शुक्रवार, जून 6, 2025
Home Blog Page 462

नाडे येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

सातारा, दि. २९ : पाटण तालुक्यातील नाडे ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालुक्यातील पहिल्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी आयुष मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे  उपाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष यशराज देसाई, समितीचे उपाध्यक्ष विजय पवार आदी उपस्थित होते.

या अश्वारुढ पुतळ्याची उंची ९ फूट असून हा पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती नाडे येथे उभारण्यात आली आहे. पाटण तालुक्यातील हा पहिला अश्वारुढ पुतळा आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील ग्रामसचिवालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

सातारा, दि.२९-पाटण येथील केंद्र पुरस्कृत अमृत २.० नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालयाचे नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे उपस्थित होते.

या पाणीपुरवठा योजनेची मूळ किंमत 16 कोटी 25 लाख 56 हजार इतकी आहे. या कामाला 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे 135 लिटर दरडोई पाणी देण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असून या योजनेअंतर्गत 110 मिमी ते 250 मिमी व्यासाची  38.964 किमी. पाईपलाईन असणार आहे.  तर 4,442 घरगुती नळ जोडण्या आहेत. या पाणीपुरवठा योजनेचे पाटण शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार आहे. याचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

मल्हारपेठ येथील ग्रामपंचायत मालकीची तीन मजली इमारत 2001 मध्ये बांधण्यात आली होती. या जुन्या इमारतीवर जन सुविधा योजनेतून 50 लाख खर्चून ग्रामसचिवलयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या सुसज्ज ग्रामसचिवालयामुळे मल्हारपेठ ग्रामस्थांना विविध सुविधा मिळणार आहेत. याचेही लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, नगरपंचायतीचे प्रशासक संतोष मोरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0000

पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा, दि. २९: पाटण तालुक्यातील काळोली येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल तालुका बीज गुणन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उ‌द्घाटन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम शेतकरी प्रशिक्षण केंद्र म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल नावारूपास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी आयुष मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कृषी सहसंचालक उमेश पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  माती परीक्षण प्रयोगशाळा, धान्य व स्वच्छता प्रतवारी केंद्र, डाळ प्रक्रिया केंद्र, तेल घाणा केंद्र व भात प्रक्रिया केंद्राची पाहणी केली.

जिल्ह्यातील दुर्गम भागात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून १६.३३ हेक्टर क्षेत्रावर काळोली येथे बहुउ‌द्देशीय कृषी संकुल उभारण्यात आले. या बहुउद्‌देशीय संकुलासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४९८ लक्ष रुपये खर्चास मंजुरी मिळाली असून त्यापैकी ४९१ लक्ष रुपये वितरित करण्यात आले आहेत. या संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रक्षेत्रावर विविध पिकाचे प्रात्यक्षिक स्वरूपात असलेले निवासी प्रशिक्षण, वेगवेगळ्या प्रक्रिया उ‌द्योगांचे प्रशिक्षण आणि माती परीक्षण या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

या कृषी संकुलात तालुका बीज गुणन केंद्र काळवली प्रक्षेत्रावर १२.२० हेक्टर लागवडीलायक क्षेत्र असून सध्या या क्षेत्रावर भात, सोयाबीन, ऊस आणि रब्बी ज्वारी या पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते. पाटण तालुक्यात पिकांच्या लागवडीसाठी पोषक हवामान आहे. येथे भात सोयाबीन, ऊस, भुईमूग, सूर्यफूल या पिकांची लागवड करण्यात येते.

कृषी संकुलामध्ये २०० आसन क्षमता असलेले सुसज्ज शेतकरी प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी कृषी, उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामविकास विभाग यांची शेतकरी तसेच महिला बचत गटासाठी प्रशिक्षणांचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे दहा हजार शेतकरी या कृषी संकुलास भेट देतील.  कृषी संकुलामध्ये पीक उत्पन्न वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या माती परीक्षण  प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकऱ्यांना माती नमुने तपासण्यासाठी जिल्हास्तरावर यावे लागणार नाही. या बहुउ‌द्देशीय कृषी संकुलामध्ये पहिल्या टप्प्यात धान्य प्रतवारी केंद्र, तेलघाणा औणि भात गिरणीचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रक्रिया केंद्रामध्ये शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर धान्याची प्रतवारी करणे भुईमूग, सूर्यफूल इत्यादीचे तेल तयार करणे आणि भात कांडून देणे या सुविधा उपलब्ध आहेत. ही केंद्रे शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी महाविद्यालयातील वि‌द्यार्थी यांचे मार्फत कार्यान्वित करण्यात येतील. या प्रक्रिया केंद्रांमुळे दुर्गम भागातील युवकांना कृषी प्रक्रियेबाबत माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

काळोलीच्या बीज गुणन केंद्रावर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील ऊस प्रात्यक्षिके उपकेंद्राच्या माध्यमातून घेणे प्रस्तावित असून तसा प्रस्ताव महात्मा फुले कृषी वि‌द्यापीठात देण्यात येणार आहे. यामुळे पाटण आणि लगतच्या तालुक्यातील उसाचे उत्पादन वाढण्यासाठी उत्तम बियाणे शेतकऱ्याऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल.या संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी निवासस्थान, उपहारगृह, शीतगृह या सुविधा प्रस्तावित असून जिल्हा वार्षिक योजनेतून त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

0000

ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

छत्रपती संभाजीनगर दि.२९(जिमाका)- ऑरीक -बिडकीन औद्योगिक प्रकल्पातील औद्योगिक गुंतवणुकीच्‍या  माध्यमातुन मराठवाड्यातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात  रोजगार निर्मिती होईल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते बिडकीन औद्योगिक  क्षेत्राचा लोकार्पण  सोहळा आयोजित करण्‍यात आला होता.

दूरदृश्‍य  प्रणाली द्वारे  बिडकीन औद्योगिक प्रकल्पाच्या  लोकार्पण सोहळ्यात   राज्यपाल सी. पी. राधाकृष्‍णन,  पुणे येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत दादा पाटील, लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ, छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक हॉल, डीएमआयसी प्रकल्प, शेंद्रा येथून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे. राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे ,डीएमआयसी सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे महाराष्‍ट्र औद्योगिक विकास एमआयडीसीचे प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक अरुण दुबे, महेश पाटील यांच्यासह विविध उद्योग समूहाचे प्रतिनिधी, उद्योजक उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्‍हणाले की, शासनाने ऑरिक सिटीच्‍या उद्घाटनापासून ते प्रकल्‍प पूर्ती करण्‍याचे काम केले आहे. ८ हजार एकरवर  या औद्योगिक वसाहतीचा विस्‍तार असून यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक विविध उद्योगाच्‍या मार्फत करण्‍यात आली आहे. बिडकीन प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून  युवकांना रोजगार उपलब्‍धतेबरोबरच पायाभूत सुविधांचाही विकास होत आहे.

ऑरिक बिडकीन प्रकल्‍पाविषयी माहिती

  • ऑरिक हे भारतातील अत्‍यंत नियोजनबध्‍द पध्‍दतीने विकसित केलेले औद्योगिक शहर हे केंद्र (४९%) आणि MIDC (५१%)  संयुक्‍त  विद्यमानातून छत्रपती संभाजीनगर येथे  १० हजार एकरवर दिल्‍ली  मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर च्‍या माध्‍यमातून विकसित होत आहे.
  • ऑरिक औद्योगिक  क्षेत्रामध्‍ये  शेंद्रा आणि बिडकीन या दोन औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे.
  • बिडकीन औद्योगिक शहर हे ७ हजार ८५५ एकर क्षेत्रामध्‍ये वसलेले असून रेल्‍वे व रस्‍ते मार्गाने जोडले गेलेले आहे.या क्षेत्रापासून ३५ किलोमीटरच्‍या अंतरावर आंतरराष्‍ट्रीय  विमानतळ आहे, तसेच जेएनपीटी अवघ्‍या ३२० किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे भारतातील सर्वात मोठ्या बंदरासाठी सुलभ दळणवळण सुविधा उपलब्‍ध  होत आहे. बिडकीन  औद्योगिक क्षेत्र हे बाळासाहेब ठाकरे महाराष्‍ट्र समृध्दी  महामार्गापासून अवघ्‍या ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
  • बिडकीन औद्योगिक क्षेत्रामध्‍ये  आंतरराष्‍ट्रीय  दर्जाच्‍या सुविधामध्‍ये

१.       प्‍लग अॅंड प्‍ले इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर

२.      २४×७ मुबलक विद्युत व पाणी पुरवठा

३.      पर्यावरण विषयक परवानगी (EC)

४.     योग्‍य क्षमतेचं  CEPT &STP प्रकल्‍प

५.     अद्यावत INTERNET सुविधा

६.     Walk to work concept

७.      एक खिडकी योजनाव्‍दारे  सर्व परवाने उपलब्‍ध या सुविधांमूळे हे क्षेत्र बहुराष्‍ट्र कंपन्‍यांना महाराष्‍ट्रामध्‍ये कारखाना उभारण्‍यासाठी एक  आदर्श ठिकाण ठरले आहे.

  • ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्‍या प्रकल्‍पाचा अंदाजीत खर्च ९ हजार १२२ कोटी पेक्षा जास्‍त आहे. या क्षेत्रामधून सुमारे ६० हजार कोटी रुपये इतकी गुंतवणूक निर्माण होणार असून त्‍याव्‍दारे सुमारे ३५ हजार प्रत्‍यक्ष व ७५ हजार अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
  •  बिडकीन औद्योगिक क्षेत्र हे पुढच्‍या भविष्‍याची एक नांदी आहे. या औद्योगिक क्षेत्रांमध्‍ये इलेक्ट्रिकल व्‍हेईकल, ऑटोमोबाईल्‍स आणि ऑटो कंपोनंट्स, औषध निर्माण व जैव तंत्रज्ञान, फूड प्रो‍सेसिंग, अवजड अभियांत्रिक  उद्योग आणि कपडे उद्योग यांना मोठी संधी उपलब्‍ध होणार आहे.
  • आतापर्यंत ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्रामध्‍ये गुंतवणूक केलेल्‍या प्रमुख कंपन्‍यांमध्‍ये

१.      भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी उत्‍पादक कंपनी अथर एनर्जी

२.      औषध निर्माण क्षेत्रातील कंपनी पिरामल फार्मा

३.      विशेष पॅकेजिंग कंपनी असलेले  कॉस्‍मो फिल्‍म आणि

४.     ऑटोमोबाईल्‍स  आणि औद्योगिक कंपन्‍यांसाठी  वंगण निर्माण करणारी लुब्रीझॉल या कंपन्‍याचा समावेश झालेला आहे.

  • बिडकीन औद्योगिक क्षेत्रामध्‍ये टोयाटो किर्लोस्‍कर मोटर इलेक्ट्रिक व हायब्रीड व्‍हेईकल विकसित करणार आहे.  या संदर्भात महाराष्‍ट्र शासन आणि किर्लोस्‍कर मोटर्स यांच्‍यामध्‍ये ३१ जुलै २०२४  रोजी सामंजस्‍य करार करण्‍यात आलेला आहे. या कंपनीतर्फे प्रकल्‍पामध्‍ये वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्‍याचे   नियोजन असून यामधून  ८ हजार पेक्षा  जास्‍त रोजगार निर्मिती होणार आहे.
  • Jsw ग्रीन   मोबिलिटी प्रकल्‍पास  मंजूरी  दिली असून ही कंपनी सुध्‍दा २७ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक्‍  या बिडकीन क्षेत्रामध्‍ये करणार असून यामधून जवळपास ५ हजार २०० रोजगार निर्मिती होणार आहे.
  •  मराठवाडा क्षेत्रामध्‍ये शेतीशी निगडित व्‍यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहे याची जाणीव ठेवून आम्‍ही बिडकीन ओद्योगिक क्षेत्रामध्‍ये १०० एकरवर मेगा फुड पार्क विकसित केलेला आहे.
  •  ऑरिक औद्योगिक क्षेत्रामुळे  मराठवाड्याचा विकास साधला जात आहे याच पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्‍या वतीने नुकत्‍यात दिघी  पोर्ट  औद्योगिक क्षेत्राच्‍या  विकासाला मंजुरी देण्‍यात आली आहे. त्‍यामाध्‍यमातून रायगड जिल्‍ह्यातील ६ हजार  ५६ एकर क्षेत्रावरती औद्योगिक क्षेत्र निर्माण करत आहोत . यामध्‍ये सुमारे ३८ हजार कोटी रुपयांची  गुंतवणूक अपेक्षित असून जवळपास १ लाख १४ हजार इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन

पुणे, दि.29: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा 1 अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ तर टप्पा 1 चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा स्मारकाचे भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला अर्पण करण्यात आले. या अनुषंगाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पुण्याचा चहूबाजूनी विस्तार होत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, शैक्षणिक संस्थेचे जाळे वाढत आहेत. याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून प्रदूषणातही वाढ होत आहे, त्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी असून याकरीता मेट्रोसारखे प्रकल्प महत्वाचे आहेत, आगामी काळात मेट्रोचे जाळे वाढविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. 

या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन दूरदृष्यप्रणालीद्वारे तर मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, आश्विनी जगताप, आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.

उद्योग आणि पायाभूत सुविधेत महाराष्ट्र देशात अग्रेसर

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या मदतीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. आज राज्यात विविध उद्योग येत असून उद्योगाला चालना देण्याकरीता राज्य शासन सहकार्य करीत आहेत. राज्यात 52 टक्के परदेशी गुंतवणूक झाली आहे, विविध क्षेत्रातील उद्योजक राज्याकडे आकर्षित होऊन उद्योगाला चालना देत आहेत. आपले राज्य उद्योगस्नेही झाले असून उद्योग आणि पायाभूत सुविधेत देशात महाराष्ट्र अग्रेसर झाले आहे.

पुरंदर विमानतळाकरीता भूसंपादनाची कार्यवाही करा

पुरंदर विमानतळाकरीता लवकरात लवकर जागा अधिग्रहित करुन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा. याबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरीता केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय आणि उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, आगामी काळात पुरंदर विमानतळाचे काम सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाकरीता राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याठिकाणी ऐतिहासिक स्मारक होत आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी लोककल्याणकारी योजनांची अमंलबजावणी

राज्य शासनाच्यावतीने सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आदी लोककल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असून त्याचा नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ कोटी ९० लाख महिलांना लाभ देण्यात आला आहे, याकरीता वर्षभरासाठी निधीची व्यवस्था करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यातून पहिली रेल्वे कोल्हापूर येथून आयोध्याकरीता सोडण्यात आली असून आगामी काळात राज्यासह पुण्यातून याकरीता प्रयत्न करावेत. यापुढेही विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा वेगवान व गतिमान कार्यक्रम असाच सुरु राहील, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता मेट्रोच्या कामाला गती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोच्या कामाला सन 2014 पासून गती मिळाली असून यासाठी महामेट्रो ही कंपनी स्थापन करुन हे काम अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आले. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा देशातील सर्वाधिक वेगाने काम पूर्ण होणारा टप्पा म्हणून ओळखला जातो. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने मेट्रोचे काम करण्यात येत असून ही देशातील पहिली सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील मेट्रो आहे. स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानक ‘मल्टिमॉडेल स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असून अशाप्रकारचे देशातील पहिले स्थानक असणार आहे. आगामी काळात मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील विविध भागात मेट्रोने प्रवास करता येईल, असे नियोजन केले आहे, असेही ते म्हणाले.

पुणे ही समाजसुधारकांची भूमी असून येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करुन देणारे स्मारक होणे अंत्यत महत्त्वाची गोष्ट आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या पाठिंब्याने भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करुन महिलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली. शिक्षणाचा आणि समाजसुधारणेचा मिळालेल्या वारसाची आठवण करुन देणारे सुंदर असे स्मारकाचे काम सुरु होत असून ते आगामी 500 वर्ष आपल्या प्रेरणा देत राहील, श्री. फडणवीस म्हणाले.

पुणे हे राज्याचे आर्थिक मॅग्नेट

पुणे ही सांस्कृतिक, तंत्रज्ञानाची राजधानी आहेच त्याचबरोबर पुणे हे आर्थिक ‘मॅग्नेट’ आहे. पुणे शहर व परिसरात सुमारे 1 लाख कोटी रुपयांची कामे करीत आहोत. राज्याचे मॅन्युफॅक्चरिंग इंजिन हे पुणे जिल्हा असून दुसरे आता छत्रपती संभाजीनगर होत आहे. राज्यात विविध प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम पुणेकरांच्या नावाला साजेसे-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणेकरांच्या नावाला साजेसे असे स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम झालेले आहे. आज जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या भूमिगत रेल्वेचे लोकार्पण होत असून स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकरीता मेट्रोचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येत आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने काम करण्यात येत आहे. पुण्यात विविध सार्वजनिक विकासाची कामे सुरु असताना पुणेकरांना त्रास होत आहे, ही गोष्ट मान्य करतो. परंतु, आगामी 50 ते 100 वर्षाचा विकास या माध्यमातून होणार आहे.

भिडेवाडा येथील या ऐतिहासिक स्मारकाकरीता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन राज्य शासनाने जागा ताब्यात घेतली आहे. जागेच्या भूसंपादनाकरीता अंदाजे 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याठिकाणच्या भूसंपादनामुळे बाधितांना योग्य तो मोबदला देण्याकरीता राज्य शासनातर्फे पुढाकार घेण्यात येईल. भिडेवाडा स्मारकाकरीता 10 कोटी रुपयांची तरतूद पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. भिडेवाडा येथील स्मारकाचे काम उत्तम व दर्जेदार होईल, अशी ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली.

श्री. मोहोळ म्हणाले, केंद्र शासनाच्यामदतीने पुणे शहराला मेट्रो, आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन विमानतळाचे टर्मिनल, स्मार्ट सिटी, चांदणी चौकातील पूल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बस, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी वंदेभारत एक्सप्रेस, पुण्यात 33 किमी मेट्रोचे मार्ग पूर्ण झाले आहेत. महिला सक्षमीकरणाकरीता बेटी-बचाव, बेटी पढाव, लखपती दीदी अशा योजना राबविण्यात येत असल्यामुळे त्या आत्मनिर्भर होत आहेत, असेही श्री. मोहोळ म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भिडेवाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन होत असल्याचा आनंद – मंत्री छगन भुजबळ

मंत्री श्री. छगन भुजबळ म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य तसेच भिडेवाडा स्मारक येथील नूतन इमारतीच्या आराखड्याबाबत माहिती देऊन मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी विविध शिक्षण, आरोग्य अशा सामाजिक सुधारणा केल्या.  भिडेवाडा येथील स्मारकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत असल्याचा आंनद आहे, असही श्री. भूजबळ म्हणाले.

मंत्री श्री. चंद्रकांत पाटील प्रास्ताविकात म्हणाले,  पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावर कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे रहदारीचे भाग जोडल्याने  पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत व्यापारालाही चालना मिळणार आहे. स्वारगेट येथून शहरातील विविध भागात जाणे शक्य होणार आहे. भिडेवाडा येथील स्मारक हा आपल्या श्रद्धेचा विषय मार्गी लागला आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी  विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

****

सोलापूर हवाई मार्गाने जोडले गेल्याने उद्योग व्यवसायाला चालना मिळणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सोलापूर दि.29 : नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृष्यप्रणाली पद्धतीने लोकार्पण झाले. सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडला गेल्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. तसेच देश विदेशातील विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी हवाई सुविधा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी सोलापूर विमानतळ येथे आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी, सोलापूर विकास मंचचे केतन शहा, माजी खासदार डॉक्टर जयासिध्देश्र्वर स्वामी, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्यासह सोलापुरातील व्यवसायीक, उद्योजक विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना हा उपहार मिळाला आहे. सोलापूर हे थेट एअर कनेक्टिव्हिटीशी जोडले गेले आहे. तिथल्या विमानतळाची सर्व प्रकारची क्षमता वाढवली असल्याने विठ्ठल भक्तांसह यात्रेकरूंना नवनवीन सुविधा मिळणार आहेत.

देश विदेशातून येणाऱ्या भक्तांना भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला थेट सोलापूरला येता येणार आहे. यामुळे सोलापूर मध्ये व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

या कार्यक्रमाची सुरूवात श्रीमद्ववीरशैव गुरूकुल होटगी मठ मधील विद्यार्थ्यांनी गणेश वंदन करून व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विमानतळ संचालक सी.एन.वंजारा यांनी केले तर आभार प्रदर्शन विमानतळ व्यवस्थापक चंपला बा यांनी केले.

राज्यपालांची स्वामीनारायण मंदिराला भेट

मुंबई दि.29 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज दादर मुंबई येथील स्वामीनारायण मंदिरास भेट देऊन तेथील नीलकंठ वर्णी यांचे दर्शन घेतले व अभिषेक केला.

राज्यपालांनी अक्षर पुरुषोत्तम भगवान, स्वामी नारायण भगवान, हरिकृष्ण महाराज व इतर देवतांचे दर्शन घेतले.

यावेळी राज्यपालांनी योगी सभागृह येथे प्रगट ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेतले तसेच उपस्थित भक्तांशी संवाद साधला. यावेळी साधू तीर्थस्वरूप दास व साधू निष्काम जीवन उपस्थित होते.

Governor visits Swaminarayan Mandir

Mumbai Dt. 29 : Maharashtra Governor C P Radhakrishnan visited the Swaminarayana Mandir at Dadar, Mumbai and performed the Puja and Abhishek of Neelakanth Varni. The Governor had the Darshan of Akshar Purshottam Bhagwan, Swami Narayan Bhagwan, Harikrishna Maharaj and other deities.

The Governor had the blessings of Pagat Brahmaswarup Mahant Sami Maharaj and interacted with the devotees at the Yogi Sabhagriha. Sadhu Teerthaswarup Das and Sadhu Nishkam Jeevan were present.

 

000000

वाळकेश्वर येथील जैन संघ महारथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना

मुंबई दि.29 : भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण महोत्सवानिमित्त मुंबईतील सर्व जैन संघांनी आयोजित केलेल्या महारथ यात्रेला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी  रविवारी (दि. 29) वाळकेश्वर येथील श्रीपाल नगर जैन मंदिर येथून झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी राज्यपालांनी जैन मुनींचे दर्शन घेतले आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, विश्वस्त रमण शहा, हिऱ्यांचे व्यापारी भरत शहा, हितेंद्र मोटा आदी उपस्थित होते.

Maha Governor flags off Maha Ratha Yatra of Jain Sanghs

Mumbai Dt. 29 : Maharashtra Governor C P Radhakrishnan flagged off the Maha Ratha Yatra organised by all the Jain Sanghs of Mumbai on the occasion of 2550th Bhagwan Mahavir Nirvan Mahotsav from Shripal Nagar Jain Mandir at Walkeshwar Mumbai. The Governor had the darshan of Munis and addressed the people assembled on the occasion.

Minister of Skill Development and Entrepreneurship Mangal Prabhat Lodha, Trustee Raman Shah, Diamond Merchant Bharat Shah, Hitendra Motaa and others were present.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

RAJU DONGRE Mantralay Mumbai

मुंबई दि.29 : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी उपाध्यक्ष श्यामराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान  येथे संपन्न झाली.

या सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषय सर्व साधारण चर्चा करुन मंजूर करण्यात आले.

पणन महासंघ ही महाराष्ट्रातील खरेदी-विक्री व पणन संस्थांची शिखर संस्था असून राज्यातील 827 “अ” वर्ग सहकारी संस्था पणन महासंघाचे सभासद आहेत. संस्थेने आजवरच्या काळात शेती व शेतकरी आणि ग्राहक यांच्या विकासासाठी आणि हितसंरक्षणासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. पणन महासंघाने शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या असून शासनाने पणन महासंघावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल सालामध्ये धान व भरडधान्य, कडधान्य व तेलबिया खरेदी, खत व पशुखाद्य विक्रीचे काम केलेले आहे. शेतीमालाला लाभप्रद व वाजवी भाव मिळावा यासाठी विविध भरडधान्य व तेलबिया / कडधान्ये यांची केंद्रशासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने राज्यात खरेदी केली आहे. नाफेड, महाराष्ट्र शासन व एफ.सी.आय. करीता पणनमहासंघामार्फत कडधान्य (तूर, उडीद, मूग, चणा) व तेलबिया (सोयाबीन) खरेदी झालेली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी यावेळी दिली.

यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील , सरव्यवस्थापक प्रभाकर सावंत, नितीन यादव, देविदास भोकरे यांच्यासह महासंघाचे संचालक मंडळ, पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

 

000000

महिला गटाद्वारे उत्पादीत मालाच्या विक्रीला मिळणार हक्काची जागा – पालकमंत्री संजय राठोड

  • दारव्हा येथे ४४ महिलागटांना ई-रिक्षाचे वितरण
  • जिल्ह्यात हजार गटांना मिळतील ई-रिक्षा
  • महिला गारमेंट क्लस्टरची संख्या वाढविणार

यवतमाळ, दि.२८ (जिमाका) : रस्ते, पाणी, वीज यासारख्या विविध सुविधा सातत्याने उपलब्ध करुन दिल्या जातात. परंतु, महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होण्यासोबतच त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिल्ह्यात आपण अनेक उपक्रम राबवतो आहे. महिला गटांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी ई-रिक्षासह उत्पादीत मालाला तालुका स्तरावर हक्काची जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

दारव्हा येथे खनिज विकास निधी व अनुसूचित जाती उपयोजनेतून महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने पालकमंत्र्यांच्याहस्ते 44 गटांना तेजस्विनी कृषी वाहतूक ई-रिक्षाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ.रंजन वानखडे, माजी पंचायत समिती सभापती सुनिता राऊत, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, मनोज सिंघी, लेखाधिकारी शैलेंद्र जिड्डेवार आदी उपस्थित होते.

महिलांना रिक्षाचे वाटप करतांना रिक्षा दर्जेदार आणि नामांकित कंपनीचाच असावा याची दक्षता घेण्यात आली आहे. 111 रिक्षांना मंजुरी दिली आहे. परंतू जिल्ह्यात आपण माविम व उमेदच्या प्रत्येकी 500 याप्रमाणे एक हजार महिला गटांना ई-रिक्षांचे वाटप करतो आहे. हा रिक्षा गटांना सक्षम करण्यासोबतच त्यांना आर्थिकदृष्ट्या पुढे नेण्यासाठी हातभार लावेल, असे पालकमंत्री श्री.राठोड पुढे बोलतांना म्हणाले.

दारव्हा तालुक्यात धामणगाव येथे महिलांसाठी गारमेंट क्लस्टर सुरु केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने नेर व दिग्रस येथे देखील क्लस्टर होणार आहे. महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत असल्याने क्लस्टरची संख्या वाढविण्याचा प्रयत्न आहे. दारव्हा शहरात देखील क्लस्टर उभे राहिले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. त्यादृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत.

महिला गट सुरुवातीस पारंपरिक वस्तू, मालाची निर्मिती करत होते. आता बाजारपेठेला आकर्षित करणाऱ्या वस्तूंची निर्मिती केली जात आहे. या वस्तू, मालाच्या विक्रीसाठी हक्काची जागा नसल्याची तक्रार महिला माझ्याकडे नेहमीच करतात. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणासह दारव्हा, दिग्रस, नेर येथे तालुकास्तरावर महिलांना विक्रिसाठी स्वतंत्र जागा देण्याचे नियोजन आपण केले आहे. माविम व उमेदला प्रत्येकी 25 याप्रमाणे 50 गाळे पगडी शिवाय नाममात्र दराने उपलब्ध होतील, असे श्री.राठोड यांनी सांगितले.

महिलांच्या प्रभाग संघांना ईमारतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. यापूर्वी आपण 16 महिला बचत गटांना फवारणी ड्रोन दिले. अजून काही गटांना देतो आहे. जिल्ह्यात महिलांसाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांना सक्षम करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री म्हणाले. यावेळी माजी पंस सभापती सुनिता राऊत व डॉ.रंजन वानखडे यांची देखील भाषणे झाली.

सुरुवातीस पालकमंत्र्यांनी खनिज विकास निधीतील 34 तर अनुसूचित जाती उपयोजनेतून 10 असे 44 ई-रिक्षांचे वितरीत केले. यावेळी त्यांच्याहस्ते दारव्हा येथील लक्ष्मी महिला बचतगटास 8 लाख 88 हजार व रेणूका बचतगटास 10 लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. माविमच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सत्कार देखील करण्यात आला. कार्यक्रमास बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००

ताज्या बातम्या

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा

0
रायगड, दि. ६ (जिमाका): युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी...

युवा भारताच्या सक्षमीसाठी ‘पंच-परिवर्तन’

0
विकसित भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी 'पंच-परिवर्तन' हा एक महत्वाकांक्षी आणि व्यापक उपक्रम म्हणून पुढे येत आहे. या उपक्रमाचा उद्देश समाजातील मूलभूत मूल्यांची पुनर्स्थापना...

शिवस्वराज्य दिनी पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

0
नंदुरबार, दि. ६ (जिमाका): शिवस्वराज्य निमित्त कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज छत्रपती शिवाजी महारांजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. जिल्हा परिषदेत...

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा

0
मुंबई, दि.5 :- चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीपासून इंदू मिल येथे निर्माण होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या...

श्री जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्त्वाची - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पर्यावरण दिनी वृक्षारोपण मोहिमेतून मंदिर व परिसर विकास आराखडा अंमलबजावणीस...