बुधवार, जुलै 23, 2025
Home Blog Page 70

आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या

बुलडाणा, (जिमाका) दि. २०:  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२  व राज्य शासनाच्या आवास योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 1 लाख 20 हजाराहून जास्त घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी कामांना गती देण्याचे व घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे दिले.

प्रधानमंत्री आवास योजना व विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बि.एम. मोहन, संजय इंगळे तसेच गटविकास अधिकारी, कृषी सेवक व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शहरी व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनांच्या सद्यस्थिती व अंमलबजावणीची माहिती घेऊन प्रधान सचिव डवले म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर केले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांकडून आवश्यक ती कारवाई पूर्ण करुन घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. आवास योजनांसाठी जमिनींच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष घालावे. केंद्र व राज्य शासनाच्या आवास योजना वेळेत व पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. गुणवत्ता आणि उत्तरदायित्व हाच जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा पाया असायला हवा, असे प्रतिपादन एकनाथ डवले यांनी केले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक व टप्पा दोनमध्ये जिल्ह्यात अपूर्ण घरकुलांची संख्या अधिक आहे. विविध कारणांमुळे विभागातील अपूर्ण असलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक कशोशीने प्रयत्न करावे. समाजातील प्रत्येक गोर-गरीब घटकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने अटी कमी केल्या आहेत. घरकुलांची उद्दीष्टपूर्ती होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदने चांगली कारगिरी करुन उद्दीष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन डवले यांनी केले. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास योजनाचा आढावा घेऊन आवासाचे प्रलंबित असलेले कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश डवले यांनी दिले.

०००

उद्योगस्नेही वातावरणातून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर दि. २०: राज्यात अधिकाधिक गुंतवणूक यावी यासाठी उद्योगांना सर्व ते सहकार्य करण्याचे शासनाचे धोरण आहे. उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध प्रशासकीय विभागांनी समन्वय ठेऊन एकत्रित प्रयत्न करावेत, उद्योगस्नेही वातावरणातून छत्रपती संभाजीनगर महानगरासह मराठवाडयाच्या विकासाला चालना मिळेल,यासाठी सर्व मिळून मिशन मोडवर काम करूया, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.

ऑरिक सिटी येथे शेंद्रा-बीडकीन उद्योग वसाहतीत येणाऱ्या उद्योगांच्या अडचणीबाबत विभागीय आयुक्त पापळकर यांनी आज उद्योजकांशी संवाद साधत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, डीएमआयसी सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. भामरे, औद्योगिक विकास एमआयडीसीचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, व्यवस्थापक महेश पाटील, उपविभागीय प्रांत अधिकारी व्यंकट राठोड, पैठणच्या उपविभागीय प्रांत अधिकारी निलम बाफना यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले, मराठवाड्यात अधिकाधिक गुंतवणूक वाढावी, यादृष्टीने उद्योगांना आवश्यक ते सहकार्य तसेच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने उद्योजक व प्रशासन यामध्ये संवाद महत्त्वाचा आहे. उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने संवाद साधण्यात येईल. बैठकीत उद्योजकांनी मांडलेल्या अडचणींवर संबंधित विभागांनी विहित कालमर्यादेत कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर ते पुणे रस्त्यांवरील वाहतूक सुलभ व्हावी, यादृष्टीने नियोजन करावे, तसेच वाहतुकीच्या अनुषंगाने तात्काळ करण्यासारख्या उपाययोजना हाती घेऊन उद्योगांना वाहतूक कोंडीपासून दिलासा द्यावा, विभागात उद्योग उभारणी, त्यांच्या पायाभूत सुविधांच्या अडचणी, याबाबत सातत्याने उद्योगांशी संवाद साधण्यासाठी प्रशासन कायम उपलब्ध आहे, असेही विभागीय आयुक्त पापळकर यांनी सांगितले.

 

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शेंद्रा-बीडकीन येथील उद्योजकांच्या प्रशासकीय प्रलंबित विषयाबाबत दोन दिवसीय शिबिर घेत त्या सोडविण्यात येतील. छत्रपती संभाजीनगर उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासोबतच उद्योग वाढीसाठी प्रशासन उद्योजकांसोबत आहे, असे ते म्हणाले.

यावेळी मासिआ या उद्योजक संघटनेचे प्रतिनिधीही आपल्या अडचणी मांडल्या. उद्योजकांनी मांडलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आपल्या सोबत आहे, उद्योगांच्या वाढीला चालना देण्यात मासिआची भूमिकाही महत्त्वाची असेल, असेही  विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले.

ऑरिक सिटी येथील नियंत्रण कक्षाची विभागीय आयुक्तांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. व्यवस्थापक महेश पाटील यांनी या कक्षाबाबत माहिती दिली.

यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, उद्योजक तसेच उद्योजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

पुणे दि.२१: आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे शुक्रवार (२०) रोजी दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली.

मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, पालखी विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त प्रमोद बेंगरूट, शिवाजीराव जगदाळे, गोरख भिकुले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारी निमित्त पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी विठ्ठल नामाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे विठ्ठल मंदिरात आगमन झाले. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वारकरी व भक्तगण उपस्थित होते.

०००

 

आर्थिक महाशक्ती होताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान – केंद्रीय मंत्री अमित शाह

मुंबई, दि. २०: देशाच्या नीती निर्धारणांमध्ये मूलगामी बदल घडविले असून भारतास २०२७ पर्यंत जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती म्हणून स्थान संपादन करताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान राहील, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या शताब्दी वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित ‘सहकारी व शासकीय औद्योगिक वसाहती राज्यस्तरीय परिषदे’चे उद्घाटन व मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री शाह बोलत होते.

परिषदेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

गृहमंत्री शाह म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या विकासात्मक कामांमुळे मुंबईच्या पायाभूत विकासात अमुलाग्र बदल होत आहेत. मेट्रो, अटल सागरी सेतू, कोस्टल रोड करतानाच पुनर्विकासाची कामे वेगात सुरु आहेत. यामुळे मुंबईची पूर्वीची ट्रॅफिक, वाढत्या लोकसंख्येमुळे होणारी चिंताजनक स्थिती बदलू लागली आहे. देशात विकासासाठी सर्व क्षेत्रात काम करताना, महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राने लॉजिस्टिक पार्क, देशातील ११ पैकी तीन औद्योगिक कॉरीडोर, बारा पैकी सात टेक्स्टाईल पार्क महाराष्ट्रात दिले आहेत. वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पंचवीस हजार करोड रुपये उपलब्ध केले आहेत. विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळ संपवून समृद्धी आणली जाईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सकारात्मक काम होत आहेत.

केंद्र व राज्यात समान विचारांचे सरकार असल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा वेग प्रचंड वाढला आहे. केंद्र सरकारने विविध अनुदानांच्या निधीतून राज्यामध्ये मोठी रक्कम विकासासाठी दिली आहे. यामध्ये पायाभूत विकासासाठी १० लक्ष करोड रुपये दिले असून केंद्र पुरस्कृत योजनांची अनुदान, राजस्व तूट अनुदान (devolution grant) याचा उल्लेख करता येईल. असे सांगून केंद्रीय मंत्री शाह यांनी राज्यासाठी दिलेल्या विविध निधीची माहिती दिली.

केंद्रीय मंत्री शाह म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नीती निर्धारण धोरणामुळे आर्थिक विकासाबरोबरच भारताचा ‘ पासपोर्ट’  शक्तिशाली झाल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. विदेशात भारतीयांचे स्वागत हसून होत असून सन्मान मिळत आहे.

इंग्रज सत्तेच्या काळात उद्योग व विकासासाठी चेंबर्स ऑफ कॉमर्स ने केलेले काम बहुमोल असून पुढे येणाऱ्या शंभर वर्षात देखील देशाच्या अर्थव्यवस्थेला उच्च स्थानावर नेण्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी निभावेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्योजक व व्यापाऱ्यांच्या योगदानामुळे महाराष्ट्र हे देशातले अग्रेसर राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्याने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करताना अर्धा टप्पा पार केला आहे. देशाच्या ३१ टक्के परकीय गुंतवणूक मिळवण्यात देखील राज्याचा वाटा आहे. सर्वात जास्त वस्तू व सेवा कर जमा करणारे महाराष्ट्र राज्य असून या अग्रेसर राहण्यामध्ये राज्यातील उद्योग व व्यापाऱ्यांचे योगदान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उद्योग व व्यापारासाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य राहिले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर यांनी पारतंत्र्याच्या काळापासून शंभर वर्षाच्या वाटचालीमध्ये देशाच्या उद्योग व विकासाचे भारतीयकरण होण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. हे एकमेव असे चेंबर ऑफ कॉमर्स आहे की, ज्यामध्ये कृषीचा देखील समावेश आहे. येथून पुढे देखील आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार, उद्योग, शेती विकासामध्ये संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राने मोठी भूमिका बजावली असून राज्याची अर्थव्यवस्था १२ लक्ष कोटी रुपयांवरून चाळीस लक्ष कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

व्यापार व उद्योगासाठी सुरक्षित वातावरण देणारे राज्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करतानाच, विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून व्यापार व उद्योगासाठी पोषक वातावरण तयार केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ऑपरेशन सिंदूर आणि गृहमंत्री शाह यांनी नक्षलवाद पूर्णपणे मिटवून टाकण्यासाठी केलेले काम, अशा सुरक्षित व आशादायी वातावरणात राज्यात सहकारातून समृद्धीकडे जाणारे वातावरण तयार झाले आहे. केंद्रीय मंत्री शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्राचा कायापालट करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जात आहे. तात्काळ निर्णय घेणारे आणि उद्योग वाढीसाठी सुरक्षित वातावरण देणारे हे राज्य आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शताब्दी वर्षानिमित्त गौरव चिन्हाचे अनावरण

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या शताब्दी वर्षानिमित्त गौरव चिन्हाचे अनावरण करण्यात आले. त्यांच्या हस्ते संस्थेच्या मुख्यालयाच्या नूतनीकृत इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच संस्थेच्या प्रमुख विश्वस्त व सभासदांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाचा’ कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास विभाग’ आणि ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर’ मध्ये यावेळी  सामंजस्य करार करण्यात आला.

०००

किरण वाघ/विसंअ/

 

 

पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात विचारवंत दिले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. २० : पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात थोर विचारवंत व क्रांतिकारक दिले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लाल – बाल – पाल या त्रयींसह महाराष्ट्र, पंजाब व पश्चिम बंगालने देशाला नेतृत्व प्रदान केले, असे नमूद करून  विकसित भारताचे लक्ष्य गाठताना देखील महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल मोठे योगदान देईल, असा विश्वास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते.

पश्चिम बंगाल देशातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असून या राज्याने देशाला वैज्ञानिक, चित्रपट निर्माते, संगीतकार व कलाकार दिले आहेत. बंगालने देशाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. मेघनाद सहा, हिरेन मुखर्जी, प्रणब मुखर्जी, सोमनाथ चॅटर्जी यांसारखे संसदपटू दिले असे सांगून आपल्याला प्रणब मुखर्जी व सोमनाथ चॅटर्जी यांच्या कार्यकाळात काम करण्याची संधी मिळाली असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी नमूद केले.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालच्या लोकसंस्कृतीचे लोकगीत व नृत्याच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव करुणा वावडणकर यांनी आभार मानले. राज्यपालांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. केदारनाथ कळवणे, मुंबईतील बंगाली भाषिक निमंत्रित, विद्यापीठाचे विद्यार्थी, कलाकार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांनी यावेळी सजीव चित्रकला सादर करीत आपल्या कलाकृती राज्यपालांना भेट दिल्या.

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालचे ‘एलो दुर्गा माँ’ लोकगीत, रवींद्रनाथ टागोर यांच्या दृष्टीतून पश्चिम बंगाल हे एकपात्री सादरीकरण, रैबेनशे लोकनृत्य व मुलींचे झुमर लोकनृत्य सादर केले.

०००

महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल

मुंबई, दि. २०: महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिल्या. किनारपट्टीच्या विकासासाठी केंद्रीय आणि राज्य विभागाची एकत्रित बैठक हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले.

राज्यातील बंदर विकास आणि महत्त्वाच्या प्रकल्पांविषयी केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री राणे यांच्या उपस्थितीत केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांची एकत्र बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री सोनोवाल आणि राज्याचे मंत्री राणे बोलत होते.

बैठकीस बंदरे व परिवहन सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, जेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ, एमबीपीटीचे उपाध्यक्ष आदेश तितारमारे, डिजिसीएचे महासंचालक श्याम जगन्नाथ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले की, सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात भरपूर संधी आहेत. महाराष्ट्रातील बंदरे क्षेत्रातील प्रकल्प महत्वाचे असून त्यासाठी लागणाऱ्या परवानगी लवकर देण्यात याव्यात. रेल्वे आणि रस्ते मार्गाने बंदराची जोडणी करणारे प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत. सागरमाला अंतर्गत महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेले प्रकल्प २०२६ सालापर्यंत पूर्ण करावेत.

मंत्री राणे म्हणाले की, केंद्रीय विभागांची परवानगी वेळेत मिळण्यासाठी दोन्ही विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच ही परवानगी मिळणे सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न व्हावे. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन खर्चात बचत होईल. आजची बैठक ही सकारात्मक झाली असून यामुळे राज्यातील बंदर विभागाची कामे गतीने मार्गी लागतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीमध्ये वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रकल्प, आनंदवाडी बंदर, रो रो सेवा, वॉटर टॅक्सी, अंतर्गत जलमार्ग,  जेटीचे प्रश्न याबाबत चर्चा झाली.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांना नियमित करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. २०: ज्या शिल्प निदेशकांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विभागामध्ये कार्य केले आहे, त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे, असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना दिले आहेत.

माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी तासिका निदेशकांना नियमित करण्याबाबत मंत्री लोढा यांना पत्राद्वारे विनंती केली होती. यानंतर मंत्री लोढा यांनी या पत्राची तातडीने दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक चर्चा करून योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने सुद्धा या संदर्भात मंत्री लोढा यांची सदर विषयाबाबत भेट घेतली. सद्य:स्थितीत अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तासिका तत्वावर कार्यरत निदेशकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. तासिका तत्वावर काम करणाऱ्या निदेशकांची ५ वर्षे व त्याहून अधिक काळ ज्यांची सेवा झाली आहे किंवा किमान पात्रता (ITI, CTI, पदविका व पदवी) धारण करतात, त्यांची परीक्षा घेऊन नियमित करण्यात यावे, असे निवेदन महासंघाने दिले होते.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सवा’त पाच आरजे घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत

मुंबई, दि. २०: जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देशातील पहिला ‘सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव’ व ‘महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रसिद्ध पाच आरजे (रेडिओ जॉकी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

शनिवार २१ जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे दुपारी २ वा. वाजता हा सोहळा होणार असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे. महाराष्ट्र भूषण आशा भोसले, प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्यासह रेडिओ आणि गीत संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून प्रथमच अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम होणार असून रेड एफएमचे आरजे सिद्धू, मॅजिक एफएमचे आरजे अक्की, रेडिओ सिटीच्या आरजे अर्चना, रेडिओ मिर्चीच्या आरजे प्रेरणा आणि बिग एफएमचे आरजे अभिलाष हे मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमाचे समन्वय हेनल मेहता करणार आहेत.

यावेळी प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात ‘आशा रेडिओ गौरव पुरस्कार’ हा संगीत क्षेत्रातील दिग्गज असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण आशा भोसले’ यांच्या नावाने देण्यात येणार आहे. यासह आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडिओ निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मराठी निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम आणि आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम अशी या पुरस्कारांची नावे असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार हे नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात आली होती. मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

दुसऱ्या भागामध्ये रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्याच्या पार्श्वभूमीत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी किस्से यांचे सादरीकरण प्रथितयश कलाकारांच्या माध्यमातून होईल. सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे अशा नावाजलेल्या कलाकारांच्या सादरीकरणातून सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे. सर्व रेडिओप्रेमींनी आणि रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान

मुंबई, दि. २०: आगामी आषाढी एकादशी वारी करिता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण १४०० दिंड्यांना प्रति दिंडी २०,००० रुपये या प्रमाणे २ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील १४ जून आणि १७ जून २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.

वारी अनुदानासाठी निधी हा अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत वितरित करण्यात आलेला नसून सर्वसाधारण योजनेतील जाहिरात व प्रसिद्धी राखीव असलेल्या निधीतून उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी आरक्षित निधीवर कोणताही अन्याय झालेला नाही, असे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने स्पष्ट केले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

202506171058571522 (1)

202506161502365422 (1)

सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला समृद्धीची दिशा – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

  • ‘पॅक्स’ आणि ‘एफपीओ’च्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • देशात २ लाख नव्या प्राथमिक कृषी पतसंस्था

मुंबई, दि. २० : “सहकार से समृद्धी” या आधारावर ग्रामीण भागात परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. देशात २ लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रत्येक गावात सहकारी संस्थांची माहिती डिजिटल डाटाबेसद्वारे संकलित करण्यात आली आहे. पॅक्स संस्थांना केवळ कृषीपुरते मर्यादित न ठेवता, २२ नव्या सेवा क्षेत्रांशी जोडण्यात येत आहे. यामध्ये जनऔषधी केंद्रे, गॅस वितरण, पेट्रोल पंप, रेल्वे तिकीट सेवा, टॅक्सी सेवा अशा सेवा क्षेत्रांचा समावेश आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सहकार परिषदेत केले.

मुंबईतील हॉटेल फेअरमोंट येथे ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार राज्यमंत्री पंकज भोईर, नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर, महाव्यवस्थापक अमित गोयल, व्यवस्थापकीय संचालक दीपक अग्रवाल, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, अन्नदाता शेतकरी बांधवांना सक्षम करण्यासाठी देशात पहिल्यांदाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. युनोने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केले. संपूर्ण जगासाठी सहकार ही आर्थिक व्यवस्थेची संकल्पना म्हणून पाहिले जाते. परंतु, भारतासाठी सहकार पारंपारिक जीवनशैलीत रुजलेले तत्वज्ञान आहे. एकत्र येणे, विचार करणे, काम करणे, समान ध्येयाकडे पुढे जाणे, आनंदात आणि दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे, हा भारतीय सहकाराचा आत्मा आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

‘नॅशनल टॅक्सी’ या आगामी सहकारी उपक्रमात टॅक्सी चालक हेच वाहनाचे मालक असतील आणि नफा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सहकाराच्या माध्यमातून महिला आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असून, देश सहकाराच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार हा प्रमुख आधारस्तंभ ठरेल, असेही केंद्रीय सहकार मंत्री शाह यांनी सांगितले.

‘पॅक्स’ आणि ‘एफपीओ’च्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहकारातून समृद्धीकडे महाराष्ट्राची वाटचाल सुरू असून राज्यात ‘पॅक्स’(प्राथमिक कृषी पतसंस्था) आणि ‘एफपीओ’(शेतकरी उत्पादक संस्था)च्या माध्यमातून विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. या योजनांमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ साखळी उपलब्ध होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने दिलेले उद्दिष्ट महाराष्ट्राने अधिक कार्यक्षमतेने पूर्ण केली आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करताना महाराष्ट्रासारखी ऐतिहासिक भूमी असूच शकत नाही.  महाराष्ट्राला १२० वर्षांची सहकाराची परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्र हा सहकार क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. भविष्यातही केंद्र सरकारने ठरवलेली सर्व मानके पूर्ण करण्याचा निर्धार महाराष्ट्र करेल. देशात प्रथमच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्राला नवसंजीवनी दिली आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात नवकल्पनांचे पर्व सुरू झाले आहे. पॅक्स (प्राथमिक कृषी पतसंस्था), एफपीओ (शेतकरी उत्पादक संस्था) यांच्या माध्यमातून सहकार गावागावात पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात नव्या आर्थिक संधी आणि रोजगारनिर्मितीस चालना मिळत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

धान्य, सोयाबीन आदी खरेदीत नाफेडने उत्तम कामगिरी केली आहे. परंतु, खरेदीच्या वेळी अनेकदा पोत्यांची कमतरता जाणवते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात, यासंदर्भात नाफेडने योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केल्या.

यावेळी ‘सहकार क्षेत्रातील नाफेडचे योगदान आणि सहकार चळवळीचे महत्त्व’ या विषयावर आधारित लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते पाच पॅक्स संस्थांना ‘नाफेड बाजार’ फ्रँचायझी सुरू करण्यासाठी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच पाच एफपीओंना इक्विटी अनुदानाचा धनादेश देण्यात आला.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अनेकांसाठी ‘जीवनदायी’….

0
आपल्या समाजात अनेक कुटुंबे अशी आहेत, ज्यांना अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारामुळे किंवा अपघातामुळे मोठे वैद्यकीय खर्च करावे लागतात. अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे अनेकांना योग्य...

वाढदिवशी मुख्यमंत्र्यांना गडचिरोली विकासाचा टिळा…

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस संपूर्णपणे गडचिरोली विकासासाठी समर्पित केला. तेथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन केले. वृक्षारोपणाच्या मोहीमेचा शुभारंभही केला. दरम्यान, दिवसभरात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर ‘कृषी समृद्धी योजना’ राबविणार – कृषी मंत्री ॲड....

0
मुंबई, दि. २२ : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर, “कृषि समृद्धी योजना”...

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

0
मुंबई दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार...