शुक्रवार, जून 13, 2025
Home Blog Page 440

अणुशक्तीनगर, चेंबूर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. हीरा लाल केंद्रीय निवडणूक निरीक्षक

मुंबई दि. २७: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगाकडून 172- अणुशक्तीनगर आणि 173- चेंबूर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. हीरा लाल (भा.प्र.से 2009) यांची केंद्रीय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ. लाल हे उत्तर प्रदेश शासनात जलसंपदा विभागाचे विशेष सचिव तसेच  ग्रेटर शारदा सहाय्यक कमांड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष आणि प्रशासक आहेत.

जनतेला सुशासन देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवांचा वापर करून विविध पदांवर यशस्वीपणे प्रशासन चालवण्याचा डॉ. लाल यांचा दांडगा अनुभव आहे.

‘ग्रीन इलेक्शन’ मॉडेल विकसित करण्यात पुढाकार

लोकसभा निवडणूक-2024 मध्ये सामान्य निरीक्षक म्हणून डॉ. लाल यांनी लोकसभा मतदारसंघ 6-आनंदपूर साहिब, रूपनगर, पंजाबमध्ये ‘ग्रीन इलेक्शन’ मॉडेल विकसित केले आहे.

मॉडेल गावचे मानद मार्गदर्शक

डॉ. लाल सध्या मॉडेल गावचे मानद मार्गदर्शक देखील आहेत. बांदा येथील जिल्हा दंडाधिकारी म्हणून त्यांनी लोकप्रिय केलेल्या विकासाच्या प्रयोगांवर आधारित, मॉडेल गाव ही त्यांची संकल्पना आहे.

पर्यावरणविषयक कामातही आघाडीवर

वातावरणातील बदलांवरील त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले असून हवामान बदलासाठी ग्राउंड ॲक्शन लीडर म्हणून, डॉ. लाल यांनी हवामान बदलामुळे होणारी हानी कमी करण्यासाठी किफायतशीर, अंमलात आणण्यास सोपे उपाय विकसित केले आहेत.

मतदार जनजागृती निमित्त किनवटमध्ये युवा संसद, संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम

नांदेड दि. २७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात युवा संसद,संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीपच्या नोडल अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतील मतदार जनजागृती (स्वीप) अंतर्गतचे उपक्रम सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड हे आपल्या सहकाऱ्यांसह 83- किनवट विधानसभा मतदार संघात राबवित आहेत. या अनुषंगाने येथील सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले.

नव मतदारांचा युवा संसद कार्यक्रम घेण्यात आला. नवमतदारांची स्वागत करण्यात आले. सर्वांनी आपल्या आई-वडिलांना, काका-काकू, दादा-वहिनी, आदिंना मी मतदान करणारच असे भावनिक करणारे पत्र लिहून घेण्याचे आवाहन करण्यात आले. शिक्षकांसह सर्व नवमतदार युवक युवतींना मतदान शपथ दिली.

याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य कृष्णकुमार नेम्माणीवार, स्वीप कक्षाचे सर्व सदस्य रमेश मुनेश्वर , शेषेराव पाटील, सुरेश पाटील व प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्वीप कक्षाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी केले. स्वीप कक्षाचे सदस्य तथा नयाकॅम्प किनवटचे केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे संकल्प पत्र लेखनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी मुलांनी आपापल्या घरी जाऊन आपल्या मातृभाषेत आई-वडिलांना मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याविषयी संकल्प पत्र लिहावे , मतदान करणे महत्त्वाचे आहे हा विचार सांगावा.

यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पर्यवेक्षक प्रा. रेणुकादास पहुरकर यांनी आभार मानले.

०००

फुलांची उधळण करणाऱ्या जागतिक वारसा स्थळ कास पठारावर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून मतदान जनजागृती

सातारा दि.26 :- पुलांची उधळण करणऱ्या व जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठरावर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदान जनजगृती केली.
सध्या कास पठरावर पुलांचा बहार आला आहे या अनुषंगाने पर्यटन कास पठरावर येत आहेत. याचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जनजागृती केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी   अर्चना वाघमारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर, गटविकास अधिकारी   सतीश बुद्धे, उपशिक्षणाधिकारी श्री रवींद्र खंदारे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या,जगात सर्वांत मोठी व बळकट अशी भारताची लोकशाही आहे. या पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कमी होत आहे. हा टक्का वाढविण्यासाठी व लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी समजाती   नागरिकांनी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजवावा.   भारत हा पहिलाच देश आहे की स्वातंत्र्यानंतर  सर्वांनाच मतदानाचा अधिकार दिला आहे.  मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे म्हणून सुट्टी जाहीर करण्यात येते. परंतु अनेक मतदार सुट्टी असूनही मतदान करत नाही. घटनेने आपल्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार मुलभूत असून मतदान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य व हक्क आहे, असेही त्यांनी सांगितले.
00000

इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक – जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर 

मुंबई दि 26: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 विधानसभा मतदारसंघातील व्यक्तींनी अथवा उमेदवारांनी इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियात प्रसृत करण्यासाठीच्या जाहिराती माध्यम  प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक  2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 विधानसभा मतदारसंघांसाठी कार्यरत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ, समिती सदस्य निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, समाजमाध्यम तज्ञ प्रा अभिजित पाटील, माहिती व प्रसारण मंत्रालयातील अधिकारी वैशाली त्रिवेदी, स्वतंत्र पत्रकार/माध्यम तज्ञ राजेंद्र हुंजे,  पंकज दळवी, मनिषा रेगे, प्रसाद कुलकर्णी, तसेच  सदस्य सचिव तथा माध्यम समन्वयक केशव करंदीकर  उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 विधानसभा मतदारसंघांसाठी कार्यरत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) कार्यरत आहे.

पेड न्यूजवरही ‘एमसीएमसी’ची करडी नजर

जाहिरात प्रमाणीकरणाबरोबरच पेड न्यूजला आळा घालण्यासाठी माध्यमप्रमाणीकरण व  संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

पेड न्यूजवरही ‘एमसीएमसी’ची करडी नजर असून पेड न्यूज आढळल्यास व समितीव्दारे ती पेडन्यूजअसल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांस नोटीस बजावण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

राजकीय जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची परवानगी आवश्यक

सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ती यांनी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर / प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियातील जाहिराती

जाहिरातींमध्ये दूरचित्रवाहिन्या, केबल नेटवर्क/ केबल वाहिन्यांवरचे प्रक्षेपण प्रसारण, चित्रपटगृहे, रेडिओ, खाजगी एफएम, सार्वजनिक ठिकाणी दृकश्राव्य माध्यमा‌द्वारे (Audio- Video Display) होणारे प्रसारण, ई-वृत्तपत्रांमधील जाहिरातींचे प्रकाशन, बल्क एसएमएस (SMS)  / व्हॉईस मॅसेजेस यांचा समावेश होतो.

मुद्रीत माध्यमांनी मतदानाच्या आधीच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या जाहिरातींकरिता पूर्व परवानगी घेणे आवश्यक

मुद्रीत माध्यमांमध्ये (Print Media Paper) मतदानाच्या आधीच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या जाहिरातींकरिता देखील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

जिल्हा आणि राज्यस्तरावर समिती

जाहिरातीचे पूर्वप्रमाणीकरण करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती व राज्य स्तरावर राज्य पूर्वप्रमाणीकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरील समितीकडे समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या मतदारसंघातील व्यक्ती किंवा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक मीडियावर जारी करावयाच्या जाहिरातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा आहे. तसेच राज्यस्तरीय समितीकडे सर्व नोंदणीकृत राजकीय पक्ष, संस्था यांनी जाहिरात पूर्व प्रमाणीकरणासाठी अर्ज करावयाचा आहे. या समितीकडून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण केले जाते. जिल्हास्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती व राज्य स्तरावर राज्य पूर्वप्रमाणीकरण समिती यांनी मान्यता दिल्याशिवाय राजकीय पक्ष / उमेदवारांनी राजकीय जाहिरातीचे प्रसारण करू नये.

००००

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र

मुंबई, दि. २६ : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हयात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ १ शॅडो मतदान केंद्र असणार आहे.

राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र असतील. १२ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र नसतील. या शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत. यामध्ये विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्हीएचएफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर या शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय बीएसएनएलमार्फत पर्यायी कम्युनिकेशन यंत्रणाही कार्यरत असेल.

विधानसभा निवडणुकांसाठी जिल्हानिहाय शॅडो मतदान केंद्राची संख्या पुढीलप्रमाणे :

.क्र जिल्हयाचे नाव शॅडो मतदान केंद्राची संख्या
अहमदनगर २२
अमरावती ७३
औरंगाबाद ०९
बीड २२
भंडारा ०२
बुलढाणा ०७
चंद्रपूर ४१
धुळे १६
गडचिरोली ४९
१० गोंदिया ३३
११ जळगाव १६
१२ कोल्हापूर १७
१३ नागपूर ०४
१४ नांदेड १२
१५ नंदूरबार ६९
१६ नाशिक १०२
१७ पुणे ३८
१८ रायगड ४६
१९ रत्नागिरी २३२
२० सांगली ०१
२१ सातारा ३१
२२ सिंधुदुर्ग ६०
२३ वर्धा ०२
२४ यवतमाळ ११
  एकूण ९१५

 

0000

 

 

मतदारजागृतीसाठी लातूर जिल्ह्यात ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम

  • दयानंद विज्ञान महाविद्यालय येथील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • कुटुंब, मित्र परिवारातील व्यक्तींमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचा संकल्प

लातूर, दि. २४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम आयोजित करण्यात होता. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी युवा मतदारांशी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले.

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी नागेश मापारी, योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिध्देश्वर बल्लाळे, डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. संध्या वाडीकर, प्रा. विलास कोमटवाड, डॉ. संदीपान जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.

निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि मत हा लोकशाहीसर्वात सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक युवा मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजवावा. यासोबतच आपल्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले. प्रत्येक मत हे मौल्यवान असून आपल्याला मिळालेल्या या अधिकाराचे मोल लक्षात घेवून नवमतदार, वयोवृद्ध नागरिक, महिला यांनी मतदान करावे, असे त्या यावेळी म्हणाल्या.

युवकांशी मनमोकळा संवाद आणि निवडणूक प्रक्रीयेबाबत प्रश्नोत्तरे

‘कॉफी विथ कलेक्टर’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी युवक-युवतींशी मनमोकळा संवाद साधत त्यांना लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक मतदाराचे महत्व याबाबत माहिती दिली. तसेच निवडणूक प्रक्रिया, लोकशाही व्यवस्था याबाबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विविध बाबींवर प्रकाश टाकला. यामध्ये युवक-युवतींनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच लोकशाही आणि निवडणुकीबाबत आपले मत व्यक्त केले.

प्रारंभी उपस्थित सर्वांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली. तसेच डॉ. संदीपान जगदाळे यांनी मतदानाचे महत्त्व सांगणारा पोवाडा सादर केला.

०००

 

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी व्हिजिल ॲपवर तक्रार करा

नांदेड, दि. २५: विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सी व्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. सी व्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे. वैशिष्ट्ये सी व्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सी व्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा. अचूक कृती व देखरेख या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सी व्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते. लाईव्ह फोटो, व्हिडिओ या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हीडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई

या ॲपवर तक्रार दाखल होताच निवडणूक यंत्रणा तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल. डाटा सुरक्षा या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

नांदेड विधानसभा मतदार संघात आतापर्यत सी-व्हीजील ॲपवर एकूण 32 तक्रारी दाखल झाल्या असून यापैकी 11 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत, तर 21 तक्रार बेदखल होत्या. तरी नागरिकांनी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी-व्हीजील ॲपवर नोंदवाव्यात तसेच 1950 टोल फ्री क्रमांकावर ही तक्रार नोंदविता येईल.

०००

नांदेडमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपमार्फत जनजागृती 

नांदेड, दि. २५:  आगामी लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 86- नांदेड उत्तर आणि 87- नांदेड दक्षिण मतदारसंघांमध्ये व्यापक जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे. यानिमित्त आज नांदेड वाघाळा महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती कार्यक्रमाची चर्चा करण्यात आली. मागील निवडणुकीत कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर्स) च्या माध्यमातून घरोघरी भेट देऊन मतदारांपर्यंत पोहोचणे, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, मतदान शपथ, महिला बचत गटांचे मेळावे, विविध व्यापारी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करणे, तसेच ऑटोरिक्षातून जागृती संदेश प्रसारित करणे या उपक्रमांवर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी सांगितले.

महापालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट आणि ध्वनीक्षेपक रिक्षांचे उद्घाटन डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मी मतदान करणार या स्वाक्षरी मोहिम फलकाचे अनावरण करण्यात आले. यात अनेकांनी सहभाग घेतला. उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत सहमती दर्शवली. तसेच येत्या दिवाळीमध्येही स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आडे, प्रा. डॉ. घनश्याम येळणे, अधीक्षक एस.आर. पोकळे, बालासाहेब कच्छवे, हनुमंत राठोड, सारिका आचमे, कविता जोशी, संजय भालके, सुनील मुत्तेपवार, साईराज  मदिराज, आशा घुले, माणिक भोसले, शिवराज पवार, मुकुंद अनासपुरे, गणेश कस्तुरे, अनिल कांबळे यांच्यासह 86- नांदेड उत्तर मतदार संघ व 87- नांदेड दक्षिण मतदार संघाचे स्वीप कक्षाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

०००

 

 

आर्थिक बाबी, खर्चावर असणार करडी नजर

मुंबई, दि. २५: विधानसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षामार्फत करडी नजर ठेवण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिले.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी सौरभकुमार शर्मा, नागेंद्र यादव, मीतू अग्रवाल, विनोद कुमार, राजेशकुमार मीना व चंचल मीना हे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक दाखल झाले असून ते मतदारसंघनिहाय आर्थिक बाबी आणि खर्चविषयक कामकाजाचा आढावा घेत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिका-यांची खर्च संनियंत्रण विषयक बैठक झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ, पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक खर्चाचा तपशील खर्च संनियंत्रण कक्षाला कळविणे बंधनकारक

जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या प्रत्येक खर्चावर करडी नजर असणार आहे. प्रत्येक खर्चाचा तपशील खर्च संनियंत्रण कक्षाला कळविणे बंधनकारक आहे. उमेदवाराने आपल्या खर्चाचे दैनंदिन लेखे विहित नमुन्यात ठेवणे, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही सभा अथवा पदयात्रेची परवानगी मागताना संभाव्य खर्चाचा आराखडा सादर करणे आवश्यक राहणार असल्याचेही श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

विविध यंत्रणांकडून तपासणी

विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापर, मद्याचा मोफत पुरवठा, भेटवस्तूंचे वाटप, किंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनासह इन्कम टॅक्स, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, राज्य वस्तू आणि सेवा कर, व्यावसायिक कर, अमली पदार्थ नियंत्रण दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल, पोलीस दल केंद्रीय, औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय किनारा दल, रेल्वे संरक्षण दल, पोस्ट विभाग, वन विभाग, नागरी उडुयन विभाग, विमानतळ प्राधिकरण, राज्य नागरी विमान वाहतूक विभाग, राज्य परिवहन विभाग, यांच्यासह  फिरते पथक ( एफएसटी ) स्टॅटिक सर्विलन्स टीम ( एसएसटी ) कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीत निवडणूक खर्चासंदर्भात घ्यावयाची खबरदारी याबद्दलची माहिती देण्यात आली.

०००

 

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांचे १२९२ नामनिर्देशन पत्र दाखल

मुंबई, दि. २५: महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी म्हणजे २५ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांचे १२९२ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर

०००

ताज्या बातम्या

नाशिक येथे डिसेंबरमध्ये होणार विश्व मराठी संमेलन

0
नाशिक, दि. १३ : नाशिक येथे २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या पूर्व तयारीसाठी कार्यालय सुरू...

कृष्णदेव गोसावी यांनी सुरू केली आरसेटी प्रशिक्षण, मुद्रा योजनेतून मोबाईल शॉपी

0
शासकीय योजनांचा लाभ घेऊन अनेक जण आयुष्यात प्रगती साधत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावीचे कृष्णदेव गोसावी त्यापैकी एक. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर सेटी...

पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

0
छत्रपती संभाजीनगर, दि.13, :- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज जायकवाडी धरणातील उद्भव विहीर (जॅकवेल) पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुदधीकरण केंद्र येथे सुरू असलेल्या...

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची मोझरी येथे उपोषणाला भेट

0
अमरावती, दि. १३ (जिमाका) : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मोझरी येथे बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला भेट दिली. तसेच मागण्यांबाबत...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संचालक डॉ. विनोद मोहितकर यांची मुलाखत

0
मुंबई दि. १३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप व प्रवेश प्रक्रिया' या विषयासंदर्भात राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे...