रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 459

चंद्रपुरात एकलव्य मॉडेल स्कूलची निर्मिती करण्यात येणार – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

चंद्रपूर, दि. ० : आदिवासी संस्कृती, भाषा आणि कला यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. त्यासोबतच आदिवासी समाजाच्या स्थायी प्रगतीसाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरणही आवश्यक आहे. त्याचदृष्टीने राज्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या 17 टक्के आदिवासी असल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी आणखी एका एकलव्य मॉडेल स्कूलची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली. यावेळी राज्यपालांनी गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पालकमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या परिश्रमाचे आणि त्यांच्या नेतृत्व कौशल्याचेही कौतुक केले.

आदिवासी विकास विभागातर्फे पोंभुर्णा येथे आयोजित आदिवासी मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, पोंभुर्णाच्या नगराध्यक्ष सुलभा पिपरे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.

‘राज्यात स्थापन होणारे आदिवासी विद्यापीठ हे उत्कृष्ट शिक्षण आणि आधुनिक कौशल्ये प्रदान तसेच आदिवासी समाजासाठी परिवर्तनाचे दीपस्तंभ होईल. या विद्यापीठात एम्स प्रमाणे वैद्यकीय महाविद्यालय, आयआयटी सारखे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय आणि आयआयएम अहमदाबाद सारखी व्यवस्थापन शाळा असेल. हे विद्यापीठ आदिवासी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देईल. या विद्यापीठात 80 टक्के जागा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन

आदिवासी संस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विभागाच्या योजनांचे आकर्षक स्टॉल्स, सामुदायिक वन हक्क आणि वैयक्तिक वन हक्क उपक्रमांतर्गत धनादेश तसेच जमिनीचे पट्टे वाटप कार्यक्रम, आदिवासी स्वयं-सहायता गटांचा झालेला सन्मान आदिवासी विद्यार्थ्यांचे यश पाहून भारावून गेलो, अशी भावना राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाने या आदिवासी मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्स यांनी मानले.

पोंभुर्णा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – मंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असून आदिवासी बांधवांची प्रगती व्हावी, यासाठी राज्यपालांचा आग्रह आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गावे पेसामध्ये घेण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. त्यासंबंधित फाईलवर स्वाक्षरी करून राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आली असून पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी बांधवांचा आणि संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकासात राज्यपालांचे योगदान राहील, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

समृद्धी महामार्ग पोंभुर्णापर्यत येणार असून या महामार्गासाठी कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘पोंभुर्णा तालुक्यातील गावांचा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार समाविष्ट झालेल्या गावांना दरवर्षी 25 लक्ष रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच वनसेवा समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झटका मशीनसाठी 15 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागेल त्याला झटका मशीन देण्यात येईल.’

पोंभुर्णा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात येईल. बिरसा मुंडा केवळ एक व्यक्ती नाही तर शोषित, वंचित लोकांचा बुलंद आवाज आहे. म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित केला आहे, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

आदिवासी बांधवांसाठी विविध निर्णय

मिशन शौर्य, तेंदुपत्त्याचा बोनस 20 कोटी वरून 72 कोटी, शहरातील आदिवासींना शबरी घरकुल योजनेचा लाभ, वीर बाबुराव शेडमाके यांच्यावर पोस्ट तिकीट, खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय, आदिवासींची 12500 पदे भरण्याचा निर्णय, 3000 आदिवासी गावांना पाच टक्के निधी, माडिया समाजाला घरकुल देण्याचा निर्णय घेतला.

पोंभुर्णा तालुक्याचा सर्वांगीण विकास

पोंभुर्णा तालुक्यात नगर पंचायतची व्हाईट हाऊस प्रतिकृती, रस्ते, राजराजेश्वर मंदिर, तहसील कार्यालय, पंचायत समिती इमारत, अत्याधुनिक वाचनालय, इको पार्क, विश्रामगृह, कार्पेट केंद्र, अगरबत्ती केंद्र, कृषी कार्यालय, स्टेडियम, आय.टी.आय., तलावाचे सौंदर्यीकरण, आठवडी बाजार, भूमापन कार्यालय, ओपन नाट्यगृह, संत जगनाडे सभागृह, मुला – मुलींचे वसतिगृह, धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम, प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, आदींचा विकास करण्यात आला आहे.

पोंभुर्णा तालुक्यात होणार एम.आय.डी.सी.

पोंभुर्णा तालुक्यात एमआयडीसीच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे विकास होईल व येथील युवकांना रोजगार उपलब्ध होईल. शेवटच्या वंचित घटकाच्या प्रगतीसाठी आपण पूर्ण शक्तीने काम करू, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

लाभार्थ्यांना धनादेश वाटप व योजनांचा लाभ

यावेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेंतर्गत गणेश परचाके, संतोष आलाम यांना प्रत्येकी 25 लाखांचा धनादेश, जनवन विकास योजनेंतर्गत चंद्रशेखर रामटेके, ताईबाई इरसावे, दिवाकर मडावी, वैयक्तिक वनहक्क पट्टे प्रमाणपत्र ब्रम्हदेव जुगनाके, किसनराव कोटनाके यांना तर सामुहिक वनपट्टे वासुदेव गावंडे, लक्ष्मण चिंचोळकर, मनोहर चौधरी यांना, आदिवासी विकास विभागाच्या वतीने एकता पुरुष बचत गटाला ट्रॅक्टरसाठी 3 लक्ष 7 हजार रुपयांचा धनादेश, किराणा दुकानासाठी पल्लवी गेडाम यांना 42500 रुपयांचा धनादेश, परदेशी शिक्षणासाठी अभिजीत टेकाम यांना 52 लक्ष रुपयांची शिष्यवृती धनादेश, लखपती दिदी अंतर्गत माया हळपे, शबरी आवास योजनेअंतर्गत शांतकला शेडमाके आणि पी.एम. आवास योजनेंतर्गत किशोर मडावी यांना धनादेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

०००

 

गोंडवाना विद्यापीठाने केलेला सन्मान चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री सुधीर मुनगंटीवार

  • स्वैराचारी शिक्षणाचा मार्ग न अवलंबता संस्कारित शिक्षणाचा मार्ग अंगीकारा

चंद्रपूर/गडचिरोली, दि. ०२ : गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून जे विद्यापीठ साकारले, त्याच्या विस्तारात मी योगदान देऊ शकलो, त्या विद्यापीठातर्फे झालेला हा सन्मान माझ्या दृष्टीने खास आहे. या सन्मानामुळे मिळालेली प्रेरणा, ऊर्जा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी मला सहाय्यभूत ठरेल, अशा भावना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केल्या.

या सन्मानमुळे माझ्या पित्याचे स्वप्न पितृमोक्ष अमावस्या दिनी आणि गांधी जयंती सारख्या विशेष दिनी साकार झाले याचा विशेष आनंद झाल्याचे सांगताना मंत्री श्री. मुनगंटीवार भावनिक झाले.

गोंडवाना विद्यापीठाच्या ११आणि १२ व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंत्री श्री. मुनगंटीवार यांना मानद डी लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले; यावेळी ते बोलत होते. मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रकुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, रजिस्ट्रार डॉ. अनिल हिरेखण यांच्यासह विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य मंचावर उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जुन्या आठवणींमुळे माझे भाव दाटून आले असून माझ्यासाठी हा क्षण बहुमूल्य आहे. माझ्या कुटुंबात बहुतेक डॉक्टर आहेत; वडील सुप्रसिद्ध डॉक्टर होते; मी देखील डॉक्टर व्हावं, ही बाबांची इच्छा होती; बाबांना आणीबाणीच्या काळात 19 महिन्याचा कारावास झाला आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलली. पण आज पितृमोक्ष अमावस्या या दिवशी माझ्या बाबांना ही पदवी समर्पित करताना आयुष्यातील एक अपूर्णता पूर्णतेमध्ये परावार्तीत झाल्याने भारावून गेलो आहे.

गडचिरोली, चंद्रपूर या दुर्गम क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने, आदिवासी संस्कृती आणि वैभवला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीसाठी मी संघर्ष केला, प्रयत्न केले त्याचे मला मनापासून समाधान आहे. सुंदर पर्यावरण, शुद्ध हवा, असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात हे विद्यापीठ स्थापन करता आले याचा आनंद आहे; कारण जेथे शुद्ध विचार तेथे शुद्ध आचार आणि शुद्ध आचार असतील तेथे शुद्ध कृती होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार,  वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीचा नामविस्तार असेल किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नामविस्तार असेल या प्रत्येक अभियानात मी होतो हे मी माझे सौभाग्य समजतो. या सर्वं महामानवांच्या नावाने विद्यापीठात विद्यार्थ्यांनी पदवी घेताना स्वैराचारी शिक्षणाचा मार्ग न अवलंबता संस्कारित शिक्षणाचा मार्ग अंगीकारला पाहिजे.  शिक्षण घेतल्यावर समाजाला “हम आपके है कोन” बनण्याच्या ऐवजी “हम साथ साथ है” चा भाव त्याच्या हृदयामध्ये जन्माला आला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे असेही मंत्री  श्री. मुनगंटीवार म्हणाले.

गोंडवाना विद्यापीठाने दिलेली मानद डी. लिट. मला ऊर्जा देणारी आहे; लोकोपयोगी कार्यात मी स्वतःला झोकून दिले आहेच; परंतु, अधिक वेगाने विकास कामे करण्याची शक्ती विद्यापीठाने मला प्रदान केली आहे. हे विद्यापीठ डॉ. प्रशांत बोकारे यांच्या नेतृत्वात व व्यवस्थापन समिती सदस्यांच्या मार्गदर्शनात उत्तम कामगिरी करत राहील, अशी भावना व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्या.

०००

 

 

कारंजा (घा) एमआयडीसीमध्ये ७५० कोटी गुंतवणूक, १५ हजार रोजगार उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई. दि. ०२ : वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस स्वरूपाचा उद्योग असून जवळपास 25 हजार कोटींची उलाढाल आहे. या कराराच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा) एमआयडीसीमध्ये 750 कोटी गुंतवणूक करून जवळपास 15 हजार रोजगार उपलब्ध होणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान मेघदूत येथे वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाचा मे.ओफए बी टेक प्रा.लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी औद्योगिक विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सचिव विरेंद्र सिंग तसेच मे.ओफए बी टेक प्रा.लिमिटेड कंपनीचे अशिष मोहपात्रा, योगेश  मंदानी, राजेश चावडे, विक्रम सिंग, अनुराग सोनी व एल.एल.सोनी उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यातील नवीन उद्योगांना मिळणार बळकटी

वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी करण्यात आलेल्या करारामुळे वस्त्रनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल, स्वस्त वीज, दळणवळणाच्या सोयी -सुविधा व अल्प दरात उपलब्ध औद्योगिक भूखंड यामुळे हा प्रकल्प लवकर कार्यान्वित होण्यासाठी पाठबळ मिळणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित वर्धा जिल्ह्यात नवीन उद्योगांना बळकटी मिळून रोजगार निर्माण होणार आहे.

महिला कारागीरांना रोजगार उपलब्ध होणार

या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील आजुबाजूच्या परिसरातील महिला कारागीरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून हब ॲण्ड स्पोक मॉडेलद्वारे ग्रामीण भागातही उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच कच्चा माल आजूबाजूच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे व त्याचा वापर उद्योगात होईल, त्याचबरोबर या उद्योगामुळे येथील भागातील आर्थिक उन्नती देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येईल.

०००

 

 

धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग आणि  डिजिटायजेशन

मुंबई, दि. २ : राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा ते किती लोकाभिमुख काम करत आहेत, हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत, असे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली,  रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन या कक्षाच्या उद्घाटनासोबतच धर्मादाय रुग्ण योजनेच्या अंमलबजावणीकरीता ऑनलाईन प्रणाली, रुग्णाकरिता 24 तास हेल्पलाईन सुविधा, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील सास्मिता इमारतीत झाले, त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.

यावेळी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव उदय शुक्ल , धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा मोफत व सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय संघटना आणि वैद्यकीय कक्ष समन्वयाने काम करीत आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन या उपक्रमामुळे सुनावणी अधिक सुकर होण्यास मदत होणार असून वेग आणि पारदर्शकता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय मदत कक्षाची अंमलबजावणी

वैद्यकीय मदत कक्ष स्थापनेमुळे धर्मादाय रुग्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल. धर्मादाय रुग्णालयातील राखीव खाटांचे कक्षाकडून वाटप होणार असल्याने सर्व गोरगरीब रुग्णांना खात्रीशीर मोफत, सवलतीच्या दरातील उपचाराकरिता बेड उपलब्ध होणार आहे. गरीब रुग्णांना मोफत तसेच सवलतीच्या दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे सुकर होणार आहे. तसेच रूग्णांना शासनाच्या विविध योजना जसे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, पीएम केअर फंड, मुख्यमंत्री सहायता निधी यांचे वैद्यकीय सहायक कक्षामार्फत मिळवून देण्यात येत आहे. वैद्यकीय साहाय्य करणाऱ्या विविध धर्मादाय संस्थेकडून  मदत मिळवून दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

ऑनलाईन प्रणालीमुळे योजनेचा लाभ घेण्याकरिता या प्रणालीमार्फत  कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी होणार असल्याने खऱ्या गरजू रूग्णांना योजनेचा लाभ मिळणार आहे. धर्मादाय रुग्ण योजनेतील खाटांच्या वितरणात सुसूत्रीकरण येईल. योजनेचा लाभ घेण्याकरिता या प्रणालीद्वारे जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष यांच्या मार्फत करता येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता निर्माण होणार आहे. धर्मादाय योजनेतील रिक्त खाटांची रिअल टाईम माहिती रुग्णांना उपलब्ध होईल, खऱ्या गरजू रुग्णांना योजनेचा लाभ मिळेल असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

वैद्यकीय मदत कक्षाचे औपचारिक उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनपूर्वीच कक्षाचे कामकाज सुरू झाले असून गेल्या 10 महिन्यात कक्षामार्फत 323 रुग्णांना गंभीर आजारांसाठी मदत करण्यात आली असून मदतीची रक्कम 12 कोटी 73 लक्ष एवढी असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळास भेट दिल्यावर राज्यातील धर्मादाय रुग्णालये, त्यांच्याकडील राखीव बेडची संख्या, यांची माहिती मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईन विषयी माहिती

       नागरिकांना वैद्यकीय आपत्तीच्या काळात धर्मादाय रुग्णालयामध्ये तात्काळ उपचार मिळावेत, याकरीता उपमुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत हेल्पलाईन सुरु करण्यात येत आहे.

       ही सुविधा 1800 123 2211 या क्रमांकावर उपलब्ध असणार असून या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णांना योजनेबाबतची माहिती, अर्ज कोठे करावा, इत्यादीबाबत माहिती 24 *7 तास उपलब्ध होणार आहे.

       सदर हेल्पलाईन सुविधा 24 तास सुरु असणार आहे.

राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाची विषयी माहिती

राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाच्या स्थापनेपासूनची माहे जानेवारी, 2024 पासून ते माहे ऑगस्ट 2024 पर्यंत कक्षाच्या माध्यमातून 323 रुग्णांना या योजनेचा लाभ उपलब्ध करुन दिला आहे. त्यानुसार रुपये 12 कोटी 73 लक्ष रकमेचे उपचार रुग्णांना मोफत / सवलतीच्या दरात सहजतेने उपलब्ध झाले आहेत. सदर मदतीमध्ये हृदय प्रत्यारोपन, कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, यासारख्या गंभीर व सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रीयांचा समावेश आहे. या व्यतिरीक्त कक्षाने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धर्मादाय ट्रस्ट, शासकीय रुग्णालये, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री केअर फंड, मुख्यमंत्री सहायता निधी यांच्यामध्ये समन्वय साधून 3 ते 4 कोटी रुपयांचे उपचार रुग्णांना उपचार मिळवून दिले आहेत.

राज्यातील हिंगोली जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यामध्ये धर्मादाय रुग्णालयांचे जाळे पसरले आहे. राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे 468 रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे 12000 बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरीता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेन, एन.एन रिलायन्स, बाई जेरबाई वाडीया, डॉ.बालाभाई नानावटी हॉस्पीटल, ब्रीच कॅण्डी हॉस्पीटल, द बॉम्बे हॉस्पीटल, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, डी.वाय.पाटील हॉस्पीटल, के.ई.एम. हॉस्पीटल, सह्याद्री हॉस्पीटल, संचेती हॉस्पीटल, जहांगीर हॉस्पीटल इत्यादी मोठ्या रुग्णालयाचा समावेश आहे.

०००

 

महाराष्ट्रातील पहिला ‘ॲक्वाफेस्ट’ जल पर्यटनमहोत्सव जळगावमध्ये सुरु

▪️ पर्यटनमंत्र्यांनी स्पीड बोट चालवून घेतला थरारक अनुभव

जळगाव दि. २ (जिमाका):  पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे. राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. राज्यात किल्ले, जल स्रोत, लेण्या, वन मुबलक प्रमाणात आहेत. यासाठीच देशातील सर्व राज्याचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे. याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी 15 कोटी रुपये देणार असून त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबीला लगेच सुरुवात करावी, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली.

जळगावमध्ये मेहरूण तलावात महाराष्ट्रातील पहिला तीन दिवसीय ‘अॅक्वाफेस्ट’ जल पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. महाजन बोलत होते.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण,यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

जळगावकरांसाठी कायमस्वरूपी जलपर्यटन केंद्र

जळगाव जिल्ह्यात आणि जिल्ह्याला लागून देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक पर्यटनस्थळे आहेत. जळगाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित केली जात असून आज पाण्यातला हा बोटींचा साहसी खेळ अनुभवल्यानंतर मेहरूण तलावात हे जल पर्यटन प्रकल्प कायम स्वरूपासाठी राबविणार असून यासाठी 15 कोटी रुपये देण्याचे निश्चित केले असून प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक बाबी लवकर पूर्ण करून इथे जल पर्यटन सुरु केले जाईल, अशी घोषणा मंत्री श्री. महाजन यांनी केली. तसेच 20 कोटी रुपयाचा निधी मेहरूण तलावाच्या चौपाटीसाठी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. फक्त जळगावकरांसाठीच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील पर्यटकांसाठीही हे आकर्षण केंद्र ठरेल, असा विश्वासही मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.

राज्यातील पर्यटन विकासासाठी पर्यटन धोरण

आपल्या राज्याला 750 किलोमीटर एवढी मोठी समुद्र किनारपट्टी आहे. इथल्या पर्यटनात मोठी क्षमता असून जगभराचे पर्यटक याठिकाणी आकर्षित होतील यासाठी सिंधुदुर्गच्या जवळ स्कुबा डायव्हिंगचा प्रकल्प सुरु केला आहे. समुद्राच्या आतमध्ये जाऊन तिथलं जैविक वैभव ज्यात सर्व प्रकारचे जलचर प्राणी, मासे, वनस्पती पाहायला मिळतील. आजपर्यंत इथे परदेशी पर्यटकांना राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेल नव्हते ते आता हॉटेल ताजच्या रूपात पहिल्या हॉटेलच्या पायाभरणीचा शुभारंभ होणार असल्याचेही पर्यटन मंत्री यांनी सांगितले. तसेच राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नसेल अशी डेक्कन ओडिसी सुरु करणार असून यात 24 तास राहण्यासाठीच्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पर्यटनमंत्र्यांनी स्पीड बोट चालवून घेतला थरारक अनुभव

अॅक्वाफेस्ट जल पर्यटन महोत्सवाची फीत कापून पहिल्यांदा बोटीतून खासदार, आमदार यांच्यासह जल पर्यटनाचा आनंद घेतला. बोट मध्यभागी गेल्यानंतर या बोटीतून स्पीड बोटीवर स्वार होऊन स्वतः हातात स्टेअरिंग हातात घेवून ताशी 90 किलोमीटर वेग असलेल्या बोटीचा थरार अनुभवला. मेहरूण तलावाला तीन फेऱ्या मारून स्वतः बरोबर बघणाऱ्यांनाही पर्यटनमंत्र्यांनी आनंद दिला.

०००

 

जिल्ह्याच्या विकासात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मोलाचे योगदान – उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा, दि. (जिमाका) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जिल्ह्याच्या आर्थिक, समाजिक, कृषी व शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान आहे. या बँकेचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी विविध योजना राबवाव्यात. या योजना राबविण्यासाठी शासनाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव सांगता सोहळा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर पार पडला त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. या सोहळ्यास पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार तथा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, आमदार सर्वश्री रामराजे नाईक-निंबाळकर, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले, दीपक चव्हाण, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई आदी उपस्थित होते.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कामगिरी राज्यात अव्वल आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, या बँकेला शंभरहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहे. स्थापनेपासून बँकेची देदिप्यमान प्रगती आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारच्या एसएमपी दराबाबतच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळणार आहे. शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत मोफत वीज देण्याच्या निर्णयाबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना 7 रुपये ज्यादा अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे.

राज्यात सौर ऊर्जेवर साडेनऊ हजार मॅगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, राज्यातील उपसासिंचन योजना टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे. याचा लाभ सातारा जिल्ह्यालाही होणार आहे. राज्याच्या विकासात सहकाराचा मोलाचा वाटा आहे. पुढील काळातही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्थापनेपासून आर्थिक शिस्त पाळली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, बँकेने नेहमीच शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोणतेही राजकारण न करता मोठा व्यवसाय निर्माण केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

बँकेचे अध्यक्ष आणि खासदार श्री. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी बँकेडून अनेक योजना राबविण्यात येत आहे. बँकेच्या एकूण 319 शाखा आहेत. जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखाने उभारण्यासाठी बँकेने सहकार्य केले आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून सामाजिक कामेही केली जात असल्याचे यांनी सांगितले.

आमदार नाईक-निंबाळकर म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गौरवशाली परंपरा आहे. कर्जफेडीचे संस्कार महत्त्वाचे आहेत. कृत्रीम बुद्धीमत्ता आणि बॅकिंग क्षेत्र यांची सांगड घातली पाहिजे, असे ही त्यांनी सांगतले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, नाबार्डचे राजेंद्र चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्यासह बँकेचे संचालक, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

 

 

नवीन भूजल महामंडळ तात्काळ स्थापन करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

मासेमारी संस्थेच्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना  

चंद्रपूर,दि. ०२ : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मच्छीमार समाजाला दिलेला शब्द पाळला आहे. मच्छीमार बांधवांच्या उद्धारासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार असल्याची ग्वाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यानुसार रविवार, दि. ३० सप्टेंबरला मुंबई येथे  बैठकीत त्यांनी नवीन भूजल महामंडळ तात्काळ स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यासोबतच मासेमारी संस्थेच्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे बैठक घेण्यात आली. यावेळी मत्स्य विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, मत्सव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे, महाराष्ट्र राज्य उपसचिव कि. म. जकाते, महाराष्ट्र राज्य मत्स्यउद्योग विकास धोरण समिती सदस्य अॅड. अमोल बावणे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार,प्रतिनिधी अमित चवले, रमेश सोनवणे, संस्थेचे प्रतिनिधी जितू टिंगूसले यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग यांच्या अखत्यारित असलेल्या तसेच माजी मालगुजारी तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे या तलावांमधून मत्स्यबीज व मासे वाहून गेले. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या  मच्छिमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाल्याची जाणीव शासनाला आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले होते. त्यानुसार प्रशासनाला महामंडळ स्थापन करण्याचे आदेश ना. मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे मच्छिमार समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या आदेशांनंतर महाराष्ट्रातील भूजल जलाशयातील मासेमारी समाज यांच्या विकासाकरिता नवीन भूजल कल्याणकारी महामंडळ तात्काळ स्थापन करण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश श्री. मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महामंडळाचे कार्यालय नागपुरात

महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक मासेमारी करणारा मच्छिमार समाज व त्यांच्या संस्थांच्या विकासाच्या उद्देशाने भूजल महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. महामंडळ स्थापन झाल्यावर त्याचे कार्यालय नागपूर येथे असावे, अशी मागणी होती. त्याचा विचार करून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी नागपूरला कार्यालय ठेवण्याच्या सूचना केल्या. सर्वाधिक भूजल संस्था या विदर्भात असल्यामुळे भूजल जलाशयातील महामंडळाचे कार्यालय नागपुरात असणे आवश्यक आहे, त्यांनी म्हटले.

म्हणून महामंडळाची स्थापना

भूजल महामंडळ स्थापन झाल्यास भूजल जलाशयातील संस्था व मासेमारी करणारा समाज यांचा सर्वांगीण विकास होणार आहे, याची जाणीव श्री. मुनगंटीवार यांना आहे. त्याचदृष्टीने त्यांनी मासेमारी करणारा समाज व मत्स्य सोसायटी यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक तसेच व्यवसायिक जीवनमान उंचावण्यासाठी या महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे मानले आभार

मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भूजल जलाशयातील मासेमारी समाजात आनंदाचे वातावरण आहे. मासेमारी समाजाकडून मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे. तसेच समाजाकडून त्यांचे आभारही मानण्यात आले आहेत.

बोटुकली खरेदीसाठी आर्थिक मदत

मंत्री महोदयांच्या सूचनेनंतर मासेमारी संस्थेला प्रति हेक्टर १५०० किलो मत्स्य उत्पादन करणे अनिवार्य असल्याची अट रद्द करण्यात आली आहे. ‘बोटूकली’चे अनुदान लवकरात लवकर संस्थेच्या खात्यात देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे श्री. मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी शासनाकडून बोटूकली (मत्स्यबीज) खरेदीसाठी आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. यासोबतच नायलॉन सूत जाळे, डोंगे यांचे अनुदान सभासदांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार आहे.

कर्जमाफीचा प्रस्ताव

मासेमारी  संस्थेवर असणाऱ्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. जुलै २०२४ मध्ये अतीवृष्टीमुळे मासेमारी सहकारी संस्थांना झालेल्या नुकसान भरपाईबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

०००

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई, दि. २ :  राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मेघदूत निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

०००

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि.२:  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विधानभवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (२) डॉ. विलास आठवले, उप सभापती यांचे खासगी सचिव श्री.रविंद्र खेबुडकर, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी,निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

मुंबई, दि.२: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे व राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

०००

 

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...