सोमवार, जुलै 28, 2025
Home Blog Page 401

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई, दि. ०४: अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. हँकी यांनी दावोस येथील गुंतवणूक करारांच्या यशासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्या उत्सुक असल्याचे श्री. हँकी यांनी सांगितले. तसेच राज्यात ऊर्जा, नव तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, नवनवीन क्षेत्रामधील सहयोगाबद्दल चर्चा केली.

राज्यात ऊर्जा क्षेत्रात असलेली संधी, विकास आणि पायाभूत सुविधा उभारणीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी उद्योग विभागाचे सचिव पी.अनबलगन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु आदी उपस्थित होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मंत्रिमंडळ निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय (दि. ०४ फेब्रुवारी, २०२५)

👉🏽 महसूल विभाग

वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ

शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कृषिक, निवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनींचे किंवा भाडेपट्टयाने दिलेल्या वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत संपली आहे. मात्र, राज्यात अशी रुपांतरणाची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे या सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्याच्या योजनेस आणखी एक वर्षांची मुदत वाढ देण्यास मान्यता देण्यात आली. यानुसार यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल होणाऱ्या अर्जांसाठी ही योजना लागू राहणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

०००

👉🏽 जलसंपदा विभाग

टेमघर प्रकल्पाचे मजबुतीकरण, गळती रोखण्याच्या कामांसाठी ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता

पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाचे (ता. मुळशी) मजबुतीकरण व गळती रोखण्याच्या कामांकरिता ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

टेमघर धरणातून पुणे शहराला दरवर्षी ३.४०९ अघफू पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. तसेच मुळशी तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याद्वारे १ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. हा प्रकल्प पुणे शहराच्या वरच्या बाजूस आहे. या प्रकल्पाला गळती लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. यामुळे धरणाच्या तसेच पुणे शहराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसा अहवाल विविध समित्यांनी दिला आहे. त्यांच्या शिफारशींचा विचार करता धरणाची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. हे काम केल्याने गळती थांबणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने टेमघर प्रकल्पाच्या गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजना व धरण मजबुतीकरण कामासाठी ३१५ कोटी ५ लाख रुपयांच्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली.

०००

👉🏽 मृद व जलसंधारण विभाग

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत होणारे २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कोयना जलाशय परिसरातील हे २५ बंधारे बुडीत क्षेत्रात येतात. या जलाशयाची पाणीपातळी फेब्रुवारी ते मे या महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाशांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना म्हणून या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी या बंधाऱ्यांच्या बांधकामांसाठी १७० कोटी रुपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.

०००

सामान्य मुंबईकरांना दिलासा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ०४: मुंबई महापालिकेने आज कोणतीही करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केल्याने सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सकारात्मक, विकासाभिमुख, विद्यार्थ्यांपासून ते चाकरमान्यांपर्यंत आणि गरीब कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्व वर्गांच्या शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधांचा विचार करणारा हा अर्थसंकल्प आधुनिक मुंबईचा शुभारंभ ठरेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली आहे.

मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री श्री. शिदे बोलत होते. ते म्हणाले, मुंबई महापालिकेचा ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर झाला. मुंबई वेगाने कात टाकत आहे. विकसित होत आहे. आम्ही दोन टप्प्यात मुंबईच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण केले. ग्लोबल मुंबईची चाहूल देणाऱ्या अर्थसंकल्पासाठी आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचं उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

भविष्यासाठी मुंबई वेगाने कात टाकतेय हे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अर्थसंकल्पात ४३ हजार कोटी विकासकामांवर खर्च होणार आहेत. त्यावरुन मुंबईचा विकास राज्य सरकारने आणि केंद्र सरकारनं किती गांभीर्याने घेतला आहे, हे दिसून येते. भांडवली खर्चातली ही वाढ विक्रमी असून येत्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात सात हजार कोटींनी भर पडली आहे त्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

‘बेस्ट’ साठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतल्या पर्यटनाला चालना देतानाच इथला प्रवास वेगवान करण्यावरही भर देण्यात आलेला आहे. प्रदुषणमुक्त, खड्डेमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई हा दिलेला शब्द खरा करून दाखवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ग्लोबल मुंबई ही देशाचं फिनटेक कॅपिटल म्हणून आकाराला येत आहे. जगाच्या नकाशावर मुंबई दिमाखाने तळपताना दिसेल त्याचाच हा शुभारंभ असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

०००

मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. ४ : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून पालघर आयटीआयमध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) प्रशिक्षण देत आहे. नुकतेच २७ तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार मिळतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

मंत्रालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे पालघर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मॉडेल करिअर सेंटर मार्फत २७ युवकांना एसी टेक्निशीयन म्हणून नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते. अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, सीआयआय या संस्थेचे भारताचे जनरल मॅनेंजर सौरभ मिश्रा, मुंबईचे विनायक उक्के, पालघर आयटीआयचे प्राचार्य महेशकुमार सिदम, एकलव्य व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे प्रशिक्षक उमाकांत लोखंडे, एकलव्य आयटीआयचे रघुनाथ धुमाळ यासह पालघर आयटीआयचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभाग काळानुरूप रोजगाराचे बदलते स्वरूप लक्षात घेवून प्रशिक्षण उपलब्ध करुन देत आहे. सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) या संस्थेच्या सहकार्याने पालघर व या परिसरात आयटीआय सोबत दहावी, बारावी व पदव्युत्तर युवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून आगामी एक वर्षात दोन हजार पेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षण देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

०००००

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्यू पावलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील जवानाच्या वारसांना साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि.०४ :- अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान तथा वाहन चालक कैलास गेणू कसबे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकरणांमध्ये सत्वर मदत होण्याच्या दृष्टीने गृह विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरुपी धोरण तात्काळ करण्याचे निदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती, उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी दिली.

नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्र.१ मधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यावर ७ जुलै २०२४ रोजी रात्री कारवाई केली होती. अवैध मद्यविक्री करणाऱ्या आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करीत असताना राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या भरारी पथकाच्या वाहनाला आरोपींच्या वाहनाने धडक दिली व त्यामध्ये जवान तथा वाहनचालक कैलास गेणू कसबे यांचा मृत्यू झाला होता.

उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. पवार यांनी या खात्याचा कार्यभार घेताच या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सन २०१४ मध्ये गृह विभागाने केलेल्या मदतीच्या धर्तीवर (पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय ठरल्याप्रमाणे साडेसात लाख रुपये) राज्य उत्पादन शुल्क विभागातील दिवंगत जवान कैलास कसबे यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून रु.७.५० लाख नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

0000

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई, दि. 4 :- अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. हँकी यांनी दावोस येथील गुंतवणूक करारांच्या यशासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्या उत्सुक असल्याचे श्री. हँकी यांनी सांगितले. तसेच राज्यात ऊर्जा, नव तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, नवनवीन क्षेत्रामधील सहयोगाबद्दल चर्चा केली.

राज्यात ऊर्जा क्षेत्रात असलेली संधी, विकास आणि पायाभूत सुविधा उभारणीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी उद्योग विभागाचे सचिव पी.अनबलगन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु आदी उपस्थित होते.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

 

प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा – आनंदराव अडसूळ

अमरावती, दि. ०३ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे दाखल होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदारांना विहीत कालमर्यादेत न्याय मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश राज्यअनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसुळ यांनी आज येथे दिले.

येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोगाचे अध्यक्ष श्री. अडसुळ यांच्या अध्यक्षतेखाली दाखल नऊ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व तक्रारदार यावेळी उपस्थित होते.

अध्यक्ष श्री. अडसुळ म्हणाले की, अनुसचित जाती-जमाती समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने या समाजाच्या सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय वगैर सद्यस्थितीचा अभ्यास करुन त्यानुषंगाने शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोग गठित करण्यात आलेला आहे. अनुसूचित जाती-जमाती समाजाच्या कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, यासाठी शासकीय यंत्रणांनी तक्रारदारांची तक्रार समजून घ्यावी, त्यावर सकारात्मकरित्या तोडगा काढावा. न्यायप्रविष्ठ तक्रारीसंदर्भात न्यायालयाचे आदेशाचे अवलोकन करुन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

आयोगाच्या सुनावणीप्रसंगी अमरावती विभागातील नऊ प्रकरणांवर तक्रारदार व संबंधित यंत्रणांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. आयोगाला प्राप्त प्रकरणांवर संबंधित विभागाकडून केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांनी आढावा घेतला तसेच सविस्तर अहवाल आयोगाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सेवा विषयक प्रकरणांच्या संदर्भात शासन निर्णयांचा अभ्यास करुन तक्रारदाराला कश्या पध्दतीने न्याय मिळवून देता येईल, यासाठी सकारात्मक विचार करण्यात यावे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा कार्यपूर्ती अहवाल आयोगाला सादर करावा, असे निर्देश श्री. अडसुळ यांनी यावेळी दिले.

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्यासाठी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागणी व अडचणी संबंधी दर तीन महिन्यात आढावा बैठक घेण्यात याव्यात, अशी मागणी गौतम गायकवाड यांनी यावेळी केली. यावर आयोग सकारात्मक निर्णय घेईल, असे श्री. अडसुळ यांनी यावेळी सांगितले.

आयोगाची कार्ये :

अनुसूचित जाती/जमातीसाठी संविधान व राज्य शासनाकडून उपलब्ध सवलती व हक्कांसाठी तरतूदीप्रमाणे सद्यस्थितीचा अभ्यास करणे व शासनास उपाय सुचविणे, अनुसूचित जाती/जमातीच्या तक्रारीची चौकशी करणे, अनुसूचित जाती/जमातीच्या सामाजिक, आर्थिक विकासाच्या योजना प्रक्रियेत भाग घेऊन शासनास सल्ला देणे व मुल्यांकन करणे, अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ व नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ प्रमाणे दाखल प्रकरणांचा आढावा घेणे, पिडीत व्यक्तीस देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याचा आढावा घेणे, अनुसूचित जाती/जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी स्विकारणे व तपास करणे, अनुसूचित जाती/जमातीसंबंधी धोरणाचा आढावा घेणे, शासनास अनुसूचित जाती/जमातीसाठी कल्याणकारी योजना संबंधी सल्ला देणे, अनुसूचित जाती/जमातीच्या कल्याण, आरक्षण, संरक्षण, विकास संबंधी इतर बाबी राज्य शासनाकडून ठरविण्यात येतील त्याबद्दल कार्यवाही करणे, अनुसूचित जाती/जमातीच्या यादीमध्ये जातीचा समावेश किंवा वगळण्यासाठी शिफारस करणे, याप्रमाणे आयोगाची विविध कार्य आहेत.

०००

मोफत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांचा रुग्णांनी लाभ घ्यावा – मंत्री हसन मुश्रीफ  

  • जिल्ह्यात होणार मोफत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया

कोल्हापूर, दि. ०३ (जिमाका) :  प्रसिद्ध रोबोटिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.मुफ्फझल लकडावाला यांच्या द्वारे हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय तसेच गर्भाशयावरील मोफत शस्त्रक्रिया करण्याचे आयोजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय कोल्हापूर येथे या शस्त्रक्रिया पार पडणार असून यासाठी संबंधित रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

या अनुषंगाने शेंडा पार्क येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये बैठक पार पडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिशिर मिरगुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्यासह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत सीपीआर येथे या शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या फेजमध्ये 50 शस्त्रक्रियांचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर रूग्णसंख्येचा विचार करून पुढिल शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे. संपूर्ण निशुल्क असलेल्या या शस्त्रक्रियेबाबत संबंधित रुग्णांनी सीपीआर येथील ओपीडी 107, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद तथा अधिनस्त प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच कोल्हापूर शहरातील कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात याबाबत आपली नोंदणी करावी, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही विनाछेद शस्त्रक्रिया असून यामध्ये कुठल्याही प्रकारची शरीराची चिरफाड न करता शस्त्रक्रिया केली जाते. ज्या रुग्णांना हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय तसेच गर्भाशय याबाबतची शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सल्ला दिला आहे, त्या रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी या मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

डॉ.मुफज्जल लकडावाला यांच्याविषयी

डॉ. मुफ्फझल लकडावाला हे डॉ. मुफी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते भारतातील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. बॅरिएट्रिक आणि गॅस्ट्रो-इंटेस्टाइनल शस्त्रक्रियांमध्ये विशेषज्ञ असून ते डायजेस्टिव्ह हेल्थ इन्स्टिट्यूटचे सह-संस्थापक आणि मुख्य शल्यचिकित्सक आहेत. सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, मुंबई येथील जनरल आणि मिनिमल ऍक्सेस सर्जिकल सायन्स विभागाचे शस्त्रक्रिया संचालक आहेत. त्यांच्या 20 हून अधिक वर्षांच्या सरावात त्यांनी 2019 मध्ये अमेरिकन सोसायटी फॉर मेटाबॉलिक अँड बॅरिॲट्रिक सर्जरी तर्फे जगातील सर्वोत्कृष्ट सर्जन पुरस्कार आणि इंटरनॅशनल फेडरेशन फॉर द सर्जरी ऑफ द वर्ल्ड मास्टर एज्युकेटर अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 हजारांहून अधिक जीव वाचवणाऱ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.

०००

कौशल्यातून रोजगार निर्मिती

देशात रोजगार यंत्रणा सर्वप्रथम 1945 मध्ये माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी स्थापन करण्यात आली. त्यानंतर 1949 पासून सर्व प्रकारच्या बेरोजगारांची नावनोंदणी करून विविध उद्योजकांकडे उमेदवारांची नावे पाठविण्याचे कार्य सुरू करण्यात आले. रोजगार कार्यालये महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयात सुरू करण्यात आली. रोजगार कार्यालयामार्फत करण्यात येणाऱ्या निरनिराळ्या कामांची, योजनांची तसेच नोकरीच्या संधी उमेदवारांना माहिती देणे इत्यादी महत्वाची कामे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत विनामूल्य केली जातात. या विभागाचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले असून कामामध्ये पारदर्शकता व जलदपणा येत आहे. येत्या काळातही जिल्हास्तरावर शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या जिल्ह्यातील आतापर्यंतच्या वाटचालीचा या लेखाद्वारे आढावा घेण्याचा हा प्रयत्न…

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग हा रोजगाराभिमुखविभाग आहे. या विभागाच्या विविध योजना व उपक्रम असून  https://mahaswayam.gov.in हे विभागाचे संकेतस्थळ कार्यरत आहे. याद्वारे उमेदवार किंवा उद्योजक कार्यालयात न येता आपली नोंदणी घरबसल्या इंटरनेटद्वारे किंवा त्यांच्याजवळ असलेल्या अँड्राईड फोनमधून rojgar.mahaswayam.gov.in या विभागाच्या वेब प्रणालीद्वारे करु शकतात. वाढती लोकसंख्या, बेरोजगारांची संख्या व नोकरीचे प्रमाण या सर्वांचा साकल्याने विचार करून विभागाच्या धोरणात व नावात महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता असे सुधारित नामाधिकरण केले आहे. नोकरीच्या संधी प्राप्त होण्यासाठी किंवा बेरोजगार युवक-युवतींनी स्वतः चा स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी त्यांना कौशल्य विकासाद्वारे निरनिराळ्या कौशल्याचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येते. यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीची स्थापना 15 फेब्रुवारी 2011 रोजी करण्यात आली. या कार्यालयामार्फत जुलै, २०२४ ते डिसेंबर, २०२४ पर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम योजना व उपक्रम हाती घेण्यात आले.

रोजगार मेळावे

जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी विविध प्रकारचे ऑनलाईन व ऑफलाईन रोजगार मेळावे आयोजित केले जातात. उद्योजक व बेरोजगार उमेदवारांना एकाच छताखाली रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्यामुळे दोन्हीकडील वेळ व पैशाची यामुळे बचत होते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४ ऑफलाईन ९ ऑनलाईन असे एकूण १३ रोजगार मेळावे घेण्यात आले. या रोजगार मेळाव्यात ५ हजार ३४७ उमेदवार व १२४ विविध खाजगी औद्योगिक आस्थापनांनी यात सहभाग घेतला. या रोजगार मेळाव्यामध्ये २ हजार २६३ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

कौशल्य विकास कार्यक्रम

नागपूर जिल्ह्यात निरनिराळ्या कौशल्य विकास अभ्यासक्रम देणा-या ७०१ प्रशिक्षण संस्थांची नोंदणी झालेली असून बेरोजगार उमेदवारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षिण देण्याचे कार्य सुरु आहे. कौशल्य विकासाच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना केंद्र शासन पुरस्कृत आहेत. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान ही योजना राज्य शासन पुरस्कृत असून किमान कौशल्य विकास कार्यक्रम ही योजना जिल्हा पुरस्कृत आहे. या सर्व योजनांच्या अंतर्गत आतापर्यंत ५२ हजार ४८९ उमेदवारांनी कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असून २३ हजार २०१ उमेदवारांना खाजगी आस्थापनांमध्ये नोकरी प्राप्त झाली आहेत. ६४४ उमेदवारांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. सद्यस्थितीत निरनिराळया अभ्यासक्रमात २१ हजार ९५५ उमदेवारांचे कौशल्य प्रशिक्षण सुरु आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या जास्तीत जास्त संधी प्राप्त होण्यासाठी व उद्योजकांना योग्य उमेदवार मिळण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील १७२ उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आले आहे.

मॉडेल करिअर सेंटरची स्थापना

केंद्र सरकारमार्फत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर येथे मॅाडेल करिअर सेंटर स्थापन करण्यात आले आहे. या मॅाडेल करिअर सेंटरद्वारे बेरोजगार उमेदवारांना १० वी व १२ वी नंतर काय, मुलाखतीची तयारी, व्यवसाय समुपदेशन करणे,  भविष्यातील रोजगाराच्या संधी,  स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करणे, व्यक्तिमत्व विकास या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तरीत्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेव्दारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

०००

    अतुल पांडे, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर

 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवा – मंत्री दादाजी भुसे

नाशिक, दि. ०३ (जिमाका): आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय शिक्षणासोबतच व्यवहारीक ज्ञान व विविध कौशल्ये अवगत असली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी नाविण्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवावेत, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित नाशिक विभागीय आढावा बैठकीत ते बोलेत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री ई- उपस्थित होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष बोरसे, शिक्षण उपसंचालक पुष्पा पाटील यांच्यासह नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी ई-उपस्थित तर शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक),शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण योजनेचे प्राचार्य व आदर्श शिक्षक हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, सर्व विभागातील शाळांचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. यासोबत मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच शाळांमध्ये पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह असावीत. शाळांमधील स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी ही शहरात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात ग्रामपंचायत यांना देण्यात येणार आहे. मुलांना शाळेत देण्यात येणारा आहाराचा दर्जा उत्तम असावा. सर्व माध्यमाच्या शाळांनी राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गायले गेले पाहिजे. यासोबतच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अनिर्वाय आहे व तो शिकविला गेला पाहिजे याची प्रभावी अमंलबजावणी व्हावी. मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ज्या शाळांना संरक्षक भिंत नाही त्यांनी नरेगाच्या माध्यमातून करून घ्यावी. शिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख यांनी शाळांना भेटी द्याव्यात व भेटीद्वारे शाळांची गुणवत्ता तपासणीसोबतच त्यांना आवश्यक असणाऱ्या बाबी व अडचणी दूर करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात इतर विभागांचे अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत. त्यादृष्टीन विभागातील सर्व शाळांनी मुलांचे अध्ययन व  शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक प्रयत्न करावेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये स्थलांतरामुळे अडचणी निर्माण होतात. या कामागारांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये व त्यांचे स्थलांतर कमी करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. विभागात आगामी काळात होणाऱ्या परिक्षांसाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवाविण्यासाठी  सर्व शाळांनी आवश्यक तयारी करावी. शाळांमध्ये आवश्यक सेवासुविधा व भौतिक विकासासाठी  जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची उपलब्धता होवू शकते. यासह लोकसहभाग, जिल्हा परिषद सेस निधी , क्रिडा विभाग, सेवाभावी संस्था, समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग, जिल्हा पातळीवरील मोठे उद्योग यांच्या सीएसआर निधीतून ही कामे करणेही शक्य असल्याचे मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

येणाऱ्या काळात तालुका पातळीवर एक आदर्श शाळा तयार करायची आहे. या शाळांमध्ये वाचनालय, लॅब, क्रिडा साहित्य, डिजिटल सुविधा असणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर लोकप्रतिनधींशी आवश्यक बाबींची चर्चा करून तसा आराखडा तयार करावा. 200 पटसंख्या वरील शाळांमध्ये एक स्मार्ट क्लासरूम तयार करणार असून त्या स्मार्ट क्लासरूम मध्ये सर्व प्रकारच्या अद्ययावत व डिजीटल शिक्षणाच्या सुविधा असतील. आढवड्यातील प्रत्येक दिवस इयत्तेनुसार या क्लासरूमचा अनुभव घेता येईल.  शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याऱ्या शिक्षकांच्या कामाची दखल घेण्यात यावी. सर्व अधिकारी व शिक्षकांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, अशाही सूचना शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.

आज विभागातील ‍नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांचा आढावा शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी घेतला. यावेळी सर्व विभागातील प्रमुखांनी सादरीकरणातून माहिती सादर केली. विभागतील आदर्श शिक्षकांनी त्यांनी केलेल्या उपक्रमांची माहिती व मनोगत व्यक्त केले. जिल्हा परीषद शाळा बोदवड, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव शाळेतील शिक्षक सुनिल बडगुजर लिखित बालकांचे भावविश्व या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुआ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा राजमोही लहान शाळेतील विद्यार्थांशी शालेय शिक्षण मंत्री यांनी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला. सुरवातीला गुरूगोविंदसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार बलविरसिंग छाब्रा यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे स्वागत केले.

 

०००

                        

 

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि.28- जिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना  सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर...

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श स्मारकाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या...

0
अहिल्यानगर दि.२७ - आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला. समाजसुधारणा, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या...

अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
अहिल्यानगर, दि.२७ जुलै - अहिल्यानगर शहरात लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रूपये...

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर, दि. 27 - प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक...

नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात गतिशीलता आराखडा साकार करू – मुख्यमंत्री...

0
दळणवळण यंत्रणेला भक्कम करणाऱ्या आरखड्याबाबत लोकप्रतिनिधींसह जनेतेनेही आपली मते नोंदविण्याचे आवाहन भक्कम व सुलभ वाहतूक व्यवस्था नागपूरकरांसाठी होणार उपलब्ध सुमारे २५ हजार ५६७...