रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 457

महोत्सवातून कोल्हापुरची संस्कृती, वैशिष्ट्ये, विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा जगभर पोहोचेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने महोत्सव होण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करावेत – छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर, दि. ३ (जिमाका) : कोल्हापुरला ऐतिहासिक परंपरा असून येथील संस्कृती, आपली वैशिष्ट्ये, येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही दसरा महोत्सवातून जगभर पोहोचेल, असे प्रतिपादन पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी केले. ऐतिहासिक भवानी मंडप परिसरात पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित शाही दसरा महोत्सव २०२४ च्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, देश आणि जगभरातून आलेल्या पर्यटकांना विजयादशमीचे महत्त्व कळावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरची वैशिष्ट्ये लोकांना पाहण्याची सुवर्ण संधी यातून मिळेल. या उद्घाटन कार्यक्रमावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, अति.आयुक्त महापालिका राहूल रोकडे, पश्चिम देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, मधुरीमाराजे छत्रपती, पर्यटन समितीचे सर्व सन्मानिय सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी येणारे १० दिवस सर्व जिल्हावासियांना भक्तीभावाचे जावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना प्रशासनाकडून चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. संपूर्ण नवरात्रोत्सवात अनेक कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले असून नागरिक तसेच पर्यटकांनी त्याचा लाभ घ्यावा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

नवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने महोत्सव होण्यासाठी मिळून प्रयत्न करावेत – छत्रपती शाहू महाराज

        येणाऱ्या नवरात्रोत्सवाबाबत सर्वांना छत्रपती शाहू महाराज यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, येणारा उत्सव भक्तीभावाने साजरा करून तो खऱ्या अर्थाने महोत्सव होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. उत्सव सर्वत्र पोहोचण्यासाठी काम करावे. शेकडो वर्षांपासून हा दसरा महोत्सव सुरू आहे. त्यामध्ये दरवर्षी नवनवीन कार्यक्रमांचा समावेश केल्याने त्याला नाविन्यता मिळत आहे. दर्शन सुविधाही अधिक चांगल्या केलेल्या असून प्रशासनाकडून चांगले काम झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत त्यांनी सर्वांचे अभिनंदनही केले.

कोल्हापूरच्या दसऱ्याला ऐतिहासिक महत्व असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी रिमोटची कळ दाबून शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मेन राजाराम हायस्कूल इमारतीमध्ये भरविण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन छत्रपती शाहू महाराज आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तर शिवाजी विद्यापीठ व शासकीय मुद्रणालया मार्फत भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोल्हापूर जिल्हयातील एतिहासिक परंपरा सांगणाऱ्या चित्रफितीचे अनावरनही करण्यात आले.

असे असतील शाही दसरा महोत्सवामध्ये कार्यक्रम

पहिल्या दिवशी भवानी मंडप परिसर येथे दसरा महोत्सवाचे उद्घाटन आणि मेन राजाराम हायस्कूल, भवानी मंडप येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ताक्षरीत दुर्मिळ पत्रसंग्रहाच्या प्रदर्शनाचे व ऐतिहासिक ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दिनांक 4 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील नागरिक, तसेच शाळा, महाविद्यालये व शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागातून पांरपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 5 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरची वारसा संस्कृती व सण परंपरा या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता भवानी मंडप परिसरात “महाराष्ट्राची शक्तीपीठे” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी भवानी मंडप परिसर येथे 10 पथकांचे युध्दकला प्रात्यक्षिक सादरीकरण. त्याचबरोबर भवानी मंडप परिसरात सायंकाळी 5 वाजता “गौरव माय मराठीचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता विविध क्षेत्रातील महिलांच्या सहभागातून “नवदुर्गा बाईक रॅली’ चे आयोजन केले आहे. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता भवानी मंडप परिसर येथे पोलीस कर्मचारी बँड, मिलीटरी कर्मचारी बँड, शाळांचे व इतर नामवंत पथकांचे बँड वादन आयोजित केले आहे. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरची वारसा संस्कृती व सण परंपरा या विषयावर आधारीत निबंध स्पर्धा, दिनांक 11 ऑक्टोबर रोजी श्री अंबाबाई देवीच्या नगरप्रदक्षिणा मार्गावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन, दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर दसऱ्यानिमित्त शाही स्वारीचे आयोजन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, ढोलवादन पथके, लेझीम पथके, झांज पथक, शिवकालीन वेशभूषेमधील मावळे, मर्दानी खेळाची पथके, मल्लखांब पथके, 11 घोड्यांसमवेत 11 मावळे, 10 मावळे-अब्दागिरीसह यांचा समावेश असणार आहे. तसेच न्यू पॅलेस ते दसरा चौक या मार्गावरुन 150 बुलेटस्वार, पोलीस एस्कॉर्ट व छत्रपतींच्या घराण्यातील वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे. या रॅली दरम्यान एन एस एस, एनसीसी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी या स्वारीला मानवंदना देतील. याशिवाय जिल्हा परिषदेच्या वतीने व शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रम व अन्य कार्यक्रमांचे नियोजन होणार आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते.

***

जिरायत भागाला ओलिताखाली आणण्यासाठी नीरा – कऱ्हा उपसा सिंचन योजना करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ३: बारामती तालुक्यातील जिरायत भागातील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी १ हजार २५ कोटी रुपयांची नीरा – कऱ्हा उपसा सिंचन योजना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

जळगाव क.प. वि.का. सेवा सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, रणजित तावरे, जळगाव क.प. वि.का. सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन रमेश चव्हाण, व्हॉईस चेअरमन रतनबाई पोंदकुले आदी उपस्थित होते.

या भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कायमच प्रयत्न करण्यात आले असून अद्यापही त्यावर काम करणे बाकी असल्याने उपसा सिंचन योजना राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, या योजनेत या परिसरातील बहुतांश जिराईत गावे समाविष्ट करण्यात येणार  असून सुमारे ४५ हजार एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यात येणार आहे. या योजनेत ७.५ फूट व्यासाची पाइपलाइन असणार असून त्यात दोन टप्प्यात २ हजार अश्वशक्तीचे १२ पंप तर २ हजार १५० अश्वशक्तीचे ७ पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे.  प्रतिवर्षी या भागात २ टीएमसी पाणी देण्यात येणार असून १ टीएमसी पाणी ३० दिवसात विहिरी, पाझर तलाव, बंधारे भरण्यासाठी देण्यात येईल तर १ टीएमसी पाणी उर्वरित ११ महिन्यासाठी देण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या पाचपैकी तीन वर्षात बारामती तालुक्यात रस्ते, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, बस स्थानक, विविध भव्य इमारती आदींसाठी ८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी दिला आहे. सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊन राज्यशासनाच्यावतीने लाडकी बहिण योजनेची तीन महिन्यांची रक्कम देण्यात आली असून ऑक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांची रक्कम लवकरच वितरीत करण्यात येईल, असे सांगितले.

ते पुढे म्हणाले, शासनाने सर्वच घटकांसाठी विविध निर्णय घेतले असून शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज, दूध उत्पादकांना चांगला दर मिळावा यासाठी प्रतीलिटर ७ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आदींचे मानधन वाढविण्यात आले आहे.

विविध कार्यकारी सेवा संस्था ही गावाच्या विकासाची नाडी असते असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याचा आमचा प्रयत्न असतो. जळगाव क.प. वि. का. स. सहकारी संस्थेने उपलब्ध जागेमध्ये गावाच्या वैभवात भर घालणारी वास्तू उभी केली आहे. संस्थेची आर्थिक स्थिती चांगली असून स्वस्त धान्य दुकान, आर.ओ. प्रकल्प, सी.एस.सी. सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याशिवाय भविष्यात प्रधानमंत्री जन औषधी केंद्र आणि संस्थेच्या इमारतीवर सौर पॅनल बसविण्यात येणार असल्याने संस्था उत्तम काम करत आहे, असेही ते म्हणाले.

संस्थेच्या मालकीची १ हजार १२८ चौरस फूट जागा असून त्यावर २ हजार ४०० चौरस फूट दोन मजली बांधकाम केलेले आहे. इमारतीचा आराखडा, अंदाजपत्रक आदीसाठी ८५ हजार रुपये, बांधकामासाठी ३४ लाख ८० हजार रुपये आणि विद्युतीकरण खर्च १ लाख १० हजार रुपये झाला आहे. संस्थेत एकूण ८५७ सभासद असून संस्थेची उलाढाल ५ कोटी ४७ लाख रुपये एवढी आहे, अशी माहिती यावेळी प्रास्ताविकात संस्थेचे संचालक गोरख चौलंग यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते यावेळी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत शून्य वीज बील प्रातिनिधिक स्वरूपात ५ शेतकऱ्यांना देण्यात आले.

कार्यक्रमास बारामती खरेदी विक्री संघाचे चेअरमन विक्रम भोसले, जळगाव क. प. चे सरपंच रामभाऊ जगताप, भिलारवाडीच्या सरपंच सत्त्वशीला जगताप, सेवा संस्थेचे संचालक, नागरिक उपस्थित होते.

काऱ्हाटी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते काऱ्हाटी येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. त्यामध्ये जाधववाडी ते कऱ्हा नदी रस्ता, जाधववाडी स्मशानभूमी सुशोभीकरण, काऱ्हाटी स्मशानभूमी बैठक व्यवस्था करणे या एकूण ४० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय काळाडाग रस्ता ते जळगाव सुपे रस्ता, यशवंतराव सभागृह सुशोभीकरण करणे, जाधव वस्ती भैरवनाथ मंदिर रस्ता, उर्वरित रानमळा रस्ता, माकरवस्ती रस्ता, संजय लोणकर यांचे घर ते पीडीसीसी बँक रस्ता ही १ कोटी ५० लाख रुपयांची कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती दिपाली लोणकर, उपसरपंच श्रीमती रेखा लोणकर आणि ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला.

सुपे गावातील ३ कोटी ४५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपे गावातील भैरवनाथ सभामंडप व नियोजित मंदिर, विविध रस्ते, भूमिगत गटार, प्राथमिक शाळा संरक्षण भिंत, ग्रामसचिवालय इमारत बांधकाम, समाज मंदिर, विठ्ठल मंदिर सभामंडप, स्वच्छतागृह, शह मन्सूर दर्गा भक्त निवास आदी एकूण ३ कोटी ४५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांसह सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच श्रीमती अश्विनी सकट, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

०००

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विकास विषयक प्रश्नांवर विविध समाज घटकांशी संवाद

अमरावती दि. ३: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. उद्योग, संस्कृती, पर्यटन, साहित्य क्षेत्रातील जाणकार तसेच विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकासविषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.

यावेळी माजी आमदार प्रवीण पोटे -पाटील, माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव पद्‌मश्री प्रभाकर वैद्य, मेळघाटचे पद्‌मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, साहित्यिक वसंत आबाजी डाहाके, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलिंद बाराहाते, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, वनविभागाच्या जयोती बॅनर्जी आदी उपस्थित होते.

 

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या समोर मान्यवर व्यक्तींनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या, सिंचन अनुशेष, विदर्भातील प्रशासकीय अधिकारी यांचा अनुशेष, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा. ‘उद्योगांसाठी पोषक वातावरण ‘नागरी सेवा परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण यासारखे विषय मांडले. राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सर्व गटांचे म्हणणे ऐकून घेत सर्व मागण्या व विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त केले.

मेळघाटात  पुरेशा प्रमाणात पाऊस पडतो. परंतु, पावसाचे पाणी थांबविण्यासाठी जल संधारणाची कामे करण्यात यावीत. बांध आणि इतर कामे करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प निर्माण करण्यात यावा.  टेक्सटाईल पार्कमधील उद्योजकांनी जिल्हा आणि पोलीस प्रशासन संपूर्ण सहकार्य करीत आहे. त्यासोबतच कामगारांच्या संघटनांही  सहकार्य करणे आवश्यक आहे. यामुळे उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण तयार होईल. याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा. पोलिस प्रशासनानेही याबाबत तक्रार आल्यास योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी. याबाबत राजकीय पक्षांशीही चर्चा करण्यात यावी. यामुळे उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.

खेळाडूंनी खेळामध्ये जास्त लक्ष द्यावे लागत असल्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे शक्य होत नसल्याने अल्प प्रक्रियेत शासकीय नोकरी मिळण्याची प्रक्रिया करण्यात यावी. अशी अपेक्षा खेळाडूंनी व्यक्त केली. याबाबत राज्यपालांना शासनाच्या ध्येय धोरणानुसार याबाबत कार्यवाही होईल असे आश्वस्त केले.

अमरावती येथे तिरंदाजी खेळामध्ये उत्तम पायाभूत सुविधा आहेत. येथे या  क्रीडा प्रकाराबाबत आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण होवू शकतील. यासाठी उत्तम प्रशिक्षक तसेच क्रीडा साहित्य मिळावे. तसेच उत्तम प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावे यासाठी नागरी प्रशिक्षण संस्था निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रभाकर वैद्य यांच्या यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध योजनांचे सादरीकरण केले. या बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत जिल्हयाचा ऐतिहासिक-सांस्कृतिक, भौगोलिक स्थिती व  उदयोग व जिल्हा विकास आराखडयानुसार विकासाचे नियोजनाचे सादरीकरण  केले.

०००

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे ५ ऑक्टोबरला वितरण – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. ३: पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. 2000/ असा एकूण 4000 रुपये चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in  या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी  सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

जळगाव एमआयडीसीला ‘डी प्लस’ दर्जा देणार ; उद्योग भवनसाठी २३ कोटी तर ट्रक टर्मिनन्ससाठी १३ कोटी मंजूर – उद्योगमंत्री उदय सामंत

चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरु करणार

 उद्योगमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांच्या सर्व मागण्या पूर्ण

जळगाव दि. 3 ( जिमाका ) जळगाव एमआयडीसीचा ‘डी’दर्जा उन्नत करून ‘डी प्लस’ दर्जा तात्काळ देण्यात येणार असून उद्योग भवनसाठी 23 रुपये तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी रुपये मंजूर केले असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याचेही उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे आयोजित खान्देश विभागस्तरीय ‘महाराष्ट्राची उद्योग भरारी ‘ या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ.सुरेश (राजूमामा ) भोळे, आ. किशोर पाटील, आ. लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, प्रादेशिक अधिकारी, धुळे दिगंबर पारधी, प्रादेशिक अधिकारी, जळगाव सुनील घाटे उपस्थित होते.

जळगाव मध्ये जे उद्योग भवन उभं राहणार आहे, त्यात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय असावे ही पालकमंत्री यांची मागणी मान्य केली असून दोन दिवसात त्याचा लेखी आदेश निघेल. हे प्रादेशिक कार्यालय आठवड्यातले दोन दिवस जळगाव जिल्ह्यातील उद्योग, उद्योजक यांच्या अडीअडचणी जाणून त्याची सोडवणूक करेल अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी यावेळी दिली.

चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे सांगून जळगाव जिल्ह्यात चोपडा आणि पाचोरा या दोन तालुक्याला नवीन एमआयडीसी, जळगावला विस्तारीत एमआयडीसीला मंजूरी दिल्याचे सांगितले.त्याच बरोबर आपण उद्योग मंत्री झाल्याबरोबर राज्यात उद्योजकांचे थकलेल्या प्रोत्साहन निधी पोटी 2 हजार 400 कोटी रुपये दिले असून आज पर्यंत जवळपास 3 हजार कोटी पेक्षा अधिकचा प्रोत्साहन निधी दिल्याचे सांगितले.

स्थानिक उद्योगजकांची 96 हजार कोटीची गुंतवणूक

 राज्यात गेल्या दोन वर्षात उद्योगात 4.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे. राज्यात स्थानिक उद्योजकांनी त्यांच्या उद्योग विस्तारासाठी 96 हजार कोटी रुपये एवढी गुंतवणूक केली आहे. त्यातून 85 हजार रोजगार निर्माण झाले असल्याचे उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली विश्वकर्मा ही अत्यंत महत्वाकांक्षी योजनेचा कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थित झाला. त्यावेळी संपूर्ण देशातून सर्वात अधिक 11 लाख 50 हजार नोंद आपल्याला राज्यातून झाली.

उद्योगमंत्र्यांनी आपण कलेल्या मागण्या मान्य केल्याचे    सांगून जळगाव जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी टेक्सटाईल पार्क द्यावा जेणे करून इथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याच बरोबर केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग इथं व्हावेत अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. चोपडा, पाचोरा, आणि जळगावला विस्तारित एमआयडीसी दिल्या बद्दल जळगाव जिल्ह्याच्या वतीने उद्योगमंत्र्यांचे आभार मानले.

उप मुख्यकार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनी  ‘महाराष्ट्राची उद्योग भरारी ‘ या कार्यक्रमा मागची भूमिका विशद करुन. राज्यातील उद्योग विभागाच्या कामकाजाचा आढावा आपल्या प्रास्ताविकात दिला. यावेळी स्थानिक उद्योगात चमकदार कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा गौरवही करण्यात आला.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची ४ व ५ ऑक्टोबरला विशेष मुलाखत

मुंबई, दि. ३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत उद्या दि. ४ व ५ ऑक्टोबर रोजी प्रसारित होणार आहे.

राज्यशासन जनतेच्या कल्याणासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेत आहे. हे निर्णय विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, तसेच महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबत मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

ही मुलाखत शुक्रवार 4 आणि शनिवार 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवरुन प्रसारित होणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

केशव करंदीकर/व.स.सं

राज्‍य नाट्य स्‍पर्धेच्‍या प्राथमिक फेरीसाठी पाच वाढीव केंद्रांना मान्‍यता

मुंबई, दि.३: महाराष्‍ट्र राज्‍य हौशी मराठी नाट्य स्‍पर्धेतील प्राथमिक फेरीसाठी वाढीव पाच केंद्रांना मान्‍यता देण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

महाराष्‍ट्र राज्‍य हौशी मराठी नाट्य स्‍पर्धेतील प्राथमिक फेरीतील अस्तित्‍वातील १९ केंद्रांव्‍यक्‍तीरिक्‍त पाच केंद्रांची संख्‍या वाढवून एकूण २४ केंद्रे करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. यासंदर्भात हौशी कलावंत संघटनेतर्फे सातत्‍याने पाठपुरावा करण्‍यात आला आहे. दिनांक १० जुलै २०२३ रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्‍यासह हौशी कलावंत संघटनेच्‍या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्‍या बैठकीत वाढीव केंद्रांना मान्‍यता देण्‍याचे आश्‍वासन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता झाली असून पाच वाढीव केंद्रांना मान्‍यता देण्‍यात आलेली आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद – केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी

मुंबई,दि. ३ :  महाराष्ट्र शासनाने युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केले असून  हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे, ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हे कौतुकास्पद असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी सांगितले.

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथे आयटीआय मुंबईचे नामकरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनी गोरेगाव, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ आज करण्यात आला. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी बोलत होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उत्तर प्रदेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अनिल कुमार, के. पी. चौधरी, माजी लोकसभा सदस्य मलुक नागर, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदीप डांगे, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. चौधरी म्हणाले की, आजचा क्षण ऐतिहासिक आहे, कारण आपल्या सर्वांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या वास्तूत शिक्षण घेतले त्या वास्तूला त्यांचेच नाव देण्याचा समारंभ आणि ज्या व्यक्तीने आयुष्यभर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले त्या संत गाडगेबाबा महाराज यांच्या नावाने सहा ॲकडमी सुरू करण्यात आल्या आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या दोन्ही महापुरूषांचे विचार आपल्या युवा पिढीने आत्मसात करून आपल्या देशाला तिसरी आर्थिक महासत्ता बनण्यासाठी, कौशल्यपूर्ण विकास करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकासमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत .मात्र, प्रत्येक राज्यात तिथली स्थानिक परिस्थिती लक्षात घेवून शिक्षण दिले पाहिजे. कोणतेही एक मॉडेल सर्वश्रेष्ट नाही, त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम केले पाहिजे.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन व्हावे, म्हणून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून त्याची अंमलबजावणी करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी अनेक योजना सुरू केल्या त्याच धर्तीवर राज्यातही कौशल्य विकास विभाग अनेक योजना राबवून कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री अनिल कुमार म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्याचबरोबर संत गाडगे महाराज यांच्या कर्मभूमीमध्ये मी उभा आहे, याचा मला खूप आनंद झाला. आजच्या पिढीने काळानुरूप शिक्षण घेवून राज्याचा आणि देशाच्या विकासाला हातभार लावावा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विचार आपल्याला दिले त्या विचारांवर आपण चालले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीचे प्रतिनिधी मुंबईच्या दिप्ती जाधव, पुणेचे सुरज महाजन, छत्रपती संभाजीनगरचे सागर भारती, नाशिक प्रमोद दुंगी, नागपूरच्या प्रदीप काटकर, अमरावतीचे प्रफुल्ल भुसारी यांचा सत्कार करण्यात आला.

०००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

आंबिया बहार सन २०२४-२५ फळ पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि.३ : पुनर्रचित हवामान आधारित ‘फळ पीक विमा योजना’ आंबिया बहार सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकासाठी 30 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होणेबाबत अथवा न होणेबाबत घोषणापत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/ किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांस  नोंदणीकृत भाडेकरार अनिवार्य आहे. या योजनेत राज्यात ‍प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे (0.10 हे) आणि उर्वरित विभागाकरीता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे (0.20 हे.) अशी मर्यादा राहील. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळूण जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यासाठी फळपिकांचे उत्पादनक्षम वय पुढीलप्रमाणे राहील. आंबा, चिकू, काजू फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 5 वर्षे, लिंबू फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 4 वर्षे, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 3 वर्षे, डाळिंब, द्राक्ष फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 2 वर्षे, केळी, पपई, स्ट्रॉबेरी पिकासाठी  उत्पादनक्षम वय नाही. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

ही योजना पुढीलप्रमाणे कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात राबविण्यात येते .जळगावनांदेडहिंगोलीयवतमाळसिंधुदुर्गकोल्हापूरवर्धा आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लि.,  जालना जिल्ह्यासाठी फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.,  छत्रपती संभाजीनगरधाराशिव अमरावती,अकोलानागपूरपरभणीरायगडनंदुरबार जिल्ह्यासाठी युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. आणि ठाणेपालघरधुळेपुणेसांगलीलातूरबुलढाणानाशिकअहमदनगरसोलापूरसाताराबीडआणि वाशिम जिल्ह्यासाठी बजाज अलियांन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

आंबिया बहार सन 2024-25 मध्ये फळपिक द्राक्ष पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३ लाख ८० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम १ लाख २७ हजार असून शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ असा आहे.

मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ३३ हजार आहे. केळी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ५७ हजार आहे. पपई पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ४० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम १३ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ असा आहे

संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ३३ हजार आहे. काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख २० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ४० हजार आहे. आंबा (कोकण) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ५७ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ असा आहे.

आंबा (इतर जिल्हे) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार आहे.गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ५७ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२४ असा आहे.

स्ट्रॉबेरी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम दोन लाख ४० हजार आहे.गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ८० हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ असा आहे.डाळिंब पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ६० हजार आहे.गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ५३ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२५ असा आहे.योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता सर्वसाधारण पणे विमा संरक्षित रकमेच्या ५% असतो.मात्र कमी जिल्ह्यात तो जास्त असू शकतो .

आंबिया बहार सन 2024-25 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अवेळी पाऊस, कमी /जास्त तापमान, वेगाचे वारे, गारपीट इत्यादी  निर्धारीत केलेले हवामान धोके (Weather Triggers)लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होणार आहे.

योजनेत सहभाग करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (https://pmfby.gov.in ) या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गारपीट (Add on Cover) या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात आलेले असुन गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील व याकरीता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमीत व अतिरिक्त विमा हप्ता हा बँकांमार्फतच भरणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. आंबिया बहारातील अधिसुचित योजनेच्या अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

दारव्हा शहर विकास योजनेचा पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून आढावा

यवतमाळ, दि.3 (जिमाका) : दारव्हा शहराचा सुधारीत आणि वाढीव हद्दीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्याचे प्रारूप प्रसिध्द करण्यात आले आहे. आराखड्याबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

बैठकीला पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राजय साबळे, नगर पालिका प्रशासनचे सहआयुक्त सुमंत मोरे, दारव्हाचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दारव्हा नगर परिषदेच्या मुळ हद्दीची सुधारीत विकास योजना 2005 मध्ये मंजूर झाली होती. सन 2012 मध्ये नगरपरिषद क्षेत्राची हद्दवाढ झाली. विकास योजना अंमलात आल्यानंतर 20 वर्षातून एकदा सुधारीत करणे आवश्यक आहे. तसेच हद्दवाढ झालेल्या क्षेत्राची योजना हद्दवाढ झालेल्या दिनांकापासून तीन वर्षाच्या आत तयार करून मंजुरीसाठी शासनास पाठवावी लागते.

त्यानुसार दारव्हा नगरपरिषद क्षेत्राची दुसऱ्यांदा सुधारीत व वाढीव हद्दीची विकास योजना तयार करून त्याचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. या योजनेमध्ये विविध प्रयोजनासाठी आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुपावर आरक्षण, झोनींग, रस्ते याबाबत दि.25 ऑक्टोंबरपर्यंत सूचना, हरकती, आक्षेप मागविण्यात आले आले.

नागरिकांडून प्राप्त झालेल्या सूचना, हरकती, आक्षेपांवर नियोजन समिती व नगर परिषद मार्फत योग्य कारवाई, पुर्तता केली जाईल. आक्षेप नोंदवितांना लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रांसह विहित वेळेत सादर होणे आवश्यक आहे. विकास आराखड्याबाबत नागरिकांकडून येणाऱ्या आक्षेप, सूचनांची योग्य दखल घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

शहराचा विकास आराखडा नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देतील, यादृष्टीने करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी बैठकीत केल्या. नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक राजय साबळे यांनी विकास आराखड्याबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली.

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...