रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 458

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि, ३ : थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव डॉ. विलास आठवले यांच्यासह विधानमंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००

माता भिमाबाई आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले

सातारा, दि. 3 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठे करण्यात माता भिमाबाई आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
माता भिमाबाई आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारकाच्या जागेची पाहणी श्री. आठवले यांनी केली. यावेळी ते बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले. माता भिमाबाई यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर स्मारकाला लागणाऱ्या अतिरिक्त जागेबाबत स्थानिक प्रशासनाचेही सहकार्य घेऊ, असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्मारकाच्या जागेची पाहणी करताना सांगितले.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर – उद्योगमंत्री उदय सामंत

नाशिक, दि. 3 सप्टेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासन औद्योगिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. उद्योगांना पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत. गेल्या तीन महिन्यांत 75 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली असून राज्य परकीय गुंतवणुकीत प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

उद्योग विभागातर्फे येथील हॉटेल डेमोक्रॅसी येथे आज सकाळी ‘उद्यमात सकल समृद्धी- महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्योग मंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उद्योजक धनंजय बेळे, संदीप सोनवणे, कांतिलाल चोपडा, अजय बोरस्ते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळे, सहसंचालक श्री. शेळके, कार्यकारी अभियंता श्री. पवार, व्यवस्थापक अतुल दवंगे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना धनादेश आणि नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. पायाभूत सोयीसुविधा निर्मितीची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. त्याच अनुषंगाने विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. अंबड औद्योगिक क्षेत्रात सांडपाणी व्यवस्थापनासाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल.

गडचिरोली जिल्ह्यास स्टील हब म्हणून विकसित करण्यात येत आहेत. त्यातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत असून त्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आगामी काळात नाशिक जिल्ह्यात लवकरच मोठा प्रकल्प येईल, असेही त्यांनी सांगितले. कृषीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत असून मोठ्या उद्योजकांबरोबरच लघु उद्योगांनाही कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत. राज्यातून कोणताही उद्योग बाहेर गेलेला नाही. नवी मुंबईतील महापे येथे जेम्स ऍण्ड ज्वेलरी पार्क साकारण्यात येणार आहे.

खासदार श्री. वाजे म्हणाले, राज्याने औद्योगिक क्षेत्रात घेतलेली भरारी आनंदाची बाब आहे. उद्योग क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी विविध उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. श्री. गांधी म्हणाले, गेल्या दोन वर्षात राज्याने पुन्हा औद्योगिक क्षेत्रात भरारी घेतली आहे. नवनवीन उद्योग आले आहेत. उद्योगांचे सक्षमीकरण होत आहे. नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित होत आहेत. ही समाधानाची बाब आहे. उद्योजकांना सन्मान मिळवून देण्याचे काम शासनाने केले आहे. श्री. बेळे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात राज्य अग्रेसर आहे. शासनाकडून उद्योजकांना सकारात्मक प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळत आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मुळे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, उद्योग भरारी या उपक्रमाची संकल्पना मंत्री श्री. सामंत यांची आहे. राज्याने उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. नाशिक उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यांना या उपक्रमाचा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले. प्रादेशिक अधिकारी श्री. गवळे यांनी आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रातील उद्योजक, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

०००००

जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

बुलढाणा, दि. ३ : खामगांव येथील श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान, आळंदी अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

खामगांवमधील घाटपुरी येथील श्री. जय जगदंबा माता संस्थान येथे आयोजित या भूमिपूजन समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, संस्थानाचे अध्यक्ष पंकज केला, उपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टड, संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम श्री जगदंबा मातेचे दर्शन घेवून पूजन केले. तसेच जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी संस्थानाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायांशी संवाद साधला.

००००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ

बारामती, दि. ३: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ वृंदावन लॉन्स येथे करण्यात आला. या अंतर्गत चार वाहनातून तालुकाभरात योजनेविषयी जनजागृती करण्यासह पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या आयुष्मान  भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची माहिती तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंबापर्यंत पोहोचविणे, त्या माध्यमातून नोंदणी करणे, लाभार्थीना ‘आभा’ कार्ड वितरित करणे आणि या योजनेच्या लाभाच्या अनुषंगाने माहिती देऊन जनजागृती करणे ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये आहेत.

हा उपक्रम राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असून त्यासाठी ४ नोंदणी व्हॅन एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या सौजन्याने पुरविण्यात आल्या आहेत. राज्यशासन हे मेडीकेअर हेल्थ सर्व्हिसेसच्या माध्यमातून नोंदणी उपक्रम राबविणार असून त्यासाठी प्रत्येक वाहनासाठी ४ स्वयंसेवक मानधन तत्त्वावर नेमण्यात आले आहेत, आदी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना देण्यात आली.

यावेळी एचडीएफसी बँकेचे विभाग प्रमुख राजा उपाध्याय, पुणे व बारामतीचे सिटी हेड पियूष शेठ, मेडीकेअर हेल्थ सर्व्हिसेसचे समन्वयक कौस्तुभ बुटाला, नरेश चौधरी, संचालक डॉ. मिनल राघमवार, अभियान व्यवस्थापक सुनीता पवार आदी उपस्थित होते.

0000

 

महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बारामती तालुक्यात ‘शक्ती अभियान’ राबविणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ३: बारामती शहरामध्ये घडलेल्या काही दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात ‘महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा व युवकांचे प्रबोधन’ या संकल्पनेवर ‘शक्ती अभियान’ राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामतीमध्ये हे अभियान यशस्वी ठरल्यास पुणे जिल्हा तसेच राज्यात राबविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

येथील शासकीय विश्रामगृहात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड उपस्थित होते.

शक्ती अभियान ‘पंच शक्ती’ बाबीवर आधारित असणार असून त्यात ‘शक्तीबॉक्स’ (तक्रारपेटी), शक्तीनंबर-एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, शक्तीकक्ष, शक्तीनजर आणि शक्तीभेट यांचा समावेश असेल, असे सांगून श्री. पवार यांनी माहिती दिली,

परिसरातील शाळा, महाविद्यालये, सर्व सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, रुग्णालये, एस.टी.स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्यूशन, महिला वसतिगृह, पोस्ट ऑफीस या ठिकाणी पोलीसांमार्फत ‘शक्तीबॉक्स’ (तक्रारपेटी) ठेवण्यात येतील. यामध्ये महिला, मुली लैंगिक छळ, छेडछाड, मुलांकडून होणारा पाठलाग आदी स्वरूपाच्या आपल्या तक्रारी टाकू शकतील. तसेच अवैध गांजा, गुटखा, गुन्हेगारीच्या अनुषंगाने अन्य बाबीबाबतची गोपनीय माहिती तक्रारपेटीत टाकू शकतील. पोलीसांमार्फत दर २ ते ३ दिवसांनी सदर तक्रारपेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच संबंधीतांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

महिला व मुलींच्या मदतीसाठी ९२०९३९४९१७ या क्रमांकाची सेवा ही २४x७ सुरू ठेवण्यात येणार असून त्यास शक्तीनंबर म्हटले जाईल. त्यावर कॉल अथवा मेसेज करून तक्रार केल्यास या तक्रारींचे त्वरीत निराकरणाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. या पथकाचा मोबाईल क्रमांक सर्वांना माहिती व्हावा यासाठी शाळा, कॉलेज, शासकीय, खाजगी संस्था, कंपनी, हॉस्पीटल यांचे दर्शनीय ठिकाणी लावण्यात येईल. अवैध धंदे, छेडछाड असे प्रकार आढळुन आल्यास त्याबाबतचे फोटो अथवा व्हिडीओ तसेच लोकेशन सदर नंबरवर शेअर केल्यास तात्काळ संबंधीतांना मदत पुरविण्यात येईल. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘शक्तीकक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या कक्षामध्ये महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देऊन त्यांना विश्वासात घेवुन त्यांचे अडचणींचे निराकरण करणे तसेच समुपदेशन करून त्यांना कायदेविषक मार्गदर्शन करणे तसेच अन्याय सहन न करता निर्भयपणे बोलते करणे आदी उपाय योजना करण्यात येणार आहेत.

शक्तीनजर या अंतर्गत व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियावर अल्पवयीन, किशोरवयीन मुले, मुली अथवा इतर व्यक्ती शस्त्र, बंदुक, पिस्तुल, चाकु अथवा इतर धारदार व घातक हत्यारांसोबतचे फोटो, पोस्ट टाकतात. त्यावर या पथकाची नजर असणार असून असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ कडक कारवाई करण्यात येणार आहे.

‘शक्तीभेट’ अंतर्गत शाळा, महाविद्यालये, सर्व सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, हॉस्पीटल, एस.टी.स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्यूशन, महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देवुन तेथील महिला/मुलींना महिलांविषयक कायदे, गुड टच, बॅड टच, व्यसनाधिनता, वाढती बालगुन्हेगारी आदीबाबत मार्गदर्शन करून अशा प्रकारांना आळा घालणे, तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यात लैंगिक, शारीरिक तसेच मानसिक छळाबाबत जागरूकता करणे, संरक्षण करणे,  सदर ठिकाणी पथकास पुरविण्यात आलेल्या वाहनातून विशेष पेट्रोलींग करून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे. शाळा,  महाविद्यालयांच्या ठिकाणी प्रबोधनात्मक, कायदेविषयक, महिलांविषयीचे कायद्यांबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात येतील.

महिलांच्या सुरक्षेबाबत संवेदनशील असलेली ठिकाणे ‘हॉटस्पॉट’ निश्चित करून त्या ठिकाणी वारंवार पेट्रोलिंगद्वारे पोलीसांचा वावर वाढवुन महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारास आळा घालण्यात येईल. ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातील पोलीस पाटील, सरपंच, बचत गटाच्या महिला यांच्या बैठका घेवुन त्यांना महिलांविषयक कायद्याची माहिती देणे. शाळा, महाविद्यालये सुटण्याच्या वेळी सदर परिसरात छेडछाडीच्या अनुषंगाने आलेल्या टुकार मुलांचा वारंवार वावर आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करून सदर परिसरातील मुलांकडुन विद्यार्थिनीना विनाकारण त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना पोलीस विभागाला दिल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

या सर्व कार्यवाहीत सातत्य  टिकविण्याच्या सूचना पोलीस दलाला दिल्या आहेत.

खून, लैंगिक अत्याचार आदी घटनांमध्ये बाल गुन्हेगारांचे वाढते प्रमाण पाहता अशा गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने १४ वर्षांवरील बालकांना बालगुन्हेगार न  समजता त्यांना प्रौढ समजण्यात यावे अशी कायद्यात दुरुस्ती व्हावी म्हणून केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

0000

आश्रमशाळा, वसतिगृहांच्या शासकीय इमारतींसाठी १०० टक्के मंजुरी; ७ ऑक्टोबरला एकाचवेळी ऑनलाईन उद्घाटन करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 03 (जिमाका वृत्त) : राज्यात आवश्यकतेनुसार आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह, आश्रमशाळा, शाळा यांना स्वमालकीच्या इमारतींसाठी 100 टक्के मंजूरी देण्यात आली असून त्यात नंदुरबार जिल्ह्यातील इमारतींना मोठ्या प्रमाणावर मंजुरी देण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व इमारतींचे भूमिपूजन ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते काल जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत एकलव्य गॉडेल रेसिडेशीअल स्कूल, (रोषमाळ, ता. धडगाव) येथील संकुलात मुलांचे वसतिगृह, भोजन कक्ष, प्राचार्य निवासस्थान, शिक्षक व कर्मचारी टाईप 2 व टाईप 3 गृहपाल निवासस्थान (मुले /मुली), अतिथीगृह, क्रिडासुविधा, डिप बोअरिंग, पंप रूम. संरक्षण मित, अंतर्गत रस्ते. प्रवेश व्दार, ध्वजारोहन स्टेज इ. भूमीपुजन समारंभ, तसेच शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, (मोलगी, ता. अक्कलकुवा) येथील मुलींचे वसतिगृह इमारतींच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमश्या पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, जि.प. सदस्य रूपसिंग तडवी, सरपंच ज्योती तडवी (मोलगी), दिलीप वसावे (सरी), आकाश वसावे (डाब), सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत, प्रभात गायकवाड  यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, ज्या शाळांना प्रशस्त जागा आहेत, तेथे खेळाची मैदाने निर्माण करून क्रिडापटूंना प्रोत्साहन देण्याचा आदिवासी विकास विभागाचा प्रयत्न आहे. ज्या शाळा, आश्रमशाळा, वसतीगृह यांच्याकडे जमीन उपलब्ध आहे, तेथे स्वमालकीच्या इमारती मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यात एकट्या तळोदा प्रकल्पातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील 34 इमारतींचा समावेश आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागात शिस्तबद्ध शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच येणाऱ्या दोन ते सहा महिन्यांत सर्व शासकीय आश्रमशाळा, वसतीगृहांमध्ये आपल्याला बायोमॅट्रीक प्रणाली स्थापित झालेल्या दिसून येणार आहेत.

ते पुढे म्हणाले, प्रत्येक गावात देवालये आहेत आणि त्या देवीलयांमधून रोज भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असतात, या सर्व भजनी मंडळांना कुठलाही भेदभाव न करता भजनाचे साहित्य जिल्ह्यात वितरीत करण्यात आले आहे. तसेच गावातील नवतरूणाईत असलेली क्रिकेट खेळाची गोडी लक्षात घेता प्रत्येक गावाला क्रिकेट साहित्याचे वितरण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच बचतगटांच्या सक्षमीकरणातून गाई व बकरी पालनालाही प्रोत्साहन दिले जात आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमश्या पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

शिवसृष्टीच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

  • छत्रपती शिवाजी महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना सर्वांच्या सहभागातून पुढे न्यावी – उपमुख्यमंत्री

नाशिक दि. ०२ (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना लोकसहभागातून पुढे न्यावी. तसेच या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी दहा कोटी किंवा त्याहून लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 

येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे. तहसीलदार आबा महाजन, माजी खासदार समीर भुजबळ. माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शिवाजी महाराजांचा १२ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा बसविण्यात आला आहे. महाराष्ट्रात सिंहासनावर बसलेला सर्वात मोठा पुतळा हा येवला शहरात असून ही येवलावासीयांसाठी गौरवाची बाब आहे. नाशिक शहरातही महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य अर्धशिल्प बसिवण्यात आले आहे.

 

शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराप्रमाणे शिवसृष्टीची रचना साकारण्यात आली आहे. शिवसृष्टीचे प्रवेशद्वारही आकर्षणाचा एक महत्त्वाचा घटक असून सागवानी लाकडापासून ते तयार करण्यात आले आहेत. जांभा दगड व काळा दगड व राजस्थान येथील चांगल्या प्रतीच्या दगडांचा उपयोग येथे करण्यात आला आहे.  शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना येथे चित्र व माहिती ही ऑडीओ व व्हिडियो स्वरूपात येथे नागरिकांना पहावयास व ऐकावयास मिळणार आहे.  शिवकालीन ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन येथे भरविले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० वी जयंती वर्ष आपण यावर्षी साजरे केले. यावर्षीपासून प्रत्येक वर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीचा आदर्श मनात बाळगून आपण सर्वांना पुढे वाटचाल करावयाची आहे. शिवाजी महाराजांसोबत अठरा पगड जातीतील लोक सरदार म्हणून काम करत होते. त्यांचे शौर्य आजही इतिहासात अधोरेखित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून सर्वांना मूलभूत अधिकार दिले आहेत. या अधिकारांचा उपयोग आपण प्रत्येकाने जबाबदारीने केला पाहीजे. नव्या पिढीला महाराजांचे शौर्य, धैर्य, पराक्रम, आदर्श, राज्यकारभाची माहिती व्हावी यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या किल्यांचे सर्वंधन पुरातत्व विभागाच्या माध्यामातून केले जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व धर्मियांना सोबत घेऊन रयतेच राज्य निर्माण केले मंत्री छगन भुजबळ

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. या रयतेच्या राजाची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली. शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला. त्यानंतर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांनी हे पोवाडे गायले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ व सुविधा दिल्या.

येवला शहरात अनेक विकासकामे झाली आहेत यात मुक्तिभूमी, महात्मा फुले नाट्यगृह, प्रशासकीय इमारत, पैठणी पर्यटन केंद्र, विविध स्मारके यांचा समावेश आहे. त्यातील एक महत्वपूर्ण काम शिवसृष्टी असून येवल्याला भूषणावह ठरेल असा शिवसृष्टी प्रकल्प चार एकर जागेत तयार झाला आहे. हा भव्य शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून पर्यटक व  शिवप्रेमी येथे येतील, असा विश्वास मंत्री श्री. भुजबळ यांनी व्यक्त केला. शिवसृष्टी प्रकल्पाचे काम अद्याप बाकी आहे. पहिल्या टप्प्यात महाराजांच्या पुतळ्यासह काही महत्त्वा कामे करण्यात आली आहेत.  महाराजांच्या जीवनावरील महत्वाच्या ऐतिहासिक घटना आणि महाराजांचे सेनापती यांची शिल्पे भित्तीचित्रे या म्युरल्सचे कोरीव काम राजस्थानमध्ये सुरु आहे.  शिवकालीन शस्त्रांचे आणि गड किल्ल्यांचे प्रदर्शन शिवकालीन इतिहासाची माहिती देण्यासाठी ऑडियो व्हिज्युअल रूम ,फाऊटन्स व गार्डन ही सर्व कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

येवल्याच्या विकास कामांच्या सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन

येवला मतदारसंघात मंत्री श्री. भुजबळ यांनी हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. या विकास कामांच्या सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन र उपमुख्यमंत्री श्री. पवार व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

शिवचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रमाने जिंकली शिवप्रेमींची मने…

येवला शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे चरित्र दाखविणाऱ्या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अभिनेते भूषण प्रधान, अविनाश नारकर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासह कलाकारांनी ‘सरनार कधी रण’ या प्रयोगाचे सादरीकरण केले. गायक आदर्श शिंदे यांनी गीत, तर शाहीर प्रा.डॉ.गणेश चंदनशीवे यांनी पोवाडे तसेच महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार  यांच्या हस्ते शिवसृष्टी येथील कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ड्रोनद्वारे करण्यात आले. यावेळी विद्युत रोषणाई, विशेष आकर्षक फायर शो पार पडला. यावेळी अभिनेते भूषण प्रधान, अविनाश नारकर,  अभिनेत्री ऐश्वर्या नारकर,  गायक आदर्श शिंदे, शाहीर प्रा.डॉ.गणेश चंदनशीवे, सरिता सोनवणे, मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ व नंदकिशोर पांचाळ, वास्तूविशारद सारंग पाटील, मक्तेदार पंकज काळे यांचा सन्मान करण्यात आला.

०००

शिक्षण हेच विकासाचे द्वार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

  • जनतेच्या विकास प्रक्रीयेत विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका

 गडचिरोली, दि. ०२: शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज व्यक्त केले.

गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षान्त सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय  मंत्री सुधीर मुनगंटीवार, कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रविण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी सी ए भास्कर पठारे व्यासपीठावर उपस्थित होते. तर आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे,  जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आदी मान्यवर  राज्यपालांच्या स्वागतप्रसंगी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

याप्रसंगी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय  मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली. तसेच राज्यपाल यांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये प्रथम स्थान, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या पदविकांक्षींना आचार्य पदवी, पदव्युत्तर पदवी व पदवी प्रदान करण्यात आली.

राज्यपाल पुढे म्हणाले की, आदिवासी बहुल भागामध्ये शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध करून देतांना नियमित अभ्यासक्रमाबरोबरच रोजगारक्षम उपक्रमांमुळे गोंडवाना विद्यापीठ आदिवासी जनतेच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.  आदिवासी नागरिकांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणण्याची  विद्यापीठामध्ये प्रचंड क्षमता आहे. विद्यापीठाकडून आपल्याला खूप अपेक्षा आहे.  या  भागातील लोकांच्या समस्या जाणून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचे विद्यापीठाच्या मदतीने नियोजन करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना आय.आय.टी., आय.आय.एम. सारखे उच्च दर्जाचे तसेच रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करण्याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.  पदवीप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे तसेच प्राध्यापकांचे त्यांनी अभिनंदन केले.

विद्यापीठाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

तब्बल पंधरा वर्ष परिश्रमपूर्वक अभ्यास केल्यावर विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त होते. ही पदवी विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देत असल्याचे  प्रतिपादन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. संसदीय आयुधांचा वापर करून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाकडे निधीची मागणी केली असून विद्यापीठाचा विस्तार करून संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असे सुंदर विद्यापीठ येथे निर्माण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून विद्यापीठाचे नाव पूर्ण महाराष्ट्रात व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाने मला डी. लिट. पदवी देऊन माझा सन्मान केल्यामुळे डॉक्टरेट मिळविण्याचे वडीलांचे स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी प्रास्ताविकेत विद्यापीठाच्या प्रगती अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र आरेकर व डॉ. अपर्णा भाके यांनी केले तर उपस्थितांचे आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी व्यक्त केले.

दीक्षान्त समारंभामध्ये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनीटीज आणि इंटरडीसीप्लीनरी स्टडीज विद्याशाखेमधील  यु. जी.  व पी. जी. मध्ये प्रदान करण्यात आलेल्या पदवीची संख्या  10 हजार 226 इतकी असून 55 विद्यार्थ्यांना  पीएच डी. तर 41 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनीटीज आणि इंटरडीसीप्लीनरी स्टडीज विद्याशाखेमधील यु. जी.  व पी. जी. मध्ये प्रदान करण्यात आलेल्या पदवीची संख्या  13 हजार 607 इतकी असून 25 विद्यार्थ्यांना  पीएच डी. , 1 विद्यार्थ्याला एम. ई.    संशोधन पदवी   तर 41 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला लोकप्रतिनीधी, प्रशासकीय अधिकारी, माजी कुलगुरु, माजी प्र-कुलगुरु, अधिसभा सदस्य, दानदाते, विशेष आमंत्रित, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

 

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद -अॅड. राहुल नार्वेकर

मुंबई, दि.०२ : राज्यात 2 वर्ष 3 महिन्यांमध्ये 40 हजाराहून अधिक रुग्णांना 340 कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देणे हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाअंतर्गत रूग्णांचा लाभार्थ्यांच्या आनंद मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत, सत्यजित तांबे, व्याख्याते गणेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

अॅड. राहुल नार्वेकर म्हणाले, सामान्य माणसाला मोफत उच्च गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा मिळणे आवश्यक असते.  मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सक्षमपणे काम करत असून कक्षातील सर्व अधिकारी-कर्मचारी कार्यकर्ते यांच्यामुळे राज्यात रुग्णसेवेचे चांगले काम सुरू असून देशात महाराष्ट्र सर्वात जास्त रुग्णांसाठी आर्थिक सहाय्य करणारे राज्य आहे.

सामान्य जनतेला रुग्णसेवा दिली तर तोच खरा आनंद असतो यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही. रुग्णसेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. 2 वर्षामध्ये 600 पेक्षा जास्त रूग्णालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी जोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णांना सहाय्य करुन निस्वार्थ समाजसेवा करत आहेत, असे अॅड. नार्वेकर यांनी सांगितले.

डॉ. नीलम गोरे म्हणाल्या, धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी राखीव बेड ठेवलेले असतात, परंतु त्याची माहिती गरजू रुग्णांना माहिती नसते. यासाठी वेबसाईटवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे.  आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, अधिकारी-कर्मचारी यांच्या अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ही काम करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे अतिशय महत्त्वाचे काम करत असून ते हे काम समाजसेवा म्हणून करत आहेत. आरोग्य क्षेत्रातील त्यांचे काम अतुलनीय आहे.

वाढदिवसासारख्या विविध कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाबद्दलची माहिती जाणे आवश्यक आहे. जेणेकरून दुर्धर आजाराचे रुग्ण, आर्थिक परिस्थिती नसणाऱ्यांना आर्थिक साह्य मिळण्यास मदत होईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना अशा शासनाच्या विविध योजनांचाही माहिती आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातील अधिकारी कर्मचारी यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल स्मृतीचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. नाशिक येथील पडसाद कर्णबधिर दिव्यांगाच्या विद्यार्थी संस्थेला  50 हजारांचा धनादेश ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते देण्यात आला. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून ज्या रूग्णांना आर्थिक मदत झाली अशा रूग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी  मदतीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचे आभार मानले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. चिवटे यांनी प्रास्ताविकात आजपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अंतर्गत करण्यात आलेल्या मदतीबद्दल सविस्तर माहिती दिली.

०००

 

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...