रविवार, जून 22, 2025
Home Blog Page 54

महाराष्ट्रातील बंदर विकासाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय मान्यता

  • उर्वरित १३ प्रकल्पांनाही लवकरात लवकर मंजुरीचे आश्वासन

नवी दिल्ली, दि. २९: महाराष्ट्रातील बंदर विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असून, उर्वरित १३ प्रकल्प तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय पर्यावरण विभागाकडे महाराष्ट्रातील बंदरे विकास मंत्रालयाच्या विविध विकास कामांच्या प्रलंबित परवानगीना तातडीने मंजुरी देण्याबाबत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रातील प्रलंबित विकास परवानगींना तातडीने मंजुरी देण्याची मागणी यावेळी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली. केंद्रीय मंत्री यादव यांनी देखील मंत्री राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित परवानगी तसेच विविध विकास कामे त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

दिल्लीतील भेटीत मंत्री राणे यांनी महाराष्ट्रातील विकास कामांमध्ये अडथळा ठरत असलेल्या सीआरझेड मोजणी नकाशे अद्याप मिळाले नसल्याकडे लक्ष वेधले. हे नकाशे मिळण्यासाठी महाराष्ट्राने आवश्यक शुल्क अदा करूनही चेन्नईच्या राष्ट्रीय कोस्टल मॅनेजमेंट केंद्राकडून मान्यता मिळालेली नाही.

केंद्रीय मंत्री यादव यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, उर्वरित १३ प्रकल्पांना लवकरात लवकर मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. यानंतर मंत्री राणे यांनी पर्यावरण भवन येथे केंद्रीय सचिव तन्मय कुमार यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

राज्य शासनाच्या बंदरे विकास विभागाच्या प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मान्यता मिळण्यासाठी सीआरझेडचे मोजणी नकाशे चेन्नई येथील मुख्यालयातून राज्य शासनाला मिळणे अत्यंत आवश्यक असते या सीआरझेड मोजणी नकाशांशिवाय केंद्रीय पर्यावरण खात्याकडे तसेच सीआरझेड बाबत ना हरकत दाखला मिळण्यासाठी अर्जच करता येत नाहीत ही बाब देखील मंत्री राणे यांनी केंद्रीय मंत्री यादव यांच्या निदर्शनास आणून दिली.

या सर्वाचा परिणाम हा शेवटी प्रकल्पांच्या किमती वाढण्यामध्ये होत आहे याकडे लक्ष वेधत महाराष्ट्रातील अशा तेरा प्रकल्पांच्या परवानगी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे गेले वर्षभर सीआरझेडच्या नकाशा अभावी प्रलंबित आहेत. आतापर्यंत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्रातील बेचाळीस प्रकल्पांना याबाबत मान्यता दिल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले आणि त्याबद्दल केंद्रीय मंत्री यादव यांचे आभार देखील व्यक्त केले. त्याचबरोबर उर्वरित तेरा प्रकल्पांच्या परवानगी बाबत तातडीने मान्यता देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी त्यांच्याकडे केली. त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री यादव यांनी दिले.

०००

भारत निवडणूक आयोगाकडून चार राज्यांतील ३७३ मतदार अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण

मुंबई, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) अंतर्गत इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अ‍ॅण्ड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), नवी दिल्ली येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) पर्यवेक्षकांसाठीच्या आठव्या तुकडीचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमातील छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील BLO, BLO पर्यवेक्षक आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना संबोधित केले.

IIIDEM येथे आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या प्रशिक्षण बॅचमध्ये एकूण ३७३ अधिकारी सहभागी झाले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमधून ११८, मध्य प्रदेशमधून १३०, छत्तीसगडमधून ९६ आणि हरियाणामधून २९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांत, दिल्ली येथे एकूण ३,७२० फील्ड अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ECI मार्फत घेण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, हे प्रशिक्षण अत्यावश्यक असून, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० व १९५१, मतदार नोंदणी नियम १९६०, निवडणूक आचारसंहिता नियम १९६१ आणि वेळोवेळी आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसार निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.

या प्रशिक्षणाद्वारे सहभागी अधिकारी अंतिम मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर जिल्हाधिकारी/कार्यकारी दंडाधिकारी (कलम २४(अ)लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०) व राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य निवडणूक अधिकारी (कलम २४(ब)) यांच्याकडे पहिल्या व दुसऱ्या अपीलच्या तरतुदींची माहिती मिळवतील. तसेच, BLO व BLO पर्यवेक्षकांनी फिल्डमध्ये काम करताना मतदारांनाही या तरतुदींची जाणीव करून द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) मोहिमेनंतर दि. ६ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून एकही अपील दाखल झालेले नाही.

या प्रशिक्षणाचा उद्देश सहभागी अधिकाऱ्यांना मतदार नोंदणी, अर्ज प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि फिल्डमध्ये निवडणूक प्रक्रियेची अंमलबजावणी याबाबत व्यावहारिक ज्ञान देणे आहे. त्यांना माहिती व तंत्रज्ञान साधनांचा वापर, तसेच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांचे तांत्रिक प्रात्यक्षिक आणि मॉक पोल्सच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकानुसार कळविले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

बारामती, दि.२९: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सिद्धेश्वर निंबोडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची तसेच नीरा डावा कालवा दुरुस्तीच्या कामांची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उपअभियंता सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसामुळे शेती, पिके, पशुधन, घरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत, त्यानुसार सर्व पंचनामे करण्यात येत आहे. तसेच बाधितांना अन्नधान्यही पुरविण्यात येत आहे, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यात येईल.

नीरा डावा कालवा फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीची तात्काळ कामे सुरु करावी.  कालव्यामधील संपूर्ण राडारोडा काढून घ्यावा. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याकरीता कालव्याची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रत्याच्या कडेला पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइड पट्टी भरुन घ्याव्यात, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी रस्ता, पूल, कोसळलेली घरे आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते आदींची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

०००

 

कृषी विद्यापीठांनी पिक उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे मॉडेल तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणी, दि. २९ (जिमाका): शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील कृषी विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. वातावरणीय बदल, कीड व्यवस्थापन, तसेच पावसाचा खंड पडल्यानंतरही तग धरू शकणारे वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध देण्याबाबतचे संशोधन अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 53 व्या बैठकीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यावेळी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर यांच्यासह कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. इंन्द्र मणि, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, संशोधक संचालक डॉ. खिजर बेग, डॉ. किशोर शिंदे उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत वसंतराव नाईक, महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने राज्यात आयसीआरच्या माध्यमातून सुरु केलेल्या नव्या योजनेत शेती सबंधित विविध शास्त्रज्ञ, या क्षेत्रात कार्यरत संस्था, अधिकारी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाणार आहेत. संशोधक आणि शेतकरी यांच्यामध्ये या माध्यमातून एक नवीन नाते निर्माण होईल. या अंतर्गत पुढील पंधरा ते वीस दिवस एकात्मिक कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत असून, या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रापासून होत आहे ही महत्त्वाची बाब आहे. या माध्यमातून संशोधक एका दिवशी तीन ते चार गावांमध्ये जातील व शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधतील. या संवादातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेती क्षेत्राच्या विकासासाठी हाती घेतलेला हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुखमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

वातावरणीय बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभा राहिली आहेत. बदलत्या तंत्राचा वापर करत गुंतवणूक आधारित शेती आपल्याला करावी लागणार आहे. संरक्षित शेतीसाठी शेतीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वातावरणीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या पावसातील खंड सारख्या संकटात तग धरू शकेल, असे वाण विकसित करावे लागणार आहे. पावसाचा खंड, कीड व्यवस्थापन, वातावरणीय बदलात पावसाचा खंड आदी संकटात तग धरू शकणारे वाण विकसित करण्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला कामे करावे लागेल तसेच शेती क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. हा वापर वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी ‘मिशन कृत्रिम बुद्धिमत्ता’ सुरु करावे. या माध्यमातून प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे नवे मॉडेल विकसित करावे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषी विद्यापीठाचे योगदान मोठे- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषी विद्यापीठाचे योगदान मोठे आहे. शेतकरी बांधवांना विकसित वाण मिळण्यासाठी कृषी विद्यापिठांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, त्यासाठी तीन दिवस चालणारी संयुक्‍त कृषी संशोधन आणि विकास समिती परिषद महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील शेतकरीही विद्यापीठाच्या बरोबरीने प्रयोग करतो आहे, अशा शेतकरी बांधवांना विद्यापीठांनी सोबत घेवून काम करावे. केंद्र सरकारने एक दिवस बळीराजासोबत हा उप्रकम सुरू केला असून राज्य शासनाने या उप्रकमात सक्रीय सहभाग घेतला आहे, असे कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

कृषी विद्यापीठाच्या वैजापूर येथील बाजरी संशोधन केंद्रामार्फत बाजरीचे पोषण मूल्य असणारे एचबी 1200 आणि 1269 हे जैव संयुक्त वाण विकसित करण्यात आले आहे. बाजरीचे पोषण मूल्य असणारे चार वाण या केंद्रात विकसित केले असून त्यापैकी दोन वाण हे परभणी कृषी विद्यापीठाचे आहेत. तसेच ज्वारीचे परभणी शक्ती हे संपूर्ण वाण विकसित केले आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शेती क्षेत्रात पथदर्शी काम करेल- राज्यमंत्री आशिष जयस्वाल

भविष्यातील कृषी क्षेत्राची दिशा व शेतकऱ्यांसाठी किफायतशीर वाण विकसित करण्याबाबत संयुक्‍त कृषी संशोधन आणि विकास समिती परिषदेत मंथन होईल. राज्यातील शेती व शेतकरी यांच्या प्रगतीचा वेग अधिक वाढविण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल. शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर महत्त्वाचा आहे. आगामी पाच वर्षात महाराष्ट्र शेती क्षेत्रात नक्कीच पथदर्शी काम करेल, असा विश्वास राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.

कृषी संशोधन हा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय- प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी

प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी म्हणाले, कृषी संशोधन हा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. परिषदेत झालेले संशोधनाचा प्रचार व प्रसार व्हावा. तसेच यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांच्या संशोधनाला कायम शासनाचा पाठिंबा आहे. राज्यात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचेही ते म्हणाले.

प्रास्ताविक कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले. तीन दिवसीय परिषदेत तीनशे ते चारशे कृषी शास्त्रज्ञांचा सहभाग असून नवीन वाणासह तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार आहेत. 31 मे पर्यंत चालणारी ही परिषद संशोधनाला चालना देणारी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यातील चारही कृषी विद्यापिठांच्या स्मरणिका व विविध कृषी विद्यापीठांच्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.

उत्कृष्ट कृषी संशोधन पुरस्कार-2025

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या उत्कृष्ट कृषी संशोधन शास्त्रज्ञांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे डॉ. मदन पेंडके, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. संतोष गहुकर, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे डॉ. विजय दळवी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. सुनील कदम यांचा उत्कृष्ट कृषी संशोधन पुरस्कार-2025 देऊन गौरव करण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे ई-भूमिपूजन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रस्तावित नविन इमारतीचे ई-भूमिपूजन करण्यात आले.

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्या शासन निर्णयानुसार १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रवेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे सुरु करण्यात आले आहे. या संस्थेकरिता शासनाकडुन गंगाखेड रोडवरील ब्राम्हणगाव व ब्रम्हपुरी या गावाच्या शिवारात एकुण २० हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेवर ४३० खाटांचे रुग्णालय व १०० विद्यार्थी क्षमतेचे एमबीबीएस महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच हे महाविद्यालय व रुग्णालयासाठी लागणारे हॉस्टेल, डॉक्टरांना राहण्यासाठी निवासस्थान, गेस्टहाऊस या सुविधा या जागेत बांधण्यात येणार आहे. बांधकामासाठी ४०३.९८ कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले आहेत.

132/33 के. व्ही. सेलू उपकेंद्राचे ई-भूमीपूजन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 132/33 के. व्ही. सेलू उपकेंद्राचे ई-भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे सेलू तालुक्यातील जिनिंग, प्रेसिंग, हातमाग उद्योग व सेलू औद्योगिक क्षेत्रातील अस्तित्वात असलेले तसेच भविष्यात येणाऱ्या उद्योगांसाठी योग्य दाबाने व अखंडित वीज पुरवठा करणे सहज शक्य होणार आहे. या बरोबरच सेलू तालुक्यातील शेतकरी व वीज ग्राहकांना फायदा होणार आहे.

०००

‘विकसित कृषी संकल्प अभियाना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन

परभणी, दि. २९ (जिमाका): राष्ट्रव्यापी ‘विकसित कृषी संकल्प अभियानाचे’ आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे या अभियानाच्या चित्ररथाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, परभरणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री  अॅड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आधुनिक कृषी पद्धती, समृद्ध शेतकरी आणि विज्ञानाधिष्ठित शेती आवश्यक आहे. कृषी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अन्नसुरक्षेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते. याकरीता केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात दि. 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत देशभरात ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अभियान यशस्वी होवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या माध्यमातून खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने लाभणार असून त्यांना शाश्वत उत्पादन घेता येईल, असे नमूद करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार संजय जाधव, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी, पुणे येथील कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सुरज मांढरे (भाप्रसे), पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा. डॉ. इन्द्र मणि, पिडीकेव्ही अकोला आणि एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, बीएसकेकेव्ही दापोलीचे  कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  नतिशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून  शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी कृषी क्षेत्रात कार्य करणारी देशाची सर्वोच्च संस्था भारतीय कृषी अनुसंधान परिषद परिश्रम घेत आहे. या अभियानामध्ये देशातील 723 जिल्ह्यांमधील 65 हजार पेक्षा जास्त गावांना भेट देणाऱ्या दोन हजार 170 तज्ज्ञ पथके सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषी विद्यापीठांचे वैज्ञानिक, संशोधन संस्थांचे तज्ज्ञ, शासकीय विभागांचे अधिकारी, नाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील 1.3 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात हे अभियान कृषी विभाग आणि 50 कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून 4 हजार 500 गावांत राबवले जाणार आहे. मराठवाडा विभागासाठी  कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांतील 12 कृषी विज्ञान केंद्रे आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केले असून यासाठी शास्त्रज्ञांचे चमू तयार केले आहेत. याद्वारे प्रत्येक गावात 200 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जवळपास दोन लाख 1 हजार 600 शेतकऱ्यांना खरीप पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान पोहचविण्यात येणार असून त्याद्वारे संपूर्ण परिसरात तंत्रज्ञान पोहोचले जाईल.

०००

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी – मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. २९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा सर्वत्र साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अहिल्यादेवींचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळा समितीतर्फे त्यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज सकाळी चांदवड येथील होळकर वाडा (रंग महालात) येथे ‘जागर होळकरशाहीचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार चित्रा वाघ, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, युवराज यशवंतराव होळकर अमरजीत बारगळ, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. श्वेता चौधरी, अंजली बारगळ, सुजाता बाबर, डॉ. मेघा मलोसे, श्वेता बोकील, संगीता पाटील, ज्योत्स्ना होळकर, आम्रपाली कोकरे, सुचेता खताळ, शैलजा जाधव, ॲड. अर्चना शर्मा आदींना अहिल्या सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले. यानिमित्त रंगमहाल येथे शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते.

मंत्री महाजन म्हणाले की, चांदवडचा रंगमहाल ही वास्तू डोळे दीपवणारी आहे. अहिल्याबाईंनी महिलांची ताकद ओळखली होती. त्यांनी अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्यांनी प्रशासक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. ३०० वर्षांपूर्वी त्यांनी जल संवर्धनाचे महत्त्व ओळखले होते. अहिल्यादेवी यांना अभिवादनासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली. होळकर साम्राज्याची उपराजधानी असलेल्या चांदवड येथे अहिल्याबाई होळकर यांचे शिल्प साकारण्यात येईल. तसेच त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. आगामी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना चांदवड येथील रंगमहालाची माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री भुसे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशात विकास कामे केली. मालेगाव येथील पूल त्यांनी बांधला आहे. शालेय विद्यार्थ्यांना रंगमहालाची सहल घडविण्यात येईल. आगामी कुंभमेळाच्या आराखड्यात रंगमहालाचा समावेश करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पणन मंत्री रावल म्हणाले की, अहिल्याबाई होळकर यांचा राज्यकारभार प्रेरणादायी आहे. त्यांचा पावन पदस्पर्श या वास्तूला लाभला आहे. या वास्तूच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्यावर आहे.

आमदार वाघ म्हणाल्या की, अहिल्यादेवींनी महिला सक्षमीकरणाची सुरूवात केली. निसर्गाचीही त्यांनी सेवा केली.

युवराज होळकर यांनी सांगितले की, अहिल्यादेवींचे व्यक्तिमत्व अलौकिक होते. त्यांनी सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण याला प्राधान्य दिले. रंगमहाल या ऐतिहासिक वास्तूचा जीर्णोद्धार करून जागतिक वारसा स्थळ घोषित होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सोनाली तेलंग यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली. आमदार डॉ. आहेर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारव पुनरुजीवन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. माजी नगराध्यक्ष कासलीवाल यांनी आभार मानले. यावेळी होळकर राज परिवाराशी निगडित व्यक्ती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

मुंबई, दि. २९ : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व जवान उपस्थित होते.

०००

लोकाभिमुख प्रशासनात सोलापूर जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट असावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सोलापूर, दि. २९ (जिमाका): राज्य शासनाच्या फ्लॅगशिप उपक्रम व योजनांची महसूल अधिकारी कर्मचारी यांनी सविस्तर माहिती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढील सहा महिन्यात महसूल अंतर्गतची सर्व कामे अत्यंत पारदर्शकपणे करून संपूर्ण राज्यात सोलापूर हा सर्वोत्कृष्ट महसुली जिल्हा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील, तहसीलदार दिनेश पारगे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, महसूल अधिकाऱ्यांनी विशेषत: तहसीलदार यांनी प्रत्येक आठवड्यातील किमान एक दिवस एका गावात जाऊन तेथील जनतेशी संवाद साधावा. त्यांना शासकीय योजनांची माहिती द्यावी. त्यांचे प्रश्न, समस्या ऐकून घ्याव्यात व सोडवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. हे शासन, प्रशासन पारदर्शक व गतिमान असून अशा पद्धतीने नागरिकांत मिसळून त्यांचे प्रश्न समस्या ऐकून त्यावर कारवाई केल्यानंतर ते अधिक लोकाभिमुख होईल. त्यांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनसंवादाचा हा सोलापूर पॅटर्न तयार करून संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरेल या पद्धतीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रत्येक तहसीलदार, प्रांत अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान एक नाविन्यपूर्ण काम करावे व त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून द्यावा. त्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात राबवलेल्या नाविन्यपूर्ण योजना राज्यासाठी दिशादर्शक ठरतील यासाठी प्रयत्न करावेत व तशा योजना असतील तर त्या योजना राज्यस्तरावर पाठवाव्यात, त्या महसूल विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात राबविण्याबाबत त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली. त्याचप्रमाणे महसूल विभागातील अधिनियम, कायदे आजच्या  काळानुसार नसतील व त्यात काही ठिकाणी बदल आवश्यक असतील तर तसे अभ्यासपूर्ण बदल करण्याबाबतचे प्रस्ताव महसूल विभागाला द्यावेत, त्यात बदल करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

गौण खनिज अंतर्गत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दंड व फौजदारी कारवाई एकत्रितपणे केली पाहिजे तरच वाळू चोरावर वचक बसेल. दंड वसूल करणे या ऐवजी फौजदारी कारवाई करून गौण खनिज उत्खनन चुकीच्या पद्धतीने होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने 413 लोकांवर जी दंडात्मक कारवाई केली आहे त्याऐवजी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. 3 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन तलाठी यांनी पाच ब्रास वाळू दिली पाहिजे. तसेच रॉयल्टी प्रमाणपत्र देत असताना त्यावर संबंधित लाभार्थ्यांनी वाळू कोठून घ्यायची याचीही नोंद असली पाहिजे. लाभार्थ्यांना महसूल आपल्या दारी आले आहे याची जाणीव झाली पाहिजे सूचना मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

अपार, जीवंत सातबारा तसेच शंभर दिवस कार्यक्रम अंतर्गत प्रशासनाने केलेल्या कामांचे मंत्री बावनकुळे यांनी कौतुक करून पुढील काळातही याच पद्धतीने पारदर्शक व गतिमान काम करून सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून द्यावा. तहसीलदार प्रांताधिकारी यांनी अर्धन्यायिक प्रकरणे त्वरित निकाली काढावेत जास्तीत जास्त दोन तारखा देऊन प्रकरणे मेरिटवर निकाली निघतील यासाठी प्रयत्न करावेत. तसेच पाणंद रस्त्यासाठी नागपूर पॅटर्न जिल्ह्यात राबवावा. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 12 फूट रुंद व एक किलोमीटर लांब रस्त्यासाठी दहा लाखाचा निधी देण्यात येतो. यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त रस्ते कामे मार्गी लावावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. यामध्ये गौण खनिज वसुली 97 कोटी झाली असल्याचे सांगून नवीन शासन निर्णयाप्रमाणे नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यात नऊ वाळू गटाची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील 2066 भूमिहीनांपैकी 252 भूमिहिनांना घरकुलासाठी जमीन वाटप करण्यात आली असून उर्वरित सर्वांना 20 जूनपर्यंत जमीन वाटप केली जाणार आहे. महाराज स्वाभिमान अंतर्गत 134 शिबिरे घेण्यात आलेली असून विद्यार्थ्यांना त्वरित दाखल्यांचे वाटप करण्यात आलेले आहे.

तसेच पानंद रस्ता कार्यक्रम, 100 दिवस कार्यक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पोट खराब जमीन, सनद वाटप, कॉल सेंटर तर राष्ट्रीय महामार्गाकडील भू – संपादन, रिक्त पदे आदींची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी देऊन जिल्हा वार्षिक योजनेतून गतिमान प्रशासनासाठी 19 कोटीचा निधी खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक स्वरूपात पाच घरकुल लाभार्थ्यांना नवीन वाळू धोरणानुसार मोफत वाळू घेऊन जाण्यासाठी रॉयल्टी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू घेऊन जाऊन घरकुल बांधण्याचे आवाहन केले.

सोलापूर जिल्ह्यात एकूण 8.93 लाख शेतकऱ्यांची संख्या असून ऍग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत 5.12 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ऍग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक असल्याने ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी अत्यंत तत्परतेने नोंदणी करून घ्यावी. जोपर्यंत शेतकरी या अंतर्गत नोंदणी करणार नाहीत, तोपर्यंत त्यांना वीज बिलात सवलतीचा लाभ मिळणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन मंत्री बावनकुळे यांनी केले.

०००

 

तालुका क्रीडा संकुल युवाशक्तीला दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा – मंत्री गुलाबराव पाटील

  • सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव, दि. २८ (जिमाका): “क्रीडा ही केवळ शारीरिक व्यायामाची बाब नसून ती शिस्त, सहकार्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व यांचा विकास करणारी शाळा आहे. अमळनेर सारख्या ग्रामीण भागात अशा भव्य क्रीडा संकुलाची नितांत आवश्यकता होती. आज ती गरज पूर्ण होत आहे, ही बाब तालुकावासीयांसाठी समाधानाची आणि प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “सुदृढ आणि सशक्त युवक म्हणजेच सक्षम राष्ट्राची पायाभरणी आहे. हे संकुल नवोदित खेळाडूंना दर्जेदार सुविधा आणि प्रोत्साहन देईल. याच माध्यमातून उद्याचे ऑलम्पिकपटू घडावेत, हीच अपेक्षा आहे. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर खेळांच्या माध्यमातून मनोबल, सहिष्णुता आणि संघभावना यांचा विकास होतो. शासनाच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे,” असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

अमळनेर तालुका क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री  पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, अमळनेर प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, “गावा – गावातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. ती जर योग्य दिशेने वापरली तर गाव, राज्य आणि देशाचा विकास शक्य होतो. या संकुलामुळे ग्रामीण खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळतील आणि ते प्रेरित होतील, असा मला विश्वास आहे. सहकार चळवळ आणि क्रीडा संस्कृती ही दोन्ही ग्रामीण विकासासाठी पूरक आहेत,” असे मत त्यांनी मांडले.

आमदार अनिल पाटील यांनी तालुक्यातील क्रीडा संस्कृतीसाठी हे नूतन संकुल फार उपयुक्त ठरेल, अशी आशा व्यक्त करत आनंद दर्शविला.

या प्रसंगी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, क्रीडाप्रेमी नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे स्केटिंग खेळाचे प्रात्यक्षिक

यावेळी सर्व मान्यवरांच्या समोर स्केटिंगमध्ये विशेष प्रविण्य असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्केटिंग ट्रॅकवर चित्तथरारक स्केटिंगचे दर्शन घडवले.

जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सांगितले की, या क्रीडा संकुलात कुस्ती, कराटे, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, योग, मार्शल आर्ट्ससाठी स्वतंत्र हॉल, ४०० मीटर धावपट्टी, बास्केटबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग, ओपन जिम आदी सुविधा खेळाडूंकरीता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी आभार मानले.

०००

आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

मुंबई, दि. २९ :  राज्यात आपत्ती परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके सतर्क आहेत. मुंबई शहर व  उपनगरमध्ये एनडीआरएफची तीन पथके, पालघरमध्ये एक, नागपूर येथे दोन पथके तैनात आहेत. तर पुणे मुख्यालय येथे एनडीआरएफची दोन पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.  नागपूर व धुळे येथे एसडीआरएफची प्रत्येकी दोन पथके तैनात असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२९ मी रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगरात सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस झाला आहे. मुंबई २९.८ मिमी, ठाणे २९.५ मिमी, नाशिक २६.३ मिमी आणि रायगड जिल्ह्यात २१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २९ मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे जिल्ह्यात २९.५, रायगड २१.९, रत्नागिरी १०.१,  सिंधुदुर्ग १३,  पालघर ३.१, नाशिक २६.३, धुळे १५.९,  नंदुरबार ५.२, जळगाव ३.२, अहिल्यानगर ४.३,  पुणे  ४.८, सोलापूर ५.७,  सातारा ३.९,  सांगली १.६,  कोल्हापूर ०.७, छत्रपती संभाजीनगर २.८,  बीड १, लातूर २.१,  धाराशिव ९.७,  परभणी ०.१,  हिंगोली ०.१,  यवतमाळ ०.१,  वर्धा ४.७, नागपूर २०.८, भंडारा १.७, गोंदिया ५,  आणि गडचिरोली ०.९.

दिनांक २८ मे २०२५ रोजी मुंबई शहरमध्ये झाड पडून दोन व्यक्ती, पालघर जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती आणि सातारा जिल्ह्यात बंधाऱ्यात पडून एक व्यक्ती मृत पावली आहे. मुंबई उपनगर येथे झाड पडून दोन, पुणे जिल्ह्यात आगीच्या घटनेत चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत.  तर जालना जिल्ह्यात २६  प्राणी, वर्धा जिल्ह्यात एक आणि चंद्रपूर जिल्ह्यात एक प्राणी मृत झाला आहे. तसेच मुंबई काळाचौकी येथे भारत आईस कंपनीमधून होणारी अमोनिया वायुची गळती मुंबई महानगरपालिका आणि अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करुन थांबवली असल्याचे सांगण्यात आले आहे.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

ताज्या बातम्या

ग्रामपंचातींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे – ग्रामविकास मंत्री

0
पुणे, दि. २१:महाआवास व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता हे दोन्ही अभियान ग्रामविकासासाठी महत्त्वाची आहेत. स्वच्छ, सुंदर व प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी ग्रामपंचायतीनी महत्त्वाची भूमिका निभवावी व...

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि.२१ : महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले. त्यानंतर राज्याला हा बहुमान मिळाला नसून यासाठी प्रयत्न व्हावा, अशा अपेक्षा...

पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार – मंत्री प्रकाश आबिटकर

0
पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार कोल्हापूर दि.21 (जिमाका): लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व...

‘ईएसआयसी’ रुग्णालयात रुग्णसेवेच्या गुणवत्तेत वाढ करा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज ताराबाई पार्क येथील राज्य कामगार विमा महामंडळाच्या...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

0
पुणे, दि. २१: राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ठळक लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती देणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत आयोजित 'संवादवारी'या चित्र प्रदर्शनाचे, एलइडी व्हॅन...