सोमवार, जून 23, 2025
Home Blog Page 185

दोडामार्ग परिसरातील रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे – वनमंत्री गणेश नाईक

RAJU DONGARE DGIPR MANTRALAY MUMBAIA

मुंबई, दि. ४ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे. तसेच या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातील संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे होणारा त्रासासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात  मंत्रालयात वनमंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या विनंतीनुसार ही बैठक लावण्यात आली होती. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिश्वास, उपसचिव विवेक होसिंग, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बी.व्ही. रामाराव आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या हत्तींपासून संरक्षण करण्यासाठी वन विभागाने सविस्तर आराखडा तयार करावा. या हत्तींना नैसर्गिक अधिवासात ठेवल्यास ते शेताकडे येणार नाहीत. त्यासाठी तिलारी प्रकल्पाच्या संरक्षित भागात या हत्तींना ठेवण्यासाठी त्या ठिकाणी हत्तींच्या उपजिवीकेसाठी आवश्यक असलेले बांबू, केळी, फणस आदी झाडे लावण्यात यावे. तसेच हत्तींचा वावर असलेल्या परिसरात रेल्वे रुळांचे फेन्सिंग करण्यासंदर्भात नियोजन करावे. या रानटी हत्तींना रेडिओ कॉलरिंग करून त्यांच्या वावरावर लक्ष ठेवण्यात यावे. यासाठी कर्नाटक व पश्चिम बंगालच्या वन विभागातील प्रशिक्षत मनुष्यबळांचे मार्गदर्शन घ्यावे.

वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवावा. तसेच यामध्ये बांबू पिकाच्या समावेशाबद्दलही प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री. नाईक यांनी दिले.

श्री. केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती देऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केली.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ४: मेरे देश की धरती, ए वतन ए वतन हम को तेरी कसम, अशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झाली, असे ज्येष्ठ निर्माते, पटकथाकार, दिग्दर्शक,अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे ‘भारतकुमार’ यांच्या निधनामुळे भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, आपल्या अभिनय कारकिर्दीत शहीद, पुरब और पश्चिम, हिमालय की गोद मै, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती अशा विविध सिनेमात मनोजकुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या. सिनेमांमधून देशभक्ती, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसहित भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला.

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतिकारकांच्या बलिदानाने मिळलेले असून त्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये यासाठी त्यांनी आपल्या कलाकृतीमधून लोकांना त्यांची जाणीव करून दिली. मनोजकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.

भारतभूमीला वंदनीय मानणारा हा सच्चा कलावंत आज भारतभूमीच्या कुशीत कायमचा विसावला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
००००

देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला

मुंबई, दि. ४:- ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

‘शहीद’ मध्ये भगतसिंग साकारून मनोजकुमार हे देशाला सुपरिचित झाले. त्यानंतर शेतीसारखा विषय त्यांनी चित्रपटातून हाताळला आणि ‘मेरे देश की धरती’ सारखे गीत आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला त्याच अभिमानाने ऐकले जाते. त्यांच्या ‘पुरब और पश्चिम’ सारख्या चित्रपटांनी तर जागतिक पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले. ‘रोटी कपडा और मकान’ सारख्या चित्रपटांनी त्यांनी सामाजिक विषयांना हात घातला. उपकार, क्रांती असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. त्यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतून देशप्रेमाची आणि राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणार नाही. मनोजकुमार यांनी दिग्दर्शन, पटकथा-गीत लेखन, संकलन या क्षेत्रातही काम केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कोट्यवधी चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि.४ :- ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. ‘दादासाहेब फाळके’, ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त असलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते.

त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.
***

कुशल आणि उपक्रमशील मनुष्यबळासाठी ‘डीपेक्स’ उपयुक्त – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.३: जागतिक स्तरावरील कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून कुशल, उपक्रमशील मनुष्यबळ उपलब्ध होत आहे, आगामी काळात सामाजिक गरजांची पूर्तता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी व्यक्त केली. देशात तंत्रज्ञानासह संशोधनाला प्रोत्साहन दिले जात असल्याची भावना संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी अध्यक्ष शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केली.

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, सीईओपी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डीपेक्स-२०२५’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. जी. सतीश रेड्डी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील भिरुड, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनावणे, सृजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘डीपेक्स’ प्रदर्शनाची सुरुवात सांगली येथून १९८६ साली झाली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध कौशल्याधिष्ठीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन मिळत असून  विविध क्षेत्रात या कल्पना मॉडेल स्वरुपात विकसित होत समाजातील गरजा पूर्ण करण्याचे काम होत आहे.

देशात सर्वत्र संशोधनात्मक वातावरण असून नवोन्मेषक ‘स्टार्टअप’ उभारत आहेत. या स्टार्टअपमधून तयार होणाऱ्या नवनवीन संशोधनाला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. जागतिक पातळीवर संरक्षण क्षेत्रात लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात देशात निर्माण होत असल्याने भारताला संरक्षण सामग्रीच्या निर्यातीची मोठी संधी आहे. डीपेक्स प्रदर्शन उपक्रम विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

डॉ. जी. सतीश रेड्डी म्हणाले, देशात आयआयटी, विद्यापीठ, महाविद्यालयात संशोधन आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात येत आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांचा नवकल्पनांना चालना मिळत आहे. आपल्या नवकल्पनाची जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल, देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावेल, या गोष्टीचा विचार करुन प्रचंड मेहनत करा, सन २०४७ मध्ये भारत देश जगाचे नेतृत्व करेल यादृष्टीने विकसित भारत करण्याची जबाबदारी तरूण पिढीवर आहे. जगाकरीता निर्मिती संकल्पना डोळ्यासमोर। ठेवून काम करावे, असे आवाहन श्री. रेड्डी यांनी केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेला डीपेक्समध्ये स्थान देणे गरजेचे आहे. डीपेक्सच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सूचनांची नोंद घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनात त्यांचा समावेश करावा, असे डॉ. भिरुड म्हणाले.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आशिष चौहान, संकल्प फळदेसाई, डॉ. शांतीनाथ बागेवाडी, अथर्व कुलकर्णी, प्रसेनजीत फडणवीस, उद्योजक प्रकाश धोका यांनी आपले विचार व्यक्त केले.

एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. 3 : एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.

परिवहन आयुक्तालय येथे राज्य परिवहन महामंडळाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर,  यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

सध्या ज्या जाहिरात संस्थांना काम दिले आहे, त्यांच्याकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचे करार रद्द करावेत. अशा सूचना देऊन मंत्री सरनाईक म्हणाले की, यासाठी चांगले उत्पन्न देणाऱ्या संस्थांची निवड करावी. सध्या जाहिरातीच्या माध्यमातून महामंडळाला 22-24 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामध्ये वाढ करुन हे उत्पन्न 100 कोटी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.

नवीन बस खरेदीमध्ये प्रवासी व बस यांची सुरक्षा लक्षात घेऊन जाहिरातीसाठी उपयुक्त पॅनेल बसवण्याची व्यवस्था करावी. तसेच जुन्या बसेसमध्येही याची व्यवस्था करण्यात यावी. बसस्थानके सुधारण्यासाठी नियोजन करावे.त्यासाठी एसटीला डिझेल पुरवठा करण्याऱ्या संस्थांकडून सीएसआर फंडाच्या माध्यमतून राज्यातील महत्त्वाच्या बसस्थानकांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष उभारून ते चांगल्या स्थितीत राहतील याची व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

मंत्री सरनाईक म्हणाले की, महामंडळ मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करते. यासाठीच्या भविष्यात निविदा काढताना त्यामध्ये सीएसआर फंडाची अट समाविष्ट करावी.

भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या संस्थेचा करार रद्द करा

सध्या 5150 इलेक्ट्रिक बस पैकी केवळ 220 बसेस एसटी महामंडळाला संबंधित संस्थेने भाडेतत्त्वावर पुरविल्या आहेत. भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्याचा करार केलेल्या आणि अद्यापही बस पुरवठा न करणाऱ्या संबंधित संस्थेला अंतिम नोटीस पाठवावी. त्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास त्यांचा करार रद्द  करण्याची कार्यवाही करावी.

नवीन बसेस प्रत्येक आगाराला पोहोचल्या पाहिजेत

यंदा 2 हजार 640 लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी मार्च अखेर 800 बसेस 100 आगारात दाखल झाल्या असून प्रवासी सेवेत रुजू झालेल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत सर्व 251 आगारांना नवीन बसेस मिळतील असे नियोजन करावे. महामंडळाच्या नवीन बसेसचे लोकांनी चांगले स्वागत केले आहे. येथून पुढेही अशाच प्रकारे चांगल्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात. सर्व बसेसमध्ये जीपीएस सह सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात यावेत, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या.

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागामार्फत २०२४-२५ मध्ये महसूल वृद्धीत उल्लेखनीय वाढ

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत महसूल वृद्धीचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यावर्षी विभागाने रु.२,२५,३०० कोटींपेक्षा जास्त महसूल संकलित केला आहेजो संपर्ण महाराष्ट्र राज्याच्या कर महसुलातील ६०% पेक्षा जास्त आहे. यामध्ये मागील वर्ष २०२३-२४ पेक्षा १३.६% वाढ झाली असून वर्ष २०२४- २५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये नमुद रु. २,२१,७०० कोटी महसुलीचा अंदाज ओलांडला गेला आहे.

तक्ता १ : महाराष्ट्र राज्य कर विभागाची कामगिरी २०२४-२५ : रक्कम कोटी मध्ये

विभाग २०२३-२४ वास्तविक वृद्धी २०२४-२५ तात्पुरती २०२३-२४ पेक्षा २०२४-२५ वाढ
जीएसटी १,४१,९७९ १,६३,०१६ १४.८ टक्के
व्हॅट ५३,३८० ५९,२३१ ११.० टक्के
पीटी २,९५३ ३,०७२ ४.० टक्के
एकूण १,९८,३१२ २,२५,३१९ १३.६ टक्के
वाढ १०.९ टक्के १३.६ टक्के  

 

विभागाने विशेषतः वस्तू व सेवा कर (GST) कायद्याअंतर्गत येणाऱ्या महसुलात १४.८% वाढ दर्शविली आहे. त्याचबरोबरसंपूर्ण देशातील एकूण GST महसूल वाढीचा दर फक्त ८.६% असून महाराष्ट्राने या क्षेत्रात इतर राज्यांपेक्षा खूपच वेगाने प्रगती केली आहे.

या उल्लेखनीय यशामागेकरदात्यांच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने निरीक्षण करणाऱ्या आणि फॉलो- अप करणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांचे परिश्रम आहेत.

सर्वात जास्त GST महसुल वाढीचा दर

सकल GST महसूलात परतावे वजावटीपूर्वीची वाढ १५.६% इतकी उल्लेखनीय आहे. हा दर प्रमुख राज्यांमधील सर्वाधिक आहे. GST महसुल संकलनातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य उत्तर प्रदेश (रु.८४,२०० कोटी) च्या तुलनेत महाराष्ट्र राज्याने दुप्पटीपेक्षा जास्त महसुल गोळा केला आहे. देशातील शीर्ष सात राज्यांमध्ये विचार केल्यास महाराष्ट्राने सर्वात जास्त GST महसुल वाढीचा दर प्राप्त केला आहे. आर्थिक दृष्टीने पाहताविभागाने एकूण रु.१,७२,३७९ कोटी महसूल संकलित केला आहेज्यात रु.१,१३,७६९ कोटी राज्य GST (SGST) व रु.५८,६१० कोटी इंटिग्रेटेड GST (IGST) चा समावेश आहे. तसेचपरताव्यातील वाढ (३०.४%) देखील या विभागाची करदात्यांना लवकर परतावा जारी करण्याची क्षमता दर्शवतेज्यामुळे पुरवठादारांसाठी कार्यशील भांडवल प्राप्त होते.

राज्याच्या महसुल वाढीच्या यशामध्ये मोलाची भूमिका

राज्याच्या महसूलातील निरंतर वाढ ही महाराष्ट्राच्या आर्थिक वृद्धीबरोबरच GST विभागाच्या अतिरिक्त प्रयत्नांमुळे साध्य झाली आहे. डेटाचे सखोल विश्लेषणअंमलबजावणी प्रकरणांचे निकट निरीक्षणतसेच फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाईबनावट ITC दाव्यांशी निगडीत संस्थांविरुद्ध कारवाई आणि कठोर वसुली या सक्रिय प्रयत्नांनी राज्याच्या महसुल वाढीच्या यशामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. वस्तू व सेवा कर विभागाचे अथक प्रयत्न अपेक्षेपेक्षा अधिक वाढीस कारणीभूत ठरले नाहीत तर महाराष्ट्राच्या इतर सर्व कर स्रोतांमध्ये देखील सर्वाधिक वाढ दर्शवते.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाची कंत्राटी तत्वावरील पदभरती परीक्षा रद्द

मुंबई, दि. ३ : गृह विभागांतर्गत असणाऱ्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक, गट-ब, वैज्ञानिक सहायक, गट-क, वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), गट-ब व वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), गट-क संवर्गातील पदे निव्वळ कंत्राटी तत्त्वावर भरणेकरीता नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटी यांचेमार्फत ५ ते ७ एप्रिल, २०२५ रोजी घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात येत असून परिक्षेबाबतचे  सुधारित वेळापत्रक व ठिकाण नव्याने कळविण्यात येईल, असे प्रभारी संचालक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि शासकीय रासायनिक विश्लेषक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

भारत भेटीने अचंबित झालो असल्याचे चिली राष्ट्राध्यक्षांची भावना

मुंबई, दि. 3 : भारताबद्दल फार पूर्वीपासून कुतूहल होते व मुंबईबद्दल अनेक पुस्तकांच्या माध्यमातून वाचले होते.  प्रत्यक्ष होत असलेल्या भारत भेटीमुळे आपण अक्षरशः अचंबित झालो आहोत. मात्र येथील संस्कृती आणि लोकजीवन वरवर न पाहता लोकांमध्ये राहून अनुभवायचे आहे, असे उद्गार सध्या भारत भेटीवर असलेले चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट यांनी आज येथे काढले.

महाराष्ट्र राज्याच्या वतीने  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी (दि.३ एप्रिल) 39 वर्षीय राष्ट्राध्यक्ष बोरिक यांचे राजभवन येथे स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.

नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोबत चिलीचा ‘सामायिक आर्थिक भागीदारी करार’ झाला असून व्यापार व वाणिज्य याशिवाय आपला देश भारताशी कृषी उद्योग, संस्कृती, महत्त्वपूर्ण खनिज आणि विशेष करून चित्रपट निर्मितीमध्ये सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे राष्ट्राध्यक्ष बोरिक यांनी यावेळी राज्यपालांना सांगितले.

चिलीशी व्यापार वाढल्यास भारताला चिली देशाचा दक्षिण अमेरिकी देशांसाठी प्रवेशद्वार म्हणून उपयोग करता येईल, असे राष्ट्राध्यक्ष बोरिक यांनी सांगितले.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण स्पेन येथे झाल्यानंतर त्या देशातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली होती, असे नमूद करून भारतीय चित्रपट उद्योगाने चिली सोबत चित्रपट सहनिर्मिती करावी आणि चिली येथे चित्रपटांचे चित्रीकरण करावे अशी अपेक्षा राष्ट्राध्यक्षांनी यावेळी व्यक्त केली.

चिली येथे चित्रीकरणासाठी फार सुंदर ठिकाणे उपलब्ध असून त्यामुळे चिलीतील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बोरिक यांनी राज्यपालांकडून राज्याच्या तसेच मुंबईच्या नागरी समस्या समजून घेतल्या तसेच त्यावर शासनातर्फे केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.

चिलीच्या राष्ट्राध्यक्षांचे राज्यात स्वागत करताना राज्यपालांनी पर्यटन व व्यापार यांच्या माध्यमातूनच उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होतील असे सांगितले.

सध्या मुंबई आणि चिली मध्ये थेट विमानसेवा उपलब्ध नसली तरी देखील नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ विमान तयार झाल्यानंतर उभय देशांमध्ये थेट विमान सेवा सुरू होण्याबद्दल चर्चा करता येईल असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी चिलीचे परराष्ट्र मंत्री अल्बर्टो व्हॅन क्लेव्हरेन, चिलीचे भारतातील राजदूत जुआन अँगुलो, चिलीच्या सांस्कृतिक कार्य मंत्री कॅरोलिना अरेडोंडो व राष्ट्राध्यक्षांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार सल्लागार कार्लोस फिगुएटो हे देखील उपस्थित होते.

**

भारत आणि चिली यांच्यातील सांस्कृतिक मैत्री वृद्धिंगत होणार – चिली प्रजासत्ताकचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट

मुंबई, दि. ३ : कला आणि संस्कृती केवळ मनोरंजनासाठी नसून ती राजनीतिक आणि सामाजिक एकजुटीचे साधन आहे. भारत आणि चिली देशांमध्ये भौगोलिकदृष्ट्या अंतर खूप असले तरी मानवता, कला आणि संस्कृती हे घटक जोडणारे आहेत. दोन्ही देशांदरम्यान चित्रपट सहनिर्मिती करार करण्याच्या दिशेने सकारात्मक वाटचाल होत आहे. यामुळे भारत आणि चिली यांच्यातील सांस्कृतिक मैत्री अधिक वृद्धिंगत होईल, असे मत चिली प्रजासत्ताकचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट यांनी व्यक्त केले.

हॉटेल ताज येथे हॉलो इंडिया, नमस्ते चिली, शूटिंग इन चिली या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चिलीच्या सांस्कृतिक व कला विभागाचे मंत्री कॅरोलिना अरेडोंडो, चिलीच्या असोसिएशन ऑफ प्रोड्युसर ऑफ सिनेमा अँड टेलिव्हिजनच्या उपाध्यक्षा आलेजांद्रा, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, तसेच भारतीय चित्रपट क्षेत्रातील निर्माते, अभिनेते उपस्थित होते.

चिली प्रजासत्ताकचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरेक फाँट म्हणाले, भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वांत मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. दरवर्षी १५०० हून अधिक चित्रपट २० हून अधिक भाषांमध्ये तयार होतात. त्यामुळे चिली आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी चित्रपट हे प्रभावी साधन ठरू शकते. एखादा बॉलिवूड चित्रपट चिलीच्या अँडीज पर्वतरांगांमध्ये, पटागोनियामध्ये किंवा व्हॅली डेल हुआस्कोमध्ये चित्रित झाला, तर त्यामुळे  आमच्या देशाला जागतिक स्तरावर आणखी ओळख मिळेल. व्यापार आणि संस्कृती एकमेकांना पूरक आहेत. भारत आणि चिली यांच्यातील संबंध केवळ आर्थिक लाभासाठी नाहीत, तर लोकांमधील जवळीक निर्माण करण्यासाठी आहेत. व्यापाराबरोबरच सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवायची आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सांस्कृतिक मंत्री ॲड. शेलार म्हणाले, सांस्कृतिक आणि व्यावसायिक संवाद जागतिक स्तरावर मदत करतो. भारत आणि चिलीमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था सेवा क्षेत्र, तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा यांवर आधारित आहेत.

भारताप्रमाणेच, चिलीमध्येही प्रवाशांसाठी वैविध्यपूर्ण अनुभव उपलब्ध आहे. भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी चिलीला शूटिंग लोकेशन म्हणून प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सह-निर्मिती हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. चिली भारतीय चित्रपट आणि मनोरंजन उद्योगासाठी उत्तम संधी उपलब्ध करून देऊ शकतो.

यावेळी चित्रपट निर्माते विवेक सिंघानिया यांनी मनोगत व्यक्त केले.

0000

गजानन पाटील/ससं/

ताज्या बातम्या

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन

0
मुंबई, दि. 22 : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ येथे एअर इंडियाच्या विमानाने रात्री ११ वाजता आगमन झाले. यावेळी ...

आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २२: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाचे घराचे स्वप्न पूर्ण करायचा संकल्प केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या काही काळामध्ये...

मुंबईच्या धर्तीवर नागपुरातील एसटीपी प्रकल्प तात्काळ मार्गी लावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, ता. २२ :- नागनदीतील प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी नागपूर महानगराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने, पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण झाला पाहिजे. यासाठी...

विधानभवनमध्ये २३, २४ जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

0
मुंबई, दि. २२ : भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित...

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
नागपूर, दिनांक २२ : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय...