मंगळवार, जून 10, 2025
Home Blog Page 18

चित्पावन ब्राह्मण संघाला सर्वतोपरी सहकार्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. १ : महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात चित्पावन ब्राह्मण समाजातील नामवंतांनी प्रत्येक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. चित्पावन ब्राह्मण संघास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

गुरूदक्षिणा सभागृहात आयोजित चित्पावन ब्राह्मण संघ नाशिक यांच्या श्री परशुराम भवन या नूतन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, माजी मंत्री डॉ. भारती पवार, संस्थेचे अध्यक्ष विजय साने, उपाध्यक्ष अविनाश भिडे, विश्वस्त देवेंद्र बापट, प्रा. दिलीप फडके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, चित्पावन ब्राह्मण संघाने अतिशय सुंदर वास्तू उभारलेली आहे. त्यांनी सुरू केलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. चित्पावन समाजातील अनेकांनी संघर्षातून पुढे येत स्वकर्तृत्वाने नावलौकिक मिळविला आहे. तसेच संघाने समाजात दुधात साखर विरघळते त्या प्रमाणे कार्य करावे. सर्व ज्ञातींनी एक होऊन कार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

श्री. साने यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी चित्पावन ब्राह्मण संघाची माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते देणगीदारांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला चित्पावन ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

0000

‘चक्र’ च्या माध्यमातून संशोधन, नवाचार आणि स्टार्ट अपला बळ मिळेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार

नाशिक दि. १: विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन, नवाचार आणि स्टार्ट अप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्यांतर्गत सुरू केलेले ‘चक्र’ ( सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) हे उपयुक्त ठरेल. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था यामधून निर्माण  होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’ चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (दूरदृष्यप्रणाली द्वारे), शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य विभागाचे मंत्री  नरहरी झिरवळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त),  प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने वैद्यकीय शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे असा विचार असून  गेल्या २ वर्षात शासकीय १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत.  आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गेल्या २५ वर्षात चांगले काम केले आहे.

वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी मार्गदर्शन करावे
परदेशी विद्यापीठे ज्याप्रकारे काम करतात, तसेच काम येथील विद्यापीठांनी करावे. विद्यापीठात संशोधनाला चालना मिळणे गरजेचे आहे, वेगवेगळ्या विषयांचे संशोधन केंद्र म्हणून विद्यापीठांनी काम केले पाहिजे.  उत्कृष्टता केंद्र, ईन्क्यूबेशन  केंद्र, स्टार्ट अप आणि विविध क्षेत्रात मार्गदर्शन करणारी केंद्रे म्हणून त्यांनी काम केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

देशात नवीन शिक्षण धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणले. समाजाची गरज आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचा धोरणात अंतर्भाव करण्यात आला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेलं ‘चक्र’ हे त्याचेच उदाहरण असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

सामान्य माणसाचे आरोग्य जपणारे संशोधन व्हावे
‘चक्र’सारखे मॉडेल आणि  हब अँड स्पोक ही पद्धती महत्वाची आहे. मागच्या काळात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नागपूर आयआयएम सोबत आदिवासी आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था  निर्माण  होणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

जगातल्या विद्यापिठाप्रमाणेच आपली विद्यापीठे  स्वयंपूर्ण होत आहेत. त्यासाठी असे प्रयोग गरजेचे आहेत. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आले आहे. मोठे बदल होत आहेत. नवे तंत्रज्ञान येत आहे. अशावेळी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पायभूत सुविधांचा  लाभ सामान्य माणसाला झाला पाहिजे. राज्यातील १३ कोटी नागरिकांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तालुकास्तरीय उपकेंद्रांनी या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. असे केल्यास खऱ्या अर्थाने जिल्हास्तरीय यंत्रणांना संशोधन आणि इतर बाबीकडे लक्ष देता येणे शक्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्यापीठाने आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये येत्या काळात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डिजिटल कुंभ सोबतच आरोग्यदायी कुंभ अशी संकल्पना राबवून यामध्ये योगदान द्यावे. विद्यापीठाच्या प्रत्येक उपक्रमात राज्य शासनाच्यावतीने पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या १५० दिवसांच्या कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विद्यापीठाने केलेल्या उपक्रमांबाबत आणि चक्र विषयक माहिती प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.

प्रास्ताविकात कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल श्रीमती कानिटकर यांनी प्रधानमंत्री यांच्या विकसित भारत संकल्पानुसार विद्यापीठाने काम सुरू केले असल्याचे सांगून चक्र आणि उत्कृष्टता केंद्र निर्मितीबाबतची माहिती दिली.
00

जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. १ : कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यातील अमृत स्नानाचे दिवसही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

साधू-महंतांच्या उपास्थितीत कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा होणे ही खऱ्या अर्थाने कुंभपर्वाची सुरूवात आहे, असे नमूद करू मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्याचे संचलन आखाडे, साधू -महंत करतात, राज्य शासन सेवक म्हणून अधिकाधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करते. यावेळी देखील शासनातर्फे उत्तम सुविधा उभारण्यात येतील. कुंभमेळ्याबाबत साधू महं तांचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. २०१५ मध्ये तयारीसाठी कालावधी कमी होता. यावेळी पूर्व तयारीसाठी अधिक कालावधी असल्याने शासन चांगली तयारी करीत आहे.

गोदावरी निर्मळ राहावी आणि कायम प्रवाही राहावी हेच कुंभचे उद्दिष्ट असून तसा शासनाचा प्रयत्न आहे. गोदावरीचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी उपायोजना करण्यात येत आहेत.  गोदावरीत जाणारे पाणी स्वच्छ असावे यादृष्टीने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी  निविदा काढण्यात येत आहेत. नदी पात्रात अशुद्ध पाणी जाऊ नये असे प्रयत्न करण्यात येतील. नदी प्रवाहित राहिल्यास शुद्ध राहील, त्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे कुंभ आणि त्यानंतरही गोदावरीचे जल निर्मळ राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

साधू-महंतांच्या सूचना लक्षात घेवून शासन आवश्यक नियोजन करेल, असे नमूद करतांना श्री.फडणवीस पुढे म्हणाले, आखाड्यासाठी आवश्यक सुविधा उपालब्ध करून देण्यात येतील. साधूग्रामची जागा कायमस्वरूपी उपयोगात यावी यासाठी जमिन अधिग्रहित करण्यात येईल. कुंभमेळ्यासाठी शहरात
रस्त्याचे जाळे तयार करण्यात येत आहे. कुशावर्त येथे गर्दी होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान असलेल्या चौंडीच्या विकासासाठी ६८१ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यांनी तयार केलेल्या घाटांचे संवर्धन करण्यात येत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथेदेखील उत्तम सुविधा उभारण्यात येतील. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. भाविक आणि साधू – महंतांची  सुरक्षितता महत्वाची असल्याने नियोजन करतांना सुरक्षा विषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले, यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यात अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने गर्दी नियंत्रणाचे मोठे आव्हान असणार आहे. तीन अमृत स्नानसोबत इतर पर्वस्नान होणार आहेत. कुंभमेळ्याची कामे वेगाने सुरू असून ४ हजार कोटींपेक्षा अधिक कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. लवकरच २ हजार ६०० कोटींच्या निविदा काढण्यात येणार आहेत. ही सर्व कामे जानेवारी २०२७ पूर्वी पूर्णत्वास येतील. या कामांसाठी सर्व आखाड्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. सर्वांच्या सहकार्याने यंदाचा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा चांगला आणि सुरक्षित होईल. इथे येणाऱ्या साधू-महंतांना सुखद आणि पावन अनुभव येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विविध आखाड्याच्या साधू-महंतांनी कुंभमेळा आयोजनाबाबत सूचना केल्या. यावेळी श्री रामानंद निर्मोही आखाडा, निर्मोही अनी आखाडा, श्री दिगंबर अनी आखाडा, निर्वाणी अनी आखाडा श्री पंचायती उदासीन आखाडा, श्री पंचायती नया उदासीन आखाडा, श्री पंचायती निर्मल आखाडा, श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा, श्री पंच अग्नी आखाडा, यांच्यासह विविध आखाड्यांचे पदाधिकारी, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, पुरोहित संघाचे त्र्यंबकेश्वर येथील अध्यक्ष मनोज थेटे आदी उपस्थित होते.

प्रारंभी सर्व साधू, महंतांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे मंत्रोच्चारात स्वागत केले. तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्व साधू, महंतांचे शासनातर्फे स्वागत केले.

नाशिक कुंभमेळा

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६, दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी (स्थळ-रामकुंड पंचवटी)
प्रथम अमृतस्नान-सोमवार २ ऑगस्ट २०२७,आषाढ सोमवती अमावस्या.
महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, श्रावण अमावस्या
तृतीय अमृतस्नान-शनिवार ११ सप्टेंबर २०२७, भाद्रपद शुद्ध एकादशी

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६,
प्रथम अमृतस्नान-सोमवार २ ऑगस्ट २०२७, आषाढ सोमवती अमावस्या.
महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, श्रावण अमावस्या
तृतीय अमृतस्नान-शनिवार १२ सप्टेंबर २०२७, भाद्रपद शुद्ध द्वादशी (वामन द्वादशी).

याशिवाय नाशिक येथे सिंहस्थ पर्व पर्वकालातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या वैधृती व्यतिपात योग हे दिवस भाविकांसाठी तीर्थस्थान, दर्शन पर्व असतील. नाशिक येथे कुंभमेळा २०२७ मध्ये मुख्य तीन पर्वण्याव्यतिरिक्त पर्वस्नानाचे एकूण ४४ मुहूर्त असून त्र्यंबकेश्वर येथे पर्वस्नानाचे एकूण ५३ मुहूर्त आहेत. भाविकांनी अमृत स्नानाशिवाय पर्वस्नानाचा दिवशी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

(सोबत सविस्तर वेळापत्रक आहे.)

०००००

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ०१ : “शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार बाबाजी काळे, आमदार बापूसाहेब पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, प्र. विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, मराठा चेबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबाणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, दापोली कृषी विद्यापीठाचे डॉ. संजय सावंत, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक संजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, शेती फक्त शेतकऱ्यांची जबाबदारी नसून उद्योग, शास्त्रज्ञ, शासन आणि समाज यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे. शासनामार्फत ॲग्री स्टॅक, डिजिटल क्रॉप सर्व्हे, स्मार्ट सिंचन, कृषी डेटा मिशन, एफ.पी.सी. सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेती प्रोत्साहन यांसारखे अनेक उपक्रम राबवित आहोत. शेतीमधून शाश्वत उपजीविका निर्माण करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असून, आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीची गती वाढविण्यासाठी आपण किती समर्पण भावनेनं काम करतो यावर महाराष्ट्राच्या कृषी विभागाचं भविष्य अवलंबून आहे, असे ते म्हणाले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ॲग्री स्टॅक नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फॉर्मर आयडी (Unique Farmer ID) दिला जात आहे. हा नंबर म्हणजे शेतकऱ्याची ओळख – जशी आपली आधारकार्डवर ओळख असते, तशीच ही शेतीसाठी खास ओळख असेल. या नंबरद्वारे शेतकऱ्याची जमीन, घेतलेली पिके, मिळालेली अनुदानं, विमा, कर्ज याची सर्व माहिती जोडली जाईल. त्यामुळे भविष्यात कुठलीही योजना मिळवण्यासाठी वारंवार कागदपत्रं देण्याची गरज भासणार नाही.

शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ मदत व योजनांचा लाभ देऊ शकेल. कोणत्याही चुकीच्या नोंदी टाळल्या जातील आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य लाभ पोहोचेल. आजपर्यंत या योजनेत महाराष्ट्रातील 1 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करुन आपला नंबर प्राप्त करुन घेतला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या तलाठी, कृषी सहायक किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन लवकरात लवकर नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणे म्हणजे स्वयंपूर्ण झालो असे नाही. उत्पादनाची गुणवत्ता राखली जाणे, व्यवस्थित त्याची जाहिरात होणे, बाजारपेठ मिळणं आणि त्याला बाजारभाव मिळणे ही मूल्यसाखळी आपल्याला निर्माण करायची आहे.

हवामान बदलामुळे शेतीपुढे खूप आव्हाने आहेत. एका क्षणात शेतीचे प्रचंड नुकसान होते. अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणं, आपला विचार, अभ्यास, प्रत्यक्षात आणणं, त्यातून शेतकऱ्याला ज्ञान देणं ही खरी काळाची गरज आहे.

या ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’मध्ये सहभागी होणाऱ्या संशोधकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याची संधी मिळेल. यशस्वी संकल्पनांना वित्तीय आणि तांत्रिक मदतही दिली जाणार आहे. तसेच, खाजगी कंपन्यांच्या सहकार्यानं हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात साकारण्यात येईल, ही बाब महत्वाची आहे. पुणे आंतरराष्ट्रीय ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’हे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारं ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषि हॅकॅथॉनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषितज्ज्ञ यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे यावेळी म्हणाले, भविष्यात शेती सुरक्षित व संरक्षित कशी करता येईल यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे. तसेच पुढील काळात शेतीसाठी मनुष्यबळाची कमतरता यादृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीची पोत खराब होत असल्याने रासायनिक शेती हळूहळू कमी करुन सेंद्रीय शेतीकडे जाणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीतून उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी मार्केट महत्वाचे असून, मार्केट लिंकींग करण्याची आवश्यकता आहे. यासाठी भारतातील कंपन्या पुढाकार घेण्यास तयार आहेत. राज्यात विभागस्तरीय सहा अद्यावत शेती प्रयोगशाळा, शॉपिंग मॉल उभारण्याच्या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्नशिल आहे. उत्तम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्यास कृषी क्षेत्रात महाराष्ट्र अधिक प्रगतशील होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेती व शेतकरी सक्षम होण्यासाठी शासनामार्फत विविध धोरण राबविण्यात येतील. या कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून शेतीसाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकऱ्यांनी त्याचा फायदा इतरांनाही होण्यासाठी प्रयत्न करावेत.

कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून नवनवीन माहिती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. यातूनच सर्वसमावेशक व शेतकऱ्यांच्या फायद्याचे कृषी धोरण राबविण्याचा विचार कृषी विभाग करत आहे, असे त्यांनी सांगितले.

कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, शेतीत उत्पादन जास्त होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत नाही यासाठी नविन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक आहे. या ॲग्री हॅकॅथॉनच्या माध्यमातून शेतमालाच्या उत्पादनासोबत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत हाईल. यावेळी माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या कृषी विषयक विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध कृषी उत्पादकांकडून माहिती जाणून घेतली.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ॲग्री हॅकॅथॉन आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ, नविन तंत्रज्ञानाची माहिती, शेतीविषयक समस्या व त्यावरील त्रांत्रिक उपाय, पाणी टंचाई, जमीनीचे व्यवस्थान उत्पादनात वाढ या बाबींची माहिती शेतकऱ्यांना ॲग्री हॅकॅथॉन मधून मिळेल. या उपक्रमात 140 जणांची निवड झाली आहे. हे सर्व जण प्रदर्शनात सहभागी होऊन सादरीकरण करणार आहेत. यातून अंतिम 16 जणांची पहिल्या व दुसऱ्या स्थानासाठी निवड होईल. 2 व 3 जून रोजी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, 3 जून रोजी समारोप होईल, असे त्यांनी सांगितले. डॉ. महानंद माने यांनी आभार व्यक्त केले.

00000

समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. १ : रुग्ण सेवा ही  ईश्वर सेवा असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील सर्वांनी गतिशीलता, पारदर्शकता आणि संवेदशनशीलतेने काम करुन समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी  प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण तथा संशोधन अकादमी (मित्रा) नाशिक येथे आयोजित मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप  प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची रचना विश्वस्त भावनेने केली आहे. परदेशातील औद्योगिक, सामाजिक दायित्व निधी प्रमाणपत्र मिळविणारा देशातील पहिला कक्ष आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर वैद्यकीय क्षेत्रात करण्याची संकल्पना २०१४ पासून राबविण्यास सुरूवात केली. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची संस्थात्मक रचना उभी केली असून सामान्य माणसाला मदत होईल, अशी या कक्षाची रचना आहे. आता या कक्षाची जिल्हास्तरावरही स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयाच्या कामकाजाच्या बाबतीतही पारदर्शक आणून दुरूपयोग टाळावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख श्री. नाईक यांनी प्रास्ताविक केले.  ‘रुग्ण मित्र’ योजना मतदारसंघनिहाय सुरू करण्यात येत आहे. सामाजिक संस्थांची फंडासाठी मदत घेणार असून केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती एका प्लॅटफॉर्म आणण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी हे आरोग्यदूत म्हणून काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राज्यस्तरीय कक्षाचे प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय तथा प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था डॉ. सुनील भोकरे, सहकक्ष प्रमुख शरद घावटे, उपकक्ष प्रमुख शेखर नामदास, जनसंपर्क अधिकारी डॉ. जगदीश सकवान, वैद्यकीय समन्वयक डॉ. सवानंद सोनार, प्रशासकीय सल्लागार दत्तात्रय विभुते यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हास्तरीय कक्षाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करावे- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि.१ : राज्य शासनाकडून समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. प्रशासनाने योग्य आणि प्रभावी अंमलबजावणीतून त्यांचा पात्र नागरिकांना  लाभ देतांना त्यांच्या यासंदर्भातील समस्याही तत्परतेने सोडवाव्यात, असे आदेश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात अधिकाऱ्यांना दिले.

येथील नियोजन भवनात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात एकूण 207 नागरिकांनी आपल्या समस्या व निवेदने सादर केली. प्रशासनातील विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

नागरिकांच्या स्थानिक स्तरावरील समस्यांचे तात्काळ निराकरण व्हावे व त्यांचे शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लागावे, यासाठी  पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थी, दिव्यांग, महिला, वृद्ध  तसेच समाजाच्या सर्व घटकातील नागरिकांनी आज व्यक्तिगत तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या समस्या सादर केल्या. समस्याग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या तक्रारींवर तात्काळ  कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. विशेषतः आरोग्यविषयक समस्यांवर आज प्राप्त झालेल्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सांगितले.

नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित व नियमानुसार करता येणारी कामे दिरंगाई न करता तातडीने पूर्ण करण्याचे आदेश  पालकमंत्र्यांनी शासकीय विभागांना दिले. आजची सर्व निवेदने, समस्या व इतर प्रकरणांविषयी संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा पुढील वेळी घेण्यात येईल, असेही श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

योजनांचा लाभ देण्यात येणारे अडथळे, आरोग्यविषयक सुविधा, अतिक्रमण, अंगणवाडी व परिचारिकांच्या समस्या, वीज वितरण, कृषी, क्रीडा व महसूल संबंधित अनेक विषयांवर नागरिकांनी निवेदने देवून श्री. बावनकुळे यांच्याशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

00000

हरित सातारा उपक्रम दरवर्षी राबवणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा  दि. १: सातारा जिल्हा निसर्गाने व झाडा झुडपांनी नटलेला आहे. यात आणखीन भर पडावी यासाठी हरित सातारा उपक्रम प्रत्येक वर्षी 1 जून रोजी राबवणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा नगरपरीषदेच्या संयुक्त विद्यमाने  पोलिस परेड मैदान येथे वृक्ष लागवड अभियानास   सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहूल अहिरे, सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, सिने अभिनेते संयाजी शिंदे, दिशा कमिटीच्या सदस्या रेणूताई येळगावकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील व नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अनेक डोंगरावरील झाडांची संख्या कमी झालेली आहे. प्रशासनाने स्थानिकांच्या सहकार्याने या डोंगरावर पुन्हा वृक्षारोपन करावे.  दर वर्षी झाडे किती लावली, किती जगली याचा आढावा घेऊन जीओ टँगींगद्वारे माहिती शासनाला सादर करणार, असल्याचेही सार्वजनिक बांधकाम श्री. भोसले यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, रस्त्यांच्या रुंदीकरण कामामुळे झाडे काढावी लागतात. ज्या ठिकाणची झाडे काढली आहेत त्या ठिकाणी पुन्हा देशी झाडांचे वृक्षारोपन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानात ८ ते १० फूट उंचीची विविध प्रकारची २ हजार ८०० झाडे लावण्यात येणार असून या अभियानात सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळाचे ११० कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेल्हे-शिक्रापूर-जेजुरी-लोणंद-सातारा या राज्य मार्गावर पोवई नाका ते वाढे फाटा यादरम्यान ३.३ कि.मी. लांब मार्गाच्या दुतर्फा १ हजार ५१४ झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने बहावा, कदंब, अर्जुन, पुत्रवती, कांचन, यकृळ, पुत्राजिवा, कडूनिंब, कुंकू, मोहगणी, खडशिंग, करंज यांसारख्या औषधी व सेंद्रिय उपयोगी वृक्षांचा समावेश आहे.  तसेच नगरपरिषदेच्यावतीने   आयोध्यानगरी ते दत्त मंदिर, हुतात्मा स्मारक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते मोळाचा ओढा, सदरबझारमधील जेसीओ कॉलनी परिसरात सोनचाफा, ताम्हीण, बॉटल ब्रश, जांभूळ, पारिजातक, पळस, आवळा, उंबर, कुसंबी, गोरख चिंच अशा विविध प्रकारचे १ हजार २०० झाडे लावण्यात आली आहेत.

किमान १० जूनपर्यंत पावसात घट शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

मुंबई, दि १ : बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली, आणि आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात ४० अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान ३५ ते ४० अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे.

कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून परत एकदा करण्यात येत आहे.

0000

गरजूंना आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे पुरविणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 31 : राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी अपंगांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्यात येणार आहे. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे निशुल्क देण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय आज अलीम्कोतर्फे सहाय्यक उपकरणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, चंदू यावलकर, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, गरजू व्यक्तींच्या कल्याणासाठी योजना राबविण्यात येत आहे. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले सहाय्यक उपकरणासाठी सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. सर्वेक्षणाच्या या पहिल्या टप्प्यात तीन हजार अपंग आढळून आलेले आहेत.या सर्वांना त्यांच्या गरजेनुसार उपकरणे देण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने समाजातील सर्व घटकांना मदत करण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार कृत्रिम अवयव वाटप करण्यात येत आहे. अपंग आणि निराधारांना देण्यात येणारे सहाय्यक अनुदान वाढविण्यात आले आहे.

वयोश्री योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आपल्या परिसरातील अपंगांना याबाबत माहिती देण्यात यावी. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात त्यांना लाभ होऊ शकेल. त्यासोबतच महाराजस्व अभियानामध्ये शिबिरे घेऊन याबाबतची माहिती देण्यात यावी. राज्य शासनाने शिक्षण, आरोग्य, रोजगार, अपंगांना मदतीचे धोरण स्वीकारलेले आहे. येत्याकाळात जलसंधारणाचे ही कामे प्राधान्याने हाती घेऊन भुजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 12 तास विज उपलब्ध व्हावी, यासाठी सौर पंप देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पांदण रस्ता आणि पाणी उपलब्ध करून देणार आहे. पांदण रस्त्यासाठी मॉडेल तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व रॉयल्टी माफ करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात किमान बारा फुटाचा पांदण रस्ता राहणार आहे. गेल्या कालावधीतील जलसंधारणाची केलेली कामे शोधण्यात येत असून यातील किरकोळ दुरुस्ती करून पाणीसाठा तयार होऊ शकेल अशी कामे पूर्ण करण्यात येणार आहे. यासोबतच सर्व शाळा आदर्श करण्यावर भर देण्यात येणार आहे. येत्या वर्षात 5 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमात एक झाड लावून आपल्या आईच्या स्मृती जागवाव्या. यासाठी शासनातर्फे मोफत रोपांचा पुरवठा करण्यात येईल. सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

0000

 

पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 31 : पारधी समाज हा आजही मागासलेलाच आहे. त्यांना आपल्या अधिकाराची अद्यापही जाणीव झालेली नाही. गेल्या कालावधीत राज्य सरकारने राबविलेल्या विविध उपक्रमामुळे जातीच्या प्रमाणपत्रासह शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यापुढेही शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात पारधी समाजामध्ये कार्य करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आज जिल्हा नियोजन सभागृहात धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने पारधी पॅकेज अंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचे वाटप पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रतापदादा अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, चंदू यावलकर, प्रवीण पोटे पाटील, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अप्पर आदिवासी आयुक्त जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी प्रिया म्हाडदळकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त समाजातील विविध घटकांचा विकास करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. पारधी विकास कार्यक्रमांतर्गत रोजगाराभिमूख योजना राबविण्यात येत आहे. आज प्रामुख्याने व्यवसाय आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. रोजगारनिर्मितीसोबतच शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार मिळवण्यासाठी प्रशिक्षित कामगार तयार करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येईल.

केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक जातीची माहिती घेण्यासोबतच त्यांचे सामाजिक सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक समाजाची परिस्थिती समजणार असून वस्तुस्थिती समोर येणार आहे. त्यानुसारच प्रत्येक समाजाला विकसित करण्यासाठी धोरण ठरवण्यात येईल. पारधी समाजाला त्यांच्या वस्त्यांमध्येच लाभ मिळावा, यासाठी त्यांचे सर्वेक्षण करावे. वस्त्यांच्या ठिकाणी महाराजस्व अभियान अंतर्गत शिबिर आयोजित करण्यात यावे. या ठिकाणी संपूर्ण योजनांची माहिती द्यावी. पारधी समाजाला येत्या काळात प्राधान्याने घरकुल आणि घरासाठी पट्टे देण्यात येणार आहे. गरजूंना दहा लाख घरे देण्याचे आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला मागणीनुसार घरे देण्यात येईल. यासोबतच पारधी समाजाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या योजना तयार कराव्यात, यासाठी वाढीव निधी देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

यावेळी पूजा सोळंके, वर्षा पवार, पंडित चव्हाण, शिवशक्ती महिला बचतगट यांना प्रतिनिधी स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, ई-रिक्षाचे प्रत्यक्ष वितरण केले.

00000

 

ताज्या बातम्या

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या महसूल लोक अदालतीमुळे महसूली दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहेत. त्यामुळे ही सर्वसामान्यांना न्याय देणारी महसूल लोकअदालतीची मोहीम यापुढे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित ‘धडपड भाग-३’ या पुस्तकाचे प्रकाशन

0
पुणे, दि. 9 : ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-3 या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद...

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये उद्या भाषण

0
मुंबई, दि. 9 : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या स्वीडनमध्ये इंटरनॅशनल आयडिया स्टॉकहोम निवडणूक प्रामाणिकता परिषद (International IDEA Stockholm Conference on Electoral...

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

0
मुंबई, दि. 9 : दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण आठ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेतील...

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली

0
ठाणे,दि.09(जिमाका):- दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वे प्रवासी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ आणि कोकण) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, डॉ.नरेश...