शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 461

गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन

Oplus_131072

मुंबई, दि. १ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने दुपारी आगमन झाले.

श्री. शहा यांचे स्वागत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार सुनील तटकरे, प्रफुल पटेल, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच  राजशिष्टाचार व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

येथून गृहमंत्री अमित शहा यांनी योगी सभागृह, दादर येथे पुढील कार्यक्रमासाठी प्रयाण केले.

०००००

अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा आनंदराव अडसूळ यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, दि. १ : माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.अडसूळ यांनी अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.

अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्षपदी धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती तर गोरक्षक लोखंडे आणि वैदेही वाढाण यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्यांनीही आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अशी माहिती, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती – जमाती आयोगाने कळविले आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. १ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक श्री. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे  तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी.

चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायींना उच्च दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या.

चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्ककडे येणारे रस्ते व त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, अनुयायांकरीता पिण्याचे पाणी, शौचालय आदींची सुविधा, परिसर स्वच्छता, सीसीटीव्हीची व्यवस्था, विद्युतव्यवस्था, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची सादरीकरणाद्वारे माहिती यावेळी देण्यात आली.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभातून बँकांचा सेवा शुल्क कपात केला तर कारवाई करणार – मंत्री आदिती तटकरे

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. १ : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) घेण्यात आली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे,सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सिडींग नसल्याने लाभ मिळत नाही. याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने दि. २ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी. बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात, अशा सूचनाही मंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत उपस्थित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना दिल्या.

नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्षात अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि पुरुषांचे आधार क्रमांक, अकाउंट नंबर दिले गेले त्यामुळे पुरुषांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून ज्या केंद्रांवर हे अर्ज भरले गेले त्या केंद्र चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

आतापर्यंत २ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी झाली असून १ कोटी ८७ लाख पात्र महिलांना  लाभ देण्यात आला आहे. उर्वरित अर्जांची पडताळणी तातडीने करून घ्यावी, अशा सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी दिल्या.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

विटा बसस्थानक पुनर्बांधणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

सांगली, दि. १ : विटा येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये १८ फलाटाची निर्मिती करण्यात येणार आहे. सर्व बांधकाम हे आरसीसी स्वरूपात करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये उपाहारगृह, दुकानगाळे, संरक्षित भिंत तसेच प्रवेशद्वार त्याचबरोबर बसस्थानकाच्या अंतर्गत भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

या अद्ययावत बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे लोकांना अत्याधुनिक सोयी – सुविधांयुक्त बसस्थानक मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजी बापू पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजी जि. प. सदस्य सुहास बाबर, अमोल बाबर, आनंदराव पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत विचारपूस

मुंबई दि. १ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासोबत झालेल्या अपघाताबाबत विचारपूस केली. राज्य शासन व जनतेच्यावतीने लवकर बरे होण्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री मुख्यमंत्री यांनी दिली. तसेच आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी अभिनयाद्वारे लाखो लोकांना आनंद दिला आहे. त्यांच्या प्रकृतीस्वास्थासाठी मुख्यमंत्री यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

मुंबई, दि. 1- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.

डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे.”

सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते वितरण

मुंबई, दि. ३० – केंद्र व राज्य सरकार हे समाजातील वंचित, गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवित असते. सरकार बरोबरच अनेक उद्योग, संस्था व कंपन्या या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून या घटकांच्या उन्नती साठी काम करत आहे. वंचित घटकांसाठीची ही सेवा निरंतर सुरू रहावी, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज येथे केले.

मुंबईतील जिओ सेंटर येथे आयोजित सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आयओसीच्या अध्यक्ष पीटी उषा, सीएसआर जर्नलचे मुख्य संपादक अमित उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे आदी उपस्थित होते.

समाजातील वंचित, गरिबांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्याना या पुरस्काराच्या निमित्ताने एकत्र आणण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून श्री. बिर्ला म्हणाले की, समाजाप्रति उत्तरदायित्व निभावत गरिबांसाठी काम करणे ही भारताची संस्कृती, सामर्थ्य आहे. कोविड काळात आपली ही सामूहिक मदत करण्याची संस्कृती जगासमोर आली. अशाच प्रकारे पुढील काळातही सर्वांनी मिळून समाजातील वंचितांना आधार देऊया.

सीएसआर च्या माध्यमातून समाजातील गरीब घटकापर्यंत विकास पोचविण्याचे काम अनेक उद्योग, कंपन्या करत आहेत. याद्वारे समाजाला दिशा देण्याचे काम होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारार्थीचा गौरव करण्यात आला.
0000

अटल सेतूवर एमएमआरडीए तर्फे उभारलेली आयटीएमएस प्रणाली योग्य परिवहन आयुक्त कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. ३० : अटल सेतूवर एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) तर्फे उभारण्यात आलेली आयटीएमएस (एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली) योग्य असल्याचे स्पष्टीकरण परिवहन आयुक्त कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहे.

शासनाच्या ११जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १६७ (ए) मध्ये नमुद केल्यानुसार राज्यातील आयटीएमएस  (इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम /एचटीएमएस(हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) प्रकल्पाकरीता राज्याचे  परिवहन आयुक्त, मुंबई यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे.

त्यानुसार या कार्यालयातील सह परिवहन आयुक्त (अंमल-२)  मुंबई यांनी एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) तर्फे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पाअंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवर लावलेल्या उपकरणांची तपासणी २५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन पनवेल कार्यालयाच्या पथकासह केली.

या तपासणीमध्ये टोलनाक्यावर ओव्हरस्पीड वाहनांची व टोलनाक्यावर टोल न भरलेल्या वाहनांची तपासणी केली.  तसेच उरण येथील एमएमआरडीएच्या कमांड व नियंत्रण कक्षामधील उपकरणांची तपासणी केली. या तपासणीमध्ये दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांसाठी तेथील उपकरणे योग्य असल्याचे आढळले.

त्यानुसार आज ३० सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १६७ (ए) नुसार परिवहन आयुक्त, मुंबई यांनी अटल सेतुवर उभारलेली आयटीएमएस (एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली) योग्य असल्याबाबत प्रमाणपत्र जारी केले आहे. याबाबत प्रकाशित झालेले  वृत्त निराधार आहे, असे स्पष्टीकरण सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ/

जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार

मुंबई, दि. ३० : जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार आहे. या निर्णयामुळे जामनेर तालुक्यातील 31 गावे, जळगाव तालुक्यातील 28 गावे आणि पाचोरा तालुक्यातील 16 गावे अशा एकूण 75 गावांना लाभ मिळणार आहे.

ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांच्या दूरदृष्टी आणि आणि विकासाभिमुख निर्णयामुळे या परिसरातील लोकांच्या जीवनमानात कमालीचा बदल होईल आणि हा भाग सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे भागपूर धरणापासून अजिंठा डोंगराच्या पायथ्यापर्यंत उपसा सिंचन योजनेतून जामनेर तालुक्यातील 31 गावांना लाभ होणार असून त्यातील 11 हजार 388 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

जळगाव तालुक्यातील 28 गावांना लाभ होणार असून 14 हजार 224 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.तर पाचोरा क्षेत्रातील 16 गावांना लाभ होणार असून 5152 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे असे ३० हजार ७६४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत जामनेर तालुक्यातील २३ लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांना व पाचोरा तालुक्यातील २६ लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांना पाणी पुरविण्यात येणार आहे. या प्रकल्पात गोलटेकडी ल.पा तलाव व एकुलती साठवण तलावाच्या कामाचा सुध्दा समावेश आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ६ :- भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना...

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि. ६ :  संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक...

“पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
जळगाव, दि. ६ – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या...

बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, ६ : बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आपल्या जीवनात शांतता, समृद्धी,...

‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ०६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ‘ईद-उल-अज़हा’ अर्थात ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून, या पर्वाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, सलोखा, सौहार्द...