बुधवार, ऑगस्ट 6, 2025
Home Blog Page 1687

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र  विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी  ही निवडणूक ३० जानेवारी २०२३ राेजी होणार आहे. आजपासून या निवडणुकीची आचारसंहिता संबंधित पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात लागू करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

गुरुवार दि. ५ जानेवारी  २०२३ रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार  दि. १३ जानेवारी २०२३ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल, सोमवार दि. १६ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून गुरुवार दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होईल.

सर्वश्री डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), श्री.विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), श्री.नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), श्री. बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य ७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

000

गेट वे ऑफ इंडिया येथून उद्या सकाळी क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ

 मुंबई, दि. २९ :  महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून प्रारंभ होणार आहे. उद्या ३० डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.

            ३९ क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या या स्पर्धा राज्यातील निवडक शहरांच्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील स्पर्धा आयोजनाचा आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

            या बैठकीत मुंबईत होणाऱ्या स्पर्धांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून खेळाडूंना उत्तम मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे, आरोग्य सुविधा, तसेच स्पर्धा कालावधी दरम्यान मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेचे संबंधित यंत्रणांमार्फत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

            मुंबई शहरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर आपले क्रीडा नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत अधिकाधिक संधी प्राप्त व्हावी, स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी, उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्ह्याचा वार्षिक क्रीडा आराखडा तयार करुन नियोजन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

            मुंबई शहरात दि. ४ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत इंडियन जिमखाना, डॉन बॉस्को स्कूल किंग्ज सर्कल, माटुंगा येथे बास्केटबॉल स्पर्धा होईल. दि.१० ते १४ जानेवारी या कालावधीत गिरगांव चौपाटी येथे याटिंग क्रीडास्पर्धा होईल.

            उद्या ३० डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी ७.३० वा. क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ होणार आहे. या रॅलीमध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कारप्राप्त नामांकित खेळाडू, एनसीसी कॅडेटस्, आर्मी याटिंग नोडचे क्रीडापटू, क्रीडा अधिकारी, नेहरु युवा केंद्राचे खेळाडू, विविध शाळांतील उद्योन्मुख खेळाडू अशा सुमारे ५०० क्रीडापटूंचा सहभाग असेल.

            या स्पर्धा मुंबईसह राज्यातील नाशिक, नागपूर, जळगांव, अमरावती, औरगांबाद या जिल्ह्यांमध्ये होणार आहेत. या स्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांकरिता खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.

            या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, सर जे. जे. रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा सर्वराज, डॉ. दिलीप गवारी,  बास्केटबॉल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मुकुंद धस, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद मुथ्थुकुमार, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोशिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, संजय शेटे, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जय कवळी आदी उपस्थित होते.
000
वृत्त: श्रीमती काशिबाई थोरात/व.स.सं.

‘साहिबजादे’यांच्या धैर्य आणि हौतात्म्याला महाराष्ट्राचा सलाम…

महाराष्ट्र आणि पंजाबचे सामाजिक सुधारणा, साहित्यिक, अध्यात्मिक ऋणानुबंध अनेक शतकांपासून आहेत. संत नामदेव, गुरु गोविंद सिंग, हुतात्मा राजगुरु यांच्यामुळे हे सर्वज्ञात आहेच.. “वीर बाल दिवस” कार्यक्रामच्या  निमित्ताने नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि पंजाबचे हे ऋणानुबंध अधिक दृढ होत आहेत…

महाराष्ट्र आणि पंजाब यांचे शतकांपासूनचे आत्मतीयेचे, आंतरिक नाते आहे. संत नामदेव भारत भ्रमण करीत असताना पंजाबच्या घुमानमध्ये पोहोचले आणि तिथलेच झाले. त्यांच्या वाणीत, कर्तृत्वात ऐवढे बळ होते ज्यामुळे त्यांच्या अभंगांचा अंर्तभाव ‘गुरू ग्रंथ साहेब’या ग्रंथामध्ये आहे. दशमेश (दहावे) गुरू गुरू गोविंदसिंग यांनाही महाराष्ट्रात यावेसे वाटले. नांदेडमध्ये त्यांच्या नावे ‘सचखंड श्री हजूर साहेब’असे शीख अनुयायांचे महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे.

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये असणारे साधर्म्य हे अनेक विषयात दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्र आणि पंजाब यांनी कित्येक क्रांतिकारांना जन्म दिला. देशाचे नेतृत्व केले. भगतसिंगासोबत हसत हसत फाशीवर चढणारे राजगुरू हे ही महाराष्ट्राचेच.  महाराष्ट्र आणि पंजाब चे ऋणानुबंध किती विशेष आहेत. दोन्ही राज्यातील बहुसंख्य जनता ही कृषीनिगडीत व्यवस्थेवर आधारित आहे. पंजाब रेंजीमेंट आणि मराठा रेजीमेंटच्या शौर्यगाथा आपण ऐकतच मोठे झालो आहोत. देशाच्या मातीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महाराष्ट्र आणि पंजाब हे शौर्य आणि धाडस, आणि अध्यात्माची पंरपरा जोपासणारी राज्ये आहेत.

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये  साहसाचे बाळकडू घरातूनच मिळते.  माता गुजरी आणि गुरू तेगबहादूर यांच्याकडून अदम्य साहसाचे संस्कार गुरू गोविंदसिंग यांना मिळाले आणि पुढे हाच वारसा त्यांच्या ‘साहिबजादे’ बाबा अजीत सिंग, बाबा जुझार सिंग तसेच ‘छोटया साहिबजादे ’ साहिबजादे बाबा जोराव‍रसिंग आणि बाबा फतेहसिंग यांना मिळाला. अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद त्यासाठी शेवटपर्यंत निसंकोचपणे शौर्याने उभे राहणे या साहिबजाद्यांचे आचरण ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’अशीच आहे. त्यांना २६ डिसेंबरला हौतात्म आले.

हा दिवस ‘वीर बाल दिवस’म्हणून पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांचा गुरू गोविंदसिंगशी असलेले नातं बघता या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नवी दिल्ली येथे आयोजित उपक्रमास मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये येथे आंमत्रित करण्यात आले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले संबोधन उपस्थितांच्या  ह्दयाला भिडल्याच्या भावना उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या कार्यक्रमातील उपस्थिती आणि संबोधनामुळे पंजाब आणि महाराष्ट्राच्या दृढ संबंधाचे नवे पर्व निर्माण होईल.

अवघे ९ वर्ष आणि ६ वर्ष वय असणारे छोटे साहिबजादे बाबा जोराव‍रसिंग आणि बाबा फतेहसिंग यांनी अदम्य शौर्याचा परिचय देत स्वाभीमानीपणे प्राणार्पण करत त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्यामध्ये गुरू गोविंदसिंग यांचे रक्त असल्यामुळे या साहबजादे यांनी अदम्य धाडस दाखविले. त्यांच्या या अदम्य धाडसाला महाराष्ट्राच्या जनतेचा सलाम. त्यांना विनम्र अभिवादन…

000

अंजु निमसरकर, माहिती अधिकारी

क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी सर्व सुविधा सुसज्ज ठेवा – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती, दि. २९ : महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे दि. ५ ते ८ जानेवारी दरम्यान अमरावतीत आयोजन होणार आहे. त्या अनुषंगाने स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंसाठी निवास, भोजन, पिण्याचे पाणी, शौचालय आदी सुविधांसह वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. पांढरपट्टे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सह सचिव प्रमोद चांदुरकर, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय खोकले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रफुल्ल कचवे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक उमेश खोडके यांच्यासह आरोग्‍य, प्रादेशिक परिवहन, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करुन विविध खेळांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हाव्यात, यासाठी राज्य शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात धनुर्विद्या या क्रीडा स्पर्धेचे करण्यात आले असून या स्‍पर्धेत सुमारे शंभर मुले-मुली स्पर्धक म्हणून, पंच, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षक, व्यवस्थापक मिळून एकूण २९७ खेळाडू सहभागी होत आहे. दि. ५ ते ८ जानेवारी या कालावधीत सलग चार दिवस आर्चरी खेळात इंडीयन, कंपाऊंड व रिकर्व्ह प्रकारात क्रीडा संकुलात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या खेळाडूंना मेडल्स व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ५ जानेवारीला सायंकाळी ५.३० वा. होणार आहे, अशी माहिती क्रीडा उपसंचालक श्री. संतान यांनी बैठकीत दिली.

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचे आयोजन

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे मुख्य स्पर्धा केंद्र पुणे असून या स्पर्धेच्या आयोजनाची भव्यता जनसामान्यांना व्हावी, यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अमरावतीत देखील क्रीडा ज्योतीचे मार्गक्रमण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत उद्या दि. ३० डिसेंबरला सकाळी ८.३० वाजता विभागीय क्रीडा संकुल येथून होणार आहे. इर्विन चौक- जयस्तंभ चौक- श्याम चौक- राजकमल चौक-राजापेठ चौक-नवाथे चौक-साईनगर चौक- बडनेरा आरडीआयके महाविद्यालय येथून अकोला अशाप्रकारे क्रीडा ज्योतीचे शहरातून मार्गक्रमण होईल. या रॅलीमध्ये महाराष्ट्र ऑलिम्पीक संघटना, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, ज्येष्ठ खेडाळू, क्रीडाप्रेमी यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहे. या रॅलीत माध्यम प्रतिनिधींनी सुध्दा सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा विभागाद्वारे करण्यात आले आहे.

000

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षांचे नियोजन करावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, ता. २९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताकडे विशेष लक्ष द्यावे. आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे निकाल यांच्या कालावधीत ताळमेळ राखावा. २०२१ च्या  राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखती लवकर घेऊन निकाल लवकर जाहीर करावा. कोविड काळात परीक्षा घेता आल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थ्याना वाढीव कालावधी मिळाला आहे. यामध्ये किती विद्यार्थ्याना याचा लाभ घेता आला याची माहिती सादर करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे आज दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आयोजित बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे  अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे, आ. वजाहत मिर्झा, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आदी या बैठकीला उपस्थित होते. लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी हे दूरदृश्य प्रणालीदवारे उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, या प्रश्नांसंदर्भात आवश्यकता पडल्यास उच्च स्तरावर बैठक घेण्यात येईल. पुणे शहरात या परीक्षांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून येत असल्याने आणि राज्याच्या ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असल्याने हा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचेही त्या म्हणाल्या.

—————–

राजू धोत्रे/विसंअ/

लम्पी चर्मरोग लस तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करारामुळे साथ रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २९ : “लस निर्मितीमुळे राज्यातील पशुधनास लम्पी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण नियमितपणे करणे शक्य होईल. त्यामुळे भविष्यात लम्पीसारख्या साथ रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नागपूर विधानभवन येथील मंत्री परिषद सभागृहात लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लस निर्मिती तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार विकास महात्मे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, उप महासंचालक आयसीएआर डॉ. भूपेंद्रनाथ त्रिपाठी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “आज झालेल्या लम्पी चर्मरोग लस तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र लम्पी लस निर्माण करणारे पहिले राज्य ठरले आहे. ही लस ऑगस्ट २०२३ पर्यंत उपलब्ध होणार आहे. लस निर्मितीमुळे कमी कालावधीत लम्पीचे निर्मूलन होण्यास मदत होणार आहे. पशुपालक शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येणार आहे”. इतर राज्यांच्या मागणीनुसार लस उत्पादनाचे  नियोजन करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या विकासासाठी केंद्र शासन सर्व क्षेत्रांत मदत करीत आहे. पशुसंवर्धनाकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लम्पी लस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र हिस्सार आणि आयसीएआर बरेली यांनी लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे. या लसीचे तंत्रज्ञान पुणे येथील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था यांच्याकडे विकसित करण्यासाठी रुपये एक कोटी 18 लक्ष खर्च करण्यात येणार आहेत. पशुवैद्यकीय जैव पदार्थनिर्मितीसंस्था, औंध, पुणे यांच्याकडे RKVY अंतर्गत निर्माण केलेल्या विषाणू प्रयोगशाळेमध्ये आदर्श उत्पादन पद्धतीचा अवलंब करून लम्पी चर्मरोगावरील लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यामुळे लस उत्पादनात, तंत्रज्ञान प्राप्त होणारी पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था ही एकमेव शासकीय संस्था असेल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मौल्यवान पशुधनाचे या रोगापासून संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला लसीचे उत्पादन लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. लस तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणामुळे बाजाराच्या मानकांची पूर्तता होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

लम्पी रोगाने एकूण १.३९ कोटी गोवंशीय पशूधनाच्या संख्येपैकी ४,१३,९३८ पशू बाधित झाले. गुरांची संख्या इतकी मोठी असूनही, संपूर्ण गोवंशीय पशूधनाच्या लसीकरणाचा वेळेवर निर्णय घेतल्याने बाधित तसेच मृत पशूधनाची संख्या मर्यादित करण्यात महाराष्ट्र शासन यशस्वी झाला आहे. त्यानुसार केंद्र शासनाने देखील आपली पूर्वनियोजित भूमिका बदलून महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण लसीकरणाचे धोरण स्वीकारले आहे. आजपर्यंत मृतांची संख्या ३०,५१३ आहे. मोफत आणि वेळेवर घरोघरी उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्याने तब्बल 3,38,714 बाधित पशूधन बरे होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लम्पी चर्म रोगापासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी एक विशेष लस, ही काळाची गरज होती.  लस केवळ जीविताच्या रक्षणाबरोबरच पशूंची उत्पादकता देखील सुनिश्चित करेल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

विकसित केलेले लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लस तंत्रज्ञान भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. हे लस तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आयसीएआर ने केलेली कामगिरी प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लस तंत्रज्ञान हस्तांतरण प्रसंगी केले.

महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यामध्ये पशु विज्ञान केंद्र स्थापन करण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली. राज्यातील लंपी चर्म रोग निर्मूलनाकरीता लस साठा उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांचे आभार मानले. राज्यात लम्पी चर्मरोग लसीचे १०० टक्के लसीकरण झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. वेळच्या वेळी अनेक निर्णय घेतल्याने राज्यात पशुधनाचे मृत्युचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ‘महाराष्ट्र राज्यातील २०व्या पशुधन आणि कुक्कुट पक्षी गणना २०१९’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे, केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध उत्पादन मंत्री पुरूषोत्तम रुपाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

४ ते ६ जानेवारीदरम्यान होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहावे – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

नागपूर, दि. २९ : मराठी भाषेचे संवर्धन व जगभर प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आणि सांस्कृतिक कार्य व उद्योग विभागाच्या सहकार्याने दि. ०४, ०५ व ०६ जानेवारी २०२३ रोजी नॅशनल स्पोर्टस् स्टेडियम, वरळी, मुंबई येथे मराठी विश्व संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांनी सदर कार्यक्रमाच्या तीनही दिवशी सहभागी व्हावे, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली.

ॲड. नार्वेकर म्हणाले, “या संमेलनात जगातील वेगवेगळ्या खंडातील २० देशांमधील विविध शहरांतून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संघटनांचे ४९८ प्रतिनिधी व त्याचप्रमाणे भारतातील विविध शहरांत राहणाऱ्या व मराठी भाषेच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्थांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत”.

मराठी संस्कृती व मराठी भाषा यांचेबाबत चर्चासत्र, मराठी संस्कृतीचे प्रदर्शन करणारे नाट्यसंगीत, वादन इ. विविध कलांचा अविष्कार त्याचप्रमाणे विविध चर्चासत्रांचे दि. ०४ ते ०६ जानेवारी २०२३ या कालावधीत नॅशनल स्पोर्टस् स्टेडियम, वरळी, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे.

“या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध उद्योग महाराष्ट्रामध्ये यावेत याकरिता गुंतवणूकदार व उद्योजक यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दि. ०६जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे मराठी उद्योजक व गुंतवणूकदार यांचा परस्पर संवाद होणार आहे.

दि. ०४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभाचे उद्घाटन करण्याचे नियोजित आहे”, अशी माहिती ॲड. नार्वेकर यांनी दिली.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/

विधानपरिषद लक्षवेधी

बंजारा समाजाची काशी पोहरादेवीचे महत्त्व कमी होणार नाही – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

नागपूर दि.२९: अखिल भारतीय बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवीचे महत्त्व कमी होणार नाही. बंजारा समाज बांधवांनी गैरसमज काढुन टाकावा, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.

जामनेर (जि. जळगाव) तालुक्यातील गोद्री येथे कुंभ आयोजित करून पोहरादेवीचे महत्त्व कमी होत असल्याने असंतोष निर्माण झाल्याबाबत सदस्य राजेश राठोड यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देतांना मंत्री श्री. महाजन बोलत होते.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले, बंजारा समाजाला प्राचीन संस्कृती लाभलेली आहे. संपूर्ण देशात बंजारा समाजाची मोठी संख्या आहे. माझ्याही मतदार संघात सर्वाधिक संख्या आहे. या अखिल भारतीय बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवीचे महत्त्व वेगळे आहे. राज्यातील तीर्थक्षेत्राला अभिप्रेत छोटे-मोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.त्यामुळे मुख्य तीर्थक्षेत्राचे महत्त्व कमी होत नाही. जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे कुंभ आयोजित केल्याने पोहरादेवीचे महत्त्व कमी होणार नाही. बंजारा बांधवांनी गैरसमज काढुन टाकावा, असे आवाहनही मंत्री श्री. महाजन यांनी केले.

राज्य शासनाने पोहरादेवीच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी दिला आहे. संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी यापूर्वीच १०० कोटी रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने अतिरिक्त ६७ कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. कामे प्रगतीपथावर आहेत. याशिवाय पोहरादेवी व उमरी या नवीन विकास आराखड्यातील ३२६.२५ कोटी रकमेच्या कामांनाही मंजुरी दिली आहे. तांड्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कामे केली जात आहेत. नागपुरातील वसंतराव नाईक ॲाडिटोरियमसाठी निधी देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. बंजारा तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात सांगितले. या लक्षवेधी चर्चेत सदस्य ॲड निलय नाईक यांनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केला होता.

००००

शाळांच्या वाढीव अनुदानाचा शासन निर्णय जानेवारीमध्ये – मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि. 29 : राज्य शासनाने कायम विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 20 टक्के व वाढीव 20 टक्के अनुदान देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नवीन वर्षात जानेवारी 2023 मध्ये काढण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

विना अनुदानित शाळांना मंजूर केलेले अनुदान त्वरित देण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले की, विना अनुदानित शाळांना अनेक वर्षांपासून अनुदान मंजूर केले नव्हते. त्रुटी पूर्ण करून अनुदानाला पात्र ठरलेल्या शाळांना 20 टक्के, तसेच अनुदान असलेल्याना 20 टक्के वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 20 टक्के व वाढीव 20 टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव 20 टक्के अनुदान दिले. शिवाय शासन स्तरावर अघोषित शाळा, वर्ग व तुकड्यांना सरसकट 20 टक्के अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आला. याचा लाभ राज्यातील 63 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे, यासाठी सुमारे 1160 कोटींची तरतूद करावी लागणार आहे. उर्वरित अनुदानासाठी शासन स्तरावर बैठक घेण्यात येईल, असेही श्री केसरकर यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य डॉ. सुधीर तांबे, डॉ. रणजित पाटील, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

००००

शिक्षकांच्या नेमणुका मार्चमध्ये करणार – मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि. २९ : राज्यात कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे विविध विभागांतर्गत पदभरतीस बंदी होती. यामध्ये शिथिलता आल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर रिक्त पदे भरण्यासाठी फेब्रुवारी २०२३ मध्ये मुलाखती घेऊन मार्चमध्ये नेमणुका दिल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरती अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याबद्दल सदस्य किरण सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

श्री. केसरकर यांनी सांगितले की, मुलाखतीशिवाय विकल्पाच्या पदभरतीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची यादी ९ ऑगस्ट २०१९ रोजी पवित्र प्रणालीवर प्रसिद्ध करण्यात आली. मुलाखतीशिवाय विकल्पांतर्गत निवड झालेल्या ५९७० पात्र उमेदवारांची निवड प्रक्रीया पूर्ण झालेली आहे. मुलाखतीसह विकल्पाच्या पदभरतीसाठी २०६२ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे.

पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये १० नोव्हेंबर २०२२ मध्ये सुधारणा करण्यात आली असून शासन निर्णयानुसार शासनाने रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित व्यवस्थापनास दर तीन महिन्यांनी पदभरती प्रक्रीया करण्याची मुभा दिलेली आहे. शिक्षकांच्या वैद्यकीय बिलासाठी मार्च 2023 मध्ये निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

नागपूर आयटीआयमधील एव्हिएशन अभ्यासक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट

आयटीआय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीसोबतच जर्मन, फ्रेंच, जपानी भाषेचे प्रशिक्षण

नागपूर, दि. २९ : राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) भेट देऊन त्याची पाहणी केली. द सॉल्ट एव्हिएशन व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सुरू असलेल्या एरॉनॉटिकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्युपमेन्ट फिटर या व्यवसायाला त्यांनी भेट दिली. फ्रान्स येथील प्रशिक्षक तसेच आयटीआय विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी बदलत्या काळाला अनुषंगिक असलेला हा अनोखा अभ्यासक्रम आयटीआयमध्ये सुरु करण्यात आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. सध्या एव्हिएशन क्षेत्रात प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने हा अभ्यासक्रम नाशिक व पुणे येथेही सुरु करण्याबाबत मंत्री श्री. लोढा यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, एव्हिएशन क्षेत्रात अल्प मुदतीचे अभ्यासक्रम जास्तीत-जास्त राबविण्याबाबत व त्यातून रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम संपूर्ण राज्यातील आयटीआयमध्ये सुरू करावेत, जेणेकरुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगार मिळाल्यास त्यांना शहरामध्ये रोजगारासाठी येण्याची गरज भासणार नाही. त्याद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सशक्त भारताचे स्वप्न साकार होईल, असेही श्री. लोढा म्हणाले.

इंग्रजीसोबतच जर्मन, फ्रेंच, जपानी भाषेचे प्रशिक्षण

देशाबाहेरील रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी आयटीआयच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी सोबतच फ्रेंच, जपानी व जर्मन भाषेचे प्रशिक्षण सुरू करावे. विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या विविध भाषातज्ज्ञांचे ऑनलाईन वर्ग घेण्याबाबत मदत घेण्याबाबत तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. आयटीआयमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करुन त्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांकडून भाषणे आयोजित करावीत, जेणेकरुन विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनचरित्रामधून प्रेरणा मिळेल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, दसॉल्ट एव्हिएशनचे समन्वयक मयुर याउल, सहसंचालक श्री. देवतळे, विशेष कार्य अधिकारी श्री. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

0000

इरशाद बागवान/विसंअ/

विदर्भ मजबूत, तर राज्य मजबूत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये बोनस

  • राज्यासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम

  • वस्त्रोद्योगासाठी नवे धोरण

  • समतोल प्रादेशिक विकासासाठी समिती

नागपूर, दि. २९: विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही हे सांगताना धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. कृषी, जलसंपदा, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विदर्भासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. विधानसभेत २९३ अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी पर्यटन सर्किट, नवीन खनिज धोरण, समतोल प्रादेशिक विकासासाठी नवीन समिती अशा विविध घोषणा केल्या.

विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाकडून सदस्यांनी मांडलेले मुद्दे आणि सूचनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रनिहाय विदर्भाचा कसा विकास करण्यात येईल ते सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून काम पाहिल्याने विदर्भाच्या अनेक प्रश्नांचा जवळून अभ्यास केला आहे. विदर्भाचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. १९५३ मध्ये नागपूर करार झाला आणि दरवर्षी नागपूरला एक अधिवेशन होईल असे ठरले. या करारावर यशवंतराव चव्हाण, बॅ. एस. के. वानखेडे, पी. के. देशमुख, भाऊसाहेब हिरे, देवकीनंदन, लक्ष्मणराव भाटकर, रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, नानासाहेब कुंटे अशा दिग्गजांच्या सह्या आहेत.केवळ नागपूर शहराला नाही तर संपूर्ण विदर्भाला एक दिलासा मिळावा, येथील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी हे अधिवेशन भरविण्याचे ठरले. हवापालट करण्यासाठी हे अधिवेशन होत नाही.

विदर्भाच्या प्रश्नांवर सत्ताधारी असोत किंवा विरोधक, आपण एकत्र येऊन त्यावर ठोस आणि कालबद्ध पावले टाकू असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले,  कोविड परिस्थितीमुळे दोन वर्षानंतर हे अधिवेशन होते आहे. नागपूर ही केवळ राज्याची उपराजधानी नाही तर राज्याच्या प्रगती आणि विकासात खूप महत्वाचे योगदान देणारा जिल्हा म्हणून नागपूरची नवी ओळख निर्माण झाली आहे. आमच्या युती सरकारला सहा महिने पूर्ण होताहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणून मलाही विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. विदर्भ मजबूत, तर राज्य मजबूत, अशी आमची भावना आहे.  विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही. देशासाठी महाराष्ट्र जसा महत्वाचा तसा महाराष्ट्रासाठी विदर्भ महत्वाचा.आणि म्हणूनच आम्ही गेल्या सहा महिन्यात विविध निर्णय घेतांना, राज्यातल्या विदर्भ, मराठवाड्यासारख्या अविकसित प्रदेशाचा विकास हा केंद्रस्थानी मानला आहे. अर्थातच उपराजधानी नागपूरला राजधानी मुंबईशी जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुरु करून आम्ही उद्याच्या उज्वल भवितव्याचा महामार्ग खुला केला आहे.’

‘महाराष्ट्राने विदर्भाचा नेहमीच सन्मान केला आहे. विदर्भाच्या भूमीभोवती आर्थिक अनुशेषाची आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येच्या दुःखाची काळी किनार आहे. तरीही या परिसरात आत्मविश्वास आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. विदर्भाविषयी आमच्या सरकारमध्ये अपार आदराची भावना आहे. विदर्भाला न्याय दिल्या पाहिजे. त्यामुळे विदर्भाचा विकास हे आमच्या सरकारचे परम कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडणारच, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे…

विदर्भासाठी महत्वाचे निर्णय, अंमलबजावणी

  • विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्र सरकारला विनंती
  • नागपूरपासून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ शक्तीपीठ महामार्ग विकसित करणार.यामुळे मराठवाडा देखील जोडला जाईल. तसेच दक्षिण भारत थेट मध्य महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे.
  • नागपूर हे शहर ‘लॉजिस्टिक हब ‘ म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात ‘लॉजिस्टिक सपोर्ट ‘ तयार होणार आहे.
  • नागपूर मेट्रो पहिला टप्पा लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्याचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
  • नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ला सुधारित ९२७९ कोटींच्या खर्चास मान्यता
  • वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गासाठी १ हजार ९६ कोटी इतक्या सुधारित खर्चास मान्यता. त्यानुसार ५४८ कोटी राज्य शासनाचा हिस्सा.
  • विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना. ७० हजार कोटीच्या  रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता. त्यापैकी विदर्भामध्ये एकूण ४४ हजार १२३ कोटी रुपयांची गुंतवणूक. ४५ हजार रोजगार निर्मिती होणार.
  • गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटी गुंतवणुकीचा खनिज उत्खनन प्रकल्प सुरू होईल. राज्याला महसूल मिळेल. रोजगारामुळे नक्षलवाद संपृष्टात येईल.
  • सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ७५५ कोटी रुपये निधी वितरित
  • अमरावती, नागपूर पुणे विभागातील १४ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २२२ कोटी ३२ लाख रुपये वितरित.
  • सोयाबीनवर शंखी गोगलगाईमुळे ५ जिल्हयात ७३ हजार हेक्टर क्षेत्र बाधित. ९८.५८ कोटी इतका निधी.
  • भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देण्यासाठी ३३६ कोटी २२ लाख सुधारित खर्चास मान्यता.
  • बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता, यामुळे सुमारे १९१८ हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होईल.
  • लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी ३६९ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी.
  • राज्यातील जैवविविधता प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात येणार विदर्भाचं म्हणून एक वेगळेपण आहे. खनिज, उर्जा, पाणी, वन, शेती ही विदर्भाची बलस्थानं आहेत. येणाऱ्या काळात उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात विदर्भात क्रांती झालेली आपण पाहाल, आणि याची सुरुवात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून झाली आहे.

* समृद्धी महामार्गाशी संलग्न जिल्ह्यांत विदर्भ-मराठवाडा असे टुरिझम सर्कीट*

  • समृद्धी महामार्गाचा उपयोग करून घेऊन आम्ही विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किट तयार करणार. आता या महामार्गामुळे नागपूर- संभाजीनगर कनेक्ट झाला असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील धार्मिक आणि निसर्ग पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होणार आहे. याठिकाणीही पर्यटन स्थळांवर सुविधा विकसित करण्यात येतील.
  • राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा आणि लोणार सरोवर पर्यटन विकास आराखड्यानुसार कामं सुरु आहेत.
  • गोसीखुर्द येथे १०० एकर जागेवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प उभारणार. यासाठी जागतिक निविदा मागवण्यात येणार असून, पीपीपी तत्वावर काम करण्यात येईल. लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल.
  • भंडारा –गोंदिया मेगा सर्किटमध्ये या दोन्ही जिल्ह्यांमधील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी २८ कोटी ९१ लाख रुपये खर्च.
  • नागपूर जिल्ह्यातील वाकी-अदासा- धापेवाडा-पारडसिंगा- छोटा ताजबाग- तेलंगखेडी-गिरड असा ५३ कोटी ९६ लाखाचा प्रस्ताव मंजूर. केंद्राकडून २३ कोटी ९९ लाख निधी उपलब्ध.
  • भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा, संभाजीनगर यांचा स्वदेश दर्शन योजनेत समावेश होणार.
  • अंचलेश्वर, कचारगड लेणी, भोजाजी महाराज, कोराडी देवी, तसेच नांदेड जिल्ह्यातील मंदिरांचे प्रस्तावकेंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत समाविष्ट होणार.
  • समृद्धी महामार्ग ज्या-ज्या जिल्ह्यांतून जातो आहे, त्या परिसरांमधील धार्मिक आणि इतर पर्यटन स्थळांसाठी विदर्भ – मराठवाडा असे टुरिझम सर्कीट विकसित करण्यात येईल,
  • रस्ते हेच विकासाचे मार्ग आहेत, हे लक्षात घेऊन शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या विषयी जागरूकता व उत्सुकता निर्माण व्हावी या हेतूने मुख्यमंत्री समृद्धी चषक या निबंध स्पर्धेचे आयोजन. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने निर्माण केलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासह, राज्यातील रस्ते विकासाबाबत जागरूकता निर्माण करण्यात येईल. ही स्पर्धा आठ जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्याच्या  पहिल्या पंधरवड्यात आयोजित कऱण्यात येईल.
  • आठवी ते दहावी तसेच अकरावी ते बारावी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल.

खनिज संपत्ती : विदर्भाला सोन्याचे दिवस

  • महाराष्‍ट्रातील 70 टक्के खनिज संपत्ती एकट्या विदर्भात आहे. विशेषतः गडचिरोली जिल्हयामध्ये उच्च दर्जाचा लोह खनिजाचा साठा मुबलक आहे.
  • सुरजागड येथे रु. १४ हजार कोटी व रु. ५ हजार कोटी गुंतवणुकीचे दोन नवीन प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता. या दोन प्रकल्पाव्यतिरिक्त आणखी एक रु. १,५००/- कोटी एवढी गुंतवणूक असलेला स्टील प्रकल्प गडचिरोली जिल्हयात येणार आहे. या ३ प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे दहा हजार जणांना रोजगारही मिळणार आहे.
  • सुरजागड लोहखनिज प्रकल्प सुरु करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास जशास तसे उत्तर देऊ. नक्षलवाद मोडून काढू. त्या भागात हाताला काम देण्याचे प्रयत्न. त्यासाठी केंद्राचेही सहकार्य मिळते आहे.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील दोन खाणींमध्ये सोने असल्याचेही केंद्राच्या खनिकर्म मंत्रालयाला आढळले आहे. यामुळे आता लवकरच विदर्भाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कोळसा खनिजावर आधारित Coal Gasification द्वारे हायड्रोजन, मिथेनॉल आणि अमोनिया / युरिया निर्मितीचा रु.२० हजार कोटी गुंतवणुकीचा प्रकल्पही मंजूर केला आहे. चंद्रपूर जिल्हयात सुमारे १०,००० लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
  • खनिज साठ्यांचे ई लिलाव एकूण २८ खाणपट्ट्याचा यशस्वी लिलाव झालेला आहे.
  • विदर्भातील खनिज संपत्तीचा योग्य तो उपयोग राज्याच्या विकासामध्ये व्हावा यासाठी राज्याचे नवीन खनिज धोरण घोषित करण्यात येईल. त्यामुळे विदर्भातील खनिकर्म उद्योग व्यवसायांना अधिक गती मिळेल.

खचू नको तू बळीराजा, धरू एकमेकांचे हात रे- मुख्यमंत्र्यांची साद

  • विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कापूस आणि सोयाबीन यांच्या व्हॅल्यु चेन्स (मुल्य साखळी) विकसित करण्यात येतील.
  • सध्या शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके यातून विविध व्हॅल्यु चेन्स आम्ही विकसित करत आहोत. या योजनेत शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करण्यात येत असून, जीनिंग आणि प्रेसींग युनीट ड्रोन द्वारे औषध फवारणी करण्यासाठी अनुदान, बीजप्रक्रिया युनीट, तेलघाणा प्रक्रिया युनीट, जैविक निविष्ठा निर्मितीकरिता मास्टर लॅब आणि बेसिक लॅब स्थापन करणे अशा विविध गोष्टींची सांगड घालणार.
  • कापूस आणि सोयाबीन व्हॅल्यु चेन्स विकसित करण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांपर्यंत भरीव अशी वाढीव तरतूद करण्यात येईल. ही योजना 2025 पर्यंत राबवण्यात येईल.
  • संभाजीनगर येथे मोसंबी, संत्रा पिकासाठी सिट्रस इस्टेट स्थापन केली असून. 9 कोटी 20 लाख रुपये खर्च झाले आहेत.
  • राज्यात संत्र्यावरील दोन प्रक्रिया प्रकल्पांना 71 लाख रुपये अर्थसहाय्य केले असून, चालू आर्थिक वर्षात 115 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. याशिवाय प्रधानमंत्री सुक्ष्मअन्न प्रक्रिया योजनेत 18 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
  • अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्हयात 72 हजार 469 हेक्टर संत्र्यांचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई म्हणून 562 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. संत्र्यावरील कोळशी रोगाचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी कृषी विभाग जनजागृती करत आहे.
  • प्रधानमंत्री पिक विम्याच्या बाबतीत 2 हजार 352 कोटी नुकसान भरपाई निश्चित झाली असून, त्यापैकी 2 हजार 25 कोटी रुपयांची रक्कम 45 लाख 83 हजार 883 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.
  • फलोत्पादनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्राला पॅरामीटर्स सुधारित करण्याची विनंती केली आहे.
  • किसान सन्मान योजनेत डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीतील तेरावा हप्ता देण्याची कार्यवाही सुरु आहे. 1 कोटी 97 लाख पात्र लाभार्थी पैकी 92 हजार लाभार्थींचा डाटा अद्ययावत करण्यात आला असून, उर्वरित 8 लाख 6 हजार लाभार्थींचा डाटा अद्ययावत करणे सुरु आहे.
  • शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. एकजरी आत्महत्त्या झाली, तरी त्याचं दुःख आहे. शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजना, कालबद्ध अंमलबजावणी. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनला अधिक मजबूत करण्यात येईल आणि त्यांच्या माध्यमातून या आत्महत्या कमी कशा होतील, याचा प्रयत्न करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून त्यांच्याशी संवाद साधणे, कौन्सिलींग करणे यासाठी समाजातील तज्ज्ञांना देखील सहभागी करून घेण्यात येईल.

आज बळीराजाला इतकच सांगणं आहे

खचू नको तू बळीराजा, धरू एकमेकांचे हात रे

आली संकटे कितीही त्यावर, सोबत करू मात रे ,

अशी सादही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काही ओळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घातली.

धान उत्पादकांना हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस

शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी 15 हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल. याचा लाभ धान उत्पादक जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. हा बोनस ऑनलाईन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. धान खरेदीत कोणतीही अनियमितता झाल्याची तक्रार आलेली नाही. केंद्र शासनाने राज्याला 15 लाख मेट्रीक टन धान खरेदीस मंजूरी दिली आहे.

विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करून शेतकऱ्यांना पूरेपूर लाभ

  • विदर्भाची जमीन काळीशार व सुपीक आहे. विदर्भात गोदावरी व तापी खो-यातून सिंचन निर्मिती होते. सिंचन अनुशेष दुर झाल्यास आणि शेतीबरोबर कृषीआधारित उद्योगधंद्याना चालना मिळणार आहे.
  • गत सहा महिन्यांमध्ये १५ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यांची एकत्रित सिंचन क्षमता २ लाख ४८ हजार ७८० हेक्टर व एकूण किंमत १८ हजार ८४ कोटी ५४ लाख रुपये आहे.
  • वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी ८३ हजार ६४६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे . राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती याबाबत तपासत आहे.
  • गोसीखुर्द प्रकल्पामध्ये देखील सिंचन क्षमता झपाट्याने वाढवत असून, चालू वर्षामध्ये 32 हजार 523 हेक्टरने ही क्षमता वाढेल. पुढील वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये 45 हजार 904 हेक्टरने सिंचन क्षमता वाढेल. 2024-25 मध्ये 26 हजार 441 हेक्टर सिंचन क्षमता वाढेल. यासाठी 1400 कोटी रुपये खर्च येईल. हा प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करणार..
  • पारशिवनी येथील पेंच प्रकल्पाला सुधारित मान्यता देण्यात येणार. यात १६८५ कोटी खर्च अपेक्षित आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातल्या ६ आणि भंडारा जिल्ह्यातल्या २ तालुक्यांना फायदा होणार आहे. १ लाख ४ हजार ४७६ हेक्टर क्षेत्र सिंचन होईल. टप्प्याटप्प्याने जून २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल
  • अकोट तालुक्यातील शहापूर लघु पाटबंधारे योजनेचा प्रस्ताव आहे, यामुळे यामुळे अकोटमधील चार गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे.
  • वाशिम तालुक्यातील पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेस बांधण्यात आली असून, वाशिम जिल्ह्यातील 34 आणि हिंगोली जिल्ह्यातील 25 गावांमधून 7 हजार 690 हेक्टर सिंचन निर्मिती झाली आहे. 45 गावांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. या प्रकल्पाच्या 787 कोटी 15 लाख रुपये किंमतीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव.
  • जिगाव प्रकल्पाला देखील गती देण्यात येत आहे. जून २०२४ अखेर ४५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार.
  • विदर्भातील १०१ प्रकल्पांचे बांधकाम सुरु असून, ६ प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली आहे. त्यामध्ये वासनी मध्यम प्रकल्प (ता. अचलपूर), सपन मध्यम प्रकल्प (ता. अचलपूर), आलेवाडी ल.पा.यो.(ता. संग्रामपूर), अरकेचरी ल.पा.यो.(ता. संग्रामपूर), वर्धा बॅरेज उपसा सिंचन (ता. बाभुळगांव), सुरेवाडा उपसा सिंचन, भंडारा यांचा समावेश आहे.
  • अमरावती मधील १०० प्रकल्पांचे सुधारित नियोजन केले आहे.
  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत आजपर्यंत 10 प्रकल्प पूर्ण झाले असून, उर्वरित 17 प्रकल्प जून 2025 पर्यंत पूर्ण करणार. यासाठी 5 हजार 143 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • ६१.६६ अब्ज घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.

जलयुक्त शिवार अभियान देशासमोर आदर्श निर्माण करेल

  • माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती आणि पुनरूज्जीवन यावर निश्चित भर देणार आहे, त्यासाठी नागपूर आणि अमरावती विभागातील जिल्हा परिषदांना निधी कमी पडू दिला जाणार नाही.
  • पूर्व विदर्भात 6 जिल्ह्यात एकूण 6 हजार 74 माजी मालगुजारी तलाव आहेत. यातील 2 हजार 588 तलावांची वर्ष 2025 पर्यंत पुनर्बांधणी करण्यात येईल. यासाठी 534 कोटी रुपयांचा निधी कालबद्धरित्या उपलब्ध करून देण्यात येईल. ही कामे पूर्ण झाल्यानंतर 51 हजार 760 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल. येत्या पाच वर्षात 3 हजार 554 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. यातून दीड लाख हेक्टर क्षेत्राहून अधिक सिंचन क्षमता निर्माण होईल.
  • राज्यात आता जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा देखील आम्ही सुरु केला असून, पहिल्या टप्प्याप्रमाणे याही वेळी जलयुक्तमुळे विदर्भासह, राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होणार आहे.
  • हे जलयुक्त शिवार अभियान देशासमोर आदर्श निर्माण करणारे राहील, अशा पद्धतीनं राबवण्यात येईल.
  • नानाजी देशमुख कृषी स्वावलंबन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला जागतिक बँकेनेही त्याला मान्यता दिली आहे. यात 6 हजार कोटी रुपयांच्या या दुसऱ्या टप्प्यात 5 हजार 220 गावांचा समावेश आहे.

वस्त्रोद्योगासाठी नवे धोरण

  • विदर्भामध्ये कापसाचे उत्पादन होते, याठिकाणी वस्त्रोद्योगाला अधिक वाव मिळावा अशी, भूमिका आहे. सध्याचे धोरण संपुष्टात आले आहे. त्यानंतरचे वस्त्रोद्योग धोरण हे 2023 ते 2028 अशा पाच वर्षांसाठी आणण्यात येणार असून, यामध्ये आधुनिक तंत्रज्ज्ञानाचा देखील वापर करण्यासंदर्भात तरतूदी असतील. नव्या धोरणात रोजगार निर्मिती, राज्यातील कापसावर राज्यातच प्रक्रिया हे तत्व अंमलात आणले जाईल. तसेच वस्त्रोद्योगात सौर ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात येईल.

मित्र आणि आर्थिक सल्लागार परिषद

  • निती आयोगाच्या धर्तीवर आपण राज्यात 1 जानेवारी 2023 पासून मित्र – महाराष्ट्र इन्स्ट्यिट्यूशन फॅार ट्रान्सफार्मेशन या संस्थेचे काम सूरू करणार. ही एक थिंक टॅंक आहे, आणि 2047 पर्यंत राज्याचे विकासाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी समन्वय साधेल.
  • राज्याचा समतोल आणि सर्वंसमावेशक विकास होण्यासाठी मित्र संस्थेचा मोठा उपयोग होणार आहे. अर्थातच याचा फायदा देखील विदर्भातील विकासासाठी होणार आहे.
  • त्याचप्रमाणे राज्याची आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्यात येईल. ही परिषद राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रीलीयन डॅालर ची बनविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल.
  • या परिषदेतर्फे विविध क्षेत्रातील महत्वाचे पॅरामीटर्स निश्चित केले जातील व धोरणही ठरवण्यात येईल. या परिषदेचे अध्यक्ष टाटा सन्सचे चेअरमन श्री. एन. चंद्रशेखरन असतील व उद्योग, ऊर्जा, बँकिंग, सामाजिक क्षेत्र, नियोजन, अभियांत्रिकी, शिक्षण, कृषी, वस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या समितीत राहतील.

राज्यासाठी आकांक्षित (Aspirational) तालुका कार्यक्रम

केंद्राच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्याचा आकांक्षित तालुका व शहरे कार्यक्रम राबवण्यात येईल. राज्यातील ड वर्ग महानगरपालिका, ब व क वर्ग नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील शहरांचा समतोल आणि कालबद्ध असा सर्वसमावेशक विकास यातून करण्यात येईल.

समतोल प्रादेशिक विकासासाठी समिती

  • 2018 ते 2020 या कालावधीत विदर्भ मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या जलद विकासाचा कार्यक्रम 21 हजार 222 कोटींचा होता. त्यावर एकूण 7 हजार 570 कोटी खर्च करण्यात आला आहे.
  • आर्थिक वर्ष 2021-22 एकूण विभाज्य निधीपैकी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राला अनुक्रमे 26 टक्के, 18.62 टक्के आणि 55.38 टक्के निधी वाटप करण्यात आले आहेत. तसेच चालू वर्षी 2022-23 करिता अनुक्रमे 26.4 टक्के, 18.66 टक्के आणि 55.29 टक्के निधी दिला आहे.
  • विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या मान्यतेनंतर तीनही विकास मंडळाचे पुनर्गठन झाले की, राज्यामध्ये विविध प्रदेशातील असंतुलन शोधणे आणि समतोल प्रादेशिक विकासासाठी नव्याने समिती गठीत करण्यात येईल.

0000

ताज्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला आढावा

0
मतदान केंद्रांवरील सोईसुविधा, आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्याचे दिले निर्देश नाशिक, दि. 5: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, निवडणूक पार...

‘स्मार्ट’द्वारे शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता….

0
कांचनी कंपनीची १०० कोटींच्यावर वार्षिक उलाढाल लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्याच्या उद्देशाने राज्यात...

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई, दि .5:- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या "राजा हरिश्चंद्र" चित्रपटाच्या...

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज...

0
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा गौरव स्व. राज कपूर जीवनगौरव...

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

0
नवी दिल्ली, 06 : साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2026 आणि युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी पुस्तकांची नोंदणी सुरू केली आहे. अकादमीने मान्य केलेल्या 24...