सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 447

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोल्हापूरमधून शुभारंभ

कोल्हापूर, दि. ०९ : महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमान परत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी, आवश्यक सहाय्य उपकरणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गारगोटी, कोल्हापूरमधून शुभारंभ करण्यात आला.

या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक वेळ एक रकमी ३०००/- रुपयांच्या मर्यादित अनुदान देय आहे. राज्यात आज अखेर १७ लाख २३ हजार ३०  इतके अर्ज प्राप्त झाले आहेत.  त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र ४० हजार २२० लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे निधी वर्ग करण्यात येणार आहे. या योजनेचा गारगोटी या ठिकाणी शुभारंभ झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

या अनुदानातून ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक असलेले सहाय्य उपकरणे खरेदी करावे तसेच मनस्वास्थ्य केंद्र युवोपचार केंद्र इत्यादीद्वारे शिबिरामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन मुख्यमंत्री महोदय यांनी केले. कोल्हापुरातून सुरू झालेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेची आता राज्यभरातील सर्व जिल्ह्यामधून अंमलबजावणी सुरू होत आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नामदेव गोपाळ भोसले व कांचन अप्पासो रेडेकर यांना तीन हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते सुपुर्द करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश अबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी हरेश सूळ, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सचिन साळे उपस्थितीत होते.

०००

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर, दि. ९ (जिमाका): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, महादेव दिंडे उपस्थित होते.

०००

राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि. ९ ( जिमाका):  शासनाने शेतकरी, कष्टकरी ,शिक्षण, महिला यांच्या प्रश्नासोबतच राज्यातील जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील विविध वास्तूंचे उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते रिमोटद्वारे करण्यात आले .

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, आदिल फरास , वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे आदी उपस्थित होते .

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की,  एक लाख लोकसंख्येकरीता जेवढे डॉक्टर असणे अपेक्षित आहे तेवढे डॉक्टर सध्या नाहीत. तथापि, एक लाख लोकसंख्येसाठी किमान 100 डॉक्टरांची सुविधा देण्याच्या दृष्टीने सरकारची वाटचाल सुरू असून त्या अनुषंगाने विद्यमान सरकारने राज्यात नव्याने दहा वैद्यकीय रुग्णालयांची निर्मिती केली आहे . भविष्यात आणखी काही वैद्यकीय रुग्णालये उभारण्यात येतील. या कामाकरता निधीची कमतरता भासणार नसल्याची ग्वाही देऊन कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी तब्बल 1400 कोटी रुपयांच्या आराखड्याला शासनाने मान्यता दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, जिल्ह्यातील जनतेला अद्यावत उपचारासाठी पुणे – मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सर्व सोई – सुविधा कोल्हापूरमधूनच उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असून त्याचाच परिपाक म्हणून सुमारे 837 कोटी रुपयांच्या विविध कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच जिल्ह्यातील जनतेसाठी अद्यावत वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल. या 837 कोटी रुपयांमध्ये 600 खाटांचे  सामान्य रुग्णालय  इमारतीचे बांधकाम , 250 खाटांचे कर्करोग रुग्णालय इमारतीचे बांधकाम, 250 खाटांचे अतिविशेष उपचार रुग्णालय इमारतीचे बांधकाम, 100 खाटांचे आरोग्य पथक स्थापन करणे, अंतर्गत रस्त्याचे काँक्रीट / विद्युतीकरण , संकुलातील वाहनतळ न्याय वैद्यकशास्त्र विभागकरिता इमारतीचे बांधकाम, जमिनीचे सपाटीकरण – सुशोभीकरण करणे , टेबल टेनिस /बास्केटबॉल / बॅडमिंटन वॉल कोर्ट आदी बांधकाम त्याचबरोबर पाच विद्यार्थी वस्तीगृहाचे बांधकाम अशा स्वरूपाचा विविध कामांचा समावेश आहे . हे सर्व बांधकाम 30 एकरातील विस्तीर्ण अशा जागेवर करण्यात येणार आहे .

०००

जागतिक स्पर्धेसाठी बँकांनी तयार रहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर दि ९ (जिमाका):  कोल्हापूर जिल्ह्यात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सहकार चळवळ रुजवली .त्यांच्या योगदानामुळेच तत्कालीन कालखंडात सुमारे 37 सहकारी संस्था उभ्या राहिल्या. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना 1938 सालची असून विद्यमान संचालकांच्या सचोटीमुळे सध्या ही बँक सुस्थितीत आहे. तथापि, यात समाधान न मानता जागतिक स्पर्धेसाठी या बँकेसह राज्यातील इतर बँकांनी तयार राहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक , खासदार धैर्यशील माने, बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजू आवळे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर , आमदार राजेश पाटील माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार संजय घाडगे, माजी आमदारअमोल महाडिक आदी उपस्थित होते .

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारत व इ – लॉबीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले . ते पुढे म्हणाले, येथील शेतकरी कष्टाळू आहे. बँकेमार्फत घेतलेले कर्ज तो वेळेत फेडतो. ग्रामीण भागाची आर्थिक नाडी म्हणजे ही बँक असून ई-लॉबी सुविधा सुरू करणारी ही राज्यातील पहिली बँक असल्याचे गौरोवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. तसेच सहकार व राज्यातील बँकांचे प्रश्न केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या मदतीने सोडवणार असल्याचे सांगून आतापर्यंत राज्यातील सुमारे 2 कोटी 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिल्याचे सांगितले .

बँकेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात 191 शाखा सुरू असून आतापर्यंत सुमारे 204 कोटीचा ढोबळ नफा या बँकेला झाला आहे .जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करताना या बँकेने सढळ हाताने कर्जपुरवठा केला आहे .आतापर्यंत सातत्याने अ वर्ग मिळवला असून नोटबंदी कालावधीतील सुमारे 25 कोटी रक्कम पुन्हा मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली . तर या बँकेत सुमारे 9500 कोटी रुपयांच्या ठेवी असून सध्या बँक सुस्थितीत असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष तथा आमदार राजू आवळे यांनी दिली .

सुमारे 15 कोटी रुपये खर्च करून नवीन पाच मजली इमारत बांधली असून धनादेशाच्या  वठणावळीसाठी अगदी सुट्टीच्या दिवशीही बँक सुरू राहणार आहे .या नवीन इमारतीमध्ये अकाउंट , एटीएम ,क्लिअरिंग , गुंतवणूक , साखर कारखाना तसेच व्यक्तिगत कर्ज पुरवठा ,गुंतवणूक आदी विभाग या नवीन इमारतीमध्ये कार्यरत राहणार आहेत .इ – लॉबी सुविधेमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा – सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत . यावेळी या इमारतीचे आर्किटेक्चर ,इंजिनियर , सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर , फर्निचर फिक्चर कॉन्ट्रॅक्टर यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला . याप्रसंगी बँकेच्या संचालकासह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

०००

 

कोल्हापूरसाठी भरीव निधी, विकासाचे नवे पर्व सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर, दि. ९ (जिमाका) : कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठीच्या निधीची प्रलंबित मागणी पूर्ण केली असून, त्यासाठी तीन हजार 200 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून पुराचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. कोल्हापूरच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या माध्यमातून विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

दसरा चौक येथे झालेल्या या कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आदी यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शाहु महाराजांच्या भूमीत सामाजिक क्रांतीची बीजे रोवली गेली. शिक्षण, सहकार आदिंची मुहुर्तमेढ रोवली गेली. कोल्हापूरची उद्योगनगरी म्हणून ओळख असून, खऱ्या अर्थाने कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी काम करत आहोत, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोल्हापूर येथे कन्वेंशन सेंटर उभारण्यासाठी 277 कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. अमृत 2.0 योजना पहिल्या टप्प्यासाठी 152 कोटी, अमृत 2.0 योजनेच्या दुसरा टप्प्यासाठी 139 कोटी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन करण्यासाठी 25 कोटी अशा माध्यमातून कोल्हापूरचे विकास प्रकल्प पुढे नेत आहोत, असे ते म्हणाले.

कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेतील वर्षानुवर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना यावेळी महापालिका प्रशासनास केल्या.

उपस्थित महिलांना नवरात्रीच्या, आगामी दसरा, दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोल्हापूरच्या महापुरावेळी आपण आलो होतो. त्यावेळी कोल्हापूरकरांचे मुक्या प्राण्यांबद्दलचे प्रेम, जिव्हाळा पाहिला. इथल्या मातीत प्रेमाचा ओलावा आहे. त्यावेळी आरोग्यमंत्री या नात्याने साथीचे रोग पसरू नये, यासाठी वेळीच उपाययोजना केल्या होत्या. तसेच, अन्नधान्य, चारा, पाणी आदी सर्व आवश्यक गरजा पूर्ण केल्या होत्या.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, विकासाबरोबरच कल्याणकारी योजनाही राज्य शासन राबवत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 2 कोटी 30 लाख महिलांच्या खात्यात 17 हजार कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असून या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते दिले आहेत. ऑक्टोबर व आगामी नोव्हेंबर महिन्याचा हप्ताही आचारसंहितेपूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. आता महिलांना लखपती करण्याचे आपले ध्येय असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी योजनेतून 5 कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला. मुख्यमंत्री युवा कार्य योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण योजना, लेक लाडकी, बसप्रवासात सवलत अशा अनेक योजनांच्या अंमलबजावणीतून समाजातील सर्व गरजू घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरसाठी भरीव प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले. तसेच, 2019 च्या पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीचे स्मरण केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महालक्ष्मीची प्रतिकृती देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन विश्वराज जोशी यांनी केले. कार्यक्रमास शहरातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकास कामांचा तपशील

कोल्हापूरच्या विकासासाठी जवळपास चार हजार कोटींच्या विकास कामांचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. ती पुढीलप्रमाणे – कोल्हापूर सांगली जिल्हा पूरनियंत्रण करणे – 3 हजार 200 कोटी, आंतराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारणे – 277 कोटी, अमृत 2.0 योजना पहिला टप्पा – 152 कोटी, अमृत 2.0 योजना दुसरा टप्पा – 139 कोटी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन करणे – 25 कोटी, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधा पुरविणे – 25 कोटी,  पंचगंगा नदी घाट सुशोभिकरण करणे – 3 कोटी 50 लक्ष, पंचगंगा नदी घाट येथे विविध विकासकामे करणे – 2 कोटी 50 लक्ष, गांधी मैदान येथे स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईन टाकणे – 5 कोटी, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये रस्ते डांबरीकरण करणे – 7 कोटी, शहरात ठिकठिकाणी हेरिटेज लाईट बसविणे – 1 कोटी 50 लक्ष, रंकाळा तलाव येथे म्युझिकल फाऊंटेन उभारणे – 5 कोटी, रंकाळा तलाव येथे आकर्षक विद्युत रोषणाई करणे – 3 कोटी 31 लक्ष, रंकाळा तलाव येथे मिनिचर पार्क तयार करणे – 3 कोटी 50 लक्ष, पंचगंगा स्मशानभूमी दुरुस्ती करणे नुतनीकरण करणे – 3 कोटी 50 लक्ष,

सिध्दार्थनगर येथे पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी 2 कोटी 74 लक्ष, अंबाबाई महालक्ष्मी मंदिर परिसराअंतर्गत म्युझिकल हेरिटेज स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी 2 कोटी 50 लक्ष, छत्रपती शिवाजी स्टेडिअम सपाटीकरण करण्यासाठी 2 कोटी, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे विरंगुळा उद्यान तयार करण्यासाठी 5 कोटी, कोल्हापूर महानगरपालिका प्र. क्र. 31 बाजारगेट अंतर्गत श्री निरंजन संस्था तालीम मठ येथे धर्मवीर आनंद दिघे कुस्ती संकुल विकसित करण्यासाठी 3 कोटी.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध गार्डनमध्ये बैठक व्यवस्था (बेंचेस) बसविण्यासाठी 4 कोटी 50 लक्ष, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये ओपन जिम व उद्यानामध्ये व्यायामाचे साहित्य बसविण्यासाठी 5 कोटी, कोल्हापूर शहरात ओला, सुका, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी कचरा वर्गीकरणासाठी ठिकठिकाणी वेट आणि ड्राय गारबेज कलेक्टर बसविण्यासाठी 2 कोटी 50 लक्ष.

कोल्हापूर महानगरपालिका प्र.क्र. 1 शुगरमिल अंतर्गत कसबा बावडा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक विकसित करण्यासाठी 1 कोटी 50 लक्ष, कोल्हापूर महानगरपालिका प्र. क्र. 56 मधील म.न.पा.चे. रि.स. नं 462 येथील (ओपन स्पेस) संभाजीनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करण्यासाठी 1 कोटी 50 लक्ष. शाहू उद्यान विकसित व सुशोभिकरण करण्यासाठी 1 कोटी,  कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील हनुमान तलावाचे संवर्धन करण्यासाठी 3 कोटी 30 लक्ष.

०००

इतर मागासवर्गाच्या केंद्रीय यादीत महाराष्ट्रातील काही जाती, समुदायांचा समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस

नवी दिल्ली, ०९: राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) आज  केंद्र सरकारकडे (i) लोध, लोढा, लोधी या ओबीसी जाती / समुदायांचा समावेश करण्याबाबत शिफारस केली आहे; तसेच (ii) बडगुजर, (iii) सूर्यवंशी गुजर, (iv) लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर; (v) डांगरी; (vi) भोयर, पवार (vii) कापेवार, मुन्नार कपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरी जाती/समुदाय महाराष्ट्र राज्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) च्या केंद्रीय यादीत समावेश करण्याची विनंती केली आहे.

याबाबत, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल यांचा समावेश असलेल्या आयोगाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने १७ ऑक्टोबर २०२३ आणि २६ जुलै २०२४ रोजी मुंबई येथे यासंदर्भात सुनावणी घेतली होती. मंगळवारी ८ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याच्या ओबीसींच्या केंद्रीय यादीत वरील जातींचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय विभागाने दिली आहे.

जलसंपदा विभागाच्या १२५ प्रकल्पांसाठी ८० हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): राज्यात शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी  जलसंपदा विभागाच्या 125 प्रकल्पांसाठी 80 हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी ता. राधानगरी येथील धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी धरण प्रकल्पाच्या घळ भरणीच्या कामामुळे चार टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. धामणीच्या चार टीएमसी पाण्यामुळे हजारो शेतकऱ्यांची तहान भागेल व शेतीलाही पाणी उपलब्ध होईल. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जलसंपदा विभागाचे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले,  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी  कार्तिकेयन एस., प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता के. डी. शिंदे, कार्यकारी अभियंता शिल्पा मगदूम राजे, उपशाखा अभियंता संजय पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, शासनाने गेल्या अडीच वर्षात राज्यामध्ये अनेक प्रकल्प राबविले आहेत. जनतेसाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, साडेसात एचपी पर्यंत कनेक्शन असणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अशा अनेक योजना सुरु केल्या आहेत. आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातून पहिली रेल्वेगाडी तीर्थदर्शनासाठी सोडण्यात आली. शिक्षणासाठी मुलींना शंभर टक्के फी माफी योजनाही राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

धामणी धरण प्रकल्पाची माहिती

धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम धामणी नदीवर मौजे राई, ता.राधानगरी, येथे प्रगतीपथावर आहे. मुख्य धरण मातीचे आहे.  हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राधानगरी तालुक्यातील 7 गांवे, गगनबावडा तालुक्यातील 7 गावे  व पन्हाळा तालुक्यातील 11 गावे असे एकूण 25 गावांचे 1400 हे. ( 2100  हे.पिकक्षेत्र) क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. धामणी नदीवर साखळी पध्दतीने एकूण 10 को.प. बंधारे बांधण्याचे नियोजन असून यापैकी 7 बंधारे पूर्ण झालेले आहेत. उर्वरित 3 को.प.बंधारे बांधकाम प्रगतीपथावर आहे. धरणाचे मातीकाम 50 %  पूर्ण, व वळण कालव्याचे खोदकाम 95 % काम पूर्ण, ICPO विहिरीचे संधानक काम 98 % काम पूर्ण व धरण पोहोच रस्त्याचे 65% काम पूर्ण झालेले आहे. या धरणाचा सांडवा द्वाररहित असून सांडवा बारची लांबी 160 मी. इतकी आहे.  सांडवा खोदाईचे सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले असून पुच्छ कालव्याचे सुमारे 50 टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. ICPO विहिरीचे संधानक काम 98 % काम पूर्ण, वायपीस व ट्रॅशरॅकच्या अंतस्थ: सुट्या भागांचे उभारणी काम पूर्ण व पातनळ उभारणीचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.

धरणाच्या द्वितीय टप्प्यातील घळभरणी सन 2025-26 मध्ये जून 2026 अखेर पूर्ण करून प्रकल्पात पूर्ण क्षमतेने 109.034 दलघमी. पाणीसाठा व 2100 हे. सिंचन निर्मिती करण्याचे नियोजन आहे. या धरणासाठी आज अखेर एकूण रु.595.15 कोटी इतका खर्च झाला आहे.

ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयासह संविधानात्मक दर्जा देता आला याचे समाधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि.9 : राज्याच्या विकासात आपआपल्यापरीने ओबीसी समाजाने मोलाचे योगदान दिले आहे.असे असूनही विकासाच्या यात्रेत मात्र या समाजाला त्यांचा हक्काचा वाटा मिळत नाही हे मी मुख्यमंत्री असताना लक्षात आले. यासाठी संविधानात्मक पातळीवर लक्ष घालणे आवश्यक असल्याने आम्ही त्यावर भर दिला. ओबीसीसाठी वेगळे मंत्रालय काढले. तेव्हापासून आजही त्याच कटिबद्धतेने विविध विकास योजना आपण साकारत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

एअरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे आयोजित इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील 44 शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, आमदार परीणय फुके, आमदार आशिष जयस्वाल, आमदार मोहन मते, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी व आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ओबीसींना मिळालेले आरक्षण हे घटनात्मक नसल्याचे कारण देऊन काही वर्षापूर्वी मोठा अन्याय केला गेला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालून हे आरक्षण घटनात्मक केले. राज्यघटनेत याला स्थान दिले. यामुळे ओबीसी आयोगाला संविधानात्मक दर्जा मिळाला असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींना असलेले आरक्षण गेले होते. त्यासाठी कायदेशीर लढ्याची बांधणी आपण केली. यात आपल्याला यश आले. केवळ सामाजिक न्यायाच्यादृष्टीने व ओबीसी समाजातील ज्या जाती आहेत त्या प्रत्येक घटकातील युवकांना, महिलांना पुढे येता यावे, शिक्षणासाठी त्यांच्या संधी अधिक विस्ताराव्या यावर आम्ही भर दिला. जवळपास 40 पेक्षा अधिक शासननिर्णय नेटाने आपण काढून अधिकाधिक न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना तालुक्याचा, जिल्ह्याच्या महानगराच्या ठिकाणी शिक्षण घेतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांचा वसतिगृहासाठी शासनाने सर्व प्रशासकीय बाबींची तात्काळ पूर्तता करुन एक धोरणात्मक निर्णय घेतला. कागदावरील हा निर्णय प्रत्यक्षात उतरला जावा यासाठी या विभागाचे मंत्री म्हणून अतुल सावे यांनी एकाच वेळी आज 44 शासकीय वसतिगृहांना साकारले. लवकरच उर्वरित वसतिगृह ही ते सुरु करुन देतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

ओबीसी समाजाला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची पूर्वी असलेली अट तुटपूंजी होती. मी आमदार असताना एक लाख रुपयांची अट वाढविण्यासाठी दोन वर्षे संघर्ष करावा लागला. नंतर ही मर्यादा 3 लाख 50 हजार एवढी झाली. त्यानंतर मला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्या मिळाल्या ही मर्यादा 8 लाख रुपये केल्याचे त्यांनी सांगितले. जे अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या इच्छेनुरुप स्पर्धा परीक्षेसाठी संधी मिळावी, कोचींग मिळावी यादृष्टीने आपण महाज्योतीची निर्मिती केली. यातून जवळपास 2 हजार युवक आपल्या अधिकारी पदाचे स्वप्न साकार करु शकले. याचा मनस्वी आनंद व समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, फेलोशिप देत आहोत. वैद्यकीय शिक्षणासाठी पूर्वी भारतीय पातळीवर आरक्षण दिले जात नव्हते. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडविला. ओबीसीसाठी 30 टक्के कोटा निश्चित केला.  स्वयंम अंतर्गत विद्यार्थ्यांना आपण लाभ देत आहोत. आज विदेशातून शिकून आलेली मुले मला आवर्जून भेटतात. आपण सुरु केलेल्या शिष्यवृत्तीमुळे मी शिकू शकलो अशी कृतज्ञता व्यक्त करतात. माझ्यासाठी हे मोठे समाधान आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

अजूनही अनेक ओबीसी घटकातील कुटुंबांना आपल्याला पुढे आणायचे आहेत. त्यांच्यासाठी मोदी आवास योजनेच्या माध्यमातून 10 लाख घरांची योजना आपण सुरु केली. यातील 3 लाख घरे संपत आली. दुसऱ्या 3 लाख घरांसाठी निधी देणे सुरु केले आहे. ज्या महिला पुढे येत आहेत त्यांना आपण कौशल्य शिक्षणाचे जोड देऊन स्वयंम रोजगाराला प्रवृत्त करीत आहोत. 12 बलुतेदार व इतर सर्व समाजाचे कल्याण व्हावे यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी भाषण केले.

ओबीसी समाजातील विविध लाभधारकांचा व महाज्योतीमार्फत विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या प्रातिनिधीक गुणवंतांचा त्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहसंचालक प्रशांत शिर्के, प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर, सहाय्यक संचालक सुकेशिनी तेलगोटे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन

पुणे, दि. ९: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण आज करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीमती उमा खापरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, श्रीमती अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर आदी उपस्थित होते.

या उद्घाटन कार्यक्रमांतर्गत बोपखेल येथे मुळा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पुस्तकाचे प्रकाशन व नवीन वाहनांचे उद्घाटन, निगडी येथे इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे (आयसीसीसी) लोकार्पण, गणेश तलाव जवळ हरीत सेतू विषयक कामाचा भूमिपूजन समारंभ, पवना नदीवर पिंपरी ते पिंपळे सौदागर दरम्यान बांधलेल्या पुलाचे लोकार्पण, सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर सब-वे बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ, मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प पुणे महानगरपालिका यांच्यासोबत राबविण्याच्या कामाच्या टप्पा १ चा शुभारंभ, मुळा नदीवर सांगवी-बोपोडी दरम्यान बांधलेल्या पुलाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

बोपखेल येथे मुळा नदीवरील पूल

बोपखेल येथे मुळा नदीवर १.८५६ कि.मी. लांबीच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले असून त्यासाठी ५३ कोटी ५३ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. बोपखेल येथील नागरिकांना पिंपरी चिंचवड शहराकडे ये जा करण्यासाठी भोसरी किंवा विश्रांतवाडी- खडकी मार्गावरून सुमारे १० ते १५ कि.मी. अंतराचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. आता या पुलामुळे नागरिकांना २.९ कि.मी. अंतरावर खडकी कॅन्टोन्मेंट भागातून पिंपरी व पुणे शहराकडे ये जा करता येणार आहे.

इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची (आयसीसीसी) शहरावर नजर

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.च्यावतीने इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) उभारण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सुमारे ३ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची या केंद्राशी जोडणी करण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून शहरातील रस्ते, महत्त्वाचे चौक, विविध महत्त्वाच्या तसेच गर्दीच्या ठिकाणांवर २४ बाय ७ लक्ष ठेवण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोठे काही अनुचित प्रकार घडत असल्यास, वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निर्देशनास आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करणे शक्य होणार आहे. याशिवाय शहरातील कचरा उचलणाऱ्या सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविलेली असून या वाहनांचे संनियंत्रणही या कमांड सेंटरच्या माध्यमातून केले जाणार आहे.

पवना नदीवर पिंपरी ते पिंपळे सौदागर दरम्यान बांधलेल्या पुलामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. मुळा नदीवर सांगवी-बोपोडी दरम्यान बांधलेल्या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासह गतीमान होणार आहे. मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प पुणे महानगरपालिका यांचे सोबत राबविण्याच्या कामाच्या टप्पा १ चा शुभारंभ करण्यात आला असून त्यामुळे नदीच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्राची आरोग्य सेवा अधिक बळकट – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

  • नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

  • शिर्डी विमानतळ येथे नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी

मुंबई दि. 9 : महाराष्ट्रात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून राज्याची आरोग्यसेवा अधिक बळकट होणार आहे. यामुळे राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या 6000 होणार आहे. विकासाचा प्रत्येक प्रकल्प हा  सामान्य जनतेसाठी असून, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणाने आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे व्यापार वाढणार आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचा समावेश आहे. प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करण्याचा आरंभ केला आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS), मुंबई आणि महाराष्ट्राच्या विद्या समीक्षा केंद्र (VSK) चे उद्घाटन केले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी सरकारने आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा ‘महायज्ञ’ सुरू केला आहे. लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहेत. यामुळे अंबरनाथ (ठाणे), मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे लाखो लोकांसाठी सेवेची केंद्रे बनतील. महाराष्ट्रात आणखी 900 वैद्यकीय जागांची भर पडून एकूण वैद्यकीय जागा 6000 होतील.

गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत-जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत हे सरकारचे प्राधान्य आहे. एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसण्याचे मोठे आव्हान होते. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांना मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न तरुण पूर्ण करतील, असेही प्रधानमंत्री यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले या दिग्गजांच्या आशीर्वादामुळेच महाराष्ट्रात प्रगतीची कामे सुरू असल्याचे प्रधानमंत्री यांनी सांगितले.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, मेट्रो नेटवर्कचा विस्तार, विमानतळांचे अद्यावतीकरण, विस्तारीकरण, महामार्ग प्रकल्प, पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा आणि टेक्सटाईल पार्क यासारखे हजारो कोटींचे विकास प्रकल्प साकारले जात आहेत. शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांसाठी नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. वाढवन बंदर याद्वारे भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदराची पायाभरणीही महाराष्ट्रात झाली आहे.

शिर्डी विमानतळावरील नवीन टर्मिनलमुळे भक्तांना मोठा फायदा होईल, देश-विदेशातील अधिकाधिक पर्यटक येऊ शकतील. अद्ययावत सोलापूर विमानतळही उभे राहील. भाविक आता शनी – शिंगणापूर, तुळजाभवानी यांसारख्या जवळच्या आध्यात्मिक स्थळांना भेट देऊ शकतील, ज्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

मराठीला अभिजात भाषा म्हणून नुकत्याच मिळालेल्या मान्यतेची आठवण करून देताना प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, जेव्हा एखाद्या भाषेला योग्य सन्मान मिळतो तेंव्हा केवळ शब्दच नाही तर संपूर्ण पिढीला आवाज मिळतो. यातून करोडो मराठी बांधवांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, जागतिक समुदाय भारताकडे मानवी संसाधनांसाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून पाहतो, ज्यामध्ये जगभरात शिक्षण, आरोग्यसेवा आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या मोठ्या संधी आहेत. या संधींसाठी भारतातील तरुणांना तयार करण्यासाठी, सरकार त्यांच्या कौशल्यांना जागतिक मानकांनुसार अद्ययावत करत आहे. शैक्षणिक आराखडा पुढे नेण्याच्या उद्देशाने विद्या समीक्षा केंद्रासह महाराष्ट्रात विविध प्रकल्पांचा आरंभ आणि मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सच्या उद्घाटनाद्वारे तरुणांच्या कलागुणांना प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटर्नशिप दरम्यान 5,000 रुपये स्टायपेंड मिळेल. हजारो कंपन्या या उपक्रमाचा एक भाग होण्यासाठी नोंदणी करत आहेत ज्यामुळे तरुणांना मौल्यवान अनुभव मिळण्यास आणि त्यांच्यासाठी नवीन संधी खुल्या करण्यात मदत होत आहे.

विकसित भारतासाठी आमच्या सरकारचे प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक धोरण समर्पित आहे. गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांचे कल्याण हेच सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक विकासप्रकल्प हा गरीब ग्रामस्थ, मजूर आणि शेतकरी यांना समर्पित आहे. शिर्डी विमानतळावर स्वतंत्र कार्गो कॉम्प्लेक्स बांधण्यात आल्याने शेतकऱ्यांना खूप मदत होईल. विविध प्रकारची कृषी उत्पादने देशभरात आणि परदेशात निर्यात केली जाऊ शकतील. शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर आणि नाशिक येथील शेतकऱ्यांना कांदे, द्राक्षे, पेरू आणि डाळिंब यांसारखी उत्पादने मोठ्या बाजारपेठेत सहजपणे पोहोचवता आल्याने कार्गो कॉम्प्लेक्सचा फायदा होईल.

बासमती तांदळावरील किमान निर्यात किंमत रद्द करणे, गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी हटवणे, परबोल्ड तांदळावरील निर्यात शुल्क निम्म्याने कमी करणे यासारख्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सातत्याने आवश्यक पावले उचलत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने कांद्यावरील निर्यात करही निम्म्याने कमी केला आहे. भारतातील शेतकऱ्यांना मोहरीसारख्या पिकांना जास्त भाव मिळावा यासाठी सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर 20 टक्के कर लावण्याचा आणि रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील कस्टम ड्युटीमध्ये लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही श्री. मोदींनी सांगितले. सरकार वस्त्रोद्योगाला मदत करत असून त्याचा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माणगाव (जिल्हा रायगड) येथून बोलताना म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता-बंधुता आणि एकतेची शिकवण दिली.  त्यांच्या नावाने असलेल्या नागपूरच्या विमानतळावर एकीकृत टर्मिनल साकारलं जातंय. त्यासाठी सात हजार कोटींचा खर्च येणार आहे. या नव्या टर्मिनलमुळे एका वेळी शंभर विमानांची व्यवस्था शक्य होणार आहे. यातून दरवर्षी चौदा लाख प्रवाशांची प्रवास सुखकर होईल, तर नऊ लाख मेट्रीक टनाची मालवाहतूक शक्य होणार आहे. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळणार आहे. अध्यात्मिक तीर्थस्थळ म्हणून जग शिर्डीकडे पाहते. याठिकाणी साडेसहाशे कोटीं खर्चून एकीकृत टर्मिनल उभारत आहोत. यामुळे शिर्डीतील पर्यटन वाढेल. त्यातून रोजगार आणि सेवा संधीही वाढतील.  एकाच दिवशी दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन हा विक्रमच आणि ऐतिहासिक घटना आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण सुविधांना केंद्रातील सरकारने पाठबळ दिले आहे.

महाराष्ट्र सामाजिक, शैक्षणिक, कला-सांस्कृतिक दृष्ट्या तसंच आर्थिक, पायाभूत सुविधा, उद्योग-गुंतवणूक व व्यवसाय अशा सगळ्याचं क्षेत्रात आघाडीवर आहे. आता आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर दिला आहे.  राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन क्षेत्रात महत्वाचे अनेक निर्णय घेतले आहेत.

एकाच शैक्षणिक वर्षात मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) अशा 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयांमुळं ग्रामीण व दूरस्थ भागात विशेषोपचार आरोग्यसेवेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या प्रवेशाची क्षमता देशातील सर्वाधिक होणार आहे. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 900 ने वाढ होणार आहे. एकूण 35 महाविद्यालयात प्रतिवर्ष 4850 एमबीबीएस जागा उपलब्ध होणार आहेत असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सातत्याने पाठबळ मिळते आहे त्यासाठी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाचे आभार मानले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथील नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत अंदाजे 7000 कोटी रुपये असणार आहे. सर्व आकारांच्या विमानांसाठी योग्य स्वतंत्र संचालनासह दोन समांतर धावपट्टी, विद्यमान धावपट्टीचे विस्तारीकरण आणि नवीन धावपट्टीचे निर्माण,दरवर्षी 14 दशलक्ष प्रवाशांच्या हाताळणीसाठी 3 लाख चौ. मी. च्या नवीन टर्मिनल इमारतीचा विकास, अंदाजे 9 लाख मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन कार्गो कॉम्प्लेक्सचा विकास करण्यात येणार आहे.एका वेळी सुमारे 100 विमाने सामावून घेण्यासाठी पार्किंग बे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या महसूल लोक अदालतीमुळे महसूली दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहेत. त्यामुळे ही सर्वसामान्यांना न्याय देणारी महसूल लोकअदालतीची मोहीम यापुढे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित ‘धडपड भाग-३’ या पुस्तकाचे प्रकाशन

0
पुणे, दि. 9 : ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-3 या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद...

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये उद्या भाषण

0
मुंबई, दि. 9 : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या स्वीडनमध्ये इंटरनॅशनल आयडिया स्टॉकहोम निवडणूक प्रामाणिकता परिषद (International IDEA Stockholm Conference on Electoral...

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

0
मुंबई, दि. 9 : दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण आठ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेतील...

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली

0
ठाणे,दि.09(जिमाका):- दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वे प्रवासी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ आणि कोकण) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, डॉ.नरेश...