सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 448

दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू

छत्रपती संभाजीनगर दि. ८ (जिमाका ):  केंद्र सरकार देशातील सर्व घटकांची प्रतिष्ठा जपत, त्यांचा विकास ,सक्षम करण्यासाठी अल्पसंख्याकांसह दुर्बल व गरजू घटकांच्या समृद्धीसाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजीजू यांनी सिल्लोड येथे केले.

सिल्लोड येथे प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत राज्यातील पहिले अल्पसंख्याक मुलां – मुलींसाठी 36 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या वसतिगृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागल, उपसचिव श्याम वर्मा, उपसचिव मोईन ताशीलदार, औकाफ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद बशीर सय्यद, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री श्री. रिजीजू म्हणाले की, केंद्र सरकार, अल्पसंख्याक समुदायांसह समाजतील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना आणि अभियानांच्या माध्यमातून सर्व घटकांना समान लाभ आणि सुविधा मिळवून दिल्या जात आहे.सरकारच्या या दृष्टीकोनामुळे देशातील अल्पसंख्याक समुदायांना शैक्षणिक आणि सामाजिक-आर्थिक विकासात साथ लाभत आहे. महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. केंद्र सरकार गरिबांचे आहे.

सिल्लोड येथे अल्पसंख्याक समाजाच्या मुलां – मुलींसाठी स्वतंत्र राज्यातील पहिले वसतिगृह उभारण्यात येत असून  प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत यासाठी  35 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या वसतिगृहात 250 मुलं तर 250 मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणार असून यामध्ये केंद्राचा हिस्सा 21 कोटी 36 लाख तर राज्याचा हिस्सा हा 14 कोटी 24 लाख रुपयांचा असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीची कमतरता भासू दिली नाही असे सांगत मंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले.

अल्पसंख्याक प्रवर्गातील लाभार्थी व विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना विभागातर्फे राबविण्यात येतात. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची हमी रक्कम 30 कोटीवरून 500 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे  व्यवसाय, उद्योग, शिक्षण यासाठी कर्ज मागणाऱ्या प्रत्येकाला कर्ज उपलब्ध होणार आहे. शैक्षणिक कर्जासाठी शासकीय अधिकारी हमीदार असावा, अशी अट आहे. ही अट काढून टाकू. यामुळे कर्ज मिळणे अधिक सोपे झाले, असे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी संगितले.

अल्पसंख्याक प्रवर्गाला इतर प्रवर्गाच्या बरोबरीने विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. विभागाची आर्थिक तरतूद देखील वाढविण्यात आली आहे. या माध्यमातून या प्रवर्गातील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यात येत असल्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाचे प्रमाण 3 लाखावरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. परदेशात नामांकित विद्यापिठात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना भविष्यात 40 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. अल्पसंख्याक प्रवर्गातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी गटाच्या महिलांना 2 लाख रुपये कर्ज देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची रक्कम 25 हजारावरून 50 हजार रुपये करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वाटप केली जावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी केले, देवेंद्र सूर्यवंशी यांनी सुत्रसंचालन तर माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आभार मानले.

०००

जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘अमरावतीचे वनवैभव’ कॉफी टेबल बुकचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

अमरावती दि. (जिमाका): जिल्ह्यातील वनराईने नटलेले वनवैभव, त्यातही मेळघाट परिसरातील निसर्ग वनसंपदा व वन्यजीव असा नैसर्गिक ठेव्याची समृद्धी दर्शविणाऱ्या ‘अमरावतीचे वनवैभव’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यास खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस उपायुक्त  शिवाजी शिंदे, सागर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा माहिती कार्यालयनिर्मित ‘अमरावतीचे वनवैभव’ या कॉफी टेबल बुकच्या निर्मितीसाठी माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांचा पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते  सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले,  ‘अमरावतीचे वनवैभव’ या कॉफी टेबल पुस्तकात मेळघाटातील नयनरम्य निसर्ग सौंदर्य, अरण्यसंपन्न मेळघाटातील वन्यजीव, जैवविविधता यासह आदिवासी संस्कृती यांची उत्तम छायाचित्रासह माहिती देण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक वारसा, वनसंपदा, कोरकू बांधवांची संस्कृती, चालीरीती यांची दुर्मिळ छायाचित्रे ही कॉफी टेबल बुकची वैशिष्ट्य आहेत.

अमरावतीचे वनवैभव हे कॉफी टेबल पर्यटन क्षेत्राला सहाय्यभूत तसेच संदर्भग्रथ म्हणून निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. पर्यावरणीय मूल्य जाणून जीवसृष्टीचे स्वरूप आणि वनसंपत्तीचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. यामुळे यावर आधारित कॉफी टेबल बुक हे महत्त्वाचे पाऊल आहे .जिल्ह्यामध्ये येणारे पर्यटक अभ्यासक यांनाही हे पुस्तक फायदेशीर ठरणार आहे, असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले.

कॉफी टेबल बुकसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

०००

 

चंद्रपूरला औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ८ : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. देशाच्‍या विकासात चंद्रपूरची भूमिका महत्‍त्त्वाची आहे. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. जिल्हा औद्योगिकदृष्ट्या पुढे जावा या दृष्टीने मार्च महिन्यामध्ये ॲडव्हान्टेज चंद्रपूरचे आयोजन केले गेले. या ॲडव्हान्टेज चंद्रपूरमध्ये विविध कंपन्यांनी सामंजस्य करार (MOU) केलेत. त्याचा लाभ स्थानिक परिसराला प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मितीतून होईल. यातून देशाच्‍या विकासात हातभार लागणार असून चंद्रपूर औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर इंडस्ट्रियल इस्टेट येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, इंडस्ट्रियल इस्टेटच्या अध्यक्षा कल्पना पलीकुंडवार, उपाध्यक्ष पदमकुमार नायर, राहुल पावडे, मनोज सिंघवी, सुभाष कासनगोट्टूवार तसेच इंडस्ट्रियल इस्टेटचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील विकासासाठी योगदान देण्याची इच्छा मनात होती, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ‘पोंभुर्ण्यामध्ये 5 हजार एकरवर एमआयडीसी स्थापन करण्यात येत आहे. लक्ष्मी मित्तल ग्रुप 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशातला नव्हे तर आशियातला सर्वात मोठा स्टील प्लांट टाकू इच्छितात. त्‍या माध्‍यमातून प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती केली जाईल, त्यादृष्टीने प्रवास सुरू झाला आहे. या माध्यमातून हा जिल्हा महाराष्ट्रात निश्चितपणे पुढे जाईल, असा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

या जिल्ह्यातील महामार्ग, समृद्धी महामार्ग पोंभुर्णा ते गडचांदूरपर्यंत जोडण्यात येत आहे. कमी कालावधीमध्ये मुंबईपर्यंत वेगाने प्रवास करता येईल यादृष्टीने कार्य केले जात आहे. तेलंगणा राज्याशी व्यावसायिक, व्यापारी आणि औद्योगिक संबंध प्रस्थापित करता यावे यासाठी नागपूर-हैदराबाद ही वंदे भारत ट्रेन जोडण्याचे कार्य केले. वंदे भारत ट्रेनला नागपूर-सिकंदराबादच्या मध्ये चंद्रपूर व बल्लारशा येथे थांबा देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, कौशल्य विकास उद्योगांमध्ये यावे या दृष्टीने एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे 600 कोटी रुपयांचे उपकेंद्र तयार होत आहे. ज्यामध्ये महिलांना 62 प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. जिल्ह्यातील आय.टी.आय. मधून उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे यासाठी आय.टी.आय. अत्याधुनिक करण्यात येत आहे. बल्लारपूरचे आय.टी.आय. मॉडेल करण्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कुशल मनुष्यबळ उद्योगधंद्यांना पुरविण्यात येत आहे, औद्योगिक आस्थापनांनी त्यांच्या ज्ञानाचा, परिश्रमाचा आणि कष्टाचा उपयोग उद्योग वाढीसाठी करू शकतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये अनेक शैक्षणिक संस्था आणल्या. सर्वप्रथम अभियांत्रिकी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र स्थापन केले. चंद्रपूरमध्ये होणारे कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, सैनिक शाळा बघितल्यास अभिमान वाटेल. अशी सर्वोत्तम कामे करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याकरिता गौरवाची बाब

चंद्रपूरमध्ये दोन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले असून आता चंद्रपूरचे नाव देखील देशाच्या बाहेर जात आहे. ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या गर्भगृहापासून तर प्रत्येक द्वार बल्लारपूरच्या काष्ठापासून तर संसदेचा प्रत्येक दरवाजा बल्लारपूरच्या काष्ठापासून तयार झाले आहे. पुन्हा एक पाऊल पुढे टाकत पीएमओचे संपूर्ण कार्यालय बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होत आहे. पंतप्रधानांची सर्वोच्च खुर्ची देखील बल्लारपूरच्या लाकडापासून निर्मित असेल ही गौरवाची बाब असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी   

जोधपूर हे देशातील सर्वात जास्त फर्निचर एक्सपोर्ट करणारे केंद्र आहे. येथून साधारणत: वर्षाला 300 कोटी रुपयांचे फर्निचर एक्सपोर्ट केल्या जाते. त्यामुळे एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफ.आय.डी.सी.) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एम.आय.डी.सी.तील 10 एकर जागेमध्ये जगातील सर्वात उत्तम फर्निचरचे काम सुरू करण्यात येत असून चंद्रपूरच्या एफ.आय.डी.सी.मधून फर्निचर एक्सपोर्टमध्ये चंद्रपूर जोधपुरलाही मागे टाकेल, या दृष्टीने काम करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ‘शक्ती पेटी’ चे वितरण

बारामती, दि.८: बारामती वकील संघटनेच्यावतीने आयोजित संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शक्ती अभियानाअंतर्गत शहरातील शाळेस प्रातिनिधिक स्वरुपात ‘शक्ती पेटी’ चे वितरण करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर बर्डे, उपाध्यक्ष ॲड.प्रिती शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

शहरातील विद्या प्रतिष्ठान हायस्कुल,  विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शाहू महाराज हायस्कुल, सातव हायस्कुल, न्यायालय परिसर, या ठिकाणी ‘शक्ती पेटी’चे वितरण करण्यात आले. यावेळी शक्ती पेटी पथकाला किटचेही वाटप करण्यात आले.

०००

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या राज्यातील विविध प्रकल्पांचे ई -भूमिपूजन, उद्घाटन

मुंबई, दि. ८ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ९ ऑक्टोबर रोजी राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांहन अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांच्या कामांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर व शिर्डी विमानतळ येथील कामांचे भूमिपूजन आणि राज्यातील नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथील विविध कामांचे व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील नवीन टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन आणि नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उ‌द्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन

केंद्र सरकारने नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असून या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 900 नी वाढ होणार आहे. एकूण 35 महाविद्यालयात प्रतिवर्ष 4850 एमबीबीएस जागा उपलब्ध होणार आहेत. एकाच शैक्षणिक वर्षात मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) अशा 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयांमुळे ग्रामीण व दूरस्थ भागात विशेषोपचार आरोग्यसेवेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथील नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत अंदाजे 7000 कोटी रुपये असून

सर्व आकारांच्या विमानांसाठी योग्य स्वतंत्र संचालनासह दोन समांतर धावपट्टी, विद्यमान धावपट्टीचे विस्तारीकरण आणि नवीन धावपट्टीचे निर्माण, दरवर्षी 14 दशलक्ष प्रवाशांच्या हाताळणीसाठी 3 लाख चौ. मी. च्या नवीन टर्मिनल इमारतीचा विकास, अंदाजे 9 लाख मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन कार्गो कॉम्प्लेक्सचा विकास करण्यात येणार आहे. एकाच वेळी सुमारे 100 विमाने सामावून घेण्यासाठी पार्किंग बे करण्यात येणार आहे.

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत – अंदाजे 645 कोटी रूपये असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे प्रवाशांना सुखद अनुभव मिळणार आहे. प्रवासी वहन क्षमतेमध्ये वाढ आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. विस्तारित टर्मिनल इमारतीमुळे शिर्डीमधील स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.

०००

 

कौशल्याधिष्ठित शिक्षणासह रोजगार निर्मितीवर राज्य शासनाचा भर- उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ८:  विद्यार्थ्यांवर देशाचे भवितव्य अवलंबून असून आजच्या स्पर्धात्मक युगात त्यांनी पारंपरिक शिक्षणाऐवजी कौशल्याधिष्ठित शिक्षण घ्यावे, यादृष्टीने कौशल्याधिष्ठित शिक्षण आणि रोजगार निर्मितीवर राज्यशासन भर देत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

माळेगाव बु. येथे आयोजित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामांतर सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगर पंचायत मुख्याधिकारी बालाजी लोंढे, प्राचार्य अवधूत जाधवर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणजीत तावरे, दत्तात्रय येळे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना समाज सुधारक, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आला आहे.  त्यानुसार जिल्ह्यात औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला छत्रपती शिवाजी महाराज तसेच महिला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सावित्रीबाई फुले आणि माळेगाव (बु) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अनंतराव पवार असे नावे देण्यात आले आहे.

बारामती येथील पवार घराण्याची सामाजिक कार्याची गौरवशाली परंपरा आणि समृद्ध वारसा आहे. सामाजिक विकासात अनंतराव पवार यांचे मोलाचे योगदान दिले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अनंतराव पवार यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या नावाला साजेसे असे काम या संस्थेच्या माध्यमातून करण्यात यावे. या संस्थेच्या रस्त्यासह आदी पायभूत सुविधे करीता १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. माळेगाव परिसराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण  करण्यात आले आहे. या मंदिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची शिकवण मिळत आहे. तसेच संविधान निर्मितीचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

अधिकाधिक युवक-युवतींना कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्यासोबतच रोजगारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी एक हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्याबाबत कार्यक्रम संपन्न झाला. स्किल इंडिया, डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आभासी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. अतिदुर्गम भागातील होतकरू विद्यार्थ्यांना कौशल्याचे शिक्षण उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील कुशल, रोजगारक्षम, उद्योगसंपन्न, अर्थसंपन्न विकसित भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्याने महत्त्वपूर्ण क्रांतिकारी पाऊल उचललेले आहे.

आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीकरीता दर्जेदार शिक्षण, प्रचंड मेहनत आणि कष्ट घ्या, असा सल्लाही श्री. पवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमापूर्वी श्री. पवार यांच्या हस्ते अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगाव (बुद्रुक) या नामफलकाचे आणि छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध आणि सावित्रीबाई फुले महिला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध या  नामफलकाचे अनावरण आभासी पद्धतीने  करण्यात आले.

0000

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ७० वे ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली, 08 :  70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू आणि पर्यवेक्षक समितीचे अध्यक्ष व मान्यवर उपस्थित होते. प्रदान झालेले पुरस्कार वर्ष 2022 चे आहेत.

‘ममर्स ऑफ द जंगल’, ‘वारसा’, ‘या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. फिचर फिल्म श्रेणीत 38 पुरस्कार जाहीर झाले. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध श्रेणीमध्ये 18 पुरस्कार जाहीर झाले.

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार

मिथुन चक्रवर्ती यांनी ‘सुरक्षा’, ‘मृगया’, ‘डिस्को डान्सर’, ‘अग्निपथ’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. ‘मृगया’ (1976) या त्यांच्या पहिल्या चित्रपटानेच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता. ‘डिस्को डान्सर’ (1982) या चित्रपटाने त्यांना अखंड भारतभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील दीर्घकालीन योगदानाबद्दल त्यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या  लघुपटला  प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार चित्रपटाचे निर्देशक व दिग्दर्शक सोहेल वैद्य यांनी स्वीकारला. “मर्मर्स ऑफ द जंगल” हा एक लघुपट आहे, जो भारताच्या नैसर्गिक वारशाच्या, विशेषतः जंगलांच्या आणि वन्यजीवनाच्या संरक्षणाच्या आव्हानांवर प्रकाश टाकतो. हा लघुपट भारतीय जंगलांचे महत्त्व, त्यांच्यातील विविधता, आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे होणारा -हास यावर आधारित आहे. लघुपटाच्या माध्यमातून जंगलांचे संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.

या लघुपटात भारतीय जंगलातील विविध वन्यजीव, वनस्पती, आणि त्यांच्याशी संबंधित समुदायांचे जीवन दर्शविण्यात आले आहे. प्रेक्षकांना जंगलाच्या संरक्षणाची जाणीव करून देणे आणि त्यांच्यामध्ये या मुद्द्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे,  या माहितीपटाव्दारे संदेश देण्यात आला आहे.

आणखी एक मोहेंजोदारो  यास सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार “आणखी एक मोहेंजोदारो” या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार चित्रपटाचे  दिग्दर्शक अशोक राणे यानी स्वीकारला. “आणखी एक मोहेंजोदारो” हा एक माहितीपट आहे ज्याचे दिग्दर्शन अशोक राणे यांनी केले आहे. या चित्रपटात गिरणगावाची कथा मांडण्यात आली आहे – मुंबईतील कापडगिरण्यांच्या सभोवतालची एक समृद्ध संस्कृती, जी 1850 च्या सुमारास फुलली. ‘गिरण्यांचे निवासस्थान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गिरणगावाने औद्योगिक क्रांतीच्या काळात जन्म घेतला, आणि एक अनोखी एकता अनुभवली. हा समाज सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध, सामाजिकदृष्ट्या लवचिक आणि राजकीयदृष्ट्या जागरूक होतो. अनेक राजकीय चळवळींमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पण 1980 च्या दशकात गिरणगावाच्या विनाशाची सुरुवात झाली.

सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार ‘वारसा (लेगसी)’

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार “वारसा” (लेगसी)  या माहितीपटाला प्रदान करण्यात आला.  हा पुरस्कार चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन सुर्यवंशी यांनी स्वीकारला. या चित्रपटात शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला देखील पुरस्कार देण्यात आला आहे. ‘वारसा’ या माहितीपटाची निर्मिती कोल्हापुरातील सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे तर या माहितीपटाला बेस्ट फिल्म नॉन फिक्शन गटातून फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धतंत्र निर्माण केले होते. त्याचा वारसा आजही कोल्हापुरातील लोक जपतात असून याला शिवकालीन युद्ध कला या नावानेही ओळखले जाते. या माहितीपटातून याच युद्ध कलेचा वारसा कोल्हापुरातील स्थानिक कसे जपतात यासाठी सतत प्रयत्नरत असल्याचे चित्रण केले आहे.

सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे  यांना पुरस्कार प्रदान

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा  ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या माहितीपटासाठी सुमंत शिंदे  यांना सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्वोत्तम बॉलिवुड दिग्दर्शक म्हणून सूरज बडजात्या यांना ‘ऊंचाई’ चित्रपटासाठी ,  केजीएफ 1: चॅप्टर २’ सर्वोत्तम कन्नड चित्रपट आणि सर्वोत्तम स्टंट कोरियोग्राफीचा पुरस्कार, ‘काबेरी अंतरधान’ सर्वोत्तम बंगाली चित्रपट, ‘ब्रह्मास्त्र’ या हिंदी चित्रपटासाठी  बॉलिवुड संगीतकार प्रीतमला सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार, ‘फौजा’ साठी नऊशाद सदार खान यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार, ‘अपराजितो’ ला सर्वोत्तम निर्मिती रचनाचा पुरस्कार,  ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्तम अभिनेता, ‘थिरुचित्राम्बलम’साठी नित्या मेनन तर ‘कच्छ एक्सप्रेस’साठी मानसी पारिख यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा  राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. “वाळवी” या चित्रपटला  सर्वोत्तम मराठी चित्रपटचा पुरस्कार जाहिर झाला आहे.

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 130/ दिनांक 08.10.2024

 

‘पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या गुंतवणुकीचे स्वागत करू’ : अध्यक्ष मोहमद मुईझ्झु

मुंबई, दि. 8 : मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाची मोठी क्षमता असल्याचे सांगून मालदीव भारताकडून पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमधील गुंतवणुकीचे स्वागत करेल, असे प्रतिपादन मालदीवचे अध्यक्ष डॉ  मोहमद मुईझ्झु यांनी आज येथे केले. या संदर्भात उभय देशांनी दिल्ली येथे स्वीकारलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ भारत आणि मालदीवमधील द्विपक्षीय संबंधांना सर्वोच्च पातळीवर घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत भेटीवर आलेल्या अध्यक्ष डॉ  मोहमद मुईझ्झु यांचे सन्मानार्थ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंगळवारी (दि. ८ ऑक्टो) राजभवन मुंबई येथे एका स्वागत समारंभाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते. मालदीवच्या अध्यक्षांसोबत त्यांच्या पत्नी साजिधा मोहम्मद आणि उच्चस्तरीय मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ होते.

आपल्या मुंबई भेटीत आपली प्रसिद्ध बॉलीवूड निर्माते व अभिनेते यांचेशी फलदायी चर्चा झाल्याची माहिती देताना श्री. मुइझ्झु यांनी बॉलिवूड निर्माते व दिग्दर्शक यांना संयुक्त चित्रपट निर्मितीसाठी तसेच चित्रीकरणासाठी मालदीवमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मालदीवमध्ये दूरचित्रवाणी मालिकांचे चित्रीकरण करण्याच्या शक्यतेचा देखील विचार व्हावा असे त्यांनी सांगितले. मालिका व चित्रपटांमुळे मालदीवमधील पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मालदीव आणि भारत पुढील वर्षी राजनैतिक संबंधांची 60 वर्षे साजरी करत आहेत असे सांगून राष्ट्रपती श्री. मुइझ्झु यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या यशस्वी भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.

मालदीवच्या अध्यक्षांचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, नवी दिल्लीत स्वीकारण्यात आलेले व्हिजन डॉक्युमेंट उभय पक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

मालदीवमध्ये रुपे कार्ड सुरु केल्यामुळे मालदीवला भेट देणाऱ्या भारतीयांना मदत होईल आणि त्यातून पर्यटनाच्या वाढीला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रात भारताचा प्रमुख भागीदार आहे आणि एक घनिष्ट मित्र आहे. भारत आणि मालदीवमध्ये अनेक शतकांपासून सांस्कृतिक, आर्थिक व  व्यापार संबंध आहेत. भारताचे ‘शेजारी प्रथम’ धोरण आणि ‘सागर व्हिजन’मध्ये मालदीवला विशेष स्थान असल्याचे राज्यपालांनी अध्यक्ष श्री. मुइझ्झू यांना सांगितले.

भारत आता मालदीवच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक झाला आहे याबद्दल आनंद व्यक्त करून राज्यपालांनी भारतीय व्यावसायिकांना मालदीवशी सहकार्य वाढविण्यात रुची असल्याचे सांगितले.

भारतीय डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिक्स संपूर्ण मालदीवमध्ये काम करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून भारतीय शिक्षक देखील मालदीव मध्ये सेवा देत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

          औपचारिक भेटीनंतर राज्यपालांनी मालदीवचे अध्यक्ष आणि त्यांच्या मंत्रीस्तरीय शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ प्रीती भोजनाचे आयोजन केले.

          यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पश्चिम नौदल मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजय कोचर, भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक भीष्म शर्मा आदी उपस्थित होते.

*****

“Will welcome investment in Tourism, Real Estate and Infrastructure”: President Muizzu
 
Keen to welcome Film and Tele Serial Makers
 
Stating that as the economic hub of India, Mumbai has great potential for business in various sectors, Maldives President Dr Mohamed Muizzu said his country will welcome investment in Tourism, Real Estate and Infrastructure. In this connection he said the Vision Document adopted by the two countries will take bilateral relations between India and Maldives to the highest levels.
 
President Muizzu was speaking to the Governor of Maharashtra C P Radhakrishnan at the reception hosted by the latter in honour of the Maldivian President at Raj Bhavan Mumbai on Tue (8 Oct). The President was accompanied by his spouse Sajidha Mohamed and a high level official delegation.
 
President Muizzu told the Governor of his fruitful meeting with famous bollywood stars in Mumbai. He invited Bollywood directors and producers to Maldives for joint film production. The President said he will also explore the possibility of enabling the shooting of Television serials in the Maldives. He said that the films and teleserials will help promote tourism in Maldives. 
 
President Muizzu told the Governor that Maldives and India are celebrating the 60 years of their relations next year. He expressed satisfaction over his successful meetings with the President and the Prime Minister of India.
 
Welcoming the Maldives President to Maharashtra, Governor Radhakrishnan said the Vision Document adopted in New Delhi is very timely to provide further guidance and framework for deepening of ties. He said the launch of RuPay card in Maldives will help Indians travelling to Maldives and encourage more tourism inflow. 
 
The Governor said Maldives is a key partner for India in the Indian Ocean Region and a close friend with whom India shares cultural, economic, trade and people to people linkages dating back centuries.  He told President Muizzu that Maldives holds a special place in India’s Neighbourhood First policy and SAGAR vision, that is, Security and Growth for All in the Region. 
 
Expressing happiness that India has now become one of Maldives top trade partners, the Governor told the President that a lot of Indian businesses are very interested to explore cooperation with Maldives.
 
The Governor said a large number of Indian doctors, nurses and paramedics working across Maldives are rendering valuable services to the people of Maldives He said Indian teachers working with schools across the islands have made an impact on the education sector and are playing a key role in strengthening the relationship between our two people.
 
The Governor told President Muizzu that he will invite Bollywood directors and producers for a meeting and encourage them to do film production in the Maldives.
 
The Governor hosted a State Dinner in honour of the visiting President and his Ministerial delegation. 
 
Minister of Skill Development Mangal Prabhat Lodha, Chief Secretary Sujata Sounik, Municipal Commissioner Bhushan Gagrani, Commissioner of Police Vivek Phansalkar, Flag Officer Commanding in Chief, Western Naval Command Vice Admiral Ajay Kochhar, Inspector General of Indian Coast Guard Bhisham Sharma were among those who attended the Banquet.
*****

 

‘माविम’कडून नवं तेजस्विनी महोत्सवाचे आयोजन

मुंबईदि. 8 : महिला व बालविकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे नवं तेजस्विनी‘ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव दि. ७ ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत वनिता समाज सभागृहवीर सावरकर मार्गदादर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात बचत गट उत्पादीत वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री करण्यात  येत आहे.

0000

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची उद्या विशेष मुलाखत

मुंबईदि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात शाश्वत पर्यावरण विकास परिषद‘ या विषयाच्या अनुषंगाने राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देवून शाश्वत विकास साधण्यासाठी शासनस्तरावर धोरणात्मक पावले उचलण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून जिवाश्म इंधनाला पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्यावर भर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स‘ देखील गठीत करण्यात आला आहे. राज्यात पर्यावरण रक्षणशाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. यासाठी जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. हा उपक्रम तसेच राज्यभरात त्याची अंमलबजावणी याबाबतची माहिती जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पटेल यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR 

०००००

ताज्या बातम्या

उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई, दि. 9 :- “मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं...

मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघाताची घटना दुःखदायक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी; जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश मुंबई, दि. ९ : मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे....

जागरूक शेतकरी – सुरक्षित फवारणी….!

0
शेती करताना कीड नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर अपरिहार्य असतो. मात्र त्याचा वापर करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही, तर याचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात....

१४ जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघगर्जनेसह पाऊस

0
मुंबई, दि ९ : गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. त्यामुळे १४...

छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ९ - भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव...