रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 456

मंत्रिमंडळ निर्णय (भाग -१)

मंत्रिमंडळ निर्णय (भाग -१ निर्णय १५ )

महसूल विभाग

राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ

राज्यातील अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सद्या गावातील गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरुपी माफ आहे. मात्र गावठाणाबाहेर रहिवासी घरांची संख्या वाढत असल्याने आणि शहरी भागात बहुमजली इमारती वाढत असल्याने अशा इमारतींखालील जमिनींचा संपूर्ण अकृषिक कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचप्रमाणे वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनीवरील अकृषिक कर रद्द करण्यात येईल.

०००

 

महसूल विभाग

महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष, सदस्य नियुक्तीसाठी जाहिरातीद्वारे अर्ज

राज्यातील महसूल न्यायाधीकरणांच्या अध्यक्ष व सदस्य पदांवर नियुक्तीसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाप्रमाणेच महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधीकरणातील अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरात काढून अर्ज मागवण्यात येतील. नियुक्तीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. या संदर्भातील महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधीकरण नियम,२०२४ च्या प्रारूपातील नियमांवर नागरिकांच्या हरकती व दावे मागवण्यात येतील.

०००

 

महसूल विभाग

दौंड येथील बहूउद्देशीय सभागृह-नाट्यगृहासाठी शासकीय जमीन

पुणे जिल्ह्यातील दौंड येथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय सभागृहासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मंजूरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

दौंड नगरपंचायतीला बहुउद्देशीय सभागृह व नाट्यगृहासाठी विनामुल्य कब्जे हक्काने भोगवटादार वर्ग-२ मध्ये ८० आर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात दौंड नगरपंचायतीने शासनास प्रस्ताव सादर केला होता.

०००

 

जलसंपदा विभाग

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामांना मान्यता

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे ब्राह्मणवाडे येथील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. किकवी पेयजल प्रकल्पाचे माती धरण, सांडवा, पाणी पुरवठा कम विद्यूत विमोचक आणि अनुषंगीक कामांना मान्यता देण्यात येत आहे. या कामांची विखंडीत केलेली निविदा मूळ अटी व शर्तीनुसार पुनरूज्जिवीत करण्यात येईल.

०००

 

जलसंपदा विभाग

टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व. अनिलभाऊ बाबर यांचे नांव

सांगली जिल्ह्यातील टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तारित टप्प्यास स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजना, टप्पा क्रं.६ असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संदर्भात या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती.

०००

 

जलसंपदा विभाग

पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती

सिल्लोडला सिंचनाचा लाभ मिळणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

एकूण सहा उच्च पातळी बंधारे व चार कोल्हापूरी बंधारे अशा दहा बंधाऱ्यामुळे सिल्लोड तालुक्यातील १२ गावांमधील १ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यासाठी येणाऱ्या ५३४ कोटी ९२ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

०००

 

पर्यटन विभाग

प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद

राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरूंगवासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अशा वास्तूंना हानी पोहचवून त्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात येत आहे.

सध्या, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पूराणवस्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष नियम १९६० (१९६१चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१२) मधील तरतुदींनुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगावस किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. १९६० सालापासून या दंडात वाढ झालेली नाही. या कायद्यात कठोर तरतुदींचा आवश्यकता आहे. केंद्र शासनाच्या १९५८च्या अधिनियमातील सुधारणांशी सुसंगत अशा तरतूदी करणे आवश्यक असल्याने हा वाढीव शिक्षेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

०००

 

क्रीडा विभाग

राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ

आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्यपदकासाठी तीन कोटी, कांस्यपदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास, तीस व वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी सुवर्णपदक विजेत्यांना तीन कोटी रुपये, रौप्यपदकासाठी दोन कोटी, कांस्य पदकासाठी एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे तीस, वीस व दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

एशियन गेम्ससाठी सुवर्णपदक विजेत्यांना एक कोटी रुपये, रौप्यपदकासाठी पंच्याहत्तर लाख, कांस्य पदकासाठी पन्नास लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे दहा लाख, सात लाख पन्नास हजार व पाच लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

वरिष्ठ कॉमनवेल्थसाठी सुवर्णपदक विजेत्यांना सत्तर लाख रुपये, रौप्यपदकासाठी पन्नास लाख, कांस्यपदकासाठी तीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सात, पाच व तीन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

युथ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्यांना तीस लाख रुपये, रौप्यपदकासाठी वीस लाख, कांस्यपदकासाठी दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे तीन, दोन व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

तसेच सांघिक खेळात ऑलिम्पिक, पॅराआलिम्पिंमध्ये सुवर्णपदक विजेत्यांना तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये, रौप्यपदकासाठी दोन कोटी पंचवीस लाख तर कांस्यपदकासाठी एक कोटी पन्नास लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सदतीस लाख पन्नास हजार, बावीस लाख पन्नास हजार व पंधरा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

सांघिक खेळात वरिष्ठ चॅम्पियनशीपमधील सुवर्णपदक विजेत्यांना दोन कोटी पंचवीस लाख लाख रुपये, रौप्यपदकासाठी एक कोटी पन्नास लाख लाख तर कांस्यपदकासाठी पंच्याहत्तर लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे बावीस लाख पन्नास हजार, पंधरा लाख आणि सात लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

सांघिक खेळात एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक विजेत्यांना पंच्याहत्तर लाख रुपये, रौप्यपदकासाठी ५६ लाख पंचवीस हजार तर कांस्यपदकासाठी सदतीस लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सात लाख पन्नास हजार, पाच लाख बासष्ठ हजार पाचशे रुपये व तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

सांघिक खेळात वरिष्ठ कॉमनवेल्थ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना बावन्न लाख पन्नास हजार रुपये, रौप्य पदकासाठी सदतीस लाख पन्नास हजार, तर कांस्य पदकासाठी बावीस लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पाच लाख पंचवीस हजार, तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये व दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

सांघिक खेळात युथ ऑलिम्पिंमधील सुवर्णपदक विजेत्यांना बावीस लाख पन्नास हजार रुपये, रौप्यपदकासाठी पंधरा लाख, तर कांस्यपदकासाठी सात लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे दोन लाख पंचवीस हजार, एक लाख पन्नास हजार रुपये व पंच्याहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

०००

 

सामाजिक न्याय विभाग

संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार

राज्यातील सर्व ऊसतोड, वाहतूक कामगार व मुकादमांना झोपडी व बैल जोडी करिता विमा संरक्षण देण्यासाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवण्याचा निर्णय आज आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

साखर कारखान्यांकडून ऊस गाळपावर प्रतिवर्षी प्रति मेट्रीक टन दहा रुपयांप्रमाणे मिळणाऱ्या निधीतून या विमा योजनेसाठी खर्च करण्यात येईल. दि न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी ही यासाठी विमा कंपनी असेल.

०००

 

जलसंपदा विभाग

लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण

राज्यातील लहान जलविद्युत प्रकल्पांचे व सहःस्थित सौर ऊर्जा प्रकल्पांचे खाजगीकरणातून बांधा, वापरा व हस्तांतरण करा (BOT) तत्वावर विकास करण्याच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यापूर्वीच्या लहान जलविद्युत प्रकल्पांचे खाजगीकरणातून विकासाच्या धोरणांतर्गत १६३.६५ मे. वॅ. क्षमतेचे एकूण ४२ जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करण्यात आलेली आहे. हे धोरण सुधारित करण्याची गरज होती. त्यानुसार प्रवर्तकाने स्वतः शोधलेल्या जलविद्युत प्रकल्पांचा थेट विकसनाचा पर्याय या नव्या धोरणात उपलब्ध असेल. शासन संकेतस्थळावरील १०१.३९ मे. वॅ. क्षमतेच्या ३७ जलविद्युत प्रकल्पांच्या विकसनाकरिता पारदर्शक निविदा पद्धतीचा अवलंब करुन प्रवर्तकाची निवड करण्यात येईल. ज्या प्रकल्पांकरिता आदान संरचना (Intake Structure) उपलब्ध असेल, त्या प्रकल्पांकरिता रु. ५० लक्ष प्रति मे.वॅ. इतके निर्धारित अधिमुल्य (Threshold Premium) निश्चित करण्यात आलेले आहे.

या धोरणानूसार महामंडळाच्या मालकीच्या जागांकरीता रु. ३५ प्रति कि.वॅ. / प्रति वर्ष भाडेपट्टी, संकरित भू पृष्ठावरील सौर ऊर्जा प्रकल्पांकरीता १० पैसे प्रति युनिट तर जल पृष्ठावरील तंरगत्या सौर प्रकल्पाकरिता ५ पैसे प्रती युनिट अतिरिक्त भाडेपट्टा व जलसंपदा विभागाच्या आदान संरचनेकरिता १० पैसे प्रति युनिट आदान संरचना देखभाल शुल्क महामंडळास महसूल स्वरुपात मिळेल.

०००

 

मदत व पुनर्वसन विभाग

कोकण पुणे विभागासाठी एसडीआरएफच्या दोन कंपन्या

कोकण व पुणे विभागासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या-एसडीआरएफच्या दोन कंपन्या स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

कोकणात नवी मुंबई येथे आणि पुण्यात दौंड येथे या कंपन्या असतील. प्रत्येक कंपनीत एकूण चार टिम असतील. त्यापैकी तीन टिम्स प्रत्यक्षात आपत्ती प्रतिसादात काम करतील. या दोन्ही कंपन्यांसाठी ४२८ पदे पोलीस महासंचालकांमार्फत निर्माण केली जातील. यासाठी ३७ कोटी रुपये खर्च येईल.

०००

 

वैद्यकीय शिक्षण विभाग

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पात्र शिक्षकेतर अधिकारी व कर्माचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत दोन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या विद्यापीठातील २४ संवर्गातील २२७ शिक्षकेतर पदांना या योजनेत लाभ मिळणार आहे. वित्त विभागाच्या १ एप्रिल २०१०, ५ जुलै २०१० आणि ६ सप्टेंबर २०१४च्या शासन निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने तरतुदी लागू होतील.

०००

 

वैद्यकीय शिक्षण विभाग

राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे

राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या अखत्यारितील महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संसोधन संस्था ही मुख्य उत्कृष्टता केंद्र असेल. यासाठी येणाऱ्या ७० कोटी ७५ लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. या केंद्रांच्या कार्यान्वयानासाठी कंपनी कायदा २०१३ मधील सेक्शन ८ अंतर्गत कंपनी स्थापन करण्यात येईल.

०००

 

इतर मागास बहूजन कल्याण/अल्पसंख्याक विकास विभाग

विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे

राज्यातील जैन, बारी, तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

विविध समाजातील घटकांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी तसेच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी ही महामंडळे काम करतील. यात जैन समाजासाठी जैन समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल. या महामंडळाच्या कामासाठी १५ पदे मंजूर करण्यात आली. याशिवाय बारी समाजासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) स्थापन करण्यात येत आहे. याशिवाय तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

०००

 

सार्वजनिक बांधकाम विभाग

पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामास मान्यता

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ-एमएसआरडीसीमार्फत पुणे शहराभोवती बांधण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या कामास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पुणे रिंग रोडच्या पूर्व भागात ऊर्से ते सोलू ते सोरतापवाडी (पुणे-सोलापूर रस्ता) या रस्त्याच्या १९ हजार ९३२ कोटी ९८ लाख रुपये इतक्या किंमतीच्या कामांना, तसेच पुणे रिंग रोड पश्चिम भागात ऊर्से ते वरवे (बु.) सातारा रोडसाठी २२ हजार ७७८ कोटी ५ लाख इतक्या किंमतीच्या कामांना सुधारित मान्यता देण्यात आली.

०००

 

 

 

माझी ‘अभिजात’ मराठी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अधिकृतपणे प्राप्त झाला याचा सर्वच मराठी भाषिकांना अभिमान आहे. याचा संदर्भ थेट बीड सोबत असल्याचा विशेष आनंद समस्त बीडवासियांना आहे. याच बीडच्या भूमीत आद्यकवी मुकुंदराज यांनी शके १११०  मध्ये पहिला मराठी ग्रंथ विवेकसिंधू लिहिला.

मराठी भाषा ही मूळची आर्यांची भाषा मानली जाते. भाषेचा उगम उत्तरेकडे झाला असला तरी ही भाषा सातपुडा पर्वतरांगांपासून खाली कावेरी नदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तारली व स्थिरावली. भाषा दर दहा कोसांवर बदलते आणि त्यानुसार मराठी संभाषणाच्या विविध शैली विकसित होत गेल्या.

मराठी भाषा बोलणारे राज्य म्हणून १९६० साली भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. त्यानंतर आजपर्यंत मराठी भाषेचा सतत विकास आपण बघतो. त्यापूर्वी असणाऱ्या काळातील मराठी भाषेचा प्रवास देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

इसवी सन ५०० ते ७०० या काळात पूर्ववैदिक, वैदिक नंतर संस्कृत, पाली प्राकृत यात विविध उत्क्रांत होत मराठी भाषेचा उगम झालेला मानला जातो. ‘श्री चामुन्डाराये करविले’ असे शिलालेखावरील मराठी भाषेत लिखित पहिले वाक्य श्रावणबेळगोळ येथे असल्याचा दाखला उपलब्ध आहे.

संत वाङमयातून मराठीचा लिखित प्रसार होत गेला. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांच्या रचनांमधून लिखित तसेच बोलीभाषेतील मराठी प्रगत आणि प्रगल्भ होत होती. मराठी भाषेबाबत संत ज्ञानेश्वर यांनी केलेले वर्णन सार्थ आहे. ‘परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरेचि रसिके मेळविण’.

भाषेत असणारे सौंदर्य आणि ते अधिक खुलविणारे अलंकार सर्वात महत्त्वाचे म्हणजे नव्याचाही स्विकार करणारी भाषा म्हणून मराठीला पाहिले जाते. सर्व भाषांमधील शब्दांना जोडत आल्याने मराठी अधिकच समृद्ध झालेली आहे.

इतक्या वर्षांच्या प्रवासात विविध शासकांचा अंमल या प्रांतावर राहिला त्यामुळे मराठी भाषेत शब्दसंग्रह सातत्याने वाढत राहिला. अरबी, फारसी, उर्दू, इंग्रजी अशा अनेक भाषेतील शब्द मराठीत कायमचे आले आणि आज ते मराठी भाषेचा भाग बनलेले आपणास दिसतात. आज संगणक युगात मराठी इंटरनेटच्या प्रमुख भाषांपैकी एक आहे आणि मराठी भाषक आवर्जून मराठीचा वापर करतात, ही अतिशय अभिमानाची बाब आहे.

साधारण २०१० च्या प्रारंभी फेसबुकच्या सारख्या माध्यमातून मी मराठी वापरायला सुरुवात केली. त्यावेळी इंग्रजी शब्दावलीत मराठी संदेश लिहिणारे अधिक होते व मराठीचा असा मराठीचा वर्ग मी सुरू केल्यावर अनेक जण मराठी कडे आकर्षित झाले. संगणक क्रांतीत ‘युनिकोड’ आल्याने या आभासी जगात मराठीचा झपाट्याने विस्तार झाला. मी स्वतः या माध्यमाला दिलेले शब्द आज दरमहा कोट्यावधी वेळा वापरल्याचे संदेश येतात. त्यावेळी मराठी भाषक म्हणून याचा मलाही अभिमान वाटतो.

मराठी भाषेचा प्रवास केवळ पुस्तकातूनच नव्हे तर प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मला शासकीय नोकरीच्या निमित्ताने मिळाली. २२  जिल्ह्यांमधून फिरताना त्या त्या ठिकाणचा मराठीचा लहेजा आणि गोडवा जाणवतो. रत्नागिरी ते गडचिरोली असा कार्यक्षेत्राचा प्रवास राहिल्याने मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जशी भाषा वेगवेगळी बोलली जाते तशीच ती वऱ्हाडात, झाडीपट्टीत, पश्चिम महाराष्ट्रात तसेच कोकणात, खानदेशात आणि पुण्या – मुंबईतही वेगळी राहते.

महानगरीय प्रभाव असणारी मुंबईची मराठी खूपच वेगळी आहे. विद्येचं माहेरघर पुण्याची मराठी तितकीच सरळ आहे. आत्मियता जपणारी आणि विशिष्ट शब्दांना खेळवणारी वर्धा – नागपूरची मराठी वेगळी आहे. सिमावर्ती जिल्ह्यांमध्ये सिमेलगत असणाऱ्या नजिकच्या राज्यातील भाषेच्या प्रभावाखाली असणारी मराठी आणखीनच वेगळी वाटते.

कोकणातली मराठी, तळकोकणची मालवणी आणि गडचिरोलीतील मराठी एकदम भिन्न आहेत. जिल्हा बदल झाल्यास जाणवतं की पदार्थ, वस्तू आणि भांड्यांची नावे एकाच भाषेतली असली तरी ती जुळत नाही.

पुण्यात अमृततुल्य अर्थात चहा करतात तर मुंबईत चहा बनवतात. विदर्भात मात्र चहा मांडतात ही भाषिक गंमतच आहे. साधारणपणे रस्त्यावर डावीकडे किंवा उजवीकडे वळतात मात्र खानदेशात डावीकडे फाकाचं असतं.

मराठवाडी माणसं अंगावर कपडे घालतात मात्र वैदर्भिय मराठीत कपडे लावतात..खूप वाटत असला तरी तोच मराठीचा वेगळेपणा आहे. अगदी भाषा तीच फरक.. काई त नी. (वर्धा) अर्थात काही तर नाही….!

 0000

– प्रशांत विजया अनंत दैठणकर

जिल्हा माहिती अधिकारी, बीड

 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; ५६,१०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ

नवी दिल्ली, दि. ४ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, वाशिम आणि ठाणे येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. प्रधानमंत्री सकाळी 11.15 वाजता वाशिममधील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील आणि संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहतील.

प्रधानमंत्री यांचे वाशिममधील कार्यक्रम

वाशिममध्ये प्रधानमंत्री 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील. या योजनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरित केला जाणार असून, यामुळे सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे 1,920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित करतील. तसेच, 9,200 शेतकरी उत्पादक संघटनांचे राष्ट्रार्पण करतील. तसेच, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या “बंजारा विरासत संग्रहालयाचे” प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

ठाण्यातील नागरी गतिशीलता वाढवण्यासाठी 32,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ

प्रधानमंत्री ठाणे येथे सुमारे 32,800 कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये मुंबई मेट्रो लाईन 3 फेज 1 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हा प्रकल्प मुंबईतील शहरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.याशिवाय, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी होईल. ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचा पायाभरणी समारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्राच्या विकासासाठी नैना (NAINA) प्रकल्पाची पायाभरणी

ठाण्यातील आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) प्रकल्प, ज्याची फेज-1 पायाभरणी होणार आहे. या प्रकल्पामुळे या भागातील पायाभूत सुविधा विकासाला गती मिळणार आहे.

या दौऱ्यात प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या कृषी, नागरी आणि औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत, ज्यामुळे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल.

०००

३ ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार

मुंबई, दि. ४ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्रीगण या बैठकीस उपस्थित होते.

३ ऑक्टोबर हा दिवस यापुढे ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

या संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला. यात म्हटले आहे की, या ऐतिहासिक निर्णयाबद्धल राज्य मंत्रिमंडळ  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार व्यक्त करते, तसेच राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

या प्रस्तावाचा आशय असा, मराठी भाषा मुळातच अभिजात होती. तिला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राने सनदशीर मार्गाने प्रयत्न केले. गेले दशकभर यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न करण्यात येत होते. यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी भाषा समितीने मोठे काम केले. मराठी भाषा विभागाने भाषा संचालनालय , मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ,  साहित्य संस्कृती महामंडळ, राज्य मराठी विकास संस्था यांच्या माध्यमातून मराठीचा अखंड जागर सुरू ठेवला आहे. मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषकांसह मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी पर्वणी ठरत आले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा तमाम मराठी भाषिकांना आनंद झाला आहे. मराठी माणसांसाठी हा निर्णय ऐतिहासिक आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक थोर साहित्यिक, संशोधक, अभ्यासकांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मेहनतीला या निर्णयामुळे यश लाभले आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेच्या विकासासाठी आणखी ऊर्जा, प्रेरणा मिळाली आहे. मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. रिद्धपूर येथे या विद्यापीठाचे मुख्यालय असणार आहे. मराठी भाषेतील अभ्यास, संशोधन याला चालना देता येणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे जगभरातील मराठी प्रेमींसाठी अभिमानास्पद, गौरवास्पद आहे. या निर्णयासाठी हे मंत्रीमंडळ केंद्र सरकारचे अभिनंदन करत आहे, असे प्रस्तावात म्हटले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री श्री. केसरकर यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडवणीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदनही केले.

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने भाषा संवर्धनाच्या दृष्टीने मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे, भारतातील सर्व  विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे. प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे, महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांचे बळकटीकरण, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थ्यांना भरीव मदत करणे या गोष्टी साध्य होणार असल्याचेही प्रा. पठारे यांच्या समितीने नमूद केले आहे.

०००

 

“अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान” – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. 4 : मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. “समस्त महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासात आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असे त्यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर माऊली, संत चक्रधर स्वामी, जगद्गुरू संत तुकाराम यांसह महाराष्ट्रातील अनेक संतांची व समाजसुधारकांची भाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषा जाहीर झाल्यामुळे सन्मानप्राप्त झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह असंख्य स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक तसेच जनसामान्यांच्या लाडक्या मराठी भाषेचा सन्मान प्रत्येकाला सुखावणारा आहे.

माय मराठीला बहुप्रतिक्षित अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी माननीय प्रधानमंत्री यांचा आभारी आहे. पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा मला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर, अधिकाधिक लोक, विशेषत: युवक आणि लहान मुले मराठी भाषा शिकतील, बोलतील व या भाषेत लिहितील तसेच मराठी भाषा विश्र्वभाषा करण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास यांनी व्यक्त केला. या आनंदाच्या प्रसंगी राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेचे आणि जगभरातील मराठी भाषिकांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्यावतीने केंद्रीय मंत्रिमंडळाचे आणि विशेषतः प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे  या निर्णयाबद्दल राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आभार मानल्याचे संदेशात म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लोकराज्यचे प्रकाशन; शासनाच्या निर्णयांची समग्र माहिती

मुंबई, दि. ४ : लोकराज्य जुलै-ऑगस्ट २०२४ अंकाचे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि माहिती महासंचालक ब्रिजेश सिंह यांची उपस्थिती होती.

या अंकामध्ये शासनाच्या दोन वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांचा समग्र आढावा घेण्यात आला आहे. या अंकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचे मनोगत पर लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

या अंकामध्ये शासनाने आतापर्यंत घेतलेला निर्णयांचा थोडक्यात आढावा घेण्यात आला आहे. तसेच या अंकामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचा आढावा आणि महिला लाभार्थ्यांच्या प्रतिक्रियांचा समावेश करण्यात आला आहे.

विविध विभागांच्या निर्णयांचा या अंकात समावेश असल्याबद्दल मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

नवी दिल्ली, दि.३ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. राज्य शासनाने यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या भाषेची समृद्धी आणि वारसा जपण्यास हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांनी व्यक्त केली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांच्यासह मोलाचे सहकार्य करणाऱ्या तसेच मराठी भाषिक व मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्यासंदर्भात मराठी भाषा विभागाने दिलेली माहिती

अभिजात भाषेचा दर्जा देण्याची कार्यवाही केंद्र शासनाकडून केली जाते. यासाठी केंद्र शासनाने निकष विहित केले आहेत.

  1. 1500-2000 वर्षापर्यंतची अगदी सुरूवातीच्या ग्रंथाची / अभिलिखित इतिहासाची अति प्राचिनता:
  2. भाषकांच्या पिढ्यांनी एक मौल्यवान वारसा म्हणून मानलेले प्राचीन साहित्य / ग्रंथाचा भाग:
  3. साहित्यिक परंपरा मूळ असावी आणि ती अन्य भाषक समाजाकडून उसनवारी केलेली नसावी:
  4. अभिजात भाषा व साहित्य हे अर्वाचीन साहित्यापेक्षा भिन्न असल्यामुळ अभिजात भाषा आणि नंतरची रूपे किंवा तिच्या उप भाषा यामध्ये खंड देखील असू शकेल.

या निकषांच्या आधारे संशोधन आणि अभ्यास करुन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात राज्य शासनाने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञ संशोधकांची समिती दि.10.01.2012 च्या शासन निर्णयानुसार गठीत केली होती.

या समितीने बरेचसे इतिहास संशोधन केले असून जुने संदर्भ, प्राचीन ग्रंथ, पुरातन काळातील ताम्रपट, कोरीव लेख, शिलालेखांचा संदर्भ इ. प्राचीन दस्ताऐवज तपासले असून त्यांचा आधार घेऊन पुराव्यासह एक सर्वंकष व परिपूर्ण अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालामध्ये सविस्तर विवेचनासह मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा मिळणेसाठी विहीत केलेल्या निकषांची पूर्तता करते हे पुराव्यांसह स्पष्ट केले.

समितीने तयार केलेला मराठी भाषेमधील मूळ अहवाल दि.12.07.2013 च्या पत्रान्वये केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर समितीने परिशिष्टांसह सादर केलेला इंग्रजीमधील अहवाल देखील केंद्र शासनाकडे दि.16.11.2013 रोजी पाठविला.

तद्नंतर सदर प्रस्तावाबाबत सचिव, प्रधान सचिव, मुख्य सचिव, मंत्री, मुख्यमंत्री यांचे स्तरावर सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला.

दि. 27.02.2020 रोजी ‘मराठी भाषा गौरव दिनाचे’ औचित्य  साघून, सन 2020 च्या द्वितीय (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी शिफारस करणारा” शासकीय ठराव महाराष्ट्र विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहांमध्ये पारित करुन पुढील कार्यवाहीसाठी केंद्र शासनास अग्रेषित करण्यात आला.

या संदर्भात राज्यशासनाचा प्रस्ताव अन्य मंत्रालये व साहित्य अकादमीच्या भाषा तज्ज्ञ समिती मार्फत विचाराधीन असल्याचे केंद्रशासनाने त्यांच्या दि. 20/10/2020 च्या पत्रान्वये कळविले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा यासाठी पत्र माहिम राबवून राष्ट्रपती महोदयांना साधारणपणे 1 लक्ष पत्रेही पाठविण्यात आली.

प्रस्तावाबाबत सर्वच स्तरावरुन केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

मा. मुख्यमंत्री महोदयांनी दि. 24.08.2022 रोजीच्या पत्रान्वये मा. पंतप्रधान महोदयांना मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत विनंती केली आहे. त्यास अनुसरून केंद्रशासनाच्या संस्कृती मंत्रालयाने दि. 03.02.2023 रोजीच्या पत्रान्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा राज्यशासनाचा प्रस्ताव केंद्रिय मंत्रालयाच्या विचाराधीन असून त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे कळविले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता ज्ञानेश्वर मुळे सेवानिवृत्त (भा.वि.से.) यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या अध्यक्षांचा सदस्य स्वरुपात समोवश असलेली एक समिती शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, दि.14.02.2024 अन्वये गठित करण्यात आली.

त्यानुसार सदर समितीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून या समितीद्वारे केंद्रशासनाकडे पाठपुरावा चालू होता.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

 

माय मराठीसाठी सोन्याचा दिवस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३ : आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर  प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.  केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील मराठी प्रेमी, तसेच साहित्यिक, संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे.

आजचा हा दिवस यापुढे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ।।  या ओळींचाही दाखला दिला आहे. ते म्हणतात, अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरला होता. त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्ती आहे . निती आयोगाच्या बैठकीतही मराठीला अभिजात दर्जा द्यावी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. या निर्णयामुळे आपल्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले आहे. मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा हा निर्णय आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घेतला गेल्याने दुधात साखर असा योग जुळून आला आहे. यासाठी आपल्या लाडक्या मराठीचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानतो. मराठी भाषा प्रगल्भ आहेच. आता तिचा प्रचार, प्रसार आणखी जोमाने करता येईल. मराठी भाषा आपल्या संतांनी जतन केली, वाढवली. तिचा आपण व्यवहारात आवर्जून वापर केला पाहिजे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी भाषक, विचारवंत, भाषा अभ्यासक- संशोधक, साहित्यिक आणि समीक्षक अशा सर्वांचे आभार मानले आहेत.

मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असून आजचा दिवस सोनेरी दिवस असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आभार मानताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने आम्ही पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात राज्यात मराठी विद्यापीठाची स्थापना, बोली भाषा विस्तार प्रकल्प, राज्यात वाचन चळवळ, पुस्तकांचे गाव, मराठी भाषा भवन असे अनेक निर्णय समाविष्ट आहेत. माय मराठीची पताका अशीच उंच फडकत राहील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

०००

मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ३ : ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने  जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल, मराठी भाषा ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळाचे मी मनापासून आभार मानतो,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हणाले की,  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही महाराष्ट्राची गेल्या अनेक दशकांची मागणी होती. ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाली आहे. यासाठी गेली अनेक दशके प्रयत्न करणाऱ्या सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समस्त महाराष्ट्रवासीयांचे, मराठीभाषकांचे, मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन केले असून यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

०००

 

ताज्या बातम्या

“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

0
मुंबई, ८ :  भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि...

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...