गुरूवार, जून 19, 2025
Home Blog Page 40

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे ⁠थ्री स्टार करणार, राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सांगली, दि. १ (जि. मा. का.) : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणसे निर्माण केली जातात. समाज घडवला जातो. सर्व सामान्यांची मुले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार असून, राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मिरज तसेच १२५ वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सांगली या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन व लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिरज येथे रमा उद्यान, मेडिकल कॉलेज ग्राऊंडच्या शेजारी, वसतिगृह इमारत ठिकाणी आयोजित या कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सामाजिक न्याय विभागाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण मेघराज भाते उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात १२५ वसतिगृहात उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृहे असावीत, या दृष्टीने वाटचाल सुरू केली. भविष्यात भाडे तत्त्वावरील वसतिगृहे शासकीय इमारतीत व्हावीत, यासाठी प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.  

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, विद्यार्थी दशेत असताना अनेक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जडणघडण वसतिगृहात झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही देण आहे. मागासवर्गियांची मुले या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया इथे घातला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना थ्री स्टार प्रमाणे सोयी सुविधा द्याव्यात. वसतिगृहात अंतर्गत व बाह्य स्वच्छता नियमित ठेवावी, असे त्यांनी सूचित केले.

आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आपण सामाजिक न्याय मंत्री पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे शासकीय इमारतीत असावीत, विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले. वसतिगृहातील सुविधा दर्जेदार असाव्यात, विद्यार्थ्यांना सुरक्षित, संरक्षित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. तालुक्यात १७ बौद्ध विहार बांधली. जिल्ह्यातील दोन वसतिगृहे खाजगी जागेत असून, ती शासकीय जागेत असावीत यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, त्यास मान्यता द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात सहायक आयुक्त समाजकल्याण मेघराज भाते म्हणाले, जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या सहा निवासी शाळा आहेत. तसेच २१ शासकीय वसतिगृहे असून, त्यापैकी दोन वसतिगृहे वगळता अन्य सर्व वसतिगृहे शासकीय जागेत आहेत. या वसतिगृहात शिक्षण घेऊन अनेक चांगले विद्यार्थी घडले आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते दोन्ही वसतिगृहांचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.

 

00000

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ जून सायंकाळपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई, दि. १ – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असून नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमधील नोंदणीमध्ये दि. १ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अखेर १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.

प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून विद्यार्थी नोंदणी करत असून संकेतस्थळावर ताण येत असल्याने थोड्या प्रमाणात संकेतस्थळ संथ गतीने चालणे तसेच प्रवेश शुल्क भरण्यामध्ये अडचणी कॉलेज पसंतीक्रम भरण्यामध्ये अडथळे येणे अशा अडचणी निदर्शनास आल्या. याबाबींवर संबंधित कंपनीमार्फत तत्काळ उपायोजना/ पर्यायी व्यवस्था करुन प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा नोंदणी अर्ज भरण्याकरिता दिनांक २६ मे २०२५ ते ३ जून २०२५ पर्यंतचा एकूण नऊ दिवसांचा पुरेसा कालावधी देण्यात आला असून या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर केली जाईल असेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात असून कोणत्याही विद्यार्थ्याने काळजी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील काही बदल नवीन पर्याय समाविष्ट करणे आवश्यक असल्याने त्याबाबतचे काम सुरू होते. यादरम्यान क्षेत्रिय स्तरावरुन आणि तज्ज्ञांकडून प्राप्त होणारे बदल यामुळे संकेतस्थळ तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागला. त्यामुळे प्रक्रियेच्या जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दि. २१ मे २०२५ पासून प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी सुरू करणे शक्य झाले नाही. यानंतर संकेत स्थळाबाबत तांत्रिक अडचणी दूर करुन दि. २६ मे २०२५ पासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आली. या बदलाबाबत संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे) यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे स्पष्टीकरण देखील दिलेले आहे.

विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी विभागस्तरावर तांत्रिक सल्लागार मार्गदर्शन केंद्र हेल्पलाईन नंबर सपोर्ट डेस्क संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेमधील माहिती पुस्तिका प्रश्न-उत्तरे विद्यार्थी युजर मॅन्युअल ‘करीअर पाथ’ चा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांस काही बदल करावयाचा असल्यास ग्रीवन्सचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. विद्यार्थी/ पालक यांच्यासाठी विभाग स्तरावर/ जिल्हा स्तरावर अधिकारी/ कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक संकेत स्थळावर देण्यात आलेले असल्याचेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यात प्रवेश प्रकिया राबविण्यात येणार असल्याने यामध्ये ९३४२ कनिष्ठ महाविद्यालयांमधून २० लाख ८८ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमता उपलब्ध झाली असल्याचेही शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००

बेंगळुरू येथील इनोव्हेशन केंद्र आणि कृषी विज्ञान विद्यापीठाला कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांची भेट

मुंबई, दि.1 : स्मार्ट शेतीसाठी बेंगळूरच्या धर्तीवर  महाराष्ट्रात प्रगत कृषी केंद्रांची (इनोव्हेशन केंद्र) उभारणी  करण्याचा धोरणात्मक आराखडा तयार करण्यात येईल. यामुळे शेतीत शिक्षण घेणाऱ्या नव्या पिढीला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळेल व शेतकऱ्यांना नव्या साधनांचा लाभ होईल, ज्यामुळे शेती अधिक उत्पादनक्षम, कार्यक्षम व शाश्वत होईल.असे मत कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.

बेंगळुरू येथील स्मार्ट शेतीसाठी नवप्रवर्तन केंद्र, कृषी विज्ञान विद्यापीठ (UAS) ला  कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. कृषी विज्ञान विद्यापीठचे  कुलगुरू, स्मार्ट शेतीसाठी इनोव्हेशन केंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी  व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने स्मार्ट शेतीसाठी (CDSA)इनोवेशन केंद्रात वापरल्या जाणाऱ्या प्रगत कृषी तंत्रज्ञान व नवकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव या भेटीदरम्यान घेतला. महाराष्ट्रात अशा प्रकारची अत्याधुनिक केंद्रे स्थापन करण्यासाठी शक्यता आणि कार्यपद्धती यांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना लाभ देणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. यावेळी शिष्टमंडळाने संपूर्ण नाविन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी केली.

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी केले बेंगळूर येथील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी  केंद्राच्या पाहणीनंतर  कृषी विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत नवप्रवर्तन केंद्राच्या कार्यपद्धती व पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानामुळे मिळणारे व्यावहारिक ज्ञान व कौशल्य, शेतकऱ्यांच्या अनुभवांद्वारे मिळालेला फायदा — उत्पादनवाढ, खर्चात बचत, आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल याविषयी सविस्तर चर्चा झाली.

केंद्रात सादर करण्यात आलेल्या तंत्रज्ञान व नवकल्पनांनी कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे प्रभावित झाले. त्यांनी अशा केंद्रांचा शेतीतील क्रांतीसाठी असलेला उपयोग आणि विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी उपक्रमांची माहिती घेऊन राज्यात त्याबाबत नक्कीच कार्यवाही करू  असेही सांगितले.

  • स्वयंचलित ट्रॅक्टर्स आणि कृषी अवजारे: स्वयंचलित ट्रॅक्टर व त्यांच्यासोबत चालणाऱ्या अवजारांची कार्यक्षमता व श्रमबचतीसाठी असलेले महत्त्व.
  • कृषी ड्रोन: ड्रोनचा वापर पिकांचे निरीक्षण, कीड ओळख, आणि अचूक फवारणीसाठी कसा करता येतो याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने या उपक्रमाची माहिती घेतली.
  • प्रेसिजन शेती तंत्रज्ञान: जी. पी. एस. आधारित प्रणाली व बदलत्या दराने खते व औषधे देण्याच्या प्रणालीसह अचूक शेती तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
  • शेती उपकरण डिझाईन लॅब्स: स्थानिक गरजांसाठी उपयुक्त व नवोन्मेषक्षम शेती उपकरणे तयार करणाऱ्या लॅब्सची यावेळी माहिती देण्यात आली.

 

0000

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटींची तरतूद -सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. 1 : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने 25 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, सद्यःस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या मालकीतील 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अधिकाऱ्यासमवेत आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली आहे. स्मारक उभारणीमुळे अण्णा भाऊ साठे यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे मंत्री शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, आमदार डॉ. अशोकराव माने, जिल्हाधिकारी अशोक काकडे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबातील सदस्य सचिन साठे उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमीला भेट देऊन शिल्पसृष्टीची ही पाहणी केली तसेच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

000

जैन समाजाच्या विकासाचा नवीन अध्याय सुरु -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १ : जैन समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेने शासन कार्य करीत आहे. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

मुंबई शहरातील मल्होत्रा हाऊस इमारतीत जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री लोढा यांच्या हस्ते तर अध्यक्षा आभा सिंह यांच्या उपस्थितीत झाले.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, जैन समाजाच्या विकास व उत्थानासाठी शासन कटीबद्ध आहे. महामंडळाच्या सुयोग्य व प्रभावी संचालनासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल.

महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महामंडळाचे कार्य विषद केले. त्यांनी 26 जिल्ह्यांचा दौरा करत 22 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केले. या दौऱ्यांदरम्यान जैन समाजासाठी महामंडळाच्या विविध योजनांच्या प्रसार व प्रचारासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले, असल्याचे त्यांनी सांगितले.

महामंडळासाठी केंद्राच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ, अध्यक्षा आभा राणी सिंह यांनी सांगितले. सरकारच्या विविध महामंडळांमध्ये जैन महामंडळाची स्वतंत्र व विशेष ओळख निर्माण करणे तसेच समाजामध्ये विविध सरकारी योजनांबाबत जनजागृती निर्माण करणे, हा एक सातत्यपूर्ण व यशस्वी प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

समारंभास महामंडळाचे उपाध्यक्ष मीतेश नहाटा, समन्वयक संदीप भंडारी, जवाहरभाई शाह, हितेश मोता, व्यवस्थापकीय संचालक जी.पी मकदूम, पंजाबी अकादमीचे अध्यक्ष बल मलकत सिंह, विकास आच्छा यांच्यासह जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.

श्रद्धा मेश्राम/ससं

000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्प’चे अनावरण संपन्न

नाशिक दि.१-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील पोलीस उपायुक्त कार्यालय, झोन-१ नाशिक येथील ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्प’चे अनावरण करण्यात आले.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव, कारागीर मोतीराम पवार, लक्ष्मण आतारकर, पोलीस शिपाई विशाल पवार यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

सामान्य माणूस व पोलीस यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, अशी कॉमन मॅन-पोलीस शिल्पाची संकल्पना आहे. या शिल्पाच्या सुशोभीकरणासाठी बसविण्यात आलेला दगड घडविण्याचे श्री.पवार व श्री.आतारकर यांनी केले आहे.
0000000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुशील आय केअर हॉस्पिटलचे उद्घाटन

नाशिक, दि. १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशील आय केअर हॉस्पिटलचे उद्घाटन केले. हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, सुशील पाटील, डॉ. शरद पाटील, डॉ .निधी पाटील व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुसज्ज अशा ऑपरेशन थिएटर व विविध सुविधा कक्षांचेदेखील यावेळी उद्घाटन केले.

चित्पावन ब्राह्मण संघाला सर्वतोपरी सहकार्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. १ : महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात चित्पावन ब्राह्मण समाजातील नामवंतांनी प्रत्येक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. चित्पावन ब्राह्मण संघास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

गुरूदक्षिणा सभागृहात आयोजित चित्पावन ब्राह्मण संघ नाशिक यांच्या श्री परशुराम भवन या नूतन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, माजी मंत्री डॉ. भारती पवार, संस्थेचे अध्यक्ष विजय साने, उपाध्यक्ष अविनाश भिडे, विश्वस्त देवेंद्र बापट, प्रा. दिलीप फडके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, चित्पावन ब्राह्मण संघाने अतिशय सुंदर वास्तू उभारलेली आहे. त्यांनी सुरू केलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. चित्पावन समाजातील अनेकांनी संघर्षातून पुढे येत स्वकर्तृत्वाने नावलौकिक मिळविला आहे. तसेच संघाने समाजात दुधात साखर विरघळते त्या प्रमाणे कार्य करावे. सर्व ज्ञातींनी एक होऊन कार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

श्री. साने यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी चित्पावन ब्राह्मण संघाची माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते देणगीदारांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला चित्पावन ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

0000

‘चक्र’ च्या माध्यमातून संशोधन, नवाचार आणि स्टार्ट अपला बळ मिळेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार

नाशिक दि. १: विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन, नवाचार आणि स्टार्ट अप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्यांतर्गत सुरू केलेले ‘चक्र’ ( सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) हे उपयुक्त ठरेल. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था यामधून निर्माण  होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’ चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (दूरदृष्यप्रणाली द्वारे), शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य विभागाचे मंत्री  नरहरी झिरवळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त),  प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने वैद्यकीय शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे असा विचार असून  गेल्या २ वर्षात शासकीय १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत.  आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गेल्या २५ वर्षात चांगले काम केले आहे.

वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी मार्गदर्शन करावे
परदेशी विद्यापीठे ज्याप्रकारे काम करतात, तसेच काम येथील विद्यापीठांनी करावे. विद्यापीठात संशोधनाला चालना मिळणे गरजेचे आहे, वेगवेगळ्या विषयांचे संशोधन केंद्र म्हणून विद्यापीठांनी काम केले पाहिजे.  उत्कृष्टता केंद्र, ईन्क्यूबेशन  केंद्र, स्टार्ट अप आणि विविध क्षेत्रात मार्गदर्शन करणारी केंद्रे म्हणून त्यांनी काम केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

देशात नवीन शिक्षण धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणले. समाजाची गरज आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचा धोरणात अंतर्भाव करण्यात आला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेलं ‘चक्र’ हे त्याचेच उदाहरण असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

सामान्य माणसाचे आरोग्य जपणारे संशोधन व्हावे
‘चक्र’सारखे मॉडेल आणि  हब अँड स्पोक ही पद्धती महत्वाची आहे. मागच्या काळात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नागपूर आयआयएम सोबत आदिवासी आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था  निर्माण  होणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

जगातल्या विद्यापिठाप्रमाणेच आपली विद्यापीठे  स्वयंपूर्ण होत आहेत. त्यासाठी असे प्रयोग गरजेचे आहेत. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आले आहे. मोठे बदल होत आहेत. नवे तंत्रज्ञान येत आहे. अशावेळी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पायभूत सुविधांचा  लाभ सामान्य माणसाला झाला पाहिजे. राज्यातील १३ कोटी नागरिकांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तालुकास्तरीय उपकेंद्रांनी या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. असे केल्यास खऱ्या अर्थाने जिल्हास्तरीय यंत्रणांना संशोधन आणि इतर बाबीकडे लक्ष देता येणे शक्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्यापीठाने आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये येत्या काळात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डिजिटल कुंभ सोबतच आरोग्यदायी कुंभ अशी संकल्पना राबवून यामध्ये योगदान द्यावे. विद्यापीठाच्या प्रत्येक उपक्रमात राज्य शासनाच्यावतीने पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या १५० दिवसांच्या कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विद्यापीठाने केलेल्या उपक्रमांबाबत आणि चक्र विषयक माहिती प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.

प्रास्ताविकात कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल श्रीमती कानिटकर यांनी प्रधानमंत्री यांच्या विकसित भारत संकल्पानुसार विद्यापीठाने काम सुरू केले असल्याचे सांगून चक्र आणि उत्कृष्टता केंद्र निर्मितीबाबतची माहिती दिली.
00

जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. १ : कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यातील अमृत स्नानाचे दिवसही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

साधू-महंतांच्या उपास्थितीत कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा होणे ही खऱ्या अर्थाने कुंभपर्वाची सुरूवात आहे, असे नमूद करू मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्याचे संचलन आखाडे, साधू -महंत करतात, राज्य शासन सेवक म्हणून अधिकाधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करते. यावेळी देखील शासनातर्फे उत्तम सुविधा उभारण्यात येतील. कुंभमेळ्याबाबत साधू महं तांचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. २०१५ मध्ये तयारीसाठी कालावधी कमी होता. यावेळी पूर्व तयारीसाठी अधिक कालावधी असल्याने शासन चांगली तयारी करीत आहे.

गोदावरी निर्मळ राहावी आणि कायम प्रवाही राहावी हेच कुंभचे उद्दिष्ट असून तसा शासनाचा प्रयत्न आहे. गोदावरीचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी उपायोजना करण्यात येत आहेत.  गोदावरीत जाणारे पाणी स्वच्छ असावे यादृष्टीने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी  निविदा काढण्यात येत आहेत. नदी पात्रात अशुद्ध पाणी जाऊ नये असे प्रयत्न करण्यात येतील. नदी प्रवाहित राहिल्यास शुद्ध राहील, त्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे कुंभ आणि त्यानंतरही गोदावरीचे जल निर्मळ राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

साधू-महंतांच्या सूचना लक्षात घेवून शासन आवश्यक नियोजन करेल, असे नमूद करतांना श्री.फडणवीस पुढे म्हणाले, आखाड्यासाठी आवश्यक सुविधा उपालब्ध करून देण्यात येतील. साधूग्रामची जागा कायमस्वरूपी उपयोगात यावी यासाठी जमिन अधिग्रहित करण्यात येईल. कुंभमेळ्यासाठी शहरात
रस्त्याचे जाळे तयार करण्यात येत आहे. कुशावर्त येथे गर्दी होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान असलेल्या चौंडीच्या विकासासाठी ६८१ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यांनी तयार केलेल्या घाटांचे संवर्धन करण्यात येत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथेदेखील उत्तम सुविधा उभारण्यात येतील. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. भाविक आणि साधू – महंतांची  सुरक्षितता महत्वाची असल्याने नियोजन करतांना सुरक्षा विषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले, यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यात अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने गर्दी नियंत्रणाचे मोठे आव्हान असणार आहे. तीन अमृत स्नानसोबत इतर पर्वस्नान होणार आहेत. कुंभमेळ्याची कामे वेगाने सुरू असून ४ हजार कोटींपेक्षा अधिक कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. लवकरच २ हजार ६०० कोटींच्या निविदा काढण्यात येणार आहेत. ही सर्व कामे जानेवारी २०२७ पूर्वी पूर्णत्वास येतील. या कामांसाठी सर्व आखाड्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. सर्वांच्या सहकार्याने यंदाचा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा चांगला आणि सुरक्षित होईल. इथे येणाऱ्या साधू-महंतांना सुखद आणि पावन अनुभव येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विविध आखाड्याच्या साधू-महंतांनी कुंभमेळा आयोजनाबाबत सूचना केल्या. यावेळी श्री रामानंद निर्मोही आखाडा, निर्मोही अनी आखाडा, श्री दिगंबर अनी आखाडा, निर्वाणी अनी आखाडा श्री पंचायती उदासीन आखाडा, श्री पंचायती नया उदासीन आखाडा, श्री पंचायती निर्मल आखाडा, श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा, श्री पंच अग्नी आखाडा, यांच्यासह विविध आखाड्यांचे पदाधिकारी, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, पुरोहित संघाचे त्र्यंबकेश्वर येथील अध्यक्ष मनोज थेटे आदी उपस्थित होते.

प्रारंभी सर्व साधू, महंतांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे मंत्रोच्चारात स्वागत केले. तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्व साधू, महंतांचे शासनातर्फे स्वागत केले.

नाशिक कुंभमेळा

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६, दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी (स्थळ-रामकुंड पंचवटी)
प्रथम अमृतस्नान-सोमवार २ ऑगस्ट २०२७,आषाढ सोमवती अमावस्या.
महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, श्रावण अमावस्या
तृतीय अमृतस्नान-शनिवार ११ सप्टेंबर २०२७, भाद्रपद शुद्ध एकादशी

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६,
प्रथम अमृतस्नान-सोमवार २ ऑगस्ट २०२७, आषाढ सोमवती अमावस्या.
महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, श्रावण अमावस्या
तृतीय अमृतस्नान-शनिवार १२ सप्टेंबर २०२७, भाद्रपद शुद्ध द्वादशी (वामन द्वादशी).

याशिवाय नाशिक येथे सिंहस्थ पर्व पर्वकालातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या वैधृती व्यतिपात योग हे दिवस भाविकांसाठी तीर्थस्थान, दर्शन पर्व असतील. नाशिक येथे कुंभमेळा २०२७ मध्ये मुख्य तीन पर्वण्याव्यतिरिक्त पर्वस्नानाचे एकूण ४४ मुहूर्त असून त्र्यंबकेश्वर येथे पर्वस्नानाचे एकूण ५३ मुहूर्त आहेत. भाविकांनी अमृत स्नानाशिवाय पर्वस्नानाचा दिवशी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

(सोबत सविस्तर वेळापत्रक आहे.)

०००००

ताज्या बातम्या

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रदीप कोकरे, डॉ. सुरेश सावंत यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

0
मुंबई, दि. १८: साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’  मराठी कादंबरीस ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या...

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर

0
मराठी आणि सिंधी भाषेसाठी महाराष्ट्रातील युवा साहित्यिकांची निवड डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळमाया’ याठी बाल साहित्य  अकादमी पुरस्कार जाहिर नवी दिल्ली, दि. १८: साहित्य...

धान साठा करण्यासाठी गोदामांची उभारणी करण्यात येणार-  मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. १८: आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी करण्यात येते. आदिवासी क्षेत्रात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान उघड्यावर राहून...

दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा – मंत्री अतुल सावे

0
मुंबई, दि. १८: राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास...

मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

0
मुंबई,दि. १८ : शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने तसेच सार्वजनिक व शासकीय अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना १००...