रविवार, जून 22, 2025
Home Blog Page 56

राजधानीत महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, २९ : शूर योद्धा, महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात त्यांना अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात  निवासी आयुक्त   तथा सचिव आर. विमला यांनी  महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

विशेष मोहिमेद्वारे दिव्यांगाचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरण करा-  मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. २९ : दिव्यांग व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे शासकीय योजना, विविध सवलती, शिक्षण, नोकरी तसेच आरोग्यविषयक सुविधा मिळवण्यात अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेता दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

चा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, दिव्यांग कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल, उपसचिव सुनंदा घड्याळे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले, दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी विभागामार्फत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून दिव्यांगांच्या रोजगारासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसाहाय्य वाढवण्याबाबतही शासन सकारात्मक असून आरोग्य विभागाच्या सहकार्याने दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत दिव्यांग शाळांमध्ये सुधारणा, रिक्त पदांची तत्काळ भरती, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, महानगरपालिकेच्या मार्फत दिव्यांगासाठीच्या राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

०००

शैलजा पाटील/विसंअ

पुणे शहरातील तीन ठिकाणांच्या अतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावे -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि.२९ : विधान मंडळ अधिवेशनादरम्यान लक्षवेधीवरील माहिती नुसार पुणे शहरातील कात्रज ,कोंढवा, येवलेवाडी या तीन ठिकाणांच्या अतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावेत. यासाठी पुणे महानगरपालिका व महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्रालयात लक्षवेधीवरील कार्यवाहीच्या अनुषंगाने मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार योगेश टिळेकर तसेच पुणे महानगरपालिकेचे व पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मंत्रालयात सहसचिव सत्यनारायण बजाज, सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, विधिमंडळ अधिवेशनातील लक्षवेधीवरील सदर प्रकरणी केलेल्या कार्यवाहीची लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहे.

महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवरील बैठका

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवरील बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या संबंधित बैठकांना राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार प्रकाश सोळंके, आमदार प्रवीण दरेकर, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते. भूमि अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यासह बैठकींमध्ये मोबाईल टॉवर साठीच्या जागांचे भाडेपट्टा करारातील नोंदणीच्या अडचणीबाबत चर्चा झाली. परतवाडा जि. अमरावती नगरपरिषद हद्दीतील जमिनीस वाणिज्यिक वापरासाठी परवानगीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

        भूसंपादन कायद्यात केंद्र सरकारने बदल केला आहे, या अनुषंगाने राज्यातील अंमलबजावणीसाठी आणि जमिनीचे वर्ग रूपांतर करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना करण्यात आली.

000000

किरण वाघ/विसंअ

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबईदि.२९ : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकासरोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवारकक्ष अधिकारी घनश्याम जाधवसहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छावविजय शिंदे आदिसह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिवांनीही केले अभिवादन

महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील उपस्थित अधिकारीकर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन केले.

00000

 

प्रशासनाला फिल्डवर जाऊन कार्यवाही करण्याचे आदेश – पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील

बुलडाणा, (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीपिके, फळबागा आणि काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वीज पडल्यामुळे जीवितहानी, पशुधन हानी तसेच रस्त्यांचेही नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक, कृषी सहायक आणि तलाठी यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण करून पंचनामे तातडीने पूर्ण करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

मान्सून कालावधीत प्रशासनाने कार्यालयीन चौकटीपलीकडे जाऊन थेट फिल्डवर जाऊन काम करावे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्रकरणांमध्ये शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशा गावांमध्ये संयुक्त सर्वेक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज्यात सध्या अवकाळी पावसाने जोर धरलेला असून काही भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे व पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहनही पालकमंत्री जाधव-पाटील यांनी यावेळी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अनमोल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी कार्यातून राज्यकारभार केला. संपूर्ण देशभरात त्यांनी मंदिरांची पुननिर्मिती व घाटांची बांधणी केली, त्यांनी तयार केलेल्या विहिरी, तलाव यांचे संवर्धन करण्याचे काम राज्य शासन करणार आहे. त्यांचे कार्य अनमोल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त सोशल स्टडीज फाऊंडेशन निर्मित “लोकमाता अहिल्याबाई होळकर अन इटरनल फ्लेम” या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती तथा ‘मॅट’च्या अध्यक्ष मृदुला भाटकर, कवी प्रसून जोशी, कॉफी टेबल बुकचे संपादक अम्बरिश मिश्रा, सत्यप्रकाश मिश्रा, अविनाश मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठक घेऊन राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंगांचे आणि पंढरपूरसारख्या देवस्थानांचे जीर्णोद्धार आराखडे मंजूर करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्याचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्यात आले आहे. अहिल्यादेवींच्या जीवनावर एक दर्जेदार व्यावसायिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटातून त्यांच्या शौर्याची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवता येईल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयीची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लोकांना त्यांच्या जीवनातील काही पैलू माहिती असतीलही, पण त्यांच्या जीवनाचे बहुआयामी दर्शन हे लोकमाता अहिल्याबाई होळकर अन इटरनल फ्लेम या पुस्तकातून घडले, हे केवळ पुस्तक नसून आपल्या संस्कृतीचा ठेवा असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी  म्हणाल्या, काशी, अयोध्या, सोमनाथसारख्या धार्मिक स्थळांच्या पुनर्विकासात अहिल्यादेवींचे ऐतिहासिक योगदानही आहे. ‘इटरनल फ्लेम’ या पुस्तकातून त्यांच्या नेतृत्वगुणांचा आढावा घेण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण पुढे जात आहोत. इतिहासात ‘प्रगतीशील राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यादेवींवरील हे पुस्तक त्यांच्या नेतृत्वगुणांवर भाष्य करते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

000

गजानन पाटील/ससं/

श्रीलंका सोबत द्विपक्षीय व्यापार आणि परस्पर सौहार्द वृद्धिंगत करण्यावर भर – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 28 : भारत आणि श्रीलंका दरम्यान असलेले परस्पर सौहार्द आणि व्यापारविषयक संबंध वृद्धिंगत करण्यावर महाराष्ट्राचा भर असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि श्रीलंका दरम्यान द्विपक्षीय व्यापारातील अधिक संधी आणि शक्यता पडताळण्यासंदर्भात सह्यादी अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी श्रीलंकाच्या महावाणिज्यदूत शिरानी अरियारत्ने आणि शिष्टमंडळाचे स्वागत केले. पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यावेळी उपस्थित होते.

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, भारत आता जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. या प्रगतीत महाराष्ट्राचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. भारताच्या एकूण जीडीपीपैकी महाराष्ट्राचे योगदान सुमारे 15 टक्के आहे. मागील दशकात भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकींपैकी 30 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. निर्यातीमध्ये देखील राज्य आघाडीवर असून श्रीलंका आणि भारतातील आर्थिक आणि व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र आणि श्रीलंकामधील व्यापाराच्या संधींच्या अनुषंगाने यावेळी महाराष्ट्र आणि श्रीलंकाच्या वतीने सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. श्री. रावल यांनी महाराष्ट्र विविध क्षेत्रात करीत असलेल्या प्रगतीबाबत माहिती दिली. राज्यात कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून विविध फळांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. व्यापार वृद्धीच्या संधींसाठी श्रीलंकाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्रात भेट देण्याचे निमंत्रण देऊन या बैठकीतील चर्चा फलदायी ठरेल, असा विश्वास श्री.रावल यांनी यावेळी व्यक्त केला.

०००००

बी.सी.झंवर/विसंअ/

शाळांमध्ये माजी सैनिकांकडून प्रशिक्षण राष्ट्रनिर्मितीचे सशक्त पाऊल – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई दि. 28 : राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात स्वयंसेवी पद्धतीने काम करणाऱ्या माजी सैनिकांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या निर्णयामुळे शिस्त, देशभक्ती, नेतृत्वगुण आणि समाजसेवेचे उत्तम उदाहरण असलेल्या माजी सैनिकांचे प्रशिक्षण आता थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असल्याने राष्ट्रनिर्मितीचे हे सशक्त पाऊल ठरेल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

माजी सैनिकांमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत मंत्रालयातील दालनात आढावा बैठक झाली. यावेळी पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव पंकज कुमार, सैनिक कल्याण विभागाचे सचिव कर्नल दीपक ठोंगे, उपसचिव चंद्रकांत मोरे, समीर सावंत, अप्पासिंग राजपूत, लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव अनिरुद्ध कुलकर्णी उपस्थित होते. शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, राज्यात दरवर्षी जवळपास पाच हजार सैनिक सेवानिवृत्त होतात. त्यातील प्रत्येक जिल्ह्यातील स्वयंसेवी पद्धतीने काम करणाऱ्या निवडक आणि गुणवत्तापूर्ण माजी सैनिकांची यादी तयार करून हा उपक्रम कशा पद्धतीने राबविता येईल याविषयीचे सविस्तर नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना सैनिकी जीवनाची मूलभूत ओळख होणार आहे. या उपक्रमाद्वारे शाळांमध्ये कवायती, शारीरिक प्रशिक्षण, ऐतिहासिक सहली, युद्ध संग्रहालयांना भेटी, प्रेरणादायी व्याख्याने व चित्रफिती यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रीय एकात्मतेची भावना आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यास मदत होणार असल्याचेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी नमूद केले.

सुरूवातीला हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार असून त्यानंतर राज्यात सर्व शाळांमध्ये राबविण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. शालेय जीवनात देशसेवेचे बीज रोवण्याचा आणि सशक्त राष्ट्र घडवण्याचा महत्त्वाकांक्षी विचार आता प्रत्यक्षात उतरतो आहे, ही निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचेही यावेळी श्री.भुसे यांनी सांगितले.

माजी सैनिकांचे अनुभव विद्यार्थ्यांसाठी अमूल्य मार्गदर्शन – माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई

सेवानिवृत्त सैनिकांकडे केवळ युद्धकलेचेच नाही, तर कठोर प्रशिक्षण, कठीण परिस्थितीशी लढण्याची मानसिकता, आणि सहकार्य यांसारख्या अनमोल कौशल्यांचा ठेवा असतो. हे सर्व गुण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. हा उपक्रम केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच शिस्त, स्वाभिमान, आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा यामुळे निर्माण होईल, असा विश्वास माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन, माजी सैनिकांची निवड, प्रशिक्षण आणि देखरेख यासाठी महाराष्ट्र राज्य सैनिक महामंडळ (MESCO) प्रभावी भूमिका बजावणार आहे. त्यामुळे उपक्रमाची अंमलबजावणी शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे होण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि माजी सैनिक कल्याण विभाग यांच्या समन्वयाने काम करण्यात येणार आहे.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

महाराष्ट्र आणि मलेशिया दरम्यान व्यापार वृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करणार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 28 : भारत नुकतीच जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा असून भारताच्या एकूण जीडीपीपैकी महाराष्ट्राचे योगदान सुमारे 15 टक्के आहे. मागील दशकात भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकींपैकी 30 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. राज्य निर्यात सक्षमतेबाबत देशात क्रमांक एकवर आहे. मलेशिया आणि भारतातील आर्थिक आणि व्यावसायिक संबंध वृद्धींगत करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करुया, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि मलेशिया दरम्यान द्विपक्षीय व्यापारातील अधिक संधी आणि शक्यता शोधण्यासाठी सह्यादी अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मलेशियाचे महा वाणिज्यदूत झुवारी युसोफ आणि इंडो-मलेशिया ट्रेड अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र विविध क्षेत्रात करीत असलेल्या प्रगतीबाबत माहिती देऊन राज्यात 306 औद्यगिक विकास क्षेत्रे, 50 हजार पेक्षा अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि 20 हून अधिक औद्योगिक कॉरिडॉर्स असल्याचे राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, मुंबईत विविध देशांचे 100 पेक्षा अधिक दूतावास तसेच अनेक आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळे आहेत. भारत आणि त्यातही महाराष्ट्र विविध क्षेत्रात करीत असलेली प्रगती तसेच द्विपक्षीय व्यापार व संबंधांच्या वाढीसाठी मिळत असणारी संधी अनेक देशांना मुंबईत दूतावास स्थापन करण्यासाठी आकर्षित करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून आंबा, केळी, कांदा, डाळींब, द्राक्ष आदींची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. महाराष्ट्र आणि मलेशियामधील व्यापाराच्या संधींच्या अनुषंगाने यावेळी महाराष्ट्र आणि मलेशियाच्या वतीने सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. मलेशिया सेमी कंडक्टर क्षेत्रात आघाडी घेत असून त्याबाबतच्या व्यापाराच्या संधी शोधण्यासाठी महाराष्ट्राचे उद्योगविषयक शिष्टमंडळ मलेशियाला भेट देईल, असे श्री.रावल यांनी यावेळी सांगितले. व्यापार वृद्धीच्या संधींसाठी मलेशियाच्या शिष्टमंडळाने देखील महाराष्ट्रात भेट देण्याचे निमंत्रण त्यांनी दिले. या बैठकीतील चर्चा फलदायी ठरेल, असा विश्वास श्री.रावल यांनी यावेळी व्यक्त केला.

०००००

बी.सी.झंवर/विसंअ/

अंजन-रावळगाव औद्योगिक वसाहतीच्या विकासाला चालना देणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई दि. 28 : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अंजन-रावळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्सटाईल, फूड प्रोसेसिंग आणि शेती आधारित उद्योगांसाठी ज्ञान केंद्र स्थापन करणे तसेच नवीन उद्योजकांना आराखडा मंजुरीसाठी विलंब शुल्कात सवलत देणे आदी विषयांबाबत मागणी करण्यात आली आहे. उद्योग विभागामार्फत प्राधान्याने या मागण्यांसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मंत्रालय येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील दालनात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, सह मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, उद्योग विभागाचे सह सचिव श्रीकांत पुलकुंडवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक घोडके, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, उप विभागीय अधिकारी नितीन सादगीर उपस्थित होते. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नवीन उद्योजकांना सवलती आणि प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात भूखंड धारकांनी संजीवनी योजनेंतर्गत अर्ज सादर केले असून प्राप्त प्रस्तावांबाबत तातडीने कायर्वाही करण्यात येणार आहे. अग्निसुरक्षा यंत्रणेसाठी स्वतंत्र निधी, तसेच वीज, पाणी, रस्ते आणि ड्रेनेजसारख्या पायाभूत सुविधांची प्रभावी उपलब्धता यावरही विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. त्याचबरोबर, प्लास्टिक झोनमधील उद्योजकांसाठी जुन्या दराने भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने, उद्योग विभागाकडून सकारात्मक पावले उचलली जातील असेही श्री. सामंत सांगितले.

उद्योग विभागाने घेतलेल्या निर्णयांमुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला नवे बळ मिळेल आणि स्थानिक रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

०००

जयश्री कोल्हे/स.सं

ताज्या बातम्या

विधानभवनमध्ये २३, २४ जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

0
मुंबई, दि. २२ : भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित...

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
नागपूर, दिनांक २२ : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय...

राज्यसभेचे उपसभापती हरीवंश सिंह यांचे मुंबईत आगमन

0
मुंबई, दि. 22 : राज्यसभेचे उपसभापती हरीवंश सिंह यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानाने संध्याकाळी 7.00 वाजता आगमन झाले. यावेळी महाराष्ट्र विधिमंडळाच्या...

लासलगाव पाटोदा रस्त्यावरील मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करा – मंत्री...

0
नाशिक,दि.२२ जून:- लासलगाव पाटोदा रस्त्यावरील परिसरातील अनेक गावांना जोडणाऱ्या लासलगाव मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात...

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार : मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि.22 जून, 2025 (जिमाका वृत्तसेवा): शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी व वीज ही महत्त्वाची गरज आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे खरिप हंगामाची कामे सुरू झाली आहे....