सोमवार, जून 23, 2025
Home Blog Page 186

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्याची भेट

नवी दिल्ली, दि. ३ : राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संसद भवनात भेट घेतली. यावेळी श्री. गोगावले यांनी रायगड जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नाबाबत केंद्रीय मंत्री श्री.वैष्णव यांच्याशी चर्चा केली. यावेळी खासदार संदीपान भुमरे उपस्थित होते.

श्री.गोगावले यांनी जिल्ह्यातील गोरेगाव स्टेशन व वामने स्टेशन येथील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याबाबतचे आणि वीर स्टेशन येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्याबाबतचे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांना दिले. यासह इतर अनुषंगिक विषयांबाबत चर्चा केली.

0000

ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूरांसह सर्व घटकांच्या हितरक्षणासाठी सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 3 :- राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, ऊसतोडणी मजूर, यांच्यात उचलीच्या (अग्रीम) रकमेवरुन होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक टळावी, त्यामुळे होणारे गुन्हे थांबावेत, ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, ऊसतोडणी मजूरांसह सर्वांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, एकाही घटकावर अन्याय होऊ नये, यासाठी ऊसतोडणी मुकादम व मजूरांचे संनियंत्रण करणाऱ्या सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिले.

प्रस्तावित कायद्याचा मसुदा कामगार व सामाजिक न्याय विभागाने सहकार, गृह, विधी व न्याय विभागांच्या समन्वयातून ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूर, ऊस वाहतूकदार,साखर कारखानदारांच्या संघटनांशी चर्चा करुन मंत्रिमंडळ बैठकीसमोर विचारार्थ ठेवावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या. राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊसतोडणी मजूर पुरवण्यासाठी तोडणी मुकादमांशी  करार केले जातात. त्यासाठी मुकादमांना कोट्यवधी रुपयांचा अग्रीम (उचल) दिला जातो. परंतु मुकादमांकडून अनेकदा कराराचे पालन होत नाही. कराराप्रमाणे मजूर पुरविले जात नाहीत. कमी संख्येने किंवा कमी दिवस मजूर पुरवले जातात. त्यामुळे तोडणीची कामे पूर्ण होत नाहीत. अनेकदा मजूर काम मध्येच सोडून निघून जातात. त्यामुळे साखर कारखाने आणि पर्यायाने ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांची हत्या होण्यासारखे गुन्हे घडतात. आजमितीस तोडणी मजूरांनी कोट्यवधी रुपययांची फसवणूक केल्याचे गून्हे दाखल आहेत. अशा अपप्रवृत्तींना आळा घालून उपाययोजना शोधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिजीत पाटील, साखर संघाचे संचालक जयप्रकाश दांडेगावकर, विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अनुपकुमार, विशेष पोलिस महानिरिक्षक मनोज शर्मा, साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ, साखर संघाचे अॅड. भूषण महाडिक आदींसह वरिष्ठ अधिकारी तसेच साखर उद्योगाशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ऊसतोडणी मजूरांचे हितरक्षण करणे ही शासनाची पहिली जबाबदारी आहे. त्यासाठी शासनाने लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली. महामंडळासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली. यातून मजूरांच्या मुलांचे शिक्षण, मजूरांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. हे लाभ अधिकाधिक मजूरांपर्यंत पोहोचावेत यासाठी मजूरांचे सर्वेक्षण आणि आधार क्रमांकावर आधारीत नोंदणीची आणि ओळखपत्र देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. ऊसतोड मजूरांच्या हिताची काळजी घेत असताना साखर कारखान्यांच्या फसवणुकीच्या माध्यमातून ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याचीही काळजी घ्यावी  लागणार आहे.

ऊसतोडणी मजूर पुरवणाऱ्या मुकादमांकडून कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणावर अग्रिम रक्कम घेतली जाते. मात्र कराराचे पालन होत नाही. मुकादमांकडून कराराचे पालन न झाल्याने कारखान्यांचे पर्यायाने ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी सर्वसमावेशक कायदा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सामाजिक न्याय आणि कामगार विभागाने एकत्रितपणे विचार करुन सर्वसमावेश कायदा करावा. त्यासाठी सहकार, गृह, विधी व न्याय विभागाची मदत घ्यावी. मात्र ऊसतोडणी मजूर, ऊसउत्पादक शेतकरी यांच्यासह कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही, सर्वांना न्याय मिळेल, अशा पद्धतीचा मसुदा असावा, असेही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

—-०००००—-

समता पंधरवड्यानिमित्त ‘विशेष जात पडताळणी मोहीम’

मुंबई, दि. ०३ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यात समता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विशेष जात पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. जात प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ९ एप्रिल २०२५ रोजी माटुंगा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी मुंबई शहर समितीमार्फत १ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत सुलभ प्रक्रियेने जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ११ ते ४ या वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र, पडताळणी समिती, मुंबई शहर, पंचशील एम १ तळमजला, सिद्धार्थ गृहनिर्माण संस्था, माटुंगा लेबर कॅम्प, वाल्मिकी रोड, माटुंगा मुंबई – १९, या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थी, शासकीय सेवेतील अर्जदार यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करिता, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून याबाबत चर्चासत्र ही आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये समितीकडील प्राप्त प्रकरणांतील त्रुटीयुक्त प्रकरणात अर्जदार यांना मार्गदर्शन, समुपदेशन करण्यात येणार आहे. संबंधित अर्जदारांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत करण्यात आले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

केंद्राकडे प्रलंबित रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तात्काळ मंजूर करावा – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांची मागणी

नवी दिल्ली, दि. 3 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यासाठीचा प्रलंबित निधी लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली.

कृषी भवन येथे श्री. गोगावले यांनी  केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्री. चौहान यांची भेट घेतली. याभेटी दरम्यान त्यांनी राज्यात रोजगार हमी योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांची  माहिती दिली तसेच राज्यासाठीचा प्रलंबित निधी मिळावा, अशी मागणी केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे आणि संदिपान भुमरे हे उपस्थित होते.

रोहयो मंत्री श्री. गोगावले म्हणाले, ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आणि ‘विकसित भारत’ संकल्पनेला गती देण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रलंबित असलेला निधी त्वरित मिळणे आवश्यक आहे. या मागणीला केंद्र शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्री.चौहान यांनी याबाबत आश्वासित केले आहे. केंद्राकडे प्रलंबित असलेला कुशल घटकांसाठीचा 2 हजार 600 कोटी रुपयांचा निधी  आणि अकुशल घटकांसाठी (मजुरी ) 1 हजार 200 कोटी रुपयांचा निधी या महिन्याच्या 12 एप्रिलपर्यंत राज्याला उपलब्ध करून दिला जाईल. यासोबतच, राज्याला आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले आहे. या निधीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास श्री. गोगावले यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्राला 10 कोटी मनुष्यदिवसांचे ‍निधी सहाय्य मिळत असून यावर्षी राज्याला रोजगार हमी अंतर्गत 13.50 कोटी मनुष्यदिवसांचे अर्थसहाय्य मिळालेले आहे. यासाठी आभार व्यक्त करून पुढील वर्षी अधिकच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करावी, अशी विनंती श्री. गोगावले यांनी यावेळी केली.

तसेच, रोजगार हमी योजनेतील व्यक्त‍िगत लाभांची मर्यादा 5 लाख रूपयांहून 10 लाख रुपयांपर्यंत करण्याची मागणीही रोजगार हमी मंत्री श्री. गोगावले यांनी योवळी केली, या मागणीचा विचार सकारात्मकपणे केला जाईल, असेही केंद्रीय मंत्री श्री.चौहान यांनी सांगितले असल्याचे श्री. गोगावले यांनी सांगितले.

0000000

अंजु निमसरकर/ वि.वृ.क्र.85 /दि.03.04.2025

मुंबई उपनगरातील कुपोषित बालकांसाठी उपाययोजना निश्चित कराव्यात – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. ३ : मुंबई उपनगरसारख्या प्रगत जिल्ह्यात तपासात कुपोषित बालके आढळणे, ही बाब चिंताजनक असून यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना निश्चित करून पुढील १० दिवसात अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

अंगणवाडी सेविकांच्या प्राथमिक पाहणीत १६,३४३ कुपोषित बालके असल्याचे निदर्शनास आल्याने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह महिला व बाल विकास विभाग आणि मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबई उपनगरातील एकात्मिक बाल विकास सेवा विकास यंत्रणेच्या पोषण ट्रॅकर अॅपवर फेब्रुवारी २०२५ मध्ये एकूण २ लाख ३८ हजार ९४ बालकांची नोंद घेतली गेली. यातील २ लाख ३४ हजार ८९६ बालकांची वजन आणि उंची मोजण्यात आली. यानुसार अंगणवाडी स्तरावर वजन आणि उंची नोंदीत पोषण ट्रॅकर अॅपवर अतितीव्र कुपोषण म्हणून २ हजार ८८७ तर मध्यम तीव्र कुपोषण म्हणून १३ हजार ४५७ बालकांची नोंद झाली.

नोंद झालेल्या अति तीव्र आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामधून १,१५९ बालके तीव्र तर ३,०९६ मध्यम तीव्र कुपोषित असल्याचे निष्पन्न झाले. तर माहे फेब्रुवारी २०२५ मध्ये अतितीव्र कुपोषित ४५० आणि मध्यम तीव्र कुपोषित ४०७ बालके आढळली. या संख्येचे अधिकृत प्रमाणिकरण करण्यात येत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी सुरू असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले.

कुपोषण निर्मूलनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणीला गती देण्याचा प्रयत्न सुरू असून तपासणीअंती आढळणाऱ्या सर्व तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच अधिक शहरी बाल विकास केंद्रे सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

000

संजय ओरके/विसंअ/

राज्यपालांनी घेतला एचएसएनसी विद्यापीठाच्या कार्याचा आढावा

मुंबई, दि. ३ : मुंबई येथील हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.हेमलता बागला यांनी आज राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्यासमोर राजभवन येथे विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण केले.

यावेळी कुलगुरु डॉ. बागला यांनी राज्यपालांना विद्यापीठाच्या व्हिजन डॉक्युमेंट व रोडमॅपची माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी विद्यापीठातर्फे होत असलेली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, कौशल्य विकास अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना कार्यानुभव तसेच आंतरवासितेच्या संधी प्रदान करणे, याबाबत मार्गदर्शन केले. परदेशी विद्यापीठांशी सहकार्य, अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविणे, वसतिगृह सुविधा निर्माण करणे, विद्यापीठ परिसर ड्रगमुक्त करणे व स्वच्छ भारत अभियान राबविणे तसेच क्रीडा विकासाला चालना देणे आदी विषयांचा आढावा घेतला व विद्यापीठाला यथायोग्य सूचना केल्या.

सन २०२० साली स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठामध्ये के. सी. महाविद्यालय, एच. आर. महाविद्यालय व बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचा समावेश आहे.

0000

 

मंत्रालयात प्रवेशासाठी ‘डीजीप्रवेश ॲप’वर नोंदणी करा

मुंबई, दि. ३ : मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारीत प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना १ एप्रिल पासून ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारे मंत्रालय बाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशकरिता आरएफआयडी कार्ड वितरीत करण्यात येईल. हे आरएफआयडी कार्ड आधारे सुरक्षा विषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. अभ्यागतांना आरएफआयडी प्रवेश ओळखपत्र परिधान करावे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करावे.

ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईल च्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअर वर तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामुल्य डाऊनलोड करता येते. या ॲपवर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनीटांपेक्षा कमी कालावधी लागतो.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिली रिपब्लिकचे अध्यक्ष गॅब्रियल बोरीच फॉन्ट यांनी घेतली भेट

मुंबई, दि. 3 : चिली रिपब्लिकचे अध्यक्ष गॅब्रियल बोरीच फॉन्ट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन विविध क्षेत्रात संयुक्तपणे काम करण्याच्यादृष्टीने सकारात्मक चर्चा केली. 

ताज हॉटेल येथे झालेल्या या सदिच्छा भेटीवेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, भारताच्या चिली येथील उच्चायुक्त अभिलाषा जोशी, चिली रिपब्लिकचे शिष्टमंडळ, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (पणन) डॉ. राजगोपाल देवरा, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन, परराष्ट्र मंत्रालय संचालक विनय कुमार, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे व संबंधित उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी, पणन, उत्पादन क्षेत्र त्याचप्रमाणे माध्यमे, तंत्रज्ञान, ‘एआय’ यासह विविध क्षेत्रात असलेल्या भविष्यातील संधी आणि या क्षेत्रांमध्ये काम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात पूरक वातावरण असल्याचे सांगून त्यादृष्टीने संयुक्तपणे काम करण्याची संधी असल्याचे सांगितले.

0000

वंदना थोरात/विसंअ/

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन

यवतमाळ, दि. 3 (जिमाका) : मृद व जलसंधारण विभागाच्या उद्योग भवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन आज मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते झाले.

यावेळी पालकमंत्र्यांह मृद व जलसंधारण विभागाचे नागपुर येथील मुख्य अभियंता वसंतराव गालफाडे, अमरावती येथील अधिक्षक अभियंता श्री.निपाने, जिल्हा जलसंधारण अधिकारी भुपेश दमाहे, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पांडे यांच्यासह विभागाचे सर्व उपविभागीय जलसंधारण अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

फित कापून कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्री श्री.राठोड यांनी संपुर्ण कार्यालयाची पाहणी केली. अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यालयाची मांडणी केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान केले. मृद व जलसंधारण विभागाचा मंत्री व राज्यमंत्री दोघेही यवतमाळ जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे विभागाची शहरात स्वतंत्र चांगली ईमारत उभी राहू शकेल का? याबाबत तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यासाठी लागणार निधी उपलब्ध करून देऊ असे ते म्हणाले.

जिल्ह्यात मृद व जलसंधारणाची अनेक कामे सुरु आहे. या आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कामांसाठी लागणार निधी देण्यात येतील, असे ते म्हणाले. विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध कामांबाबत यावेळी त्यांनी चर्चादेखील केली.

प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालय तर शाळेच्या प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे असलेच पाहिजेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दि. 3 ( जिमाका):- जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था तत्काळ करावी. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेच्या वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. या दोन्ही कामांसाठी नियोजन समितीच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

नियोजन समिती सभागृहात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार राजू खरे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,  निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पोलीस शहर उपायुक्त दिपाली काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, महावितरण चे अधीक्षक अभियंता सुनील माने, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की शंभर दिवस कृती आराखड्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था झालेली दिसून येते परंतु जिल्हा परिषद व अन्य राज्यस्तरीय शासकीय कार्यालय तसेच जिल्हा तालुका स्तरावरील तसेच गाव पातळीवरील प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था तात्काळ करून घ्यावी यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नियोजन समितीला प्रस्ताव पाठवावे. उत्तर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रत्येक वर्ग खोलीमध्ये बसवण्याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे सीसीटीव्ही फुटेज पाहता येईल अशी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी. यासाठी आवश्यक तेवढा निधी नियोजन समितीकडून उपलब्ध करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत प्रशासन काम करत आहे परंतु शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतरही याच पद्धतीने लोकांना उत्कृष्टपणे सेवा दिल्या गेल्या पाहिजेत. तसेच कृती आराखड्यात अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळा जाहीर केलेले आहे त्याप्रमाणे सर्व अधिकारी कर्मचारी विशेषता गावपातळीवरील ग्रामसेवक व तलाठी नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध होतात का यावर योग्य नियंत्रण ठेवावे असे सूचना पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिल्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयापर्यंत ही ऑफिस प्रणाली सुरू करावी. सन 2024-25 मध्ये नियोजन समिती वरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना सहा कोटी तर जिल्हा शल्य चिकित्सक यांना सात कोटीचा निधी औषधी खरेदीसाठी उपलब्ध करून दिलेला होता. संबंधित आरोग्य यंत्रणेंनी औषधी खरेदी केल्यानंतर त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला आहे की नाही याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत त्वरित तपासणी करावी असेही त्यांनी निर्देश दिले. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी चांगल्या सुविधा आहेत का?  व शौचालय आहेत का याची तपासणी करावी असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2025 – 26 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 934 कोटी 28 लाखाचा निधी मंजूर आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी पुढील एका महिन्याच्या काळात मंजूर निधी अंतर्गत सर्व कामांच्या याद्या जिल्हा नियोजन समितीला सादर कराव्यात त्यानंतर आलेल्या कामांच्या याद्यावर विचार केला जाणार नाही याची संबंधित यंत्रणा प्रमुखांनी दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. पंढरपूर देवस्थान विकास आराखड अंतर्गत 73 कोटी 45 लाखाचा निधी मंजूर होता त्यानुसार विठ्ठल मंदिराच्या जतन व संवर्धन कामे आषाढी वारी पूर्वी पुरात्व विभागाने पूर्ण करून घ्यावेत अशी सूचना त्यांनी केली. तर दर्शन मंडप व  स्काय वॉक, श्री संत नामदेव महाराज स्मारक श्री महात्मा बसेश्वर यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने स्वतंत्र बैठक नियोजन विभागाने आयोजित करावी असेही त्यांनी निर्देशित केले.

टंचाईच्या परिस्थितीनुसार जिल्ह्याची सद्यस्थिती माहिती घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना टंचाईच्या काळात कोणालाही पाण्याची कमतरता पडणार नाही या अनुषंगाने कार्यवाही करावी अशी सूचना करून एखाद्या गावातून पाण्याच्या टँकरची मागणी आल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी मागणीप्रमाणे तात्काळ तपासणी करून आवश्यकतेप्रमाणे टँकरला मंजुरी द्यावी असेही त्यांनी सांगितले. मोहोळ तालुक्यातील 11 गावांना पाणीटंचाई जाणवत असून त्या ठिकाणी टँकरची मागणी केलेली आहे त्याप्रमाणे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्वरित तपासणी करून पुढील कार्यवाही करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

 

नियोजन समितीतून घेण्यात आलेल्या वाहनांचा लोकार्पण सोहळा –

जिल्हा वार्षिक योजना सन 2024- 2025 सर्वसाधारण अंतर्गत सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाला अकरा वाहन उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, त्या वाहनांना पोलीस आयुक्त कार्यालय येथे हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लोकार्पण केले. तर महसूल विभागाला देण्यात आलेल्या शासकीय वाहनांचे लोकार्पणही नियोजन समिती परिसरात पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

ताज्या बातम्या

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन

0
मुंबई, दि. 22 : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ येथे एअर इंडियाच्या विमानाने रात्री ११ वाजता आगमन झाले. यावेळी ...

आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २२: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाचे घराचे स्वप्न पूर्ण करायचा संकल्प केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या काही काळामध्ये...

मुंबईच्या धर्तीवर नागपुरातील एसटीपी प्रकल्प तात्काळ मार्गी लावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, ता. २२ :- नागनदीतील प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी नागपूर महानगराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने, पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण झाला पाहिजे. यासाठी...

विधानभवनमध्ये २३, २४ जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

0
मुंबई, दि. २२ : भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित...

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
नागपूर, दिनांक २२ : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय...