मंगळवार, जून 10, 2025
Home Blog Page 19

अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये अत्याधुनिक अग्निशमन वाहने उपलब्ध करून देणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दिनांक 31:-राज्य शासन व प्रशासन हे कारखानदार, कामगार तसेच उद्योगाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये नुकतीच झालेली दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी एमआयडीसीमध्ये रस्ते, पाणी, वीज या सुविधा बरोबरच अत्याधुनिक अग्निशामक वाहने लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित अक्कलकोट एमआयडीसी  मध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्घटने संदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णूरकर, कार्यकारी अभियंता तपन डंके, स्मार्ट सिटी चे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे, MIDC विभागीय अधिकारी शिवाजी राठोड, अग्निशमन अधिकारी दिनेश अंभोरे, महापालिकेचे अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे, श्रीमती रोहिणी तडवळकर, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, पेंटप्पा गडडम अध्यक्ष सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ अध्यक्ष पॅन्टपा गड्डम, मल्लिकार्जुन कमटम, अंबादास बिंगी, नारायण आडकी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, एमआयडीसी मध्ये रस्ते लहान असल्याचे निर्देशनास आलेले आहे, त्यावर काही ठिकाणी अतिक्रमने झालेले असून ती अतिक्रमणे काढून टाकणं, रस्ते रुंदीकरण करणे तसेच या ठिकाणी पाच लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. महापालिकेला अत्याधुनिक अग्निशमन वाहने घेण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करण्यात येईल. शासन व प्रशासन उद्योग वाढीबरोबरच उद्योग व तेथे काम करणारे कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करतच आहे परंतु या भागातील कारखानदारांनी ही तेवढे सहकार्य देणे आवश्यक असून नियमानुसार सर्व सुविधा कारखान्यात उपलब्ध ठेवणे ही आवश्यक असल्याचे त्यांनी सुचित केले.

तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महापालिका, अग्निशमन दल, पोलीस विभाग तसेच संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल पुढील आठ दिवसात द्यावा. हा वॉल प्राप्त झाल्यानंतर दुर्घटनेचे कारणे समोर येतील तसेच आग विझवताना आलेल्या अडचणी तसेच वॉटर फीडिंग ची व्यवस्था व अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत या दृष्टीने पुढील काळात काटेकोरपणे नियोजन करणे शक्य होणार असल्याची माहिती पालकमंत्री श्रीगोरे यांनी दिली.

बांधकाम विभाग आणि अग्निशमन दलांना या घटनेसंदर्भात कोणाला नोटीस दिल्या आहेत, याची विचारणा करण्यात आली. कारखान्यांमध्ये अनधिकृत बांधकामे, कायद्याचे उल्लंघन, खबरदारीच्या उपायांचा अभाव आणि आवश्यक साहित्याची अनुपलब्धता यावर पालकमंत्री गोरे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच कारखान्यांमध्येच प्रार्थना स्थळे असणे आणि कामगारांना तिथेच राहण्याची सोय करणे या बाबी नियमांना धरून नाहीत तरी कारखानदारांनीही नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

एमआयडीसीमध्ये मुबलक पाण्याची सोय नसल्याने विविध समस्या भेडसावत असल्याचे उद्योग असोसिएशनने निदर्शनास आणले. एमआयडीसी मधील विविध सोयी सुविधा तसेच मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच उद्योग मंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे श्री. गोरे यांनी सांगितले.

शहरात होणाऱ्या उड्डाणपुलावरती नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून त्यावर लवकरच निर्णय घेतला  जाणार आहे. शासनाकडून ज्यांना जागा नाही, घर नाही अशा लोकांचाही सर्व्हे केला जाईल व त्यांना शासकीय जमिनीवरती घरेही लवकरच मिळवून देण्याचा शासनाचा ध्यास  असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी नुकत्याच एम आय डी सी मध्ये घडलेल्या दुर्घटनेचे अनुषंगाने पालकमंत्री महोदय यांना माहिती दिली.

महापालिकेचा सर्वेक्षण अहवाल –

महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी सादर केलेल्या अहवालात अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे नमूद केले. अनधिकृत बांधकामांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचणे आणि प्रभावीपणे कार्य करणे अशक्य झाले. महानगरपालिकेच्या 9 सदस्यीय पथकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार,  प्रत्येक पथकात अग्निशमन विभाग, नगर रचना विभाग व कर विभागाचे अधिकारी सहभाग एकूण ९३२ मालमत्ताची पाहणी ५७ ठिकाणी अनधिकृत बांधकामे निदर्शनास आली ७३७ मालमत्तांमध्ये सामासिक अंतरामध्ये बांधकाम, गोडाऊन, शेड, बोईलर मशीनसाठी वापर असल्याचे दिसून आले.२१५ ठिकाणी रहिवास व औद्योगिक वापर होत असल्याचे दिसून आले.४५८ इमारतींमध्ये कोणत्याही प्रकारची अग्निशमन व्यवस्था उभारली गेली नसल्याचे निदर्शनास आलेकेवळ २७ इमारतीमध्ये अग्निशमन व्यवस्था..४४७ ठिकाणी अर्धवट किंवा केवळ दिसण्या पूर्ती अग्निशमन व्यवस्था..६७ ठिकाणी लोक अनधिकृतपणे निवासी वापर करत असल्याचे दिसून आले.असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे.

00000

 

नूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी कार्यभार स्वीकारला

छत्रपती संभाजीनगर, दि. ३१ :  नूतन विभागीय आयुक्त  जितेंद्र पापळकर यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. सेवानिवृत्त होत असलेले विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त अनंत गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी श्री पापळकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी नगरविकास विभागाचे सहआयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री पापळकर यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधत विभागातील माहिती जाणून घेतली.

नवनियुक्त विभागीय आयुक्त श्री. पापळकर हे २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हाधिकारी, हिंगोली जिल्हाधिकारी, धुळे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

००००

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण झाल्यावर शासनाकडून निश्चीतपणे मदत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

सातारा, दि.31:  सातारा जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत फलटण, माण, खटाव या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी  होऊन नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करुन भरपाईसाठी त्वरीत सादर करावेत, एकत्रितपणे पंचनामे राज्यशासनाला प्राप्त झाल्यावर शासन निकषानुसार निश्चितपणे मदत करेल अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

फलटण तालुक्यातील फलटण शहरासह बाधित गावांची भेट देऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी  मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी केली. यावेळी  फलटणचे आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल मोरे, प्रभारी गट विकास अधिकारी श्री. कुंभार आदी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात मान्सून पूर्वी असा पाऊस कधी झाला नसून असा प्रथमच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचे पाहणी प्रसंगी सांगून मंत्री श्री. पाटील  म्हणाले, आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार अतिवृष्टीने घरांची पूर्णत: पडझड झाली आहे.  शेतपीकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले असून  बागायती व फळपिकांखालील क्षेत्र बाधित झाले आहे. अंगणवाडी, शाळांसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जनावरेही मयत झाली आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून राहिलेले पंचनामे पूर्ण करण्याचे युध्दपातळीवर काम सुरु आहे.

भरपाईसाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठीच्या सूचना मदत व पुनर्वसन विभागाकडून दिल्या आहेत. यंत्रणांनी पंचनामे त्वरीत पूर्ण करावेत. रस्ते, पूल, बंधाऱ्याचे  नुकसान झाले आहे, काही ठिकाणी नदीचे पात्र बदलले आहे. त्यांच्या दुरुस्तीचेही प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तात्काळ सादर करावेत अशा सुचना दिल्या.

अतिवृष्टीने ज्या घरात पाणी शिरले आहे, त्या घरातील नागरिकांना स्थलांतर करून त्यांच्या जेवणाची, रेशनची व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून व सेवाभावी संस्थाकडून करण्यात आली आहे, अशी माहितीही मकरंद पाटील यांनी दिली.

००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी – उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील

सोलापूर, दि. 31- रणरागिणी, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सबंध भारतभर बारा हजाराहून अधिक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. पाण्यासाठी पाणवठे तसेच बारवे निर्माण करून जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य केले. त्यांचा आदर्श राज्यकारभार, युद्धनीती, न्यायव्यवस्था यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते, असे गोरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.

शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विद्यापीठात आयोजित विविध कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. यावेळी पीएम उषा योजनेतून दोन नवीन इमारतींचा पायाभरणी समारंभ तसेच विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य मोठे असून त्यांच्या कार्याचा गौरव व सन्मान केंद्र व राज्य सरकारकडून त्रिशताब्दी जयंतीनिमित्त करण्यात येत आहे. 2019 मध्ये सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन एक प्रकारचा सन्मान तत्कालीन सरकारकडून करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सासरे मल्हारराव होळकर यांच्याकडून चांगली शिकवण मिळाली. पुढे त्या राज्यकारभारात व न्यायदानात पारंगत झाल्या. विद्यापीठाने त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे घेऊन जाताना त्यांच्या नावाप्रमाणे साजेशे कारभार करावे. विविध नवनवीन कोर्सेस सुरू करावेत. बांधकामास व विद्यापीठाच्या विविध कामास कसलाही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अहिल्यादेवीच्या आदर्श समाजव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे अनुकरण आजच्या पिढीने करावे -पालकमंत्री जयकुमार गोरे

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या शुभेच्छा देऊन विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचे काम 15 जुलैपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले. एक भव्य स्मारक येथे उभा राहत असून यातून सर्वांनाच प्रेरणा मिळेल. अहिल्यादेवी होळकर यांचे काम संपूर्ण देशात आदर्शवत असे आहे. संपूर्ण देशात हिंदू मंदिरांचा त्यांनी जिर्णोद्धार केला. हिंदू संस्कृती जोपासण्याचे काम त्यांच्या हातून झाले. आज देशात त्यांच्या आदर्श विचारांचा व कार्याचा जागर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सुरू आहे. अहिल्यादेवींच्या आदर्श समाजव्यवस्था, न्यायव्यवस्थेचे अनुकरण आजचा पिढीने केले पाहिजे. विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. रस्त्याचे कामही लवकरच पूर्ण होईल, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श विचार व कार्य डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. आज विद्यापीठाची विद्यार्थिनी भुवनेश्वर जाधव हिने कराटे स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर कांस्यपदक पटकाविले. 154 हून अधिक कौशल्य विकासाचे कोर्सेस विद्यापीठात सुरू आहेत. त्याचबरोबर पंढरपुरात आंतरराष्ट्रीय वारकरी संशोधन केंद्र सुरू करण्या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तृतीयपंथी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा केंद्र देखील सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.. यासाठी शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा कुलगुरू प्रा. महानवर यांनी यावेळी व्यक्त केली.

महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासकीय कार्य लोकाभिमुख होते, असे सांगून प्रशासनात आजही त्यांच्या कार्याचा पगडा आहे, असे सांगितले. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, सिनेट सदस्य तथा भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, मोहन डांगरे, सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, गणेश डोंगरे, यतीराज होनमाने, अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य अमोल कारंडे, माऊली हळणवर यांच्यासह विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, विद्यापीठ अभियंता गिरीश कुलकर्णी, विविध प्राधिकरणाचे सदस्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे व प्रा. श्रुती देवळे यांनी केले.

000000

जिल्ह्यात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घ्या – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि.३१ : जिल्ह्यातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी  सांगितले की, जिल्ह्यात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तसेच सह जिल्हा निबंधक (मुद्रांक) अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह सर्व तालुका सह दुय्यम निबंधक उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर यांनी मुद्रांक नोंदणी कार्यालयांना जनतेच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले. दस्त नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखून लोकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले.

ते म्हणाले, ‘नोंदणी प्रक्रियेत होणाऱ्या गैरव्यवहारांवर तातडीने अंकुश आणला जावा. दस्त नोंदणी ही प्रक्रिया सरळसोप्या पद्धतीने पार पडावी यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही. जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही, याची खात्री करणे हे आपले कर्तव्य आहे. नियमांनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या बैठकीत लोकाभिमुख सेवा सुधारण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. मुद्रांक व दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी डिजिटल पद्धतींचा अधिकाधिक उपयोग करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयांच्या चांगल्या कामकाजातून जिल्ह्यातील नागरीकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि ही त्यांची जबाबदारी आहे. नियमांचे काटेकोर पालन, पारदर्शकता, व कार्यक्षम व्यवस्थापनाच्या माध्यमातून या क्षेत्रातील फसवणूक थांबवण्यासाठी त्यांनी कटिबद्ध असले पाहिजे असे ते पुढे म्हणाले. बैठकीवेळी मान्यवरांचे स्वागत बाबासाहेब वाघमोडे यांनी पुस्तिका भेट देऊन केले.

०००००

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश 

कोल्हापूर, दि.31 : कोल्हापूर जिल्हा गौणखनिज विभाग व त्याअंतर्गत विविध विषयांवर आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विशेष अतिथी म्हणून ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आशिष जयस्वाल, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार विभाग) हे सहभागी झाले होते. त्यांनी दिनांक 08 एप्रिल 2025 रोजीच्या सुधारित वाळू निर्गती धोरण, दिनांक 30 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णय आणि वन व पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडील दिनांक 28 मार्च 2020 च्या अधिसूचनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करत धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यावर भर दिला.

बैठकीची सुरुवात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी पालकमंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वागत करून आढावा बैठकीच्या उद्दिष्टांचा परिचय करून दिला. यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी आपले मार्गदर्शन करत दिनांक 08/04/2025 च्या सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार व दिनांक 30/04/2025 च्या शासन निर्णयामध्ये नमूद घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या दिनांक 28/03/2020 च्या अधिसूचनेनुसार पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक नसलेल्या प्रकरणांची तात्काळ निश्चीती करण्यात यावी. यासाठी सर्व तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी सजग राहून कार्यवाही करावी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी या कामावर नियंत्रण ठेवावे.

या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), जिल्हा परिषद कोल्हापूर, कार्यकारी अभियंता (पाटबंधारे विभाग – उत्तर कोल्हापूर), उपविभागीय अभियंता गडहिंग्लज उपविभाग व अन्य संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत वाळू निर्गती धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या अडचणी, उपाययोजना व सहकार्याच्या बाबीवर चर्चा झाली. घरकुल लाभार्थ्यांना वेळेत आणि अडथळेविना वाळूचा पुरवठा होण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला.

पालकमंत्री आबिटकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना नागरिकाभिमुख दृष्टिकोन ठेवून हे धोरण वेळेत प्रभावीपणे राबवावे व कोल्हापूर जिल्ह्याला मॉडेल जिल्हा बनवण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येत्या आठ दिवसात उद्दिष्ट ठेवून एक उपक्रम हाती घेऊन काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये उपलब्ध वाळूचे स्रोत निश्चित करून घरकुल लाभार्थ्यांना वाळूचे पासेस वितरित करण्यास सुरुवात करण्याच्या सूचना केल्या. हे करीत असताना तयार करण्यात येत असलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच कार्यवाही करावी व कोणत्याही प्रकारे नियमांच्या बाहेर जाऊन व्यावसायिक कारणासाठी वाळू दिली जाणार नाही याची खबरदारी प्रत्येक महसूल अधिकाऱ्याने घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

०००००

 

शासनाकडून कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक ती मदत देणार – सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ

कोल्हापूर, दि. ३१ : जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने सुरू असून, येत्या काळात शासनाकडून कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक ती मदत वेळेत दिली जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, महाराष्ट्र राज्य तथा सह पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा माधुरीताई मिसाळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात त्यांनी त्यांच्या कार्यभाराखालील विविध विभागांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी सह पालकमंत्री म्हणाल्या, श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासह श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याची अंमलबजावणी करीत असताना त्या ठिकाणी व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना पुनर्वसनाबाबत जी काही भीती आहे, त्याबाबत प्रशासन नेमके काय करणार आहे, याबाबतची माहिती द्या. त्यामुळे त्यांचे गैरसमज दूर होऊन आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी ते सहकार्य करतील. श्री अंबाबाई मंदिराबाबत मागील दोन भेटीदरम्यान विविध कामांचा अंतर्भाव करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यासह विविध कामांचा समावेश करून तयार केलेल्या मंदिर विकास आराखड्यात अजून शंभर कोटी रुपयांच्या कामांचा अंतर्भाव केल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. संबंधित व्यावसायिकांबरोबर येत्या काळात बैठका घेऊन त्यांचे प्रश्न सोडवून पुनर्वसनाबाबतची माहिती त्यांना देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहराच्या हद्दवाढीबाबतही सह पालकमंत्री यांनी आजूबाजूच्या गावांमधून प्राधान्याने काही निवडक गावांचा समावेश करून त्या गावांसाठी महानगरपालिका कोणत्या सुविधा देत आहे आणि देणार आहे, याबाबत माहिती देऊन इतर गावांपुढे एक चांगले उदाहरण निर्माण करा, यामुळे आजूबाजूच्या गावांमधील हद्दवाढीबाबतचे गैरसमज दूर करता येतील, अशा सूचना त्यांनी केल्या. कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पंचगंगा नदीच्या व राष्ट्रीय महामार्गाच्या आतील गावांचा हद्द वाढीमध्ये समावेश करणे आवश्यक असल्याचे सांगून यातील दहा गावे शहरात एकरूप झाल्याचे सांगितले. याचबरोबर शहरातील रस्त्यांसाठी मागणी केलेला उर्वरित निधीही मिळावा, अशी मागणी सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे केली.
आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी महानगरपालिके अंतर्गत रवींद्रनाथ टागोर वाचनालयासाठी आवश्यक निधी मिळावा, अशी मागणी केली. तसेच त्यांनी इचलकरंजी शहरातील एचपीसीएल गॅस पाईपलाईनसाठी तीन टप्प्यांमध्ये खोदाई झाली असल्याचे सांगून यामध्ये महानगरपालिकेला देय महसूल संबंधित कंपनीकडून मिळाला नसल्याचे सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आवश्यक देय महसुलाबाबतची माहिती तयार करून एचपीसीएलला देण्यास सांगितले जाईल असे सांगून लवकरच याबाबत बैठक आयोजित केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीत परिवहन विभागाकडील एचएसआरपीए नंबर प्लेटबाबत अनेक तक्रारी असल्याचे सांगून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांनी नागरिकांच्या तक्रारी सोडवून फसवणूक करणाऱ्या पुरवठादार तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच शहरातील खाजगी वाहतूक करणाऱ्या बसेस तसेच इतर वाहनांमुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी गर्दी होते, तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा नाहीत याबाबत तक्रारी असून प्रादेशिक परिवहन कार्यालयासह महानगरपालिकेने खाजगी वाहतूक व्यवस्थेसाठी उपाययोजना राबवून प्रवाशांचे प्रश्न सोडवावेत, अशा त्यांनी आरटीओ संजीव भोर यांना सूचना केल्या.
तसेच त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक बसेसची मागणी असल्यास त्वरित प्रस्ताव देण्यात यावा, अशा सूचना केल्या. तसेच प्रत्येक एसटी स्टँडमधील स्वच्छतागृहांची व्यवस्था चांगली असल्याची खात्री करून आवश्यक दुरुस्त्या करण्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांना सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा मंडळातील ३१ वर्षांच्या सेवेबद्दल सन्मान सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिकेसह इचलकरंजी महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबतचा आढावा सह पालकमंत्री मिसाळ यांनी घेतला. यावेळी त्यांनी सांगितले, दरवर्षी पावसाळा येण्याआधी नालेसफाईसह इतर अनेक प्रकारची कामे केली जातात. या काळात धावपळ करून कामे करण्यापेक्षा वर्षातील इतर कालावधीतही पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शाश्वत तयारी केली जावी.
भेटीदरम्यान सहपालकमंत्री माधुरी ताई मिसाळ यांनी अंबाबाई मंदिरात आणि जोतिबा मंदिरात जाऊन विधीवत पूजा करून विकास आराखड्याचा अनुषंगाने माहिती जाणून घेतली.

००००००

पहलगाम दहशतवादी हल्ला : राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

मुंबई, दि. 31: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या राज्यातील नागरिकांच्या कुटुंबियांना सुरवातीस 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.  मात्र, नंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मदत रक्कम वाढवून प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.  या निर्णयानुसार मदत व पुनर्वसन विभागाने मृतांच्या कुटुंबियांना ही आर्थिक मदत वितरित केली.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून मिळालेली ही मदत ही अशा कठीण काळात कुटुंबीयांना थोडा आधार देणारी आहे, अशी भावनाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केली.

००००

 

महिला व मुलींच्या  सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय 

मुंबई,दि. ३१: महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाच्या 10 टक्के निधीतून खालील योजना सक्षमपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून याआधीचे  शासन निर्णय, पुरक पत्रे व शुध्दीपत्रके या द्वारे अधिक्रमित करून गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजना तसेच गट ब च्या योजना (वस्तु व खऱेदीच्या योजना ) राबवण्याचा निर्णय ग्रामविकास विभागमार्फत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनेअंतर्गत मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण,मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारिरिक विकासासाठी प्रशिक्षण,महिलांसाठी समुपदेशन केंद्र,इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण, तालुकास्तरावर शिकणा-या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे, किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर,आरोग्य,कुटुंबनियोजन,कायेदविषयक प्रशिक्षण, अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत,भाडे, बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर्स आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना पुरस्कार देणे, पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन केंद्र, बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण, विशेष प्राविण्य मिळवेलल्या मुलींचा सत्कार, महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा दौरा या बाबींचा समावेश आहे.

तर गट ब च्या योजना (वस्तू खरेदीच्या योजना ) या मध्ये अंगणवाडींना विविध साहित्य पुरविणे, कुपोषित मुलामुलींसाठी व किशोरवयीन मुलींसाठी, गरोदर,स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार,दुर्धर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य, महिलांना विविध साहित्य पुरवणे, 5 वी ते 12 वी पर्यंतच्या शिकणा-या मुलींसाठी सायकल पुरवणे,या बाबींचा समावेश आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारः

महिला व बाल विकास विभागाने प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित दिनांक 31 मे रोजी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामध्ये पुरस्काराचे स्वरूप, पात्रता निकष, पुरस्कारार्थी महिलेची निवड करण्याची कार्यपद्धती व यंत्रणा निश्चित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी प्रति ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत अपेक्षित असलेला अंदाजे रूपये दोन हजार इतका खर्च महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांना उपलब्ध होणा-या जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या 10% निधीतून करण्यात  यावा, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शासन निर्णय वाचण्यासाठी शासन निर्णय महिला बालविकास योजना signed येथे क्लिक करा.

00000

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या – प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

रत्नागिरी, दि. ३१ (जिमाका)- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, समाजमाध्यम आणि जबाबदार पत्रकारिता विषयावर श्री.सिंह यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, मोबाईलमुळे मोठा बदल घडून आलेला आहे. पत्रकारितेतील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर फायदेशीर आहे. त्यामुळे कामांमध्ये सुलभता आली आहे. एकाचवेळी ९ भाषांमध्ये लाईव्ह भाषणाचे भाषांतर करता येते, असे सांगून, समाज माध्यमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अतिरेक, कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे होणारे फायदे आणि होणारे नुकसान याबद्दल मार्गदर्शन केले. सत्य तुमच्याकडे आहे मात्र एआय ला सत्य काय आहे हे माहीत नसते.

श्री. सिंह म्हणाले की, मी स्वत: पत्रकार कुटुंबातून आलो आहे. माझे वडील अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते. शासनाने मला त्याच विभागात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शासनाचा ऋणी आहे.

यावेळी कार्यशाळेत उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची श्री. सिंह यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

००००

ताज्या बातम्या

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या महसूल लोक अदालतीमुळे महसूली दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहेत. त्यामुळे ही सर्वसामान्यांना न्याय देणारी महसूल लोकअदालतीची मोहीम यापुढे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित ‘धडपड भाग-३’ या पुस्तकाचे प्रकाशन

0
पुणे, दि. 9 : ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-3 या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद...

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये उद्या भाषण

0
मुंबई, दि. 9 : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या स्वीडनमध्ये इंटरनॅशनल आयडिया स्टॉकहोम निवडणूक प्रामाणिकता परिषद (International IDEA Stockholm Conference on Electoral...

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

0
मुंबई, दि. 9 : दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण आठ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेतील...

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली

0
ठाणे,दि.09(जिमाका):- दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वे प्रवासी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ आणि कोकण) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, डॉ.नरेश...