सोमवार, जून 16, 2025
Home Blog Page 435

मतदारांच्या सक्रीय सहभागाने मतदानाचा टक्का वाढणार -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. ११ : स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन, महापालिका आणि विविध संस्था, संघटनांच्या मदतीने आज अमरावती येथे मतदार जनजागृतीसाठी तिरंगा महारॅली काढण्यात आली.

नेहरू मैदान येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. राजकमल,  जयस्तंभ, इर्विन चौक मार्गे ही रॅली निघून विभागीय क्रीडा संकुलात समारोप करण्यात आला.

समारोपावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, महारॅलीचे आयोजन उत्कृष्ट प्रकारे झाले आहे. यात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली होती. मात्र, शहरी भागात मतदान कमी होत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचून जागरूकता करणे गरजेचे आहे. त्यांच्यापर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचल्यास मतदानाच्या टक्केवारीत निश्चितच वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य समजून मतदान करावे, असे आवाहन केले.

श्री. कलंत्रे यांनी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी रॅलीचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक शाळा रहाटगाव आणि प्रगती विद्यालय रहाटगाव यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच मतदानासाठी नागरिकांना जागरूक करण्यासाठी मान्यवरांनी हवेत फुगे सोडले.

विभागीय क्रीडा संकुलात मानवी साखळी करण्यात आली. यातून ‘गो वोट’चा संदेश देण्यात आला. तसेच मनपा शाळेने पथनाट्य सादर करण्यात आले. दिव्यांनी ‘गो वोट’ साकारण्यात आले. शिक्षणाधिकारी श्री. मेश्राम यांनी आभार मानले.

०००

 

 

 

८.१६ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

मुबंई, दि. ११ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ८.१६ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची दि. ९ डिसेंबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि. १० डिसेंबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १० डिसेंबर २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या  शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.१६ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोकऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ/

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात १०३ ज्येष्ठ नागरिकांसह ११ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई, दि. ११ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ रोजी मतदान होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या, प्रपत्र १२ ड भरलेल्या ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदान पथकामार्फत घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात आज एकूण १०३ ज्येष्ठ नागरिक आणि ११ दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

मुंबादेवी मतदारसंघात ८५ वर्षांवरील एकूण ११८ ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत, त्यापैकी १०३ अर्जदारांनी, तसेच १३ पैकी ११ दिव्यांग मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. या ११४ अर्जदारांचे आज गृह टपाली मतदान घेण्यात आले.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत ८५ वर्षांवरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

भारत निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या घरपोच मतदान सुविधेचे स्वागत केले असून, टपाली मतदान पथकाचे आभार मानले आहेत.

०००

मुद्रित माध्यमांमध्ये जाहिरातीसाठी एमसीएमसी पूर्व प्रमाणिकरण अनिवार्य

मुंबई, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या मतदान दिवसापूर्वी आणि मतदानादिवशी मुद्रित (प्रिंट) माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला अडथळा येईल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत, याबाबत मुद्रित माध्यम व सर्व संबंधितांना दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

तसेच कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या मतदानादिवशी (दि. २० नोव्हेंबर २०२४) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) मुद्रित  माध्यमांत कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व – प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत प्रकाशित करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. तरी सर्व संबंधितांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी कळवले आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ/

उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना २० नोव्हेंबर रोजी मतदानासाठी सुट्टी

मुंबई, दि. ११ : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ही सूचना जारी केली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार, निवडणूक क्षेत्रातील कोणत्याही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांत काम करणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीस मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. तसेच पोटकलम (१) नुसार या सुट्टीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्यास, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने नमूद केले आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ/

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त आचारसंहिता भंगाच्या ४,६८३ तक्रारी निकाली

मुंबई, दि. ११ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत दि. १५ ऑक्टोबरपासून आजपर्यंत एकूण ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

सोबत : जिल्हानिहाय तक्ता

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/11/seizure-all-distwise-report-2024-11-11-1731303146.pdf”]

०००

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची उद्या ‘जय महाराष्ट्र’ तर १२ व १३ रोजी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. ११: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि  ‘दिलखुलास’ कार्यक्रमात  ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता राज्य निवडणूक आयोगाची तयारी’  याविषयावर राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

डॉ. कुलकर्णी यांची मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवार दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर प्रसारित होणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. १२ आणि बुधवार दि. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची ही निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत नियोजनबद्ध तयारी करण्यात आली आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी आणि उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोई सुविधा, मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले उपक्रम, कायदा व सुव्यवस्था, राज्यातील सर्वच घटकातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी केलेली तयारी याबाबत डॉ. कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे. 

०००

मतदार जनजागृतीसाठी फिरत्या वाहनाद्वारे प्रचार शुभारंभ व बाईक फेरी

नंदुरबार, दि. ११ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान जनजागृती (SVEEP) उपक्रमासाठी केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान जनजागृतीसाठी पाठविण्यात आलेल्या डीजिटल व्हॅन व बाईक रॅलीच शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते नंदुरबार शहरात करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, नंदुरबार विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, शरद पाटील, सचिन गोसावी, नंदुरबार तालुक्याचे सर्व केंद्रप्रमुख, नंदुरबार तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच नंदुरबार तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून रॅलीस सुरुवात होऊन नवापूर चौफुली- धुळे चौफुली- श्रॉफ हायस्कुल-छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर-अंधारे चौक- नगरपालिका-नेहरू पुतळा-गांधी पुतळा- उड्डाण पूल-सिंधी कॉलनी या मार्गाने रॅलीचे आयोजन होऊन शहरातील एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीचा शुभारंभ SVEEP चा झेंडा तसेच हिरवा झेंडा दाखवून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान जनजागृतीसाठी पाठविण्यात आलेल्या डीजिटल व्हॅनला देखील हिरवी झंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. ही व्हॅन नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदार जागृतीचे उपक्रम राबविणार आहे. रॅलीच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते निवडणुकीचे घोषवाक्य लावलेले फुगे हवेत सोडून मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य, निवडणूक गीत तसेच फ्लॅश मॉब अंतर्गत निवडणुकीच्या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. समारोप प्रसंगी उपस्थितांना मतदानाची शपथ देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.

०००

लोकशाही बळकटीकरणसाठी उत्स्फूर्तपणे मतदान करा – अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर

  • मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि नव मतदारांना मतदान करण्याकरिता प्रेरित करण्यासाठी उपक्रम
  • मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय संचार ब्यूरोचा उपक्रम

सोलापूर. दि. ११ : भारतीय  लोकशाहीला बळकट करण्यासाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. विशेषतः नव मतदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी आज येथे केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि नव मतदारांना मतदान करण्याकरिता प्रेरित करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित स्वीप मल्टीमीडिया व्हॅनच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमती ठाकूर बोलत होत्या.

यावेळी केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, स्वीपचे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, शिक्षणाधिकारी कादर शेख, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ राजेंद्र वडजे, सरकारी कामगार अधिकारी विलास गायकवाड, समाज कल्याण अधिकारी सचिन कवले आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मागील विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण अल्प असलेल्या भागांमध्ये मल्टीमीडिया व्हॅनच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. ही व्हॅन सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातील १०० हून अधिक ठिकाणी प्रवास करेल, ज्यात मतदानाचे प्रमाण अल्प असलेल्या भागांचा समावेश आहे. ही व्हॅन मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची ठिकाणे, आदर्श आचारसंहिता आणि कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाबाबत तक्रारी दाखल करण्यासंबंधाची माहिती आणि ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केल्याचे व्हिडिओ संदेश एलईडी स्क्रीनवर पाहता येणार आहे.मतदारांचा सहभाग वाढविणे आणि नागरिकांना निवडणूक प्रक्रियेबद्दल साक्षर करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मतदान करण्याची शपथ दिली. शाहीर रमेश खाडे यांच्या पथकाने मतदान करण्याविषयी गाण्याच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावर्षी प्रथमच मतदान करत असलेल्या भाग्यश्री अंकलगी आणि नागेश सोनसाखळे यांनी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत सर्वानी मतदान करावे, असे आवाहन केले. या नव मतदारांचा अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी स्वीपचे सहायक नोडल अधिकारी रुपाली भावसार, गोदावरी राठोड, स्वाती स्वामी, अमोल भोसले, शाहबाज काजी, अनिल थोरबोले, साईराज राउळ, योगीराज कोंडाबत्तीन आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संगमेश्वर कॉलेज आणि वालचंद महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

मतदार जनजागृतीसाठी फिरत्या वाहनाद्वारे प्रचाराचा शुभारंभ आणि बाईक फेरी संपन्न

नंदुरबार, दि. 11 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान जनजागृती (SVEEP) उपक्रमासाठी केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान जनजागृतीसाठी पाठविण्यात आलेल्या डिजिटल व्हॅनचा व बाईक रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते नंदुरबार शहरात करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, नंदुरबार विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, शरद पाटील, सचिन गोसावी, नंदुरबार तालुक्याचे सर्व केंद्रप्रमुख, नंदुरबार तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच नंदुरबार तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ‌्या प्रमाणावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून रॅलीस सुरुवात होऊन नवापूर चौफुली- धुळे चौफुली- श्रॉफ हायस्कुल-छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर-अंधारे चौक- नगरपालिका-नेहरू पुतळा-गांधी पुतळा- उड्डाण पूल-सिधी कॉलनी या मार्गाने रॅलीचे आयोजन होऊन शहरातील एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्रांगणात रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीचा शुभारंभ SVEEP चा झेंडा तसेच हिरवा झेंडा दाखवून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या  केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान जनजागृतीसाठी पाठविण्यात आलेल्या डिजिटल व्हॅनला देखील हिरवी झंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. सदर व्हॅन नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदार जागृतीचे उपक्रम राबविणार आहे.

रॅलीच्या समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते निवडणुकीचे घोषवाक्य लावलेले फुगे हवेत सोडून मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य, निवडणूक गीत तसेच फ्लॅश मॉब अंतर्गत निवडणुकीच्या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. समारोपप्रसंगी उपस्थितांना मतदानाची शपथ देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.

0000000000

ताज्या बातम्या

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक,दि.१५: शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावेत, अशा...

नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनआढावा

0
सातारा दि. १५ (जिमाका): नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याच्या आढाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यातील दरे येथे बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष...

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

0
पुणे, दि. १५: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन...

महिला सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि.१५: महाराष्ट्राने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेतला आहे. राज्य नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्नशील असून त्यांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन...

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहवेदना

0
मुंबई, दि. १५: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना धक्कादायक आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे तसेच...