रविवार, जून 22, 2025
Home Blog Page 188

‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ला राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार

मुंबई, दि. २ : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी या महोत्सवाला उपस्थित रहावे अशी विनंती  पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी येथे भेट घेऊन विनंती केली असून त्यांच्या विनंतीला राज्यपाल यांनी संमती दर्शवून ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मध्ये आयोजित करण्यात येणारे लेझर शो, टेंट सिंटीचे आयोजन, विविध परिसंवाद, देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम याची माहिती त्यांनी राज्यपाल यांना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मे रोजी उद्घाटन होणार आहे. तसेच या उद्घाटनाप्रसंगी मंत्रिमंडळातील सदस्यही उपस्थित राहणार आहेत.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई’  चरित्र ग्रंथ पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी  भेट दिला. दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांचे कार्य आजच्या पिढीला मार्गदर्शक असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ यशस्वी करूया – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा समावेश

मुंबई, दि. २ : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत २ मे २०२५ रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पावनगड या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ या पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातील सदस्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. सातारा जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात पर्यटन महोत्सव होत आहे. या महोत्सवात पर्यटकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा तलावात महोत्सव कालावधीत नेत्रदीपक लेझर शो होणार आहे. गुजरातमधील कच्छ रणच्या धर्तीवर महाबळेश्वर येथे शंभरहून अधिक टेन्ट्स उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी अत्याधुनिक निवासव्यवस्थेकरिता टेंट सिंटी उभारली जाणार आहे. वेण्णा तलावात पर्यटकांना साहसी खेळ आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल. देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद देखील आयोजित करण्यात येणार आहे.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि पर्यटनदृष्ट्या त्यांचे योगदान यावर विशेष सादरीकरण देखील होणार आहे. ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वरच्या साबळे रोड येथे एक विशेष सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येईल. या महोत्सवात राज्यातील प्रत्येक भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद पर्यटकांना घेता येईल. तसेच ४ मे २०२५ रोजी समारोप सोहळ्यापूर्वी महाराष्ट्रातील विविध पारंपरिक लोककला जसे की लावणी, गोंधळ, जागर, नाशिक ढोल इत्यादींचे सादरीकरण होणार आहे. तसेच, भव्य ‘ड्रोन शो’ या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून या महोत्सवात सहभागी झालेल्या उद्योजक, ट्रॅव्हल गाईड्स आणि स्थानिक कलाकारांचा यथोचित सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर करणार आहोत या महोत्सवाला पर्यटनप्रेमींनी जरूर यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

कृषी विद्यापीठासाठी शेतीयोग्य जागेचा शोध दहा दिवसात घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ०१: कोल्हापुरच्या शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन आदी कार्यासाठी पर्यायी जागा म्हणून कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील 60 ते 100 हेक्टर एकत्रित जागेचा शोध घेण्यात यावा. येत्या दहा दिवसात कृषी विद्यापीठाच्या सहमतीने पर्यायी जागा अंतिम करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत आयोजित विशेष बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्देशांमुळे कोल्हापूरातील शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोल्हापुरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची 60 ते 100 हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यात येणार आहे. ही जागा निश्चित करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (व्हीसीद्वारे), कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (व्हीसीद्वारे), आमदार अमल महाडिक (व्हीसीद्वारे), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (व्हीसीद्वारे), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे (व्हीसीद्वारे), महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे कुलसचिव डॉ. नितीन दानवले आदी मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी कृषी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांचा समतोल विकास महत्त्वाचा आहे. शेतीसंशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना आवश्यक सुविधा तसेच शेती, शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यक्रमासाठी पुरेसी, अनुकुल जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शासनाची असून शासन ती पार पाडेल. राज्याने काळाची गरज ओळखून उद्योगस्नेही धोरण स्विकारले आहे. त्यातून उद्योगक्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यातून राज्याचा आर्थिक विकास आणि रोजगाराची संधी उपलब्ध करण्याची उद्दीष्टे साध्य होणार आहेत. त्यातूनच कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होणार आहे.

शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची जागा पूर्वी शहराबाहेर होती ती आता शहराच्या मध्यवर्ती भागात आली आहे. ‘आयटीहब’सारख्या उद्योगासाठी शहरातील जागा आवश्यक असते. कृषी संशोधनासाठी शहराबाहेरील जागाही उपयोगात आणता येईल, त्यामुळेच ‘आयटीहब’साठी शेंडापार्कच्या जागेची निवड करण्यात आली आहे. त्याबदल्यात कृषी विद्यापीठाला कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील वीज, पाणी, रस्त्यांच्या सोयीयुक्त 60 ते 100 हेक्टर एकत्रित शेतीयोग्य पर्यायी जागा, कृषी विद्यापाठाच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्या जागेचा विकासही करुन देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी कृषी विद्यापीठाच्या मान्यतेने येत्या दहा दिवसात पर्यायी जागा अंतिम करावी. त्याजागेच्या हस्तांतरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत सांगितले.

०००

‘एआय’ सेंटर्स ऑफ एक्सलन्ससाठी महाराष्ट्र शासन, मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. ०१: राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला.

करारावर महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे वेंकट कृष्णन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव नवीन सोना, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले तसेच मायक्रोसॉफ्टचे विक्रम काळे, विशाल घोष आदी उपस्थित होते.

हा सामंजस्य करार महाराष्ट्र शासनाच्या “डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र” या संकल्पनेला बळकटी देणारा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शासन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक होईल, ज्याचा थेट लाभ नागरिकांना मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, मायक्रोसॉफ्टसोबत झालेल्या सांमजस्य करारामुळे राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रशिक्षण मिळविण्याची संधी मिळणार आहे. ही भागीदारी महाराष्ट्राच्या २०२८ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाला गती देईल. तसेच महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांना अधिक सक्षम करेल. याचबरोबर राज्याच्या नवकल्पना, प्रगती आणि उद्योजकतेला चालना मिळेल. यामुळे ही भागीदारी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारी ठरेल.

राज्यभरात तीन ‘ए.आय.’ उत्कृष्टता केंद्रे

मुंबई- भूगोल विश्लेषण केंद्र : भूगोल-संबंधित प्रगत विश्लेषणासाठी, जी.आय.एस. आणि उपग्रह इमेजरीद्वारे धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस सहाय्य. हे केंद्र मुख्य सचिव कार्यालयात कार्यरत राहील. उपग्रह इमेजरी विश्लेषण, भू-सांख्यिकी व्यवस्थापन आणि जी.आय.एस.-आधारित वापराच्या माध्यमातून शासनाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस मोठी मदत होईल.

पुणे – न्यायवैज्ञानिक संशोधन आणि ‘ए.आय. केंद्रः’ गुन्हे तपास आणि न्यायवैज्ञानिक विश्लेषणासाठी ए.आय.चा उपयोग वाढविणे.

नागपूर – मार्व्हेल केंद्रः कायद्यांची अंमलबजावणी, दक्षता आणि सुधारित प्रशासनासाठी ‘ए.आय.’वर आधारित संशोधन आणि प्रशिक्षण तसेच, राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना ‘ए.आय.’ प्रशिक्षण व मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्रे प्रदान केली जातील. एम.एस. लर्न या जागतिक दर्जाच्या प्लॅटफॉर्मद्वारे प्रशासन अधिक सक्षम व तंत्रज्ञानस्नेही होईल.

मायक्रोसॉफ्ट कोपायलट (Copilot) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शासनाच्या विविध कार्यप्रणालींमध्ये लक्षणीय सुधारणा केली जाणार आहे. प्रशासनिक कार्यप्रवाह अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयोगी ठरेल. दस्तऐवज व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी स्वयंचलित संक्षेपण व विश्लेषणाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच, नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने जलद निराकरण शक्य होणार आहे. आरोग्य व्यवस्थापन, जमीन अभिलेख व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये कोपायलट तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल. वाहतूक दंडाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ते आधार कार्ड व अन्य आवश्यक सेवांशी थेट जोडण्यात येईल. यामुळे शासनाच्या सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकांच्या हिताच्या बनतील.

सामंजस्य कराराचे प्रमुख फायदे

  • प्रशासनिक कार्यक्षमता वाढवेल : ‘ए.आय.’ तंत्रज्ञानाच्या मदतीने दस्तऐवजांचे स्वयंचलित विश्लेषण आणि प्रक्रिया जलद होईल. शासनाचे निर्णय अधिक अचूक आणि डेटा-आधारित होतील. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यप्रवाह सोपा आणि सुव्यवस्थित होईल.
  • कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन आणि रोजगाराच्या संधी : मायक्रोसॉफ्टच्या MS Learn प्लॅटफॉर्मद्वारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त AI प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढेल. नवीन तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रातील IT आणि AI क्षेत्रात अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
  • नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा मिळणार : Copilot तंत्रज्ञानामुळे नागरिकांच्या तक्रारी आणि प्रश्नांना तत्काळ उत्तर मिळेल. हेल्थकेअर, शिक्षण, वाहतूक आणि जमीन अभिलेख व्यवस्थापन यांसारख्या सेवा अधिक जलद आणि प्रभावी बनतील. नागरी सुविधांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल.
  • कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने धोरणात्मक सुधारणा : कृषी, आरोग्य, सायबर सुरक्षा आणि औद्योगिक विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये एआय आधारित घोरणे तयार करता येतील. वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी दंड प्रणालीला डिजिटल सेवांशी थेट जोडता येईल, ज्यामुळे शिस्तबद्ध वाहतूक प्रणाली निर्माण होईल. शासनाच्या विविध यंत्रणांमध्ये ‘एआय’चा समावेश झाल्यामुळे महाराष्ट्र डिजिटल प्रशासनाच्या दिशेने देशात अग्रेसर राहील.
  • महाराष्ट्राला डिजिटल प्रशासनात आघाडीवर नेणार : महाराष्ट्र हे ‘एआय’ आधारित सरकारी सेवा सुधारण्यासाठी देशातील अग्रणी राज्य बनेल. जागतिक कंपन्यांसाठी महाराष्ट्र हे ‘एआय’ आणि तंत्रज्ञानासंबंधी गुंतवणुकीसाठी एक आदर्श केंद्र बनेल. नाविन्यपूर्ण प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांना उत्तम सेवा आणि सुविधा मिळतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

०००

संजय ओरके/विसंअ/

तृतीयपंथीयांच्या हक्कांचेही होणार संरक्षण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ०१: राज्य शासन राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे. यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना ही करण्यात आली आहे. तृतीयपंथी यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक सक्षमतेने आणि प्रभावी होण्यासाठी या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे, याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या संबंधीच्या निर्णयाची प्रत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते तृतीयपंथी समुदायाच्या प्रतिनिधींना सह्याद्री अतिथीगृह येथे देण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीय समुदायाच्या शिक्षण, रोजगार आणि आरोग्य यासंदर्भातील विविध योजना राबवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे तृतीयपंथीय समुदायाला अधिक सक्षम आणि न्याय्य प्रतिनिधित्व मिळेल, तसेच त्यांचे हक्क आणि कल्याण अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करता येईल.

सामाजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले, सन २०१८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या मंडळाच्या संरचनेत बदल करून सुधारित स्वरूपात नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १३ अशासकीय सदस्यांची नियुक्ती रद्द करून त्याऐवजी नव्या सदस्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी तृतीयपंथीयांसाठीचे धोरण – २०२४, ११ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आले होते. या धोरणानुसार राज्यस्तरीय मंडळाच्या संरचनेत सुधारणा करणे आवश्यक होते.

नव्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळाचे अध्यक्ष असतील. तसेच समाज कल्याण आयुक्त हे सदस्य सचिव असणार आहेत. तृतीयपंथीय प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अशा अशासकीय सदस्यांचाही मंडळात समावेश करण्यात आला आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ‘बाईक टॅक्सी’ धावणार

मुंबई, दि. ०१: राज्यात नागरिकांना नाविन्यपूर्ण परिवहन सेवेच्या सुविधा देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. याअंतर्गत नागरिकांना सुलभ परिवहन सेवा मिळण्यासाठी बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आता बाईक टॅक्सी धावणार असून याबाबतच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

रस्त्यावरील वाहनसंख्या कमी होण्यासाठी खासगी दुचाकी वाहनांसाठी बाईक पुलिंगच्या पर्यायालासुद्धा शासनाने मान्यता दिली आहे. अशा वाहनांना मोटार वाहन कायद्यांतर्गत योग्यता प्रमाणपत्र, विधीग्राह्य परवाना व विमा संरक्षण बंधनकारक असणार आहे. बाईक टॅक्सीच्या प्रवासी भाड्याचे दर हे संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारे निश्चित करण्यात येतील.

बाईक टॅक्सीमुळे कमी खर्चात प्रवासासाठी सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य राहणार आहे. या धोरणातंर्गत केवळ परिवहन संवर्गातील इलेक्ट्रीक बाईक टॅक्सीच धावणार आहेत. या योजनेमुळे नागरिकांना स्वस्त प्रवासाच्या पर्यायासह ‘लास्ट माईल कनेक्ट‍िव्हीटी’चा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे शहरातील प्रदूषण व वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार असून नवीन रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. केवळ २० ते ५० वर्ष वयोगटातील चालकांनाच बाईक टॅक्सी सेवा देता येणार आहे. तसेच यामध्ये महिला प्रवाशांना महिला चालकाचा पर्याय निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

उद्योग विभागाची १०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ०१: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आखून दिलेल्या १०० दिवस आराखड्यात निश्चित केलेल्या उद्दिष्टांची १०० टक्के पूर्तता होण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

 

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीस उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासु, विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह, सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड तसेच उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दावोस येथे झालेल्या करारामध्ये उद्योग विभागाने २३५ टक्के उद्दिष्टपूर्ती केली असल्याचे सांगून उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत ४०.८९ टक्के गुंतवणूक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग संचालनालय, मैत्री, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, शासकीय मुद्रणालय आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या उद्दिष्टांची ९० ते ९५ टक्के पूर्तता झाली असून संपूर्ण उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री सामंत यांनी सर्व कार्यालयात स्वच्छता आणि नूतनीकरण करण्याच्या सूचना दिल्या. उद्योग विभाग हा शासन यांनी उद्योजक यांच्यातील महत्वाचा दुवा असल्याने शासन करीत असलेली कामे सामान्यांपर्यंत पोहोचावी, उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी उद्योग सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी, विकास आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

०००

संजय ओरके/विसंअ/

दत्तक प्रक्रियेत महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी; ५३७ बालकांना मिळाले हक्काचे ‘घर’ – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ०१: महाराष्ट्र राज्याने दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. सन २०२४-२५ या वर्षात सर्वाधिक ५३७ बालकांना कायदेशीर प्रक्रियेनंतर दत्तक इच्छुक पालकांना सोपविण्यात आले. यामुळे बालकांना हक्काचे ‘पालक’ व ‘घर’ मिळाले आहे, अशी समाधानाची भावना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली .

देशात एकूण कायदेशीर दत्तक मुक्त बालकांची संख्या ४५१२ इतकी असून यापैकी महाराष्ट्रात एकूण ५३७ बालके कायदेशीर दत्तक मुक्त करण्यात आली आहे. या दत्तक प्रक्रियेद्वारे हक्काचे आई-वडील व कुटुंब मिळवून देण्यात आली आहेत. सातत्याने काम करुन दत्तक प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राला देशात अव्वलस्थानी आणल्याबद्दल या उल्लेखनीय यशासाठी महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, संस्था व राज्याच्या दत्तक स्त्रोत संस्थांचे अभिनंदन केले आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, सुधारीत अधिनियम २०२१ आणि कारा दत्तक नियमावली २०२२ च्या अनुषंगाने राज्यात प्रभावीपणे दत्तक प्रक्रिया राबवण्यात आली आहे. केंद्रीय दत्तक स्त्रोत संस्था (कारा), नवी दिल्ली यांनी या उल्लेखनीय कामाची दखल घेतली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत ६० विशेष दत्तक मान्यता प्राप्त संस्था कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून दत्तक पात्र बालकांना कायदेशीर मुक्त घोषित करून त्यांना हक्काचे पालक व कुटुंब मिळवून देण्याचे कार्य केले जाते.

महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव आणि आयुक्त  नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. अनेक बालकांना सुरक्षित आणि प्रेमळ कुटुंब मिळावे यासाठी  दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

भारत निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत संवाद मोहीम

मुंबई, दि. ०१: भारतीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर राजकीय पक्षांसोबत संवाद साधण्याची मोठी मोहीम राबवली. आतापर्यंत एकूण २५ दिवसांच्या कालावधीत आणि ३१ मार्च २०२५ पर्यंत, देशभरामध्ये एकूण ४,७१९ बैठका घेण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी यांनी ४० बैठका, जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी ८०० आणि मतदार नोंदणी अधिकारी यांनी ३,८७९ बैठका घेतल्या, ज्यामध्ये देशभरातील २८ हजारांहून अधिक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

या बैठका ४-५ मार्च २०२५ रोजी आयआयआयडीईएम IIIDEM, नवी दिल्ली येथे झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू व डॉ. विवेक जोशी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आयोजित करण्यात आल्या.

लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० व १९५१, मतदार नोंदणी नियम १९६०, निवडणूक संचलन नियम १९६१ आणि मॅन्युअल्स, निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे व निर्देश यांच्यानुसार सबंधित अधिकाऱ्यांकडून प्रलंबित प्रकरणांचे निराकरण करणे हा या संवाद बैठकींचा उद्देश होता. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून कृती अहवाल मागवण्यात आला असून, कायदेशीर चौकटीत न सोडवता आलेले कोणतेही मुद्दे आयोगाच्या स्तरावर घेतले जातील.

विधानसभा मतदारसंघ, जिल्हे आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संवाद बैठकीत राजकीय पक्षांचा सकारात्मक सहभाग दिसून आला, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/

 

‘अभिजात मराठी’साठी लवकरच समिती गठित करणार – मंत्री उदय सामंत

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. ०१: मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून आता भाषेच्या संशोधन आणि विकासासाठी तसेच भाषेच्या उन्नतीसाठी काम करण्यात येत आहे. यासाठी लवकरच एक समिती गठित करण्यात येईल, असे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक विभागास १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांची उद्दिष्टे दिली, त्या अनुषंगाने मराठी भाषा मंत्री सामंत यांच्या अध्यकतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. बैठकीस मराठी भाषा विभागाचे सहसचिव नामदेव भोसले तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले की, मराठी पुस्तकांना पुरस्कार देण्यात येतो. वाचक हा पुस्तक खरेदी करताना प्रथम पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून पुस्तक घेतो. त्यामुळे मराठी पुस्तकांच्या उत्तम मुखपृष्ठासाठी पुरस्कार देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मंत्री सामंत म्हणाले की, मराठी भाषा विभागाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे नूतनीकरण करण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा भवन उभारण्याचे काम सुरू आहे. सीमा भागात असलेल्या गावामध्ये मराठी भाषेच्या प्रसारासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे मराठी भाषा मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

०००

संजय ओरके/विसंअ/

ताज्या बातम्या

ग्रामपंचातींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे – ग्रामविकास मंत्री

0
पुणे, दि. २१:महाआवास व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता हे दोन्ही अभियान ग्रामविकासासाठी महत्त्वाची आहेत. स्वच्छ, सुंदर व प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी ग्रामपंचायतीनी महत्त्वाची भूमिका निभवावी व...

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि.२१ : महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले. त्यानंतर राज्याला हा बहुमान मिळाला नसून यासाठी प्रयत्न व्हावा, अशा अपेक्षा...

पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार – मंत्री प्रकाश आबिटकर

0
पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार कोल्हापूर दि.21 (जिमाका): लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व...

‘ईएसआयसी’ रुग्णालयात रुग्णसेवेच्या गुणवत्तेत वाढ करा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज ताराबाई पार्क येथील राज्य कामगार विमा महामंडळाच्या...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

0
पुणे, दि. २१: राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ठळक लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती देणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत आयोजित 'संवादवारी'या चित्र प्रदर्शनाचे, एलइडी व्हॅन...