रविवार, जून 22, 2025
Home Blog Page 191

रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

मुंबई, दि. ३१: सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर होणारी तुती लागवड ही  शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर, आणि आर्थिक पाठबळ देणारी शाश्वत शेती म्हणून उत्तम पर्याय समोर येत आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध योजनांची अंमलबाजवणी करीत आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होत आहे. त्यामुळे रेशीम शेतीला चालना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत .

केंद्र शासनकडून यासाठी जो निधी मिळतो त्याचा प्रस्तवा तातडीने तयार करून केंद्र शासनाकडे  पाठपुराव करावा अशा सूचनाही विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत

केंद्र सरकार आणि राज्यशासन तसेच खाजगी कंपन्या, सामाजिक संस्था यांच्या सामाजिक दायित्व निधीतून तुती व टसर उद्योगाचा एकात्मिक विकास करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार तातडीने बैठक घेऊन रेशीम शेती संचालनालयाचे कार्यालय नसलेल्या जिल्ह्यांमध्ये तुती व टसर रेशीम उद्योगाच्या विकासासाठी पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथील बाएफ या संस्थेची मदत होत आहे. या संस्थेच्या मदतीने रेशीम उद्योग कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे .

बाएफ संस्थेने तुती लागवड ते कापड निर्मितीतील मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्यासाठी रेशीम संचालनालयास मदत करण्याबाबतचे सादरीकरण केले. तुती लागवड, अंडीपुंज ते कोष निर्मिती, कोषोत्तर प्रक्रीया उद्योगास चालना देवून समूह पध्दतीने विकास, त्याद्वारे मुल्यवर्धीत साखळी निर्माण करणे,  रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे याबाबत बाएफ व रेशीम संचालनालय यांनी क्षेत्रे निश्चित करावी. ज्या क्षेत्राच्या साखळी विकासामध्ये तुट अशा क्षेत्रातील तज्ज्ञ, कार्यरत व्यक्तींनी  त्यासाठी बाएफ संस्थेने मुल्यवर्धीत साखळी निर्माण करुन स्थानिकांना रोजगार निर्मिती आणि रेशीम उद्योगाला चालना दिली आहे, अशा उरळी कांचन, जि. पुणे येथे प्रत्यक्ष भेट देवून पुढील दिशा व कार्यकक्षा निश्चित करण्यात येत आहे.

रेशीम शेती आणि वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून रेशीम उद्योगासाठी आवश्यक  निधी संदर्भात पाठपुरावा आणि राज्यातील रेशीम संदर्भातील संबंधित विभागाचा समनव्य करून याला अधिक गती देण्यात येत आहे. तुती लागवड, ऐन व अर्जुन वृक्ष लागवडीसाठी वन विभागाची मदत आणि. झोमॅटो व झेप्टो या कंपनीच्या सामाजिक दायीत्व निधीतून आदिवासी जिल्हयामध्ये तुती, ऐन व अर्जुन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत अजून याबाबतच कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

टसर क्षेत्रामध्ये रेशीम अळीचे संगोपन करताना शेतकऱ्यांना  येणाऱ्या अडचणीसंदर्भात संबधित जिल्हयातील वनविभागाचे अधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने सहकार्य करण्याचे नियोजन करावे. निधीची आवश्यकता असल्यास किंवा प्रस्ताव प्रलंबीत असल्यास त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत पाठपुरावा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

तुती व टसर क्षेत्रातील विकासाकरिता विशेषतः महीला व अदिवासी घटकांना उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी पुढील 5 वर्षामध्ये 10 हजार लाभार्थ्यांसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून रेशीम शेतीला प्रोत्साहन

राज्यातील तुती व तसर रेशीम शेतकऱ्यांना जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 75 टक्के इतक्या सवलतीच्या दरात अंडीपुंज पुरवठा करण्यात येत आहे. तसेच राज्यांतर्गत रेशीम शेती नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. रेशीम शेतकऱ्यांना विद्या वेतनासह 15 दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषांना उत्पादनावर आधारित प्रोत्साहन पर अनुदान, सूत उत्पादन अनुदान योजना, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती रेशीम सुत उत्पादनासाठी आर्थिक साह्य आधुनिक यंत्रसामुग्रीसाठी अनुदान, मल्टी अँड रेलिंग युनिट 100 प्रति किलो अनुदान, ऑटोमॅटिक रेलिंग युनिट 150 रुपये प्रति किलो, अनुदान टसर रीलींग युनिट 100 रुपये प्रति किलो अनुदान देण्यात येत आहे.

यासाठी  केंद्र व राज्य सरकारच्या  योजनांचा उपयोग करून,योग्य तंत्रज्ञान,शेकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देऊन  ग्रामीण,दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे  उत्पन्न वाढीसाठी  त्यांना आर्थिक सक्षमता मिळू देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच बरोबर आदिवासी,ग्रामीण भागात तुतीची लागवड आणि रेशीम उत्पादनामुळे स्थानिक पातळीवर मोठया प्रमाणत  रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून  विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

.

0000

डिफेन्स क्लस्टरमुळे शिर्डी परिसरातील औद्योगिक विकासाला चालना – राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि.३१ – शिर्डी एमआयडीसीत होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या लौकिकात भर पडणार असून शिर्डी परिसराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून रोजगारात वाढ होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

सावळिविहीर खुर्द येथील शिर्डी औद्योगिक वसाहत येथे डिफेन्स क्लस्टरअंतर्गत निबे ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड (शेल फोर्जिंग) कंपनीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, निबे प्रायव्हेट लिमिटेडचे गणेश निबे, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड आदी उपस्थित होते.

श्री.विखे पाटील, शिर्डी एमआयडीसीमधील डिफेन्स क्लस्टरमुळे नवीन औद्योगिक पर्व सुरू होत आहे. शिर्डी विमानतळावरून नाइट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे. यामुळे शिर्डीतील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. एमआयडीसीने डिफेन्स क्लस्टरसाठी मोफत जमीन उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी टाटा कंपनीच्या पुढाकाराने अडीचशे कोटींचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून यात उद्योगांना आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडील ३०० एकर जागा कोपरगाव औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.

शिर्डीचा विकास व औद्योगिक विस्तारासाठी ग्रामस्थांनी विचार विनिमय व समन्वयाने निर्णय घ्यावा. शिर्डी साईबाबा संस्थानच्या माध्यमातून ११ नंबर चारीच्या विस्तारासाठी २२ कोटी व थीम पार्कसाठी ४० कोटी मंजूर करण्यात आले आहेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेमुळे अनेक तरुण स्टार्टअप स्वरूपात कंपन्या स्थापन करत असून आर्थिक उन्नतीसाठी तरुणांनी जागतिकीकरणामुळे प्राप्त संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिर्डी एमआयडीसीमुळे आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे आमदार काळे यावेळी म्हणाले.

श्री.निबे म्हणाले, डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून पाच लाख बॉम्ब शेलची निर्मिती होणार असून या कंपनीच्या माध्यमातून तीन हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

प्रास्ताविक मंगेश जोशी यांनी केले.

0000

रमजान ईदनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा

मुंबई, दि. ३०: राज्यात गुढीपाडव्या पाठोपाठ रमजान ईद हा सण उत्साहाने साजरा होत आहे. पवित्र अशा रमजान ईद सणाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटले की, मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना पवित्र मानला जातो. उपवासाच्या व्रतानंतर येणारा ‘ईद-उल-फित्र’ संयम, त्याग आणि समर्पण यांच्या कृतार्थतेची भावना निर्माण करतो. या दोन्ही सणांच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट होवून त्यांचे मनोरथ पूर्ण व्हावेत, अशी मनोकामना व्यक्त करतानाच त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ईद-उल-फित्र हा केवळ उत्सव नाही, तर आपल्या जीवनातील चांगल्या मुल्यांचा उत्सव आहे. या दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन, एकमेकांशी प्रेम आणि आपुलकीने समाजात सौहार्द दृढ करूया, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ३०: गुढीपाडवा व मराठी नववर्षा सोबत आलेली रमजान ईद सर्वांच्या जीवनात आनंद, सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात प्रेम, सौहार्द, एकता आणि बंधुत्व अधिक दृढ व्हावे. रमजान ईदच्या निमित्ताने वंचित, गरजू बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊया. यंदाची ईदही आपण सर्वांनी एकोपा, आनंद आणि उत्साहाने साजरी करुया. परस्परांप्रती सहकार्याची भावना वृद्धिंगत करत सामाजिक ऐक्य अधिक दृढ करुया. मानवकल्याण आणि विश्वबंधुत्वाचा संदेश संपूर्ण जगाला देऊया… अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ईदनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री पवार म्हणतात की, रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मुस्लिम बांधवांसोबतच सर्वधर्मीय नागरिकही या सणाच्या आनंदात सहभागी होतात. गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षासोबत आलेली यंदाची रमजान ईद वैशिष्ट्यपूर्ण आहे. सध्याच्या काळात समाजात ऐक्य, सहिष्णुता आणि बंधुत्व वृद्धिंगत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रमजान ईद हा सण समाजात परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी आणि मदतीची भावना वाढवतो. महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक ऐक्य आणि प्रगतीसाठी ही बंधुत्वाची भावना अत्यंत आवश्यक आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.

०००

 

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. ३० : ज्या जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकांचे जाळे सक्षमपणे कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी अधिक सुखी असल्याचे आपण पाहतो. याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये शेतीपूरक उद्योगाने चांगला आकार घेतल्याचे आपल्या निर्दशनास येते. या दृष्टीने विचार करुन नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संस्थापक प्रशासकत्वाची जबाबदारी आजपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे सुपूर्द केल्याने शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग अधिक व्यापक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संस्थापक प्रशासक नियुक्ती सोहळ्यात ते बोलत होते. गुढीपाडव्याचे औचित्य साधून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या विशेष समारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन, कृषी व मदत पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, सहकार आयुक्त दिपक तावरे, प्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार आशिष देखमुख यांनी प्रशासक पदाबाबत केलेल्या विनंतीचा विचार करुन आपण हा पहिला प्रयोग करत आहोत. सहकार आयुक्तालयाने यात यथायोग्य भूमिका निभावून येत्या दीड वर्षात नागपुरची जिल्हा सहकारी बँक आर्थिक फायद्यात येईल याची खात्री असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यांनी गुढीपाडव्याच्या औचित्याने नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेली ही अपूर्व भेट आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रुपाने नागपूर जिल्हा सहकारी बँकेला आता एक शक्तीशाली जोड मिळाली आहे. येत्या दोन वर्षात ही बँक फायद्यात येण्यासह जिल्ह्यात सहकाराचे जाळे अधिक भक्कम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आमदार आशिष देशमुख यांनी जिल्हा सहकारी बँकेत सर्वांनी मुदत ठेवी दाखल करुन आकर्षक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी प्रास्ताविक केले. शिखर बँका, जिल्हा बँका व विविध कार्यकारी संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. यावर्षी राज्य बँकेने 52 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा पार केला असून 650 कोटींपेक्षा अधिक नफा बँकेने प्राप्त केल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

०००

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी

मुंबई, दि. ३१: राज्यामध्ये दुचाकी चार चाकी व अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. नवीन वाहन खरेदीची नोंदणी २०२४ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ३० टक्के जास्त वाहनांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक नागरिक नवीन वाहनांची खरेदी करीत असतात या वाहनांची नोंदणी संबंधित प्रादेशिक परिवहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत करण्यात येते. नागरिकांमध्ये वाहन खरेदीचा उत्साह दिसून येत असल्यामुळे यावर्षी वाहन नोंदणी मध्ये ३० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तब्बल २० हजार ०५७ वाहने मागील वर्षाच्या तुलनेत अधिक खरेदी करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

चार चाकी कार प्रकारात २०२५ मध्ये २२ हजार ०८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून ही मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९४२ ने जास्त आहे. याची टक्केवारी २८.८४ टक्के आहे. तसेच मोटरसायकल, स्कूटर या दुचाकी वाहन प्रकारात २०२५ मध्ये ५१ हजार ७५६ नवीन वाहनांची खरेदी नागरिकांकडून करण्यात आली आहे. मागील वर्षी हीच खरेदी ४० हजार ६७५ एवढी होती. यामध्येही ११ हजार ०८१ ने वाढ नोंदविण्यात आली असून २७.१४ टक्के अधिकची नोंदणी झाल्याचे निदर्शनास येत आहे.

राज्यात सर्वात जास्त पहिल्या पाच परिवहन कार्यालय अंतर्गत वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे परिवहन कार्यालय अंतर्गत ११ हजार ५६, पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालय अंतर्गत ६ हजार ६४८, नाशिक अंतर्गत ३ हजार ६२६, मुंबई (मध्य) परिवहन कार्यालय अंतर्गत ३ हजार १५४ आणि ठाणे परिवहन कार्यालय अंतर्गत ३ हजार १०७ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे, असे परिवहन विभागाकडून कळविण्यात आले.

०००

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून गुढीपाडवा उत्साहात साजरा

मुंबई, दि. ३० : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त राजभवनातील आपल्या निवासस्थानी गुढी उभारून पूजा केली. यावेळी त्यांनी सर्व उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांना गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

०००

गुढीपाडवा सकारात्मकता, नवउत्साहाचा सण – सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला

नवी दिल्ली, दि. ३०: महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत, राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू असलेला नववर्ष स्वागताचा सण संपूर्ण देशभर मोठ्या श्रद्धेने आणि आनंदात साजरा करण्यात येतो. राजधानी नवी दिल्लीतही महाराष्ट्र सदनाच्या वतीने कोपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांनी गुढी उभारली. त्यानंतर कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी गुढी प्रतिष्ठापना करून विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी सुमनचंद्रा, भारतीय प्रशासकीय सेवेतील अन्य वरिष्ठ अधिकारी, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, सारिका शेलार, यांसह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुढीपाडव्या निमित्त महाराष्ट्र सदनात स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त मराठमोळ्या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत, निवासी आयुक्त आर. विमला यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत गुढीपाडव्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व यावेळी विशद केले. “गुढीपाडवा हा नवउत्साह, समृद्धी आणि सकारात्मकतेचा सण आहे. महाराष्ट्राबाहेरही तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, ही अभिमानास्पद गोष्ट आहे,” असे सांगत, त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या व नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धीचे आणि आनंददायी जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

०००

अमरज्योत कौर अरोरा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवे चे उद्घाटन

नागपूर, दि. ३० : नागपूर – अमरावती रोडवरील बाजारगाव स्थित सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलर कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, कंपनीचे व्यवस्थापकीस संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष नुवाल, सोलर डिफेंस ॲन्ड एरोस्पेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक वासुदेव आर्या उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोटेरिंग म्युनिशन टेस्ट सुविधेचे तसेच भारतातील पहिली अनमॅन एरियल सिस्टीम (युएसए), 1.27 कि.मी. चे रनवे, हँगर्स आणि रिपेअर लेनचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सोलर ग्रुपद्वारा निर्मित अत्याधुनिक सुरक्षा यंत्राचे अवलोकन केले. कार्यक्रमाला कंपनीचे उपमहाव्यवस्थापक श्याम मुंदडा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

 

संघटन, समर्पण व सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची नेत्र संस्था ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
  • माधव नेत्रालयाने जनतेच्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्तम कार्य केले

नागपूर, दि. ३०: संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने कार्य करीत आहे. माधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन दशकांपासून लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य केल्याचे गौरवोद्गार, त्यांनी काढले.

हिंगणा रोड वरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई- भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंद देव गिरी, माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आरोग्य  क्षेत्रातील सुधारणांमध्ये देशाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प जाहीर केला. गेल्या दशकात ग्रामीण भागात लाखो आयुष्मान भारत केंद्रे उभारण्यात आली. कोट्यवधी लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. टेलिमेडिसिनद्वारे उपचार व आरोग्य सेवा सशक्त करण्यात आल्या. एम्ससारख्या संस्थांची संख्या तिपटीने वाढविण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच देशात वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. योग आणि आयुर्वेदालाही जगात मानाचे स्थान मिळाले आहे. आरोग्य सेवेपासून कुणी वंचित राहू नये, असे शासनाचे धोरण असून त्यानुसार सक्षमपणे कार्य सुरू आहे.

आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात आले. आयुष्मान भारतसारख्या योजनांद्वारे गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांचा हाच वसा माधव नेत्रालय पुढे घेऊन जात आहे.  द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्शावर मार्गक्रमण करत नेत्रालयाने अंध:कार दूर करीत लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. प्रीमियम सेंटरमुळे या नेत्रालयाच्या कार्याचा विस्तार होऊन त्यास गती मिळेल. तसेच देशातील आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीतही या संस्थेचे भरीव योगदान राहील.

विदर्भातील थोर संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे जन्मतः अंध होते. मात्र अंधत्वावर मात करीत त्यांनी ज्ञानाची दृष्टी विकसित केली. दृष्टी बोधातून येते व विवेकातून प्रगट होते याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ अशा देशातील संतांनी भारताला एकसंध ठेवत उत्तम शिकवण दिली. माधव नेत्रालयानेही त्यांच्या विचारांची कास धरत कार्य केले आहे. समाजसेवेचे हे कार्य अव्याहत पुढे जावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची नेत्र संस्था ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दृष्टी ही ईश्वराने मानवाला दिलेला मौल्यवान ठेवा आहे. ज्यांच्याकडे दुर्देवाने ही दृष्टी नाही त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य माधव नेत्रालय गत तीन दशकांपासून करीत आहे. देशात व राज्यात नेत्र आरोग्य क्षेत्रात भरीव सेवा देण्याची आवश्यकता आहे. माधव नेत्रालयासारख्या संस्था सातत्यपूर्ण सेवा कार्य करीत या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत आहेत. नेत्रालयाचे प्रीमियम सेंटर अस्तित्वात आल्याने मध्य भारतातील नेत्र आरोग्य क्षेत्रात सेवा देणारी माधव नेत्रालय ही महत्वाची संस्था ठरणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोककल्याणाच्या प्रेरणेतून माधव नेत्रालयाचे जीवनदृष्टी देण्याचे कार्य – डॉ. मोहन भागवत

नि:स्वार्थ भावनेतून लोककल्याणाच्या प्रेरणेने माधव नेत्रालय अव्याहतपणे कार्यरत असून दृष्टीबाधितांना जीवनदृष्टी देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले. चैत्र प्रतिपदेचा दिवस आणि माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमीपूजन हा एक शुभ योग असल्याचे सांगत शुभ योगासाठी तप:श्चर्येची आवश्यकता असते.  तप:श्चर्येतून पुण्य लाभते व पुण्यातून फळ मिळते या मागची प्रेरणा लोककल्याण आहे. चांगल्या कर्मातून प्राप्त फळाचा उपयोग विश्व कल्याणासाठी करण्याची प्रत्येक माणसाची भूमिका असल्यास सर्वांचे जीवन निरामय होईल, असे ते म्हणाले.

‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या माधव नेत्रालयाचा आतापर्यंतचा प्रवास दर्शविणाऱ्या स्मरणिकेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. माधव नेत्रालयाचे सचिव डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शांतीमंत्राने कार्यक्रमांची सांगता झाली.

यावेळी महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष शेलार, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माधव नेत्रालयाविषयी…

द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपुरात माधव नेत्रालयाची स्थापना १९९५  मध्ये झाली. वासुदेवनगर येथील माधव नेत्रालय सिटी सेंटर २०१८ पासून सेवेत आहे. या नेत्र चिकित्सालयातून आधुनिक तंत्रज्ञानाने गरीब रुग्णांवर कमी खर्चात उपचार होतात.

अशी असेल नवीन वास्तू

माधव नेत्रालयाची नवीन वास्तू हिंगणा रोडजवळील वासुदेवनगर येथे ५.८३ एकर जागेत बांधण्यात येणार आहे. येथे आधुनिक उपकरणांनी सुसज्ज २५० खाटा, १४ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि १४ अत्याधुनिक शस्त्रक्रिया केंद्र, नेत्रपेढी, संशोधन केंद्र असेल. सर्वत्र हिरवळ, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा अशी व्यवस्था या परिसरात राहणार आहे.

०००

ताज्या बातम्या

ग्रामपंचातींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे – ग्रामविकास मंत्री

0
पुणे, दि. २१:महाआवास व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता हे दोन्ही अभियान ग्रामविकासासाठी महत्त्वाची आहेत. स्वच्छ, सुंदर व प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी ग्रामपंचायतीनी महत्त्वाची भूमिका निभवावी व...

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि.२१ : महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले. त्यानंतर राज्याला हा बहुमान मिळाला नसून यासाठी प्रयत्न व्हावा, अशा अपेक्षा...

पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार – मंत्री प्रकाश आबिटकर

0
पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार कोल्हापूर दि.21 (जिमाका): लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व...

‘ईएसआयसी’ रुग्णालयात रुग्णसेवेच्या गुणवत्तेत वाढ करा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज ताराबाई पार्क येथील राज्य कामगार विमा महामंडळाच्या...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

0
पुणे, दि. २१: राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ठळक लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती देणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत आयोजित 'संवादवारी'या चित्र प्रदर्शनाचे, एलइडी व्हॅन...