सोमवार, जून 16, 2025
Home Blog Page 28

राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार; घरकुलांसाठी ग्रामीण भागात ८० हजार कोटींची गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नव्याने सर्वेक्षण करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुल देणार – केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान

पुणे, दि. 3 : केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी 30 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले असून राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्यात येईल, या माध्यमातून ग्रामीण भागात 80 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ग्रामविकास व पंचायत राज व राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण- गृहनिर्माण विभागाच्यावतीने श्री छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा व  महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  बोलत होते. यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्र.विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सहसचिव गया प्रसाद, राजाराम दिघे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

विक्रमी संख्येने महाराष्ट्रासाठी घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केल्याने केंद्रीय मंत्री श्री.चौहान यांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, २०११ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात बेघर असलेल्यांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. राज्याचे उद्दिष्ट अत्यंत कमी होते. २०१७ मध्ये हे उद्दिष्ट पुरेसे नसल्याने अधिक उद्दीष्ट मंजूर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यानंतर आलेल्या आवास प्लस योजनेत नोंदणीची सुविधा केंद्राने दिल्याने ३० लाख बेघराची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्याची घरे पूर्ण करीत असतांना केंद्राने २० लाख घरकुलांना मंजुरी दिली. त्यापैकी १० लाख घरांचा पहिला हप्ता ग्रामविकास विभागाने जमा केले आहे. आता नव्याने १० लाख घरकुलांचे पत्र मिळाल्याने जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी घरकुलाशिवाय राहणार नाही. शिवाय अजून कुणी सुटले असल्यास नव्याने सर्वेक्षण करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय

घराची मुलभूत गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्धार केला असून राज्य शासनाने घरकुलासाठी ५० हजार रुपये अधिक देण्याचा निर्णय घेतला. दीनदयाल उपाध्याय घर खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या घराला सोलर पॅनल लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरासोबत इतर मुलभूत सुविधा गरीब माणसाला देण्यासाठी वेगाने काम करण्यात येत आहे. घरकुलांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभाग अत्यंत वेगाने काम करीत आहे. बेघरमुक्त महाराष्ट्राची संकल्पना राबविण्याचे प्रयत्न होत आहे. जागेची कमतरता असतांना दुमजली घरे, गृहसंकुलासारख्या संकल्पना राबवून ती समस्या दूर करण्यात आली. गायरान जमिनी देण्याचा निर्णय घेण्यात आला, गावठाणाची हद्दवाढ करीत जमिनीचे पट्टे देऊन घरकुलाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व प्रकारच्या योजना राबवून नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यायचा आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर शासनाचा भर

‘लखपती दिदी’ योजनेच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती होत आहे. राज्यातही यादृष्टीने प्रयत्न होत असून मागील वर्षी २६ लाख ‘लखपती दिदी’ झाल्या असून यावर्षी 25 लाख महिला लखपती दीदी होतील. अशा एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. आमच्या बहिणी याद्वारे सक्षम होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे कार्य करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यासाठी ग्रामविकास विभागाच्या मागे राज्य शासन खंबिरपणे उभे आहे, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या नावाने घर देण्यात यावे, असे आवाहनही श्री.फडणवीस यांनी केले.

प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुल देणार – केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

आजचा क्षण अभिमानास्पद आणि ऐतिहासिक असल्याचे नमूद करून केंद्रीय मंत्री श्री.चौहान म्हणाले, राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी केलेला संकल्प आज पूर्ण होत आहे. आज १० लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केल्यानंतर एकही गरीब घरावाचून वंचित राहणार नाही. या घरकुलांच्या माध्यमातून गरिबांना केवळ घर मिळणार नाही, २० लाख घरांच्या माध्यमातून होणाऱ्या ६५ हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अद्यापही २०१८ च्या यादीतून नाव सुटलेल्यांना घरे देण्यासाठी सर्वेक्षण करावे, नव्या सर्वेक्षणानंतर प्रत्येक बेघर माणसाला घर देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

घरकुल हा प्रत्येकाचा मुलभूत हक्क आहे. त्यामुळे घरकुल मंजूर करण्यासाठी असलेल्या अटी कमी करण्यात आल्या आहेत. आता दुचाकी असलेल्या, अडीच एकर बागायती किंवा ५ एकर जिरायती शेतजमीन असलेल्यांना किंवा १५ हजार रुपये मासिक उत्पन्न असलेल्यांनाही नव्या सर्वेक्षणात घरकुल मंजूर करण्यात येईल. महिलांनाही सन्मानाने जगता यावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे अर्ध्या लोकसंख्येला न्याय मिळाला असून या महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे कामही करायचे आहे. या महिलांना उद्योगाशी जोडून समृद्ध करण्याचे कार्य करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

विकसीत भारतासाठी विकसीत शेती आणि समृद्ध शेतकरी उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र सरकार काम करीत असून ग्रामीण भागात कृषी वैज्ञानिक मार्गदर्शन करण्यासाठी  येणार आहेत. या विकसीत कृषी संकल्प अभियानात शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.चौहान यांनी केले.

हक्काच्या घरामुळे गरिबांना स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचा आधार मिळाला – उपमुख्यमंत्री अजित  पवार

ग्रामविकास विभागाचा हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादीत नूसन आपल्या ग्रामविकास क्षेत्रात सामुहीक यश आणि प्रयत्नांचा उत्सव असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आपले घर ही फक्त वास्तू नसून स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचा आधार असतो, हा आधार राज्यातील लाखो नागरिकांना मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत यावर्षी देखील लाखो नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे. देशात 3 कोटी नागरिकांना घर देण्याचे उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. महाआवस अभियान राज्य शासनाचे अभिनव पाऊल होते. यात घरासोबत वीज, शुद्ध पाणी, रस्ता, गॅस जोडणी, स्वच्छता गृह आणि मनरेगा अंतर्गत रोजगार आदी मिळत असल्याने घर समृद्ध आणि राहण्याजोगे बनले आहे.

महाराष्ट्राला केंद्र सरकारने 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट दिल्याबद्दल केंद्रीय ग्रामविकास मंत्री श्री.चौहान यांना धन्यवाद देऊन श्री.पवार पुढे म्हणाले, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी क्षमतेने काम केल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. यापुढेदेखील या प्रयत्नात सातत्य ठेवून वेगाने घरकुले उभारावे लागतील. घरकुलासाठी गायरान जमीन देण्याचा क्रांतीकारी निर्णय शासनाने घेतल्याने अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. ग्रामीण गृहनिर्माण अभियान यशस्वी करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. कष्टकरी सर्वसामान्य माणसाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

घरकुलांची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी भरीव प्रमाणत निधी उपलब्ध करून देण्यात आला असून प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अटल बांधकाम आवास योजना, पारधी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना,  मोदी आवास योजनांसारख्या योजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या प्रकल्पांची ग्रामीण भागात वेगाने अंमलबजावणी करावी, असे आवाहन श्री.पवार यांनी केली. राज्याच्या ग्रामविकास विभागाने देशपातळीवर चांगली कामगिरी करून राज्याचा लौकिक उंचावला असून घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करून या लौकिकात भर घातली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

ग्रामविकास मंत्री श्री.गोरे म्हणाले, सर्वांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करीत असतांना गेल्या ७ वर्षात राज्याला प्रधानमंत्री आवास योजनेचे १३ लाख ५७ हजार उद्दिष्ट मिळाले होते. यावर्षी २० लाख घरांचे विक्रमी उद्दीष्ट मिळाल्याने या योजनेच्या अंमलबजावणीला गती येईल. या घरांना मंजूरी देण्याचे काम ४५ दिवसात करण्यात आले आणि मंजूरी पत्र एकाच दिवशी देण्यात आले. घर बांधत असतांना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घरकूलासाठी ५० हजाराचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला.

घर बांधण्यासाठी वाळूची अडचण दूर करण्यासाठी मोफत ५ ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूमिहीन लाभार्थ्याला घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून गायरान, गावठाण जमीन उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पं.दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य  योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी १ लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५० हजाराहून अधिक घरे पूर्ण केली असून पुढील वर्षभरात सर्व २० लाख घरे उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या वर्षभरात ५० लाख ‘लखपती दिदी’ करण्यात येतील, असेही श्री.गोरे म्हणाले.

यावेळी ‘अमृत ग्राम महा आवास अभियान-महाराष्ट्राची गौरवगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत पुरस्कार विजेत्यांची यशोगाथा देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच प्रतिनिधीक स्वरूपात महा आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांच्या चावीचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० लाख घरांचे उद्दीष्ट पत्र सुपूर्द करण्यात आले.

पुरस्कार प्राप्त विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतींची यादी

अमृत महाआवास अभियान २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट कार्य करणारे विभाग, जिल्हे, तालुके, ग्रामपंचायतींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

कोकण विभाग प्रथम, नाशिक विभाग द्वितीय तर नागपूर विभाग तृतीय

राज्य पुरस्कृत आवास योजना

नाशिक विभाग प्रथम, कोंकण विभाग द्वितीय तर  पुणे विभाग तृतीय.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

अहिल्यानगर जिल्हा प्रथम, सिंधुदुर्ग जिल्हा द्वितीय, गोंदिया जिल्हा तृतीय.

 राज्य पुरस्कृत आवास योजना

अहिल्यानगर जिल्हा प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय, सातारा जिल्हा तृतीय.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका प्रथम, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड द्वितीय, सातारा जिल्ह्यातील  जवळी तालुका तृतीय.

राज्य पुरस्कृत आवास योजना

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुका प्रथम,  गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी  द्वितीय, अमरावती जिल्ह्यातील  अंजनगाव सुर्जी  तालुका तृतीय.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

सातारा जिल्ह्यातील येळगाव ता.कराड  ग्रामपंचायत प्रथम, सातारा जिल्ह्यातील भुडकेवडी ता.पाटण द्वितीय तर वाशीम जिल्ह्यातील चोंढी ता.मानोरा तृतीय.

राज्य पुरस्कृत आवास योजना

सातारा जिल्ह्यातील बोंद्रे ग्रामपंचायत ता. पाटण प्रथम, वाशीम जिल्ह्यातील कारखेडा ता. मानोरा द्वितीय, रत्नागिरी जिल्ह्यातील कुळवंडी ता.खेड ग्रामपंचायत तृतीय.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारतीसाठी जळगाव जिल्ह्यातील हनुमंत खेडे ग्रामपंचायत ता.धरणगाव  प्रथम,  भंडारा जिल्ह्यातील भोसा (टाकळी) ता.मोहाडी  द्वितीय तर  वाशीम जिल्ह्यातील मोहगव्हान ग्रामपंचायत ता. मानोरा तृतीय.

राज्य पुरस्कृत आवास योजना

सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारतीसाठी नाशिक जिल्ह्यातील अंतापूर ग्रामपंचायत ता. बागलाण  प्रथम, परभणी जिल्ह्यातील डोंगरजवळा ग्रामपंचायत ता.गंगाखेड द्वितीय, पुणे जिल्ह्यातील शिंद ग्रामपंचायत ता.भोर तृतीय.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

सर्वोत्कृष्ट गृहसंकुलासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील  वांगदरी ग्रामपंचायत ता.श्रीगोंदा प्रथम, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील  गणोरी ता. फुलंब्री द्वितीय,सोलापूर जिल्ह्यातील  लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायत ता. मंगळवेढा तृतीय.

राज्य पुरस्कृत आवास योजना

सर्वोत्कृष्ट गृहसंकुलासाठी अहिल्यानागर जिल्ह्यातील नांदगाव ग्रामपंचायत ता. अहिल्यानगर प्रथम, पुणे जिल्ह्यातील कुशेर बु. ता.आंबेगाव द्वितीय, चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत ता. राजुरा तृतीय.

००००

बेलारूस महाराष्ट्रासोबत प्रादेशिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक – अलियाक्सांड्र मात्सुकोऊ

मुंबई, दि. ३ : रशिया, युक्रेन व पोलंड हे शेजारी असलेला बेलारूस महाराष्ट्रासोबत प्रादेशिक स्तरावर सहकार्य वाढविण्याबाबत उत्सुक असून भारतासोबत डम्प ट्रक निर्यात, संरक्षण उत्पादन, शिक्षण, कृषी  व फलोत्पादन, वस्त्रोद्योग, पर्यटन, चित्रपट निर्मिती व संस्कृती यांसह इतर क्षेत्रात संबंध प्रस्थापित करण्याबाबत प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन बेलारूस प्रजासत्ताकाचे मुंबईतील वाणिज्यदूत अलियाक्सांड्र मात्सुकोऊ यांनी केले.

बेलारूसच्या वाणिज्यदूतांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

अनेक युरोपिअन संघ देशांचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर सध्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. मात्र अनेक निर्बंध असून देखील बेलारुसचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर ४ टक्के आहे तर भारताचा हा दर  ६.४ टक्के इतका आहे असे त्यांनी सांगितले.

बेलारूस औद्योगिक उत्पादनात आघाडीवर असून डम्प ट्रक निर्यात, संरक्षण सामग्री व मशिनरी उत्पादन उद्योगात पुढे असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्न प्रक्रिया, दूध व चीज उत्पादन क्षेत्रात देखील बेलारूस आघाडीवर असून या क्षेत्रात सहकार्य करार व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. खडक, दगड फोडण्याच्या मशीन उत्पादनात देखील बेलारूस आघाडीवर असून या मशिन्सचा उपयोग बांधकाम क्षेत्रात वाळू निर्मितीसाठी होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

मुंबईच्या निम्म्याहून कमी लोकसंख्या असलेल्या बेलारूसमध्ये साक्षरता ९९ टक्क्यांहून अधिक आहे तसेच वैद्यकीय शिक्षण व अभियांत्रिकी शिक्षणात बेलारूस प्रगत असून उच्च शिक्षण क्षेत्रात राज्याशी सहकार्य वाढविण्यास आपला देश उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.  बेलारूस येथे एक हजाराहून अधिक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय रिझर्व्ह बँक रशिया व बेलारूस येथे रुपयांमध्ये व्यापार सुकर करण्यासाठी विशेष खाते सुरु करण्याबाबत सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

बेलारूसच्या वाणिज्य दूतांचे स्वागत करताना महाराष्ट्र आणि बेलारूस प्रांतांमध्ये सहकार्य वाढविण्याबाबत संबंधितांशी चर्चा करू असे राज्यपालांनी सांगितले.  बेलारूसने मशिनरी निर्यात, फळे – भाज्यांची भारतातून आयात, शिक्षण या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी ठोस प्रस्ताव सादर करावे, असे राज्यपालांनी सांगितले.

बैठकीला बेलारुस वाणिज्य दुतावासाचे कौन्सल कॉन्स्टॅन्टीन पिन्चुक हे देखील उपस्थित होते.

००००

अंबरनाथ, कल्याण व मुरबाड तालुका क्रीडा संकुलाची कामे तातडीने पूर्ण करा – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

VIRENDRA DHURI

मुंबई, दि. ३ : अंबरनाथ, कल्याण व मुरबाड येथील तीनही तालुका क्रीडा संकुलाची उभारणी तसेच डागडुजी संदर्भात १५ दिवसांत कार्यवाही करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, नांदगाव, मनमाड येथील क्रीडा संकुलांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी मंत्री श्री. भरणे बोलत होते.

VIRENDRA DHURI

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, कल्याण क्रीडा संकुलात क्रीडा साहित्य खोली, तारेचे कुंपण, २०० मीटर धावण मार्ग तयार करण्यात यावा. मुरबाड येथे सद्यस्थितीत संकुलाच्या प्राप्त जागेवरच संकुल उभारणी करणे व अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्यात यावी. अंबरनाथ येथील तालुका क्रीडा संकुलात पावसामुळे पडझड झाली तेथील दुरूस्तीचे काम तातडीने करावे.

मनमाड येथील महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलामध्ये क्रीडा संदर्भात सर्व साहित्य पुरविण्यात यावे. इनडोअर जिम साहित्य, महिलांसाठी योगा, मेडिटेशन, हॉल बांधणे, सोलर पॅनल व त्यासंदर्भात कामे, नांदगाव येथे इनडोअर कबड्डी मॅट स्टेडियम बांधणे, संरक्षक भिंत, व्यायाम साहित्य, सोलर पॅनल पुरविण्यासंदर्भातील कामांची कार्यवाही करण्यात यावी.

सांगली येथील कवठेपिरान येथे पै.कै. हिंदकेसरी जाकार्तावीर मारूती माने स्मारक समितीच्या मागणीनुसार स्मारकास परिसरात संरक्षण भिंत उभारणे आणि पुतळ्यात योग्य त्या सुधारणा करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

यावेळी आमदार किसन कथोरे, सदाशिव खोत, सुहास कांदे, प्रभारी आयुक्त सुधीर मोरे, उपसचिव सुनिल पांढरे, उपसंचालक सुहास पाटील, माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, तहसिलदार अभिजित देशमुख, अमित पुरी, उपअभियंता संजय कोरडे, मदन हिरवे यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणाबाबत बैठक

मुंबई, दि. ३ : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणाबाबत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखील घरत, रवींद्र आंधळे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत प्रदूषण निर्माण करणाऱ्या घटकांबाबत चर्चा करण्यात आली. प्रदूषण करणाऱ्या घटकांची वर्गवारी करून त्यांच्यावर प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत सक्ती करण्यात यावी. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्तरावर अशा घटकांबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी दिल्या.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

पॅराग्वे प्रजासत्ताकचे अध्यक्ष सँटियागो पेना यांचे मुंबई येथे आगमन

मुंबई, दि. 3 : पॅराग्वे प्रजासत्ताकचे अध्यक्ष सँटियागो पेना यांचे त्यांच्या शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विशेष विमानाने आगमन  झाले.

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पॅराग्वेतील भारतीय राजदूत पियुष सिंह, प्रधान सचिव अंशु सिन्हा, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण, सचिव संजय दशपुते, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी मान्यवर उपस्थित होते.

पॅराग्वेचे अध्यक्ष यांनी शिष्टमंडळासमवेत हॉटेल ताज महल येथे प्रयाण केले. यावेळी मान्यवरांनी त्यांचे हॉटेल ताज महल येथेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

000

समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली

मुंबई, दि. 3 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात विविध आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांची सेवाकाळात एक वेळची बाब म्हणून बदली करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. यानुसार 23 ते 25 जून 2025 या कालावधीत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या करण्यात येणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील आरोग्य उपकेंद्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नेमणूक झालेले समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. गेली काही वर्ष समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांकडून विनंती बदली करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. तृतीयस्तरीय आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने एक वेळची बाब म्हणून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक निर्णय घेत सेवाकालातील एक वेळची बाब म्हणून राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची बदली धोरणास मान्यता दिली आहे.

सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या पसंतीच्या जिल्ह्यात बदलीसाठी विनंती करता येणार आहे. आंतरजिल्हा बदली संचालक-1 आरोग्य सेवा, मुंबई यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बदलीकरिता इच्छुक समुदाय आरोग्य अधिकारी यांचेकडून 12 जून 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येणार असून प्राप्त अर्जांची छाननी 13 ते 19 जून 2025 पर्यंत होणार आहे. बदली पात्र समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची यादी 20 जून 2025 रोजी आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 23 ते 25 जून 2025 या कालावधीत विनंती बदली संदर्भाने समुपदेशन आयोजित करण्यात येणार आहे. समुपदेशनानंतर बदली करण्यात आलेल्या समुदाय अधिकाऱ्यांना 07 जूलै 2025 पर्यंत रुजु होण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.

जिल्हा अंतर्गत बदली करण्याकरिता शासनामार्फत सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार बदली प्रक्रियेसंदर्भाने समिती स्थापन करण्याबाबतच्या सूचना जिल्ह्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार असून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिक लोकाभिमुख सेवा मिळणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ/

कोविडसंदर्भात नागरिकांनी घाबरू नये; काळजी घ्यावी – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन

मुंबई, दि. 3 : राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी राज्यात आयएलआय (इन्फ्लूएंझा सारखा आजार) आणि एसएआरआय (गंभीर तीव्र श्वसन संसर्ग) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. रुग्ण कोविड पॉझीटीव्ह आढळल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत.

जानेवारी 2025 पासून 12 हजार 11 रुग्णांची कोविड चाचणी केली असून त्यापैकी 873 पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून आतापर्यंत 369 रुग्ण बरे झाले आहेत. याबाबत आरोग्य आरोग्य विभागाने जाहीर केलेली माहिती :

दि.02 जून 2025 रोजी पॉझीटीव्ह रुग्ण – 59 (मुंबई-20, ठाणे-4, पुणे-1, पुणे मनपा-17, पिंपरी चिंचवड मनपा – 2, सातारा – 2, कोल्हापूर मनपा – 2, सांगली मनपा – 1, छत्रपती संभाजीनगर – 1, छत्रपती संभाजीनगर मनपा – 7, अकोला मनपा – 2)

2 जून 2025 रोजी सक्रिय असलेले रुग्ण – 494

माहे जानेवारी 2025 पासून मुंबई मधील एकूण रुग्ण संख्या – 483 (जानेवारी – 1, फेब्रुवारी 1, मार्च- 0, एप्रिल- 4, मे – 477)

निदान झालेल्या सर्व रुग्णांत सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. जानेवारी 2025 पासून आजपर्यंत सहव्याधीने ग्रस्त असलेले 9 व इतर 1 असे एकूण 10 रुग्ण दगावले आहेत. यापैकी एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम सह हायपोकॅल्सिमिक सीझर होते व दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि फिट येत होती. चौथ्या रुग्णास डायबेटिक किटोएसिडोसिस आजार होता. पाचव्या रुग्णास आयएलडी होता. सहाव्या रुग्णास डायबेटीस होता व 2014 पासून अर्धांगवायू झालेला होता. सातव्या रुग्णास सीवीअर एआरडीएस विथ डायलेटेड एओटिक रीगर्जिटेशन हा आजार होता. आठव्या रुग्णास मधुमेह आणि नवव्या रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाब होता व इतरमध्ये 47 वर्षीय महिला असून, महिलेस ताप आणि धाप लागणे ही लक्षणे होती.

कोविड रुग्णांची तुरळक वाढ फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर इतर राज्यात तसेच काही इतर देशात देखील दिसून येत आहे. फ्लूसदृश्य आजार व एसएआरआय (तीव्र श्वसन दाह असलेले रुग्ण) यांचे आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण सुरू आहे. तसेच तीव्र श्वसनदाह असलेल्या सर्व रुग्णांचे कोविड-19 या आजारासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. तसेच फ्लू-सदृश आजार असलेल्या रुग्णांपैकी 5% रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. सर्व आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेले नमुने संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एन आय व्ही, पुणे व बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे व राज्यातील इतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात.

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांचे स्तरावर कोविड 19 साथरोग संदर्भात पूर्वतयारीचा आढावा विभागीय स्तरावर घेण्यात येत असून त्यामध्ये सर्व यंत्रणेला रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, आरटीपीसीआर चाचणी, ऑक्सीजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन उपलब्धतेबाबत सर्व तयारी ठेवण्यासंदर्भात जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तथापि काळजी घ्यावी.

खोकताना व शिंकताना रूमालाचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, धाप लागणे इत्यादी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयास संपर्क साधून मोफत उपचार व आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात. अशा प्रकारची लक्षणे, इतर आजाराने व्याध‍िग्रस्त लोकांमध्ये आढळून आल्यास विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, दि. ३ : राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी १२ महिन्यासाठी देण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनीधींची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आनंदराव अडसुळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या बससेवेच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे. बसगाड्या सोबतच बसस्थानके देखील स्वच्छ असली पाहिजे. स्वच्छतागृह, विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले पाहिजे. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. बसस्थानके हे बस पोर्ट झाली पाहिजेत असे सांगत एसटी अधिक फायद्यात राहण्यासंदर्भात अभ्यास करा. एसटीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी संघटनांच्या प्रतिनीधींनी विविध मागण्या केल्या. एसटीची उत्पन्न वाढ, इंधन बचत, यावरही चर्चा झाली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर ४६ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. जून २०२५ च्या वेतनापासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर “धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही पैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये आहेत अशा कर्मचाऱ्यांना कामगिरीवर असताना- नसताना (दोन्ही प्रकरणी) अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात येत आले आहे. त्यामध्ये  वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास एक कोटी, पुर्णतः अपंगत्व आल्यास एक कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम दिली जाईल.

एसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्याचा पास देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केली. याचा लाभ सुमारे ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.

००००

‘दिलखुलास’ कार्यक्रमात रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे प्रा.जी.डी.यादव यांची ४ व ५ जून रोजी मुलाखत

मुंबई, दि. ३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात रासायनिक तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) या संस्थेचे माजी कुलगुरू प्रा. जी. डी. यादव यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. ४, आणि गुरूवार दि. ५, जून २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे, ज्येष्ठ निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

रासायनिक तंत्रज्ञान संस्था म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) ही मुंबईतील एक प्रतिष्ठित शैक्षणिक आणि संशोधन संस्था आहे. या संस्थेअंतर्गत रासायनिक अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि औषध निर्माणशास्त्रात विशेष कामकाज केले जात आहे. उद्योगांना नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादने विकसित करण्यासाठी या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना रासायनिक अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि संबंधित क्षेत्रांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. या संस्थेचे माजी कुलगुरू तसेच प्रा. जी. डी. यादव यांनी हरित रसायनशास्त्र व अभियांत्रिकी, उत्प्रेरक विज्ञान, रासायनिक अभियांत्रिकी, ऊर्जा अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी आणि स्वच्छ व हरित तंत्रज्ञानाच्या विकासात उल्लेखनीय कार्य केले आहे. याची दखल घेऊन त्यांना यावर्षी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने भटनागर फेलोशिपने सन्मानित केले आहे. त्यांनी केलेले संशोधन तसेच त्यांचा प्रवास याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रा. यादव यांनी माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

मंत्रिमंडळ निर्णय

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार

मुंबई, दि. ०३ जून : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडीत विषय वेगेवगळे आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र आयोग असणे आवश्यक आहे. तसेच ५१ व्या जनजाती सल्लागार परिषदेत महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हा आयोग स्थापन करण्यात येत आहे. या आयोगाची रचना राज्य अनुसूचित जाती आयोगाप्रमाणेच एक अध्यक्ष व चार अशासकीय सदस्य अशी राहील. आयोगाकरिता नव्याने २६ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या पदांसाठीचे तसेच आयोगाचे सदस्य यांचे वेतन, भत्ते आणि कार्यालयासाठी भाडे तत्वावर जागा, फर्निचर, वीज, दूरध्वनी, इंधन यांसह अनुषंगिक खर्चासाठी ४ कोटी २० लाख रुपयांच्या तरतुदीस बैठकीत मान्यता देण्यात आली.

दरम्यान, अनुसूचित जाती आयोग देखील स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा मिळावा यासाठी मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता दिली. त्यासाठीही आगामी काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.

००००

कामगार विमा महामंडळाला छत्रपती संभाजीनगरमधील २०० खाटांच्या रुग्णालयासाठी करोडीतील १५ एकर जमीन

महामंडळांच्या प्रस्तावित अन्य ९ रुग्णालयांना जमीन देण्यास मान्यता

छत्रपती संभाजीनगर येथे राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी १५ एकर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

यासह बिबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती(पुणे), सातारा आणि पनवेल (रायगड) येथील प्रस्तावित रूग्णालयांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर शहरातील औद्योगिक विस्तार आणि वाढत्या कामगारवर्गाच्या आरोग्य गरजांचा विचार करून कर्मचारी राज्य विमा निगमचे (ESIC) २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी मौजे करोडी येथील १५ एकर गायरान जमीन देण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

शहरातील शेंद्रा, बिडकीन, डिएमआयसी वाळूज, चिकलठाणा व रेल्वे स्टेशनसारख्या औद्योगिक वसाहतींमुळे कामगारवर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवांची आवश्यकता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, महाराष्ट्रातील अन्य नऊ ठिकाणी अशी रुग्णालये उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार विबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती (पुणे), सातारा आणि पनवेल (रायगड) येथील रुग्णालयांना आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यास बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली.

००००

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला येथील मातृदुग्धशाळेची जमीन हस्तांतरणाच्या करारनाम्यातील अटी, शर्तींमध्ये सुधारणा

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या कुर्ला येथील मातृदुग्धशाळेची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दि. १४ जून २०२४ च्या शासन ज्ञापनानुसार प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे नियोजन प्राधिकरण म्हणून ही जमीन काही अटी व शर्तींवर धारावी पुनर्विकास प्रकल्प- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना प्रदान करण्यात आली आहे. हा प्रकल्प राबविणे अधिक सुलभ व्हावे यासाठी या ज्ञापनातील आणि जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्या मसुदा करारनाम्यातील अटी व शर्ती गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाच्या धोरणाशी सुसंगत करण्यास मान्यता देण्यात आली. जेणेकरून धारावीतील रहिवाश्यांच्या पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. धारावी पुनर्विकासात साडे आठ लाख कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. यापैकी पाच लाख पात्र कुटुंबाचे पुनवर्सन धारावी परिसरात पुनर्वसन होणार आहे. उर्वरित साडे तीन लाख कुटुंबांचे पुनवर्सन करण्यासाठी अधिकची जमीन गरजेचे आहे. कुर्ला येथील जमीन उपलब्ध झाल्याने आणखी काही कुटुंबांचे पुनर्वसन करणे सुलभ होणार आहे. आजच्या या निर्णयामुळे धारावीतील अपात्र नागरिकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे. सर्वांसाठी घरे या धोरणाचे पालन करताना हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून, केवळ घरेच नाही, तर शाळा, रुग्णालये, शॉपिंग कॉम्प्लेक्स अशा इतरही नागरी सुविधांचे निर्माण सुलभ होणार आहे.

000

मुंबईतील प्रवेशासाठी पथकराच्या सवलतीपोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास भरपाई

मुंबई शहरात प्रवेश करण्याच्या पाच पथकर नाक्यांवर हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे. या पथकराच्या सवलतीपोटी महामंडळास भरपाई देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच पथकर सवलतीचा कालावधी १७ सप्टेंबर २०२९ पर्यंत वाढविण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई प्रवेश द्वाराच्या सायन – पनवेल मार्गावर वाशी येथे, लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड येथे, ऐरोली पुलाजवळ, तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर दहीसर येथील नाक्यांवर १४ ऑक्टोबर २०२४ पासून पथकरातून सवलत देण्यात आली आहे. ही सवलत दिल्यामुळे एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना या प्रकल्पासाठी करारनाम्यानुसार नुकसान भरपाई देण्याकरिता मुख्य सचिव यांच्या समितीने शिफारस केली आहे.

तसेच पथकर वसुलीचा मुळ कालावधी १९ ऑक्टोबर, २०१० ते १८ नोव्हेंबर २०२६ होता. या कालावधीत सुधारणा करून तो १७ सप्टेंबर २०२९ पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली.  तथापि या १९ नोव्हेंबर २०२६ ते १७ सप्टेंबर २०२९ या कालावधीतील सर्व प्रकारच्या वाहनांची प्रत्यक्ष गणनेचा रिअल-टाईम-डाटा उपलब्ध करून देण्याची अनिवार्य अट घालण्यात आली आहे. तसेच मुंबई व उपनगर विभागातील २७ उड्डाणपुले व अनुषंगिक बांधकामांची निगा व देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी ही संबंधित कंपनीकडेच राहणार आहे. याशिवाय, वाशी खाडी पूल या प्रकल्पासाठी पथकर सवलत नुकसान भरपाई पोटी खाडी पूल क्रमांक ३ च्या प्रकल्पाची सुमारे ७७५ कोटी ५८ लाख रुपयांची किंमत महामंडळास भरपाई ऐवजी टप्प्या-टप्प्याने रोख स्वरुपात देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

000

ताज्या बातम्या

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक,दि.१५: शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावेत, अशा...

नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनआढावा

0
सातारा दि. १५ (जिमाका): नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याच्या आढाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यातील दरे येथे बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष...

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

0
पुणे, दि. १५: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन...

महिला सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि.१५: महाराष्ट्राने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेतला आहे. राज्य नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्नशील असून त्यांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन...

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहवेदना

0
मुंबई, दि. १५: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना धक्कादायक आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे तसेच...