बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 68

पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवात विविध उपक्रम राबविणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई दि.16: समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे, खऱ्या अर्थाने अंत्योदयांच्या माध्यमानेच लोकशाहीच्या उदिष्टांची पूर्ती होईल, हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. त्यांच्या विचारांवर आधारित पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे शासनाच्या सर्व  विभागांनी तसेच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा असे कौशल्य विकास,उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निर्देश दिले.

राज्यात 22 ते 25 एप्रिल2025 या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव राबवण्यात येणार आहे याबाबत मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी  मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाच्या अपर सचिव मनीषा वर्मा, दिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, दीनदयाळ संशोधन संस्थेचे सचिव अतुल जैन  उपस्थित होते.

दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. या महोत्सावासाठी शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन महोत्सव समिती स्थापन केली असून या समितीचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा अध्यक्ष आहेत. मानव कल्याण यासंदर्भातील  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे मौलिक विचार समाजात रुजावेत या उद्देशाने देशभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव साजरा  होणार आहे. देशभरात या महोत्सवाला सुरुवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी या बैठकीत दिली.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य, विचार प्रणाली, एकात्म मानवदर्शन आदींबाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पंडितजींच्या विचारांवर आधारित एक लाख पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या महोत्सवात ग्रामीण भागात बचतगट, अंगणवाड्या आणि शाळांमध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. तसेच गावातील स्वच्छता विषयक उपक्रम, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत योजना तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय  योजना पोहोचवण्यासाठी या महोत्सवात युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या महोत्सवात महिला व बाल विकास, शालेय शिक्षण, ग्रामविकास, सांस्कृतिक कार्य, आदिवासी विकास, पर्यावरण, पर्यटन या विभागाकडूनही या महोत्सवात विविध कार्यक्रमाद्वारे योगदान दिले जाणार आहे.

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जिल्हास्तरावर समिती स्थापन करून हा महोत्सव जिल्हाधिकारी यांनी  यशस्वी करावा, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मार्च महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १६ :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे मार्च २०२५ मध्ये २९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गुढीपाडवा (भव्यतम), ७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र सहयाद्री, १२ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी होळी विशेष, १९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गौरव, २१ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व २५मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आले असल्याचे वाशी येथील महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाचे उपसंचालक (वित्त व लेखा), यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत तिकीट क्रमांक GP-0५ / 19259 या महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. 50 लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक G 11 / 1590 या श्रीगणेश एंटरप्रायजेस, मुंबई यांचेकडून -विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.३५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहिर झाले आहे.

तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ५ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

मार्च- २०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १९३४८ तिकीटांना रू. १,६३,१३,५००/- व साप्ताहिक सोडतीतून ५५७०२ तिकीटांना रू. १,९९,७२,७००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी या  कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

मुंबई, दि. 16 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती पुढील महिन्यात दिनांक 31 मे, 2025 रोजी येत आहे. त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती  देणाऱ्या श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधान भवन येथे सभापती श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. यावेळी  मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची विशेष उपस्थिती होती. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तर दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर सर्व संबंधित विभागांची चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण करणे, त्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक करण्याच्या दृष्टीने या आराखड्यास प्राधान्य द्यावे.  चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्वार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्याने उपलब्ध करुन  देण्यात याव्या, याबाबतचा प्रस्ताव तत्परतेने सादर करण्याबाबत  सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी सूचित केले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले..

००००

वंदना थोरात/विसंअ

देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरु -उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १६ : डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून महाज्ञानदीप या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी  देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबईत ‘महाज्ञानदीप’ पोर्टलचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे  अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे, आयआयटी गांधीनगरचे प्रा. समीर सहस्त्रबुद्धे तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे संचालक उपस्थित होते. तसेच वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे या शुभारंभ कार्यक्रमास सहभागी झाले होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  ‘महाज्ञानदीप’ उपक्रमांतर्गत एक हजार (Massive open online course – MOOC) तज्ज्ञ प्राध्यापक घडवण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत १५० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी-२०२०) अंतर्गत ‘भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिक’ (आयकेएस – इंडियन नॉलेज सिस्टीम- जेनेरिक) हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केला आहे. हा अभ्यासक्रम या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून जगभरातील  विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन सहज एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमामध्ये  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई यांचा समावेश आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

शेतमालाच्या खरेदीसाठी राज्य सहकारी पणन महासंघाने व्यावसायिक वृत्ती अंगिकारावी – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १६ : शेतीमालाची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची मोठी जबाबदारी आहे. आपले महत्त्व आणि गतवैभव टिकवून ठेवण्यासाठी तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महासंघाने व्यावसायिक आणि सकारात्मक मानसिकतेने काम करावे. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या पदभरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

मंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील, सरव्यवस्थापक (प्रशासन) आनंद ऐनवाड, सरव्यवस्थापक (मालमत्ता) नितीन यादव, सरव्यवस्थापक (खरेदी) देविदास भोकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले, महासंघाची स्थापना १९५८ मध्ये झालेली असून महासंघाच्या उद्दिष्टांमध्ये काळानुसार बदल करणे आवश्यक आहे. महासंघाने व्यवसाय वाढविण्यासाठी सकारात्मक विचार करावा. तालुका पातळीवरील खरेदी विक्री संघ हा पणन महासंघाचा घटक असल्याने महासंघाने राज्य शासन आणि खरेदी विक्री संघ यांच्यामधील दुवा म्हणून काम करावे. यासाठी खरेदी विक्री संघाला एकत्र घेऊन त्यांच्यामध्ये विश्वास जागवावा.

ज्या राज्यांमध्ये पणन महासंघाचे काम चांगले आहे त्या राज्यांच्या कामाचा अभ्यास करण्याची सूचना करून मंत्री श्री. रावल यांनी आपल्या राज्यातील शेतीमालाची विक्री होण्यासाठी इतर राज्यांना येथे निमंत्रित केले जाईल असे सांगितले. ते म्हणाले, पणन महासंघ आणि तालुका पातळीवरील खरेदी विक्री संघामार्फत जास्तीत जास्त शेतमालाची खरेदी होईल यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र शासनाच्या योजनांमधून व्यवसाय मिळविता येईल का त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

महासंघाच्या मालमत्ता सुस्थितीत ठेवून शक्य त्या ठिकाणी त्या भाडेतत्वावर द्याव्यात, आठवडी बाजारांसाठी जागा मिळवून देण्यात महासंघाने समन्वयकाची भूमिका बजावावी, याद्वारे महासंघाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. मालमत्तांचा सुयोग्य वापर होण्यासाठी पणन महामंडळ आणि वखार महामंडळाचे सहकार्य घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.रावल यांनी यावेळी सांगितले.

व्यवस्थापकीय संचालक श्री. डुबे पाटील यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे पणन महासंघाच्या कार्याची माहिती दिली. महासंघाकडील ५११ पदांपैकी केवळ १०४ पदे कार्यरत असून इतर पदांची भरती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महासंघाच्या गोदामांची तसेच इतर मालमत्तांची दुरुस्ती होण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यात या वर्षी सोयाबीनची सर्वाधिक खरेदी झाली असून देशात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. यामध्ये राज्य सहकारी पणन महासंघाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल्याबद्दल मंत्री श्री. रावल यांनी महासंघाचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन केले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा नगरपालिका क्षेत्रात “वार्ड भेट समस्या समाधान अभियाना”च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद

Ø 75 नगरपालिकेतून नागरिक सहभागी

Ø  नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासन नागरिकांसोबत

छत्रपती संभाजीनगर, दि.15 एप्रिल, (विमाका) :- पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, घरकुलासाठी जागेची अडचण, नगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा, रस्ते यासह नागरी क्षेत्रातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी आज नागरिकांनी थेट विभागीय आयुक्तांसमेार मांडल्या. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांनी मांडलेल्या अडचणी तत्परतेने मार्गी लावण्यासोबतच याबाबतचा अहवाल दोन दिवसात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करावा, असे निर्देश दिले.

विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी नागरिकांना अडचणीच्या काळात प्रशासन कायम आपल्यासोबत असेल, असा दिलासा दिला. मराठवाड्यातील अनेक नगर पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.

मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील नागरिक आपल्या वार्डातील अडचणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतला आहे. नगरपालिका क्षेत्रात कवार्ड भेट समस्या समाधान अभियाना”च्या माध्यमातून आज संवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त ॲलिस पोरे, सहायक आयुक्त संजय केदार उपस्थित होते.

नागरिकांनी नगर विकास विभागाशी सबंधित योजना, प्रश्न, असलेल्या अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण तसेच याबाबत असलेल्या अडचणीबाबत थेट विभागीय आयुक्त यांच्याशी संवाद साधला.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नगर परिषदेत क्षेत्रातील नागरिकांनी संवादात सहभाग घेतला. यावेळी रमाई आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल योजनेसाठी जागेचा विषय मांडण्यात आला.  याबाबतची माहिती तात्काळ संकलित करून नगर प्रशासन विभागाने याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. गेवराई,केज येथील नागरिकांनी घरकुल योजनेबाबत चर्चेत सहभाग घेतला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर नगर परिषदेअंतर्गत लाभार्थी नागरिकांनी आम्ही गरीब लोक आहोत, आम्हाला घरकुल मिळाले मात्र घरकुलासाठी मिळणारी लाभाची रक्कम कमी पडते, त्या रकमेत वाढ करावी अशी मागणी केली. त्यावर याबाबत धोरणात्मक निर्णयासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे विभागीय आयुक्त श्री.गावडे म्हणाले.  कन्नड नगर परिषदेने पीएम स्वनिधी योजनेत पथदर्शी काम केल्याबद्दल विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच खुलताबाद नगर परिषदेच्या माध्यमातून उत्तम काम सुरू असल्याचे लाभार्थी म्हणाले. याबाबतही प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

धाराशिव नगर परिषदेअंतर्गत शबरी आवास योजनेतून आम्हाला घरकुल मिळाल्याचे समाधान लाभार्थी व्यक्त करत होते, आम्हा पारधी समाजासाठी जिल्हाधिकारी व मुख्यधिकारी यांनी ही योजना यशस्वी केली त्याबद्दलचे समाधान लाभार्थी व्यक्त करत होते. तर बचत गटातून आम्ही स्वत:च्या पायावर उभे राहिलो अशा यशोगाथाही महिलांनी सांगितल्या. तुळजापूर येथील महिलांनी संवादात सहभाग घेत आम्ही बचत गटाच्या माध्यमातून माळा बनविण्याचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. या व्यवसायासोबत आम्हाला उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण करण्यासाठी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबत विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभ्यास करून याबाबत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले. लोहारा नगर परिषदेच्या क्षेत्रातील लाभार्थी महिलेने घराबाबतच्या अडचणी मांडल्या. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करतो मात्र मार्केटींगची अडचण असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. मार्केटिंग बाबत प्रशिक्षण तसेच यामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पीएम स्वनिधी अंतर्गत पहिले कर्ज मिळाले मात्र दुसऱ्या हफ्त्याचे कर्ज मिळाले नाही अशी तक्रार केली.  याबाबत तात्काळ अहवाल सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले.

हिंगोली नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पीएम स्वनिधी योजनेतून आम्हाला 10 हजार, 20 हजार, 50 हजार असे तिनही लाभ मिळाले आहेत, यात रोजगारात आम्ही सक्षम झालोत, अशी यशोगाथा लाभार्थ्यांनी सांगितली. औंढा नागनाथ नगर परिषदेअंतर्गत येत असलेल्या लाभार्थ्यानी पीएम विश्वकर्मा योजनेबाबत झालेल्या लाभाची माहिती दिली.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील लाभार्थ्यांनी प्रलंबित असलेल्या घरकुल योजनेबाबतची अडचण मांडली. तसेच महिला लाभार्थ्यानी पीएम स्वनिधी व बचत गट योजनेला नागरी भागात गती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. बचत गटाला कर्ज मिळावे, दोन वर्षापासूनचा प्रस्ताव प्रलंबित आहे अशी अडचण मांडताच विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी याबाबत मुख्याधिकारी यांनी पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावावा असे निर्देश दिले. औसा नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी घरकुलासाठी अनुदान पुरत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच शहरात अंगणवाड्यांची संख्या वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नागरिकांच्या या अपेक्षेबाबत नगर प्रशासन विभागाने तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिल्या. नळदुर्ग येथे शहरात दहा दिवसाला पाणीपुरवठा होत असल्याचे महिलांनी सांगितले त्यावर स्थानिक प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन करून दहा दिवसाचे अंतर कमी करावे अशा सूचना विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दिल्या.

जालना जिल्ह्यातील अंबड येथील नागरी क्षेत्रातील नागरिकांनी घरकुल योजना, तसेच पीएम स्वनिधी, कर्जप्रकरणे याबाबतच्या अडचणी मांडल्या. जिल्हा प्रशासनाने याबाबत लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. बदनापूर येथील नागरिकांनी घरकुलासाठीचे अनुदान वाढवावे तसेच आमच्या सोबत आमच्या इतर सहकाऱ्यांनाही लवकरात लवकर घरकुल मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबतही विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत.

 नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी चर्चेत सहभाग घेत पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला असून लाभाची रक्कम वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुखेड नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला मात्र कराची रक्कम जास्त लावण्यात आली ती कमी करा अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबत नगर प्रशासन विभागाने कराबाबत तपासणी करून नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. बचत गटाला मानव विकास योजनेतून कांडप मशीन उपलब्ध करून देण्यात आले व त्या माध्यमातून तयार होणारे उत्पादन थेट मुंबईच्या बाजारपेठेत विकले जात असल्याचे समाधान महिलांनी व्यक्त केले.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजने बाबत कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. घरकुलासाठीच्या पाटबंधारे विभागाच्या जागेचा प्रश्न प्रलंबित आहे तो मार्गी लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबत जिल्हा प्रशासनाने लक्ष घालुन कार्यवाही करावी असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. जिंतूर येथूनही नागरिकांनी चर्चेत सहभाग घेतला.  मराठवाड्यातील नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांनी ऐवढ्या मोठ्या संख्येत शांततेत व शिस्तबद्ध पध्दतीने सहभाग नोंदविल्याबद्दल विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी नागरिकांचे आभार मानले. तसेच ज्या नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांशी आज संवाद होऊ शकला नाही त्यांच्याशी येत्या 15 दिवसात संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

******

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शुक्रवारी पुण्यात समारंभ  क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार २०२३-२४
मुंबई दि. १५ : सन २०२३-२४ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंत्रालयात केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक विजेते (आर्चरी) आदिती स्वामी, ओजस देवतळे , क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल यांना  शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरविले जाणार आहे. एकूण ८९ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.
पुण्यात शुक्रवार १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता  म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार समारंभ होईल. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,  विधान सभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे. अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सन २२०२२-२३ व २०२३-२४ अशा दोन वर्षांच्या पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली आहे.
मुंबईत आज शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह  उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक-जिजामाता पुरस्कार,  खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार  असे एकूण ८९ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. १८ खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जीवन गौरवसाठी पाच लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी तीन लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे.
पुरस्काराच्या घोषणेनंतर मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची गौरवशाली परंपरा आहे. पुण्यात दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार देण्यात येणार आहे.
२००१ पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराची परंपरा सुरू झाली. पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.१९७९  ते १९८२ कालावधीत १०६ राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा  विक्रम खटावकर यांनी केला होता. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल आठ वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. १९७८ मध्ये केंद्र शासनाच्या अर्जून पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
टिप – शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२३-२४ यादी सोबत जोडली आहे. (शासन निर्णय)

बनावट शालार्थ आयडी प्रकरणी संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा -शालेय शिक्षण विभागाची माहिती

मुंबई दि. १५ – नागपूर जिल्ह्यामधील बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता सर्व संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त यांना देण्यात आले असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये २०१९ पासून सुमारे ५८० प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे आदेश तसेच शालार्थ आयडी प्रदान करण्याच्या आदेशांची कोणतीही शहानिशा न करता बनावट शालार्थ आयडी प्रदान करण्यात आल्याबाबत विविध माध्यमांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याअनुषंगाने शिक्षण विभागामार्फत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांनी २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या आदेशान्वये विभागीय अध्यक्ष नागपूर विभागीय मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती. त्यानुसार चौकशी अधिकारी यांनी सन २०१९ पासून बनावट शालार्थ आयडी प्रदान झालेल्या एकूण ५८० प्राथमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची यादी विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या कार्यालयास उपलब्ध करुन दिली आहे.

या यादीची तपासणी केली असता विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या कार्यालयाकडून शालार्थ आयडीचे आदेश निर्गमित झालेले नसताना ऑनलाईन शालार्थ प्रणालीचा पासवर्ड हॅक करुन किंवा गैरवापर करुन शालार्थ आयडीचे ड्राफ्ट जनरेट केल्याची बाब निदर्शनास आल्याचे तसेच आहरण व संवितरण अधिकारी लेखाधिकारी यांचा शालार्थ लॉगीन आयडी व पासवर्डचा गैरमार्गाने वापर करुन संबंधित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नावाचा ड्राफ्ट शालार्थ प्रणालीमध्ये टाकून सदर ड्राफ्ट शाळेकडे फॉरवर्ड करुन अधीक्षक वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक) जिल्हा परिषद नागपूर यांनी अॅप्रुव्हड करून वेतन देयक व थकीत देयक काढल्याचे निदर्शनास आले असल्याचे दि. ७ मार्च २०२५ च्या पत्रान्वये शिक्षण आयुक्त यांच्या कार्यालयास कळविले आहे.

शिक्षण आयुक्त कार्यालयाने १० मार्च २०२५ च्या पत्रान्वये सदर प्रकरणामध्ये शासकीय निधीचा अपहार झाल्याबाबतचा अहवाल शासनास सादर केला आहे. त्यानुषंगाने वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक) जिल्हा परिषद नागपूरचे अधीक्षक निलेश वाघमारे यांचा उपरोक्त नमूद शासकीय निधीच्या अपहारामध्ये सहभाग असल्याचे चौकशीमध्ये आढळून आले असल्याने त्यांच्याविरुद्ध तसेच सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच ९ एप्रिल २०२५ च्या आदेशान्वये निलेश वाघमारे यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर कार्यालय शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) नागपूर कार्यालय अधीक्षक वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक) जि.प. नागपूर कार्यालयातील संबंधित सर्व अधिकारी/ कर्मचारी तसेच खासगी अनुदानित शाळांमधील जबाबदार कर्मचारी/ पदाधिकारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निर्देश शिक्षण आयुक्त यांना देण्यात आले असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००

बी.सी.झंवर/विसंअ

मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्र उभारणार

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यात आज मंत्रालय येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.

या कराराअंतर्गत राज्यात तीन AI कौशल्य व उत्कृष्टता केंद्रे उभारली जाणार असून त्यामध्ये मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठी, पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी तर नागपूरमध्ये प्रगत AI संशोधन व MARVEL अंमलबजावणी तंत्रज्ञानासाठी केंद्रे स्थापन केली जाणार आहेत.

या भागीदारीचा उद्देश सार्वजनिक सेवा वितरण अधिक परिणामकारक, वेगवान व नागरिक-केंद्रित बनवणे हा असून, AI, हायब्रिड क्लाऊड, डेटा अ‍ॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर यामध्ये केला जाणार आहे.

या कराराद्वारे व्हर्च्युअल सहाय्यक आणि एजेन्टिक AI च्या साहाय्याने शासकीय सेवा अधिक सुलभ आणि वैयक्तिक करण्यात येणार आहे. AI मॉडेल्सवरील मालकी हक्क महाराष्ट्र शासनाकडे असणार असून, तंत्रज्ञानावर शासनाचे पूर्ण नियंत्रण राहणार. जनरेटिव्ह AI चा वापर करून प्रशासकीय प्रक्रिया अधिक आधुनिक, अंदाजाधारित व पारदर्शक बनवली जाणार असून हायब्रिड क्लाऊड, ओळख व्यवस्थापन आणि सुरक्षित नागरिक प्रवेश प्रणाली यांवर विशेष भर दिला जाणार आहे.

IBM च्या प्रशिक्षण प्लॅटफॉर्मचा उपयोग करून सरकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांना AI, सायबर सुरक्षा व क्लाऊड तंत्रज्ञान यामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.

त्याचबरोबर MSME आणि उद्योग क्षेत्राला AI व ऑटोमेशन स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार, ज्यामुळे उत्पादनक्षमता व स्पर्धात्मकता वाढेल.

या सामंजस्य कराराच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आयबीएमचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.

लघु सिंचन योजनांसह,जलसाठ्यांच्या प्रगणनेचे काम यंत्रणांनी समन्वयाने करावे-जिल्हाधिकारी आंचल गोयल

मुंबई, दि १५ :- लघु सिंचन योजनांची व जलसाठ्यांचे प्रगणनेचे काम विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.

लघु पाटबंधारे योजनांची सातवी प्रगणना व जलसाठ्यांची प्रगणना कामांबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस ठाणे जिल्ह्याचे जलसंधारण अधिकारी तथा समन्वय समितीचे सदस्य सचिव फरीद खान, उपसचिव सुशील महाजन यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

जल व्यवस्थापनामध्ये जलसाठ्यांच्या प्रगणनेला अधिक महत्व असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती गोयल म्हणाल्या, प्रगणनेद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे भविष्यातील नवीन लघु सिंचन योजनांसाठी व पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सुयोग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. लघुसिंचन योजनेची सातवी प्रगणना, जलसाठ्यांची दुसरी प्रगणना आणि मोठ्या व मध्यम प्रकल्पाची पहिली प्रगणना मुंबई शहर जिल्ह्यासाठी प्रथमच होत आहे. जलसाठ्यांच्या प्रगणनेचे हे काम सहा महिन्यात पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. प्रगणनेच्या कामासाठी प्रगणक व परीक्षकांची नियुक्ती करून त्यांना पुढील आठवड्यात याबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे. त्यानंतर त्वरित प्रगणेनेच्या कामास सुरुवात करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी दिल्या.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...