सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 1704

‘कोरोना’ संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे आवाहन

मुंबई, दि. 17 : मुंबई शहरात कोरोना ‍विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने या संदर्भात दिलेल्या सूचना विचारात घेता, मुंबई शहरातील सर्व धर्माच्या सार्वजनिक प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी होणारे सर्व सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम, यात्रा/उत्सव अथवा गर्दी होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम दि. 31 मार्च, 2020 पर्यंत रद्द करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सिद्धीविनायक मंदिर न्यासाने भाविकांप्रती असणारे सामाजिक दायित्व लक्षात घेता पुढील सूचना मिळेपर्यंत ज्याप्रमाणे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच धर्तीवर इतर सर्व सार्वजनिक व धार्मिक आस्थापना यांनी अशा स्वरुपाचा निर्णय तातडीने लागू करावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

000

डॉ.राजू पाटोदकर/वि.सं.अ./17/03/2020

विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिस्थितीनुसार ‘वर्क फ्रॉम होम’ चा निर्णय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई, दि. 17 : राज्यात कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठे, महाविद्यालये दि. 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आपत्कालीन परिस्थिती वगळता प्राध्यापकांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची परवानगी देण्यात आली आहे. याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही परिस्थितीनुसार अशी परवानगी देण्याबाबत शासन निर्णय घेईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

श्री.सामंत म्हणाले, विद्यापीठे, महाविद्यालये बंद असले तरी विद्यापीठाचे कुलगुरु, उपकुलगुरु, कुलसचिव, उपकुलसचिव तसेच महाविद्यालये/तंत्रनिकेतनचे प्राचार्य/संचालक/अधिष्ठाता, यांनी नियमितरित्या कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असते. शैक्षणिक वेळापत्रक, प्रशासकीय परिस्थितीचा अभ्यास करुन, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या सर्व परिस्थितीचा विचार करुन आवश्यकतेनुसार प्राध्यापकांप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ संदर्भात निर्णय तातडीने घेण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/17.3.2020

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांची मुलाखत

मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात रेशीम शेतीतून समृद्धीया विषयावर रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांची मुलाखत दिलखुलासकार्यक्रमात बुधवार, दि. १८ आणि गुरुवार, दि. १९ मार्च रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी ७:२५ ते ७:४०या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

रेशीम उद्योगाचे फायदे, राज्यात रेशीमचे घेतले जाणारे उत्पादन, रेशीमला उपलब्ध होणारी बाजारपेठ, रेशीम शेतीकरिता योजना, रेशीम उद्योगातून मिळणारे परकीय चलन, तुती उद्योगाकरिता प्रशिक्षण केंद्र, तुती शेतीला प्रोत्साहन देण्याकरिता करण्यात येत असलेले प्रयत्न, महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणीसाठी  रेशीम धाग्याचा केला जाणारा वापर आदी विषयांची माहिती श्रीमती बानायत यांनी दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्थेचे दोन वर्षांचे व्यवस्थापन पुरस्कार जाहीर

मुंबई,दि. 17 : राज्याच्या जलनितीनुसार सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असण्यासाठी सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. सहभागी सिंचन यशस्वी होण्यासाठी पाणी वापर संस्थाचे व्यवस्थापन कार्यक्रम असणे व पाणी वापर संस्थांनी स्वबळावर सुदृढ (Self Sustainable) होणे आवश्यक आहे. यास्तव पाणी वापर संस्थांच्या व्यवस्थापनाकरीता महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेचे सन-2017-18 (नववे वर्ष) 2018-19 (दहावे वर्ष) चे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. पुरस्कारार्थी पाणी वापर संस्थांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या पाणी वापर संस्था

2017-18-मोठे प्रकल्प

प्रथम-जानुबाई पाणी वापर संस्था,शिरवली,ता.बारामती,निरा डावा कालवा (भाटघर वीर प्रकल्प),जि.पुणे, द्वितीय-ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्था,ता.बारामती,निरा डावा कालवा (भाटघर वीर प्रकल्प),जि.पुणे, तृतीय-वारेगाव ग्रुप उपसा जलसिंचन सहकारी संस्था,ता.सिन्नर,दारणा प्रकल्प,ता.इगतपूरी,जि.नाशिक.

कोल्हापूर पद्धतीचा बंधारा

प्रथम-पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था,मेहकर. पेनटाकळी मोठा प्रकल्प,ता.मेहकर,ता.बुलढाणा.

साठवण तलाव व लघु प्रकल्प या अंतर्गत नामांकन प्राप्त झाले नाही.

2018-19 मोठे प्रकल्प

प्रथम-केशवराज पाणी वापर संस्था,अन्वी मिर्झापुर,काटेपुर्णा मोठा प्रकल्प,ता.बार्शिटाकळी,जि.अकोला.

मध्यम प्रकल्प

प्रथम-कै.रंगनाथ गोपाळ पाटील पाणी वापर संस्था,वलखेड,ता.दिंडोरी,वाघाड प्रकल्प,जि.नाशिक.

साठवण तलाव व लघु प्रकल्प या अंतर्गत नामांकन प्राप्त झाले नाही.

000

डॉ.राजू पाटोदकर/वि.सं.अ./17/3/2020

मंत्रिमंडळ निर्णय : दि. १७ मार्च २०२०

 कोरोना संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

शासकीय कार्यालये, सार्वजनिक वाहतूक बंद राहणार नाहीत

अनावश्यक गर्दी, प्रवास टाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

  ·      राज्यात कोरोना पॉझिटिव्ह 41 रुग्ण असून एका वृद्ध रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. उर्वरित 40 पैकी 7 रुग्णांमध्ये कमी तीव्रतेची लक्षणे असून एक रुग्ण गंभीर आहे. तर 32 जणांमध्ये लक्षणे आढळलेली नाहीत.

  ·      रुग्णांमध्ये 28 पुरुष असून 13 स्त्रिया आहेत.

  ·      मंत्रालयासह शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार नाहीत. मात्र, परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून याविषयी योग्य तो निर्णय वेळोवेळी घेण्यात येईल.

  ·      सध्या अत्यावश्यक नसलेल्या सेवांना शासनाने मर्यादित स्वरुपात काम करण्यास सांगितले आहे. 

  ·      शहरातील विशेषत: क्रॉफर्ड मार्केट परिसरातील पक्षी व प्राण्यांशी संबंधित दुकाने संसर्गाचा धोका गृहित धरुन बंद करण्यात येतील. मात्र भाजीपाला दुकाने सुरुच राहतील.

  ·      कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन प्रभावी उपाययोजना करीत असून खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होम कार्यपद्धती मान्य करण्यात आली आहे.

  ·      रेल्वे, बसेस ही सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येणार नाही.  मात्र, आवश्यक असेल तेव्हाच नागरिकांनी प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात असून आवश्यकता भासल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल.  

  ·      औषधे,बँका,संस्थांचे व्यवस्थापन प्रमुख आणि आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी देखील संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. कंपन्यांच्या सीएसआर फंडातून औषधे,मास्क,सॅनिटायझर,व्हेन्टीलेटर पुरविणार.

  ·      गरज असल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार.

  ·      कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता गर्दी कमी करणे हा प्रभावी उपाय असून त्यासाठी आवश्यक तेवढाच प्रवास करावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

  ·      खासगी व्यतिरिक्त इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयातून नियमित काम सुरुच राहील. मात्र, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आरोग्याची पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  ·      सध्या परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ आणि बंदरांवर कसून तपासणी सुरु असून विलगीकरणाची व्यवस्था देखील पुरेशी आहे.

  ·      प्रसंगी शहरातील मोठ्या हॉटेल्स मध्ये कमी दरात विलगीकरण सुविधाही देण्यात आलीआहे.

  ·      कोरोनाच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात देखील उपचार करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी.

  ·      सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा-अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश

  ·      राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात

  ·      ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी,

  ·      केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.

—–०—–

अपार्टमेंट्स मालकांना अपिलाचा अधिकार

अपार्टमेंट्स मालकांना देखील अपिल करण्यासंदर्भातील अधिकार देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

अपार्टमेंट्स विषयक महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम,1970 मधील तरतुदींची अंमलबजावणी करतांना, आता  असे आढळून आले आहे की,याअधिनियमामध्येप्रतिज्ञापत्रकरताना, अपार्टमेंट्स मालकांना कोणतेही अधिकार नाहीत. हे अधिकार प्रवर्तककिंवा मालमत्तेचे मालक यांच्याकडे आहेत. त्यामुळे प्रवर्तकयाचा गैरफायदा घेवून त्यांना फायदेशीर ठरतील अशा रितीने प्रतिज्ञापत्रव अपार्टमेंट्स कागदपत्रे तयार करतात.

त्यासाठी शासनाने या अधिनियमामध्ये1970 मध्ये नव्याने कलम१२(अ) चा अंतर्भाव करण्याचा निर्णय घेतला असून प्रतिज्ञापत्र किंवा अपार्टमेंट्स कागदपत्राच्या मजकुरात बहुसंख्य अपार्टमेंट्स मालकांच्या विशेष बैठकीद्वारे सुधारणा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, या अधिनियमातनव्याने कलम १6 (अ) चा अंतर्भाव करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर अधिनियमामधील कोणत्याही तरतुदी किंवा त्याखाली तयार करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाचा भंग झाल्यास अपार्टमेंट्स मालकास, अपार्टमेंट्स मालकांच्या संघटनेस कोणत्याही अपार्टमेंट्स मालकाविरुद्ध किंवा मालमत्तेच्या एकमात्र मालक किंवा सर्व मालकांविरुद्ध निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल.

सदर तक्रारींवर निबंधक, सहकारी संस्था यांनी 30 दिवसांच्या आत निर्णय घेणे त्यांच्यावर बंधनकारक  राहील.निबंधक, सहकारी संस्था यांच्या आदेशाविरुद्ध अपार्टमेंट्स मालक, अपार्टमेंट्स मालकांची संघटना, मालमत्तेचा एकमात्र मालक किंवा सर्व मालक यांना 60 दिवसांच्या आत सहकार न्यायालय यांच्याकडे अपील दाखल करता येईल.  

—–०—–

कल्याण डोंबिवली मनपा हद्दीतून वगळलेल्या

18 गावांची नगर परिषद

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वगळलेल्या 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

वगळण्यात आलेली गावे पुढील प्रमाणे –  घेसर, हेदूटणे, उंब्रोली, भाल, द्धारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उर्वरित 9 गावे पुढील प्रमाणे – आजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा.

कोकण विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या अभिप्रायावरुन वरीलप्रमाणे स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय घेण्यात आला.

—–०—–

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सर्व मुलांना एकसमान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे शासनाचे धोरण असताना काही मोजक्या मुलांसाठीच उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करण्याकरिता संलग्नता देणे योग्य आहे का असा आक्षेप घेण्यात आला. कोणत्याही नवीन अभ्यासक्रमास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे पण तसे करण्यात आले नाही. राज्याची दोन परीक्षा मंडळे असू नयेत असे शालेय शिक्षण विभागाचे मत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील सर्व शाळांसाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार करण्याचे ठरले.

—–०—–

‘महावितरण’च्या ऑनलाईन सेवांचा वापर करण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे आवाहन

मुंबई, दि. १७ : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यशासन तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे कोटेकोरपणे पालन करण्यासोबत वीज ग्राहकांनी वीज बिल भरण्यासाठी तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित  महावितरणच्या उपलब्ध सर्व ऑनलाईन सेवेचा वापर करावा, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे.

वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी सार्वजनिक वाहनातून प्रवास करत महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रावर रांगेत ताटकळत उभे राहून गर्दी करण्यापेक्षा महावितरणच्या आठवड्यातील 7 दिवस 24 तास उपलब्ध ऑनलाईन सेवेचा घरबसल्या वापर करून वीज बिलांचा भरणा केल्यास कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे. नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणे, वीज पुरवठ्याशी संबंधित सुविधेबाबत तक्रार दाखल करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्याने वीज ग्राहकांनी जाणिवपूर्वक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

वीज बिल भरण्यासाठी, नवीन वीज जोडणीसाठी, अर्ज करण्यासाठी, वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांना www.mahadiscom.in  या अधिकृत संकेतस्थळावर, महावितरण मोबाईल ॲपवरून सर्व लघुदाब ग्राहकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकीग, मोबाईल वॉलेट तसेच कॅश कार्डचा वापर करून वीज बिल भरता येते. याशिवाय विविध ऑनलाईन सुविधेबाबत महावितरणच्या संकेतस्थळावरील कंझ्युमर पोर्टल या विभागात ग्राहकांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त महावितरणच्या ग्राहकांना १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५ / १९१२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

००००

डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर/विसंअ/17.3.2020

सॅनिटायजर आणि मास्क ग्राहकांना उपलब्ध करून द्या विनाकारण साठा करू नका – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

मुंबई, दि. १७ : ग्राहकांना मागणीनुसार हॅन्ड सॅनिटायजर आणि मास्क उपलब्ध करून द्यावेत, औषध विक्रेत्यांनी विनाकारण त्याचा साठा करून ठेऊ नये, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले. राज्यात उद्भवलेल्या कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख औषध उत्पादक आणि वितरक यांच्यासमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.

यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरूण उन्हाळे, ऑल इंडिया केमिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे आणि मान्यवर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ.शिंगणे म्हणाले, सध्या सॅनिटायजर आणि मास्क यांची मागणी वाढली आहे. तेव्हा ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आपल्या दुकानात मुबलक प्रमाणात चांगल्या दर्जाचे उत्पादन ठेवा आणि योग्य किंमतीतच ते विका अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी हात साबणाने धुवा, स्वच्छता राखा, सर्दी खोकला किंवा आजारपणाचे लक्षणं वाटत असतील तर तपासणी करून घ्या. स्वत:ला इतरांपासून दूर ठेवा, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले.

अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

सॅनिटायजर आणि मास्क याचा काळाबाजार होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी औषध विक्रेत्यांची बैठक संपल्यानंतर प्रत्यक्ष केमिस्ट स्टोअरवर जाऊन पाहणी केली. तिन बत्ती चौक मलबार हिल भागातील दोन दुकानांत त्यांनी अचानक भेट दिली. या दुकानात सॅनिटायजर, मास्क उपलब्ध आहेत का? ते योग्य दरात विकले जाते आहे काय याची प्रत्यक्ष चाचपणी केली. या दुकानात उपलब्ध सॅनिटायजरमधील घटक योग्य असल्याचे तपासले. ग्राहकांना दिलेल्या बिलावरील रक्कम एमआरपी पेक्षा जास्त तर नाही याची देखील त्यांनी खात्री केली. यावेळी अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी सोबत होते.

0000

विसअ/अर्चना शंभरकर/ बैठक अन्न व औषध प्रशासन

अतिरिक्त प्रवास भाडे घेणाऱ्या खाजगी बसेस वर कारवाई करण्याचे परिवहन मंत्री अनिल परब याचे निर्देश

मुंबई, दि. १७ : राज्यात कोरोना विषाणू (कोविड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवा वगळून शाळा, महाविद्यालय व खाजगी कंपन्या यांनी सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी जेथे अधिक बसेस सोडण्याची आवश्यकता आहे तेथे त्यानुसार त्वरित कार्यवाही करुन प्रवाशांची संभाव्य गैरसोय दूर करण्याच्या सूचना एसटी महामंडळाला देण्यात आल्या आहेत. परंतू खाजगी बसेस कडून जर अधिकचे प्रवास भाडे घेण्यात येत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले.

श्री.परब म्हणाले, अत्यावश्यक सेवा वगळता खबरदारीची उपाययोजना म्हणून काही खाजगी कंपन्यानी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. तसेच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थी, प्रवाशी गावी जात आहेत. या काळात खाजगी बस सेवांनी अधिकचे प्रवास भाडे घेतल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. खाजगी बससेवांनी सामाजिक बांधीलकीतून योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करून सहकार्य करावे, असेही श्री.परब यांनी यावेळी संगितले.

श्री.परब म्हणाले, राज्यातील प्रमुख शहरातील गर्दीच्या बसस्थानकावरील बैठक व्यवस्था दररोज दिवसातून दोन-तीन वेळा सॅनिटायझरचा योग्य वापर करून स्वच्छ केली जावी. तसेच बस स्थानकाचा परिसर जंतुनाशकांची फवारणी करून निर्जंतुक केला जावा वाहकाकडे कर्तव्यावर निघत असताना, सॅनिटरी लिक्विडची एक बाटली देण्यात यावी, प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांनी ती उपलब्ध करावी. याचबरोबर आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बस सॅनिटरी लिक्विड मिश्रित पाण्याने स्वच्छ धुऊनच मार्गस्थ केली जावी. तसेच बसस्थानकावरील उद्घोषणा यंत्रणेद्वारे वेळोवेळी कोरोना विषाणूंच्या संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रवाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत. अशा प्रकारे एसटी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे प्रवाशांनीही काळजी घ्यावी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही श्री.परब यांनी केले आहे.

0000

काशीबाई थोरात (वि.सं.अ)

कुक्कुट उत्पादनांमुळे कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई – पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांची माहिती

मुंबई, दि. १७ : कुक्कुट उत्पादनाद्वारे कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचवू शकतो ही बाब पूर्णतः अशास्त्रीय व निराधार असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, मोबाईलवर अशा अफवा पसरविणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येत असून अशा अफवांविषयी नागरिकांनी दक्ष रहावे, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केले आहे.

श्री.केदार म्हणाले, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सोशल मीडिया उदा. फेसबुक, व्हॉट्सॲपवर, युट्युबवर कुक्कुट मांस व इतर उत्पादने यांच्या आहारातील समावेशाबाबत विविध अशास्त्रीय बाबी पसरवल्या जात आहेत. अशा अफवांमुळे कुक्‍कुट खाद्य निर्मिती व कुक्कुट पालनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. या उत्पादनाद्वारे कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचू शकतो हे पूर्णतः अशास्त्रीय व निराधार आहे, असे त्यांनी सांगितले.

चिकन अंडी खाल्ल्याने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होतो, अशी व्हिडिओद्वारे खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्यांची गांभीर्याने दखल घेत सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एकाला आंध्रप्रदेशातून तर दुसऱ्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. अफवा पसविणाऱ्यांचा शोध सुरु असून त्यांच्यावरही गंभीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे पोल्ट्री व्यवसाया करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, असे श्री.केदार यांनी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/17.3.2020

ताज्या बातम्या

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

0
मुंबई दि. 29 - स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
नागपूर,दि.29 :  येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची...

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती...

0
तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६००...

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २९: राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना...

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

0
मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे...