मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 217

कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहकार्यावर आधारित दिव्यांग कल्याणाचे धोरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील १०० दिवसांमध्ये दिव्यांग कल्याण विभागाने करावयाच्या कामांचा घेतला आढावा

मुंबई, दि. 27 : दिव्यांग आपल्या शारीरिक व्यंगामुळे समाजात अनेक वेळा हीनतेच्या भावनेचा अनुभव घेत असतो. दिव्यांगाना सर्वतोपरी मदत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन वेळोवेळी निर्णय घेते आहे. दिव्यांग कल्याणासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर सहकार्य करण्यास इच्छुक असतात. त्यांच्या मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणासाठी पुरेपूर उपयोग व्हावा याकरिता कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहकार्यावर आधारित धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग कल्याण विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दिव्यांग विभागाअंतर्गत असलेल्या अनुदानित विशेष शाळा व कार्यशाळा यामध्ये आधार कार्डसाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. अनुदानित विशेष शाळा, कार्यशाळांमध्ये विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी आधार संलग्न बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करावी. विविध शासकीय योजनांचा दिव्यांगांना लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (UDID कार्ड) अत्यावश्यक आहे. या ओळखपत्राचे वाटप करण्यासाठी राज्यात विशेष मोहिमेचे आयोजन करावे.

शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजना व दिव्यांग व्यक्ती विवाह योजना डिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. नमो दिव्यांग शक्ती अभियान योजनेअंतर्गत उर्वरित जिल्ह्यांमध्ये दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्र तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

बैठकीत दिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून विभागाचा आराखडा सादर केला. तसेच येत्या शंभर दिवसात विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांची सविस्तर माहिती दिली.

बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,  मुख्य सचिव सुजाता सौनिक, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील १०० दिवसांमध्ये दुग्ध व्यवसाय विकास विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा

मुंबई, दि. २७  : दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास हानीकारक असल्याने दूध भेसळीस आळा घालण्यासाठीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, दुधातील भेसळीचा दूध उत्पादक आणि डेअरी यांनाही  फटका बसतो. भेसळयुक्त दुधाच्या पुरवठ्यामुळे दूध उत्पादकांना कमी दर मिळतो. राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थात होणाऱ्या भेसळीवर समन्वयाने प्रतिबंधत्मक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दुग्धव्यवसाय विकास विभाग यांच्यामार्फत संयुक्तरित्या मोहिमा राबविण्यात येतील. तसेच दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. सी. एस. आर. च्या माध्यमातून दूध उत्पादकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ राज्यात चांगले काम करत आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यातील दुधाची उपलब्धता वाढवण्यावर भर द्यावा. विदर्भामध्ये दूध उत्पादनात वाढ झाली आहे. आणखी वाढीसाठी काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

यावेळी दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून विभागाचा तसेच येत्या शंभर दिवसात विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा मांडला.

बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,  मुख्य सचिव सुजाता सौनिक, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

नदी प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक पाणी तपासणी यंत्रणा उभारावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २७ – राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्याने (रिअल टाईन मॉनिटिरिंग) करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात यावी. छोट्या छोट्या स्त्रोतांचे प्रदूषण कमी होण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती अभियान राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,  मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील १०० पाणथळ जागांचे सर्वेक्षण करून त्याचे नकाशे व ब्रीफ डॉक्युमेंटशन करण्यात यावे. राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत २५ नवीन तलाव संवर्धन प्रस्तावांना मान्यता देण्यात यावी. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नमामि गोदावरी, नमानी चंद्रभागा  अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात तसेच नमामी पंचगंगा कार्यक्रम राबविण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करावा.

पर्यावरणविषयक तक्रारी, त्यावरील कार्यवाहीसंदर्भात महापर्यावरण अॅप तयार करण्यात यावे. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र प्रदूषण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, कामे, परवाने यासंदर्भात डाटाबेस तयार करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

केंद्र शासनाने परिचित समुद्र किनाऱ्यांच्या निल ध्वज (ब्लू फ्लॅग) प्रमाणीकरणाचा महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. ब्ल्यू फ्लॅग हे जागतिक इको लेबल प्रमाणन मानांकन आहे. त्यामुळे या योजनेत राज्यातील पाच समुद्र किनाऱ्यांचा समावेश करण्यात यावे. यामध्ये सिंधुदुर्ग येथील मेढा-निवती, रायगडमधील काशिद, पालघरमधील डहाणू, रत्नागिरीतील गुहागर आदींचा समावेश करून त्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

माझी वसुंधरा अभियानातील कामांचे मूल्यांकन व परिक्षण करणे, सीआरझेड अधिसूचनेअंतर्गत नवीन किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा नकाशे अंतिम करणे, पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी विभागीय स्तरावर स्थानिक तज्ञांचा समावेश असलेली पर्यावरण रिसोर्स सेल तयार करणे हरित कार्यक्रमास मंजुरी घेणे आदी विषयी शंभर दिवस आराखड्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी यावेळी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २७ : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पशुसंवर्धन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी यांनी सादरीकरण केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पाळीव प्राणी जखमी झाल्यास अथवा त्यांच्या आजारपणात उपचारासाठी पशुसंवर्धन विभागाकडे तज्ज्ञ उपलब्ध असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यासाठी रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. तसेच पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळाची रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करावी. पशुसंवर्धन व्यवसायाला कृषि व्यवसायाचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गायी पैदासीसाठी स्वतःची यंत्रणा उभारावी. तसेच गायी पैदासीसाठी शेतकऱ्यांचा सहभाग घ्यावा. तसेच चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा व्यवस्थापन करावे. चारा उत्पादनासाठी जमीनींची उपलब्ध करून घेऊन उत्पादन वाढवावे. विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविताना इतर विभागांचेही सहाय्य घेण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केल्या.

शेळ्यांमधील देवी/लंपी चर्मरोग प्रतिबंधक लस निर्मिती लवकर करण्यात यावी. राष्ट्रीय संदर्भ लस चाचणी प्रयोगशाळा लवकर कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे. लाळ खुरकत व पीपीआर प्रतिबंध लसीकरण मोहीम राबवावी. बर्ड-फ्ल्यूसारखे रोग पसरू नयेत, यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

पशुप्रजनन धोरणात कालानुरुप बदल करणे आवश्यक असून त्यानुसार नवीन धोरण निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच पशुपालन व्यवसायात लोकसहभाग वाढविण्यासाठी पशुवैद्यकीय संस्था पातळीवर अभियान राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी यावेळी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

राज्यातील तिसरे दिव्याशा केंद्र बुलढाण्यात; दिव्याशा केंद्र दिव्यांगासाठी पर्वणी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

बुलढाणा,दि.27 (जिमाका) : दिव्यांगांना आवश्यक असलेल्या उपकरण, साहित्यासाठी मुंबई, नागपूर अशा ठिकाणी जावे लागत असे. आता दिव्यांगाना आवश्यक साहित्य दिव्याशा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार असून दिव्याशा केंद्र हे दिव्यांगांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचा लोकार्पण सोहळा धाड रोड स्थित असलेल्या अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमचे उपव्यवस्थापक के.डी. गोते, दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्थाचे अध्यक्ष जयसिंग जयवार, संस्थेचे विश्वस्त गजानन कुलकर्णी, ओमसिंग राजपूत, देशोन्नतीचे सहसंपादक राजेंद्र काळे आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत दिव्यांगाना आवश्यक असलेले उपकरणे, साहित्य सहज आणि कमी वेळेत मोफत उपलब्ध व्हावेत यासाठी प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र बुलढाणा येथे सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील दिव्यांगांना लाभ होणार आहे. या केंद्रामुळे दिव्यांगांना साहित्य मिळविण्यासाठी होणारा त्रास कमी होणार असून त्यांची क्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणेच त्यांनाही सन्मानाने जगणे सोपे होणार आहे. दिव्यांगाना जास्तीत जास्त सोईसुविधा, साहित्य वाटप व आरोग्याच्या मुलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मुंबई, नागपूर नंतर राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे व देशातील 67 वे केंद्र बुलढाणा जिल्ह्यात सुरू झाले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. दिव्यांगाप्रमाणे दारिद्र रेषेखालील वयोवृद्ध नागरिकांनाही त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य या केंद्रातून देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व वयोवृद्धावर आधुनिक पद्धतीने उपचार करुन आवश्यक साहित्य कमी वेळेमध्ये उपलब्ध होतील. जिल्ह्यातील गरजू दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांनी दिव्याशा केंद्रात भेट देवून लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 47 दिव्यांगांना 3 लक्ष 51 हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये व्हील चेअर, श्रवण यंत्र, ट्र्राय साईकल, कुबड्या, अंधकाठी अशा विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एलिम्कोचे उपव्यवस्थापक के.डी. गोते यांनी तर संचालन रमेश आराख यांनी केले.

0000000

पुढील वर्षासाठीच्या ८२० कोटींच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता – पालकमंत्री शंभूराजे देसाई

सातारा दि.27 (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन 2025-26 साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत 712.35 कोटींचा, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत 106 .28 कोटींचा व आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रम अंतर्गत 2.08 कोटींचा अशा एकूण 820.71 कोटींचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असून या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये सन 2025-26 साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत शासनाने ठरवून दिलेली वित्तीय मर्यादा 486 कोटी 25 लाखाची असून यामध्ये जिल्हास्तरावरील विविध विकास योजनांसाठी 226.10 कोटी वाढीव निधीची मागणी असा एकूण 712.35 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, खासदार नितीन पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, दूरदृष्य प्रणालीद्वारे खासदार र्धर्यशील मोहिते पाटील, सर्वश्री आमदार शशिकांत शिंदे, जयंत आसगावकर, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सन 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रम) अंतर्गत एकूण 671 कोटी 63 लाख 58 हजार तरतूद अर्थसंकल्पित झाली असून बीडीएसवर प्राप्त तरतुद 262 कोटी 43 हजार आहे. तसेच सन 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रम) अंतर्गत 648 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता झालेल्या असून प्राप्त निधी पैकी 204 कोटी 92 लाखांचा निधी खर्च झाला आहे. प्राप्त तरतुदीच्या तुलनेत 31 डिसेंबर 2024 अखेर 78.21 टक्के निधी खर्च झाला आहे.
सातारा जिल्हा हा प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये तसेच खर्चामध्ये राज्यात अग्रेसर आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले. सन 2025-26 साठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी शासनाने वित्तीय मर्यादा 486 कोटी 25 लाखाची असून राज्य समितीकडे केलेली मागणी 226.10 कोटीची आहे. पुढील वर्षासाठी अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 95 कोटी वित्तीय मर्यादा असून 11.28 कोटींची वाढीव मागणी आहे. तर आदिवासी बाह्य क्षेत्र कार्यक्रमासाठी 1 कोटी 63 लाखाची वित्तीय मर्यादा असून 44.40 लाखांची वाढीव मागणी आहे. एकूण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 237 कोटी 83 लाखांची वाढीव मागणी राज्यस्तरीय समितीकडे करण्यात येणार आहे. हा वाढीव निधी मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय व लोकप्रतिनिधीसह दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय बैठकीमध्ये प्रयत्न करणार आहे. सन 2024-25 साठी सर्व मंजूर निधी 100 टक्के खर्च होईल व त्यातून होणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असतील याची सर्वतोपरी खबरदारी घ्यावी. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 176 कोटी 86 लाख, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत 27 कोटी 82 लाख तर आदिवासी क्षेत्र बाह्य कार्यक्रमांतर्गत 23 लाख 76 हजार रुपये निधी आत्तापर्यंत खर्च झाले आहे. उर्वरित सर्व निधी विहित मुदतीत खर्च होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.देसाई यांनी दिले आहेत. या बैठकीत महावितरण कंपनीने निधी उपलब्ध नाही या कारणास्तव मंजूर कामे चालू करण्याचे थांबवू नयेत, मंजूर निधी टप्याटप्याने येत राहील. शेती पंपासाठी विद्युत पुरवठ्याची कामे गतीने पूर्ण करावीत. जल जीवन मिशन अंतर्गत आराखडा मधील कामांच्या 15 टक्के वाढीव रकमेच्या कामांना शासनाची मान्यता घेणे तसेच 15 टक्के पेक्षा जास्त रक्कम लागणाऱ्या कामांच्या मान्यतेसाठी मा. पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे बैठक घेणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत व विविध योजनांच्या निधी उपलब्ध करुन कामे मार्गी लावावीत, असे सूचित करण्यात आले. तसेच या या बैठकीत कराड उपजिल्हा रुग्णालयाची सुधारणा करणे, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, रहिमतपूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करणे अशा मा. आमदार महोदयानी उपस्थित केलेल्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ च्या ७२९ कोटी ८७ लक्ष प्रारूप आराखड्यास मंजुरी

▪️ जिल्हा नियोजन समिती बैठकित पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी उत्कृष्ट काम केल्या बद्दल अभिनंदन ठराव पास

▪️ जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांना गटारी बांधण्यासाठीचा निधी प्रस्ताव शासनाकडे सादर करणार

▪️ शहीद जवानांच्या स्मारकांसाठी निधी मिळावा; शासनाकडे मागणीचा ठराव

जळगाव, दि. 27 (जिमाका) – जिल्हा वार्षिक योजना 2025-26 साठी 729 कोटी 87 लक्ष एवढ्या प्रारूप आराखड्यास आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यावर फुटपाथसह गटारी बांधणे गरजेचे आहे. जेणेकरून रस्ते खराब होणार नाहीत, त्यासाठी शासनाकडे पाठविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. बैठकीत विशेषतः शहीद जवानांसाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे मागणी करण्याचा ठरावही यावेळी संमत करण्यात आला.

आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी निधी नियोजन, त्याची अंमलबजावणी यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल खासदार, आमदार यांच्याकडून अभिनंदन ठराव पास करण्यात आला.

या बैठकीस खासदार स्मिता वाघ, आमदार एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश (मामा) भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण,आमदार अमोल जावळे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रारूप आराखड्यात असलेल्या बाबी

साल 2025-26 साठी जिल्ह्यासाठी एकूण 729 कोटी 87 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये:सर्वसाधारण योजना 574.59 कोटी रुपये, विशेष घटक योजना (अनु. जाती)93 कोटी रुपये, आदिवासी उपयोजना 62.28 कोटी रुपये असा जिल्ह्याचा प्रारूप आराखडा करण्यात आला आहे. जिल्हा नियोजनच्या निधीतून निधीतून जिल्हा विकास आराखड्यासाठी 25 टक्के निधी द्यायचा असून ती रक्कम 145 कोटी एवढी आहे.त्याबाबत चर्चा करण्यात आली असून आराखड्यानुसार निधीस मंजुरी देण्यात आली.

शहीद जवानांच्या स्मारकांसाठी निधी मागणी मागील बैठकीत जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागात शहीद जवानांसाठी प्रत्येकी 25-30 लाख निधी मंजूर करण्याबाबत विषय मांडण्यात आला होता. मात्र, जिल्हा नियोजन अंतर्गत स्मारकांसाठी योजना बंद असल्याने त्यावर खर्च करणे शक्य नव्हते. यामुळे विशेष बाब म्हणून शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला आहे.

या प्रारूप आराखड्यातील प्रमुख कामे व उद्दिष्टे

शासकीय कार्यालयांचे आधुनिकीकरण:
महसूल विभागाची कार्यालये आणि जिल्हा परिषद कार्यालये आधुनिक व लोकाभिमुख बनविणे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवून गुड गव्हर्नन्स अंतर्गत जलद व सक्षम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रकल्पांना गती. शेतकऱ्यांना विनाअडथळा वीज उपलब्ध व्हावी म्हणून ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी 30 कोटी रुपये निधीची तरदूत यात केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची तरदूत यात करण्यात आली आहे. 100% अंगणवाडी बांधकामे पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतीला कार्यालय नाही तिथे ग्रामपंचायत कार्यालये आणि स्मशानभूमी बांधकामासाठी आग्रक्रमाने निधी दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील तीर्थस्थळ व पर्यटनस्थळ विकासात ‘क’ वर्ग तीर्थस्थळे आणि अन्य पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी निधी दिला जाणार आहे. तसेच शहर क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात रस्ते, गटारी व वीजसाठी वाढीव तरतूद करण्यात आली आहे. युवक आणि विद्यार्थी विकासासाठी व्यायामशाळांचे बांधकाम व साहित्य उपलब्ध करून देणे तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, अभ्यासिका बांधकाम व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक शिबिरे घेण्यासाठीच्या निधीची तरदूत यात असेल.

वीजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याच्या कामाचा यात समावेश असणार आहे. खासदार आणि आमदार यांच्याकडून आलेल्या मागणीनुसार राज्यस्तरीय बैठकीत ग्रामीण भागातील गावांतील जनसुविधांसाठी 100 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली जाईल असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खा. स्मिता वाघ,आमदार एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश (मामा) भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण,आमदार अमोल जावळे, आमदार अमोल पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या समोर विविध विकास कामाच्या संदर्भातील विषय मांडले. बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्या त्या विभाग प्रमुखांना खासदार, आमदार यांच्याकडून उपस्थिती केलेल्या मुद्दाबाबत गांभिर्याने दखल घेण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या समोर प्रारूप आराखड्याचे सादरीकरण केले. या बैठकीत 25 जुलै 2023 रोजी नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. 2025- 2026 च्या प्रारूप आराखड्यास मंजूरी देण्यात आली.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘कॅप्टीव्ह मार्केट’ योजनेअंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी योजनेचा शुभारंभ

राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणार कॅप्टीव्ह मार्केट योजनेचा लाभ

जळगाव दि. 27,( जिमाका ) कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ येथील तापी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आज 27 जानेवारी रोजी संपन्न झाला.

याप्रसंगी तालुक्यातील 10 अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलाना प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते साडी वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिकाधारक यांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार असल्याचे मंत्री सावकारे यांनी सांगितले.

सहकारी यंत्रमाग संस्था व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग अंतर्गत नोंदणीकृत घटकाकडून साड्यांचे उत्पादन करण्यात आले असून त्यामुळे विणकरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. वस्त्रोद्योग मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागाचा पहिला कार्यक्रम भुसावळ येथे संपन्न होत असून लाडक्या बहिणींना साडी वितरण करताना आपल्याला आनंद होत असल्याची भावना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की, जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. त्यामुळे कापूस संबंधी प्रक्रिया उद्योग या संबंधित विभागाचे मंत्रीपद हे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे असल्याने जळगाव व भुसावळ येथे संबंधित उद्योगाच्या वाढीस नक्कीच चालना मिळणार आहे. वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, त्यात त्यांनी उपस्थिताना कॅप्टीव्ह मार्केट योजनेबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री खाजगी सचिव प्रल्हाद रोडे, भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील , भुसावळ तहसीलदार नीता लबडे ई मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती बडगुजर यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील दिव्यांग, विधवा महिला, परितक्ता महिला यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देऊन मान्यवरांचे हस्ते ई- शिधापत्रिकांची वितरण करण्यात आले.

वसतिगृह, आश्रमशाळांची वारंवार भेटी देऊन तपासणी करावी – मंत्री अतुल सावे

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मंत्री अतुल सावे यांनी घेतला आढावा

पुणे, दि. २७ : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या घटकांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विविध ५४ कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून वसतिगृह व आश्रमशाळा योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची वारंवार भेटी देऊन तपासणी करावी, अशा सूचना मंत्री अतुल सावे यांनी दिल्या.

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरित कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित विभागाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महाज्योतीचे महासंचालक राजेश खवले, उपसचिव कैलास साळुंखे, सहसंचालक संतोष हराळे, प्रशांत शिर्के आदी उपस्थित होते.

मंत्री श्री सावे म्हणाले, राज्यात सन २०१७ मध्ये सामाजिक न्याय विभागातून नव्याने इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्थापना झाली. मागील अडीच वर्षात इतर मागास बहूजन समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. १०० विद्यार्थी क्षमतेचे मुला-मुलींसाठी ५६ वसतीगृह २६ जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहेत. वसतिगृहात प्रवेश देताना जातप्रमाणपत्र पडताळणी करुनच प्रवेश देण्यात यावा. बोगस प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा दाखल करावा असे सांगून ते म्हणाले या विभागांतर्गत योजना राबविण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. परंतु शासनाच्या निधीचा योग्य विनियोग होईल याची सर्व अधिकाऱ्यांनी गंभीरपणे दखल घ्यावी. व विद्यार्थ्यांच्या तक्रारी येणार नाहीत यासाठी सर्व सोई उपलब्ध असल्याची वसतीगृह व आश्रमशाळांना भेटी देऊन खात्री करावी.

ते म्हणाले, ज्या जिल्ह्यात अद्याप वसतिगृहासाठी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी जागा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत त्या जिल्ह्यांनी तातडीने जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करावेत, विद्यार्थ्यांना भोजन भत्ता तसेच साहित्य पुरवठा प्राधान्याने करावा, वसतीगृह अनुदानाबाबत पाठपुरावा करावा असे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री सावे यांनी मॅट्रिकोत्तर योजना, मॅट्रिकपूर्व योजना, परदेश शिष्यवृत्ती योजना, स्वयंम व आधार योजना, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेश, वसतिगृह योजना, आश्रमशाळा योजना, कै. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, कै. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, घरकुल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, निपुण भारत योजनेंतर्गत विभाग व जिल्हा निहाय नोंदणी तसेच विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला.

प्रास्ताविकात श्री. खिलारी यांनी विविध योजना व त्याअंतर्गत खर्चाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या वतीने संचालनालय स्तरावर आश्रमशाळा संहितेमध्ये सुधारणा करण्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

बैठकीला पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नाशिक व लातूर प्रादेशिक उपसंचालक तसेच सहायक संचालक उपस्थित होते.
0000

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरित कार्यालयाचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. २७ : इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार उमा खापरे, आमदार बापूसाहेब पठारे, विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महाज्योतीचे महासंचालक राजेश खवले, उपसचिव कैलास साळुंखे, सहसंचालक संतोष हराळे, प्रशांत शिर्के आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले, कामाचे ठिकाण प्रशस्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाचा उत्साह वाढेल. कार्यालयास पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून विभागाने अधिक कार्यक्षमपणे व पारदर्शकपणे काम करावे. पेपरलेस कामकाजाला प्राधान्य द्यावे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना तालुकास्तरापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री. सावे यांनी कार्यालयातील दालनांची यावेळी पाहणी केली.

यावेळी पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नाशिक व लातूर प्रादेशिक उपसंचालक, सहसंचालक, सहायक संचालक तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे....

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
धुळे, दि. २८ (जिमाका):  महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राबविण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम...

उद्योगांसाठी रावेर येथील २ हजार एकर जमीन उपलब्ध करुन देणार -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
उद्योगांना सोईसुविधा व सवलती देण्यासाठी शासन कटिबद्ध गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर परिषदेमध्ये 8436 कोटींचे गुंतवणूक करार, 11506 रोजगार उपलब्ध होणार रोजगार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

0
नांदेड दि. २८ :  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

परोटी तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

0
नांदेड दि. २८: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),...