रविवार, जून 22, 2025
Home Blog Page 55

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

मुंबई, दि. २९ : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व जवान उपस्थित होते.

०००

लोकाभिमुख प्रशासनात सोलापूर जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट असावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सोलापूर, दि. २९ (जिमाका): राज्य शासनाच्या फ्लॅगशिप उपक्रम व योजनांची महसूल अधिकारी कर्मचारी यांनी सविस्तर माहिती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढील सहा महिन्यात महसूल अंतर्गतची सर्व कामे अत्यंत पारदर्शकपणे करून संपूर्ण राज्यात सोलापूर हा सर्वोत्कृष्ट महसुली जिल्हा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील, तहसीलदार दिनेश पारगे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, महसूल अधिकाऱ्यांनी विशेषत: तहसीलदार यांनी प्रत्येक आठवड्यातील किमान एक दिवस एका गावात जाऊन तेथील जनतेशी संवाद साधावा. त्यांना शासकीय योजनांची माहिती द्यावी. त्यांचे प्रश्न, समस्या ऐकून घ्याव्यात व सोडवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. हे शासन, प्रशासन पारदर्शक व गतिमान असून अशा पद्धतीने नागरिकांत मिसळून त्यांचे प्रश्न समस्या ऐकून त्यावर कारवाई केल्यानंतर ते अधिक लोकाभिमुख होईल. त्यांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनसंवादाचा हा सोलापूर पॅटर्न तयार करून संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरेल या पद्धतीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रत्येक तहसीलदार, प्रांत अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान एक नाविन्यपूर्ण काम करावे व त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून द्यावा. त्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात राबवलेल्या नाविन्यपूर्ण योजना राज्यासाठी दिशादर्शक ठरतील यासाठी प्रयत्न करावेत व तशा योजना असतील तर त्या योजना राज्यस्तरावर पाठवाव्यात, त्या महसूल विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात राबविण्याबाबत त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली. त्याचप्रमाणे महसूल विभागातील अधिनियम, कायदे आजच्या  काळानुसार नसतील व त्यात काही ठिकाणी बदल आवश्यक असतील तर तसे अभ्यासपूर्ण बदल करण्याबाबतचे प्रस्ताव महसूल विभागाला द्यावेत, त्यात बदल करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

गौण खनिज अंतर्गत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दंड व फौजदारी कारवाई एकत्रितपणे केली पाहिजे तरच वाळू चोरावर वचक बसेल. दंड वसूल करणे या ऐवजी फौजदारी कारवाई करून गौण खनिज उत्खनन चुकीच्या पद्धतीने होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने 413 लोकांवर जी दंडात्मक कारवाई केली आहे त्याऐवजी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. 3 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन तलाठी यांनी पाच ब्रास वाळू दिली पाहिजे. तसेच रॉयल्टी प्रमाणपत्र देत असताना त्यावर संबंधित लाभार्थ्यांनी वाळू कोठून घ्यायची याचीही नोंद असली पाहिजे. लाभार्थ्यांना महसूल आपल्या दारी आले आहे याची जाणीव झाली पाहिजे सूचना मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

अपार, जीवंत सातबारा तसेच शंभर दिवस कार्यक्रम अंतर्गत प्रशासनाने केलेल्या कामांचे मंत्री बावनकुळे यांनी कौतुक करून पुढील काळातही याच पद्धतीने पारदर्शक व गतिमान काम करून सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून द्यावा. तहसीलदार प्रांताधिकारी यांनी अर्धन्यायिक प्रकरणे त्वरित निकाली काढावेत जास्तीत जास्त दोन तारखा देऊन प्रकरणे मेरिटवर निकाली निघतील यासाठी प्रयत्न करावेत. तसेच पाणंद रस्त्यासाठी नागपूर पॅटर्न जिल्ह्यात राबवावा. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 12 फूट रुंद व एक किलोमीटर लांब रस्त्यासाठी दहा लाखाचा निधी देण्यात येतो. यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त रस्ते कामे मार्गी लावावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. यामध्ये गौण खनिज वसुली 97 कोटी झाली असल्याचे सांगून नवीन शासन निर्णयाप्रमाणे नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यात नऊ वाळू गटाची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील 2066 भूमिहीनांपैकी 252 भूमिहिनांना घरकुलासाठी जमीन वाटप करण्यात आली असून उर्वरित सर्वांना 20 जूनपर्यंत जमीन वाटप केली जाणार आहे. महाराज स्वाभिमान अंतर्गत 134 शिबिरे घेण्यात आलेली असून विद्यार्थ्यांना त्वरित दाखल्यांचे वाटप करण्यात आलेले आहे.

तसेच पानंद रस्ता कार्यक्रम, 100 दिवस कार्यक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पोट खराब जमीन, सनद वाटप, कॉल सेंटर तर राष्ट्रीय महामार्गाकडील भू – संपादन, रिक्त पदे आदींची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी देऊन जिल्हा वार्षिक योजनेतून गतिमान प्रशासनासाठी 19 कोटीचा निधी खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक स्वरूपात पाच घरकुल लाभार्थ्यांना नवीन वाळू धोरणानुसार मोफत वाळू घेऊन जाण्यासाठी रॉयल्टी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू घेऊन जाऊन घरकुल बांधण्याचे आवाहन केले.

सोलापूर जिल्ह्यात एकूण 8.93 लाख शेतकऱ्यांची संख्या असून ऍग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत 5.12 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ऍग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक असल्याने ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी अत्यंत तत्परतेने नोंदणी करून घ्यावी. जोपर्यंत शेतकरी या अंतर्गत नोंदणी करणार नाहीत, तोपर्यंत त्यांना वीज बिलात सवलतीचा लाभ मिळणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन मंत्री बावनकुळे यांनी केले.

०००

 

तालुका क्रीडा संकुल युवाशक्तीला दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा – मंत्री गुलाबराव पाटील

  • सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव, दि. २८ (जिमाका): “क्रीडा ही केवळ शारीरिक व्यायामाची बाब नसून ती शिस्त, सहकार्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व यांचा विकास करणारी शाळा आहे. अमळनेर सारख्या ग्रामीण भागात अशा भव्य क्रीडा संकुलाची नितांत आवश्यकता होती. आज ती गरज पूर्ण होत आहे, ही बाब तालुकावासीयांसाठी समाधानाची आणि प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “सुदृढ आणि सशक्त युवक म्हणजेच सक्षम राष्ट्राची पायाभरणी आहे. हे संकुल नवोदित खेळाडूंना दर्जेदार सुविधा आणि प्रोत्साहन देईल. याच माध्यमातून उद्याचे ऑलम्पिकपटू घडावेत, हीच अपेक्षा आहे. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर खेळांच्या माध्यमातून मनोबल, सहिष्णुता आणि संघभावना यांचा विकास होतो. शासनाच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे,” असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

अमळनेर तालुका क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री  पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, अमळनेर प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, “गावा – गावातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. ती जर योग्य दिशेने वापरली तर गाव, राज्य आणि देशाचा विकास शक्य होतो. या संकुलामुळे ग्रामीण खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळतील आणि ते प्रेरित होतील, असा मला विश्वास आहे. सहकार चळवळ आणि क्रीडा संस्कृती ही दोन्ही ग्रामीण विकासासाठी पूरक आहेत,” असे मत त्यांनी मांडले.

आमदार अनिल पाटील यांनी तालुक्यातील क्रीडा संस्कृतीसाठी हे नूतन संकुल फार उपयुक्त ठरेल, अशी आशा व्यक्त करत आनंद दर्शविला.

या प्रसंगी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, क्रीडाप्रेमी नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे स्केटिंग खेळाचे प्रात्यक्षिक

यावेळी सर्व मान्यवरांच्या समोर स्केटिंगमध्ये विशेष प्रविण्य असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्केटिंग ट्रॅकवर चित्तथरारक स्केटिंगचे दर्शन घडवले.

जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सांगितले की, या क्रीडा संकुलात कुस्ती, कराटे, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, योग, मार्शल आर्ट्ससाठी स्वतंत्र हॉल, ४०० मीटर धावपट्टी, बास्केटबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग, ओपन जिम आदी सुविधा खेळाडूंकरीता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी आभार मानले.

०००

आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

मुंबई, दि. २९ :  राज्यात आपत्ती परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके सतर्क आहेत. मुंबई शहर व  उपनगरमध्ये एनडीआरएफची तीन पथके, पालघरमध्ये एक, नागपूर येथे दोन पथके तैनात आहेत. तर पुणे मुख्यालय येथे एनडीआरएफची दोन पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.  नागपूर व धुळे येथे एसडीआरएफची प्रत्येकी दोन पथके तैनात असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२९ मी रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगरात सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस झाला आहे. मुंबई २९.८ मिमी, ठाणे २९.५ मिमी, नाशिक २६.३ मिमी आणि रायगड जिल्ह्यात २१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २९ मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे जिल्ह्यात २९.५, रायगड २१.९, रत्नागिरी १०.१,  सिंधुदुर्ग १३,  पालघर ३.१, नाशिक २६.३, धुळे १५.९,  नंदुरबार ५.२, जळगाव ३.२, अहिल्यानगर ४.३,  पुणे  ४.८, सोलापूर ५.७,  सातारा ३.९,  सांगली १.६,  कोल्हापूर ०.७, छत्रपती संभाजीनगर २.८,  बीड १, लातूर २.१,  धाराशिव ९.७,  परभणी ०.१,  हिंगोली ०.१,  यवतमाळ ०.१,  वर्धा ४.७, नागपूर २०.८, भंडारा १.७, गोंदिया ५,  आणि गडचिरोली ०.९.

दिनांक २८ मे २०२५ रोजी मुंबई शहरमध्ये झाड पडून दोन व्यक्ती, पालघर जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती आणि सातारा जिल्ह्यात बंधाऱ्यात पडून एक व्यक्ती मृत पावली आहे. मुंबई उपनगर येथे झाड पडून दोन, पुणे जिल्ह्यात आगीच्या घटनेत चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत.  तर जालना जिल्ह्यात २६  प्राणी, वर्धा जिल्ह्यात एक आणि चंद्रपूर जिल्ह्यात एक प्राणी मृत झाला आहे. तसेच मुंबई काळाचौकी येथे भारत आईस कंपनीमधून होणारी अमोनिया वायुची गळती मुंबई महानगरपालिका आणि अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करुन थांबवली असल्याचे सांगण्यात आले आहे.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

महाराष्ट्राला परकीय गुंतवणुकदारांची पहिली पसंती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण 4,21,929 कोटी रुपयांपैकी तब्बल 40 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

गत आर्थिक वर्षात (जानेवारी ते मार्च 2025) शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले असून, मागील 10 वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांतच पार झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या ऐतिहासिक आणि विक्रमी गुंतवणुकीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वाखाली राज्याची प्रगती अशीच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मागील दशकातील परकीय गुंतवणुकीचा आढावा (कोटी रुपयांमध्ये) :

2015-16 : 61,482 कोटी

2016-17 : 1,31,980 कोटी

2017-18 : 86,244 कोटी

2018-19 : 57,139 कोटी

एप्रिल ते ऑक्टोबर 2019 : 25,316 कोटी

2020-21 : 1,19,734 कोटी

2021-22 : 1,14,964 कोटी

2022-23 : 1,18,422 कोटी

2023-24 : 1,25,101 कोटी

2024-25 : 1,64,875 कोटी

०००

संजय ओरके/विसंअ/

 

राजधानीत महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, २९ : शूर योद्धा, महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात त्यांना अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात  निवासी आयुक्त   तथा सचिव आर. विमला यांनी  महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

विशेष मोहिमेद्वारे दिव्यांगाचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरण करा-  मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. २९ : दिव्यांग व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे शासकीय योजना, विविध सवलती, शिक्षण, नोकरी तसेच आरोग्यविषयक सुविधा मिळवण्यात अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेता दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

चा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, दिव्यांग कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल, उपसचिव सुनंदा घड्याळे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले, दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी विभागामार्फत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून दिव्यांगांच्या रोजगारासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसाहाय्य वाढवण्याबाबतही शासन सकारात्मक असून आरोग्य विभागाच्या सहकार्याने दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत दिव्यांग शाळांमध्ये सुधारणा, रिक्त पदांची तत्काळ भरती, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, महानगरपालिकेच्या मार्फत दिव्यांगासाठीच्या राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

०००

शैलजा पाटील/विसंअ

पुणे शहरातील तीन ठिकाणांच्या अतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावे -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि.२९ : विधान मंडळ अधिवेशनादरम्यान लक्षवेधीवरील माहिती नुसार पुणे शहरातील कात्रज ,कोंढवा, येवलेवाडी या तीन ठिकाणांच्या अतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावेत. यासाठी पुणे महानगरपालिका व महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्रालयात लक्षवेधीवरील कार्यवाहीच्या अनुषंगाने मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार योगेश टिळेकर तसेच पुणे महानगरपालिकेचे व पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मंत्रालयात सहसचिव सत्यनारायण बजाज, सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, विधिमंडळ अधिवेशनातील लक्षवेधीवरील सदर प्रकरणी केलेल्या कार्यवाहीची लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहे.

महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवरील बैठका

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवरील बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या संबंधित बैठकांना राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार प्रकाश सोळंके, आमदार प्रवीण दरेकर, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते. भूमि अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यासह बैठकींमध्ये मोबाईल टॉवर साठीच्या जागांचे भाडेपट्टा करारातील नोंदणीच्या अडचणीबाबत चर्चा झाली. परतवाडा जि. अमरावती नगरपरिषद हद्दीतील जमिनीस वाणिज्यिक वापरासाठी परवानगीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

        भूसंपादन कायद्यात केंद्र सरकारने बदल केला आहे, या अनुषंगाने राज्यातील अंमलबजावणीसाठी आणि जमिनीचे वर्ग रूपांतर करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना करण्यात आली.

000000

किरण वाघ/विसंअ

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबईदि.२९ : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकासरोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवारकक्ष अधिकारी घनश्याम जाधवसहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छावविजय शिंदे आदिसह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिवांनीही केले अभिवादन

महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील उपस्थित अधिकारीकर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन केले.

00000

 

प्रशासनाला फिल्डवर जाऊन कार्यवाही करण्याचे आदेश – पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील

बुलडाणा, (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीपिके, फळबागा आणि काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वीज पडल्यामुळे जीवितहानी, पशुधन हानी तसेच रस्त्यांचेही नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक, कृषी सहायक आणि तलाठी यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण करून पंचनामे तातडीने पूर्ण करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

मान्सून कालावधीत प्रशासनाने कार्यालयीन चौकटीपलीकडे जाऊन थेट फिल्डवर जाऊन काम करावे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्रकरणांमध्ये शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशा गावांमध्ये संयुक्त सर्वेक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज्यात सध्या अवकाळी पावसाने जोर धरलेला असून काही भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे व पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहनही पालकमंत्री जाधव-पाटील यांनी यावेळी केले.

ताज्या बातम्या

‘महास्वच्छता’ अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्याचे क्रांतिकारी कार्य झाले – पालकमंत्री जयकुमार गोरे

0
पंढरपूर/सोलापूर, दिनांक 22 (जिमाका):- पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत 42 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून 148...

पिंपळस ते येवला पर्यायी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक ,दि.२२ जून :-पिंपळस येवला या रस्त्याचे चौपदरी काँक्रिटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्यावर ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथून वाहनांची येजा...

पावसाळ्याची पूर्वतयारी : सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज

0
मुंबई, दि. 21 : पावसाळ्यात रस्ते व पूल सुस्थितीत राहावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यापक उपाययोजना राबविल्या असून, राज्यातील प्रमुख रस्त्यांचे व पुलांचे दुरुस्ती...

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

0
मुंबई, दि. २२ :   राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे....

ग्रामपंचातींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे – ग्रामविकास मंत्री

0
पुणे, दि. २१:महाआवास व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता हे दोन्ही अभियान ग्रामविकासासाठी महत्त्वाची आहेत. स्वच्छ, सुंदर व प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी ग्रामपंचायतीनी महत्त्वाची भूमिका निभवावी व...