सोमवार, जून 23, 2025
Home Blog Page 60

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

मुंबई,दि. 28 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 16 जून 2025 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात येत आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या भरती पूर्व प्रशिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे दि. 5 जून 2025 रोजी मुलाखतीस सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावर सीडीएस-65 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट काढून व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. तसेच उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. या परीक्षेकरिता ऑनलाइन द्वारे अर्ज केलेला असावा. ही पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावेत.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी: training.pctenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाट्सअप क्र. 9156073306 (प्रवेश मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

0000

रास्तभाव दुकानांमधून ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जूनपूर्वी उचलण्याचे आवाहन

मुंबई, दि. २८ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो. आगामी पावसाळा व परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जून २०२५ पूर्वीच रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे.

सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जून २०२५ पर्यंतच रास्तभाव दुकानांमधून उचलावे, असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

मोहिनी राणे/ससं/

‘पर्यटन सुरक्षा दल’ उपक्रमाचा विस्तार करणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. २८ : पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा दल हा पर्यटन विभागाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सवात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या संदर्भात मंत्री श्री. देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार महेंद्र थोरवे, पर्यटन संचालक श्री. पाटील यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, पर्यटन सुरक्षा दलासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडील अधिकारी- कर्मचारी यांची सेवा घेण्यात येत आहे. सुरवातीच्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कास पठार, पाचगणी आणि कोयनानगर येथे हा उपक्रम राबविण्यात येईल. या उपक्रमांतर्गत नियुक्त अधिकाऱ्यांसाठी वाहने घेण्यात यावीत. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

तत्पूर्वी मंत्री श्री. देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील कोयनानगर नेहरू गार्डन, स्काय वॉक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे विकसित करण्यात येणाऱ्या पर्यटन प्रकल्पासंदर्भात माहिती घेतली. हे प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी विहित निकषानुसार तयार करून पाठवावेत आशा सूचनाही त्यांनी दिल्या.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

राजधानीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि. 28 :  भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा हुंकार पेरणारे आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्र शासनाचे आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना श्री. जाधव म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतीकारक नव्हते, तर भारतीय राष्ट्रवादाचे खरे पुरस्कर्ते होते.” त्यांच्या विचारांनी आजही प्रेरणा मिळते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमास निवासी आयुक्त व सचिव आर. विमला, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा  यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

0000

अमरज्योत कौर अरोरा/ वृत्त विशेष  -119

जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके डी+ करण्यास तत्वतः मंजुरी – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २८ : जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १० तालुक्याचे वर्गीकरण होऊन ते डी+ वर्गवारीत झाले. पुढील एक महिन्यात नवीन औद्योगिक धोरण जाहीर होणार असून या धोरणात जळगाव जिल्ह्यातील शिल्लक पाच तालुक्यांचा समावेश डी+ वर्गवारीत करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आजच्या बैठकीत दिली.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी आणि शिष्टमंडळांनी उद्योगमंत्री श्री.सामंत यांची भेट घेतली. याप्रसंगी जळगाव जिल्ह्याच्या पाच तालुक्यांचा समावेश डी+ वर्गवारीत होणार असल्याची तत्वतः मान्यता उद्योगमंत्री यांनी दिली. बैठकीस एम. आय. डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह, सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार तसेच जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात उद्योग आले पाहिजेत, यासाठी उद्योजकांशी बोलून त्यांना जळगाव जिल्ह्यात उद्योग उभारण्याबाबत विनंती करण्यात येईल. यासाठी लोकप्रतिनिधींनी सुद्धा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. जळगाव जिल्ह्यात मेगा प्रकल्प किंवा अल्ट्रा मेगा प्रकल्प आल्यास प्रस्तावित औद्योगिक धोरणानुसार सवलतीचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे ५०० कोटी पेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या उद्योगांना सुद्धा एमएसएमई अंतर्गत लाभ देण्यात येत असल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत उद्योगमंत्री श्री.सामंत यांनी सांगितले की, डिफेन्स उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची गरज लागते. डिफेन्स उद्योगास जागा उपलब्ध करून दिल्यास त्याचा मोठा फायदा जळगाव जिल्ह्यास होऊ शकतो, असेही मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मौजे चौंडी येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून ६८१ कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. 28 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन विकासासाठी 681 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासन निर्णय नियोजन विभागाने आज जारी केला आहे. या आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने संबंधितांच्या बैठका घेऊन पाठपुरावा केल्यामुळे हा शासन निर्णय निश्चित वेळेत जारी होऊ शकला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी येथील त्यांच्या स्मृतीस्थळाचा विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार प्रयत्नशील होते. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेली राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्त्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत तयार करण्यात येतात. स्थानिक पातळीवरील संबंधित आणि तज्ज्ञांशी चर्चा करुन चौंडी स्मृतीस्थळ जतन व विकास आणि त्यास लागणाऱ्या निधीचा आराखडा अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला. त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून 6 मे 2025 रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने 681 कोटी 32 लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मंजुरीचा शासन निर्णय आज जारी केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे यंदा त्रिशताब्दी जन्मवर्ष असून त्यानिमित्ताने त्यांच्या चौंडी जन्मगावी 6 मे 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नियोजन विभागाने निश्चित वेळेत आज शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना त्यांचे ऐतिहासिक महत्त्व, वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्ती, संस्थांकडूनंच ही कामे करु घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. जी कामे केंद्र शासनाच्या PRASAD योजना, स्वदेश दर्शन योजना किंवा अन्य  योजनांमधून शक्य आहेत. ती त्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत. विकास आराखड्यातील सर्व कामे पुढील तीन वर्षात 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही शासन निर्णयात दिले आहेत.

शासन निर्णय – choundi GR

राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन

मुंबई, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२ व्या  जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व जवान उपस्थित होते.

००००

Governor pays tributes to Savarkar on birth anniversary

Mumbai Dated 28 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portrait of Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar on the occasion of his 142nd Birth Anniversary at Raj Bhavan.

Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware, Deputy Secretary S. Ramamoorthy, staff and officers of Raj Bhavan and State police were present.

000

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.२८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवार, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे आदिसह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

धोंडिराम अर्जुन/स.सं

बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणास वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती

मुंबई, दि. २८ : शासकीय, निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणाची अट शिथील करून या धोरणास स्थगिती देण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

शासकीय, महानगर पालिका यांच्या वैद्यकीय महविद्यालयातून एमबीबीएस अभ्याक्रम पूर्ण केल्यानंतर विहीत कालावधीची शासनाची बंधपत्रित सेवा पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना एमडी, एमएस तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरवता येणार नाही, असा शासन निर्णय 2017 साली घेण्यात आला होता. त्यामुळे बंधपत्रित सेवेच्या अटीस स्थगिती देण्यात आल्यामुळे आता पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.

बंधपत्रित सेवांची अट 2019-20 मधी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून लागू करण्यात आली होती. तसेच याबाबत विद्यार्थी संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे या अटीची अंमलबजावणी प्रत्यक्षात करण्यात येत नव्हती. यंदाची पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षा ही जून महिन्यात होणार आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बंधपत्रित सेवेच्या अटीला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच बंधपत्रित सेवेसाठी आवश्यक जाता सार्वजनिक आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. उपलब्ध असलेल्या जागांचा विचार करता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी पदवी अभ्याक्रमानंतरची बंधपत्रित सेवा पूर्ण असणे या धोरणास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे.

 

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

 

सुरक्षित प्रवासासाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २८ : राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेस मध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

एसटी महामंडळाच्या ठाणे-नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट बस’मध्ये बसवण्यात आलेल्या आयटी सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी आज ठाणे येथे केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटीचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, सध्या दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एसटी बसमधील प्रवास अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे. या उद्देशाने एआय तंत्रज्ञानावर आधारित ” एकात्मिक सुरक्षा प्रणाली ” नव्या बसेसमध्ये लावण्यात येणार आहे. चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धती पासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालीवर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या सोबतच वायफाय, एलईडी स्क्रीन, जीपीएस प्रणाली सह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसविण्यात येणार आहे.

या उपकरणामुळे महिलांना सुरक्षितरीत्या प्रवास करता येणे शक्य होणार असून, चालकाला गाडी चालवणे अधिक सोपे होणार आहे. तसेच त्याने मद्यपान केले असले किंवा त्याला झोप येत असली तरीही सायरनद्वारे लगेच कळणार असल्याने प्रवाशांना सुरक्षितरीत्या प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे ही प्रणाली बसविण्यात येत आहे. त्यांनी भविष्यातील बदलांचा विचार करून एसटीमध्ये अमुलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतला आहे, असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

परिवहन महामंडळाच्या या ‘स्मार्ट बस’मध्ये प्रगत चालक सहाय्यक प्रणाली (ADAS) आणि चालक निरीक्षण केमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच 360 अंशातील सर्व माहिती चालकाला देणारे ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये प्रवासी भागात दोन, समोर आणि पाठीमागे प्रत्येकी एक कॅमेरा बसवण्यात आला आहे. तसेच चालक सहाय्यक स्क्रीन, मोबाईल जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी स्क्रीन आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

००००

ताज्या बातम्या

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला बाजार समितीतील ७.५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन...

0
नाशिक, दि. २३ :  राज्याचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर होत आहे. या यंत्रणेचा अभ्यास करून बाजार समितीमध्ये ही ए.आय. यंत्रणा विकसित करावी....

शिक्षणातील गुंतवणूक म्हणजे उज्ज्वल भविष्याची पायाभरणी – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

0
गडचिरोली,(जिमाका) दि.23: “शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही उद्याचे भविष्य निर्माण करणारी गुंतवणूक आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्पर्धात्मक ज्ञान वाढले पाहिजे, ते शहरातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परीक्षांत उतरतील...

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

0
मुंबई, दि. २३: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना 'केवायसी' प्रक्रिया पूर्ण करणे...

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

0
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई, दि. २३:  कोकण किनारपट्टीला आज सायंकाळी ५:३० पासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय...

अंदरसूल येथील मुलींच्या शाळा इमारतीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0
नाशिक,दि.२३: तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात अन्य देशांमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध भाषा अवगत कराव्यात....