गुरूवार, जून 19, 2025
Home Blog Page 41

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ०१ : “शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार बाबाजी काळे, आमदार बापूसाहेब पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, प्र. विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, मराठा चेबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबाणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, दापोली कृषी विद्यापीठाचे डॉ. संजय सावंत, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक संजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, शेती फक्त शेतकऱ्यांची जबाबदारी नसून उद्योग, शास्त्रज्ञ, शासन आणि समाज यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे. शासनामार्फत ॲग्री स्टॅक, डिजिटल क्रॉप सर्व्हे, स्मार्ट सिंचन, कृषी डेटा मिशन, एफ.पी.सी. सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेती प्रोत्साहन यांसारखे अनेक उपक्रम राबवित आहोत. शेतीमधून शाश्वत उपजीविका निर्माण करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असून, आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीची गती वाढविण्यासाठी आपण किती समर्पण भावनेनं काम करतो यावर महाराष्ट्राच्या कृषी विभागाचं भविष्य अवलंबून आहे, असे ते म्हणाले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ॲग्री स्टॅक नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फॉर्मर आयडी (Unique Farmer ID) दिला जात आहे. हा नंबर म्हणजे शेतकऱ्याची ओळख – जशी आपली आधारकार्डवर ओळख असते, तशीच ही शेतीसाठी खास ओळख असेल. या नंबरद्वारे शेतकऱ्याची जमीन, घेतलेली पिके, मिळालेली अनुदानं, विमा, कर्ज याची सर्व माहिती जोडली जाईल. त्यामुळे भविष्यात कुठलीही योजना मिळवण्यासाठी वारंवार कागदपत्रं देण्याची गरज भासणार नाही.

शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ मदत व योजनांचा लाभ देऊ शकेल. कोणत्याही चुकीच्या नोंदी टाळल्या जातील आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य लाभ पोहोचेल. आजपर्यंत या योजनेत महाराष्ट्रातील 1 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करुन आपला नंबर प्राप्त करुन घेतला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या तलाठी, कृषी सहायक किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन लवकरात लवकर नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणे म्हणजे स्वयंपूर्ण झालो असे नाही. उत्पादनाची गुणवत्ता राखली जाणे, व्यवस्थित त्याची जाहिरात होणे, बाजारपेठ मिळणं आणि त्याला बाजारभाव मिळणे ही मूल्यसाखळी आपल्याला निर्माण करायची आहे.

हवामान बदलामुळे शेतीपुढे खूप आव्हाने आहेत. एका क्षणात शेतीचे प्रचंड नुकसान होते. अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणं, आपला विचार, अभ्यास, प्रत्यक्षात आणणं, त्यातून शेतकऱ्याला ज्ञान देणं ही खरी काळाची गरज आहे.

या ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’मध्ये सहभागी होणाऱ्या संशोधकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याची संधी मिळेल. यशस्वी संकल्पनांना वित्तीय आणि तांत्रिक मदतही दिली जाणार आहे. तसेच, खाजगी कंपन्यांच्या सहकार्यानं हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात साकारण्यात येईल, ही बाब महत्वाची आहे. पुणे आंतरराष्ट्रीय ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’हे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारं ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषि हॅकॅथॉनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषितज्ज्ञ यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे यावेळी म्हणाले, भविष्यात शेती सुरक्षित व संरक्षित कशी करता येईल यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे. तसेच पुढील काळात शेतीसाठी मनुष्यबळाची कमतरता यादृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीची पोत खराब होत असल्याने रासायनिक शेती हळूहळू कमी करुन सेंद्रीय शेतीकडे जाणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीतून उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी मार्केट महत्वाचे असून, मार्केट लिंकींग करण्याची आवश्यकता आहे. यासाठी भारतातील कंपन्या पुढाकार घेण्यास तयार आहेत. राज्यात विभागस्तरीय सहा अद्यावत शेती प्रयोगशाळा, शॉपिंग मॉल उभारण्याच्या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्नशिल आहे. उत्तम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्यास कृषी क्षेत्रात महाराष्ट्र अधिक प्रगतशील होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेती व शेतकरी सक्षम होण्यासाठी शासनामार्फत विविध धोरण राबविण्यात येतील. या कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून शेतीसाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकऱ्यांनी त्याचा फायदा इतरांनाही होण्यासाठी प्रयत्न करावेत.

कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून नवनवीन माहिती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. यातूनच सर्वसमावेशक व शेतकऱ्यांच्या फायद्याचे कृषी धोरण राबविण्याचा विचार कृषी विभाग करत आहे, असे त्यांनी सांगितले.

कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, शेतीत उत्पादन जास्त होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत नाही यासाठी नविन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक आहे. या ॲग्री हॅकॅथॉनच्या माध्यमातून शेतमालाच्या उत्पादनासोबत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत हाईल. यावेळी माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या कृषी विषयक विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध कृषी उत्पादकांकडून माहिती जाणून घेतली.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ॲग्री हॅकॅथॉन आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ, नविन तंत्रज्ञानाची माहिती, शेतीविषयक समस्या व त्यावरील त्रांत्रिक उपाय, पाणी टंचाई, जमीनीचे व्यवस्थान उत्पादनात वाढ या बाबींची माहिती शेतकऱ्यांना ॲग्री हॅकॅथॉन मधून मिळेल. या उपक्रमात 140 जणांची निवड झाली आहे. हे सर्व जण प्रदर्शनात सहभागी होऊन सादरीकरण करणार आहेत. यातून अंतिम 16 जणांची पहिल्या व दुसऱ्या स्थानासाठी निवड होईल. 2 व 3 जून रोजी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, 3 जून रोजी समारोप होईल, असे त्यांनी सांगितले. डॉ. महानंद माने यांनी आभार व्यक्त केले.

00000

समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. १ : रुग्ण सेवा ही  ईश्वर सेवा असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील सर्वांनी गतिशीलता, पारदर्शकता आणि संवेदशनशीलतेने काम करुन समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी  प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण तथा संशोधन अकादमी (मित्रा) नाशिक येथे आयोजित मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप  प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची रचना विश्वस्त भावनेने केली आहे. परदेशातील औद्योगिक, सामाजिक दायित्व निधी प्रमाणपत्र मिळविणारा देशातील पहिला कक्ष आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर वैद्यकीय क्षेत्रात करण्याची संकल्पना २०१४ पासून राबविण्यास सुरूवात केली. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची संस्थात्मक रचना उभी केली असून सामान्य माणसाला मदत होईल, अशी या कक्षाची रचना आहे. आता या कक्षाची जिल्हास्तरावरही स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयाच्या कामकाजाच्या बाबतीतही पारदर्शक आणून दुरूपयोग टाळावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख श्री. नाईक यांनी प्रास्ताविक केले.  ‘रुग्ण मित्र’ योजना मतदारसंघनिहाय सुरू करण्यात येत आहे. सामाजिक संस्थांची फंडासाठी मदत घेणार असून केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती एका प्लॅटफॉर्म आणण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी हे आरोग्यदूत म्हणून काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राज्यस्तरीय कक्षाचे प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय तथा प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था डॉ. सुनील भोकरे, सहकक्ष प्रमुख शरद घावटे, उपकक्ष प्रमुख शेखर नामदास, जनसंपर्क अधिकारी डॉ. जगदीश सकवान, वैद्यकीय समन्वयक डॉ. सवानंद सोनार, प्रशासकीय सल्लागार दत्तात्रय विभुते यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हास्तरीय कक्षाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करावे- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि.१ : राज्य शासनाकडून समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. प्रशासनाने योग्य आणि प्रभावी अंमलबजावणीतून त्यांचा पात्र नागरिकांना  लाभ देतांना त्यांच्या यासंदर्भातील समस्याही तत्परतेने सोडवाव्यात, असे आदेश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात अधिकाऱ्यांना दिले.

येथील नियोजन भवनात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात एकूण 207 नागरिकांनी आपल्या समस्या व निवेदने सादर केली. प्रशासनातील विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

नागरिकांच्या स्थानिक स्तरावरील समस्यांचे तात्काळ निराकरण व्हावे व त्यांचे शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लागावे, यासाठी  पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थी, दिव्यांग, महिला, वृद्ध  तसेच समाजाच्या सर्व घटकातील नागरिकांनी आज व्यक्तिगत तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या समस्या सादर केल्या. समस्याग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या तक्रारींवर तात्काळ  कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. विशेषतः आरोग्यविषयक समस्यांवर आज प्राप्त झालेल्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सांगितले.

नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित व नियमानुसार करता येणारी कामे दिरंगाई न करता तातडीने पूर्ण करण्याचे आदेश  पालकमंत्र्यांनी शासकीय विभागांना दिले. आजची सर्व निवेदने, समस्या व इतर प्रकरणांविषयी संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा पुढील वेळी घेण्यात येईल, असेही श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

योजनांचा लाभ देण्यात येणारे अडथळे, आरोग्यविषयक सुविधा, अतिक्रमण, अंगणवाडी व परिचारिकांच्या समस्या, वीज वितरण, कृषी, क्रीडा व महसूल संबंधित अनेक विषयांवर नागरिकांनी निवेदने देवून श्री. बावनकुळे यांच्याशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

00000

हरित सातारा उपक्रम दरवर्षी राबवणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा  दि. १: सातारा जिल्हा निसर्गाने व झाडा झुडपांनी नटलेला आहे. यात आणखीन भर पडावी यासाठी हरित सातारा उपक्रम प्रत्येक वर्षी 1 जून रोजी राबवणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा नगरपरीषदेच्या संयुक्त विद्यमाने  पोलिस परेड मैदान येथे वृक्ष लागवड अभियानास   सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहूल अहिरे, सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, सिने अभिनेते संयाजी शिंदे, दिशा कमिटीच्या सदस्या रेणूताई येळगावकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील व नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अनेक डोंगरावरील झाडांची संख्या कमी झालेली आहे. प्रशासनाने स्थानिकांच्या सहकार्याने या डोंगरावर पुन्हा वृक्षारोपन करावे.  दर वर्षी झाडे किती लावली, किती जगली याचा आढावा घेऊन जीओ टँगींगद्वारे माहिती शासनाला सादर करणार, असल्याचेही सार्वजनिक बांधकाम श्री. भोसले यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, रस्त्यांच्या रुंदीकरण कामामुळे झाडे काढावी लागतात. ज्या ठिकाणची झाडे काढली आहेत त्या ठिकाणी पुन्हा देशी झाडांचे वृक्षारोपन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानात ८ ते १० फूट उंचीची विविध प्रकारची २ हजार ८०० झाडे लावण्यात येणार असून या अभियानात सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळाचे ११० कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेल्हे-शिक्रापूर-जेजुरी-लोणंद-सातारा या राज्य मार्गावर पोवई नाका ते वाढे फाटा यादरम्यान ३.३ कि.मी. लांब मार्गाच्या दुतर्फा १ हजार ५१४ झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने बहावा, कदंब, अर्जुन, पुत्रवती, कांचन, यकृळ, पुत्राजिवा, कडूनिंब, कुंकू, मोहगणी, खडशिंग, करंज यांसारख्या औषधी व सेंद्रिय उपयोगी वृक्षांचा समावेश आहे.  तसेच नगरपरिषदेच्यावतीने   आयोध्यानगरी ते दत्त मंदिर, हुतात्मा स्मारक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते मोळाचा ओढा, सदरबझारमधील जेसीओ कॉलनी परिसरात सोनचाफा, ताम्हीण, बॉटल ब्रश, जांभूळ, पारिजातक, पळस, आवळा, उंबर, कुसंबी, गोरख चिंच अशा विविध प्रकारचे १ हजार २०० झाडे लावण्यात आली आहेत.

किमान १० जूनपर्यंत पावसात घट शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

मुंबई, दि १ : बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली, आणि आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात ४० अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान ३५ ते ४० अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे.

कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून परत एकदा करण्यात येत आहे.

0000

गरजूंना आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे पुरविणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 31 : राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी अपंगांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्यात येणार आहे. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे निशुल्क देण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय आज अलीम्कोतर्फे सहाय्यक उपकरणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, चंदू यावलकर, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, गरजू व्यक्तींच्या कल्याणासाठी योजना राबविण्यात येत आहे. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले सहाय्यक उपकरणासाठी सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. सर्वेक्षणाच्या या पहिल्या टप्प्यात तीन हजार अपंग आढळून आलेले आहेत.या सर्वांना त्यांच्या गरजेनुसार उपकरणे देण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने समाजातील सर्व घटकांना मदत करण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार कृत्रिम अवयव वाटप करण्यात येत आहे. अपंग आणि निराधारांना देण्यात येणारे सहाय्यक अनुदान वाढविण्यात आले आहे.

वयोश्री योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आपल्या परिसरातील अपंगांना याबाबत माहिती देण्यात यावी. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात त्यांना लाभ होऊ शकेल. त्यासोबतच महाराजस्व अभियानामध्ये शिबिरे घेऊन याबाबतची माहिती देण्यात यावी. राज्य शासनाने शिक्षण, आरोग्य, रोजगार, अपंगांना मदतीचे धोरण स्वीकारलेले आहे. येत्याकाळात जलसंधारणाचे ही कामे प्राधान्याने हाती घेऊन भुजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 12 तास विज उपलब्ध व्हावी, यासाठी सौर पंप देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पांदण रस्ता आणि पाणी उपलब्ध करून देणार आहे. पांदण रस्त्यासाठी मॉडेल तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व रॉयल्टी माफ करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात किमान बारा फुटाचा पांदण रस्ता राहणार आहे. गेल्या कालावधीतील जलसंधारणाची केलेली कामे शोधण्यात येत असून यातील किरकोळ दुरुस्ती करून पाणीसाठा तयार होऊ शकेल अशी कामे पूर्ण करण्यात येणार आहे. यासोबतच सर्व शाळा आदर्श करण्यावर भर देण्यात येणार आहे. येत्या वर्षात 5 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमात एक झाड लावून आपल्या आईच्या स्मृती जागवाव्या. यासाठी शासनातर्फे मोफत रोपांचा पुरवठा करण्यात येईल. सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

0000

 

पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 31 : पारधी समाज हा आजही मागासलेलाच आहे. त्यांना आपल्या अधिकाराची अद्यापही जाणीव झालेली नाही. गेल्या कालावधीत राज्य सरकारने राबविलेल्या विविध उपक्रमामुळे जातीच्या प्रमाणपत्रासह शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यापुढेही शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात पारधी समाजामध्ये कार्य करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आज जिल्हा नियोजन सभागृहात धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने पारधी पॅकेज अंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचे वाटप पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रतापदादा अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, चंदू यावलकर, प्रवीण पोटे पाटील, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अप्पर आदिवासी आयुक्त जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी प्रिया म्हाडदळकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त समाजातील विविध घटकांचा विकास करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. पारधी विकास कार्यक्रमांतर्गत रोजगाराभिमूख योजना राबविण्यात येत आहे. आज प्रामुख्याने व्यवसाय आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. रोजगारनिर्मितीसोबतच शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार मिळवण्यासाठी प्रशिक्षित कामगार तयार करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येईल.

केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक जातीची माहिती घेण्यासोबतच त्यांचे सामाजिक सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक समाजाची परिस्थिती समजणार असून वस्तुस्थिती समोर येणार आहे. त्यानुसारच प्रत्येक समाजाला विकसित करण्यासाठी धोरण ठरवण्यात येईल. पारधी समाजाला त्यांच्या वस्त्यांमध्येच लाभ मिळावा, यासाठी त्यांचे सर्वेक्षण करावे. वस्त्यांच्या ठिकाणी महाराजस्व अभियान अंतर्गत शिबिर आयोजित करण्यात यावे. या ठिकाणी संपूर्ण योजनांची माहिती द्यावी. पारधी समाजाला येत्या काळात प्राधान्याने घरकुल आणि घरासाठी पट्टे देण्यात येणार आहे. गरजूंना दहा लाख घरे देण्याचे आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला मागणीनुसार घरे देण्यात येईल. यासोबतच पारधी समाजाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या योजना तयार कराव्यात, यासाठी वाढीव निधी देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

यावेळी पूजा सोळंके, वर्षा पवार, पंडित चव्हाण, शिवशक्ती महिला बचतगट यांना प्रतिनिधी स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, ई-रिक्षाचे प्रत्यक्ष वितरण केले.

00000

 

अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये अत्याधुनिक अग्निशमन वाहने उपलब्ध करून देणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दिनांक 31:-राज्य शासन व प्रशासन हे कारखानदार, कामगार तसेच उद्योगाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये नुकतीच झालेली दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी एमआयडीसीमध्ये रस्ते, पाणी, वीज या सुविधा बरोबरच अत्याधुनिक अग्निशामक वाहने लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित अक्कलकोट एमआयडीसी  मध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्घटने संदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णूरकर, कार्यकारी अभियंता तपन डंके, स्मार्ट सिटी चे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे, MIDC विभागीय अधिकारी शिवाजी राठोड, अग्निशमन अधिकारी दिनेश अंभोरे, महापालिकेचे अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे, श्रीमती रोहिणी तडवळकर, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, पेंटप्पा गडडम अध्यक्ष सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ अध्यक्ष पॅन्टपा गड्डम, मल्लिकार्जुन कमटम, अंबादास बिंगी, नारायण आडकी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, एमआयडीसी मध्ये रस्ते लहान असल्याचे निर्देशनास आलेले आहे, त्यावर काही ठिकाणी अतिक्रमने झालेले असून ती अतिक्रमणे काढून टाकणं, रस्ते रुंदीकरण करणे तसेच या ठिकाणी पाच लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. महापालिकेला अत्याधुनिक अग्निशमन वाहने घेण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करण्यात येईल. शासन व प्रशासन उद्योग वाढीबरोबरच उद्योग व तेथे काम करणारे कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करतच आहे परंतु या भागातील कारखानदारांनी ही तेवढे सहकार्य देणे आवश्यक असून नियमानुसार सर्व सुविधा कारखान्यात उपलब्ध ठेवणे ही आवश्यक असल्याचे त्यांनी सुचित केले.

तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महापालिका, अग्निशमन दल, पोलीस विभाग तसेच संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल पुढील आठ दिवसात द्यावा. हा वॉल प्राप्त झाल्यानंतर दुर्घटनेचे कारणे समोर येतील तसेच आग विझवताना आलेल्या अडचणी तसेच वॉटर फीडिंग ची व्यवस्था व अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत या दृष्टीने पुढील काळात काटेकोरपणे नियोजन करणे शक्य होणार असल्याची माहिती पालकमंत्री श्रीगोरे यांनी दिली.

बांधकाम विभाग आणि अग्निशमन दलांना या घटनेसंदर्भात कोणाला नोटीस दिल्या आहेत, याची विचारणा करण्यात आली. कारखान्यांमध्ये अनधिकृत बांधकामे, कायद्याचे उल्लंघन, खबरदारीच्या उपायांचा अभाव आणि आवश्यक साहित्याची अनुपलब्धता यावर पालकमंत्री गोरे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच कारखान्यांमध्येच प्रार्थना स्थळे असणे आणि कामगारांना तिथेच राहण्याची सोय करणे या बाबी नियमांना धरून नाहीत तरी कारखानदारांनीही नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

एमआयडीसीमध्ये मुबलक पाण्याची सोय नसल्याने विविध समस्या भेडसावत असल्याचे उद्योग असोसिएशनने निदर्शनास आणले. एमआयडीसी मधील विविध सोयी सुविधा तसेच मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच उद्योग मंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे श्री. गोरे यांनी सांगितले.

शहरात होणाऱ्या उड्डाणपुलावरती नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून त्यावर लवकरच निर्णय घेतला  जाणार आहे. शासनाकडून ज्यांना जागा नाही, घर नाही अशा लोकांचाही सर्व्हे केला जाईल व त्यांना शासकीय जमिनीवरती घरेही लवकरच मिळवून देण्याचा शासनाचा ध्यास  असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी नुकत्याच एम आय डी सी मध्ये घडलेल्या दुर्घटनेचे अनुषंगाने पालकमंत्री महोदय यांना माहिती दिली.

महापालिकेचा सर्वेक्षण अहवाल –

महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी सादर केलेल्या अहवालात अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे नमूद केले. अनधिकृत बांधकामांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचणे आणि प्रभावीपणे कार्य करणे अशक्य झाले. महानगरपालिकेच्या 9 सदस्यीय पथकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार,  प्रत्येक पथकात अग्निशमन विभाग, नगर रचना विभाग व कर विभागाचे अधिकारी सहभाग एकूण ९३२ मालमत्ताची पाहणी ५७ ठिकाणी अनधिकृत बांधकामे निदर्शनास आली ७३७ मालमत्तांमध्ये सामासिक अंतरामध्ये बांधकाम, गोडाऊन, शेड, बोईलर मशीनसाठी वापर असल्याचे दिसून आले.२१५ ठिकाणी रहिवास व औद्योगिक वापर होत असल्याचे दिसून आले.४५८ इमारतींमध्ये कोणत्याही प्रकारची अग्निशमन व्यवस्था उभारली गेली नसल्याचे निदर्शनास आलेकेवळ २७ इमारतीमध्ये अग्निशमन व्यवस्था..४४७ ठिकाणी अर्धवट किंवा केवळ दिसण्या पूर्ती अग्निशमन व्यवस्था..६७ ठिकाणी लोक अनधिकृतपणे निवासी वापर करत असल्याचे दिसून आले.असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे.

00000

 

नूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी कार्यभार स्वीकारला

छत्रपती संभाजीनगर, दि. ३१ :  नूतन विभागीय आयुक्त  जितेंद्र पापळकर यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. सेवानिवृत्त होत असलेले विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त अनंत गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी श्री पापळकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी नगरविकास विभागाचे सहआयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री पापळकर यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधत विभागातील माहिती जाणून घेतली.

नवनियुक्त विभागीय आयुक्त श्री. पापळकर हे २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हाधिकारी, हिंगोली जिल्हाधिकारी, धुळे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

००००

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण झाल्यावर शासनाकडून निश्चीतपणे मदत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

सातारा, दि.31:  सातारा जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत फलटण, माण, खटाव या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी  होऊन नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करुन भरपाईसाठी त्वरीत सादर करावेत, एकत्रितपणे पंचनामे राज्यशासनाला प्राप्त झाल्यावर शासन निकषानुसार निश्चितपणे मदत करेल अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

फलटण तालुक्यातील फलटण शहरासह बाधित गावांची भेट देऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी  मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी केली. यावेळी  फलटणचे आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल मोरे, प्रभारी गट विकास अधिकारी श्री. कुंभार आदी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात मान्सून पूर्वी असा पाऊस कधी झाला नसून असा प्रथमच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचे पाहणी प्रसंगी सांगून मंत्री श्री. पाटील  म्हणाले, आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार अतिवृष्टीने घरांची पूर्णत: पडझड झाली आहे.  शेतपीकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले असून  बागायती व फळपिकांखालील क्षेत्र बाधित झाले आहे. अंगणवाडी, शाळांसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जनावरेही मयत झाली आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून राहिलेले पंचनामे पूर्ण करण्याचे युध्दपातळीवर काम सुरु आहे.

भरपाईसाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठीच्या सूचना मदत व पुनर्वसन विभागाकडून दिल्या आहेत. यंत्रणांनी पंचनामे त्वरीत पूर्ण करावेत. रस्ते, पूल, बंधाऱ्याचे  नुकसान झाले आहे, काही ठिकाणी नदीचे पात्र बदलले आहे. त्यांच्या दुरुस्तीचेही प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तात्काळ सादर करावेत अशा सुचना दिल्या.

अतिवृष्टीने ज्या घरात पाणी शिरले आहे, त्या घरातील नागरिकांना स्थलांतर करून त्यांच्या जेवणाची, रेशनची व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून व सेवाभावी संस्थाकडून करण्यात आली आहे, अशी माहितीही मकरंद पाटील यांनी दिली.

००००

ताज्या बातम्या

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रदीप कोकरे, डॉ. सुरेश सावंत यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

0
मुंबई, दि. १८: साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’  मराठी कादंबरीस ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या...

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर

0
मराठी आणि सिंधी भाषेसाठी महाराष्ट्रातील युवा साहित्यिकांची निवड डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळमाया’ याठी बाल साहित्य  अकादमी पुरस्कार जाहिर नवी दिल्ली, दि. १८: साहित्य...

धान साठा करण्यासाठी गोदामांची उभारणी करण्यात येणार-  मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. १८: आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी करण्यात येते. आदिवासी क्षेत्रात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान उघड्यावर राहून...

दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा – मंत्री अतुल सावे

0
मुंबई, दि. १८: राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास...

मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

0
मुंबई,दि. १८ : शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने तसेच सार्वजनिक व शासकीय अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना १००...