शुक्रवार, जून 6, 2025
Home Blog Page 1659

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांच्या निधनानं व्यासंगी व्यक्तिमत्व पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 9 :- ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अनंत दीक्षित यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यासंगी, ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात त्यांनी अनंत दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अनंत दीक्षित हे विचारांनी परखड व अनेक पत्रकारांचे आदर्श होते. पत्रकारांच्या अनेक पिढ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. कोल्हापूर आणि पुण्याशी त्यांचे जिव्हाळ्याचं नाते होते. त्यांच्या संस्कारातून घडलेले पत्रकार यापुढच्या काळात त्यांचे विचार पुढे नेतील, असा मला विश्वास आहे.

पुणे येथे एव्हिएशन गॅलरीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

प्रत्येक जिल्ह्यात एव्हिएशन गॅलरी उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार 

पुणे,दि. ९ : राज्यातील विविध भागातील विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांना हवाई दल,या दलातील रोजगार संधींबाबतची माहिती करुन देण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात एव्हिएशन गॅलरी उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

शिवाजीनगर गावठाण येथे नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या विकास निधीतून पूर्णत्वास आलेल्या सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,उपमहापौर सरस्वती शेंडगे,खासदार ॲड. वंदना चव्हाण,आमदार चंद्रकांत पाटील,आमदार सिद्धार्थ शिरोळे,विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ,नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे,पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी’पुण्याचे हवाई दर्शन’हा माहितीपट  दाखविण्यात आला.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले,राज्यात सर्वात आधी पुण्यात विविध नवनवीन प्रयोग राबविण्यात येतात. पुण्यात उभारण्यात आलेल्या या एव्हिएशन गॅलरीची संकल्पना कौतुकास्पद असून यामुळे लहान मुलांचे गगनभरारीचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी निश्चितच मदत होईल. वाहतूक कोंडीसह पुण्याच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. रिंग रोड,पुणे मेट्रो,विमानतळ,आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आदी कामे लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.  जगभरात फैलावत असणाऱ्या’कोरोना’चा संसर्ग राज्यात व देशात पसरु नये,यासाठी सर्वांनी हस्तांदोलन टाळावे तसेच सामाजिक शिष्टाचार पाळावेत,असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले,महानगरपालिकांनी नागरी सुविधा देण्याबरोबरच ट्रॅफिक पार्कसारख्या नवनवीन गोष्टींचं ज्ञान देणाऱ्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार होणे आवश्यक आहे,असे श्री. पाटील म्हणाले.

यावेळी महापौर श्री. मोहोळ यांनी पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहावे,यासाठी मदत व्हावी,अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे,नगरसेविका यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले. आभार उपमहापौर श्रीमती शेंडगे यांनी मानले.

याठिकाणी जे.आर.डी. टाटा यांचे भित्तिचित्र,विमानांचा इतिहास,उड्डाणामागील विज्ञान आदीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच विमानांच्या प्रतिकृती,  एरोमॉडेलिंग,पॅरामोटरिंग,अवकाश विज्ञान,हेलिकॉप्टर च्या प्रतिकृती,विमानतळ,भारतीय वायु सेना अशा विविध दालनांमध्ये विमाने व हेलिकॉप्टरच्या छोट्या व मोठ्या प्रतिकृती व हवाई दलातील रोजगार संधी बाबतची माहिती देण्यात आली आहे.

गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती येथील गिरीराज हॉस्पिटल आणि जैन सोशल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान, शस्त्रक्रिया व किमोथेरपी शिबीराचे उद्घाटन

बारामती, दि. 8 : कर्करोगासारख्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या गुटखा व त्या अनुषंगिक उत्पादनांवर शासनाने यापूर्वीच बंदी घातली आहे. तथापि, अजूनही अवैध मार्गाने विक्री होताना आढळून येत आहे. अशा अवैध मार्गाने गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर शासन कठोर कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती येथील गिरिराज हॉस्पिटल आणि जैन सोशल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान, शस्त्रक्रिया व किमोथेरपी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद, गिरिराज हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रमेश भोईटे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील तसेच विविध संस्थेचे मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीनुसार जगामध्ये कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा आजार असून या आजारामुळे मोठ्या संख्येने नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत, ही चिंतेची बाब आहे. हवामानबदल,आहारातील बदल तसेच ग्रामीण भागातून शहराकडे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर आदी कारणांमुळे कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. तथापि,  कर्करोग झालेल्या रुग्णांनी घाबरु नये, वेळीच औषधोपचार घ्यावेत, रोज सकस व प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेता आरोग्य या विषयासाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता जागांची संख्या वाढविण्यात आलेल्या आहेत. जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहेत. नागरिकांनी शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य विषयक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थितांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच गिरिराज हॉस्पिटलमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत समाधान व्यक्त करुन डॉ. रमेश भोईटे व त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिगवण रोड नूतन शाखेचे उद्घाटन

बारामती, दि. 8 : बारामती येथील भिगवण रोडवरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिगवण रोड नूतन शाखेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, संचालक मदनराव देवकाते तसेच संचालक मंडळ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात सुमारे २५ हजार पोलिसांची तपासणी

महिला पोलीस कर्मचाऱ्यांची कॅन्सरविषयक नियमित तपासणी

गायनोकॉलॉजिस्ट सोसायटीच्या सहकार्याने करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई, दि 8 : पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेषत: सर्व प्रकारच्या कॅन्सरची तपासणी तसेच चांगल्या आरोग्यासाठी नियमित तपासणी करण्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञांच्या फेडरेशन ऑफ गायनोकॉलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (फॉग्जी) च्या समन्वयाने कार्यक्रम हाती घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधिताना सुचना दिल्या आहेत.

चर्नी रोड येथील पुरंदरे हॉस्पिटल येथे आज या आरोग्य तपासणी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी फॉग्जीचे माजी अध्यक्ष डॉ. सी.एन. पुरंदरे, महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ.जयदीप टांक, सचिव डॉ. माधुरी पटेल, पदाधिकारी डॉ.सुवर्णा खाडिलकर, डॉ.सरिता भालेराव, डॉ. कोमल चव्हाण, डॉ. परीक्षित टांक, डॉ. अनुजा पुरंदरे, डॉ. शेखर पुरंदरे, डॉ. सुजाता दळवी आदींची उपस्थिती होती.

आज जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच फॉग्जीच्या मुंबई, ठाणे, भाईंदर शाखेने मिळून सुमारे २५ हजार  पोलीस कर्मचाऱ्यांची तसेच राज्य राखीव दलातील महिला पोलिसांची कॅन्सरविषयक तपासणी केली.

आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीचा हा उपक्रम राबविण्याची कल्पना फॉग्जीचे विद्यमान अध्यक्ष अल्पेश गांधी यांची असून महाराष्ट्रातील 33 शाखांमधून आज पोलीस महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य विषयक तपासणी आणि कॅन्सरपासून कसा प्रतिबंध करायचा यावर त्यांना मार्गदर्शन असे कार्यक्रम घेण्यात आले अशी माहिती महाराष्ट्राच्या संघटक डॉ गिरीजा वाघ यांनी दिली. फॉग्जीच्या देशभरातील 300 सदस्य संस्थापैकी 230 संस्थानी त्यांच्या भागात सदर शिबिरे विनामुल्य आयोजित केली होती.

महिलांमधील स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत असून गर्भाशयाचा तसेच इतर प्रकारचे कर्करोग वाढत आहेत. पोलीस दलातील महिलांना आपले कर्तव्य बजावताना आरोग्याची काळजी घेता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी खास अशा प्रकारे नियमित तपासणी करण्याचा उपक्रम राज्य शासन फॉग्जीच्या सहकार्याने करू शकते का ते पाहण्याच्या सुचना देऊन या उपक्रमास मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले.

हा उपक्रम राबवून पोलिसांच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना आरोग्य सेवा आणि सल्ला देण्याचे काम फॉग्जीने केले आणि यामध्ये पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंह तसेच राज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले याबद्धल मुख्यमंत्र्यांनी त्यांना देखील धन्यवाद दिले तसेच फॉग्जीचे अध्यक्ष अल्पेश गांधी, डॉ गिरीजा वाघ आणि सर्व डॉक्टर्सचे कौतुकही केले.

राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही

कोरोनाबाबत तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने २५८ जणांना घरी सोडले -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. ८ : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या  निरीक्षणाखाली १५ जण असून २५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप एकही संशयित रुग्ण आढळून आला नसून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९०४ विमानांमधील  १ लाख ९ हजार ११८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात पुणे व नागपूर विमानतळावर देखील स्क्रिनिंग सुरू झाले आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ५६० प्रवासी आले असून ३०५ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

दिनांक १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत २७३ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २५८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. इतर १५ जणांचे अहवाल उद्या प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या २७३ प्रवाशांपैकी २५८ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या  १३ जण मुंबईत तर २ पुणे येथे भरती आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुढील सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे –

o वुहान (चीन ) मधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.

o इतर  बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्याची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते.

o बाधित भागातून येणा-या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे.

o  या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते.

o याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सुचित करण्यात आले आहे.

o या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.

राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४  टोल फ्री  क्रमांक १०४ संपर्क करण्याचे आवाहन

अजय जाधव..८.३.२०२०

पोलीस दलातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रमाण 30 टक्क्यावर नेण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई पोलीस दलाने काढला महिला सुरक्षा मार्च

मुंबई, दि. 8 : राज्यातील पोलीस दलामध्ये महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रमाण सध्याच्या 15 टक्क्याहून 30 टक्क्यापर्यंत नेण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील राहील, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत महिला सुरक्षा पदयात्रा (मार्च) काढण्यात आली.

मुंबई पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शाळांच्या विद्यार्थीनी, आरएसपीच्या विद्यार्थीनी, विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी झाले. एनसीपीए येथे या पदयात्रेच्या शुभारंभप्रसंगी गृहमंत्री बोलत होते. याप्रसंगी मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह, गृहमंत्री श्री. देशमुख यांच्या पत्नी श्रीमती आरती देशमुख यांच्यासह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन श्री. देशमुख म्हणाले, आज महिलांच्या गौरवाचा दिवस आहे. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या त्या सक्षमतेने सांभाळत आहेत. घर आणि कुटुंब सांभाळून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला आदर्शवत काम करत आहेत.

राज्याच्या पोलीस दलात सुमारे सव्वादोन लाख अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यापैकी सुमारे 28 हजार म्हणजेच 15 टक्क्याच्या आसपास महिला आहेत. सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्या उत्कृष्ट काम बजावत आहेत. महिला पोलिसांचे प्रमाणे वाढवून 30 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी शासनाचा प्रयत्न राहील.

ते पुढे म्हणाले, समाजात घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. राज्य शासन या बाबतीत अत्यंत संवेदनशील असून अशा दुर्दैवी घटनांना पायबंद घालण्यासाठी नवीन कायदा करत आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलिसांकडून संवेदनशीलरित्या हाताळली जातात. मात्र तपासामध्ये अधिक गतिमानता तसेच लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी विशेष तरतूद या कायद्यात करण्यात येणार आहे.

या पदयात्रेत मरीन ड्राईव्हच्या पदपथावरुन स्वत: गृहमंत्री श्री. देशमुख हे सपत्नीक सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह सहभागी झाली. मरीन ड्राईव्हला फेरफटका मारण्यासाठी आलेले मुंबईकर तसेच पर्यटकांनी कौतुकाने रॅलीची मोबाईल कॅमेऱ्यातून छायाचित्रे काढली. कौतुकाने गृहमंत्र्यांसोबत सेल्फी काढण्याची काहींची इच्छाही यावेळी पूर्ण झाली. पदयात्रेचा समारोप सुंदरमहल जंक्शन जवळ झाला.

पोलीस बँडची धून, घोडेस्वार (माऊंटेड) पोलीसांचा डौल यामुळे ही पदयात्रा प्रेक्षणीय ठरली. शेवटी गृहमंत्र्यांनी महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थीनी, आरएसपीचे विद्यार्थी- विद्यार्थिनींकडे जाऊन आस्थेने विचारपूस करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या आयोजनात सहपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, संतोष रस्तोगी, मधुकर पांडे, राजवर्धन, अतिरिक्त पोलीस आयुक्त निशीत मिश्रा, एस. जयकुमार, पोलीस उपायुक्त एन. अंबिका, सुनिता साळुंखे, संग्रामसिंह निशानदार, रश्मी करंदीकर आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये मुंबई पोलीस दलातील महिला सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी आदींनी सहभाग घेतला.

जागतिक महिला दिनानिमित आयोजित ‘महिला कला महोत्सव-२०२०’ चा शुभारंभ

मुंबई, दि. ८ – पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘महिला कला महोत्सव – २०२०’ चा आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार  शुभारंभ झाला.

या शुभारंभ कार्यक्रमास अभिनेत्री मीना नाईक आणि डॉ. निशिगंधा वाड, नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या हर्षिनी कान्हेकर, प्रकल्प संचालक बिभिषण चवरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या ‘महिला कला महोत्सव- २०२०’ मध्ये दि, १२ मार्चपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शास्त्रीय संगीत, अभिवाचन, भजन, शास्त्रीय नृत्य, नाटक, कविता वाचन, गायन, स्टॅंड अप कॉमेडी, महिलांचे सामूहिक सितार वादन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

००००००

वर्षा फडके, विभागीय संपर्क अधिकारी, 8 मार्च 2020.

जागतिक महिला दिनी गृहमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती आरती देशमुख यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी साधला संवाद

मुंबई, दि. 8 : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी श्रीमती आरती देशमुख यांनी आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी तसेच महिला पोलिसांशी संवाद साधून आस्थेने विचारपूस केली. साक्षात गृहमंत्र्यांच्या पत्नीच विचारपूस करत आहेत या आश्चर्याच्या धक्क्यातून सावरत या महिलांनी भरभरुन बोलत श्रीमती देशमुख यांचे आभार मानले.

वरळी येथील आयपीएस भोजनालयात (मेस) हा हृदय संवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस उपायुक्त श्रीमती सुनीता ठाकरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अखंड कार्यरत राहणारे पोलीस दल राज्याचा अभिमान आहे, असे सांगून श्रीमती देशमुख म्हणाल्या, पोलीस दलातील महिला अधिकारी- कर्मचारी तसेच पुरुष पोलीस त्यांच्या कुटुंबियांच्याही काही समस्या असू शकतात त्या जाणून घेणे महत्त्वाचे वाटले. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना सांगून पोलिसांच्या पत्नींना तसेच महिला पोलिसांना एकत्र बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्याचे ठरविले.

यावेळी उपस्थित पोलीस पत्नींनी पोलीस वसाहतीतील निवासस्थानांच्या समस्यांसह विविध समस्या त्यांच्याकडे मांडल्या. त्या गृहमंत्र्यांकडे निश्चितपणे पोहोचवेन, असे आश्वासन श्रीमती देशमुख यांनी त्यांना दिले.

‘तनिष्का’ गारमेंट युनिटचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा नियोजन समितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम

मुंबई, दि. ७ :महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय मुंबई अंतर्गत तनिष्का लोकसंचालित साधन केंद्र, धारावी येथे जिल्हा नियोजन समिती यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून सुरू करण्यात आलेल्या तनिष्का गारमेंट युनिट व तेजस्विनी फॅशनचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे उपस्थित होत्या.

तनिष्का लोकसंचालित साधन केंद्र

मुंबईमध्ये धारावी हे गारमेंट युनिटचे हब म्हणून प्रसिद्ध आहे . त्या संकल्पनेला अनुसरून मंत्री प्रा. गायकवाड यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियोजन समिती यांच्याकडे नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गारमेंट युनिटचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासाठी एकूण २० लाख ५० हजार एवढ्या रकमेची मागणी करण्यात आली होती. त्यातील १५ लाख १० हजार एवढा निधी जिल्हा नियोजन समितीकडून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला.

कापडी पिशव्या मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी स्वतंत्र युनिटची स्थापना करण्यात येत आहे. युनिटसाठी शिलाई मशीन, कापड कटिंग मशीन, ओवर लॉक मशीन घेण्यात आली आहेत . हे युनिट २५ महिला एकत्र येऊन सुरू करण्यात आले आहे. यासाठी त्यांचे बँकेत खाते सुरु करण्यात आले आहे. त्या युनिटमधील सर्व महिलांकडे कपडा कटिंग, शिलाई व छपाईची सर्वस्वी जबाबदारी असेल . तसेच प्रामुख्याने जागेचे भाडे,  वीज बिल व इतर देखभाल असे एकूण २५ हजार रुपये इतकी अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे . ह्या महिलांमध्ये मार्केटिंग, पॅकिंग, लेबलिंग, टेलरिंग असे विभाग तयार करण्यात आले असून त्यांच्यावर त्यांची सर्वस्वी जबाबदारी देण्यात आली आहे . मुंबई जिल्ह्यामध्ये या युनिटच्या माध्यमातून गरजू महिलांना सातत्यपूर्वक व्यवसाय मिळेल. तसेच महिलांना प्रतिमहा पाच ते सहा हजार इतके उत्पन्न मिळेल. तनिष्का गारमेंट युनिटमार्फत CMRC ला शाश्वत असा उपक्रम सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

ताज्या बातम्या

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा

0
मुंबई, दि.5 :- चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीपासून इंदू मिल येथे निर्माण होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या...

श्री जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्त्वाची - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पर्यावरण दिनी वृक्षारोपण मोहिमेतून मंदिर व परिसर विकास आराखडा अंमलबजावणीस...

ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल – मुख्यमंत्री...

0
ठाणे,दि.05 (जिमाका):- ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि...

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि.5 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून अण्णासाहेब मगर स्टेडियम व सिटी सेंटर भवन हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश...

आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर

0
मुंबई, दि. ५ : आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व खरी माहिती पोहोचणे अधिक गरजेचे असते. यासाठी आपत्ती काळात घडणाऱ्या सर्व घटना, आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याची...