैशांची संसाराला मदत होईल. माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी हे पैसे अडचणीच्या काळात नक्की उपयोगी पडतील. या पैश्यातून मी माझ्या चारही मुलींसाठी शैक्षणिक साहित्य व कपडे खरेदी करणार आहे. योजनेतून पैसे मिळाल्या निमित्त मी मुख्यमंत्री महोदयांची खूप खूप आभारी आहे. ही योजना अशीच नियमितपणे सुरु राहावी, अशी भावना व्यक्त केली दिग्रस तालुक्यातील वडगाव तांड्याच्या संगीता भाऊराव चव्हाण यांनी.

00000

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ महिलांचा सन्मान वाढविणारी योजना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यवतमाळ येथे वचनपूर्ती मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यवतमाळ, दि. 24 : गेल्या दोन महिन्यात महिलांसाठी विविध निर्णय घेतले. महिलांची समाजात, कुटुंबात भागिदारीसह त्यांचा ‘सन्मान’ वाढविण्यासाठी आपण ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी 40 लाख महिलांनी नोंदणी केली. त्यापैकी एक कोटी 7 लाख बहिणींच्या खात्यात रक्कम देखील जमा केली आहे. राज्यातील शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत नोंदणी सुरुच राहील, असे यवतमाळ येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. जिल्हाभरातून 50 हजारावर लाडक्या बहिणी मेळाव्यास उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमण झाल्यानंतर लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधून वचनपूर्तीनिमित्त त्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री संजय राठोड, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.मदन येरावार, आ.प्रा.डॅा.अशोक उईके, आ.डॅा.संदीप धुर्वे, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.नामदेव ससाणे, आ.इंद्रनिल नाईक, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आदी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा महासागर यवतमाळ येथे पाहिला होता. आज देखील स्त्रीयांची विराट शक्ती दिसून येत आहे. या शक्तीला वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलो आहे. ज्या बहिणींची अद्यापही नोंदणी झाली नाही त्यांची नोंदणी करून त्यांना एकाचवेळी तीन महिन्यांची रक्कम देऊ. प्रत्येक पात्र महिलेची नोंदणी करण्याचे आपले लक्ष्य आहे. योजना सुरळीत सुरु राहण्यासाठी वर्षभरासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. गृहिणींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून त्यांना 3 सिलिंडर मोफत देण्यात येत असल्याचे श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

राज्य सरकारने गेल्या काही दिवसात विविध योजना महिलांसाठी आणल्या. राज्यातील महिलांना या योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचे आमचे धोरण आहे. या माध्यमातून राज्यातील प्रत्येक बहिणीला लखपती होतांना पाहण्याचे स्वप्न आहे. लाडक्या बहिणींसोबतच लाडक्या भावासाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली. या योजनेतून भावांना महिन्याला 6 ते 10 हजारांपर्यंत विद्यावेतन दिले जात आहे. राज्यातील लाडक्या शेतकऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आपण सुरु केली. 7.5 एचपी पर्यंत वीज वापर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे वीज बिल भरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेत सहभागाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना मोबदला देणे बंधणकारक आहे. ज्या कंपन्या मोबदला देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

राज्य शासनाकडून महिला शक्तीचा जागर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्वसामान्य महिलांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने गेल्या काळात विविध कल्याणकारी योजना आणल्या. या माध्यमातून शासन सातत्याने महिला शक्तीचा जागर करत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना सक्षम करणारी योजना आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली. या योजनेतून मुलीला तिच्या 18 व्या वर्षापर्यंत 1 लाख रुपये मिळणार आहे. महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलतीचा प्रवास आपण सुरु केला. बचतगटांचा फिरता निधी वाढविला. 8 हजार 500 कोटी रुपये बचतगटांना दिले. काही दिवसांपूर्वी बदलापुर येथे अप्रिय घटना घडली. अशा घटना होऊ नये यासाठी गैरवर्तनाबाबत प्रत्येक शाळेत मुलींची विचारपूस केली जात आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या दिवसात शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसाला 12 तास वीज मिळेल, यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागणार नाही. गेल्यावर्षी कापुस, सोयाबिनचे भाव पडले. यामुळे नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना आपण आर्थिक मदत देतो आहे. शेतमालाच्या भावात कमी येणार नाही, यासाठी प्रयत्न करीत आहोत. वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा प्रकल्प विदर्भासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 50 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला खूश आहेत. योजनेच्या निकषात बसणारी एकही बहीण लाभापासून वंचित राहणार नाही. ही रक्कम महिलांच्या हक्काची, अधिकाराची रक्कम आहे. या योजनेमुळे शहरी आणि ग्रामीण भागाला गती मिळेल. राज्यातील 52 हजार कुटुंबाना वर्षाला 3 सिलिंडर आपण मोफत देतोय. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण यासारख्या अनेक योजना राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आल्या. मुलींशी होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी शक्ती कायदा आपण केला. राष्ट्रपतींची मंजुरी झाल्यानंतर हा कायदा अंमलात येईल. असे गैरवर्तन करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची देखील भावना असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम सुरु – पालकमंत्री संजय राठोड

शेतकरी, महिला, गरीब, कामगार, युवक यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे. सर्वसामान्यांच्या गरजांचा विचार करून त्यांच्यासाठी त्याप्रमाणे योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून 1 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यवतमाळ जिल्ह्यात 4 लाख 60 हजार महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्य शासनाने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना आणल्याचे पालकमंत्री श्री. राठोड यांनी सांगितले. यवतमाळ येथे आज झालेल्या मेळाव्याप्रसंगी पाऊस असतानाही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 50 हजारांपेक्षा अधिक महिलांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली.

लाडकी बहीण व भावाला लाभाचे वितरण

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि श्री.पवार लाडक्या यांच्या हस्ते बहीण व भावाला लाभाचे वितरण केले. लाडकी बहीण योजनेंतर्गत श्रुती विलास भगत, नंदा सुतारकर, बेबी माणिक चव्हाण, नलिनी राम राठोड, चंदा सचिन शेंडे, शुभांगी शिंदे, प्रतिभा कोरडे, सुमन रमेश गेजीक, जया हरीदास विरदंडे, इंदिरा लक्ष्मण मांगरे, शुभांगी रविंद्र ढोरे, टिंकल आकाश उरगुंडे, संगिता शेषराव राठोड, रेश्मा शेख जावेद, नाझीया अमजतखा पठाण यांना लाभाचे धनादेश दिले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या शितल घाडगे व वैष्णवी पैदपवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

0000

जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षण उत्तम दर्जाचे – केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी

पालघर दि. 24 (जिमाका): जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र शासनाची संस्था असून या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिक्षण उत्तम दर्जाचे आहे. असे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता व शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी सांगितले.

माहिम येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे केंद्रीय राज्यमंत्री श्री. चौधरी यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, माहिम येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य अब्राहम जॉर्ज तसेच वरिष्ठ अधिकारी विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत असून या विद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नावज्ज्वल करत आहेत. असेही श्री. चौधरी यांनी सांगितले. श्री. चौधरी यांनी विविध देशांमध्ये विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करणाऱ्या या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांशी दूरदृष्टी प्रणालीद्वारे संपर्क साधून चर्चा केली. यावेळी जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयाचे सादरीकरण केले.

******

साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी संस्थांनी काम करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनच्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन

पुणे, दि. २४: साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे आव्हान असून त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी संशोधन आणि तंत्रज्ञान विकास करण्यासाठी काम करावे, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जे. डब्लू. मेरीयट हॉटेल येथे आयोजित दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनच्या (डीएसटीए) ६९ व्या वार्षिक अधिवेशन आणि प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी दूरदृष्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (एनएफसीएफएस) अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, एनएफसीएफएसचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (तांत्रिक) एस. डी. बोखारे आदी उपस्थित होते.

ऊसाच्या उत्पादकतेत वाढ करणे, राज्यातील ऊस उत्पादन वाढविणे आदी आव्हाने आपल्यापुढे असल्याचे सांगून मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, साखर कारखानदारी आणि सहकारी चळवळीचे नाते अभिन्न आहे. सहकारी साखर कारखानदारीच्या उद्योगाने राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्थैर्य दिले. सहकार चळवळीने देशाच्या अर्थव्यवस्थेमध्येही मोठा वाटा बजावला आहे. साखर कारखानदारीच्या वाटचालीत गेल्या काळात डीएसटीएची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, असेही ते म्हणाले.

ज्या भागात ऊस उत्पादन अधिक आहे. त्या भागातील आर्थिक विकासाचे चित्र अधिक चांगले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सर्वसामान्य शेतकऱ्यांची चूल पेटवण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काम केले. सहकारी साखर कारखानदारीची वाटचाल चांगली असल्याचे समाधान आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. विखे पाटील पुढे म्हणाले, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा केंद्र शासनाने सहकार मंत्रालयाची स्थापना केली. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला साखर कारखान्यांचा आयकराचा प्रश्न सहकार मंत्रालयाने मार्गी लावला. इथेनॉल निर्मितीच्या माध्यमातून अधिक उत्पन्नाचा मार्ग दाखविला. या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील नवीन सहकारी साखर कारखाने, खासगी कारखाने यांच्यापुढील आव्हानांवर मार्ग शोधला जात आहे. आज केंद्र शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्याबाबत निर्णय घेतला. ऊसापासून उपपदार्थ निर्मितीला चालना दिली.

ऊस उत्पादनखर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादनात वाढ करणे आदी नवीन आव्हाने आहेत. आज केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहण्यासारखी परिस्थिती नाही. ज्यूस, सिरप, मळीपासून इथेनॉल निर्मितीच्या उत्पादनाचे क्षेत्र पुढे आले आहे त्याचा साखर कारखान्यांनी फायदा घेतला पाहिजे. केंद्र शासनाच्या धोरणांतर्गत पेट्रोलमध्ये २५ टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे ऊसशेती, साखर उत्पादन, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

कारखान्यांच्या आधुनिकीकरणासाठी तंत्रज्ञान विकसित करणे, ऊस तोडणीचा खर्च मोठा असून अजूनही परदेशातून हार्वेस्टर आयात करावे लागतात. त्यामुळे या सर्व बाबींमध्ये संशोधन करुन तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज असून त्यावर काम करावे, असेही ते म्हणाले.

साखर आयुक्त डॉ. खेमनार म्हणाले, साखर कारखान्यांचे भविष्यातील मार्गक्रमण कसे राहील यदृष्टीने साखर आयुक्तालयाचे कार्य सुरू आहे. कारखान्यांचे आर्थिक व्यवस्थापन, जमीन व्यवस्थापन, ग्रीन हायड्रोजन, ड्रोनचा वापर, यांत्रिकीकरण आदी अनेक विषयांवर आयुक्तालयाने कार्यशाळा घेतल्या आहेत. इथेनॉल तसेच त्याला पर्यायी इंधन कसे देता येईल याविषयीदेखील चर्चा करण्यात आली आहे.

साखर कारखान्यांमध्ये सीबीजी निर्मितीला केंद्र शासन मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. लवकरच महाराष्ट्र शासनाचेही त्याबाबत धोरण तयार होत असून त्या अनुषंगानेही सर्व भागधारकांची बैठक नुकतीच घेण्यात आली. साखर कारखान्यांचे आधुनिक यांत्रिकीकरण, कार्बन अर्थव्यवस्था, हरीत हायड्रोजन, सौर उर्जा याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. कारखाने शाश्वत करायचे असेल तर हरित तंत्रज्ञान, शाश्वत तंत्रज्ञान वापरणे आणि त्यात नाविन्यता आणण्यासाठी संशोधन करणे तसेच जास्तीत जास्त कार्यक्षम तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे. कारखान्यांना कमीत कमी भांडवल गुंतवणूक करुन वर्षभर आणि हंगामाव्यतिरिक्त उत्पन्न कसे मिळेल यासाठी आयुक्तालयाचा प्रयत्न आहे. साखर आयुक्तालयाच्यावतीने भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी साखर उद्योगाने आपल्या सूचना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, देशातील साखर कारखाने आधुनिक करुन त्यांना दिशा देण्याच्या कामात डीएसटीएने सिंहाचा वाटा उचलला आहे. केंद्र शासनाने सहकार मंत्रालय स्थापन केल्यामुळे सहकारी साखर कारखानदारीचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. साखर कारखानदारीला चालना देण्यासाठी उपलब्ध सर्व संसाधनांना चालना देण्याचे काम करावे लागेल. देशातील अनेक संस्था साखर कारखानदारी आणि या क्षेत्राशी निगडीत असून त्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी एनएफसीएफएस काम करेल, असेही ते म्हणाले.

यावेळी डीएसटीएचे अध्यक्ष श्री. भड यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमात डीएसटीएच्या वार्षिक अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी विवेक हेब्बल, दिलीपराव देशमुख, आमदार श्री. लाड, प्रकाश नाईकनवरे, अमृतलाल पटेल, संजय अवस्थी यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार, साखर उद्योगातील संस्था आणि व्यक्तींना तांत्रिक उत्कृष्टता पुरस्कार, औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार आदी पुरस्कार देण्यात आले.

या कार्यक्रमास साखर कारखाने व ऊस उत्पादन क्षेत्राशी तंत्रज्ञ, संशोधक आदी उपस्थित होते.
0000

गणेश मंडळांनी सीसीटीव्ही, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक वाद्यांवर भर द्यावा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

बाणेरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक संपन्न

पुणे, दि.२४ : आगामी गणेशोत्सव गणेश मंडळांनी सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले. गणेशोत्सव काळात मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

चतु:शृंगी पोलीस ठाणे व पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर मधील साफा बॅन्क्वेट हॉल येथे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पुणे शहर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सयाजीराव गायकवाड, महापालिका उपायुक्त अविनाश सपकाळ, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गिरीश दाबकेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजाच्या एकजुटीसह गरजू लोकांना मदत होईल, या भावनेतून सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना मांडली. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनीही उत्सव काळात जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, त्यासाठी आपल्या देखाव्यांमधून महिला सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा असे विषय साकारावेत.

गणेशोत्सव काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी मंडळांनी आपल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे आवश्यक आहे. तसेच, जनजागृतीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करावे. त्यासोबतच ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिला पाहिजे. या तिन्ही गोष्टींसाठी मंडळांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. कायद्याचे पालन करणाऱ्या गणेश मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत. त्यामुळे गतवर्षी परवानगी घेतलेल्या मंडळांना पुन्हा परवानगीची गरज नाही. मात्र, परवानगी घेताना मंडळांनी नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे. मंडळांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी उत्सव काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सजग रहावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पोलीस उपायुक्त जाधव यांनी बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५० गणेश मंडळे असून गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याची माहिती दिली. गणेशोत्सवासाठी पोलीस दलाचे योग्य नियोजन केले‌ असल्याचे त्यांनी सांगितले.
0000

महानिर्मितीचा २५ मेगावॅट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

उत्पादित वीज खुल्या बाजारात विकणार, महानिर्मितीची सौर ऊर्जा स्थापित क्षमता ४२८ मेगावॅट

मुंबई, दि.२४ :  महानिर्मितीने धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण ७० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये साक्री-१ (२५ मेगावॅट), साक्री-२ (२५ मेगावॅट) आणि साक्री-३ (२० मेगावॅट) चा समावेश आहे. यापैकी साक्री-१ येथे २५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम मेसर्स गोदरेज आणि बॉयस या विकासकाने इ.पी.सी. (अभियांत्रिकी खरेदी आणि उभारणी तत्वावर) हा प्रकल्प विकसित केला असून क्रिस्टलाईन पद्धतीचे सौर पॅनेल आहेत. या प्रकल्पाची  कॅपॅसिटी युटीलायझेशन फॅकटर (सी.यू.एफ.) २०.५९ टक्के असून वार्षिक वीज निर्मिती ४५.०९ दशलक्ष युनिट अपेक्षित आहे.

२१ ऑगस्ट  रोजी हा सौर प्रकल्प कार्यान्वित करून  २२०/३३ के.व्ही. शिवाजीनगर, साक्री उपकेंद्राशी यशस्वीरित्या जोडण्यात आला. साक्री-१ प्रकल्पामुळे ५० लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा स्थापित क्षमता  ४२८ मेगावॅट इतकी झाली आहे.

साक्री-१ प्रकल्पाची वैशिष्ट्ये

या प्रकल्पासाठी ५२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून याचा प्रकल्प खर्च ९३.१२ कोटी इतका आहे.  या प्रकल्पातून उत्पादित वीज ही खुल्या बाजारात विकण्यात येणार  आहे.

साक्री” महानिर्मितीचे सोलर हब

साक्री येथे महानिर्मितीचा १२५ मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मागील सुमारे दहा वर्षांपासून कार्यरत आहे. त्यात साक्री-१,२,३ सौर प्रकल्प पूर्ण झाल्यावर एकाच ठिकाणी सुमारे १९५ मेगावाट स्थापित क्षमता असलेल्या या  सौर प्रकल्पामुळे साक्री महानिर्मितीचे “सोलर हब” म्हणून नावारूपास येणार आहे.

महानिर्मिती पॉवर ट्रेडिंग क्षेत्रात

जुलै २०२४ पासून महानिर्मितीने सेझ बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे समवेत १५ मेगावॅट सौर वीज वितरणाचा करार केला आहे.

प्रगतीपथावर सौर ऊर्जा प्रकल्प

साक्री-१ येथे २५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे काम मेसर्स गोदरेज एन्ड बोएस कंपनी तर साक्री-२ हा २५ मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प टाटा पॉवर सोलर सिस्टिम , साक्री-३, हा २० मेगावॅट स्थापित क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे काम  मेसर्स स्वरयू पॉवर करीत असून लवकरच हे दोन्ही  प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

ऊर्जामंत्र्यांनी केले महानिर्मितीचे  अभिनंदन

साक्री-१ येथे २५ मेगावॅट स्थापित क्षमतेचा हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांनी महानिर्मिती अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.  महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी संचालक(प्रकल्प) अभय हरणे आणि (नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि नियोजन)चमुचे तसेच मेसर्स गोदरेज एन्ड बॉयस च्या अधिकारी, अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.

००००

ताज्या बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून मुंडेगाव येथील जिंदाल कंपनीची पाहणी

0
नाशिक, दि. 23 मे, 2025 (जिमाका वृत्तसेवा): राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दुपारी मुंडेगाव, ता. इगतपुरी येथील जिंदाल पॉलिफिल्म या कंपनीला...

महिला, बालके आणि ज्येष्ठांची सुरक्षितता आणि सोईसुविधांसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मानदंड ठरेल- विधानपरिषद उपसभापती डॉ....

0
नाशिक, दि. 23: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक  यांची सुरक्षितता आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांसाठी मानदंड म्हणून ओळखला जाईल, अशा...

खरीप हंगाम जागृती : घरच्या घरी तयार करा निंबोळी अर्क – प्रभावी व पर्यावरणपूरक...

0
रासायनिक कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे पिकांचे नुकसान, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास, मानवी आरोग्यावर दुष्परिणाम आणि पर्यावरणीय संकटे या समस्या गंभीर बनल्या आहेत. यावर एक नैसर्गिक, प्रभावी...

सहकार चळवळीच्या वाढीसाठी पूर्ण सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही 

0
शेतकऱ्यांच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही लाडकी बहीण योजना सुरु राहणार शेतीत एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी काळम्मावाडी धरणाची गळती...

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे...

0
पुणे, दि. २३: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच संबंधित विभागांनी समन्वय...