रविवार, जून 15, 2025
Home Blog Page 437

आचारसंहिता भंगाच्या २८१९ तक्रारी निकाली

  • विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४

मुंबई, दि. ६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण २८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

२८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण २८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

०००

विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिक शाईच्या बाटल्या

  • विधानसभा निवडणूक २०२४

मुंबई, दि. ६ : विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे.

राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांबरोबरच अधिकच्या म्हणून काही अशा एकूण २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्या, मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात मतदान केंद्रानिहाय पोहोचविण्याची निवडणूक यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु आहे.

यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकरिता राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई विशेषरित्या बनवली जाते. या सर्व शाईच्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्यांना पुढील वाटपासाठी ताब्यात देण्यात येत आहेत.

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात.

०००

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात १ लाखांहून अधिक मतदान केंद्र

मुंबई, दि. ६ : विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 579, ठाणे – 6 हजार 955, नाशिक – 4 हजार 922 तर नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत.

निवडणूक आयोगाने शहरी भागातील मतदाराची अनास्था विचारात घेऊन गृहनिर्माण संकुलात मतदान केंद्र उभारली आहेत तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील मतदारांना मतदान केंद्राच्या जवळ लवकरात लवकर पोहोचता यावे यासाठी मतदान केंद्राची संख्या वाढवली आहे.

महाराष्ट्रातील 241 विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 186 असून त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 इतकी मतदान केंद्र संख्या राहणार आहे. सहायक मतदान केंद्रांची संख्या 241 इतकी आहेत. गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे मतदारांची सोय आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित होईल. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात पोहोचता यावे यासाठी बऱ्याच ठिकाणी आवश्यक रॅम्पची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष

यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने मतदार सुविधांमध्ये सुधारणा केली आहे, जसे की मतदार सहाय्य केंद्रे,  मतदार हेल्पलाईन, आणि सूचना फलक यांचा समावेश आहे. तरुण मतदार, महिला मतदारांना लक्षात ठेवून हे उपाय योजले आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्येही मतदान केंद्र

शहरी भागांमध्ये जसे की मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरामध्ये अतिउंच इमारती आणि सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये 1 हजार 181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे. तसेच झोपडपट्टीमध्ये 210 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे.

नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता

निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मतदार आपले मतदान केंद्र शोधण्यासाठी ऑनलाइन पोर्टल आणि मोबाइल अॅप्स वापरू शकतात. मतदार जागरूकता मोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मतदारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील.

राज्यातील एकूण मतदानकेंद्राचा दृष्टीक्षेप

मतदान केंद्रांची संख्या जिल्हानिहाय

  1. पुणे – 8462
  2. मुंबई उपनगर – 7579
  3. ठाणे – 6955
  4. नाशिक – 4922
  5. नागपूर – 4631
  6. अहमदनगर – 3765
  7. सोलापूर – 3738
  8. जळगाव – 3683
  9. कोल्हापूर – 3452
  10. औरंगाबाद – 3273
  11. सातारा – 3165
  12. नांदेड – 3088
  13. रायगड – 2820
  14. अमरावती – 2708
  15. यवतमाळ – 2578
  16. मुंबई शहर – 2538
  17. सांगली – 2482
  18. बीड – 2416
  19. बुलढाणा – 2288
  20. पालघर – 2278
  21. लातूर – 2143
  22. चंद्रपूर – 2077
  23. अकोला – 1741
  24. रत्नागिरी – 1747
  25. जालना – 1755
  26. धुळे – 1753
  27. परभणी – 1623
  28. उस्मानाबाद – 1523
  29. नंदूरबार – 1434
  30. वर्धा – 1342
  31. गोंदिया – 1285
  32. भंडारा – 1167
  33. वाशिम – 1100
  34. हिंगोली – 1023
  35. गडचिरोली – 972
  36. सिंधुदुर्ग – 921

एकूण : 1,00,427 मतदान केंद्र

००००

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- हिर्देशकुमार, उपायुक्त भारत निवडणूक आयोग 

  • विधानसभा निवडणूक २०२४

छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका): निवडणूक प्रक्रिया राबविताना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले.

येथील स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप, उपसचिव सुमनकुमार, संजयकुमार, अभिलाष कुमार, अनिलकुमार, अविनाशकुमार तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.

प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता जपा

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनाच सर्व प्रक्रिया राबवावयाची आहे. राबवित असलेल्या निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी व प्रक्रिया राबवावी. त्याचे दस्तऐवजीकरण करावे. त्यांचे शंकानिरसन करावे. निवडणूक प्रक्रिया राबवितांना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,असे हिर्देशकुमार यांनी सांगितले.

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा

मतदार याद्यांबाबतही योग्य ती काळजी घेऊन त्या याद्या अधिक बिनचूक असाव्यात. प्रत्येक मतदारापर्यंत मतदान चिठ्ठ्या वेळत पोहोचतील याचे नियोजन करा. मतदार याद्यांविषयी असलेल्या तक्रारींबाबत तात्काळ दखल घ्यावी. मतदान केंद्रांबाबतही सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. प्रत्येक मतदान केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था, तात्पुरत्या मतदान केंद्रांची मान्यता घेणे, मतदान केंद्राचे ठिकाण बदलले असल्यास त्याबाबत मतदारांपर्यंत माहिती पोहोचविणे, त्याची प्रसिद्धी करणे, विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करणे जसे. पर्यावरणपूरक, महिलांनी, दिव्यांग कर्मचाऱ्यांनी संचलित केलेले इत्यादी मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, सावली इत्यादी सुविधांची निर्मिती, तसेच वेब कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे लावून मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करणे, मतदान केंद्राच्या बाहेर व आत कॅमेरे लावावे इत्यादी सुचना दिल्या. तसेच या सर्व सुविधांची पूर्तता झाल्याबाबत व आवश्यकतांबाबत स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांनी स्वतः पाहणी करुन खातरजमा करावी, असे निर्देशही देण्यात आले.

यंदा मतदान नोव्हेंबर महिन्यात असून सूर्यास्त लवकर होईल, अशा वेळी सायंकाळी मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाशासाठी दिवे लावण्याची सुविधा करावी, अशी सुचना देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रात मोबाईल नेता येणार नाही, याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. टपाली मतदान व गृह मतदान प्रक्रियेबाबतही यंत्रणांनी पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित राबवावी. गृह मतदान कार्यक्रम अगोदर जाहीर करावा. त्याबाबत उमेदवारांना कळवावे.

मतदान कर्मचाऱ्यांसाठी सुविधा द्या

निवडणूक कामकाजासाठी लागणारे पुरेस मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करावी. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जेवण, पिण्याचे पाणी, कामकाजाची सुविधा, मतदान केंद्रांवर गेल्यावर मुक्काम, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता, भोजन, पाणी याबाबतची व्यवस्था पुरविण्यात यावी. महिला कर्मचाऱ्यांना विशेष सुरक्षा व सोयी सुविधा द्याव्या. निवडणूक कामकाजात कर्मचाऱ्यांना अचानक उद्भवणाऱ्या आजारांसाठी तात्काळ वैद्यकीय सेवा देण्याचे नियोजन असावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्या. प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्याची योग्य काळजी घेतली जाईल, याची खबरदारी घ्यावी.

सी – व्हिजील वरील तक्रारींचे तात्काळ निराकरण करा

प्रत्येक जिल्ह्यात व विधानसभा क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी  सर्व संलग्न जिल्ह्यांच्या पोलीस यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवावा. मद्य, अंमलीपदार्थ, मौल्यवान वस्तू, रोकड यांच्या अवैध वाहतुकीवर नजर ठेवून कारवाई करावी. याबाबत सी व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करावी. या तक्रारींचे तात्काळ निराकरण  झाले पाहिजे, याबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

फेक न्यूजला तात्काळ पायबंद

निवडणूक काळात माध्यमांमध्ये येणाऱ्या बनावट बातम्या, फेक न्यूज अर्थात खोट्या माहितीचे प्रसारण तात्काळ रोखावे. खोटी माहिती असल्यास तिचे प्रसारण रोखून सत्य माहितीचे तात्काळ प्रसारण करावे.  याबाबत या विभागाशी संबंधित बातम्या असतील त्यांनी तात्काळ योग्य माहिती पुरवावी व वस्तूस्थिती जनतेसमोर मांडावी, जेणेकरुन निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होणार नाही व त्याबाबत गैरसमज निर्माण होणार नाही.

मतदार जनजागृतीवर भर द्या

मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी आयोगामार्फत लवकरच ‘स्विप’ उपक्रम मोठ्याप्रमाणावर राबविले जाणार आहेत. ते सर्व उपक्रम आपल्या विधानसभा क्षेत्रात राबवावे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करावे. मतदारांना मतदान करणे सोईचे व सुलभ व्हावे यासाठी उपाययोजना राबवाव्या.

अचूक आकडेवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी

मतदानाचे प्रमाण नेमके कळावे व त्यातील आकडेवारीत अधिक अचूकता यावी यासाठी या निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी विधानसभा मतदार संघस्तरावर, जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर नेमण्यात येणार आहे. मतदान टक्केवारीची आकडेवारी बुथनिहाय पडताळणी करुन मतदान टक्केवारी अचूक देण्यात येईल यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचेही निवडणूक उपायुक्त यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. चोकलिंगम म्हणाले की, राजकीय पक्ष उमेदवारांना वेळोवेळी अद्यावत निर्णय व माहिती देऊन अवगत करावे.मतमोजणी साठी मतमोजणी केंद्राच्या पुनर्रचनेचा आराखडा नव्याने मंजूर करावयाचा असल्यास त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावे. टपाली मतमोजणीबाबतच्या व्यवस्थेसह आराखडा मंजूर करावा. निवडणूक कामकाजाविषयी सर्व अहवाल वेळेत व अचूक पाठविणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही दिरंगाई व हयगय खपवून घेतली जाणार नाही. सर्व आकडेवारी अचूक पाठवावी. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आपल्या अंतर्गतअसलेल्या सर्व विधानसभा क्षेत्रातील कामकाजावर लक्ष ठेवावे. पैशांचा वापर. माध्यमांमध्ये येणारी माहिती, आणि असामाजिक तत्वांचा वावर याबाबत सजग राहून वेळीच कारवाई करावी.

बैठकीस नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत  राऊत, परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी, गोंदिया जिल्हाधिकारी प्राजित नायर, भंडारा जिल्हाधिकारी संजय कोलते, वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी. एस, वर्धा जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने, हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल, धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओबांसे, लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, नागपुरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल तसेच बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव,गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे, चंद्रपूर पोलीस अधीक्षक रिना जानबंधू, लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल, परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी,  हिंगोली पोलीस अधीक्षक एस. डी. कोकाटे, भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन  तसेच दूरदृश्य पद्धतीने सर्व जिल्ह्यातील अधिकारी व या निवडणुकीसाठी नेमलेले निवडणूक आयोगाचे निरीक्षक सहभागी झाले होते.

०००

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

  • निवडणूक आयोगाची छत्रपती संभाजीनगरला बैठक
  • जिल्ह्यातील निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा सादर

अमरावती, दि. ६ : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान यंत्र, निवडणुकीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, यंत्रणा यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिली.

निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर येथे अमरावती विभागातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा घेतला. या बैठकीत श्रीमती पाण्डेय यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह सामान्य निवडणूक निरीक्षक श्यामलाल पुनिया, बिधानचंद्र चौधरी, रवी राजन कुमार विक्रम, पोलीस निरीक्षक बत्तुला गंगाधर, खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ, डॉ. उमा माहेश्वरी आदी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहेत. त्यानुषंगाने फिरते पथक, स्थिर पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रत्यक्ष निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात त्यांचे दुसरे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातील दूर्गम भागातील मतदान केंद्राशी संपर्क साधण्याची सुविधा वनविभाग व पोलीसांच्या संपर्क यंत्रणांच्या सहाय्याने कार्यान्वित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांना निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भेटी देऊन या ठिकाणच्या सोयी सुविधांची पाहणी करणार आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना योग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबतच निवडणूक कामांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सेक्टर ऑफिसर, पोलीस, होम गार्ड यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहे. 85 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदान दि. 9 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे, याची राजकीय पक्षांना माहिती आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. याचे दस्तावेज निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तयार करण्यात आले आहे. यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी स्वीपचे उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रामुख्याने शहरी भागात आणि लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या भागात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी फिरते पथक, स्थिर पथक, खर्च पथक प्रभावीपणे कार्य करीत आहे.

०००

मतदार जनजागृती रथाला जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दाखविला हिरवा झेंडा

जळगाव, दिनांक 6 नोव्हेंबर (जिमाका वृत्त) : मतदानाबाबत जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून मतदार जनजागृती रथाला जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखविली. व्हाईस ऑफ मीडिया व मंगळ ग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर जिल्हाधिकारी भिमराज दराडे, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, जिल्हा सहाय्यक नियोजन अधिकारी राहुल इधे , जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जैन उद्योग समूहाचे मीडिया डायरेक्टर अनिल जोशी, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, ग.स पतपेढीचे संचालक राम पवार, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, तालुकाध्यक्ष उमेश काटे, अजय भामरे, ज्येष्ठ सल्लागार विवेक अहिरराव, उमेश धनराळे, मिलिंद पाटील, जयंतलाल वानखेडे, बापूराव ठाकरे, शरद कुलकर्णी, दिनेश नाईक, दयाराम पाटील, जगदीश पाटील, उमाकांत ठाकूर, राहुल पाटील, किरण चव्हाण, संजय पाटील, हेमंत वैद्य आदी उपस्थित होते. दरम्यान मतदार जनजागृती रथ जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात गावोगावी फिरून लोकांना मतदानाबाबत जागृती करणार आहे.

या रथाच्या माध्यमातून मतदारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे गीत-संगीताच्या सहाय्याने आवाहन करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हाईस ऑफ मीडियाने सुरू केलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. या मतदार जनजागृती रथामुळे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार आहे. या उपक्रमाचा आदर्श घेत इतर सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडिया यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जनजागृती रथ या उपक्रमाचे कौतुक केले.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. रथाच्या माध्यमातून “ तू लढला नाहीस तरी चालेल, पण विकला जाऊ नकोस”, “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” आदी मतदारांना उद्देशून घोष वाक्य यावर आहेत.

0 0 0 0 0 0

स्वीप अंतर्गत भोकर येथे तृतीयपंथी मतदारासाठी विशेष कार्यक्रम

नांदेड दि. 5 नोव्हेंबर:- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम घेतले जात आहेत. भोकरमध्ये स्वीप अंतर्गत  तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या उपक्रमात मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली आणि मतदानासाठी स्वाक्षरी मोहीम तसेच सेल्फी काढून या उपक्रमात सहभाग नोंदवला.

भोकरमध्ये मतदार जागृतीच्या दृष्टीने आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात तृतीयपंथी मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. त्यांनी स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घेतला आणि मतदान करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाद्वारे तृतीयपंथी मतदारांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांनी मतदानाच्या प्रक्रियेतील पारदर्शकता व जबाबदारी या विषयी माहिती दिली. यावेळी सुमन गोणारकर यांनी मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती दिली आणि त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाने तृतीयपंथी मतदारामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला. या कार्यक्रमामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.  यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जकियोद्यीन शेख, मिलिंद जाधव, सुधांशु कांबळे आदींची उपस्थिती होती.

०००००

कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सोलापूरदि. 05: – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून लाखो वारकरी भाविक येतात. दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी कार्तिकी एकादशी असून यात्रेचा कालावधी दि. 02 ते 15 नोव्हेंबर 2024 असूनवारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देवून आवश्यक उपाययोजना  तात्काळ  कराव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयनियोजन भवन  येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादमुख्यकार्यकारी अधिकारी कुलदिप जंगमजिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णीअप्पर  पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलजिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवारजिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले,प्रांताधिकारी सचिन इथापेव्हीसीव्दारे मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेमुख्यधिकारी प्रशांत जाधवसां.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निंबकर यांच्यासह संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

कार्तिकी यात्रा  सोहळा यशस्वी व निविघ्नपणे पारपाडण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. नगरपालिकेने यात्रा कालावधीत स्वच्छतेसाठी जादा स्वच्छता कर्मचारी यांची उपलब्धताटॉयलेट स्वच्छतापिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था आदी  कामे तात्काळ करावीत. पोलीस प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे तसेच मंदीर समितीनेही जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. मंदीर समिती पत्राशेडदर्शन रांग तसेच दर्शन रांगेमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चर ऑडीटफायर ऑडीट व इलेक्ट्रीक ऑडीट करुन घ्यावे. आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना ज्याप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या त्याप्रमाणेच कार्तिकी यात्रा कालावधीतही  सुविधा उपलब्ध करुन कार्तिकी यात्रा सोहळा पार पाडावा अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणालेनगरपालिकेने शहरातील खड्डे तात्काळ बुजवावेत चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे. तसेच अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तसेच प्रसादलयाच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी जादा पथकाची नेमणूक करावी.

मुख्यकार्यकारी अधिकारी श्री जंगम म्हणालेकार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुबलक औषध पुरवठ्यासह औषधोपचार केद्रांची व बाईक ॲब्युलन्सची संख्या  वाढविण्यात आली असून तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कार्तिकी यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने जनावरांच्या औषधोपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथके नेमण्यात आली आहेत.

यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत  प्रशासनाकडून   करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. तर मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना जलद व सुखकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले  तसेच  नगरपालिका प्रशासनाकडून भाविकांच्या स्वच्‍छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता. स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची  नेमणूकनदी पात्रातील स्वच्छतातात्पुरते शौचालय व्यवस्था65 एकर येथे आवश्यक सर्व सुविधा भाविकांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशात जाधव यांनी सांगितले.

0000

निवडणूक पारदर्शकता : राजकीय पक्षांचा सहभाग आणि महत्त्व

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि योग्यरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्राधान्य आहे. या दृष्टिकोनातून निवडणूक यंत्रणा विविध टप्प्यांवर आवश्यक खबरदारी घेत आहे. मतदान प्रक्रियेत राजकीय पक्षांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो, कारण त्यांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीतील पारदर्शकतेला अधिक बळ मिळते. म्हणूनच, विविध टप्प्यांवर राजकीय पक्षांचे उमेदवार आणि प्रतिनिधी यांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते.

मतदार यादीचे पुनरिक्षण

राज्यभरात मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. या प्रक्रियेत, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी संबंधित मतदान केंद्रांच्या मतदार यादीवर लक्ष ठेवतात, ज्यात नवीन मतदारांची नोंदणी, तसेच वगळलेली नावे यांची तपासणी केली जाते. यामध्ये, बुथ लेवल अधिकारी यांना मदत करण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सक्रियपणे सहभागी होतात. जिल्हा निवडणूक अधिकारी आपल्या कार्यवाहीचे दस्तऐवजीकरण करून राजकीय पक्षांना आवश्यक माहिती देतात.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील  मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे  स्थानिक प्रतिनिधी यांच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत बैठका घेतल्या जातात. सभेची सूचना  राजकीय पक्षाच्या अधिकृत ईमेल आयडीवर त्यांना पाठविली जाते.  या बैठकींना राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहुन  शंका  आणि अडचणी मांडतात. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत शंकांचे निरसन केले जाते. तसेच आवश्यकता भासल्यास भारत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शनासाठी पाठविले जाते.

ईव्हीएम प्रक्रिया

मतदान यंत्राबाबत ( ईव्हीएम ) प्रकियेमध्ये राजकीय पक्षांचा वेळोवेळी सहभाग आवश्यक आहे, तशा निवडणूक आयोगाच्या स्पष्ट सूचना आहेत. मतदान यंत्र ठेवलेले गोडाऊन उघडण्याच्या वेळेस आणि  बंद करण्याच्या वेळेस  राजकीय पक्षाचे स्थानिक प्रतिनिधी यांना आमंत्रित केले जाते.  ईव्हीएम मशीन्स त्यांच्या समक्ष उघडून सीलबंद करण्याची कार्यवाही केली जाते.  यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत व्हिडिओ  शुटींग देखील केली जाते.

आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी निवडणुकीची तयारी म्हणुन जिल्हास्तरावर  ईव्हीएम मशिन्स उपलब्ध झाल्यानंतर कंट्रोल युनिट, व्हिव्हिपॅट आणि बॅलेट युनिट यांची संख्या निश्चित करुन निवडणुकीसाठी किती मशिन्स आवश्यक आहेत तेवढ्या प्रमाणात उपलब्धता निश्चित केली आते.

‘फस्ट लेव्हल चेक’ म्हणजे प्रत्येक मशिनची तपासणी करुन ते चालू अवस्थेत आहे की नाही,  त्यामध्ये बिघाड आहे काय?, त्यांची सर्व बटने व्यवस्थित काम करत आहेत किंवा कसे? यांची तपासणी केली जाते. ही तपासणी  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ह्या केंद्र शासनाच्या संस्थेचे अभियंते करत असतात. या तपासणीच्या वेळेस जिल्हा पातळीवर राजकीय पक्षाचे स्थानिक प्रतिनिधी यांना निमंत्रित केले जाते. त्यांच्या समक्ष तपासणीची कार्यवाही पूर्ण करुन मॉकपोल ही प्रक्रिया राबविण्याकरिता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होतात. त्यावर अल्फा, बिटा अशा चिन्हांचा उपयोग करुन एका चिन्हाचे बटन दाबले तर दुसऱ्या चिन्हाची प्रिंट स्लिप निघत नाही याबाबत तपासणी करुन स्थानिक राजकीय प्रतिनिधींची खात्री झाल्यावर ते मशिन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी तयार ठेवले जाते. मॉकपोल झाल्यावर राजकीय पक्षांसमक्ष सर्व मशिन्स गोडाऊन मध्ये सीलबंद ठेवली जातात.

महाराष्ट्र राज्यामध्ये ‘फस्ट लेव्हल चेक’ प्रक्रिया १ ऑगस्टपासून राबविण्यात आली असून मशिन्स सीलबंद करुन ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचेशी चर्चा करुन त्याच्या उपस्थितीत  प्रक्रिया पूर्ण केली जाते. या प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींग करुन जतन करुन ठेवण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यात राजकीय  पक्षांनी स्थानिक  प्रतिनिधींमार्फत ‘एफएससी’ प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे.

‘एफएससी’ ओके असे स्टीकर लावलेल्या मशिन्सच्या गोडावून मधील एकूण मतदान केंद्र संख्येच्या ५ टक्के मशिन्स प्रशिक्षण आणि जनजागृतीसाठी वापरण्यात आल्या आहेत. जनजागृती कामासाठी ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर असा कालावधी होता. त्यानंतर मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रिया प्रात्यक्षिक करण्यासाठी त्याच मशिन्स उपयोगात आणल्या जात आहेत. या मशिन्स प्रत्यक्ष निवडणुकीकरिता वापरल्या जाणार नाहीत.

त्यानंतर कमिशनिंग प्रक्रियेवेळी मशिन्सची सिंबॉल लोडिंग ही प्रक्रिया केली जाते. यासाठी  दि.१० नोव्हेंबरपासून वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे आणि अशाप्रकारे कमिशनिंग पुढील ४ ते ५ दिवसात पूर्ण होईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींना निमंत्रित करुन त्यांच्या समक्ष कमिशनिंग केले जाते. मॉकपोलमुळे तयार होणाऱ्या ‘व्हीव्हीपॅट’ च्या वोटर स्लीप एकत्रित करुन त्याची विल्हेवाट लावली जाते. स्थानिक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी समक्ष मतदानासाठी सिध्द असलेली सर्व मशिन्स कडेकोट बंदोबस्तात गोडाऊनमध्ये ठेवले जातात.

मतदान अधिकाऱ्यांच्या यादीचे निवडणूक आयोगाच्या परराज्यातील निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये सरमिसळीकरण (randomisation) केले जाते. त्यामुळे कोणत्या कर्मचाऱ्यास कोणत्या मतदान केंद्रावर निवडणुकीच्या कामासाठी जावे लागणार हे मतदान केंद्रावर जाण्यास पथके निघतात तेव्हाच कळते. त्याचप्रमाणे मतदान केंद्रासाठी कंट्रोल युनिट, ‘व्हीव्हीपॅट’, बॅलेट युनिट  यांचे सरमिसळीकरण (randomization) होते आणि कोणत्या मतदान केंद्रावर कोणकोणत्या  कर्मचाऱ्याजवळ कोणते मशिन्स जाणार यांचे संगणकाद्वारे वाटप होते. ही प्रक्रिया राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींसमोर केली जाते व त्याबाबतचे इतिवृत्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीसह जतन केली जाते. कोणत्या नंबरचे कोणते मशिन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार त्याची यादी उमेदवारांना दिली जाते.

मतदान यंत्र संच घेऊन मतदान पथक मतदान केंद्रावर जायला निघतात, तेव्हा राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींसमोर गोडाऊन उघडले जाते आणि सरमिसळीकरण (randomization) नुसार तिन्ही मशिन्स मतदान अधिकाऱ्यांच्या पथकाकडे सुपुर्द केली जातात. प्रत्यक्ष मतदान सुरु होण्याच्या आधी मतदान केंद्रावर उमेदवार किंवा उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी यांच्यासमोर ‘मॉकपोल’ घेतला जातो. मशिन्स व्यवस्थित चालू आहेत की नाही याची खात्री मतदान प्रतिनिधी यांना पटल्यावर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात केली जाते. मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मतदानाच्या गोपनीयतेचा भाग वगळून मतदान अधिकारी यांची सर्व कामे प्रत्येक मतदान केंद्रात उमेदवाराच्या प्रतिनिधी समक्ष घडतात.

मतदान संपल्यावर तिन्ही मशिनचा तपशील मतदान प्रतिनिधी समक्ष तपासला जातो व मशिन्स सीलबंद केली जातात. मतदान यंत्रांच्या वाहतुकीदरम्यान उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी वाहनाचे सिलिंग स्वत: पाहु शकतात. सिलिंग करणे अथवा उघडणे या प्रक्रियेदरम्यान व्हिडिओ शुटींग देखील केली जाते.

मतदानाच्या वेळेस देखील मशिन्स उघडणे व बंद करतेवेळेस उमेदवाराचे स्थानिक प्रतिनिधी उपस्थित असतात. त्यांच्या उपस्थितीबाबत मतदान यंत्रावरील लावण्यात येणाऱ्या स्लीपवर ते स्वाक्षरी करु शकतात.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या पातळीवर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी बैठका वेळोवेळी घेण्यात येतात. सदर बैठकीमध्ये निवडणूक प्रक्रियेसंबंधी माहिती दिली जाते आणि शंकांचे निरसन  केले जाते.

आपल्या महाराष्ट्र राज्याला शांततापूर्ण निवडणूक आणि मतदान प्रक्रियेची सवय आहे. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार  आणि संबंधित सर्व घटकांचा सहभाग याबाबत प्रत्येक टप्यावर खबरदारी घेतली जाते. महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या निवडणुकांना गौरवशाली परंपरा असल्याने सध्याची विधानसभा निवडणूक प्रक्रिया देखील शांततेने पार पडेल अशी अपेक्षा आणि खात्री आहे.

डॉ.किरण कुलकर्णी,

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी

0000

 

‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. संजय कोलते यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. ५ : राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीच्या मतदानाची तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘भंडारा जिल्हा प्रशासनाची तयारी’ बाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. संजय कोलते यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत उद्या बुधवार दि. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी भंडारा शैलजा वाघ-दांदळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

विधानसभा निवडणूक-२०२४ शांततेत पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत प्रत्येक जिल्हास्तरावर काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. आचारसंहितेच्या काळात नागरिकांनी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभाग घेवून मतदानाचा हक्क बजावावा यासाठीचे कोणते उपक्रम राबविण्यात येत आहेत. याविषयी माहिती डॉ. कोलते यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

०००

 

 

ताज्या बातम्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई  देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे

0
नांदेड, दि. १४ जून :- मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, वादळी वारा सुरु आहे. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान झाले आहे....

साजूर, तांबवे, किरपे, शेनोली रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील  साजूर, तांबवे, किरपे  शेनोली गावातील रस्त्याच्या  कामामुळे गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे...

सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाणाचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री...

रोजगार हमी योजनेची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री संजय राठोड

0
रोहयो कामे, पीएम आवास, स्मार्ट पीएचसीचा आढावा विहिरीचे आदेश पंचायत समितीतून थेट लाभार्थ्यांना द्या यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून नाट्यगृहाची पाहणी

0
यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ नगरपरिषदेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाची आज पाहणी केली....