सोमवार, एप्रिल 21, 2025
Home Blog Page 19

‘ग्रंथ महोत्सव’चे रुपांतर आनंदसोहळ्यात व्हावे – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि. 11 (जिमाका): पुस्तक वाचनाचा फायदा माणसाला जीवनभरात नक्की होत असतो. समाजमन घडविण्या-या ग्रंथाच्या या महोत्सवाचे रुपांतर आनंद सोहळ्यात व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 7 ते 14 एप्रिल दरम्यान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठात पहिल्यांदाच 11 ते 14 एप्रिल दरम्यान इतिहास वस्तू संग्रहालयाच्या हिरवळीवर उभारलेल्या भव्य मंडपात ग्रंथ महोत्सव घेण्यात येत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्याच्या हस्ते शुक्रवारी (दि.11) करण्यात आले. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.भारत खंदारे, डॉ.योगिता पाटिल, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ.वैशाली खापर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, अशोक पटवर्धन यांची ही मंचावर उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगीश्री.शिरसाट म्हणाले, विद्यापीठात पहिल्यांदाच मोठया प्रमाणावर ग्रंथ महोत्सव होत आहे. आजकाल वाचन संस्कृती लोप पावत असून  या प्रदर्शनात आलेल्या  प्रत्येकाने किमान एक पुस्तक विकत घेऊन वाचन करावे.

महोत्सवात देशभरातून 20 नामांकित प्रकाशक सहभागी झाल्याचे प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रा.प्रराग हासे यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, रोजदांरी कर्मचारी, विद्यार्थी व वाचक मोठया संख्येने उपस्थित होते.इतिहास वस्तू संग्रहालयच्या हिरवळीवर 14 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या दरम्यान ग्रंथ प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे.

वसतिगृहासाठी २५ कोटी देऊ : पालकमंत्री

विद्यापीठात आल्याचा मला मनस्वी आनंद असून वसतीगृहासाठी २५ कोटींचा निधी सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येईल, असे आश्वासन श्री.शिरसाट यांनी दिले. विद्यापीठास आवश्यक ते सहकार्य राज्य शासनाकडून करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

‘नॅशनल बुक ट्रस्ट’ च्या वतीने पुढील वर्षी राष्ट्रीय दर्जाचे पुस्तक प्रदर्शन घेऊ, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी अध्यक्षीय समारोपात घोषित केले.

 वीस प्रकाशंकाचा सहभाग

या ग्रंथ महोत्सवात देशभरातून २० प्रकाशक सहभागी झाले. यामध्ये ऑक्सफर्ड हाऊस, वायकिंग बुक, बुक एन्क्लेव्ह, अ‍ॅपेक्स पब्लिकेशन (सर्व जयपूर), करंट पब्लिकेशन (आग्रा), युनिव्हर्सल पब्लिक सिंग, एन.एम मेडिकल बुक्स, वक्रतुंड बुक्स, कवडवाल बुक्स, न्य एस इंटरनॅशनल (मबई), प्रशांत बुक्स, विज्ञान बुक्स राजकमल, आहुजा, टेक्निस् बुक्स (नवी दिल्ली) सुमन बुक्स, कैलास पब्लिकेशन (छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

अभ्युदयनगर पुनर्विकासात किमान ६२० चौ.फूटाची सदनिका; निविदा प्रक्रियेला गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ११ : मुंबईतील अभुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान ६२० चौ.फूट प्रमाणे करुन नव्याने निविदा काढण्यात याव्यात व ही निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार प्रविण दरेकर, अजय चौधरी, माजी आमदार बाळा नांदगावकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह अभुदयनगर रहिवासी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

अभुदयनगर येथील म्हाडाच्या वसाहतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी यापूर्वी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदेमध्ये पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 635 चौरस फूट असण्याबद्दल प्रमुख अट होती. मात्र, विकासकाकडून ही अट व्यवहार्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निविदेमध्ये पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र 635 चौ.फूट ऐवजी किमान 620 चौ.फूट चटई क्षेत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच निविदेमध्ये 620 चौ.फूटपेक्षा जास्त क्षेत्रफळ देणाऱ्या विकासकाचा विचार पुनर्विकासासाठी करण्याचे निर्देश दिले. या निर्णयास अभ्युदयनगर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनुकुलता दाखविली.

या प्रकल्पासाठी पुनर्विकास विनियम 33(5) नुसार लागू असलेल्या 3 चटई क्षेत्र निर्देशांक हा अधिमूल्याच्या मोबदल्यात गृहसाठ्याच्या स्वरुपात वितरित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. पुनर्विकासादरम्यान रहिवाश्यांना देण्यात येणाऱ्या 20 हजार रुपये घरभाड्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. जयस्वाल यांनी या प्रकल्पातील आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या निर्देशानुसार, पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ 620 चौ. फू. नुसार तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे सांगितले.

श्री. दरेकर, श्री. चौधरी व श्री. नांदगावकर यांनी अभ्युदयनगर पुनर्विकास हा एक दिशादर्शक प्रकल्प होईल, असे सांगून रहिवाशांना पुनर्विकासादरम्यान देण्यात येणारे घरभाडे वाढवून देण्याच्या मागणीसह विविध मागण्या केल्या.

अभ्युदयनगर फेडरेशनचे तुकाराम रासम, दिलीप शिंदे, निखिल दिक्षीत यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

 

तारळी धरणावरील उपसासिंचन योजनांची अपूर्ण कामे मे अखरे पूर्ण करावीत – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. 11 : तारळी धरणावरील ज्या उपसा सिंचन योजनांची कामे अपूर्ण आहेत ती कामे येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करावीत. तसेच ज्या उपसासिंचन योजना पूर्ण कायान्वीत आहेत परंतु तेथील ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्या आहेत, अशा ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उपसासिंचन योजनेतून शेतीला पाणी द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांनी तारळी धरणावरील उपसा सिंचन व मोरणा (गुरेघर) धरणांतर्गत सुरु असलेल्या बंदीस्त पाईपालईन कामांचा आढावा घेतला. या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोपें यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तारळी धरणावरील पूर्ण झालेल्या उपसासिंचन योजनेतून पूर्ण क्षमतेने शेतीसाठी पाणी मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत अशा उपसासिंचन योजनेच्या पहाणी प्रत्येक गावातील पाच शेतकरी घेऊन पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी पुन्हा सर्व्हे करावा. सर्व्हेक्षणात काही दुरुस्ती करावयाच्या आढळल्यास त्या तात्काळ कराव्यात. त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
बांबावडे उपसा सिंचन योजना टप्प 2 व तारळे उपसासिंचन योजना टप्पा 2 ची कामे 50 टक्के पूर्ण झाली आहेत. ही कामे येत्या मे महिन्याअखरे पूर्ण करावीत. तसेच नाटोशी उपसासिंचन योजनेची पंप हाऊस दुरुस्तीसह उपसा सिंचन योजनेत काही सुधारणा करावयाच्या असल्या त्या कराव्यात या उपसिंचन योजनेंतर्गत असणाऱ्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचले पाहिजे.
मोरणा (गुरेघर) धरणांतर्गत येणाऱ्या बंदीस्त पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच ज्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये पाईपलाईन जात आहे अशा शेतकऱ्यांना आर्थिक मोबदल्यासह निर्वाह भत्ता येत्या 15 एप्रिलपर्यंत द्यावा. बंदीस्त पापलाईनच्या कामाला गती येण्यासाठी  पोलीस व महसूल विभागाची मदत घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

सातारा, दि. 11 :  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

धुळे, दिनांक 11 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या.

येथील शासकीय विश्रामगृह, गुलमोहर येथे शिक्षण विभागातील नाविण्यपूर्ण उपक्रम सादर करणाऱ्या शिक्षकांसोबत संवाद बैठक संपन्न झाली. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. या संवाद बैठकीस आमदार मंजुळाताई गावित, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.किरण कुवर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

शिक्षणमंत्री श्री.भुसे म्हणाले की, राज्यातील विद्यार्थ्यांना आंनददायी, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. यासाठी किमान 25 टक्के पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांना शाळेत भौतिक सुविधा जसे. इमारत, हवा खेळती वर्गखोली, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष आदी अद्ययावत ठेवावेत. शिक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (उदा. स्मार्ट बोर्ड, ऑनलाइन शैक्षणिक साहित्य) वापर करावा. शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक-शिक्षक संघाच्या नियमित बैठका आयोजित कराव्यात. पालकांशी नियमित आणि सकारात्मक संवाद साधणे, त्यांच्या शंकांचे निरसन करावे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना शाळेच्या विकासात सहभागी करून घेणे. त्यांच्या अनुभवांचा आणि यशाचा उपयोग नवीन विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी करावा. येत्या शैक्षणिक वर्षांपासून पहिलीपासून विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार आहे. त्यांचे प्रशिक्षण येत्या काळात सर्व शिक्षकांना देण्यात येणार आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण कसे देता येईल यासाठी प्रयत्न करावे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक गावांमध्ये, नागरिकांमध्ये जाऊन पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. शाळेतील पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे. शाळेत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम करावा. जिल्हा वार्षिक योजनेत शालेय शिक्षणासाठी 5 टक्के निधी राखून ठेवण्यात आला असून त्या निधीतून विविध कामे करण्यात यावी. विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य पत्रिका तयार करावी. धुळे महापालिकेतील शाळेची संख्या तसेच विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रगीतासोबत राज्यगीत रोज शाळेत घेण्यात यावे. विद्यार्थ्यांची सहल बॅकेत, दवाखाना, दुकान, शासकीय कार्यालयात काढण्यात याव्यात तसेच इतर माध्यमांच्या शाळेत मराठी सक्तीने शिकवावेत, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री भुसे पुढे म्हणाले की, यंदा शाळेतील पहिल्या दिवसापासून प्रत्येक विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या काळात शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी करण्यात येणार आहे.  यंदापासून जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन सक्तीने करण्यात येणार आहे. बालक पालक मेळावा बंधनकारक करण्यात येणार आहे. सर्व शाळेत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धां घेण्याचे नियोजन, विद्यार्थींनीसाठी सायकल वाटप, आठवीच्या पुढील वर्गासाठी पींक रुम, 4 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांशी शैक्षणिक विषयांवर दररोज अर्धातास संवाद उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदार संघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्ह्यातील शाळेत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेल्या शिक्षकांशी मंत्री श्री.भुसे यांनी संवाद साधला. शिक्षकांनी नाविण्यपूर्ण उपक्रम शिक्षण पद्धतीत राबविल्याबाबत सर्व शिक्षकांचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले तसेच असे नाविण्यपूर्ण उपक्रम राज्यव्यापी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

गुंतवणूक परिषद म्हणजे  जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्ह्यात 1636 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

जळगाव दि. 11 ( जिमाका वृत्तसेवा ) – उद्योग सुलभतेसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक ‘उद्योग भवन’ उभारले जात असून, कुसुंबा व चिंचोली येथे 285 हेक्टर जागेचे भूसंपादन करून नवीन MIDC विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असून  जागा उपलब्धते बाबत  जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात प्लास्टिक उद्योगांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘प्लास्टिक औद्योगिक समूहा’ साठी उद्योजकांनी यासाठी सहकार्य करावे. उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेणार आहे. “ही गुंतवणूक परिषद केवळ गुंतवणुकीची नाही, तर जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार आहे.  उद्योग केवळ नफ्यासाठी नसतात, ते समाज घडवण्यासाठी आणि भविष्य उभारण्यासाठी असतात. शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जळगावने आता औद्योगिक प्रगतीचे पंख लावावे,” असे भावनिक उद्गारही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चाळीस उद्योजकांशी करण्यात आलेल्या रु. 1636 कोटीचे सामंजस्य कराराचे वाटप करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक प्रगतीला चालना देण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराचे आमदार राजूमामा भोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

परिषदेला संबोधित करताना पालकमंत्री म्हणाले, “भुसावळसारखं देशातील महत्त्वाचं रेल्वे जंक्शन, नाशिक व संभाजीनगरला जोडणारे महामार्ग, जलसंपन्नता, मेहनती तरुणाई आणि महिलाशक्तीमुळे जळगाव जिल्हा उद्योगविकासासाठी अत्यंत सक्षम आहे.” या परिषदेच्या निमित्ताने जिल्ह्यातील 40 उद्योगांमार्फत तब्बल 1636 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2848 रोजगारनिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आले. मागील वर्षी झालेल्या परिषदेत 1126 कोटींच्या गुंतवणुकीसाठी करार झाले होते, त्यातील 9 उद्योगांनी प्रत्यक्षात उत्पादन सुरू केले असून, 142 कोटींची गुंतवणूक करत 839 रोजगार निर्माण केले असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून मागील वर्षी 663 कर्जप्रकरणांना मंजुरी मिळवून जिल्ह्याने 90% उद्दिष्ट पूर्ण केले असून, पंतप्रधान रोजगार योजनेत 112% यश प्राप्त केले आहे.

शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासासाठी उद्योजकांचे योगदान हे महत्त्वाचे असून उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालिका वृषाली सोने यांनी केले. सूत्रसंचालन निवेदिका अपूर्वा वाणी यांनी केले.  तर आभार जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी मानले.

या गुंतवणूक परिषदेला चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी सुनील घाटे, लीड बँकेचे व्यवस्थापक  प्रणव झा, उद्योग सहसंचालिका वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक आर. आर. डोंगरे. लघु उद्योग भारतीचे व इतर औद्योगिक संघटनाचे  पदाधिकारी  तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आणि  उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला निधीची कमतरता भासू देणार नाही – क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

अमरावती, दि.11 (जिमाका ):  राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संकुलातील विविध क्रीडा सुविधांची पाहणी करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन दिले.

श्री. भरणे यांनी संकुलातील खेलो इंडिया आर्चरी सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्क्वॅश कोर्ट, ज्युदो, कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटन बहुउद्देशीय हॉल, जिम, कार्यालय आणि बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या क्रीडा वसतिगृहाच्या कामाची पाहणी केली.यावेळी मंत्री श्री.भरणे यांनी संकुलातील सुविधांवर समाधान व्यक्त केले.

 अमरावती जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करता येतील, अशा प्रकारच्या विविध क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या जातील. या संकुलातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अमरावती विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी आर. व्ही. वडते, क्रीडा कार्यकारी अधिकारी ममता कोळमकर आदि उपस्थित होते.

हव्याप्र महाविद्यालयाच्या दीक्षान्त समारोह कार्यक्रमाला उपस्थिती

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामार्फत चालविले जाणारे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन बहुसंकाय  स्वायत्त महाविद्यालयाचा 11 व्या दीक्षान्त समारोह कार्यक्रमाला क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

अनंत क्रीडा जिम्नॅस्टिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, प्राचार्य श्रीनिवास देशपांडे आदी   उपस्थित होते.

श्री. भरणे यांनी विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  क्रीडा क्षेत्रात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्य तळमळीने आणि अव्याहतपणे सुरू आहे. हव्याप्रला क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक सर्वतोपरी मदत शासनामार्फत करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी यावेळी संस्थेची कारकीर्द सांगितली. श्री. असनारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशांत देशपांडे यांनी संस्थेची माहिती दिली.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास आणि शिक्षिका ज्योती नागलवाडे यांची मुलाखत

मुंबई दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-2024’ अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त भंडारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अभिषेक नामदास तसेच जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अभिषेक नामदास यांची मुलाखत मंगळवार 15 एप्रिल 2025 तर जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांची मुलाखत बुधवार 16 एप्रिल 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी घेतली आहे.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-2024 अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत शासकीय अधिकारी गटातून सर्वोत्कृष्ट उपक्रम या श्रेणीत भंडारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अभिषेक नामदास यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाशी जोडण्यासाठी जिल्हा यंत्रणेमार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच विभागांशी संबंधित अद्ययावत माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्याकरिता ‘DDMA चॅटबोर्ड’ प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना याप्रणालीमुळे कशाप्रकारे माहिती व मदत उपलब्ध होणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती श्री. नामदास यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. श्रीमती नागलवाडे यांनी जिजामाता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगामुळे विद्यार्थी पटसंख्याच नव्हे तर विद्यार्थी गुणवत्ता वाढण्यास देखील मदत झाली आहे. त्यांनी या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे केली याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून शिक्षिका श्रीमती नागलवाडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

 

 

८.२५ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.२५ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि. १२ मे २०२५ पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि. १३ मे २०२५ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १३ मे २०२५ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या  शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील. तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.२५ %  महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत.  लोकऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

0000

 

 

 

कांदिवलीत उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

मुंबई, दि. ११ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने उद्या १२ एप्रिल, २०२५ रोजी भुरामाई हॉल, शांतीलाल मोदी रोड, ईराणी वाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या मेळाव्यामध्ये मुंबईतील नामांकित कंपन्या आपल्या रिक्त पदासह उपस्थित राहून त्याच ठिकाणी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत व प्राथमिक निवड केली जाणार आहे. यावेळी शासनाच्या विविध महामंडळामार्फत सवलतीच्या कर्जाची माहिती दिली जाणार आहे. तसेच उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रशिक्षण संस्था हजर राहणार आहेत.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच प्रधानमंत्री इन्टर्न योजना अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ उमेदवारांना मिळणार आहे. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय / विविध शाखेचे पदवीधर उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी या महारोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रसिद्धपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

०००

गजानन पाटील/ससं/

 

 

ताज्या बातम्या

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली विविध विभागाची आढावा बैठक

0
नागपूर, दि. २१ : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसह केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागपूर...

जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार असल्याने हा आनंदाचा क्षण सर्वासमवेत अनुभवता येणार आहे. नागरिकांची पाण्याची आस्था व श्रध्दा पूर्ण...

धामणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुदतीत व नियाजित वेळेत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पडसाळी, राई, राई-1 व राई-2 वसाहतीमधील पुनर्वसित गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा आज...

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम

0
अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चर्चासत्र ठेवणार ! मुंबई दि. २०: संविधान अमृत महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४...

समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. २० : पाश्चिमात्य संकृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असे म्हणते. भारतीय संस्कृती मात्र, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि...