रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 1661

मुंबई उपनगरात फेब्रुवारीमध्ये विविध ठिकाणी रोजगार मेळावे; उद्या शनिवारी गोरेगाव येथे आयोजन

मुंबई, दि. ३ : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने मुंबई उपनगरांमध्ये फेब्रुवारी महिन्यात विविध ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्यांचे उद्घाटन होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. उद्या शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी शहीद स्मृती क्रींडागण (व्हीनर्स जॉगर्स पार्क), पाटकर कॉलेजजवळ, उन्नत नगर, एस. व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम) येथे मेळावा होणार आहे. या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून नोकरी इच्छूक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

इयत्ता 10 वी, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर, पदविकाधारक अशा विविध नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.

11 फेब्रुवारी रोजी सेंट फ्रान्सिस आयटीआय माऊंट पोनसूर, एस.व्ही.रोड, हिरालाल भगवती हॉस्पिटलजवळ, बोरिवली (पश्चिम) येथे तर 18 फेब्रुवारी रोजी ऑक्सफर्ड हायस्कूल, टँक रोड, भांडूप (पश्चिम) येथे हे मेळावे होणार आहेत. या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्र.वा. खंडारे यांनी केले आहे.

००००

इरशाद बागवान/विसंअ

तळमळीतूनच होते साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा; वर्धा येथील लाइट ॲण्ड साऊंड शोला मान्यता

वर्धा, दि. ३ : जगण्याचे बळ देणारे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेते असतात. जगण्याच्या तळमळीतून साहित्य आणि राजकीय नेतृत्व निर्माण होते. समाजाला दिशा देणाऱ्या या दोन्हींचे उगमस्थान साहित्यच आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा व सूचनांचा राज्य शासन कायम आदर करीत आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त येथील आचार्य विनोबा भावे सभा मंडपात प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर आयोजित या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष, माजी खासदार दत्ता मेघे, साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष तथा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे. हे दोन्ही महान नेते एक उत्तम लेखक होते. या प्रभावळीत लोकमान्य टिळक, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आदी राजकीय नेते हे उत्तम लेखक होते. लोकसेवेचे व्रत घेऊन या सर्व नेत्यांनी साहित्यातूनच आपल्या सामाजिक व राजकीय कार्याची मोट बांधल्याचे मुख्यमंत्री  श्री. शिंदे म्हणाले. राजकीय नेतृत्वाचे उगमस्थान साहित्य असल्याचे यातून अधोरेखित होते, त्यामुळे लोकसेवेच्या व्रताला बळ देण्यासाठी साहित्यिकांकडून राज्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावे, अशा भावना त्यांनी व्यक्त केली.

मराठी साहित्य संमेलन हे सुदृढ सांस्कृतिक लोकशाहीचे विशाल रूप

मराठी भाषा ही चमत्कार घडविणारी आहे. संत साहित्य आणि साहित्याच्या विविध प्रवाहांनी या भाषेला समृद्ध केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचा उत्सव साजरा होतो. हे संमेलन म्हणजे सुदृढ सांस्कृतिक लोकशाहीचे विशाल रूप असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी काढले. मराठी भाषा संमेलनाची शतकाकडे होत असलेली वाटचाल ही गौरवाची बाब आहे. लक्षावधी सारस्वत या संमेलनासाठी महाराष्ट्र व देशातून दरवर्षी एकत्र येतात ही ओढ अद्भूत आहे. राज्याच्या ग्रामीण भागातून उत्तम लेखक व सकस साहित्य निर्माण होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शासकीय पातळीहूनही मराठी बोलीभाषेच्या संवर्धनासाठी कार्य करण्यात येत असल्याचे सांगत मराठी साहित्याच्या समृद्धीसाठी राज्य शासन सदैव पुढाकार घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठी भाषेची सेवा करणाऱ्या महाराष्ट्राबाहेरील संस्थांना संमेलनासाठी तसेच वारकरी संमेलनासाठी राज्य शासनाने प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरी जीवनाबरोबरच ग्रामीण भागातील बदलांची साहित्यिकांना नोंद घेण्याचे आवाहन करतांना समृद्धी महामार्गाचा उल्लेख केला. या महामार्गासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण व नागरी जीवनावर झालेल्या सकारात्मक बदलांचे प्रतिबिंब साहित्यात उमटावे, देश-विदेशातील विकासात्मक व प्रेरणादायी साहित्य मराठी भाषेत अनुवादित व्हावे, शासन यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर असल्याचे त्यांनी  सांगितले.

संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना राज्य अतिथींचा (स्टेट गेस्ट) दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. मराठी साहित्य मंडळाने राज्य शासनाकडे या संदर्भात मागणी केली होती, ती मागणी मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लाईट, साऊंड ॲन्ड लेझर शोची मागणी मान्य

वर्धा येथील साहित्य संमेलनात शहराच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाला मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सेवाग्राम मार्गावरील चरखा भवन येथे महात्मा गांधी  आणि विनोबा भावे यांच्या मोठ्या प्रतिमा लावलेल्या ठिकाणी ‘लाईट, साऊंड ॲण्ड लेझर शो’ राज्य शासनामार्फत सुरु करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात वर्ध्याच्या वैभवात भर घालण्यासाठी सौंदर्यीकरणाची ही मागणी मान्य करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, साहित्यिक हे समाजाची ज्योत आहे, ही ज्योत तेवत ठेवण्यासाठी राज्य शासन सदैव पाठिशी आहे. मराठी साहित्याच्या विकासासाठी राज्य शासनाची प्रतिबद्धता असल्याचे सांगत त्यांनी साहित्य क्षेत्रात राज्य शासन हस्तक्षेप करणार नाही. सातारा जिल्ह्यातील वाई येथे मराठी विश्वकोश भवन आणि मुंबईत मराठी भाषा भवन बांधण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देण्यात येणारे अनुदान ५० लाखाहून वाढवून २ कोटी करण्यात आले. तसेच, विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठीचे अनुदान १० कोटींहून वाढवून १५ कोटी केल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.घे, पद्मश्री डॉ. तिवारी, डॉ. विश्वास, न्या.चपळगावकर, श्री.सासणे, श्री. दाते आदींची समयोचित भाषणे झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष न्या.चपळगावकर आणि पूर्वाध्यक्ष श्री. सासणे यांचा सत्कार करण्यात आला. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमिताने प्रकाशित करण्यात आलेल्या  ‘दौत लेखनी’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले.

यावेळी आयोजन समितीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या वर्धा गौरव गीत, कविवर्य सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य…’ हे मराठी अभिमान गीत आणि संमेलन गीताचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी, तर आभार प्रदर्शन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहंदळे यांनी केले.

०००००

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात धीरज लिंगाडे सर्वाधिक मते मिळवून विजयी

अमरावती, दि. 3 : अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीत सर्वाधिक 46 हजार 344 मते मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे हे विजयी उमेदवार ठरले. निवडणूक निरीक्षक पंकज कुमार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत श्री. लिंगाडे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी पद्मजा, मुलगा सोहम आणि वेदांत उपस्थित होते.

            निवडणूकीत झालेल्या 1 लाख 2 हजार 587 मतदानापैकी  93 हजार 852 एवढी मते वैध व 8 हजार 735 मते अवैध ठरली. अवैध ठरलेल्या 8 हजार 735 मतांचे फेरअवलोकन करण्याची मागणी उमेदवार डॉ. पाटील यांच्या प्रतिनिधींनी केली. त्यानुसार या मतांची फेरमोजणी करण्यात आली. यापैकी 348 मते वैध मानण्यात आली. त्यानुसार एकूण वैध मते 94 हजार 200 ही संख्या निश्चित होऊन 8 हजार 387 मते अवैध ठरली. विजयासाठी 47 हजार 101 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर प्रथम पसंतीक्रमाच्या गणनेत श्री. लिंगाडे यांना सर्वाधिक 43 हजार 517 मते मिळाली. डॉ. पाटील यांना 41 हजार 171 मते मिळाली. अनिल ओंकार अमलकार (4 हजार 188), डॉ. गौरव आर. गवई (241), अनिल वकटूजी ठवरे (26), अनंतराव राघवजी चौधरी (79), अरुण रामराव सरनाईक (1 हजार 542), ॲड. आनंद रवींद्र राठोड (383), धनराज किसनराव शेंडे (23), ॲड. धनंजय मोहनराव तोटे (69), निलेश दीपकपंत पवार (राजे) (14), पाटील उपेंद्र बाबाराव (66), पाटील झांबरे शरद प्रभाकर (421), प्रजापती श्याम जनमोहन (208), डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी (1 हजार 695), प्रवीण दिगांबर बोंद्रे (45), भारती दाभाडे (216), माधुरी अरुणराव डाहारे (93), रणवीर संदेश गौतमराव (43), लक्ष्मीकांत नारायण तडसे (14), विकेश गोकुलराव गवाले (51), सुहास विठ्ठलराव ठाकरे (25), संदीप बाबुलाल मेश्राम (70) प्रथम पसंतीक्रमाच्या गणनेनंतरही कोटा पूर्ण होत नसल्याने बाद फेरी सुरू होऊन त्या फे-यांत सर्वात कमी मते मिळाल्याने बाद होणा-या उमेदवारांची दुस-या पसंतीक्रमाच्या मतांची गणना झाली.

या गणनेदरम्यान निलेश दिपकपंत पवार (राजे), लक्ष्मीकांत नारायण तडसे, धनराज किसनराव शेंडे, सुहास विठ्ठलराव ठाकरे, अनिल वकटुजी ठवरे, रणवीर संदेश गौतमराव, प्रविण डिगांबर बोंद्रे, विकेश गोकुलराव गवाले, पाटील उपेंद्र बाबाराव, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, संदीप बाबुलाल मेश्राम, अनंतराव राघवजी चौधरी, माधुरी अरुणराव डाहारे, प्रजापती श्याम जगमोहन, डॉ. गौरव आर गवई, श्रीमती भारती ख. दाभाडे, ॲड. आनंद रविंद्र राठोड, शरद प्रभाकर झांबरे पाटील, अरूण सरनाईक, डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी, अनिल ओंकार अमलकार हे उमेदवार त्यांच्या कमी मतसंख्येनुसार क्रमाक्रमाने बाद ठरविण्यात आले.

त्यानंतर उर्वरित दोन उमेदवारामध्ये प्रथम क्रमांकाची सर्वाधिक  46 हजार 344 मते श्री. लिंगाडे यांना व दुस-या क्रमांकाची  42 हजार 962 मते डॉ. पाटील यांना मिळाली. त्यानुसार श्री. लिंगाडे यांना 3 हजार 382 ही अधिकची मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक मतमोजणीला बडनेरा रस्त्यावरील नेमाणी गोडाऊन येथे काल  दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरू झाली. तब्बल 34 तास ही प्रक्रिया चालली. निवडणुकीत 265 टपाली मतपत्रिकांपैकी प्रतिज्ञापत्र नसणे, सही, साक्षांकन, सीलबंद पाकिटात नसणे आदींमुळे 73 मतपत्रिका रद्द करण्यात आल्या.

अन्य उमेदवारांची मते खालीलप्रमाणे –

निलेश दीपकपंत पवार (राजे) (14), लक्ष्मीकांत नारायण तडसे (14), धनराज किसनराव शेंडे (23), सुहास विठ्ठलराव ठाकरे (25), अनिल वकटूजी ठवरे (26), रणवीर संदेश गौतमराव (44), प्रवीण दिगांबर बोंद्रे (46), विकेश गोकुलराव गवाले (52), पाटील उपेंद्र बाबाराव (70), ॲड. धनंजय मोहनराव तोटे (73), संदीप बाबुलाल मेश्राम (76), अनंतराव राघवजी चौधरी (80), माधुरी अरुणराव डाहारे (108), प्रजापती श्याम जनमोहन (212), डॉ. गौरव आर. गवई (246), भारती ख दाभाडे (252), ॲड. आनंद रवींद्र राठोड (402), पाटील झांबरे शरद प्रभाकर (462), अरुण रामराव सरनाईक (1596), डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी (1774), अनिल ओंकार अमलकार (4338).

 मतमोजणीचे कार्य करत असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथील मंडल अधिकारी एस. सी. खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  दिवंगत खडसे यांना निवडणूक प्रशासन व अधिकारी- कर्मचा-यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

नाशिक पदवीधर मतदारसंघ; सत्यजित तांबे  68 हजार 999 मतांनी विजयी

नाशिक, दि. 3 फेब्रुवारी, 2023(विमाका वृत्तसेवा) – नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीची सर्वाधिक 68 हजार 999 मत मिळवून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे  यांनी श्री. तांबे यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.

विभागीय आयुक्त श्री गमे यांनी पहिल्या पसंतीच्या 1 लाख 29  हजार 615 मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्याची घोषणा करत उमेदवारांना प्राप्त मतांची माहिती  दिली. विजयी  उमेदवारासाठी 58 हजार 310  मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. सत्यजित तांबे यांनी निश्चित कोट्यापेक्षा 10 हजार 689 मते अधिक प्राप्त केली.त्यांना 68 हजार 999 मत प्राप्‍त झाली आहेत. एकूण मतमोजणी नतंर  1 लाख 16 हजार 618 मत वैध ठरली तर 12 हजार 997 मत अवैध ठरल्याचे त्यांनी सांगितले.

मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने श्री गमे यांनी सत्यजित तांबे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.

यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, जिल्हाधिकारी नाशिक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण् डी., जिल्हाधिकारी अहमदनगर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी  पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.

वैध ठरलेल्या मतांपैकी एकूण 15 उमेदवारांना प्राप्त पहिल्या पसंतीचे मते पुढील प्रमाणे.

=========================

➡️ शुभांगी भास्कर पाटील: 39534

➡️ रतन कचरु बनसोडे :2645

➡️ सुरेश भिमराव पवार :920

➡️ अनिल शांताराम तेजा :96

➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर :246

➡️ अविनाश महादू माळी :1845

➡️ इरफान मो इसहाक :75

➡️   ईश्वर उखा पाटील :222

➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे :710

➡️ ॲड. जुबेर नासिर शेख :366

➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले :271

➡️ नितीन नारायण सरोदे :267

➡️ पोपट सिताराम बनकर :84

➡️ सुभाष निवृत्ती चिंधे :151

➡️ संजय एकनाथ माळी :187

खासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली, 03 : राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.

परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक, अमरज्योत कौर अरोरा यांनी डॉ बोंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे करण्यात येणारे कार्य, प्रका‍शित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणारा समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. डॉ बोंडे यांना यावेळी “लोकराज्य” मासिकाची प्रत भेट करण्यात आली. त्‍यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रत्येक क्षेत्रात नवे करण्याची उमेद बाळगा- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

            सांगली दि. 3 (जि.मा.का.) :  आजची पिढी ही अधिक चिकित्सक असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात नवे करण्याची उमेद बाळगावी, असा सल्ला पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना दिला.

            जिल्हा परिषद शिक्षण विभाग व  विज्ञान व गणित अध्यापक संघ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कुपवाड एमआयडीसी येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक येथे आयोजित ५० व्या सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण  पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतिनाथ कांते, लठ्ठे पॉलिटेक्निकचे प्राचार्य आण्णासाहेब गाजी, सुहास पाटील, भालचंद्र पाटील, सुशांत खाडे यांच्यासह मान्यवर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची वाढावी, त्यांच्यात संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी शालेय, तालुका व जिल्हा स्तरावर भरवण्यात येणारी विज्ञान प्रदर्शने प्रेरणादायी आहेत. लठ्ठे पॉलीटेक्निक येथे आयोजित करण्यात आलेल्या ५० व्या सांगली जिल्हा विज्ञान प्रदर्शनातून देशासाठी भावी संशोधक व वैज्ञानिक निर्माण होतील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. खाडे यांनी व्यक्त केला. मुलांमध्ये लहान वयापासूनच वैज्ञानिक ज्ञानाबाबत रूची निर्माण करण्यासाठी लठ्ठे पॉलिटेक्निक येथे सुंदर विज्ञान प्रदर्शन भरवले याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. तसेच विज्ञान प्रदर्शनासाठी अनुदान बंद केले नसून याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने पाठवावा त्याचा पाठपुरावा केला जाईल असे ते म्हणाले.

            ५० वे विज्ञान प्रदर्शन लठ्ठे पॉलिटेक्निक येथे आयोजित करण्याचा बहुमान दिल्याबदद्ल लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतिनाथ कांते यांनी शिक्षण विभागाचे आभार मानले. यापुढेही शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी मदत करेल, असा विश्वास त्यांनी दिला.

            माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. लोंढे यांनी प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनाची माहिती दिली. मुलांमध्ये वैज्ञानिक चिकित्सा व संशोधन वृत्ती वाढावी यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त ठरतात. जिल्ह्यात 758 हायस्कूल असून यामध्ये दोन लाखाच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना बाल वयातच विज्ञानाची गोडी लागून त्यांच्यात संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी सायन्स क्लबची स्थापना करण्यात येणार असून जिल्ह्यातील शालेय विद्यार्थांसाठी  सायन्स सेंटर  व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            विज्ञान शिक्षक दादासाहेब सरगर यांनी विज्ञान प्रदर्शनासंदर्भात माहिती देऊन प्रत्येक गटात प्रथम क्रमांक आलेल्या विज्ञान उपक्रमाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

            50 व्या सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी कृती या गटात इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूरच्या विश्वप्रतापसिंग रामराजे माने यास प्रथम क्रमांक, शांतिनिकेतन कन्या शाळा सांगली येथील वैष्णवी आनंदा मोरे द्वितीय,  येलूर हायस्कूल येलूरची वेदिका रत्नाकर जाधव तृतीय आणि कमलाबाई रामनामे कन्या विद्यालय इस्लामपूरची मधुरा मनोज कोरडे व पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हायस्कूल पलूसचे श्रेयस जगन्नाथ जाधव यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे.

            प्राथमिक शिक्षक कृती गटात जिल्हा परिषद शाळा, आराळा येथील  शिक्षक मोहन राजाराम पवार प्रथम क्रमांक, जिल्हा परिषद शाळा कारजनगे येथील शिक्षक श्रीकांत शंकर सोनार द्वितीय, जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीनगर करगणी येथील शिक्षक दिपाली आनंद देवकर तृतीय आणि जिल्हा परिषद शाळा नं. २,  कुची येथील शिक्षक अमोल किसन हंकारे यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे.

            माध्यमिक विद्यार्थी कृती गटात जिजामाता विद्यालय वाळवा येथील श्रुती गजानन माळी प्रथम क्रमांक, एस. व्ही. एम. व्ही, कोळेगरी येथील प्रतीक्षा करबसप्पा हिरेमठ द्वितीय क्रमांक, शांतिनिकेतन विद्यामंदिर सांगली येथील आरती उमेश चव्हाण तृतीय क्रमांक आणि नचिकेता गौरवकुंज माध्यमिक विद्यालयाची ज्ञानेश्वरी संतोष माने व आझाद विद्यालय कासेगाव येथील ऋषिकेश राजेंद्र किरवे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.

            माध्यमिक शिक्षक कृती गटात न्यू इंग्लिश स्कूल कोंगनोळी येथील शिक्षक संजयकुमार लालासो मगर प्रथम क्रमांक, समाज विकास विद्यालय, सांगाव येथील शिक्षक मंगेश विठ्ठल तिके द्वितीय क्रमांक, प्रतिनिधी हायस्कूल कुंडल येथील शिक्षक गीतांजली योगेश लुब्बाळ तृतीय क्रमांक आणि जवाहर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मिरज येथील शिक्षक परवीन मोहम्मद आरिफ बागवान यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे.

            प्रयोगशाळा परिचर कृती गटात सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथील अशोक गणपतराव पाटील प्रथम क्रमांक, विटा हायस्कूल विटा येथील मुलाणी परवेज मौलाअली द्वितीय क्रमांक,  बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल कवठेमहांकाळ येथील शहाजी पतंगराव दळवी तृतीय क्रमांक आणि समाज विकास विद्यालय सांगाव येथील आर. एच. कोरे यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले आहे.

            विज्ञान प्रदर्शनातील प्रश्नमंजुषा या गटात नांद्रे विद्यालय व कला वाणिज्य विद्यालय  नांद्रे येथील श्रद्धा राजेंद्र तांदळे, श्रावणी आप्पासो यादव, समीक्षा संदीप पवार यांना प्रथम क्रमांक, सेकंडरी हायस्कूल व जुनिअर कॉलेज भिलवडी येथील सृष्टी दादा चौगुले, सानिका शब्बीर इनामदार, सुखदा धनंजय भोळे यांना द्वितीय क्रमांक आणि महात्मा गांधी विद्यालय विटा येथील साद रफिक तांबोळी, अथर्व दीपक मुतालिक, विराज सूर्यकांत कदम यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे.

            दिव्यांग विद्यार्थी कृती गटात भीमरावशेठ जगन्नाथ चव्हाण-देशमुख विद्यालय वासुंबे ता. खानापूर येथील विराज संजय पवार यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

राज्यपालांच्या हस्ते गुणवंतांना ‘गौरव श्री सन्मान पुरस्कार’ प्रदान

मुंबई, दि. ३ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.३) उद्योग, व्यवसाय, कला व समाजकार्य या विषयामध्ये कार्य करणाऱ्या ४० गुणवंत व्यक्तींना राजभवन येथे ‘गौरव श्री सन्मान २०२३’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मैत्री पीस फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्याला फाऊंडेशनचे अध्यक्ष बौद्ध भिक्खू सुरजित बरुआ, संगीतकार अनू मलिक व बुद्धांजली आयुर्वेदचे कैलाश मासूम प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी संगीतकार अनू मलिक, अभिनेते राजपाल यादव, उद्योजक अजय हरिनाथ सिंह, डॉ.प्रसन्न पाटणकर, सम्बुद्ध धर, सचिन साळुंके, दीपक बरगे, सुनील निखार, परवेझ लकडावाला आदींना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

००००

Governor presents Gaurav Shri Samman 2023 to 40 achievers

Mumbai, 3rd Feb : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Gaurav Shri Samman 2023’ to 40 outstanding achievers from various fields at Raj Bhavan Mumbai. The Samman ceremony was organised by Maitry Peace Foundation, a social service organisation.

President of the Foundation and Buddhist Monk Surjit Barua, Musician Anu Malik, Buddhanjali Ayurveda’s Kailash Masoom and others were present.

The ‘Gaurav Shri Samman 2023’ were presented to Anu Malik, actor Rajpal Yadav, businessman Ajay Harinath Singh, Dr Prasanna Patankar, Sambuddha Dhar, Sachin Salunke, Deepak Barge and Sunil Nikhar, Parvez Lakdawala (IUV Foundation) among others.

0000

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. ३ : क्रीडा विभागामार्फत प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी  अर्ज सादर करण्यास २० फेब्रुवारी, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या क्रीडा महर्षींचा गौरव करण्यासाठी शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

संचालनालयाने अर्ज करण्यासाठी पूर्वी ३० जानेवारीपर्यंत मुदत दिलेली होती. तथापि, विविध क्रीडा संघटना खेळांडूंच्या विनंतीनुसार आता २० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून २० फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेपर्यंत पुरस्कारासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत.

साहसी क्रीडा पुरस्कारासह सर्व क्रीडा पुरस्कारांसाठी कामगिरीचा कालावधी त्या पुरस्कार वर्षातील ३० जून रोजी संपण्याऱ्या वर्षासह विचारात घेण्यात येईल. पुरस्कार अर्जाचे नमुने क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याबाबत क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

000000

राजू धोत्रे/विसंअ/

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

मुंबई, दि. 3 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि फुटबॉल क्लब बायर्न यांच्यातील करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन निवडलेल्या खेळाडूंना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी  राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या “एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

फुटबॉल क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल  स्पर्धा आयोजित करून, त्यातून निवडलेल्या २० खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे, तेथील निवास, प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांचा लोगो वापरण्याची मुभा दिलेली आहे. तसेच एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडककरिता टी. व्ही ९ मराठी हे मीडिया पार्टनर आहेत.

राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने करारनामा झाला आहे. बायर्न म्युनिक हा जागतिक पातळीवर लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे.

राज्यातून २० खेळाडू जर्मनी येथे या प्रशिक्षणासाठी जाण्याकरीता, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत “एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक” स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. ही स्पर्धा १४ वर्षाखालील मुलांच्या गटात होईल. याकरीता जिल्ह्यातील १४ वर्षाखालील मुलांचे संघ जास्तीत जास्त सहभागी होतील यासाठी शाळांना अवगत करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत भाग घेण्याकरीता dsomumbaisub2020@gmail.com वर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर (शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजी नगर समोर आकुर्ली रोड, कांदिवली पू.) संपर्क क्रमांक – ०२२/२८८७११०५ येथे आपले अर्ज दि.०६/०२/२०२३ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत पाठवावेत. शैक्षणिक संस्था, शाळा, फुटबॉल संघटना व फुटबॉल क्लब यांनी या स्पर्धेत अधिकाधिक संघ सहभागी करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

परकीय गुंतवणुकीसाठी उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून परकीय गुंतवणुकीसाठी उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जर्मनीच्या शिष्टमंडळासमवेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी त्यांनी जर्मनीच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.

श्री. सामंत म्हणाले की, जर्मनी आणि भारताचे द्विपक्षीय संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण असे राहिलेले आहेत. जर्मनी हा युरोपातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी असणारा देश आहे. भारताचे व्यापारी संबंध असलेल्या जगातील पहिल्या दहा देशांमध्ये जर्मनीचे नाव आहे.

सध्या भारतात १७०० पेक्षा जास्त जर्मन कंपन्या कार्यरत असून यातील ५०% कंपन्या महाराष्ट्रात आहेत. तसेच भारताच्या २१३ कंपन्या जर्मनीमध्ये कार्यरत आहेत. पुणे हे राज्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्रांपैकी एक असून जर्मन कंपन्यांचा प्राधान्यक्रम पुणे शहराला असल्याची माहिती श्री.सामंत यांनी दिली.

श्री.सामंत म्हणाले की, महाराष्ट्र आणि जर्मनीचे संबंध केवळ गुंतवणुकीपुरते मर्यादित नसून इंगोलस्ट्याड आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या दोन शहरांमध्ये ‘सिस्टर सिटी’ भागीदारी करार करण्यात आला आहे. तसेच मुंबई आणि स्टुटगार्ट हे दोन शहरे ट्विन सिटी म्हणून 1968 पासून ओळखली जातात.

भारत ही जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असून महाराष्ट्र हे परकीय गुंतवणूक आकर्षित करणारे अग्रेसर राज्य आहे. कोविडच्या आधी आणि नंतर संपूर्ण परकीय गुंतवणुकीपैकी केवळ जर्मनीचा महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा वाटा 40 ते 50% राहिला असल्याची माहिती श्री.सामंत यांनी दिली.

श्री.सामंत यांनी जर्मन कौन्सिलेट आणि इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे मनापासून आभार मानले.

यावेळी, बाडेन-व्युर्टेंबर्ग स्टेट मिनिस्टर डॉ. फ्लोरियन स्टेगमन, मेंबर ऑफ स्टेट पार्लमेंट टोबियस वोगट, सासचा बिंदर, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, जर्मनीच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी व सर्व संबंधित उपस्थित होते.

जर्मन शिष्टमंडळाचा मराठी पद्धतीने पाहुणचार

जर्मनीचे मंत्री डॉ. फ्लॉरेन स्टॅगमन, वूटनबर्गचे खासदार, महापौर यांच्यासह 30 जणांचे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांचे मुंबईत आगमन झाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. मराठमोळ्या पद्धतीने शाल व फेटे घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

या भेटीत ग्रीन हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सहकार्य करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहेत. या दौऱ्यात काही गुंतवणूक करार होणार आहेत. उद्योग, व्यापार क्षेत्रात जर्मनीचे अनेक वर्षांपासून मैत्रिपूर्ण संबंध आहेत. या दौऱ्याने ते अधिक दृढ होतील.

००००

विसंअ/अर्चना शंभरकर/उद्योग

ताज्या बातम्या

कानडवाडी येथील १० एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील राष्ट्रीय स्मारक विकासासाठी पहिल्या टप्यात ५० कोटींची तरतूद, प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर

0
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, १५० कोटी खर्च अपेक्षित मुंबई , दिनांक 16 :- विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे 'स्टॅच्यू ऑफ...

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

0
मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५...

शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन

0
समाधीस्थळाला भेट कोल्हापूर, दि. १६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी...

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा हा नेतृत्त्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने...