सोमवार, जून 16, 2025
Home Blog Page 1696

महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजाची फिनलँड संसदीय शिष्टमंडळाकडून पाहणी

मुंबई, दि. 26 : फिनलँडच्या संसदीय शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानपरिषदेतील कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर दोन्ही देशातील संसदीय  कार्यपद्धतीसंदर्भात विधानभवनात पीठासीन अधिकाऱ्यांसोबत  बैठक झाली.

बैठकीला विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पीठासीन अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी, राज्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी कृषी उत्पन्नावर संशोधन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक या विषयावर चर्चा करुन फिनलँडने यासाठी सहकार्य करावे, असे प्रस्ताव शिष्टमंडळासमोर ठेवण्यात आले. तसेच फिनलँडमधील  मोफत शिक्षण याचा अभ्यास करण्यासाठी फिनलँड येथील विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील विद्यापीठाचा सामंजस्य करार करता येईल का यावर चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर शाश्वत विकासासाठी एक समिती गठित करावी, असेही या बैठकीत सांगण्यात आले.

फिनलँड संसदीय शिष्टमंडळात वित्तीय समितीचे अध्यक्ष जोहान्स कोस्कीन, अँडर्स अँडलेरक्रूझ, सदस्य इवा जोहना एलोरांटा, सदस्य सँनी ग्रॅहॉन-लॅसेनन, सदस्य एस्को किविरंता, सदस्य जुक्का कोपरा, सदस्य मेर्जा कायल्लोनेन, सदस्य पिया लोहिकोस्की, सदस्य आरीस सुमेला, सदस्य जस्सी विहोनेन, सदस्य हेलवी इकावल्को, फिनलँडचे भारतीय राजदुत रिल्वा कोक्कु-रोंडे, फिनलँड देशाचे वाणिज्यदुत मिक्को पॉटसोनेन, जुक्का होलाप्पा, फिनलँडचे मुंबई, गुजरात, गोवा या राज्यासाठींचे वाणिज्यदूत श्रेयस दोषी उपस्थित होते.

००००

काशिबाई थोरात/वि.सं.अ./26/02/2020

विधान परिषद प्रश्नोत्तरे

औरंगाबादमधील सातारादेवळाई भागात विकासकामांवर भर देणार मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 26 : सातारा-देवळाई नगर परिषद औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केल्यानंतर येथील विकासकामांवर भर देण्यात येत आहे, अशी माहिती नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री. शिंदे म्हणाले, सातारा- देवळाई  भागाकरिता महानगरपालिकेकडून रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण, रस्त्यांचे व्हाईट टॅपिंग, भूमिगत गटारे, सरकारी नाल्यांवर पुलाचे बांधकाम करणे, आरोग्य केंद्र उभारणीसाठी इमारतींची  दुरुस्ती व नाल्यातील गाळ काढणे इत्यादी कामे करण्याचे नियोजित आहे. या भागात एकूण 43  विकासकामे करण्यात आली असून त्यासाठी  1.98 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे.  याशिवाय इतर कामांसाठी सुमारे दिडशे कोटीचा निधी देण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

या विषयाच्या अनुषंगाने सदस्य सतिश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

कांदिवलीतील सार्वजनिक उपयोगाच्या भूखंडाचे आरक्षण कायम मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 26 : पोईसर (कांदिवली) पूर्व येथील भूखंड हे विकास आराखड्यानुसार सन 2034 पर्यंत सार्वजनिक उद्दिष्टांसाठी आरक्षित असून प्राथमिक, माध्यमिक शाळा, क्रीडांगण व नियोजित रस्ता यासाठीचे आरक्षण हे कायम राहील, अशी माहिती नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री.  शिंदे म्हणाले, मौजे पोईसर, कांदिवली पूर्व येथील विशिष्ट भूखंडाच्या जमीन मालकाने हा भूखंड महानगरपालिकेस बजावलेल्या खरेदी सूचना नगररचना अधिनियमातील तरतुदींशी विसंगत वाटल्याने महानगरपालिकेने त्या अस्वीकृत करून स्वाधिकारात भूसंपादनाचा प्रस्ताव महानगरपालिकेमार्फत सुधार समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. मात्र हा भूखंड सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव असल्याने यावरील आरक्षण व्यपगत होणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य नागोराव गाणार, प्रसाद लाड, गोपीकिशन बाजोरिया, किरण पावसकर, जोगेंद्र कवाडे, प्रविण दरेकर, जयंत पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

नागपूर महानगरपालिकेतील शिक्षक, शिक्षकेतरांना थकबाकी देय नाही मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 26 : नागपूर महानगरपालिकेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना दिनांक 1 जानेवारी 2006 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2010 या कालावधीतील कोणतीही थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही. निर्णय घेऊन 1 डिसेंबर 2010 पासून सहावा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आहेत. त्यामुळे आता कोणतीही थकबाकी देय नाही, अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या आहेत. भविष्य निर्वाह निधी, अंशदायी निवृत्ती वेतन, थकित महागाई भत्ता देण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य नागोराव गाणार,  अनिल सोले, भाई जगताप आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

०००

रायगड जिल्ह्यातील साळावा-रेवदंडा खाडीवर नवीन पूल बांधणार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 26; रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पुलावरील रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरीकरण करून भरण्यात आले असून पुलाचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. दुरुस्तीची निविदा काढण्यात आली असून आवश्यकता वाटल्यास या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येईल असे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री. भरणे म्हणाले, रायगडचे जिल्हाधिकारी यांनी अति अवजड वाहनांना या पुलावरून प्रवेशास बंदी घातली आहे. रेलिंगची दुरुस्ती करण्यात आली आहे तसेच पुलावरील रस्त्याची साफसफाई करण्यात आली आहे.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य जयंत पाटील, अनिकेत तटकरे, भाई जगताप, प्रविण दरेकर आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

०००

विसंअ/ अर्चना शंभरकर/ विधान परिषद प्रश्नोत्तरे/26-2-20

‘महाज्योती’ संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूरला

मुंबई, दि. 26 : महाज्योती संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूर येथील सामाजिक न्याय भवनाच्या नवीन इमारतीत स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिली.

महाज्योती संस्थेमार्फत शासनाकडून हाती घेण्यात आलेल्या योजनांना विशेष गती देऊन या योजनांचा लाभ इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या आर्थिक विकासासाठी व्हावा यासाठी नागपूर येथे हे कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. विदर्भामध्ये या समाजाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हे कार्यालय सामाजिक न्याय भवन नागपूर येथील नवीन इमारतीत कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री.वडेट्टवार यांनी दिली.

बहुजन कल्याण मंत्री श्री.वडेट्टीवार महाज्योती संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या नागपूर येथील मुख्यालयासाठी आवश्यक असणारे अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या वेतन, भत्ते व अन्य कार्यालयीन सोयी सुविधांबाबत आवश्यक ते आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील. याबाबतचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

००००

संगीता बिसांद्रे/26.2.2020

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरु

68 गावांतील 15 हजार 358 कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई, दि. 26 : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाईन आधार प्रमाणीकरण सुरु असून सध्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. राज्यात 68 गावांतील 15 हजार 358 कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

श्री.पाटील म्हणाले, राज्यभरातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सामूहिक सुविधा केंद्र व बँकांच्या शाखा या ठिकाणी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर योजनेंतर्गत लाभाची रक्कम थेट त्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

अजय जाधव/वि.सं.अ./26/02/2020

मराठी भाषा ही शक्ती आणि भक्तीची भाषा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन  व अध्ययन विधेयक विधानपरिषदेत एकमताने संमत

मुंबई, दि. 26 : मराठी भाषेला अनेक वर्षांचा इतिहास लाभला आहे. मराठी भाषेचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हा खूप मोठा आहे. मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची भाषा असून आपण सर्वांनी मिळून ही भाषा जपली पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,  असे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मराठी शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन  व अध्ययन विधेयक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मांडले. हे विधेयक विधान परिषदेत एकमताने संमत करण्यात आले. या विधेयकाच्या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते. मराठी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची भाषा असून आज्ञापत्र  देणारी ही मराठी भाषा आहे. समाज म्हणजे काय, जगायचं कसं हे मराठी भाषेने शिकविले. इंग्रजांना वठणीवर आणणारी मराठी भाषा होती. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असे ठणकावून मराठी भाषेतूनच लोकमान्य टिळकांनी सांगितले. देशाची राज्यघटना लिहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे महात्मा फुले हेही मराठी होते हीच मराठीची शक्ती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कुठल्याही भाषेचा दुःस्वास करावा असे, शिकविले नाही. त्यामुळे मराठी भाषेच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या आपण जपल्या पाहिजेत, आत्मसात केल्या पाहिजे. मराठीची संस्कृती आपण जपली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधेयकावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य  दिवाकर रावते, शरद रणपिसे, हेमंत टकले यांनी भाग घेतला.

अस्वच्छ परिसरात व्यवसाय करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांचे सर्वेक्षण करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई, दि. 26 : अस्वच्छ परिसरामध्ये व्यवसाय करणाऱ्या कामगारांच्या शिक्षण घेत असणाऱ्या मुलांना, त्यांची संख्या निश्चित नसल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अस्वच्छ परिसरामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांचे सर्वेक्षण करावे असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवनात  डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत अस्वच्छ परिसरामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना प्री-मॅट्रीक शिष्यवृत्ती मिळण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यातील काच, कागद, पत्रा, कष्टकरी पंचायत या संघटनेने शासनाला विविध समस्यांचे  निवेदन दिले होते. या व्यवसायात काम करणाऱ्या व सफाई कामगार यांच्या मुलांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती शासनाने 2013 मध्ये सुरू केली आहे. या योजनेमध्ये लाभार्थींची संख्या अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येत आहेत त्या त्रुटी तातडीने दूर कराव्यात,  केंद्र सरकारने 2018 पासून शिष्यवृत्ती 1580 वरून तीन हजार रुपये वाढवून दिली आहे, त्याची अंमलबजावणी करावी. ही योजना केंद्र पुरस्कृत असल्याने कोणताही भार राज्य शासनावर पडणार नसल्याने योजना तातडीने राबविण्यात यावी. त्यात कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ही माहिती जिल्हानिहाय ऑनलाईन उपलब्ध करून द्यावी असे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनजंय मुंडे म्हणाले, आरोग्यास अपायकारक असलेल्या व्यवसातील व्यक्तींच्या मुलांकरीता मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. केंद्र शासनाच्या तरतुदीनुसार 100 टक्के केंद्र पुरस्कृत असलेली रक्कम 3000 रुपये देण्यात येतील. कागदपत्रे जमविणे, बँकेत खाते उघडणे, आधार क्रमांक जोडून देणे यामध्ये शाळांनी पालकांची मदत करावी याकरिता संबंधितांना निर्देश दिले. शासनाच्या संकेतस्थळावर लाभार्थींची जिल्हानिहाय यादी प्रकाशित करण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस प्रकल्प संचालक हंबीरराव कांबळे, कैलास कणसे, पौर्णिमा चिकरमाने, सुरेखा गाडे, ज्योती म्हापसेकर, निशा बांदेकर आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

राजू धोत्रे/विसंअ/26.2.2020

माजी विधानसभा सदस्य नामदेवराव भोईटे यांना विधानसभेत आदरांजली

मुंबई, दि. 26 : माजी विधानसभा सदस्य नामदेवराव भोईटे यांना विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकप्रस्ताव मांडला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री प्रकाश आबिटकर, विनय कोरे यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

000

अजय जाधव/वि.सं.अ./26/02/2020

‘मराठी भाषा गौरव दिन’ महाविद्यालये, विद्यापीठात विविध उपक्रमांनी साजरा करण्यासंदर्भात परिपत्रकाद्वारे सर्वांना सूचना

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत निवेदन

मुंबई, दि. 26 : मराठी भाषा गौरव दिनमहाविद्यालये, विद्यापीठात विविध उपक्रमांनी साजरा करण्यासंदर्भातच्या परिपत्रकाद्वारे सर्वांना सूचना देण्यात आल्याचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिले.

श्री. सामंत म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे, सर्व अभिमत विद्यापीठे, सर्व स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे आणि सर्व शासकीय/अशासकीय, अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये व परिसंस्था, कला संचालनालय व त्या अधिपत्याखालील कार्यालये तसेच तंत्र शिक्षण संचालनालय व त्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने व तत्सम शैक्षणिक संस्था यामध्ये “मराठी भाषा गौरव दिन”  साजरा करण्याविषयी सर्व संबंधितांना दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी विविध उपक्रम आयोजित करून समारंभपूर्वक“मराठी भाषा गौरव दिन”सोहळा साजरा करण्याबाबत दि. २५ फेब्रुवारी, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये निर्देशित करण्यात आले आहेत.  या दिवशी “मराठी भाषा गौरव दिन”साजरा करण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दि. २७ फेब्रुवारी हा जन्मदिन“मराठी भाषा गौरव दिन”म्हणून साजरा करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागाच्या दि.२१ जानेवारी, २०१३ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुसरून सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयीन प्रमुखांना मराठी भाषा विभागाच्या दि. ०४ फेब्रुवारी, २०२०च्या परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत.

तसेच उपरोक्त सर्व विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था यातील विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्ययनवर्ग सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन करण्याबाबत तसेच स्नेह संमेलने, वर्धापन दिन, समारोप समारंभ, सामूहिक उपक्रम, चर्चासत्र, शिबीर, विविध विषयांबाबतचे परिसंवाद, वादविवाद स्पर्धा इत्यादी आयोजित कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने करण्याबाबतच्या सूचना दि. १५ फेब्रुवारी, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये सर्व संबंधित विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना देण्यात आलेल्या आहेत.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील उपरोक्त नमूद विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये लावण्यात येणारे नामफलक मराठी भाषेतून लावण्याबाबत तसेच ज्या ठिकाणी नामफलक इंग्रजी भाषेमध्ये लावण्यात आले आहेत, तेथे सदर फलक इंग्रजी भाषेसह मराठी भाषेत लावण्याबाबतच्या सूचना दि. १५ फेब्रुवारी, २०२०च्या शासन परिपत्रकान्वये सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.

मराठी भाषा गौरव दिनी उलगडणार मराठी भाषेचा प्रवास आणि प्रवाह (विशेष लेख)

ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिन  राज्य शासनाकडून ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून यादिवशी राज्यभर मराठी भाषेच्या संवर्धन व विकासासाठी पूरक ठरतील असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. यात  सर्व मंत्रालयीन विभाग व त्याअंतर्गत सर्व शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये यांनी भरभरून सहभाग घेतला.

राज्य शासनाकडून यादिवशी विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, श्री.पु.भागवत पुरस्कार, डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार असे चार विशेष पुरस्कार व साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीकरिता 35 वाङ्मय पुरस्कार या पुरस्कारांबाबत विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात येत आहे.

यावर्षीचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ व मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या प्रकाशन संस्थेस ‘श्री.पु.भागवत पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. निवड समितीने यावर्षीच्या ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी’ ज्येष्ठ साहित्यिका, श्रीमती अनुराधा पाटील यांची तसेच ‘श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी पद्मगंधा प्रकाशन, पुणे या संस्थेची निवड केली आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस ‘भाषा संवर्धन पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. त्यानुसार या वर्षी डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारासाठी अनुक्रमे प्रा.आर.विवेकानंद गोपाळ व श्री.अनिल गोरे यांची निवड करण्यात आली आहे.

 या सर्वांचा थोडक्यात परिचय याप्रमाणे.

पद्मगंधा प्रकाशन, पुणे

महाराष्ट्र शासनाचा२०१९चा श्री.पु. भागवत पुरस्कार पद्मगंधा प्रकाशन, पुणे या प्रकाशन संस्थेला प्रदान करण्यात आला आहे. मराठी समाजमानस साहित्याच्या माध्यमातून समृद्ध करण्याचे काम जितके लेखकांनी केले आहे तितकेच विविध प्रकाशन संस्थांनीही केले आहे. गेली तीन दशके “पद्मगंधा प्रकाशन”ची नाममुद्रा मराठी ग्रंथव्यवहारात अतिशय ठसठशीत आणि स्पष्ट आहे. विविध प्रकल्प घेऊन काम करणे हे पद्मगंधाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. डॉ. रा चि. ढेरे यांच्या संशोधनाचे पुनर्व्यवस्थापन करून जुने व नवीन बावीस ग्रंथ प्रकाशित करणे, र.धों. कर्वे ह्या विसाव्या शतकातील एका द्रष्टया पुरुषाचे व्यक्तित्व व विचार आठ खंडात प्रकाशित करणे, श्री.व्य. केतकरांच्या कादंबऱ्या व समीक्षाग्रंथ, लावणी वाङ्मय व लोकसाहित्याचे विविध प्रकल्प, डॉ. गणेश देवी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय भाषांच्या लोकसर्वेक्षणातील महाराष्ट्रातील भाषांचा खंड, संशोधन व समीक्षा ग्रंथांचे प्रकल्प, विविध संप्रदाय, देवताविज्ञान, स्त्रीवादी साहित्य, दलित साहित्य, समाजशास्त्र, भाषाविज्ञान, ललित व विज्ञान साहित्य ‘पद्मगंधा प्रकाशना’ने प्रकाशित केले आहे.

महाराष्ट्रातील नामांकित लेखकांबरोबरच अनेक नवीन व तरुण संशोधकांचे समीक्षाग्रंथ तसेच ललित साहित्यही पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. पद्मगंधा प्रकाशनाने अनुवादित पुस्तके प्रकाशित करताना केवळ लोकप्रिय अनुवाद प्रकाशित केले नाहीत तर जे वैश्विक साहित्यात पथदर्शी ठरले अशा प्रतिभावंत लेखकाच्या महान कलाकृती मराठीत आणल्या. परदेशी लेखकांप्रमाणेच अनेक भारतीय भाषातील लेखकाच्या साहित्यकृतीचे अनुवाद पद्मगंधाने मराठीत प्रसिद्ध केले.

पद्मगंधा प्रकाशनचे संस्थापक श्री. अरुण जाखडे हे स्वतः उत्तम संपादक व लेखक आहेत. त्यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकांनाही’महाराष्ट्र शासनाचे व इतर संस्थाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भारतीय भाषाचे लोकसर्वेक्षणह्या प्रकल्पातील योगदानासाठी श्री जाखडे यांचा डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते गौरव झाला आहे.

पद्मगंधा प्रकाशनच्या१२५पेक्षा अधिक पुस्तकांना’महाराष्ट्र शासन व इतर प्रतिष्ठित साहित्य संस्थाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर प्रकाशन संस्थेस मुंबई साहित्य संघ, ‘म.सा.प. पुणे. मराठवाडा साहित्य परिषद, फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, नवी दिल्ली व इतर काही संस्थाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

श्रीमती अनुराधा पाटील

श्रीमती अनुराधा पाटील यांना, महाराष्ट्र शासनाचा २०१९चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान होत आहे. आधुनिक मराठी कवितेचे दालन समृद्ध करण्यात त्यांच्या कवितेचा मोठा वाटा आहे.

१९५३ साली जळगाव जिल्ह्यातील पहूर या छोटेखानी गावात त्यांचा जन्म झाला. पहूर गावातच त्यांचे दहावीपर्यंतचे औपचारिक शिक्षण झाले. ऐंशीच्या दशकात मराठीतील प्रतिष्ठित नियतकालिकातुन त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. १९८१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या’दिगंतकवितासंग्रहाने मराठी काव्यरसिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तरीही (१९८५), ‘दिवसंदिवस (१९९२),’वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ (2015) आणि कदाचित अजूनही (2017) हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. याबरोबरच कथा लेखन  आणि अनुवादही त्यानी केले आहेत.

याबरोबरच त्यांनी काही कथा लिहिल्या तसेच अनुवादही केले आहेत. मात्र कवयित्री म्हणूनच मराठी साहित्यात त्यांची  स्वतंत्र ओळख अधोरेखित झालेली आहे. आधुनिक मराठी कवितेचे दालन समृद्ध करण्यात त्यांच्या कवितेचा मोठा वाटा आहे.१९८१साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या’दिगंतकवितासंग्रहाने मराठी काव्यरसिकांचे लक्ष वेधून घेतले.

व्यापक जीवनानुभवासह स्त्रीकेंद्री दुःखाच्या महापटाचा शोध हे त्यांच्या एकूण काव्य संवेदनशीलतेचे केंद्रीय सूत्र राहिले आहे. दुःखानुभवाच्या विविध पैलूंसह, एकाकीपणा, परात्मता, सर्जनशीलतेचे सहोदरत्व, नात्यांचा शोध, मातृत्वबंध, मृत्यू आणि अतीताचा शोध या जाणीवसूत्रांनी त्यांची  कविता व्यापलेली आहे.

मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, महाराष्ट्र फाउंडेशन, बहिणाबाई चौधरी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहास २०१९चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कवितांचे उर्दू, उडिया, पंजाबी, राजस्थानी, या भारतीय भाषांसह इंग्रजीतही अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. दरअसलया नावाने हिंदीत त्यांचा अनुवादित काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.

साहित्य अकादमीच्या भाषा सल्लागार मंडळ सदस्य तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.

डॉ.अशोक केळकर

तंजावर येथून मराठी भाषेची पदविका घेतल्यानंतर पुण्यात मराठी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यानंतर, मध्ययुगीन मराठी भाषेचे अध्ययन व दोन वर्ष मोडी लिपीचे प्रशिक्षणही घेतले.

प्राचीन भारतीय इतिहास आणि भाषावैभव समजून घेताना दुर्मिळ हस्तलिखिते अत्यंत महत्वाचा ऐवज आहे. हे जाणून त्यानंतर गेली अनेक वर्षे या लिपीच्या अध्यापनाचे कार्य ते करत आहेत. त्यासाठी तंजावरच्या सुप्रसिद्ध’सरस्वती महाल ग्रंथसंग्रहालयात मोडी आणि मराठी भाषा प्रशिक्षणाचे १२ अभ्यासक्रम तयार केले आहेत. तंजावरच्या या वाचनालयात मोडी भाषेतील अनेक दुर्मिळ हस्तलिखि साहित्याला एक समृध्द असा खजिनाच उपलब्ध करुन दिला आहे.

कुप्पमच्या द्रवितीयन विद्यापीठात गेली 11 वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच, मराठी आणि तमिळ या भाषेतील सेतू म्हणून ते काम करित आहेत. लावणी काव्यप्रकाराचा चिकित्सक अभ्यासया विषयात मराठी आणि तामिळ, अशा दोन्ही भाषांमध्ये अध्ययन करुन १९८७साली युवराज तुळजेन्द्र राजा टी. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मराठी अभ्यास परिषदेची त्यांनी स्थापना केली. मराठी शिकवण्याचे काम ते तीन दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे करत आहेत.

मोडी लिपीतील हस्तलिखितांच्या अनुवादासह, मराठी आणि तमिळ भाषेत त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. त्यात, शहाजी महाराज, मराठी पाळणा संग्रह, बिल्हण काव्य, लावणीचा इतिहास आणि विकास, क्षत्रिय मराठा कुळ आणि त्यांचे विभाजन असे अभ्यास ग्रंथ आहेत.  सिद्धहस्त विदुषी इरावती कर्वे यांचे युगान्तहे अजरामर पुस्तक, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक इयाम मनों यांनी अनुवादित केले. त्याशिवाय, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे (खंड 98) तीन भाग, डॉ जी. एम. पवार लिखित लेखक भालचंद्र नेमाडे यांचे टीका स्वयंवर, अरुण खोपकर यांचे चित्रपटविषयक लेखन चलत्-चित्रव्यूहअसे दर्जेदार कार्य ते करत आहेत. तमिळ साहित्यातील सुप्रसिद्ध ग्रंथ ‘थिसारळ’चा त्यांनी मराठीत अनुवादही केला आहे.

श्री.अनिल गोरे

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनिल श्रीपाद गोरे एक डोळस भाषांतरकार, जागरूक प्रकाशक आणि सजग कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत.

व्यवहारामध्ये मराठीचा अधिकाधिक उपयोग करता येण्यासाठी त्यांनी सरकार-दरबारी तसेच सामाजिक वर्तुळात नियोजनबद्ध कार्य केले.  २०१०पासून आतापर्यंत निरनिराळ्या बँकांमध्ये तब्बल७ अब्ज कागद मराठीतून छापले गेले. तसेच शैक्षणिक, हजार पानांचे इंग्रजीतून मराठीत रूपांतर त्यांनी केले.

मराठीकरणाचा उपयोग सिद्ध करण्यासाठी मराठी माध्यमातील शिक्षणाचा राज्यभर प्रसार करण्याचे व्रत घेऊन समाजमाध्यमांच्या मदतीने त्यांनी अभिनव पद्धतीने जनजागृती केली. राज्यातील ३ लाख ११हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून मराठी माध्यमात प्रवेश घेतला, हीच याची फलश्रुती होय !

ज्ञानभाषा म्हणून मराठीचे महत्त्व ठळक करण्यासाठी त्यांनी प्रकाशन व्यवसायात उतरून इयत्ता अकराव जीवशास्त्र आणि कृषीविज्ञान या विषयांच्या मराठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली. इतकेच नव्हे तर, आय. आय. टी.  नीटपरीक्षा, मराठीतून घेण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावाही यशस्वी झाला.

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

2010 (1ला) श्रीमती विजया राजाध्यक्ष

2011 (2रा) श्री.के.ज. पुरोहित

2012 (3रा) श्री.ना.धो. महानोर

2013 (4था) श्री. वसंत आबाजी डहाके

2014 (5वा) प्रा. द. मा. मिरासदार

2015 (6वा) प्रा. रा. ग. जाधव

2016 (7वा) श्री. मारुती चितमपल्ली

2017 (8वा) श्री. मधु मंगेश कर्णिक

2018 (9वा) श्री. महेश एलकुंचवार

डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार

2015 (1ला) श्रीमती मॅक्सीन बर्नसन

2016 (2रा) श्रीमती यास्मिन शेख

2017 (3रा) श्री. अविनाश बिनीवाले,पुणे

2018 (4था) डॉ. कल्याण काळे

श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार

2008 (1ला) पॉप्युलर प्रकाशन

2009 (2रा) साकेत प्रकाशन

2010 (3रा) मौज प्रकाशन

2011 (4था) नवचैतन्य प्रकाशन

2012 (5वा) मॅजेस्टिक प्रकाशन

2013 (6वा) राजहंस प्रकाशन

2014 (7वा) केशव भिकाजी ढवळे प्रकाशन

2015 (8वा) कॉन्टिनेन्टल प्रकाशन

2016 (9वा) भारतीय विचार साधना

2017 (10वा) वरदा प्रकाशन

2018 (11वा) साहित्य प्रसार केंद्र

कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार

2015 (1ला) श्रीमती बेबीताई गायकवाड

2016 (2रा) श्री. श्याम जोशी

2017 (3रा) मराठी विज्ञान परिषद

2018 (4था) डॉ. हरिश्चंद्र बोरकर

– अर्चना शंभरकर

वरिष्ठ सहायक संचालक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

ताज्या बातम्या

“मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या!”– पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️पुष्पवृष्टी, स्वागतगीत, पुस्तके-वह्या व दप्तरांचे वाटप ▪️इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या उद्घटनाने पहिला दिवस स्मरणीय जळगाव दि. १६ (जिमाका): "माझ्यासह माझी मुलेही याच शाळेत शिकलेली आहेत, हे सांगताना...

२२ जुलै ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून साजरा होणार

0
मुंबई, दि. १६: राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी...

रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट

0
मुंबई, दि. १६: भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार २४ तासाकरिता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट,...

विद्यार्थ्यांनो देश व राज्याचा नावलौकीक वाढवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
सातारा, दि. १६:  शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती...

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया सन्मानित

0
मुंबई, दि.१६ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते फोर्स मोटर्सचे अध्यक्ष उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांना अलीकडेच अरुत्चेलवर डॉ. एन. महालिंगम पुरस्काराने...