मंगळवार, एप्रिल 22, 2025
Home Blog Page 1631

दिलीप शिंदे लिखित ‘निवडणूक कायदेविषयक’ पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 19 : निवडणूकविषयक कायदे, आचारसंहिता, निवडणूकविषयक गुन्हे, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यासह निवडणूक प्रक्रियेबाबत समग्र माहितीचा समावेश असलेल्या निवडणूकविषयक कायदे आणि प्रक्रियाया पुस्तकाचे प्रकाशन काल भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या हस्ते झाले. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे (भा.प्र.से.) हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

श्री. अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा, वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त संदीप सक्सेना, उमेश सिन्हा, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार, सुदीप जैन, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल मुंबईत राज्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यावेळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाला श्री. अरोरा यांची प्रस्तावना असून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे पुस्तक ग्रंथालीप्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत तसेच राजकीय कार्यकर्ते ते सर्वसामान्य मतदार अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. पुस्तकात निवडणूक आयोगाची माहिती, मतदार नोंदणी प्रक्रिया आणि ओळखपत्रे, उमेदवारांची पात्रता, शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरणास बंदी, आचारसंहिता, निवडणूक विषय गुन्हे, राजकारणातील गुन्हेगारीस प्रतिबंध, प्रशासकीय यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम), टपाली मतदान, कायद्यातील नव्या सुधारणा, पेड न्यूज, उमेदवारांसाठी एक खिडकी योजना आणि मतदान जागृती कार्यक्रम याबाबत सविस्तर आणि सचित्र माहिती समाविष्ट आहे.

000

मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 19 : मतदार जागृती आणि मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा यांच्या हस्ते काल उद्घाटन झाले.

राज्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी श्री. अरोरा यांच्यासह भारत निवडणूक आयोगाचे अन्य निवडणूक आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी येथे आले होते. सह्याद्री अतिथीगृहात त्यांनी विविध बैठका घेतल्या.  त्यानंतर राज्यात लोकसभा निवडणुकीत राबविलेल्या विशेष उपक्रमांवर आधारित आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या’पारदर्शक, सुरक्षित, उत्साहीया नावाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. लोकसभा निवडणुकीमध्ये राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची उत्कृष्ट छायाचित्रे आणि माहिती या पुस्तकात समाविष्ट आहे. यावेळी मतदार जागृती वाहनाचे तसेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मोबाईल व्हॅनचे झेंडी दाखवून उद्घाटन केले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष पोस्ट तिकिट आणि टपाल आवरणाचे (कव्हर) प्रकाशनही यावेळी करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनित मतदार जागृती चित्रफितीचे उद्धाटनही याप्रसंगी करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा, संदीप सक्सेना, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार, सुदीप जैन, महासंचालक धीरेंद्र ओझा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, महाराष्ट्र परिमंडळाचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर आदी उपस्थित होते.

0000

सचिन गाढवे/ वि.सं.अ./दि.19.9.2019

निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा

विधानसभा निवडणूक-२०१९ च्या पूर्वतयारीचा भारत निवडणूक आयोगाने घेतला आढावा

मुंबई, दि. 19: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने करतानाच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज येथे सांगितले.

राज्यातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त श्री. अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा आणि भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी कालपासून मुंबईत आले होते. आज सायंकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी या बैठकांबाबत तसेच राज्याच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली.

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्राचे काम उल्लेखनीय झाले आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूकदेखील मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडेल असा विश्वास श्री. अरोरा यांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सुमारे 61 टक्के मतदान झाले होते. ते देशाच्या सुमारे 67 टक्के इतक्या सरासरीपेक्षा कमी होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना राज्यातील निवडणूक यंत्रणेला दिल्या आहेत.‍

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 18 ते 35 वयोगटातील मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या असून मतदार जागृतीच्या कार्यक्रमाला (स्वीप) अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात विविध पक्षांच्या सुमारे 1 लाख 28 हजार 216 इतक्या बूथ लेव्हल एजन्टची नेमणूक करण्यात आली आहे. मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी हे कार्यकर्ते निवडणूक यंत्रणेला मदत करतील. 

मतदान केंद्राच्या ठिकाणी वीज, पाणी आदी आवश्यक त्या सुविधा, दिव्यांग मतदारांसाठीच्या सुविधा पुरविण्याबाबत तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

आयोगाने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांच्यासह निवडणुकीसाठीच्या विविध यंत्रणांचे राज्यस्तरावरील प्रमुख अधिकारी, राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला. त्या अनुषंगाने श्री. अरोरा यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, आगामी निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 4 हजार 500 मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याबाबत राज्याने विशेष काम केले आहे. काही राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत वाढ करण्याची मागणी केली होती.‍ तथापि, सध्यातरी यामध्ये वाढ होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएम यंत्रे अत्यंत सुरक्षित असून त्यामध्ये कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाद्वारे छेडखानी करता येऊ शकत नाही, असे सांगून त्यांनी मतपत्रिकांद्वारे मतदान हा मुद्दा जुना झाला असल्याचे सांगून येणारी निवडणूक मतदान यंत्राद्वारेच होणार हे ठामपणे स्पष्ट केले.

निवडणुकीच्या तारखा निश्चित करताना शाळांच्या सुट्ट्या, परीक्षा तसेच सर्व धर्मांचे महत्त्वाचे सण विचारात घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. आदर्श आचारसंहितेतील तरतुदीनुसार कोल्हापूर, सांगलीमधील पुरामुळे बाधित लोकांच्या सुरू असलेल्या पुनर्वसन कार्यावर ‍परिणाम होणार नाही. तथापि, या अनुषंगाने अधिकची काही तरतूद करण्याबाबत मागणी केली गेल्यास त्याबाबत सहानुभूतीने विचार केला जाईल.

यावेळी श्री. सिन्हा यांनी निवडणुकीसाठी जिल्हास्तरावरील यंत्रणेची तरतूद, ईव्हीएम- व्हीव्हीपॅटची पुरेशी उपलब्धता, कायदा आणि सुरक्षा व्यवस्था,‍ उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर विशेष लक्ष ठेवणे, मतदान केंद्रावर सीसीटीव्ही, मतदार यादी अचूक करण्यासाठीचे प्रयत्न, संवेदनशील भागात सुरक्षेची विशेष व्यवस्था, सुविधा,‍ सी-‍ व्हिजील ॲप आदींबाबत माहिती दिली.

यावेळी वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा, संदीप सक्सेना, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार, सुदीप जैन, महासंचालक धीरेंद्र ओझा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

चौंडी मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भातील ती जाहिरात चुकीची : सार्वजनिक बांधकाम विभाग

0
मुंबई, दि. २२: चौंडी येथील प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीसाठी सुमारे 150 कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्यासंदर्भात लोकमतमध्ये प्रकाशित जाहिरात चुकीची आहे. कॅामा आणि टिंब यात...

डॉ. निधी पाण्डेय यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

0
 वर्ष २०२३-२०२४ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाची कामगिरी अमरावती, दि. २१ : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा २०२३-२०२४ मध्ये राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये ‘कार्यालयीन...

‘ई-पंचनामा ॲप’ या अभिनव उपक्रमासाठी विभागीय आयुक्तांचा सन्मान

0
नागपूर, दि. २१ :  नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने राबविलेल्या ‘ई-पंचनामा ॲप’ या अभिनव उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज...

नॉर्दन ब्रांच कालव्यावरील अतिक्रमण काढणार-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि.२१ - नॉर्दन ब्रांचच्या ४४ किलोमीटरच्या कालव्याच्या नूतनीकरणाच्या कामास आजपासून सुरुवात झाली असून यामाध्यमातून या कालव्यावरील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात येणार आहे. या कालव्यांच्या...

अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूर शहरासाठी कटिबद्ध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि.२१ - येत्या काळात श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहर हरित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे...