मंगळवार, जून 10, 2025
Home Blog Page 76

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी जिल्ह्यात या योजनेतंर्गत सुरु असणारे प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महावितरणचे अधिकारी व प्रकल्प विकासकांना दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेबाबत जिल्ह्यातील स्थितीचा आढावा पालकमंत्री यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, महावितरणचे नांदेडचे मुख्य अभियंता  आर. बी. माने, परभणीचे अधीक्षक अभियंता  आर. के. टेंभुर्णे,  कार्यकारी अभियंता  एम. पी. वग्याणी,  जी. के. गाडेकर, श्री. गिल्लुरकर आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मेडा, महावितरणचे अधिकारी व विकासक उपस्थित होते. तर व्हीसीव्दारे महावितरणचे संचालक (प्रकल्प), महावितरणचे निर्मितीचे (प्रकल्प), कार्यकारी संचालक (सौर/नवीकरणीय ऊर्जा), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेतंर्गत एकूण 65 उपकेंद्र मंजूर झाले आहेत. यातून सुमारे 255 मे. वॅट सौर वीजनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पांसाठी एक हजार 275 एकर जागा लागणार आहे. 16 उपकेंद्रांना शंभर टक्के जागा मिळाली आहे, तर 26 उपकेंद्रांना अंशत: जमीन मिळालेली आहे. इतर उपकेंद्रांना जमिन मिळण्याची कार्यवाही सुरु आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत परभणी विभागातील गंगाखेड तालुक्यात 9 उपकेंद्र, पालम तालुक्यात 4, परभणी तालुक्यात 15, पुर्णा तालुक्यात 9 आणि सेलू विभागातील जिंतूर तालुक्यात 9, मानवत तालुक्यात 6, पाथरी तालुक्यात 6, सेलू तालुक्यात 3 व सोनपेठ तालुक्यात 4 असे एकूण 65 उपकेंद्रांची संख्या आहे.

पालकमंत्री म्हणाल्या की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0  ही परभणी जिल्ह्यासाठी महत्त्वाची योजना आहे. ही योजना जलदगतीने वेळेत पूर्ण करावी. विकासकांनी महसूल व पोलीस प्रशासन यंत्रणाशी समन्वय ठेवावा. कुठलीही अडचण आल्यास संबंधित यंत्रणेशी किंवा माझ्याशी संपर्क साधावा, मात्र योजनेत कुठल्याही प्रकारे दिरंगाई करु नये. प्रशासनाने जमिनीशी संबंधित कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी. पावसाळ्यापूर्वी प्रकल्पांचे बहुतांश काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

आढावा बैठकीत पालकमंत्री यांनी कामांची सद्यस्थिती, सोलर विकासकांच्या अडचणी, प्रकल्पासाठी मिळालेल्या जमिनीची माहिती, जमिनी मिळण्यासाठी येत असलेल्या अडचणी याबाबतची माहिती जाणून घेतली. प्रकल्प उभारणीसाठी अडचणींचे तातडीने निराकरण केले जाईल, मात्र विकासकांनी कामे वेळेत पूर्ण करण्याबाबतची सुचना पालकमंत्री यांनी यावेळी केली.  श्री. माने यांनी सादरीकरणाव्दारे योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा होणार आहे. राज्यात 14 हजार 900 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. यातून 45 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 65 हजार कोटी रुपयांची गुंतवणुक असणाऱ्या या योजनेमुळे 50 हजार रोजगारांची ग्रामीण भागात निर्मिती होणार आहे.

बैठकीत पालकमंत्री यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, सोलार सिटी, सोलार व्हीलेज, शासकीय कार्यालयाच्या छतावर सोलर पॅनल बसविण्याच्या स्थितीचाही आढावा घेतला.

०००

कामकाजात सुलभता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा – मंदार कुलकर्णी

Oplus_131072

मुंबई, दि. ०५ : प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, गतिमान आणि कार्यक्षम करण्यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे, असे मत मायक्रोसॉफ्टचे अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘शासकीय कामकाज प्रभावीपणे कसे करावे’ या विषयावर मंदार कुलकर्णी बोलत होते.

Oplus_131072

मंदार कुलकर्णी म्हणाले, गुगल, डॉक्ससारख्या डिजिटल साधनांद्वारे फाईल तयार करणे, ती सुरक्षित जतन करणे आणि थेट ईमेलद्वारे पाठवणे शक्य होते. त्यामुळे कागदपत्रांची देवाणघेवाण अधिक वेगाने होते आणि वेळेची बचत होते. डिजिटल साधनांचा वापर करून प्रशासनिक कामकाज अधिक सुलभ करता येते. मायक्रोसॉफ्ट कोपायलट हा एक एआय-संचालित डिजिटल सहायक असून, तो विविध कार्यालयीन कामकाजात मदतीसाठी डिझाइन करण्यात आला आहे.

Oplus_131072

डेटा विश्लेषणासाठी पिव्होट टेबल्स सारख्या सुविधांचा वापर करून मोठ्या प्रमाणातील डेटा वर्गवारीनुसार सादर करता येतो. डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना श्री. कुलकर्णी म्हणाले, वैयक्तिक माहिती, शासकीय कागदपत्रे किंवा कार्यालयीन डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित बॅकअप व विश्वासार्ह अँटीव्हायरस वापरणे अत्यावश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशासनातील कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

मीरा-भाईंदर महापालिकेच्या विकासकामांचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. ०५: मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा घेऊन विकासकामे गतीने करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.

मंत्रालय येथे मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह पुरातत्व, परिवहन, महसूल, पर्यावरण आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, मीरा-भाईंदर महापालिकेकडील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच ती विहित कालमर्यादेत करावीत. महसूल विभागाने बी.एस.यू.पी. योजनेंतर्गत यापूर्वी हस्तांतर केलेल्या जागेपैकी सद्यस्थितीत झोपडपट्टी असलेल्या जागेत पीपीपी तत्त्वावर इमारती बांधकामांसाठी जागा मीरा भाईंदर महापालिकेला हस्तांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा.

विकासकामांचा आढावा घेताना मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, शिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करावे, खाडी किनारा विकसित करणे व स्काय वॉकची जागा रिकामी करून काम सुरू करावे, चेना रिव्हर फ्रंट 18 मीटर जागेचे भूसंपादन करावे, महापालिका मुख्यालय भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी वर्ग करावा, पर्यटन स्थळ विकास, शिवसृष्टी प्रकल्प, कांदळवन उद्यान या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. घोडबंदर किल्ला व परिसरात कामे करण्याबाबत महापालिकेस परवानगी देण्याबाबतही मंत्री सरनाईक यांनी निर्देश दिले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

 

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ०५: रस्त्यावरील होणारे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी  रस्ता  सुरक्षा  निधीतून  प्राधान्याने घेण्यात येणाऱ्या कामांसह निधी वापराबाबत नियमावली तयार करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात रस्ता सुरक्षा निधीबाबत, ऑटो-रिक्षा व मिटर्स टॅक्सी भाडे नाकारण्याच्या तक्रारीसंदर्भात उपाययोजना करणे, मोटार वाहन विभागातील ऑनलाईन बदली धोरण आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जाहिरात धोरणाबाबत बैठक झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, एस. टी. महामंडळाचे अधिकारी देशमुख यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत मंत्री सरनाईक म्हणाले, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. जनजागृतीसाठी ब्रँड अँबेसिडरची नियुक्ती करावी. सर्व रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. याबरोबरच रस्त्यावर झेब्रा क्रॉस यासह आवश्यक मार्किंग चिन्हे करण्यात यावीत.

एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी जाहिरात धोरणाचा मसुदा तयार करावा. जाहिरात व पार्सल सेवेतून एस. टी. महामंडळास अधिकचे उत्पन्न मिळाले पाहिजे याचे नियोजन करावे. उत्पन्न वाढीसाठी कोल्ड स्टोरेज सारखा प्रकल्प राबविण्याचा महामंडळाने विचार करावा. तसेच प्रवाशांना ऊन, वारा पाऊस याचा त्रास होऊ नये म्हणून या पुढील काळात नवीन एस.टी निवारे बांधतांना ते बंदिस्त पद्धतीचे  बांधावेत तसेच एस.टी निवारे पी.पी.पी. तत्वावर करण्याबाबतचाही अभ्यास करण्यात यावा.

सर्व मीटर रिक्षांना इंडिकेटर लावण्याच्या सूचना परिवहन प्राधिकरणाला दिल्या जातील तसेच बाईक टॅक्सी मधून रोजगार निर्माण होणार असल्याने या योजनेमध्ये काही सुधारणांबाबत आवश्यक मार्ग काढला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मोटार वाहन विभागात राबविण्यात येणारे ऑनलाईन बदली धोरण सर्वसमावेशक असावे. राज्य शासनाच्या अन्य विभागात ऑनलाइन बदली धोरण कशा प्रकारे राबवले जाते याची माहिती घेण्यात यावी, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता- एनआयसीचे महासंचालक अभिषेक सिंग

मुंबई, दि. ०५: तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता हा जीवनाचा भाग होत असून शासकीय कामकाजातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. ‘एआय’च्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता येते. मात्र एआयचा वापर करताना सावधानता बाळगावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे महासंचालक तथा इंडिया एआय मिशनचे अभिषेक सिंग यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर श्री. सिंग यांनी माहिती दिली. यावेळी वस्तू व सेवा कर विभागाचे आयुक्त आशिष शर्मा, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या निवासी आयुक्त आर. विमला आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या मिशन ‘एआय’संबंधीची माहिती देऊन सिंग यांनी शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा कशा प्रकारे वापर होत आहे याविषयी सविस्तर विवरण केले.

सिंग म्हणाले की, बँकिंग, आरोग्य, शेती, न्यायदान अशा सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. हे तंत्रज्ञान परिवर्तनशील असून सातत्याने त्यात बदल होत आहेत. शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे एकाच माहितीचा विविध योजना, उपक्रमांसाठी वापर करता येतो. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय मनुष्यबळच ‘एआय’वर काम करत आहे. भारतात ‘एआय’ वापरासंबंधीचे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या मनुष्यबळाचा वापर भारतातील शासकीय कामकाजात ‘एआय’च्या वापरासाठी करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. त्यासाठी केंद्र सरकार एआय कोश तयार करत असून राज्याकडून डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे भाषिणी, भारत जेन, इंडिया ‘एआय’ अशी ‘एआय’वर आधारित अँप्लिकेशनही केंद्र शासनाने तयार केली आहेत.

महाराष्ट्रातील विस्तार प्रकल्प हा सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून याद्वारे कृषि क्षेत्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरे चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने मिळत आहेत. तसेच अनेक स्टार्टअपही एआयच्या क्षेत्रात काम करत असून महाराष्ट्र त्यामध्ये आघाडीवर असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

अचूक व दर्जेदार डेटा मिळणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामधील आव्हान आहे. अनेकदा कृत्रिम बुद्धिमत्ता ही त्याला पुरविण्यात आलेल्या माहितीवर आधारित उत्तरे देतो. मात्र, ती माहिती अचूक आहे का याचा विचार मानवी बुद्धिमत्तेद्वारेच केला जाऊ शकते. त्यामुळे शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित टूलचा वापर करताना प्रत्येकाने सावधानता बाळगायला हवी, असेही श्री. सिंग यांनी यावेळी सांगितले.

शर्मा यांनी आभार मानले.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

 

माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार-  राज्‍य माहिती आयुक्त गजानन निमदेव

नागपूर,दि. ०५: गत 34 वर्षापासून पत्रकार ते संपादक म्हणून प्रदीर्घ अनुभव असलेले गजानन निमदेव यांनी आज राज्य माहिती आयुक्त (नागपूर खंडपीठ ) पदाची जबाबदारी स्वीकारली. राज्य शासनाने त्यांची नुकतीच या पदावर निवड केली आहे. माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करु असे त्यांनी सांगितले. आज दिनांक ५ मे रोजी सकाळी 11 वाजता प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयात त्यांनी कामकाजास प्रारंभ केला. कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी व पत्रकार बांधवांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. दैनिक तरुण भारत या मराठी दैनिकात त्यांनी पत्रकार, प्रशिक्षणार्थी उपसंपादक या पदापासून पत्रकारितेला प्रारंभ केला. जवळपास गेली पंधरा वर्षे संपादक म्हणून त्यांनी  दैनिक तरुण भारतची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. नागपुरात काम करणाऱ्या बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळाचा स्व. शक्तीकुमार संचेती स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ यांचा आप्पासाहेब पाडळकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सत्यजित गौरव पुरस्कार, नागपुरातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्व. अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार यासह एकूण ७ पुरस्कारांनी निमदेव यांना सन्मानित केले आहे.

सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याची त्यांनी विशेष आवड जपली आहे. याच आवडीतून निमदेव यांनी सातत्याने 20 वर्षे स्तंभलेखन केले. याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी नि:शुल्क मार्गदर्शन केले, हे विशेष. हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. एमपीएससीच्या परीक्षांसाठी सात पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर स्वतंत्रपणे हजारपेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. आठशेपेक्षा जास्त अग्रलेख लिहिले आहेत. इंग्रजी आणि हिंदीतील साडेतीन हजार लेखांचे भाषांतर करण्याचा अनुभव त्यांनी संपादित केलेला आहे.

०००

वेव्हज्‌ २०२५ – प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ

  • जागतिक माध्यम संवादात सदस्य देशांनी स्वीकारला वेव्हज्‌ जाहीरनामा
  • क्रिएट इन इंडिया चॅलेंज भारतात सृजनशील अर्थव्यवस्थेला चालना देणार
  • वेव्हज्‌मध्ये प्रकाशित झालेल्या ज्ञान अहवालांनी वर्तवले सृजनशील अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या गरुडझेपेचे भाकित

मुंबई, दि. ०५ : वेव्हज्‌ अर्थात जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद या अतिशय प्रतिष्ठेच्या, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील पहिल्या वहिल्या महोत्सवाचा मुंबईत सोहळ्याला वेगळ्या उंचीवर नेत उत्साहात समारोप झाला. या शिखर परिषदेला प्रदर्शक, उद्योग धुरीण, स्टार्टअप्स, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि सामान्य जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध कलाकार आणि प्रभावशाली आशय निर्माते असोत, तंत्रज्ञान नवोन्मेषक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रणी अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींच्या सहभागामुळे ही परिषद म्हणजे माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेसाठी संगमाचे केंद्र ठरली.  प्रदर्शने, पॅनेल चर्चा आणि बीटूबी सहकार्याच्या उत्साही मिलाफासह, या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आणि भारताची माध्यम आणि मनोरंजनाची उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून असलेले स्थान अधिक भक्कम झाले.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाने विविध तारेतारका आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि कथाकथनाच्या या महोत्सवाचा गुरुवारी  प्रारंभ झाला. वेव्हज्‌ हे केवळ एक संक्षिप्त नाव नाही तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक नातेसंबंधाची ही एक लाट आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमात केले. भारत चित्रपट निर्मिती, डिजिटल आशय, गेमिंग, फॅशन, संगीत आणि लाईव्ह कॉन्सर्टसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी जगातील सर्जकांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि त्यांच्या कथा सांगण्याचे, गुंतवणूकदारांना केवळ प्लॅटफॉर्ममध्येच नव्हे, तर लोकांमध्ये गुंतवणूक करण्याचे आणि भारतीय तरुणांना त्यांच्या एक अब्ज न सांगितलेल्या कथा जगाला सांगण्याचे आवाहन केले. वेव्हज म्हणजे भारताच्या केशरी अर्थव्यवस्थेची पहाट असल्याचे जाहीर करत त्यांनी युवा वर्गाला या सृजनशील लाटेवर स्वार होण्याचे आणि भारताला जागतिक सर्जनशील निर्मिती केंद्र बनवण्याचे आवाहन केले.

उच्च-परिणाम साधणारी ज्ञान सत्रे

पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या उद्देश पुढे नेत, चार दिवसांत वेव्हज 2025 ने विचार, कौशल्य आणि महत्त्वपूर्ण अभिप्राय यांच्या उच्चस्तरीय देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. वेव्हज 2025 चा विचारविनिमय मागोवा संवाद आणि सहकार्यासाठी एक महत्त्वाचा मंच म्हणून काम करत होता, ज्यामुळे जगभरातील विचारवंत, उद्योगधुरीन, धोरणकर्ते आणि व्यावसायिक एकत्र आले. पूर्ण सत्रे, विभागीय चर्चासत्रे आणि महत्वपूर्ण शिक्षणसत्रांच्या काळजीपूर्वक तयार केलेल्या मालिकेद्वारे, शिखर परिषदेने माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाचे भविष्य घडवणाऱ्या नवीनतम नवकल्पना आणि उदयोन्मुख धोरणांचा शोध घेतला. या सत्रांनी विशेषज्ञता क्षेत्रात वैचारिक देवाणघेवाण करण्यास सक्षम केले.

वेव्हज्‌ची प्रारंभिक आवृत्ती उच्च-परिणाम साधणारी ज्ञानवर्धक सत्रे आणि प्रसारण तसेच माहिती आणि मनोरंजन, एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्र, डिजिटल मीडिया आणि चित्रपट यासारख्या विषयांच्या विस्तृत व्याप्तीचा समावेश असलेल्या चर्चासत्रांच्या माध्यमातून स्मरणात राहील. तीन मुख्य सभागृहांमध्ये (प्रत्येक सभागृहात एक हजारहून अधिक सहभागी सामावले जातील) तसेच 75 ते 150 पर्यंत क्षमता असलेल्या पाच अतिरिक्त सभागृहांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 140 हून अधिक सत्रांसह, शिखर परिषदेत उपस्थिती मोठ्या संख्येने राहिली – अनेक सत्रांमध्ये पूर्ण उपस्थिती नोंदवली गेली.

पूर्ण सत्रांमध्ये मुकेश अंबानी, टेड सॅरंडोस, किरण मजुमदार-शॉ, नील मोहन, शंतनू नारायण, मार्क रीड, ॲडम मोसेरी आणि नीता अंबानी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींची 50 हून अधिक प्रमुख भाषणे होती. विकसित होत असलेल्या मनोरंजन उद्योग, जाहिरातीचे विशाल क्षेत्र आणि डिजिटल परिवर्तनाबाबत त्यांनी महत्वपूर्ण अभिप्राय मांडत यथार्थ चित्र सादर केले. चिरंजीवी, मोहनलाल, हेमा मालिनी, अक्षय कुमार, नागार्जुन, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अल्लू अर्जुन आणि शेखर कपूर यांसारख्या चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी, ज्यांपैकी बहुतांश जण वेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य होते, आभासी निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सिनेमा आणि कंटेंट निर्मितीच्या भविष्यावर विचारपूरक चर्चा केली.

वेव्हज्‌ 2025 मधील 40 महत्वाची शिक्षण सत्रे व्यावहारिक शिक्षण आणि सर्जनशील अन्वेषण देण्यासाठी विशेषत्वाने निर्मित केली होती. आमिर खानचे द आर्ट ऑफ ॲक्टिंग, फरहान अख्तरचे क्राफ्ट ऑफ डायरेक्शन आणि मायकेल लेहमनचे इनसाइट्स इन फिल्ममेकिंग यासारख्या सत्रांद्वारे सहभागींना उद्योग तंत्रांचा थेट अनुभव घेता आला. ॲमेझॉन प्राईमद्वारे पंचायत बनवणे, ए आर लेन्स डिझाइन करणे, ए आय अवतार तयार करणे आणि उत्पादकक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने गेम विकसित करणे यासारख्या पडद्यामागील अदाकारी पेश करण्यात आली. या सत्रांमध्ये व्यावसायिक आणि इच्छुक निर्मात्यांना वेगाने विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेत आघाडीवर राहण्यासाठी कृतीशील ज्ञान आणि साधनसामग्रीविषयी माहिती प्रदान करण्यात आली.

वेव्हज्‌मध्ये 55 विभागीय चर्चासत्रे देखील होती ज्यांनी प्रसारण, डिजिटल मीडिया, ओटीटी, ए आय, संगीत, बातम्या, लाइव्ह कार्यक्रम, ॲनिमेशन, गेमिंग, आभासी निर्मिती, चित्रकथा आणि चित्रपट निर्मिती यासारख्या विशेष संकल्पनेवर सखोल चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले. या परस्परसंवादी सत्रांमध्ये मेटा, गुगल, ॲमेझॉन, एक्स, स्नॅप, स्पॉटीफाय, डी एन ई जी, नेटफ्लिक्सआणि एन व्ही आय डी ए आय यासारख्या आघाडीच्या कंपन्यांमधील वरिष्ठ व्यावसायिकांसह फिक्की, सी आय आय आणि आय एम आय सारख्या उद्योग संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले. क्षेत्र-विशिष्ट महत्वपूर्ण अभिप्राय आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेल्या या चर्चेत गंभीर आव्हानांबाबत उपाय शोधण्यात आले आणि वाढ आणि नवोन्मेषासाठी नवीन दिशानिर्देश देण्यात आले.

वेव्हज्‌ बाजारने व्यवसाय करारांमधून 1328 कोटी रुपये कमावले; महाराष्ट्र शासनाने ‘माध्यम आणि मनोरंजन’ क्षेत्रात 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले वेव्हजच्या छत्राखाली 1 ते 3 मे दरम्यान आयोजित वेव्हज बाजारचा आरंभीचा हंगाम जबरदस्त यशस्वी झाला कारण त्याने सर्जनशील उद्योगांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सहकार्यासाठी एक प्रमुख मंच म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे. या बाजारपेठेत चित्रपट, संगीत, रेडिओ, व्हीएफएक्स आणि अ‍ॅनिमेशन क्षेत्रात 1328 कोटी रुपयांचे व्यवसाय करार तसेच व्यवहार नोंदवले गेले. एकूण अंदाजित उत्पन्नापैकी 971 कोटी रुपये हे केवळ आंतर व्यावसायिक बैठकांमधून प्राप्त झाले आहेत. खरेदीदार-विक्रेता बाजार हे या बझारचे एक प्रमुख आकर्षण होते, ज्यामध्ये 3,000 हून अधिक बीटूबी बैठका झाल्या. आंतरराष्ट्रीय सहकार्याअंतर्गत एक मोठी कामगिरी म्हणून, न्यूझीलंडमधील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅंटरबरी एनझेड यांनी न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केला. ओन्ली मच लाउडरचे सीईओ तुषार कुमार आणि रशियन फर्म गॅझप्रॉम मीडियाचे सीईओ अलेक्झांडर झारोव्ह यांनी रशिया आणि भारतात परस्पर-सांस्कृतिक महोत्सवात सहकार्य करण्यासाठी आणि कॉमेडी आणि संगीत विषयक कार्यक्रमांची सह-निर्मिती करण्यासाठी सामंजस्य करारावर लवकरच चर्चा करण्याची घोषणा केली. प्राइम व्हिडिओ आणि सीजे ईएनएम बहुवार्षिक सहयोगाची घोषणा ही बझार चे आणखी एक आकर्षण होते कारण जागतिक स्तरावर प्रीमियम कोरियन आशय वितरित करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीचे अनावरण करण्यात आले. इतर टप्पे म्हणजे ‘देवी चौधराणी’ चित्रपटाची घोषणा, जो भारताचा पहिला अधिकृत इंडो-यूके सह-निर्मिती असलेला चित्रपट ठरला. आणि ‘व्हायलेटेड’ चित्रपट जो यूके आणि जेव्हीडी फिल्म्सच्या फ्यूजन फ्लिक्सची सह-निर्मिती असेल.

महाराष्ट्र शासनाने वेव्हज्‌मध्ये 8,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करून शिखर परिषदेत व्यावसायिक मूल्य वाढवले आहे. यॉर्क विद्यापीठ आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासोबत प्रत्येकी 1,500 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले, तर राज्याच्या उद्योग विभागाने प्राइम फोकस आणि गोदरेजसोबत अनुक्रमे 3,000 कोटी रुपयांचे आणि 2,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले.

जागतिक माध्यम संवाद 2025 मध्ये सदस्य राष्ट्रांनी वेव्हज जाहीरनामास्वीकारला

मुंबईतील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेदरम्यान (वेव्हज 2025) आयोजित करण्यात आलेला जागतिक माध्यम संवाद 2025 हा एक ऐतिहासिक कार्यक्रम होता ज्यामध्ये 77 राष्ट्रांचा सहभाग होता, जो जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो. वेव्हज 2025 मधील जागतिक माध्यम संवादाने सांस्कृतिक संवेदनशीलतेचा आदर राखत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून सर्जनशीलतेला चालना देण्याच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला. सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे ‘वेव्हज घोषणापत्र’ स्वीकारले, त्यामध्ये डिजिटल अंतर कमी करण्याची तातडी आणि जागतिक शांतता व सौहार्दाला प्रोत्साहन देण्यासाठी माध्यमांचा वापर यावर भर देण्यात आला. चर्चेमध्ये विविध संस्कृतींना एकत्र आणण्यात चित्रपटांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वाढणाऱ्या सर्जक अर्थव्यवस्थेत वैयक्तिक कथांचे महत्त्व अधोरेखित झाले.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी तंत्रज्ञान आणि परंपरेच्या समन्वयावर जोर देत, कौशल्य विकास आणि नवोन्मेषाद्वारे तरुणांना सक्षम करण्याची गरज मांडली. माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आशय-सामग्री निर्मितीवर असलेल्या तंत्रज्ञानाच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश टाकला आणि स्थानिक आशय-सामग्री, सह-निर्मिती करार आणि संयुक्त निधी उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या “क्रिएट इन इंडिया” स्पर्धेतून 700 हून अधिक जागतिक सर्जकांना यशस्वीपणे निवडण्यात आले, आणि पुढील आवृत्तीत ही स्पर्धा 25 जागतिक भाषांमध्ये विस्तारित करण्याची योजना जाहीर करण्यात आली. या परिषदेने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भविष्यातील जागतिक सहकार्यासाठी मजबूत पायाभरणी केली, तसेच त्यामध्ये सर्जनशील उत्कृष्टता आणि नैतिक सामग्री निर्मितीवर भर देण्यात आला.

वेव्हज: माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील आकांक्षी स्टार्ट-अप्ससाठी एक प्रवेगक

वेव्हज्‌ स्टार्ट-अप प्रवेगकांनी 45 प्रमुख एंजेल गुंतवणूकदारांपैकी लुमिकाई, जिओ, कॅबिल, वॉर्मअप व्हेंचर्स सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या अद्वितीय कल्पना थेट मांडण्यासाठी  30 माध्यम आणि मनोरंजन स्टार्ट-अप्सची निवड केली. 1000 हून अधिक नोंदणींसह, या उपक्रमामुळे सध्या सुरू असलेल्या 50 कोटी रुपयांच्या गुंतवणूक अपेक्षित आहेत. याशिवाय, 100 हून अधिक स्टार्ट-अप्सनी समर्पित स्टार्ट-अप पॅव्हेलियनमध्ये संभाव्य गुंतवणूकदारांना त्यांच्या संकल्पना आणि उत्पादने प्रदर्शित केली. वेव्हज एक उपक्रम म्हणून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारे एंजल गुंतवणूकदार नेटवर्क तयार करून स्टार्ट-अप्सना भरभराटीसाठी आणि वाढीसाठी एक स्पष्ट गुंतवणूक परिसंस्था तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवते. टियर 1 आणि टियर 2 मधील स्टार्ट-अप्स वेव्हज मध्ये चमकले आणि त्यांच्या संस्थापकांनी केंद्रस्थानी स्थान मिळवले. अशा निर्मात्यांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासाठी वेव्हज्‌ इनक्यूबेटरचे नेटवर्क स्थापित करेल ज्यामध्ये समर्पित मार्गदर्शक आणि बीज भांडवल गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदार असतील. वेव्हएक्स (WAVEX) अनोखे आहे कारण ते अशा कल्पनांना सुविधा देते ज्यांचे अद्याप मूर्त उत्पादन नाही, परंतु त्यांच्याकडे ठोस क्षमता आहे.

वेव्हज्‌ 2025 मध्ये प्रकाशित प्रमुख ज्ञान अहवाल

माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी मुंबईतील वेव्हज परिषद 2025 मध्ये पाच महत्त्वपूर्ण अहवालांचे अनावरण केले. हे अहवाल भारताच्या समृद्ध माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेचे सर्वसमावेशक विहंगावलोकन करतात, त्यात आशय सामग्री निर्मिती, धोरणात्मक चौकट आणि थेट कार्यक्रम यांसारख्या प्रमुख पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

माध्यम आणि मनोरंजनावरील सांख्यिकीय पुस्तिका 2024 – 25:

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तयार केलेली ही सांख्यिकीय पुस्तिका भारताच्या माध्यम परिदृश्यातील वाढीचे कल, प्रसारण, डिजिटल माध्यम, चित्रपट प्रमाणन आणि सार्वजनिक माध्यम सेवांबाबत महत्त्वपूर्ण डेटा-आधारित अंतर्दृष्टी प्रदान करते. भविष्यातील धोरणनिर्मिती आणि उद्योग धोरणांसाठी अनुभवजन्य पुराव्यांवर आधारित आवश्यक माहिती उपलब्ध करून देते.

फ्रॉम कंटेंट टू कॉमर्स’ – बीसीजी

बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा हा अहवाल भारताच्या सर्जक अर्थव्यवस्थेच्या विलक्षण वाढीवर प्रकाश टाकतो, त्यात 20 ते 25 लाख सक्रिय डिजिटल सर्जकांचा सहभाग आहे. या सर्जकांचा वार्षिक 350 अब्ज डॉलरहून अधिक खर्चावर प्रभाव पडतो, आणि 2030 पर्यंत हा आकडा 1 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज आहे. हा अहवाल सर्जकांसोबत लघुकालीन व्यवहारांऐवजी दीर्घकालीन, प्रामाणिक भागीदारी निर्माण करण्यावर जोर देतो.

अ स्टुडिओ कॉल्ड इंडिया’ – अर्न्स्ट अँड यंग (Ernst & Young)

अर्न्स्ट अँड यंगचा हा अहवाल भारताला त्याच्या भाषिक विविधता, समृद्ध संस्कृती आणि तंत्रज्ञान कौशल्याच्या जोरावर जागतिक सामग्री केंद्र म्हणून चित्रित करतो. यामध्ये अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स सेवांमध्ये भारताला 40 – 60 टक्के खर्चाचा फायदा आणि भारतीय ओटीटी सामग्रीसाठी वाढती आंतरराष्ट्रीय मागणी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामुळे भारताची जागतिक सांस्कृतिक राजकीय भूमिका बळकट होत आहे.

कायदे आणि थेट कार्यक्रम क्षेत्रातील घडामोडी:

‘खैतान अँड कंपनी’च्या नव्या कायदेशीर मार्गदर्शक पुस्तिकेत इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि त्यासंदर्भातील नियमावली यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असून, मिडिया क्षेत्रातील व्यावसायिकांना भारतातील नियामक चौकटीतून वाट काढण्यासाठी मदत मिळणार आहे. याशिवाय, भारतातील थेट कार्यक्रम क्षेत्रावर प्रकाशित करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेनुसार सध्या या क्षेत्राची 15 टक्के दराने वाढ होत असून, त्या पार्श्वभूमीवर, या वाढत्या उद्योगासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि परवाना प्रक्रियेतील सुलभता अत्यावश्यक आहे असेही  या श्वेतपत्रिकेत अधोरेखित करण्यात आले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी: राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) – मुंबईत स्थापन होणारे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी क्षमता बांधणीत एक मैलाचा दगड ठरणार आहे. केवळ एव्हीजीसी-एक्सआर (AVGC-XR) क्षेत्राला समर्पित असणाऱ्या या संस्थेची औपचारिक स्थापना वेव्हज 2025 च्या तिसऱ्या दिवशी करण्यात आली. प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला जागतिक दर्जाच्या संस्थेच्या रुपात स्थापित करण्यासाठी वेव्हजने उद्योग संघटनांसोबत धोरणात्मक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी देखील केली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहयोगाला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला. वैष्णव यांनी प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीचे स्थान मिळवण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला. ज्याप्रमाणे आयआयटी आणि आयआयएम या संस्था तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आदर्श बनल्या आहेत त्याप्रमाणेच आयआयसीटी आपल्या क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे असे वैष्णव यांनी सांगितले. दीर्घकालीन सहकार्यासाठी हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओस्टार, अ‍ॅडोब, गुगल आणि यूट्यूब, मेटा, वॅकॉम, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीआयडीआयए यांचा समावेश आहे.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज आणि क्रिएटोस्फीअर: सर्जनशील  प्रतिभेचा जागतिक उत्सव

वेव्हज् 2025 चे एक प्रमुख आकर्षण म्हणजे क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) पर्व  1 चा भव्य समारोप होता. या स्पर्धेत 60 हून अधिक देशांमधून सुमारे एक लाख जणांनी नोंदणी केली होती. वेव्हज अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजने (सीआयसी) ॲनिमेशन, एक्सआर, गेमिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, चित्रपट निर्मिती, डिजिटल संगीत आणि इतर क्षेत्रातील निर्मात्यांना वयोगट, भौगोलिक आणि विषयांच्या सीमा ओलांडून एकत्र आणले होते. या उपक्रमाने यात सहभागी झालेल्या प्रत्येक क्रिएटरला  स्टार बनवले आहे.

32 कल्पक आणि भविष्यवेधी आव्हानांमधून 750 हून अधिक स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. या स्पर्धेत 1100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सहभागींचा समावेश होता. या प्रतिभावान व्यक्तींनी वेव्हज्‌मधील समर्पित नवोन्मेषी विभाग असलेल्या क्रिएटोस्फीअरमध्ये आपले सृजन सादर केले. या व्यासपीठावर त्यांनी आपले प्रकल्प सादर केले तसेच संभाव्य सहयोगासाठी उद्योगातील धुरीणांशी ते संपर्क करू शकले.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज केवळ एक स्पर्धा न राहता, विविधता, युवा ऊर्जा तसेच परंपरा आणि तंत्रज्ञानात रुजलेली कथाकथन साजरे करणारी एक चळवळ बनली आहे. 12 ते 66 वर्षे वयोगटातील अंतिम स्पर्धक तसेच सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या जोरदार सहभाग असलेल्या या उपक्रमात समावेशकता आणि आकांक्षा प्रतीत झाली होती.  होती. क्रिएटोस्फीअर हे तळागाळातील नवोन्मेष, ड्रोन स्टोरीटेलिंग आणि भविष्यासाठी सज्ज आशय यासारख्या संकल्पनांसाठी  जगासमोर येण्याची एक संधी  देखील होती. क्रिएटोस्फीअर हे व्यासपीठ उद्याच्या सर्जनशील भारताची झलक दाखवणारे होते. “प्रवास आता सुरू झाला आहे,” हे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सीआयसीच्या पुरस्कार सोहळ्यात उच्चारलेले शब्द सार्थ आहेत आणि क्षितीजावरील भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेसारख्या उपक्रमांनी या गतीला अधिकच बळ मिळत आहे.

8 वे राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलन आणि राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार

वेव्हज्‌चा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलनात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी देशभरातील 12 उत्कृष्ट सामुदायिक नभोवाणी केंद्रांना ‘राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार’ देऊन गौरवले. डॉ. मुरुगन यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हे राष्ट्रीय संमेलन भारतातील सामुदायिक माध्यमाच्या क्षेत्राला नवप्रवर्तन, समावेश आणि प्रभावाच्या माध्यमातून अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात विचारमंथन आणि  सहकार्याची संधी निर्माण व्हावी या उद्देशाने देशभरातील 400 पेक्षा अधिक सामुदायिक नभोवाणी (सीआर) केंद्रांचे प्रतिनिधी एकाच मंचावर आले होते. सध्या देशात एकूण 531 सामुदायिक नभोवाणी केंद्र कार्यरत आहेत.

भारत मंडप– ‘कला ते कोडप्रवास

वेव्हज्‌ 2025 मध्ये भारताची कथाकथन परंपरा ‘कला ते कोड’ या संकल्पनेतून उलगडणाऱ्या ‘भारत मंडप’ या अनुभवात्मक विभागाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मंडपामध्ये भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील तोंडी आणि दृश्य परंपरांपासून ते आधुनिक डिजिटल नवप्रवर्तनापर्यंतच्या उत्क्रांतीचे दर्शन घडवले गेले.

‘भारत मंडप’ने आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि नव्या तंत्रज्ञान लाटेचा समतोल साधत भारताचा आत्मा उलगडला. वेव्हज 2025 च्या उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंडपाला भेट दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री  एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव तसेच अनेक मान्यवरांनीही भेट देऊन या मंडपाच्या सादरीकरणाचे कौतुक केले. मंडपामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आणि लोक भारताच्या सांस्कृतिक खजिन्यांच्या शोधामुळे आ‍श्‍चर्यचकित  झाले.

भारताच्या सर्जनशील प्रवासाचा गौरव करणारे हा मंडप केवळ एक प्रदर्शन नव्हते, तर भारताला एका सर्जक राष्ट्राच्या रूपात मांडणारे प्रभावी माध्यम होते. या मंडपाने भारताची सांस्कृतिक खोली, कलात्मक उत्कर्ष आणि जागतिक कथाकथनात उद्योन्मुख नेतृत्व दाखवून दिले.

वेव्हज्‌चा समारोप सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प

वेव्हज्‌ 2025 ने सर्जनशीलता, व्यापार आणि सहयोग यांना एकत्र आणणारे जागतिक व्यासपीठ म्हणून एक उच्च दर्जा प्रस्थापित केला. दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक घोषणा, आंतरराष्ट्रीय करार, मजबूत व्यावसायिक व्यवहार आणि नवोपक्रम गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर वेव्हजने भारताच्या जागतिक सर्जनशील नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली. 77 देशांनी वेव्हज जाहीरनाम्याला पाठिंबा दिला. वेव्हज बाजार आणि वेव्हेक्स अॅक्सलरेटरचे यश यामुळे स्पष्ट झाले की, भारत नावीन्य, समावेश आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यांच्या आधारावर भविष्य घडवत आहे. या ऐतिहासिक पहिल्या आवृत्तीच्या समारोपानंतर, वेव्हजने केवळ भारताची सर्जनशील क्षमता जगासमोर मांडली नाही, तर एक जागतिक चळवळ सुरू केली आहे — जी जगभरातील सर्जकांच्या आवाजाला प्रेरणा, गुंतवणूक आणि संधी देत राहील.

०००

सागरकुमार कांबळे/ससं/

डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा – प्रभू गौर गोपाल दास

Oplus_131072

मुंबई, दि. ०५ : धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणसं जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल, सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रेरणादायी वक्ते व लेखक प्रभू गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले. टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभू गौर गोपाल दास बोलत होते.

टेक्नोसॅव्ही व्हा

सध्या जग वेगाने डिजिटल दिशेने वाटचाल करत आहे. स्मार्टफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड संगणक, आणि इंटरनेट यांसारखी तंत्रज्ञान आपला रोजचा भाग बनत आहेत. अशा काळात ‘टेक्नोसॅव्ही’ होण ही केवळ गरज नसून ती एक अनिवार्यता बनली आहे. विविध ऑनलाईन कोर्सेस, मोबाइल अ‍ॅप्स आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्समुळे तंत्रज्ञान शिकण आता पूर्वीपेक्षा अधिक सोप झाले आहे, असेही प्रभू गौर गोपाल दास यांनी सांगितले.

शिकण थांबवू नका आयुष्यभर विद्यार्थी राहा

प्रभू गौर गोपाल दास म्हणाले, शिकण ही एक प्रक्रिया आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरू असते. वय कितीही असो, नवीन कौशल्य शिकणे, भाषा आत्मसात करणे किंवा एखादा छंद जोपासणे यामुळे मेंदू अधिक कार्यक्षम राहतो. वृद्धापकाळातही अल्झायमर आणि डिमेन्शियासारखे आजार टाळण्यासाठी मेंदूला वर्कआउट देणे गरजेचे आहे. डिजिटल युगात विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सद्वारे हे अधिक सुलभ झाले आहे.

मानसिक आरोग्य सांभाळा

दररोज थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. ध्यान, वाचन, मनमोकळ्या गप्पा किंवा छंद जोपासा. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा दिनक्रम ठेवा. या गोष्टींचा अवलंब केल्यास तणाव आणि मानसिक विकारांवर मात केली जाऊ शकते.

संस्कृती विसरू नका

संस्कृती आणि मूल्य ही आपल्या जीवनात महत्त्वाची आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासात आपण पुढे जात असताना, आपल्या परंपरा, नीतिमूल्य विसरता कामा नये. स्मार्ट, डिजिटल व भविष्यकाळासाठी सज्ज होण महत्त्वाच असलं तरी आपले संस्कार आणि मूल्य यांचा विसर पडू देऊ नका, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मनात सतत रेंगाळणारे विचार जर व्यक्त झाले नाही तर ते मानसिक आजारांना आमंत्रण देऊ शकतात. यासाठी एक सोपा उपाय म्हणजे  मनातील त्रासदायक विचार एखाद्या व्यक्तीसमोर मोकळेपणाने व्यक्त करणे किंवा ते लिहून मोकळ होणे. ही पद्धत मनावरचा भार हलका करते आणि मन:स्वास्थ्य टिकवते. आनंदी आणि समाधानी जीवनासाठी इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःशीच तुलना करा. सतत आपल्याकडे काय नाही याचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा, आपल्याकडे काय आहे याची जाणीव ठेवल्यास आयुष्य अधिक समृद्ध होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंत्रालयाच्या या मंदिरात तंत्रज्ञान हे दैवत असून डिजिटल टेक्नॉलॉजी ही अभंगासमान आहे, आधुनिक काळात तंत्रज्ञान आणि डिजिटल कौशल्य ही यशस्वी भविष्यासाठी आवश्यक ठरली आहेत. त्यामुळे आपण त्याचा स्वीकार भक्तिभावाने करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक  – उपमुख्यमंत्री अजित पवार

Oplus_131072

मुंबई, दि. ०५ : प्रशासन काळानुरूप बदल स्वीकारणारे असेल तर लोकांना अधिक गतिमान, पारदर्शक व चांगल्या सेवा मिळू शकतात. सामान्य प्रशासन विभागाने आयोजित केलेला ‘टेक वारी’: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ हा उपक्रम राज्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशासकीय क्षमता विस्तारण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आपण बदलांचा केवळ स्वीकार करत नसून बदलाचे नेतृत्व करत असल्याचा संदेश ‘टेक वारी’ उपक्रमाच्या  माध्यमातून जाईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

Oplus_131072

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे ‘टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर.विमला, प्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपालदास यासह ज्येष्ठ सनदी अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Oplus_131072

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ५ ते ९ मे दरम्यान टेक वारी अंतर्गत हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपाल दास यांच्या मार्गदर्शनाचा फायदा सर्वांनाच होईल. ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज्, सायबर सुरक्षा, डिजिटल फायनान्स ‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचे परिवर्तन’ ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’, विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक’ अशा क्षेत्रातील तज्ज्ञ विविध मार्गदर्शन सत्रांद्वारे हे विषय सोप्या पद्धतीने समजावून  सांगणार आहेत. काळानुरूप बदल सगळ्यांनी स्वीकारून प्रशासन अधिक गतिमान करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केले.

Oplus_131072

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, टेक-वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, संगीत थेरपी, ध्यानधारणा, कार्य-जीवन समतोल या विषयांवरील मार्गदर्शन सत्रे आयोजित केली आहेत. यामुळे संतुलित व सुदृढ शासकीय कर्मचारी वर्ग घडविण्यास मदत होईल.

महाराष्ट्र ‘आय गॉट’वरही प्रथम येईल – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून लोकाभिमुख काम करणारे महाराष्ट्र राज्य प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. ‘आय गॉट’ वर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आपले राज्य पहिल्या तीनवरून प्रथम क्रमांक प्राप्त करेल. प्रशासनाने अधिक गतीमान सेवा देण्यावर भर द्यावा. आपल्या प्रत्येकाच्या कामाच्या मूल्यमापनातूनच एकंदरीत कामाचे मोजमाप होत असते महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. प्रत्येक बदलाला सामोराही जात आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी देखील हे बदल स्वीकारून आपले काम अधिक गतीमान पद्धतीने करतील, असा विश्वास मंत्री ॲड. शेलार यांनी व्यक्त केला.

इज ऑफ लिव्हिंगमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे राहील : प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार

प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान अवगत करून अधिकारी व कर्मचारी काम करत आहेतच पण काळानुरूप आपल्या सेवा ‘इज ऑफ लिव्हिंग’ असल्या पाहिजेत. त्या अधिकाधिक लोकामिभुख असाव्यात यासाठी प्रशासनाने काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

‘टेक-वारी’ उपक्रमात मंत्रालय ते गावपातळीवरील अधिकाऱ्यांचा सहभाग – आयुक्त आर.विमला

महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर. विमला म्हणाल्या की, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या प्रयत्नामुळे आणि राज्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आज केंद्र शासनाच्या ‘ऑय गॉट’ प्रणालीवर सर्वाधिक प्रशिक्षण घेणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिल्या तीन मध्ये आहे. ‘टेक-वारी’ उपक्रम नाविन्यपूर्ण असून त्याचा लाभ नक्कीच सर्व अधिकारी घेतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांनी ‘टेक वारी’ या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अथक परिश्रम घेवून केले, मात्र त्यांच्या वडिलांचे निधन झाले असल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. यावेळी अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

मंत्रालयात आरोग्य, शिक्षण, कृषी या विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सचे, मन:शक्ती प्रयोगकेंद्रातील उपक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा नातू यांनी सूत्रसंचालन केले.

०००

संध्या गरवारे /विसंअ/

 

 

बारावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

  • परीक्षेचा निकाल ९१.८८ टक्के
  • मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ ने जास्त

मुंबई, दि. ०५ : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव देविदास कुलाळ यांनी निकाल जाहीर केला.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील यशानंतर त्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. या माध्यमातून स्वत:ची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधण्याची संधी मिळणार असल्याने ते या संधीचे सोने करतील, असा विश्वास आहे. तथापि, ही परीक्षा हे अंतिम ध्येय नाही, यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

निकालाची वैशिष्ट्ये

या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,97,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 91.88 आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के इतका सर्वाधिक आहे.

विभागीय मंडळनिहाय निकाल

कोकण विभागातील 22,797 (96.74 टक्के), कोल्हापूर विभागातील 1,06,004 (93.64 टक्के), मुंबई विभागातील 2,91,955 (92.93 टक्के), छत्रपती संभाजीनगर 1,65,961 (92.24 टक्के), अमरावती 1,32,814 (91.43 टक्के), पुणे 2,21,631 (91.32 टक्के), नाशिक 1,44,136 (91.31 टक्के), नागपूर 1,36,805 (90.52 टक्के) आणि लातूर विभागातील 80,770 (89.46 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुलींची टक्केवारी अधिक

सर्व विभागीय मंडळांतून 6,76,972 मुले तर 6,25,901 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नियमित मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 टक्के असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी जास्त आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 1,49,932 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, 4,07,438 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 5,80,902 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 1,64,601 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

शाखानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

विज्ञान शाखेतील 7,15,595 विद्यार्थी (97.35 टक्के), कला शाखेतील 2,81,606 (80.52 टक्के), वाणिज्य शाखेतील 2,77,629 (92.68 टक्के), व्यवसाय अभ्यासक्रम 24,450 (83.26 टक्के) तर आयटीआय मधील 3,593 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (82.03 टक्के).

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.38

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,258 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6,705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी 92.38 इतकी आहे.

श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत फक्त लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुन:श्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जून-जुलै 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस श्रेणीसुधार/ गुणसुधार साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत आहेत, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

ताज्या बातम्या

पोर्तुगाल प्रजासत्ताकाचे भारतातील राजदूत यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

0
मुबई, दि. १० : पोर्तुगाल व भारताचे संबंध ऐतिहासिक आहेत. मात्र पोर्तुगालने आता भविष्यावर लक्ष केंद्रित केले असून भारताशी व्यापारासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवणार...

‘कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १० : देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे. प्रधानमंत्र्यांच्या...

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या महसूल लोक अदालतीमुळे महसूली दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहेत. त्यामुळे ही सर्वसामान्यांना न्याय देणारी महसूल लोकअदालतीची मोहीम यापुढे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित ‘धडपड भाग-३’ या पुस्तकाचे प्रकाशन

0
पुणे, दि. 9 : ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-3 या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद...

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये उद्या भाषण

0
मुंबई, दि. 9 : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या स्वीडनमध्ये इंटरनॅशनल आयडिया स्टॉकहोम निवडणूक प्रामाणिकता परिषद (International IDEA Stockholm Conference on Electoral...